Monday, May 30, 2022

माझे सैराटी समीक्षा

काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र मला म्हणाला, पटाईत, बर्‍याच महिन्यांपासून तू काही लिहले नाही. मी म्हणालो आजकाल मूड होत नाही. तो म्हणाला, अस कर, काहीतरी नवीन लिह. एखाद्या सिनेमाची समीक्षा तुझ्या शैलीत कर. मी त्याला म्हणालो, मी सिनेमे फारच कमी बघतो. उभ्या आयुष्यात थिएटरमध्ये जाऊन जास्तीसजास्त डझन भर बघितले असतील. तो म्हणाला, अरे सिनेमांची समीक्षा  करायला, जास्त डोक्स लागत नाही. आपल्या सुपर डूपर मराठी सिनेमा सैराटची कर. आता मित्राचा आदेश टाळणे शक्य नव्हते.  

आपल्या बॉलीवूड सिनेमांची एक विशेषता असते. विषय कुठलाही का  असेना, कथेचा मूळगाभा एकच असतो. हीरो बहुतेक गरीब मजदूर, मागासलेला, सुंदर हिरोईन, खलनायक श्रीमंत प्राण  आणि शशिकले सारखी हिरोईनची आई, जिला पैश्यांसाठी हिरोईनला तिच्या इच्छे विरुद्ध  प्राणच्या गळ्यात बांधायचे असते. प्राणला ही सुंदर हिरोईन पाहिजे. सुंदर हिरोईन गरीब हीरो वर प्रेम करते. त्याच्या घरची मीठ भाकर तिला आवडते. हीरो तिच्या सोबत झिंगाट डान्स करतो, गाणी म्हणतो. साहजिकच आहे ,प्राणला हे आवडत नाही. तो हीरोला जाळ्यात अटकविण्यासाठी षड्यंत्र रचत रहातो. हिरोचे  मित्र प्राण पणाला लाऊन हिरोची मदत करतात. प्राणचे षडयंत्र विफल होते. बहुधा तो जेल मध्ये जातो. हीरो हिरोईनचा सुखीचा संसार सुरू होतो आणि चित्रपट संपतो. "बुडत्या जहाजावरच्या प्रेम कथा" या हॉलीवूड सिनेमावर ही बॉलीवूडचा परिणाम दिसला. प्राण, शशिकला, सुंदर हिरोईन आणि गरीब हीरो. सर्वच तिथे दिसले. फरक एवढाच हिरोईनला वाचविताना हीरो शहीद होतो. प्राणला काही हिरोईन मिळत नाही. 

काळानुसार बॉलीवूडच्या चित्रपटांत थोडा फार बदल होत राहिला. पूर्वी हीरो मिल मॅनेजर किंवा मजदूर इत्यादि राहायचा. नंतर कॉलेजमध्ये शिकणारे  प्रेमवीर आले. सैराटच्या निर्मात्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थी, ज्यांना प्रेम कशाशी खातात माहीत नाही,  प्रेम प्रकरण दाखविले. बहुतेक "मुलांनो शाळेत शिकू नका प्रेम करा, पोरीला घेऊन घरातून पळा " असा संदेश त्यांना द्यायचा असेल. गावाची पृष्ठभूमी होती, साहजिक मुलगी पाटलाची पोर आणि मुलगा दलित घराण्याचा दाखविला. हीरो हा डशिंग असावा लागतो. आज क्रिकेट खेळाडूंना सुंदर हिरोईन भेटतात. तर आमचा हीरो ही क्रिकेट उत्तम खेळणारा होता. प्रेमाची जागा, पनघट जागी, विहीर आली. हिरोईन आपल्या मैत्रिणींसोबत विहीरीत जलविहार करत होती, तेंव्हाच हीरो ने विहीरीत उडी मारली. काय हा डशिंग पणा, अहाहा! पाहून डोळे तृप्त झाले. हिरोईनला  पटावायला हीरोला असले नानाविध प्रकार करावेच लागतात.  बाकी गावात असे घडले तर संपूर्ण गावात चर्चा होते. तेंव्हाच या कहाणीचा दी एंड झाला असता. पण हिरोईनच्या मैत्रिणींनी याची चर्चा कुठेच केली नाही. तिची प्रेम कहाणी सहज पोटात पचविली. पूर्वीपार चालत आलेल्या बॉलीवूडी परंपरेनुसार झिंगाट डान्स हा झालाच. हिरोईन आणि  हिरोचे प्रेम आता जगा समोर उघड झाले. आपला शाळेकरी नाबालिग हीरो, नाबालिग मुलीला घेऊन पळाला. भरपूर मार खाऊन हिरोच्या  मित्रांनी त्याला हिरोईनलासोबत घेऊन पळण्यास मदत केली. (हिरोचे मित्र मार खाण्यासाठीच असतात). दोघांचा सुखी संसार एका महानगरात सुरू झाला.(आता नाबालिग पोरांना राहण्यासाठी जागा,  नौकरी कशी मिळाली असले फालतू प्रश्न विचारू नये).

