Tuesday, July 31, 2018

वात्रटिका : फाटके कपडे


पूर्वी मध्यमवर्गीय रफू करून तेच कपडे पुन्हा-पुन्हा  वापरायचे. जास्ती जुने व फाटके कपडे मोलकरीणला किंवा भिकार्याला दान म्हणून देत होते. आज फाटलेले कडे माल व उच्चभ्रू शॉप मध्ये महागात विकले जातात.  त्या अनुषंगाने हि क्षणिका:


*रफू कारीगर 
झाला बेरोजगार
फाटक्या कपड्यांची 
फैशन आज आली. 


 रफू कारीगर :फाटके कपडे  दुरुस्त करणारा . 


Monday, July 30, 2018

वात्रटिका (शतशब्द) - : काही मुली कधीच मोठ्या होत नाही


 मेट्रोत डुलक्या घेता-घेता ऐकू आलेले आजच्या तरुणींचे  संवाद:
 
पहिली: हाय, भारीच दिसते आहे, कुणी मित्र भेटला का. 

दुसरी: अजून तरी नाही. 

पहिली: तू सेकंड ईअर मध्ये गेलीस, ना. अजूनही मित्र नाही भेटला, कमाल आहे, काही प्रोब्लेम? 

दुसरी: नाही यार, इथे नुसते कुणाला हाय केली किंवा स्मायली दिली तर तो चक्क गळ्यात पडायला कमी करत नाही. त्या पेक्षा शाळेतील मित्र बरे होते. 

पहिली: खरंच ग! शाळेतील मित्र कधीच गळ्यात पडायचे नाही. भित्रे भागुबाई होते ते. मला तर बाई आवडेल कुणी गळ्यात पडलेले? 

दुसरी: तुझे पहिले वर्ष आहे, म्हणून तू असे म्हणते. बघ लवकरच या मजनुंचे खरे स्वरूप तुला कळेल. मग तू हि म्हणशील शाळेतलेच बरे होते.

पहिली: स्वाती म्हणते तेच खरं! काही मुली कधीच मोठ्या होतच नाही. ....

Friday, July 27, 2018

आठवणीतून -कामधेनू


 
चार वर्षांपूर्वी जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर, मनात आलेले विचार....
हक्काची गाय आणली
पुढ्यात चारा टाकला
तिने भरपूर दूध दिले.
सखी, भार्या, माता
कर्तव्य चोख बजावली.
चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य
त्यात कसले आले प्रेम
माझा शुद्र पुरुषी विचार.
त्या दिनी हॉस्पिटल मध्ये
दोन्ही हातानी मला
बेड वर बसविले.
  सहज तिच्या डोळ्यांत पाहिलं
तिथे दिसले केवळ
निखळ निरागस प्रेम.
स्वत:ची लाज वाटली
का ओळखू नाही शकलो
प्रेम तिचे?
थरथरत्या हातानी
तिचा हात घट्ट पकडला
कापऱ्या आवाजात म्हणालो
भीती वाटते मला.
खंबीर आवाजात ती म्हणाली
काही नाही होणार तुम्हास्नी
मी आहे ना.
त्या क्षणी  ती मला
यमराजाशी झुंज देणारी
सावित्री सम भासली.
प्रेमाच्या  माणसांसाठी
सर्वस्व अर्पण करणारी
संसारात सुखाचे
रंग भरणारी.
खरोखरीची
कामधेनूच ती.
 

