Thursday, December 31, 2020

मूक साक्षीदार

 

निर्जन जंगलातील एक देवालय. देवतेची पूजा सुरु होती. देवालयाच्या गाभार्यात पुजारी आणि दोन लोक उपस्थित होते. पूजा झाल्यावर पुजारी म्हणाला, ही जागृत देवता आहे, जो कोणी सच्च्या मनानी अपराधांची क्षमा मागतो, त्याला देवता क्षमा करते. पहिल्या व्यक्तीने देवते समोर हात जोडून प्रार्थना केली, भगवंत,आपण जाणता मी आपले कर्म पूर्ण निष्ठेने करतो. पण मी ज्या इस्पितळात कार्य करतो तिथे यावर्षी साथीच्या आजाराने मृत व्यक्तींनाहि काही दिवस जीवनरक्षक प्रणालीवर ठेऊन  इस्पितळाने लुटीचा धंधा केला. या घटनांचा मी साक्षीदार होतो. आपल्या पासून काय लपले आहे, पोटपाण्याचा प्रश्न मोठा बिकट असतो. हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहून सुद्धा मी अबोल राहिलो.  मी विवश होतो, भगवंत मला क्षमा कर. 

दुसरा व्यक्तीने देवासमोर प्रार्थना केली, माझे वडील साथीच्या आजाराशी झुंझ देत इस्पितळात मरण पावले. ते सज्जन पुरुष होते. तरीही त्यांच्या हातून न कळत काही अपराध झाले असेल तर त्यांना क्षमा कर. आपल्या चरणी त्यांना स्थान दे. 

पुजारीने तथास्तु म्हंटले. दोघेही मंदिराच्या बाहेर पडले. पहिला व्यक्ती दुसर्याला म्हणाला, साहेब आपले वडील कुठल्या इस्पितळात  स्वर्गवासी झाले. दुसर्या  व्यक्तीने इस्पितळाचे नाव सांगितले. पहिला व्यक्ती त्याच्या पाया पडत म्हणाला, साहेब मी त्याच इस्पितळात नौकरी करतो. तुमची माफी मागतो. दुसर्‍या  व्यक्तीच्या मनात राग, द्वेष घ्रुणा सर्वच भावना उचंबळून आल्या. त्याने डोळे बंद करून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. काही क्षणात त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.  दुसर्‍या व्यक्तीने विचारले, साहेब तुमच्या डोळ्यांत अश्रू .... पहिला व्यक्ती म्हणाला, मीहि तुझ्याच सारखा मूक साक्षीदार आहे, मलाही कल्पना आली होती, पण मी हि विवश होतो.  

Thursday, November 12, 2020

कोविड : जबाबदार कोण?

 

माझ्या मोठ्या बंधूंना स्वर्गवासी होऊन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी मनात एकच विचार सतत घोळत आहे, योग्य उपचार मिळाला असता तर कदाचित् माझा भाऊ वाचलाहि असता. इतके दिवस ब्लॉगवर काहीही लिहले नाही आणि काहीही नवीन वाचलेहि नाही. शेवटी मनात साठलेले  सर्व गरळ बाहेर ओकण्याचा निश्चय केला. सर्व शिक्षित लोकांप्रमाणे माझ्या भावाचाहि आधुनिक चिकित्सा शास्त्रावर विश्वास होता. त्याला कोविड झाला.  हॉस्पिटलमध्ये त्याची प्रकृती खालावत गेली. आधी ऑक्सिजन, व्हेन्टीलेटर, लाइफ सेविंग इंक्जेक्शन आणि शेवटी ओळख होती म्हणून अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी.... या प्रसिद्ध हॉस्पिटलचा संचालक भावाच्या चांगल्या ओळखीचा असल्यामुळे उपचारात हलगर्जीपणा झाला असे म्हणता येत नाही.

आधुनिक चिकित्सा शास्त्रात अनुसंधान आणि क्लिनिकल ट्रायलवर खर्या उतरलेल्या औषधांचा उपयोग केल्या जातो, मग ती औषधी रासायनिक असो, धातू पासून बनली किंवा हर्बल असो। आज कोविड वर आधुनिक चिकित्सा शास्त्रात औषध नाही. अश्या काळात आपला अहंकार सोडून दुसर्या  चिकित्सा पद्धतीने शोधलेल्या औषधांचा प्रयोग करण्यात काही गैर होते का? पण तसे न करता, दुसर्या शास्त्रातील औषधी बाबतीत मिडीयाच्या मदतीने दुष्प्रचार  करून  लोकांच्या मनात भ्रम पैदा केला. शेकडोंच्या संख्येने कोर्ट केसेस दाखल केले. उच्च न्यायालयाने  विचारले दाव्यात असत्य काय आहे, तर केस टाकणारे उत्तर देऊ शकले नाही. या दुष्प्रचारामुळे अधिकांश शिक्षित (?) वर्ग उपचारापासून वंचित राहिला. दुर्भाग्य त्यात माझा मोठा बंधूहि होता.

आपल्या मनात प्रश्न येणार मी हे का म्हणतो आहे. ज्यावेळी माझा भाऊ हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी संघर्ष करत होता, माझ्या रूममध्ये बसणाऱ्या एका सहकर्मीला कोविड झाला. आम्हा सर्वांचे टेस्ट झाले. एक एमटीएस जो काढा पिऊन यायचा नेगेटिव्ह निघाला. मी ऑफिसला जाणे सुरु केल्या पासून, एक आयुर्वेदिक कंपनीचे औषध घेणे सुरु केले होते. मीहि नेगेटिव्ह निघालो (माझ्या हृदयाची सर्जरी झालेली आहे,  सायनसचीहि समस्या आहे. या शिवाय  पेंक्रियाचा टीबीहि होऊन चुकलेला आहे). एक क्लार्क  पाजीटीव्ह निघाला. तो हळदीचे दूध घेणारा होता. तो घरीच राहिला दोन आठवड्यात ठीक होऊन ऑफिस मध्ये येऊ लागला. एक पीएस परिवार सहित पाजीटिव्ह निघाला. फरीदाबादच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती झाला. तिथे आधुनिक पद्धतीच्या उपचारा सोबत सामाजिक कार्यकर्ता काढा आणि योग  सुविधाहि पुरवत होते. तोहि  ठीक झाला पण प्रकृती पूर्ण बरी झालेली नाही, बहुतेक महागड्या औषधांचा दुष्परिणाम. माझ्या लेकीच्या सासरी  माझी लेक, सासरा आणि तिची भावजय हॉस्पिटलमध्ये नौकरी करतात. सर्व ठिकाणी कोविडचे रोगी आहेत. दीराचा डोळ्यांचा दवाखाना आहे. त्याला कोविड झाला. घरी सर्वांचे टेस्ट झाले, सर्व नेगेटिव्ह निघाले. दीरालाहि कुठलाहि त्रास झाला नाही. कारण,  हिमाचल मध्ये त्यांच्या भागात जंगलात भरपूर गिलोय होते. परंपरेने हिवाळ्यात गिलोय कापून वाळवून ठेवतात.  गिलोयचा चहा, दूध आणि इतर पदार्थांत  वापर करतात. यावरून निष्कर्ष निघतो स्वदेशी उपचार पद्धतीहि कोविड वर प्रभावकारी आहे आणि स्वस्तहि आहे.