प्रेम झाले, झिंगाट डान्स झाला, मस्त गाणे झाले, सुखी संसार सुरू झाला. सर्वसाधारण सिनेमा असता तर इथेच संपला असता. पण निर्मात्याला लक्षात आले की त्याला ऑनर किलिंग ही दाखवायची आहे. सिनेमात  90 टक्के मनोरंजन असल्याने सिनेमा खूप चालला. झिंगाट गाण्यावर खूप शिट्ट्या ही वाजल्या. बॉलीवूडी सिने सिद्धांताचे पालन करत गावातील दाहक वास्तव  दाखविण्याचे श्रेय ही निर्मात्याला मिळाले. 

सिनेमा पाहताना मनात अनेक प्रश्न आले,  प्रेम कथेत वयस्क स्त्री-पुरुष ही दाखविता आले असते. तसे असते तर दाहक वास्तव अजून उठून दिसले असते. पण मग झिंगाट डान्स आणि गाणी दाखविता आली नसती. शाळा आणि कालेजात शिकणार्‍या पोरांना हा सिनेमा अत्यंत आवडला. दिल्लीत आज ही  लग्नाच्या रिसेप्शन मध्ये  डीजे झिंगाट गाणे वाजवितात आणि  कोवळे मुले आणि मुली या गाण्याच्या तलवार झिंगाट डान्स ही करतात. अश्या सिंनेमानपासून प्रेरणा घेऊन प्रेमी सोबत गाव सोडून मुली पळतील तर काय होईल. शहरात येणार्‍या अल्पवयीन जोडप्यांचे शहरातील गिधाडे काय हाल करतात, हे कोवळ्या मुलांना माहीत असण्याची शक्यता नाही. पण निर्माता तर शिकलेला होता?   मला वाटते कोवळ्या मुलांवर अश्या सिनेमांचे काय परिणाम होतात, याच्याशी निर्मात्याला काही ही घेणे देणे नव्हते.  निर्मात्याचा मुख्य उद्देश्य फक्त गल्ला भरणे होता.  त्यात तो सफल ही झाला. बाकी  ऑनर किलिंग  मुद्दा म्हणजे  हत्तीचे दात दाखविण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे(हे माझे मत आहे, कुणाला सहमत होण्याची आवश्यकता नाही).

 



Monday, May 23, 2022

वार्तालाप (२१) श्रीदासबोध : दशक ८: दुश्चितपणा आणि राजाची सुरक्षा.

 जय जय रघुवीर समर्थ 

समर्थांनी छत्रपति संभाजीराजेंना उद्देश्यून एक पत्र लिहले होते त्या पत्राची सुरवात  "अखंड सावधान राहावे, दुश्चित कदापि नसावे"  या ओळीने केली होती. इथे दुश्चितपणाचा एक अर्थ असावधान, बेफिकीर असा होतो. राजा सुरक्षित असेल तर राज्य सुरक्षित राहते. एका सुरक्षित राज्यातच प्रजा संपन्न  आणि सुखी राहू शकते. प्रजेच्या हितासाठी राजाची सुरक्षाही सर्वोपरी असते.  राजाच्या  सुरक्षेची जवाबदारी राजाचे सुरक्षा सल्लागार, सचिव आणि अंगरक्षक यांच्यावर असते. त्यांना नेहमीच अखंड सावधान राहण्याची गरज असते. श्रीदासबोधच्या आठव्या दशकात समर्थ म्हणतात "घात होतो दुश्चितपणे.., दुश्चितपणे शत्रू  जिणे...". राजा जर  असावधान असेल तर घात होतो. शत्रू  त्याला पराजित करतो. 