Wednesday, July 25, 2018

जशी दुकान तसा भाव


एका लग्नात गेलो होतो. मोठ्या FMCG कंपनीच्या मोठ्या हुद्द्यावर असलेले एक सज्जन भेटले. जेवायला वेळ होता. सहज एका स्वदेशी कंपनीचा विषय काढला. ते म्हणाले समजा तुमची कंपनी आहे. तुमचे उत्पादन सर्वोत्तम, तुम्ही नफा कमी घेणार उत्तम. ग्राहकाला उत्तम दर्जेची वस्तू स्वस्त मिळणार उत्तम. पण एक महत्वाची गोष्ट तुम्ही विसरता. प्रत्यक्ष ग्राहकाला समान विकणार्या दुकानदाराला जर कमी कमिशन देत असाल तर तुमची कंपनी जास्त पुढे जाऊ शकत नाही. त्याचे एक कारण ९९ टक्के ग्राहकांना पेकिंगच्या आत वस्तू कुठल्या दर्ज्याची आहे, हे माहित नसते व ते तपासण्याचे कष्ट हि तो घेत नाही.  "क्या चल रहा है" सारखे विज्ञापन पाहून तो निर्णय घेतो. ग्राहक नेहमीच उत्तम दर्जेची आणि स्वस्त वस्तू घेईल हि धारणा काही अंशीच ठीक आहे. तुमच्या कंपनीची वस्तू विकण्याची इच्छा दुकानदाराच्या मनात असेल तरच तो तुमच्या कंपनीच्या वस्तू दुकानात ठेवेल, अन्यथा नाही. जी कंपनी जास्त कमिशन देत असेल तिचे उत्पाद चांगले हे ग्राहकच्या डोक्यात भरण्याचा प्रयास तो नक्कीच करणार. चांगल्या दर्जाच्या वस्तूसाठी ग्राहक पंचवीस-पन्नास रुपये जास्त द्यायला नेहमीच तैयार असतोच.
  
त्या सदगृहस्थाने, पुढे माहिती दिली. आपल्या इथे सामान्यत: ४ प्रकारची दुकाने आहेत. महानगरात VVIP भागातील दुकाने. तू दिल्लीचा, सीपी, साउथ एक्स. अश्या ठिकाणी दुकानांचे भाडे जास्त असते. दुकान एसी असते. आंग्ल भाषा बोलणारे कर्मचारी असतात. अर्थात खर्च जास्त. इथे समाजातील उच्चभ्रू लोक समान घ्यायला येतात. भीडभाड जास्त रहात नाही. ग्राहकांना पैश्यांची चिंता नसते. हा दुकानदार त्याच वस्तू विकणार ज्यात त्याला जास्तीसजास्त कमिशन मिळणार. मग तो ७० रुपयात मिळणारे मध नव्हे तर १५०-२०० रुपयांत उत्तम पेकिंग केलेले मध विकणार हे साहजिक आहे. हा दुकानदार तुमचे उत्पादन कदापि ठेवणार नाही. इथे उत्तम पेकिंग मध्ये गुंडाळून ठेवलेला विदेशी कचरा हि चांगल्या भावात विकल्या जातो.

दुसर्या प्रकारची दुकाने म्हणजे मोठे-मोठे माल. हे हि एसी असतात. पण इथे भरपूर ग्राहक येतात. देशी-विदेशी सर्व प्रकारचे ब्रांड इथे मिळतील. इथे येणारे अधिकांश ग्राहक आंग्ल भाषा शिक्षित तरुण असतात. टीवी, हॉलीवूड, बॉलीवूडचा प्रभाव या ग्राहकांवर असतो. सामान्यत: त्यातहि अधिकांश आंग्ल शिक्षित तरुण ग्राहकांच्या मनात विदेशी वस्तू उत्तम हि धारणा. ग्राहक स्वत: उत्पादन निवडतो.  काही ग्राहकांना तुमची उत्पादने पाहिजे असतील, त्याहि या माल मध्ये मिळतील. पण सर्वांना सहज न दिसेल अश्या रीतीने ठेवलेली. 

तिसर्या प्रकारची दुकाने, म्हणजे गल्ली-बोळातील छोटी-छोटी दुकाने. इथे किराणाच्या सामानासोबत, दूध, अंडी, ब्रेड, तंबाकूच्या पुड्या, छोट्याशा फ्रीज मध्ये काही थंड पेयांच्या बाटल्या इत्यादी वस्तू मिळतात. सकाळी दूध-ब्रेड विकल्यानंतर. दिवसभरात काही जास्त धंधा होत नाही. ग्राहक हि निम्नवर्गीय असतात. गरीब ग्राहक पाव-अर्धा किलो समान गुणवत्ता न पाहता घेतात. पाचशे-हजार रुपयांची उधारी नेहमीच असते. या दुकानात हलक्या प्रतीचे व डुप्लिकेट समान गरीब ग्राहकांना विकल्या जाते. इथे तुमचे उत्पादन चुकूनही कुणी ठेवणार नाही. 