कोविड काळात जर औषध नाही तर रोगींचा उपचार करण्यासाठी, आपली पद्धती श्रेष्ठ हा अहंकार सोडून,  सुरुवातीपासून आधुनिक चिकित्सा पद्धती सोबत  योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, इत्यादी सर्व पद्धतींचा गरजेनुसार वापर केला असता तर निश्चित हजारो लोकांचे प्राण वाचले असते. अखेर स्वास्थ्य मंत्रालयाने आयुर्वेदिक औषधीहि वापरण्याची अनुमती दिली. तो पर्यंत भरपूर उशीर झालेला होता. 

कोविड काळात एक मात्र निश्चित कळले. फक्त एका पद्धतीचे शास्त्र घेऊन आपण महामारीशी लढू शकत नाही. भविष्यात आधुनिक चिकित्सा शास्त्राचे शिक्षण घेताना स्वदेशी चिकित्सा पद्धतीचे ज्ञानहि भावी चिकित्सकांना मिळाले पाहिजे,  त्या शिवाय पुढील महामारींचे सामना आपण करू शकणार नाही. असो.


Saturday, August 8, 2020

पर्यावरणवादी एनजीओ(???) आणि मेट्रो

 
हिमालय ते समुद्रापर्यंत पसरलेल्या भूभागाला भारतवर्ष म्हणून संबोधित केले जाते. एक छत्र लोकतान्त्रिक  शासनाच्या अधीन आपला देश सुख आणि समृद्धीच्या मार्गावर आहे. जगात कुणीच कुणाचा मित्र नसतो. प्रत्येकाला स्वत:च्या हितासाठी दुसर्याचे शोषण करायचे असते. आपल्या देशाची प्रगती कुणालाच आवडणार नाही. सीमेवर प्रत्यक्ष युद्ध अत्यंत महाग असते. मग दुसरा उपाय देशात अस्थिरता माजविणे आणि विकासाची कार्य अवरुद्ध करणे. साहजिकच आहे, यासाठी शत्रू आपल्याच देशातील प्रिंट मिडिया, सोशल मिडीया इत्यादीचा वापर आपल्याच विरुद्ध करणारण्याचा प्रयत्न करणार. 
 
समाजसेवाच्या उद्देश्याने अनेक लोक एनजीओ स्थापन करतात. उद्देश्य समाज सेवाआणि विषय - स्त्रियांचा, दलितांचा, वनवासी लोकांचा, शेतकर्यांचा, मजुरांचा आणि पर्यावरणाचाहि. शत्रू अत्यंत चतुराईने या एनजीओंना आपल्या जाळ्यात अटकवितात. त्यासाठी आर्थिक मदत, अंतराष्ट्रीय पुरस्कार इत्यादी देतात.  त्यांचा आपल्या हितांसाठी वापर करून घेतात. अनेकदा समाजसेवी लोकांना कळतच नाही कि त्यांचा वापर झाला आहे. आपल्या आकांच्या इशार्यावर ते एका कठपुतलीप्रमाणे  विकासकार्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करू लागतात. अनेक वकील  जनहित याचिका दायर करून कोर्टाला विकासकार्यांना स्थगिती द्यायला बाध्य करतात. शेवटी कंटाळून सरकार कुठल्याही पक्षाची असो, विकासाची कार्य करणे सोडून देते. उशीर झाल्याने विकासाचे प्रोजेक्ट्स अनेकदा पांढरे हत्ती ठरतात. पुढील कार्यांसाठी स्वस्तात लोन हि मिळणे मुश्कील होते.  शत्रूचा उद्देश्य सफल होतो. वेगळा विषय पण रस्त्याचेहि अनेक प्रोजेक्ट्स फक्त पर्यावरण परवानगी न मिळाल्याने अनेक वर्ष रेंगाळले. काही लाख कोटींचे नुकसान फक्त यामुळेच देशाचे झाले. त्यामुळे अनेक भागांची प्रगती आणि रोजगार इत्यादींचे हि नुकसान झालेच.

गेल्या वर्षी गुजरात भटकंतीला गेलो होतो. सरदार सरोवर जवळ दोन स्थानिक तरुणीशी गप्पा मारल्या. दोन्ही शिकलेल्या होत्या. त्या सहज म्हणाल्या "आता आम्हाला कळते, सरदार सरोवरचा विरोध आमचे चांगले पुनर्वसन व्हावे हा मुळीच नव्हता. त्यांचा उद्देश्य फक्त प्रोजेक्ट्स पांढरा हत्ती झाला पाहिजे हा होता. आमचा वापर झाला आम्ही मूर्ख बनलो". नर्मदेचे पाणी लाखो शेतकर्यांच्या जमिनीला मिळाले. अनेक शहरात पिण्यासाठी पाणी मिळाले. गुजरात असो वा मध्य प्रदेश,  नर्मदा आंदोलनच्या नेत्यांप्रती स्थानिकांच्या मनातला  आक्रोश स्पष्ट दिसत होता. या वर्षी जनवरी महिन्यात टेहरी डॅम बघितला. सोबतीला असलेल्या कर्मचार्याचे घर हि पाण्यात बुडाले होते. त्या बदल्यात त्याला नौकरी मिळाली होती. त्याचेहि मत जवळपास असेच होते. पर्यावरणवादींच्या विरोध, जनहित याचिका इत्यादी मुळे टेहरी डॅम पूर्ण व्हायला अत्याधिक वेळ आणि अनेकपट जास्त खर्च आला. अनेक वर्ष उशिराने डॅमचा लाभ जनतेला मिळाला. देशाचे हजारो कोटींचे नुकसान करण्यात शत्रू सफल झाला. 
  
जून, २०१३ मध्ये पाऊस सुरु होण्यापूर्वी डॅम चतुर्थांश भरलेला होता.जेवढे शक्य झाले तेवढे पाणी या डॅम मध्ये साठवल्या गेले. त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. हजारो कोटींचे आर्थिक नुकसान हि टळले. हे सांगताना त्या कर्मचारीच्या   चेहऱ्यावर भाव सांगत होते कि टेहरी डॅम वर झालेला खर्च सार्थकी लागला.   
  
सरदार सरोवर असो किंवा टेहरी, सत्य एकच होते  भरपूर विदेशी मदत या न त्या रूपाने अनेक मान्यवरांना विरोध करण्यासाठी विदेशातून मिळाली होती. सुरवातीला सामाजसेवाच्या उदेश्याने भारावलेले एनजीओ नंतर पोट आणि प्रतिष्ठेसाठी समाज विरोधी तत्वांचे कठपुतली बनतात, हि विडंबना आहे.
 
