Wednesday, February 28, 2018

चोरी कृष्णाने केली दंड हि कृष्णाला मिळाला


न्यायाधीश, पेंद्या तुला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. तू चोरी केली हे तू कबूल करतो का? न्यायाधीश महोदय, मी चोरी केली नाही. 'करता करविता स्वयं भगवान कृष्ण आहेत'.  जे घडले ते भगवंताच्या इच्छेने.  शिवाय मी रोज सकाळी भगवंताची पूजा करताना आपल्या सर्व कर्मांची फळे भगवंताला अर्पित करतो. ॐ श्री कृष्णार्पणमस्तु मी चोरी केली हे जरी सिद्ध होत असेल तरीही त्या चोरीची शिक्षा भगवंताला मिळाली पाहिजे मला नाही. 

न्यायाधीश म्हणाले, पेंद्या मग बोलव तुझ्या कृष्णाला. विचार तुझ्या कृत्याची शिक्षा भोगायला तो तैयार आहे का? पेंद्या उतरला, साहेब मी चोरी  केली नाही. भगवंताने केली आहे. भगवंत  नेहमीच आपल्या भक्तांच्या मदतीला येतात, ते गजेंद्रच्या मदतीला आले होते, माझ्या मदतीला का नाही येणार. न्यायाधीश म्हणाले पेंद्या एक वेळ तू म्हणतो म्हणून मान्य करतो, पण कृष्णाला   इथे बोलावणार कसे, तो तर स्वर्गात राहतो, तिथे समन पाठविता येत नाही. 

पेंद्या त्यावर म्हणाला, साहेब भगवंताच्या नावानी पुकारा करा बघ कसा धावत येईल आपल्या भक्ताच्या मदतीला. कोर्टाने भगवंताच्या नावानी पुकारा केला, भगवंत हाजीर हो. काय आश्चर्य, भगवंत साक्षात न्यायाधीश महोदया समोर उठे ठाकले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही भगवंत आहात, सर्वज्ञाती आहात. पेंद्या म्हणतो, चोरी तुम्ही केली, चोरीच्या गुन्ह्याची सजा हि  तुम्हाला मिळाली पाहिजे. पेंद्याचा आरोप  तुम्हाला मान्य आहे का? भगवंत हसत म्हणाले, मला गुन्हा स्वीकार आहे. न्यायाधीश म्हणाले, चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा  पाठीवर ५० कोडे  मारण्याची आहे. नाईलाजाने मला ती शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल.  भगवंत म्हणाले, मी निराकार अविनाशी आहे, माझे हे जे रूप तुम्ही बघत आहात, आभासी आहे. माझ्या,आभासी शरीरावर कुणी कोडे मारले तर तो कोडा  माझ्या शरीरातून आरपार होऊन मारणार्यालाच लागण्याची शक्यता आहे.  सत्य हेच मला कुठला हि दंड देणे शक्य नाही. न्यायधीश महोदय म्हणाले, कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी चोराला दंड देणे गरजेचे, अन्यथा राज्यात अराजकता माजेल. आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला दंड कसा देऊ. भगवंत हसत म्हणाले, मी सर्वव्यापी आहे. प्रत्येकाच्या देहात माझे वास्तव्य आहे. जे भक्त मला आपले चांगले कर्मफळ मला समर्पित करतात. त्या चांगल्या कर्मांचे फळ मी भक्तांच्या देहाच्या माध्यमाने भोगतो. माझ्या इच्छेने पेंद्याने चोरी केली. चोरीचे कर्मफळ हि मला अर्पित केले. चोरीच्या कर्माचे फळ मी पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगणार आहे.  तुम्ही पेंद्याच्या शरीराला कोडे मारण्याचे आदेश द्या, कोडे त्याला लागतील, कष्ट मला होईल.  भगवंताचे म्हणणे ऐकताच हातवारे करत पेंद्या जोरात ओरडला, भगवंता हि तर चक्क फसवणूक आहे. तुला कर्मफळ अर्पित करण्याचा फायदा काय. पण भगवंत केंव्हाच अदृश्य झाले होते. 

न्यायाधीश महोदयाने शिक्षा सुनावली. भगवंतानी चोरीचा गुन्हा कबूल केला. ते हि शिक्षा पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगतील. पेंद्याला ५० कोडे मारले जावे.  