शेवटचा प्रकार म्हणजे, किराणाचे दुकान जेथून मध्यमवर्ग महिन्याचे राशन उचलतो. इथे हि ग्राहक उधार घेतात. हजार ते पाच हजार पर्यंत उधारी असणे सामान्य बाब आहे. वर्षानुवर्षे समान घेणारे ग्राहक इथे असतात. नेहमीचाच दुकानदार असल्यामुळे, दुकानदाराचे मत व सिफारीशी वर ग्राहक विश्वास ठेवतो. हा दुकानदार हि तुमचे उत्पादन ठेवेल, ग्राहकांच्या मागणीनुसार. तुमच्या उत्पादनाची शिफारीश, स्वत: वापरात असेल, तरी हि ग्राहकाला कधीच करणार नाही. तुमचे प्रतिस्पर्धी, जास्त मुनाफा घेणारे, या दुकानदाराला अधिक कमिशन देऊन, तुमचे उत्पादन ठेवायला हतोत्साहित करतील. अनेक अफवाः पसरविल्या जातील. शेवटी धंद्यात सर्व काही उचित असते.

तुम्हाला स्वत:ची दुकाने काढून उत्पादने विकावी लागतील. पण अश्यारीतीने तुम्ही जास्तीसजास्त १०टक्के ग्राहकांपर्यंत पोहचू शकाल. 

त्यांच्या सोबत झालेल्या चर्चा झाल्यावर प्रत्यक्ष परिस्थिती तपासून बघितली. सीपीतील विभिन्न राज्यांचे इम्पोरिअम व उच्चभ्रू ग्राहक ज्या दुकानांत येतात. तिथे किमंती बर्या पैकी जास्त होत्या. मीठ हि किमान २७ रु किलो वाले दिसले. 

गल्लीत एक विधवा छोटेखानी दुकान चालविते, तिच्या दुकानातून सकाळी फक्त दूध घेतो. सहज तिला विचारले, तांदूळ काय भाव. ती उतरली, साहेब, तुमच्या खाण्यालायक नाहीत. गल्लीत एका रूमच्या भाड्याच्या खोलीत संसार थाटणारे, तिचे ग्राहक. 

उच्चभ्रू ग्राहकांसाठीच काही कंपन्या चांगली पेकिंग करून वस्तू भारी किमतीत  विकतात, दुकानदाराला ५०टक्के किंवा त्याहून जास्त  कमिशन देतात. २०० रुपयांत मिळणारा एलोविरा ज्यूस इथे ५००-१००० रुपयाहून कमी किमतीत मिळणार नाही.  

चर्चेतून निष्पन्न काढले. 

१. किराणा विकणारा दुकानदार, fmcg सेक्टर मध्ये सर्वात महत्वाचा व्यक्ती आहे. तो प्रसन्न राहिला पाहिजे. दुसरे ३० टक्के कमिशन देत असेल तर तुम्ही किमान २० टक्के कमिशन  दिले पाहिजे. अन्यथा एका बिंदू वर आल्यावर तुमची विक्री वाढणार नाही किंवा दुसर्यांपेक्षा कमी गतीने वाढेल.  शिवाय दुकानदार ग्राहकांचे सहज लक्ष जाईल अश्या ठिकाणी तुमच्या वस्तू ठेवणार नाही. 

२. दुकानदाराला कमिशन व्यतिरिक्त हि अनेक भेटवस्तू दिल्या पाहिजे

३.  अधिकांश उत्पादक वस्तू कुठे विकायची आहे, कोण ग्राहक आहे, या निकषावर किमंत ठरवितात. गुणवत्तेच्या आधारावर नाही. समानदर्जाच्या वस्तूंची किमंत वेगवेगळी असते.

ग्राहकांसाठी: 

१.गुणवत्ता आणि किमंत या बाबतीत ग्राहकाला जागृत करणे गरजेचे. 

2. महागातली वस्तू उत्तम हे खूळ डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे.  

३.पेकिंगच्या आत काय आहे, याची तुलना करून वस्तू घेणे शिकले पाहिजे. त्यासाठी  स्वत: खरीदारी करावी लागेल. घरात बसून किराणा मागवत असाल तर दुकानदार तुम्ही सांगितलेली वस्तू अन्यथा ज्यात  कमिशन  जास्त असेल तीच वस्तू तुम्हाला  पाठवेल. 

४. शक्यतो प्रसाधन सामग्री  साबण, शेम्पू, क्रीम इत्यादी इत्यादी हिरवे टॅग वाली विकत घ्यायची.