भारतातील अधिकांश प्रिंट विशेषकरून मोठा आंग्ल प्रिंट मिडिया आणि दृश्य मिडीयात विदेशी हिस्सा जास्त आहे, त्यातहि तो हिस्सा भारत विरोधी लोकांजवळ आहे. या मिडीयाचा वापर करून विशेषकर आंग्ल शिक्षित लोकांना मूर्ख बनविणे अत्यंत सौपे असते. कारण ते आधीच मानसिक गुलाम असतात. त्यांचा वापर देशविरोधी एनजीओ दबाव गुट बनविण्यासाठी करतात. अधिकांश वेळा सफलहि होतात.
 
वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो प्रोजेक्ट्स सुरु झाले. मेट्रोमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणुकीची अपेक्षा असते. सरकारी प्रयत्नामुळे  विदेशातून अत्यंत कमी अर्थात दीड ते दोन टक्का व्याजावर यासाठी कर्जहि प्रोजेक्ट्स अनुसार मिळू लागले. पण हे कर्जहि चुकवायचे असते. तसे न झाल्यास पुढील प्रोजेक्ट्स साठी कर्ज मिळणे दुष्कर होईल. मेट्रो प्रोजेक्ट्स प्रदूषण कमी करतातच पण आर्थिक विकासाला हि चालना देतात. शहरातील गर्दी हि कमी करण्यात मदत करतात. उदा. मेट्रो मुळे अनेक सरकारी / गैर सरकारी प्रतिष्ठान द्वारकेत स्थापित झाले.  दिल्लीतहि पहिले दोन फेज वेळेच्या आधी पूर्ण झाले. पण फेज III ला कोर्ट केसेस इत्यादी मुळे उशीर झाला. फेज IV चे कार्यहि उशिरा अर्थात नुकतेच सुरु झाले आहे. एवढेच नव्हे दिल्ली मेरठ रेपिड रेल्वे ज्यामुळे हजारो वाहने कमी होणार तिचे कार्य हि २०१७ जागी २०१९च्या अखेर सुरु झाले. चारचाकी कंपन्या, पेट्रोल लाबी मेट्रोचा विरोध करणार हे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण पर्यावरण संरक्षक एनजीओ विरोध करतात, हे मात्र समजण्याच्या पलीकडचे आहे.

मुंबईत मेट्रो कारशेडचा विरोधहि पर्यावरणच्या नावावर सुरु झाला. इथेहि  आरेत फिल्म सिटी सहित अनेक निर्माण आहेत. त्यासाठी झाडे कापल्या गेली (अर्थात एक हि नवीन लावले नसणार) कुणीच विरोध केला नाही. पण कारशेडचा विरोध करण्यासाठी चेन्नई ते दिल्लीतले एनजीओहि  पोहचले. सरकारवर दबाव वाढविला. याच दबावामुळे कोर्टाने हिरवा कंदील दिला तरी सरकारने  कार्य  थांबविण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्या नंतरहि सरकारने अनेक कार्यांसाठी झाडांना कापण्याची परवानगी दिली. कोणत्याही एनजीओ ने विरोध केला नाही.  नव्या सरकारनें स्थापित कमिटीने हि कारशेड आरेतच ठेवण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतला.असो.
 
मेट्रो मुळे लाखो प्रवाश्यांचा वेळ वाचेल. ५ लाख वाहने रस्त्यावरून कमी होतील. पर्यावरण प्रेमीनी मेट्रोचे समर्थन केले पाहिजे पण तथाकथित पर्यावरणवादी विरोधात उतरले होते. मिडीयातहि मेट्रो विरोधात अनेक लेख आले. २३ हजार कोटींच्या प्रोजेक्ट्स मध्ये १३ हजार कोटींचे अल्प व्याजावर घेतलेले जिका लोन आहे. एक दिवसाचा उशीर म्हणजे किमान दोन ते तीन कोटींचे नुकसान. जेवढा उशीर तेवढा प्रोजेक्ट खर्च वाढणार. परिणाम महाराष्ट्र सरकारला विकासाच्या कार्यांसाठी स्वस्तात  लोन मिळणे नामुष्कील होणार.  शत्रूचा हेतू सफल होतो.

विकास आणि जनविरोधी एनजीओ मेट्रो प्रोजेक्ट्सचा जनतेला काहीच फायदा होणार नाही. पर्यावरणाचे नुकसान होईल इत्यादी सिद्ध करण्यासाठी अनेक प्रकारचे आकडे देऊन भ्रमित करण्याचा सदैव प्रयास करतात. आपण त्यांच्या जाळ्यात  अटकले नाही पाहिजे.लेख लिहिण्याचा हाच हेतू. 


Wednesday, July 22, 2020

आचार्य कुलं, हरिद्वार आणि दिल्लीतील वीआयपी भागांतील शाळा तुलनात्मक परीक्षा परिणाम



काही दिवसांपूर्वी इंडिया टीवी वर आचार्य कुलंच्या मुलांना योगाभ्यास करता पाहून माझा एक सहकारी म्हणाला. बाबांच्या शाळेत मुलांना टाकणे व्यर्थ. योगाभ्यास करण्याने कुणाचे भविष्य बनत नाही. त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या आंग्ल भाषी शाळेत टाकणे गरजेचे.  तो म्हणाला अनेक सरकारी कर्मचारी स्वत:चे घर असूनही क्वार्टर घेतात त्याचे कारण या भागातील चांगल्या शाळा अर्थात सेंट कोलंबस, डीपीएस इत्यादी. या शाळांत अधिकांश अधिकारी आणि बाबूंची मुले शिकतात. या शाळांत प्रवेश घेण्यासाठी अनेक पापड लाटावे लागतात. या शिवाय मुलाचे शैक्षिणिक प्रदर्शन चांगले नसेल तर शाळेतून हकालपट्टीहि होते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक  महागाच्या  कोचिंग क्लासवरहि  भरपूर पैसा खर्च करतात. दुसरीकडे आपल्या गौरवशालीपरंपरेवर विश्वास ठेवणारी मध्यमवर्गातील पालकांची मुले आचार्यकुलं मध्ये शिकायला येतात. माझा सहकारी म्हणाला आचार्यकुलंचा परीक्षा परिणाम या शाळांचा जवळपास हि नसणार.  मुले पैदा होताच त्यांच्याशी आंग्ल भाषेत "गुटर गू" करणाऱ्या मानसिक गुलाम फक्त भगव्या वस्त्रावरून शाळेच्या शिक्षणाची कल्पना करतात. अर्थातच १२वी परीक्षा परिणाम बघितल्या वर त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.  असे कसे होऊ शकते हीच त्याची प्रतिक्रिया. बाकी या सर्व शाळांचा परिणाम  नेहमी सारखा उत्तम होता तरीही आचार्य कुलं शाळेचा त्यांच्यापेक्षाहि जास्त उत्तम होता.  पतंजलि संचालित  आचार्यकुलं बहुतेक एकमात्र शाळा असावी जिथे शरीर आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असलेले विद्यार्थी निर्माण होतात. याशिवाय तिथे शिक्षण हि अत्याधुनिक आहे, बहुधा अधिकांश मानसिक गुलामांना माहित हि नसेल.