मी एसपीजीत असताना एक किस्सा अनेकदा ऐकला होता. त्यात किती सत्य आहे, हे मला माहीत नाही. पण हा किस्सा राजाच्या सुरक्षेची जवाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांची भूमिका काय असावी हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट करतो.  किस्सा असा आहे, भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांची एक सभा होती. एक कनिष्ठ पोलिस अधिकारी आणि काही शिपाई प्रधानमंत्रीच्या सुरक्षेसाठी नियुक्त होते. सभा संपली. आपल्या प्रिय नेत्याचे चरणस्पर्श करण्यासाठी आणि हात मिळविण्यासाठी लोकांनी गर्दी केली. कनिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या लक्षात आले, लोकांचे हे प्रेम पंडितजींवर भारी पडत आहे. पंडितजींना शारीरिक इजा होऊ शकते.  त्याने शिपायांना आज्ञा केली, लोकांना पंडितजीपासून दूर करा. त्या कनिष्ठ पोलिस अधिकार्‍याने पंडितजींचा हात पकडला आणि त्यांना ओढत कारकडे निघाले. अर्थातच पंडितजींना हे आवडले नाही. ते त्याच्यावर ओरडले, रागावले. पण त्या अधिकार्‍याने पंडितजींच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना कारमध्ये बसविले. दुसर्‍या दिवशी पंडितजींनी त्या अधिकार्‍याला आपल्या चेंबर मध्ये बोलविले. त्याला वाटले, आता पंडितजी रागावणार आणि त्याची  हकालपट्टी होईल. पण झाले उलट. पंडितजींनी त्याची प्रशंसा केली आणि म्हणाले आम्ही नेता लोक प्रजेसोबत असताना, भान विसरून जातो. तुम्ही प्रसंगावधान राहून योग्य निर्णय घेतला. त्या अधिकार्‍याने आपल्या कर्तव्याचे १०० टक्के पालन केले होते.   

आपल्या पूर्वप्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधींचे त्यांच्या शीख अंगरक्षकांसोबत अत्यंत पारिवारीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यावेळची परिस्थिति पाहता, प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनी शीख अंगरक्षकांची बदली करण्याचे ठरविले. त्यांनी प्रधानमंत्रीच्या निजी सचिवला त्यानुसार सूचना केल्या असतीलच. पण श्रीमती इंदिरा गांधींनी परवानगी दिली नाही.  प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनीही योग्य निर्णय घेतला नाही. श्रीमती गांधीची हत्या झाली. संपूर्ण देशाला त्याचे परिणाम भोगावे लागले.  निष्ठा दोन प्रकारच्या असतात.  त्यांची निष्ठा स्वर्गीय इंदिरा गांधी या व्यक्ति प्रति होती अर्थात "तुम दिन को यदि रात कहो, हम रात कहेंगे" अशी होती. त्यांना प्रधानमंत्रीच्या सुरक्षे एवजी स्वतच्या हिताची जास्त काळजी होती. मी स्वत: अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निजी सचिव राहिलो आहे. प्रधानमंत्री असो किंवा अधिकारी, त्यांनाही भावना असतात. भावनेच्या भरात चुकीचे निर्णय तेही घेऊ शकतात. अश्या वेळी त्यांच्या सोबत कार्य करणार्‍या निजी सचिवांची/ अधिकार्‍यांची जवाबदारी वाढते.  जिथे राजाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तिथे राजाच्या विरोधाला न जुमानता राजाच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी लागते. त्या अधिकार्‍यांची निष्ठा जर प्रधानमंत्री या पदाशी असती तर, त्यांनी  स्वर्गीय  इंदिरा गांधीच्या विरोधाला न जुमानता त्या शीख अंगरक्षकांची बदली केली असती. जास्तीसजास्त त्यांचीही बदली झाली असती. देश एका संकटापासून वाचला असता. समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहून सावधान केले होते. तरीही संकटाच्या वेळी त्यांच्या सोबत असणार्‍या सहकार्‍यांनी त्वरित योग्य निर्णय घेतले नाही. परिणाम, घात झाला. त्याची स्वराज्याला आणि महाराष्ट्राला मोठी किमत मोजावी लागली. 

सारांश जिथे राजाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो. तिथे मानवीय भावनांना स्थान नाही. राजाची अनुमति असो वा नसो, राजाच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता परिस्थितीनुसार राजाच्या सचिव, सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांपाशी  आणि  अंगरक्षकांमध्ये असली पाहिजे. 




Tuesday, May 17, 2022

डासांचे विजय गीत

 

(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी  भारतात घेतो. ) 


शूर वीर  डास आम्ही

बांधुनि कफन डोक्यावरी 

तुटून पडतो शत्रुंवरती 

त्यांचे रक्त  पिऊनी

देतो विजयी आरोळी.

 

डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी 

करतो हल्ला माणसांवरती 

पाठवतो त्यांना यमसदनी.


घाबरून आमच्या फौजेला 

मच्छरदानीत  लपणार्‍या

भित्र्या भागुबाई  माणसांशी 

काहो करता तुलना आमुची.  


करू नका अपमान आमुचा

पावसाळा आता दूर नाही 

रक्ताची आहे भूक आम्हा

रक्त पिऊनी माणसांचे 

देऊ विजयी आरोळी.