५. शाकाहारी  ग्राहकांनी बिस्कूट इत्यादी हि हिरवे टॅग वाले विकत घेतले पाहिजे. 

बाकी गेल्या काही वर्षांपासून मी फक्त स्वदेशी, सर्वोत्तम व कमी भाव असलेले उत्पाद विकत घेतो.  

Tuesday, July 24, 2018

काही क्षणिका : राख




जाळल्या स्मृती 

हृदयी उरली

राख विस्मृतीची.




धरती जळाली

 सवे राख झाली 

वीज फिदायनी.




मेघांच्या अश्रूंत

भिजली राख 

प्रगटले चैतन्य. 


कितीही विसरण्याच्या प्रयत्न केला तरी राखेच्या रुपात स्मृती आपल्या हृदयात ठाण मांडून बसतीलच.


किती हि वीज पडली, उध्वस्त झाले जीव तरीहि धरतीच्या कोखात जीवन हे निजपणारच. राखेतून पुन:जीवित होणार्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे. 


 

Monday, July 23, 2018

आज आषाढी एकादशी, विठ्ठल नाही पंढरपुरी


आज आषाढी एकादशी 
विठ्ठल नाही पंढरपुरी 
भक्ताच्या दर्शनासी 
गेला तो मुंबापुरी

मला वाटते कधी-कधी इतिहासाची पुनरावृत्ती होते. महाराजांची कुलदैवत आई तुळजा भवानी. आसुरी शक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अफजल खानाने आईची विटंबना केली. महाराजांच्या जागी दुसरा कुणी असता तर त्वेषाने खानवर तुटून पडला असता. हजारो मावळे शहीद झाले असते. स्वराज्याचे स्वप्न हि भंगले असते. अश्या प्रसंगी हि महाराज शांत राहिले. स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. 

विठ्ठल तर भक्तांचा देव. भक्तांचे कष्ट पाहून तो नाथा घरी पाणी भरायला गेला. भानुदासाला वाचविण्यासाठी शुष्क काष्ठाला हिरवे केले. जिथे  कठोर तपस्येनंतर देवांचे दर्घडते इथे पंढरीत तर साक्षात पांडुरंग भक्तांच्या दर्शनासाठी विटेवर उभे आहेत, अनेक युगांपासून. आपल्या एका भक्ताला इथे येण्यापासून आसुरी शक्तींनी  रोखले आहे, हे पांडुरंगाला कळणारच. मग त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी पांडुरंग त्याच्या घरी जाणारच. अर्थात हि साधी सौपी गोष्ट आसुरी शक्तींच्या अधीन असणार्या मूर्खांना कळणे अशक्यच. आज पांडुरंग चरणी एकच प्रार्थना. पांडुरंगा तू दयाळू आहे, आपल्या सर्व अज्ञ लेकरांना  क्षमा कर, क्षमा कर. 

Friday, July 20, 2018

काही क्षणिका : श्रावणात



गंगा आली 
अमृत पाणी 
श्रावणात.
 
पृथ्वी न्हाली 
हिरवी नटली
 श्रावणात.

ऊन- पाऊस 
 लग्न भुताचे
श्रावणात.


सोनेरी ढगांचा 
सतरंगी साज
श्रावणात.




Thursday, July 19, 2018

पाऊस - काल आणि आज



द्वाड पोरांनी 
मटकी फोडली 
अमृताची.



  टेंकर फोडले 
 कान्हा उपाशी 
दुधाविना. 




मेघ (द्वाड पोरे) आकाशातून अमृताचा वर्षाव करतो. इथे जाणते टेंकर फोडतात, तेही दुसर्यांचे. दुधाविना तान्हा कसा जगेल एक क्षण हि हा विचार जाणत्यांच्या मनात येत नाही. बहुतेक समर्थांनी अश्या लोकांसाठी पढत मूर्ख हा शब्द वापरला असेल. 


Wednesday, July 18, 2018

दोन क्षणिका: सुगंध




वासंतिक सुगंध 
वार्यासवे आला 
बंद दरवाज्या  समोर 
दम त्याने तोडला.


एसीच्या वार्यात 
कृत्रिम सुगंध 
रोग केंसरचा
असा पसरला. 