प्रत्येक शाळेतील प्रथम आलेल्या  विद्यार्थ्याचे प्रतिशत

आचार्यकुलं, हरिद्वार  :                           ९९.४ %
सेंट कोलम्बस, गोल डाक खाना :            ९८.४ %
डीपीएस, मथुरा रोड :                            ९९.००%
डीपीएस, आर के पुरम :                         ९८.८%

आचार्य कुलं हरिद्वार

विद्यार्थी                      ७७
९०% पेक्षा जास्त         38       49.35%
75% पेक्षा जास्त         73       99.49%
60% पेक्षा जास्त         77       100%
सेंट कोलंबस गोल डाकखाना

विद्यार्थी                     २४२
९०% पेक्षा जास्त        ५२    २१.४८%
75% पेक्षा जास्त       १६७   ६८.१८%
60% पेक्षा जास्त       २३४    ९५.८६%
डी पी एस मथुरा रोड
कुल विद्यार्थी              ४११ 
९०% पेक्षा जास्त        १७५     ४२.५७%
75% पेक्षा जास्त        ३७६     ९१.४८%
60% पेक्षा जास्त        ४१०      ९९.७५%
डी पी एस  आर के पुरम
कुल विद्यार्थी            ८७८
९०% पेक्षा जास्त      ५५७     ६३.४३%
75% पेक्षा जास्त       ८४१     ९५.78.%
60% पेक्षा जास्त      ८७८      100%
  
https://www.dpsmathuraroad.org/cbse-result-xii-2019-20.php                         




Friday, July 17, 2020

प्रदूषण देत्य आणि सौर चक्र.


फार पूर्वी  ईक्ष्वाकु वंशाचा राजा भगीरथ पृथ्वीवर राज्य करत होता. एक दिवस पाताळातून हलाहल नावाचा दैत्य पृथ्वीवर आला. त्याने प्रजेला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे आमिष दाखविले. प्रजा त्याच्या विळख्यात न कळत सापडली. हलाहल दैत्य विषाक्त वायुने प्रजेचे प्राण घेऊन आपली भूक शमन करून लागला. भगीरथाने हलाहल दैत्य विरुद्ध युद्ध पुकारले.  पण भगीरथाचे अस्त्र-शस्त्र हलाहल दैत्य समोर निष्फळ ठरले.  

अखेर भगीरथाने जगाला  उर्जा प्रदान करणार्या सूर्यदेवाची आराधना सुरु केली. सूर्यदेव प्रसन्न झाले. सूर्यदेवाने भगीरथाला सौर चक्र प्रदान केले.  या सौर चक्राच्या मदतीने भगीरथाने हलाहल दैत्याला पराजित केले. हलाहल दैत्य पुन्हा पाताळात जाऊन दडून बसला.

Thursday, July 16, 2020

प्रदूषण : वेताळ आणि विक्रम


विक्रमा, पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या प्रदूषणासाठी उत्तरदायी कोण? तुला माहित असूनहि खरे उत्तर दिले  नाही तर तुझ्या डोक्याचे हजार तुकडे होतील. विक्रम म्हणाला, वेताळ, मानव निर्मित कचरा, प्लास्टिक, पेट्रोलचा धूर इत्यादीमुळे प्रदूषण पसरते. यांचा निर्माता मनुष्य प्राणी असल्यामुळे मानवच उत्तरदायी आहे. वेताळ खदाखदा हसला, विक्रम हा मी चाललो म्हणत वेताळ आकाशी उडाला, पण त्याला दूर-दूर कुठेही झाड दिसले नाही. शेवटी थकून-भागून वेताळ एका विजेच्या खांबावर लटकला.  ४४० वाॅटचा जोरदार करंट त्याला लागला. वेताळ धाडकन जमिनीवर आपटला. त्याला मुक्ती मिळाली आणि विक्रम प्रदूषणच्या नरकात तडफडत मरण्यासाठी जिवंत राहिला. 

(श्री सुभाष पी. नाईक यांच्या धरा धरोहर कविता संग्रहापासून पासून प्रेरणा  घेऊन)


Tuesday, July 14, 2020

करोना आणि मॅकालेचे मानसिक गुलाम


मॅकाले शिक्षणाचा एक  हेतू भारतीयांना मानसिक गुलाम बनविण्यासाठी त्यांच्यात हीन भावना भरणे होते.  एकदा माणूस आत्मग्लानी आणि हीन भावनेने ग्रस्त झाला कि त्याचे  विचार काहीशे असे होतोत "आपण अडाणी होतो, जे काही ज्ञान आहे ते ब्रिटीशांनी दिलेले आहे." आणि अश्या परिस्थितीत आपल्या परंपरागत ज्ञानाच्या आधारावर कुणी गौरवास्पद  कार्य केले तरी त्याला ते पचणार नाही.  या करोना काळात  पतंजलि निर्मित आयुर्वेदिक औषधी चाचणीत १०० टक्के  खरी उतरली आणि आंग्ल शिक्षित मानसिक गुलामांना हे पचणे कठीण झाले, याचे कारण काय. यावर विचार मांडण्या आधी पार्श्वभूमी समजणे हि आवश्यक. 

दहाव्या शताब्दी पर्यंत आयुर्वेद हे जगातील सर्वात उन्नत आरोग्य शास्त्र होते. शल्यक्रिया पासून ते शिक्षणासाठी शवांचे विच्छेदनचे कार्यहि देशातील मोठ्या गुरुकुलांमध्ये होत होते. विदेशी आक्रांतानी आपल्या ज्ञानाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यात ते सफलहि झाले. आपले दुर्भाग्य स्वतंत्रता प्राप्ती नंतरहि काळ्या मानसिक गुलामांचेच राज्य आले. आयुर्वेदाला दुर्लक्षित केल्या गेले. जिथे  एलोपथी  शिक्षणावर अब्जावधीचे अनुदान दिले जाते तिथे आयुर्वेद शिक्षणाच्या  फी वरहि निर्बंध घातले जाते. त्यामुळे कुठलेही नवीन अनुसंधान करणे आयुर्वेदीक शिक्षण संस्थांना  शक्य नाही. या मूर्खपणामुळे देशाचे अब्जावधी कोटींचे नुकसान होते, हेहि  त्यांना कळत नाही. आज जगात हर्बल मेडिसिन क्षेत्रात  चीनी औषधींना मान्यता प्राप्त आहे. लाखो कोटींचा त्यांचा व्यापार आहे. तिथल्या लाखो शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधरली आणि महागड्या औषधांचा खर्च हि वाचला. या शिवाय चीनला लाखो कोटींचे परकीय चलन हि मिळते. पण आयुर्वेदाला औषधी शास्त्र म्हणून जगात मान्यता  नाही कारण आयुर्वेदिक औषधीत प्रयुक्त होणार्या ११००च्या जवळपास वनस्पतींवर शोध कार्य अत्यंत कमी प्रमाणात  झाले आहे. सरकारने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असे म्हटले तरी गैर नाही. तसे झाले असते तर आज शेतकर्यांना काही लाख कोटी दरवर्षी भेटले असते. असो.