बेचारा पेंद्या त्याची चतुराई, काही कामी आली नाही. गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली.












Tuesday, February 6, 2018

प्रदूषण (१७)- श्री कृष्ण आणि कृष्णा बिल्डर


द्वापर युगात कृष्ण झाला.  कृष्णाने  इंद्राच्या कोपापासून  वृंदावनला वाचविण्यासाठी गोवर्धन पर्वताची पूजा केली. हिरव्या वनस्पतीच्या वस्त्रांनी गोवर्धन पर्वताचा शृंगार केला. त्याच्या पायथ्याशी ९९ तीर्थ बांधले. नानाविध पक्ष्यांचा गुंजारव. फळे-फुलांचा सुगंध. साक्षात स्वर्गच वृंदावनात उतरला. ब्रज वासी सुखी आणि संपन्न झाले. इंद्र पराजित झाला. 


कलयुगात बिल्डर कृष्णाने, पर्वतांना फोडून गिट्टी तैयार केली. तीर्थांना(तलाव) बुजवून तिथे मोठ्या-मोठ्या इमारती बांधल्या. इमारतींपर्यंत पोहचण्यासाठी भव्य रस्ते बांधले. त्या साठी मार्गात येणारे पर्वत, वन-उपवन पशु-पक्षी सर्वांचा विनाश केला. भव्य इमारती तैयार झाल्या. पण पाणीच नव्हते. पाण्यासाठी भांडणे झाली, युद्ध झाले, संपूर्ण मानवजातीचा विनाश झाला. इमारती ओसाड पडल्या. साक्षात नर्क पृथ्वीवर अवतरला. आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीवरच्या जीवांचा संहार करणारा मानव नावाचा दैत्य हि नष्ट झाला. विशेष म्हणजे मानव नावाच्या दैत्याला मारण्यासाठी इंद्राला युद्ध करावे लागले नाही, वज्र हि चालविण्याची गरज पडली नाही. 


टीप: भागवतात कृष्णाने ९९ तीर्थ बांधले असे वर्णन आहे. 

Monday, February 5, 2018

प्रदूषण (१६) - कालिदासाला कोण वाचविणार ???



निरक्षर मूर्ख कालिदास, ज्या झाडाच्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता. काही शहाण्या माणसांनी समजवून त्याला खाली उतरविले. झाड व झाडाची फांदी वाचली आणि कालिदास हि वाचला.   

आजचा शिक्षित विद्वान कालिदास श्रेष्ठत्वाच्या दंभात चूर, अपरिमित इच्छांचा गुलाम. लागली आहे त्याला तहान रक्ताची. धरती मातेचे रक्त रोज पाहिजे त्याला. धरती मेली तरी चालेल पर्वा नाही त्याला. भोगायचे आहे स्वर्गीय सुख धरतीवरच, ययाति सारखे. धरती मरणार आणि त्या सोबत कालिदास हि. कोण वाचविणार आजच्या कालिदासाला. आजचे सर्वच शहाणे कालिदासा सारखेच रोज पितात धरती मातेचे रक्त आणि स्वत:ला शिक्षित म्हणवितात. 

Sunday, February 4, 2018

प्रदूषण (15)- नवी त्रिमूर्ती


ब्रह्माने केली
सृष्टी निर्मिती.

विष्णूने केले
पालन सृष्टीचे.

मानवाने केला
संहार सृष्टीचा.


टीप: महादेवाला तांडव नृत्य करायची गरज नाही. पृथ्वीवरील माणूस त्याची गरज भासू देणार नाही. महादेवाचे नेत्र उघडण्यापूर्वीच सृष्टी नष्ट झालेली असेल. 

Friday, February 2, 2018

प्रदूषण १४ - एक अल्हड भोळी नदी




एक अल्हड  भोळी  नदी 
भटकून  शहरात आली  
मिळाली तिला ओळख नवी  
गंदा नाला नंबर अकरा 




टीप: अंबाझरी तलावातून निघणारी नाग नदी आता नाग नाला म्हणून ओळखली जाते. असी नदी असी नाला इत्यादी. बहुतेक शहरांच्या जवळून वाहणाऱ्या  सर्व नद्यांना नाला म्हणून नवी ओळख मिळालेली आहे.