टीप: बंद दरवाजा, घरात एसी. मातीचा सुगंध असो किंवा फुलांचा सुगंध  घरात येऊ शकत नाही. डीओचा रासायनिक कृत्रिम सुगंध, केंसरला कारणी भूत आहे. 

Tuesday, July 17, 2018

क्षणिका - असत्य




तारेवरची कसरत 
पैलतीरी स्वर्गसुख
तोल गेला नरकवास. 

Monday, July 16, 2018

जन्मपत्रिका म्हणजें शोकपत्रिका


सौप्या शब्दांत सांगायचे जन्माची जागा आणि १२ राशी, सूर्य, चंद्रमा व  ग्रह इत्यादींची त्या जागेची संबंधित स्थिती. या स्थितीला कागदावर मांडणे म्हणजे जन्मकुंडली. त्या कुंडलीनुसार बालक/बालिकेचे भविष्य मांडणें म्हणजें जन्मपत्रिका.  काही ग्रह चांगले, काही दुष्ट.  शनीची साडेसाती तर मंगळी तर लग्न होणे दुष्कर.  या सर्व ठोकताळ्यांचा आधार काय, कुठलाच जोतिषी सांगू शकत नाही. मजेदार गोष्ट जगात अनेक प्रकारचे जोतिष सिद्धांत व अनेक प्रकारच्या जन्म कुंडल्या आणि त्यांचे वेगवेगळे ठोकटाळे. कुठल्या ठोकताळ्यांवर विश्वास ठेवायचा, हा हि एक प्रश्न आहे. 

माझ्या नाते संबंधातील गोष्ट. वडिलांना पत्रिकेचे भारी ज्ञान. पत्रिका पाहून मुलगी बघायचा कार्यक्रम ठरविला तिथे मुलगी नकार द्यायची किंवा मुलाला मुलगी पसंद नाही पडायची. बिना पत्रिका बघता आधी मुलगी बघितली तर पत्रिका आड यायची. वयाची ३५ची उलटली. मुली यायला बंद झाल्या. शेवटी त्यांच्या मुलाने एका सहकर्मी मुलीशी लग्न केले. पत्रिका, जात काही हि पहिली नाही. त्यांचा संसार सुखाचा आहे. पत्रिका पाहून लग्न झाल्यावर हि संसार सुखाचा होईल याची शाश्वती कुठला हि जोतिषी किंवा जन्मपत्रिका देत नाही.  कारण सुखी संसार आणि पत्रिका, यांचा संसाराशी काही हि घेणे देणे नाही. 

पत्रिकेत मंगळ असेल तर लग्न जमणे जवळपास अशक्य. शेवटी मंगळी मुलगा भेटला कि लग्न करून जवाबदारी झटकली जाते. मुलीचा संसार उध्वस्त झाला तरी चालते. शेवटी खापर पत्रिकेतल्या मंगळावर फोडल्या जाते. कधी-कधी लग्नच होत नाही. मुले/ मुली आयुष्भर अविवाहितच राहतात. दोषी कोण पत्रिकेतील मंगळ. या शिवाय पत्रिकेतील दुष्ट ग्रहांची शांती करण्यासाठी अवाढ्य खर्च केला जातो, चित्र-विचित्र रंगांचे दगड बोटांमध्ये घातले जातात. गंडा, ताबीज, दोरे बांधले जातात. आपल्या पत्रिकेत ग्रह चांगले नाही, याचा मनावर परिणाम झाला कि समजा आयुष्य उध्वस्त होणारच.  