सन २०१६ मध्ये आयुर्वेदिक औषधींवर अनुसंधान करण्यासाठी पतंजलिने अब्जावधी खर्च करून देशातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक उन्नत यंत्रांनी सज्ज प्रयोगशाळा स्थापित केली. स्वयं प्रधानमंत्री नरेंद्र मोदिजीनी या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. आज इथे ३०० हून जास्त शास्त्राज्ञ कार्य करतात.  औषधींचे सुष्म स्तरापासून ते प्राणी आणि मानवावर प्रयोग करण्याची सुविधा इथे आहे. पतंजलि उद्योग समूहाच्या लाभांशचा अधिकांश हिस्सा या प्रयोगशाळेवर खर्च होतो. गेल्या तीन वर्षांत आयुर्वेदिक औषधींवर अनेक रिसर्च पेपर नेचर सहित अनेक मेडिकल जर्नल मध्ये प्रकशित झाले आहे. एवढेच नव्हे तर संस्कृत भाषेतहि एका रिसर्च पेपरचा सारांश प्रकाशित झाला आहे. अर्थात संस्कृत भाषेला अंतराष्ट्रीय स्तराच्या मेडिकल जर्नल मध्ये मान्यता मिळाली. हे वेगळे याबाबत मिडीयाने कधी चर्चा हि केली नाही. याचे उत्तर मिडीयाच देऊ शकते. (https://www.acharyabalkrishna.com/research/) पतंजलिचे अश्वगंधावर रिसर्च पेपर प्रकाशित होताच, अनेक आयुर्वेदिक कंपन्यांनी अश्वगंधाचे जोमाने  विज्ञापन सुरु केले. असो.

गिलोय, तुळशी, अश्वगंधा, अणु तेल आणि श्वासरी रस या औषधांचा प्रयोग पतंजलिने कोरोनाच्या रोगींवर केला. रोगी पूर्णपणे ठीक झाले. निम्स, जयपूरने या औषधींच्या आधुनिक पद्धतीने क्लिनिकल ट्रायल करण्यात रुचि दाखविली. सर्व सरकारी औपचारिकता पूर्ण करून नियमानुसार  'third party;  परीक्षण सुरु झाले. लक्षण नसलेले रोगी, कमी आणि मध्यम लक्षण असलेल्या रोगींवर हे परीक्षण झाले. इथे नमूद करणे गरजेचे उपचारासाठी येणार्या ९९ टक्के रोगींना हीच लक्षणे असतात. बाकी रोगीची प्रतिकार शक्ती कमी असेल किंवा आधुनिक औषधींचे दुष्परिणाम, रोगी दगावण्याची टक्केवारी जास्त आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या शब्दांत परीक्षणाचा प्रचार केला नाही कारण तसे केले असते तर बहुतेक ड्रग माफियाने या परीक्षणात अडथळे आणले असते.  या परीक्षणात सर्व रोगी बरे झाले. चुकीने एखादहि दगावला असता तर बहुतेक मानव वधाचा आरोप पतंजलिवर लावण्यात ड्रग माफिया आणि त्यांच्या गुलामांनी कसर सोडली नसती.  

साहजिकच मानसिक गुलामांना परीक्षणाचे निष्कर्ष पटले नाही. बहुधा त्यांना वाटत असेल आजहि आयुर्वेदिक औषधी खरल मध्ये खरडून बनतात.  अनेक अतिविद्वानाच्या मते आयुर्वेदिक औषधी म्हणजे 'आजीबाईच्या बटव्यातील औषधी', आयुर्वेदिक औषधींचा परिणाम अत्यंत हळू होतो. एवढे परिणाम कारक औषध आयुर्वेदात निर्मित होणे शक्यच नाही, इत्यादी. आमच्या औषधांच्या एक-एक गोळीची किमत हजारो रुपये आणि बाबा एवढ्या स्वस्तात औषध बाजारात आणतात आहे, काही तरी गोम आहे. आंग्लशिक्षित शहाणे बिना कुठले प्रमाण देता, बाबा फेक दावा करतात इत्यादी टंकून मोकळे झाले. हा त्यांच्या दोष नाही त्यांच्या मनात हीन भावना निर्माण करणाऱ्या  शिक्षणाचा दोष आहे. लोकांना लुटण्याच्या धंद्यावर गदा आल्यावर फेक आणि भ्रमित प्रचार पेड मिडिया करणारच. तसेही जेवढा मोठा मिडिया तेवढा जास्त खर्च आणि त्यासाठी विज्ञापनहि जास्त लागते. मध्यान्ही सूर्य दिसत असूनही त्याला रात्र म्हणणे त्यांचीहि विवशता. औषधींना बाजारात येऊ न देण्यासाठी राजकीय मदतहि घेण्यात आली. पण औषध बाजारात आलेच. या औषधी मुळे हजारो करोना रोगी रोगमुक्त होतील. अन्य औषधींच्या सेवनाने शरीरावर जे दुष्परिणाम  होतात तेहि होणार नाही.

आपण आपल्याच गौरवपूर्ण कार्याला स्वीकार करत नाही, हाच मॅकाले शिक्षणाचा परिणाम.आपल्या जवळहि ज्ञान-विज्ञान आहे, आधुनिक तंत्रांचा उपयोग करून आपणहि आपल्या  प्राचीन ज्ञानाला समृद्ध करून   जगात पुढे जाऊ शकतो ही भावना आज निर्मित करण्याची गरज आहे. बाकी सूर्याला उदित होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही.

Monday, July 6, 2020

स्वामी त्रिकालदर्शी: करोना वर चर्चा

आज  बर्याच  महिन्यांनी स्वामी त्रिकालदर्शी यांचे दर्शन घ्यायला त्यांच्या कुटीत गेलो. नेहमीप्रमाणे ते ध्यानमग्न अवस्थेत होते. कुटीत एका कोपर्यात जाऊन बसलो आणि त्यांच्या समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. एकदाचे त्यांनी डोळे उघडले आणि समाधीतून बाहेर आले. मी त्यांना साष्टांग प्रणाम केला. माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत स्वामीजी म्हणाले, बच्चा काय समस्या आहे. 

मी: स्वामीजी, सध्या करोनाची साथ जगात पसरलेली आहे. लाखो लोग मृत्यमुखी पडले आहे.  करोना मीटर पाहिल्यावर असे दिसते. जगात ज्या ठिकाणी स्वास्थ्य सुविधा कमी, तिथे मृत्यू दर कमी आणि जिथे जास्त तिथे मृत्यू दर जास्त. आपल्या देशातहि मुंबई, दिल्ली, अहमेदाबाद, चेन्नई सारख्या मोठ्या महानगरात मृत्यू दर जास्त आणि झारखंड, बिहार, ओडिशा, आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात कमी. काय कारण असावे?

स्वामीजी: बच्चा, करोनाच्या रोगींचा उपचार ज्या औषधींनी होतो आहे. त्या औषधींचा विपरीत परिणाम श्वसनतंत्र, हृदय, लिवर आणि किडनी वर होतो. पण बच्चा, एक लक्षात ठेव ९५ ते ९६  टक्के रोगी या औषधींमुळे बरे होतात. 

मी: स्वामीजी पण...

स्वामीजी: (पानदाणीतून विडा काढत), बच्चा पान खाणार का?

मी: स्वामीजी, मी पान खात नाही.

स्वामीजी: हा सोन्याचा वर्ख लागलेला विडा आहे, खाऊन बघ. डोक्यात फालतू विचार येणार नाही, डोक शांत होईल. म्हणतात न, "खाली दिमाग शैतान का घर".

मी: स्वामीजी, तुम्हाला माहित आहे, मी पान विडी तंबाकू काहीच घेत नाही. 

स्वामीजी: बच्चा, म्हणूनच तुझे चंचल मन एकाग्र होत नाही. ऐक, वेद भगवान म्हणतात, "एकत्र राहा, एकत्र खा, एकत्र प्या, एकत्र पुरुषार्थ करा". अशाने देशाची अर्थव्यवस्था सुधरते. बाकी जीवन-मरण भगवंताच्या हाती आहे. तू उगाच व्यर्थ काळजी करतो. मित्रांसोबत खा पी आणि मौज कर.

मी: स्वामीजी,  अखेरची शंका, चाचणीत यशस्वी झालेल्या औषधाचा विरोध का? त्या औषधाचे दुष्परीणाम हि नाही. 

स्वामीजी: वेद विरोधी कार्य करणार्याचा विरोध होतो. ज्या ग्राहकांकडून लाखो वसूल केल्या जाऊ शकतात. त्यांचे समाधान हजारहून कमी रुपयांत करून आपल्याच बंधूंच्या पोटावर लाथ मारणार्याचा विरोध हा होणारच. पोट आहे म्हणून हे मायावी जग आहे. जगण्यासाठी प्रथम स्वत:च्या पोटाचा विचार केला पाहिजे.  समाजाच्या विपरीत जाऊन कार्य करणे म्हणजेच अज्ञान. अज्ञान सोडून ज्ञानाचा मार्ग धर बच्चा तुझे कल्याण होईल म्हणत स्वामीजी पुन्हा ध्यानमग्न झाले.  





Sunday, June 28, 2020

प्राचीन ज्ञानाचे पुनरुत्थान (डिजिटलीकरण) आणि प्रकाशन - पतंजलिचे महत्वपूर्ण योगदान



भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. या हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली.  तरीही कालप्रवाहात लाखो  ताडपत्री पाण्डूलिपी निश्चित जिवंत राहल्या असतील.  देशाला स्वतंत्रता मिळाली. पण दुर्भाग्य असेकि गुलामी मानसिकता असलेल्या काळ्या साहेबांचे राज्य भारतात आले. आपल्या प्राचीन ज्ञानाविषयी त्यांच्या मनात आदर कमीच.  विदेशी आक्रांतान्पासून आपले ज्ञान काही प्रमाणात वाचले पण काळ तर सर्वच नष्ट करणारा असतो. जीर्णशीर्ण पाण्डूलिपी किती काळ जिवंत राहणार. आपल्या सरकारी तंत्राने हि भारताचे प्राचीन ज्ञान सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले आहे. पण सरकारी तंत्राचीहि  'दिनभर चलेअढाई कोस' वाली  गत असते.


आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात डिजिटल स्वरूपात प्राचीन ज्ञान सुरक्षित केले जाऊ शकते. पण ते करणे अचाट मेहनतीचे कार्य आहे.  पाण्डूलिपी कुणापाशी आहेत त्याची माहिती मिळविणे. त्यांच्या पर्यंत कसे पोहचायचे. त्यांची परवानगी घेऊन, त्या जीर्णशीर्ण ताडपत्री पुस्तकांना दुरुस्त करणे. त्यासाठी भाषा विशेषज्ञ आणि दुरुस्ती कार्य करणाऱ्या तकनिकी लोकांची गरज.  त्यानंतर पांडूलिपींचे डिजिटलीकरण करणे आणि शेवटी त्यांना सुरक्षित ठेवणे.  ज्यांनी परत मागितली त्यांना परत करणे.  दुर्लभ आणि मूल्यवान ग्रंथांचे प्रकाशत करून प्राचीन ज्ञान जनतेसमोर आणणे, इत्यादी. ह्या सर्व कार्यांत   हजारो लोकांच्या अचाट मेहनत शिवाय,  वेळ आणि धनाचीहि गरज लागते. शिवाय गुलाम मानसिकता असलेले सरकारी तंत्र किंवा जनताहि तुमच्या कार्याचा गौरव करणार नाही. मीडियाही तुमच्या कार्याची माहिती जनतेला  देणार नाही. तरीही एका व्यक्तीने हे कार्य करण्याचा विडा उचलला.


त्रेता युगात महर्षी विश्वामित्र यांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. इंद्राचे सिंहासनहि  गदागदा हालविलें होते. या कलयुगातहि बहुतेक त्यांचाच अवतार स्वामी रामदेवच्या रूपाने भारतात प्रगट झाला असावा हें मला नेहमीच वाटते.  गुरुकुलात वेद शास्त्र संपन्न होऊन, हिमालयात तपस्या करून, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने भारताला पुन्हा उन्नतीच्या शिखरावर पोहचविणे हे त्यांचे स्वप्न. फूडपार्क पासून होणार २ टक्के नफा फक्त देशसेवेसाठी वापरायचा हा त्यांचा संकल्प.त्यात हि ७० टक्के फक्त रिसर्च आणि अनुसंधानावर. 
स्वामी रामदेवांनी कार्य हातात घेतले आणि मोठ्या प्रमाणावर हे कार्य करण्याचा निश्चय केला. आचार्य बाळकृष्णच्या नेतृत्वाखाली पतंजली युनिव्हर्सिटी आणि त्यांना मदत करणारे हजारो सहयोगी या कार्यात गुंतले. कुणालाही आश्चर्य वाटेल एवढे अचाट कार्य  ६० हजारच्यावर पाण्डूलिपी ज्यात ५० हजारांच्यार ताडपत्री स्वरूपात.  तब्बल १९ विषय - अलंकार शास्त्र, आयुर्वेद, ब्राम्हण ग्रंथ, दर्शन, धार्मिक ग्रंथ, ज्योतिष, काव्य, कोश, मंत्र, नीती ग्रंथ, पाकशास्त्र, पुराण, संस्कृत-साहीत्य, स्त्रोत्र, तंत्र, उपनिषद, वेद, व्रत, व्याकरण इत्यादी.  १४ भाषा- देवनागरी, शारदा, श्री, गुरुमुखी, फारसी, संस्कृत, उर्दू, बंगाली, मल्याळी, मराठी, नेपाली, ओडीया,तमिळ तेलगु. २६ लाखांहून जास्त पाने.