एक प्रश्न कुणाच्या हि मनात येईल, खरंच पत्रिकेतल्या ग्रहांचा मानवीय जीवनावर परिणाम होतो का? हाच प्रश्न एका जोतिषीला विचारला. तो म्हणाला, पहा चन्द्रमाच्या प्रभावाने समुद्रात ज्वार-भाटा येतात. मग त्याचा परिणाम माणसावर का नाही होणार? प्रतिप्रश्न रास्त होता. मी म्हणालो तो प्रभाव प्रत्येक माणसावर एक सारखा पडतो. वेगवेगळा पडणार नाही. शारीरिक परिस्थितीनुसार कमी जास्त पडू शकतो, मान्य आहे. पण त्याच्या कुंडलीत कुठल्या स्थानावर चंद्रमा आहे याशी काही संबंध आहे का? जोतिषी चमकलाच असा प्रश्न आधी कुणीच विचारला नसेल. त्याच्या जवळ उत्तर नव्हते. सर्व ग्रह विधात्याने निश्चित केलेल्या मार्गानुसार सूर्याचे परिभ्रमण करीत आहे. त्यांना तुम्ही केंव्हा पैदा झाला, त्या वेळी ते ग्रह तुमच्या पत्रिकेत कुठल्या स्थानी होते, याच्याशी काही घेणे देणे नाही. त्यांच्या गृत्वाकर्षण, प्रकाश, इत्यादी प्रभाव जर पृथ्वीवरच्या लोकांवर पडत असेल तर सर्वांवर एक सारखाच पडणार. वेगळा नाही. शिवाय ब्रह्मांडात अब्जावधी खगोलीय पिंड आहेत त्यांच्या हि प्रभाव पृथ्वीलोकावर पडत असेल त्यांची हि जन्मकुंडलीत मांडणी का करत नाही. या प्रश्नावर जोतिषबुवा चूप राहिले. चिडून शेवटचा बाण त्यांनी मुखातून काढला, विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, पुढे काही बरे वाईट झाले तर बोंबलू नका. मी म्हणालो, पुढे काय होणार, हे विधात्याशिवाय कुणीच सांगू शकत नाही. जोतिषी तर निश्चित नाही. 

आमच्या वडिलांनी आमच्या लग्नाच्या वेळी जन्मकुंडली / पत्रिका बघितली नाही. घरात कुणाचेच काही वाईट झालेले नाही. पुढच्या पिढीने तर प्रेम विवाह केले जाती  बाहेर हि, सर्वांचे संसार सुखीचे आहे. महर्षी दयानंद तर जन्मपत्रिकेला, शोकपत्रिका म्हणायचे. ज्यांना आपला संसार उध्वस्त करायचा असेल किंवा पैसा उडवायचा असेल त्यांनी जन्मपत्रिकेवर विश्वास ठेवावा. मंगळ आणि शनीची शांती करावी.  ज्यांना आयुष्यात पुढे जायचे असेल  जन्मपत्रिका विसरून पुरुषार्थावर विश्वास ठेवावा. लग्न हि अनुरूप मुलगा / मुलगी पाहून करावे. पत्रिका पाहून तर कदापि नाही. 

Thursday, July 12, 2018

घर एक बोध कथा


(आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार)

एका गावात एक घर होते. घरात आत शिरायला फक्त एक छोटासा दरवाजा होता. तो हि सदैव जाड काळ्या कपड्याने झाकलेला. त्या घरातील लोक रोज सूर्य उगवल्यावर छोट्याश्या दरवाज्यातून हातात एक बादली घेऊन बाहेर यायची. हाताने बादलीत काही तरी भरायचे नाटक करायची आणि घरात जायची. हा प्रकार कित्येक तास चालत असे. लोकांना त्यांच्या या वागण्याचे आश्चर्य वाटायचे. हळू हळू हि वार्ता  त्या राज्याच्या राजाच्या कानावर पडली. सत्य पडताळण्यासाठी एक दिवस राजा मंत्री सोबत भल्या पहाटे त्या घरासोमोर येऊन ठाकला. सूर्य उगवला, घरातून एक वयस्कर माणूस हातात बादली घेऊन बाहेर आला आणि आपल्या रिकाम्या हाताने बादलीत काहीतरी भरण्याचे नाटक सुरु केले. राजाला राहवले नाही त्याने विचारले, तुझ्या हातात काही नाही तरी हि तू बादलीत काहीतरी भरण्याचे नाटक करीत आहे. हा काय प्रकार आहे. तो माणूस विनम्रतेने म्हणाला, राजन आमच्या घरात आंधार आहे. मी सूर्याचे ऊन या बादलीत भरतो आणि घरात जाऊन ती बादली रिकामी करतो. राजाने हसू आवरीत विचारले, घरात प्रकाश पसरला का? तो म्हणाला, रोज कित्येक बादल्या भरून सूर्याचे ऊन घरात टाकतो तरी हि घरात आंधार राहतो. काहीच समजत नाही. राजा घराच्या दरवाज्याजवळ आला आणि तलवारीने काळे जाड कापड कापून टाकले. घरात सूर्याचा प्रकाश पोहचला. (गोष्ट इथेच पूर्ण होते). राजा म्हणाला, बघ दरवाजा उघडा असेल तर सूर्याचा प्रकाश घरात येईल, एवढी साधी गोष्ट तुला का कळत नाही. त्या माणसाने काही सांशक होऊन राजाकडे पहिले आणि विचारले, राजन सूर्याचा उन्हांसोबत धूळ माती पाऊस-पाणी, माश्या, डास व रात्रीच्या वेळी सर्प इत्यादी  येतील त्याचे काय? राजा मंद हसला आणि म्हणाला त्याचाही बंदोबस्त करतो. त्याने मंत्रीला आदेश दिला गवंडी करून या परिवारासाठी व्यवस्थित घर बांधून द्या.     