आता विचार करा  या अफाट कार्यासाठी हजारो  लोकांशी/ संस्थांशी  संपर्क करावा लागला असेल. अनेक भाषाविदांची मदत घ्यावी लागली. या पवित्र कार्यासाठी अधिकांशी विद्वानांनी कसले हि मानधन घेतले नाही. पण त्यांच्या येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च तर होताच.  शिवाय  पगारी कर्मचार्यांची फौजहि.  या कार्यातहि सरकारी तंत्र नेहमीप्रमाणे  उदासीन होता.  आमच्या जवळ असलेले प्राचीन  साहित्य तुम्हाला डीजीटलीकारण साठी काही काळासाठीहि देणार नाही आणि  हे वेगळे आम्ही केंव्हा करू, आमचे आम्हालाच माहित नसते. असो. 


डिजिटलीकरण नंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पुस्तकांचे प्रकाशन. इथेहि समस्या होती.  एक-एक पुस्तकाच्या अनेक पाण्डूलिपी आणि पाठभेद.  विद्वानांच्या मदतीने प्रामाणिक प्रती तैयार करून एव्हढ्या कमी कालावधीत अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित केले. त्यांची नावे- सिद्धसार - संहिता (रविगुप्त- विरचित), योगशत्तम (अमितप्रभ्यम् - विरचित), योगशास्त्र-वैद्यवल्लभ (रुपनयन - विरचित), आयुर्वेद-महोदधी/ सुषेण-निघन्टु (सुषेण वैद्य- विरचित), भोजनकह्तुलम् (रघुनाथ सुरी -विरचित), अजीर्णमर्त मंजरी (काशिनाथ-विरचित), रुचिवधु- गल्- रत्नमाला (परप्रणव - विरचित), हरमेखला (मधुक-विरचित), योगरत्न समुच्चय (चंद्रात- विरचित), वैद्यशतश्लोकी (अवधान सरस्वती- विरचित), चंद्र निघन्टु/ मदनादी-निघन्टु (चंद्रनंदन-विरचित), हृद्यदीपक-निघन्टु (भोपदेव विरचित), राज- निघन्टु/ सोढलनिघन्टु (सोढल विरचित), मदनपाल -निघन्टु (नृप मदनपाल-विरचित), वैद्य प्रसारकम् (वैद्य गदाधर-विरचित ).

हे कार्य सतत चालणारे कार्य आहे. काळात विस्मृत झालेले ज्ञान विज्ञानाची पुस्तक रुपी रत्ने एका महाऋषीच्या प्रयत्नाने पुन्हा प्रगट होणार आहेत.  आपण त्यांच्या कार्याचा गौरव तर करीत नाही. पण इथल्या आसुरी प्रवृत्ती  मात्र पूर्ण शक्तीने त्यांच्यावर प्रहार करीत आहे.  या काळात आपले काय कर्तव्य आहे, हे आपल्याला कळले पाहिजे. असो.  खालील लिंकच्या  आणि आस्थावर या संबंधात पाहिलेल्या कार्यक्रमाच्या आधारावर हा लेख आहे.

https://www.patanjaliresearchinstitute.com/ayurvedic_manuscripts.php#










Saturday, June 27, 2020

काही गूढ क्षणिका


लांडग्याची मैत्री केली
शेतकऱ्याला मारले
कुंपणाने असे
शेतच खाल्ले.

अमृताचे कुंभ
सागरात फेकले
देवांना चषकात
हलाहल पाजले.

 "मायेच्या" पोटी
प्रजेशी फितुरी
मढयांवर त्याने
लोणी खाल्ले.

नागाने मणी
बेडुकाला दिली
बदल्यात त्याची
पिल्ले खाल्ली.

Monday, June 22, 2020

काही क्षणिका: मुखौटे


सत्याचा मुखौटा
चेहऱ्यावर लावला
असत्याचा प्रचार
जोमाने केला.

मुखौटाच्या मागे
अर्जुन लपला
विजय धर्माचा
रणी जाहला.

मुखौट्यांचा स्टॉक 
सदा जवळ बाळगा
कोठी, गाडी आणि पैका 
मुखौट्यांची सारी कृपा.

मुखौटा देवा
कलयुगाचा त्राता
वाहुनी तुळस - दूर्वा 
पूजा तयाची करा.

Saturday, June 20, 2020

सूर्यग्रहण: सावल्या - सावल्यातील अंतर


हिमाचलच्या लोकांशी घरोबा झाल्यामुळे हिमाचलच्या वारी होतच राहतात. असेच एका लग्नाला गेलो होतो.  मंडी जिल्ह्यात लोकांची घरे मोठी अर्थात १० ते २० खोल्यांची असतातच. लग्नकार्य घरातच होतात. लग्नकार्याच्या विधी दिवसभर चालणारे असल्यामुळे गप्पांच्या मैफिलसाठी भरपूर वेळ मिळतो. सहज सूर्यग्रहण हा विषय निघाला. एका सज्जन धार्मिक इंजिनिअर महोदयांनी सूर्यग्रहणाचा एक किस्सा सांगितला. हिवाळ्याचे दिवस होते. त्यांचे एक मराठी मित्र घरी आले होते.  शिक्षित आणि विज्ञानवादी विचारधारेचे मराठी सज्जन अंधश्रद्धा मूर्खमिलन समितीचे चाहतेही होते. बाहेर भयंकर थंडी असल्यामुळे बैठीकीच्या खोलीत फायर बॉक्समध्ये लाकडे जळत होती समोर १२ फूट दूर सोफ्यावर बसून  गप्पा मारताना सूर्यग्रहण हा विषय निघाला. विज्ञानवादी मित्र म्हणाले चंद्राची सावली आणि वादळाची सावली काहीच फरक नसतो. चंद्राच्या सावलीचा काहीही दुष्प्रभाव पडत नाही. इंजिनिअर सज्जन म्हणाले फरक असतो आत्ताच सिद्धकरून दाखवतो. त्यांनीं  एक ताट आणि एक छोटी वाटी मागवली. ताट फायरबॉक्सच्या समोर अश्यारितीने धरले की ताटाची सावली मित्राच्या अंगावर पडली. मित्राला विचारले काही फरक पडला का? मित्र म्हणाला हो, ताटाने उष्मा रोखल्यामुळे थोडी थंडी जाणवते आहे.  इंजिनीयर महोदयाने  छोटी वाटी मित्राला देत म्हंटले वादळाची पण सावली असते. वादळ जास्तीतजास्त पृथ्वीपासून दहा-बारा किलोमीटर उंचीवर असते. चंद्राच्या मानेने फारच जवळ. ही वाटी म्हणजे वादळ. आता वाटीला पोटाशी धरून ठेव आणि सांग काय फरक पडतो. मित्र म्हणाला काहीही फरक पडणार नाही.  इंजिनीयर महोदय विजयी मुद्रेने म्हणाले हा फरक सूर्यग्रहण आणि वादळाच्या सावलीतला आहे. एका मराठी माणसाची कशी जिरवली हा भाव ही त्यांच्या मुद्रेत दिसत होता. 

दोन वर्षांपूर्वी मला पँक्रियाचा टीबी  झाला. गंगाराम हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आशिष  कडून ट्रीटमेंट घेत होतो. एक दिवस त्यांना विचारले माझ्या घरी आणि कार्यालयातील ही स्वच्छता आहे. मी बाहेरचेही जास्त खात नाही तरीही मला टीबी का झाली? ते म्हणाले वातावरणात लाखो वायरस नेहमीच असतात. भारतासारख्या देशात तर टीबीसहित अनेक रोगांचे जीवाणू ही वातावरणमध्ये असतात. शरीराची प्रतिकारशक्ती त्यांच्याशी सदैव युद्ध करत राहते. काही क्षणांसाठी ही एखाद्या रोगणुप्रति ती कमी झाली की लगेच तो रोगाणु शरीरात वाढू लागतो. हे असेच आहे, जसे क्षणभराच्या नजरचुकीने एखादा आतंकवादी देशात घुसतो. सर्च ऑपरेशन करून त्याचा नायनाट करावा लागतो.  तसे न केल्यास देशात बॉम्बस्फोट इत्यादी होतात आणि लोकांचा जीव जातो.  तुम्हाला ही दहा बारा दिवस आणखीन उशीर झाला असता तर...असो.

वादळ वातावरणात आपल्या जवळ असतात. सूर्याच्या जीवनदायी किरणांना रोखण्याची क्षमता त्यात नसते. पण अंतरीक्षात विचरण करणाऱ्या पृथ्वीपासून लाखो किमी दूर असलेल्या चंद्रमामध्ये निश्चित असते त्यामुळे वादळांच्या आणि चंद्रमाच्या सावली फरक असतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर न जाणे योग्य. हे असेच आहे, जसे कारोनाच्या बचावासाठी गर्भवती स्त्री, वृद्ध आणि रोगी माणसांना घरात बसण्याचा सल्ला दिला गेला आहे. बाकी अंधश्रद्धा मूर्खमिलन बाबत काही न बोलणे योग्य.




Friday, June 12, 2020

साने गुरुजी आणि मी

आज साने गुरुजींची पुण्यतिथि. आजच्या दिवशी अर्थात 11 जून 1950 रोजी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती. बहुतेक गणपती उत्सवात श्यामची आई हा सिनेमा पाहिला होता आणि सिनेमा पाहताना ढसाढसा रडलोही होतो. साने गुरुजी कोण त्याबाबत प्रथम माहिती आईकडून मिळाली. पण एक प्रश्न मनात सतत घोंगावत होता एवढ्या मोठ्या माणसाने आत्महत्या का केली? त्याचे कारण काय असावे? दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही  नागपूरला जायचो. काका एका वृत्तपत्रात संपादक होते. नागपूर आणि विदर्भात प्रकाशित होणाऱ्या अधिकांश हिंदी पुस्तकांचे संपादनही ते करायचे. त्यासाठी राष्ट्रपती कलामच्या हातून राष्ट्रपती भवनात त्यांचा गौरवही झाला होता. नागपूरला काकांच्या घरी एक मोठी लायब्ररी होती. किमान दोन-तीन हजार पुस्तके तरी होती. बहुतेक त्यावेळी मी तेरा-चौदा वर्षांचा होतो. वाचण्याची आवडही होती. साने गुरुजींचे जीवन चरित्र वाचले. लहानपणीच वडिल गेले नंतर आई. अनेक कष्ट सहत सानेे गुरुजींनी शिक्षण पूर्ण केले. ते एमए झाले. शाळेत शिक्षकाची नोकरी केली. १९३० मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले. त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता विरोधात लढा दिला. राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. साधना साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. खडतर मार्गाने आयुष्याचा प्रवास करणारा व्यक्ती आत्महत्या करतो हे कधीच मनाला पटले नव्हते. एक दिवस काकांना हाच प्रश्न विचारला. ते म्हणाले साने गुरुजी कवी होते. भावनाप्रधान होते. देशाला स्वात्यंत्र मिळतात देश बदलेल असे त्यांना वाटत असावे. माणसाचे आयुष्य १०० वर्ष असेल तर राष्ट्राचे हजारो वर्ष असते. जे बदल माणसाच्या आयुष्यात एका वर्षात होतात त्या बदलांसाठी राष्ट्राला १०० वर्ष ही अपुरे पडतील. एकच उद्दीष्ट मनात ठेऊन अनेक पिढ्यांना खपावे लागते. देश स्वतंत्र झाला. भारतीय नेते सत्ताधीश झाले. सत्ता टिकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्वांचा उपयोग करावा लागतो. या सदा  चालत आलेल्या मार्गावर आजचे सत्ताधीश ही चालणारच. स्वतंत्रता मिळाली. देशात लाखो लोक दंगलीत मारल्या गेले.  महात्मा गांधींची हत्या झाली,. महाराष्ट्रात जतिगत घृणेचे राजकारण फोफावले. बहुतेक कवी हृदयाने पाहिलेले स्वप्न धुळीत मिळाले.  सत्याचा मार्ग काटेरी असतो त्यावर विपरीत परिस्थितीतही सतत चालणे प्रत्येकाला जमत नाही. काही सत्य मार्गाचा त्याग करतात. काही परिस्थितीशी समाझौता करत नाही अर्ध्यावरच प्राण सोडतात. काही विरलेच संघर्षाची ज्योत सतत तेवित ठेवतात.  निराश होऊन साने गुरुजींनी अर्ध्या रस्त्यावरच प्राण ठेवलेेेे. शेवटी काका म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत निराश व्हायचं नाही हे त्यांचे चरित्र वाचून शिकले पाहिजे.

Wednesday, June 10, 2020

मुखवटे


रंगमंचावर नाचती 
मुखवटे तालावर
सरड्याच्या.

मुखवट्या विना
न चाले व्यवहार
जगाचा.

हरवला मुखवटा
आरशात दिसला
चेहरा राक्षसाचा.