राजाच्या आदेशानुसार गवंडीने त्या परिवारासाठी घर बांधले. घरात शिरण्यासाठी एक मोठा दरवाजा, त्या शिवाय एक लोखंडी ग्रील असलेला एक जाळीचा दरवाजा हि. जेणे करून दिवस भर सूर्य प्रकाश व वारा घरात येत राहील. ग्रील सहित जाळीदार खिडक्या आणि काचेचे रोषनदान हि लावेले जेणेकरून धुळीची आंधी आल्यावर दरवाजे खिडक्या बंद केल्या तरी रोषनदान मधून प्रकाश येत राहणार. खिडक्या दरवाजांना जाळी असल्यामुळे रोगराई पसरविणार्या माश्या, डास इत्यादी घरात शिरू शकत नव्हते. रात्री दरवाजा बंद केल्यावर हिंसक पशु, विषाक्त सर्प इत्यादी घरात प्रवेश करु शकत नव्हते. तो परिवार आनंदाने त्या घरात राहू लागला. 

इथे घर म्हणजे माणूस. सूर्याचा उजेड म्हणजे ज्ञान. राजा म्हणजे गुरु. ज्ञानवान गुरु भेटल्यावर ज्ञानरुपी सूर्याचा प्रकाश घरात येतो. धूळ माती म्हणजे वाईट विचार. वाईट विचारांना दूर ठेवण्यासाठी दरवाजे खिडक्या बंद कराव्या लागतात. खिडक्या व दरवाज्याला लागलेली जाळी रोगराई पसरविणार्या किड्यांना घरात येऊ देत नाही. विषाक्त सर्प हि घरात शिरू शकत नाही.  हे सर्व  किडे  दुष्ट विचारांचे प्रतिक आहेत. मनात दुष्ट विचार आल्यावरच माणूस दुसर्यांना त्रास देतो, मारहाण करतो. या विचारांच्या जास्त आहारी गेल्यावर माणूस दुसर्यांचा खून हि करतो.  

हृदयाचे कपाट मोकळे ठेऊन ज्ञानाचा प्रकाश आत येऊ द्या. पण वाईट व दुष्ट विचारांना हृदयात स्थान देऊ नका. बहुधा हाच या कथेचा सार आहे. 


Wednesday, July 11, 2018

क्षणिका - अर्धसत्य



असत्यापासून दूर 
सत्यापासून हि दूर
स्वार्थ सिध्द करणारे 
आप मतलबी अर्धसत्य.

Tuesday, July 10, 2018

क्षणिका - मार्ग सत्याचा



अंगार वेदनेचा 
दुखांचा कष्टांचा
मार्ग हरिश्चंद्राचा. 

Monday, July 9, 2018

राधा हि बावरी



अवसेच्या राती 
यमुनेच्या काठी 
कृष्णाला शोधी 
राधा हि  बावरी.

काळी यमुना 
मेघ काळा
अदृश्य झाला 
घनश्याम.

मेघांच्या तालावर
बंशीची धुन
वीजेच्या समेवर 
दिसला ग! घनश्याम.

प्रेमाच्या सरीत 
कृष्णाच्या मिठीत 
एकरूप झाली 
राधा हि बावरी.

* मेघांच्या तालावर-वादळांचा गडगडाट
वीजेच्या समेवर- वीज कडकली 

Friday, July 6, 2018

कविता - मेघ बरसला





मेघ बरसला 
विरही अश्रूंचा 
खारा खारा.

मेघ बरसला 
प्रथम आषाढी
प्रिय वार्तेचा. 

मेघ बरसला 
 माळात रानात
काळा काळा.

मेघ बरसला 
भिजली धरणी
हिरवी हिरवी.