तब्बल ३५ वर्षांनी ते दोघं पुन्हा भेटले. केस पांढरे झाले होते, चेहऱ्यावर काळाच्या रेषा उमटल्या होत्या, पण डोळ्यांतली ओळख अजूनही ताजी होती. त्याला आठवली ती शेवटची भेट—नेहरू पार्क. केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळलेली ती, त्याला खेटून बसलेली होती. त्याने वेणी हुंगण्याचे नाटक करत तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं होतं. “दूर हो! काय समजलं मला? अजून लग्न नाही झालं आपलं,” ती रागावून म्हणाली. “मग केव्हा विचारणार तुझ्या वडीलांना? मला नोकरी लागून वर्ष झालंय.” “अरे, माझे बाबा एका भाड्यावर राहणार्या बाबूशी आपल्या लेकीचे लग्न करायला तैयार होणार नाही”. ‘मग काय आपण असेच राहायचे’?
मी सरकारी नौकरी साठी प्रयत्न करते आहे. एकदा मला नौकरी लागली की विचारेल की बाबांना, एका स्मार्ट पण अक्कल नसलेला, कंजूष मुलाशी लग्न करायचे आहे. दोघांच्या पगारात आमचे व्यवस्थित भागेल. माझे बाबा नाही म्हणणार नाही, खात्री आहे मला”. ‘मी कंजूष?’ “मग काय, आपल्या प्रेयसीला चाणक्य सिनेमा हाल मध्ये ६५ पैश्याचे पहिल्या रोचे तिकीट घेऊन सिनेमा दाखवणार्याला काय म्हणायचे? एका रुप्पलीचे पॅापकॅार्न आणि एक कप कॉफी दोघांसाठी. काय मजनू आहे माझा. बाय द वे तुझ्या आई-वडीलांना विचारले का?” ‘दूध देणार्या गायीला, कोण नकार देणार’. तिने त्याच्या पाठीवर जोरात गुद्दा मारला. ‘आई! ग! किती जोरात मारते’. “आई! ग, नाही म्हणायचे, बायको ग, म्हणायचे”. ‘म्हणजे लग्न झाल्यावरही तू मारणार’ “हो, पण लाटण्यानी” ....
पुढे ती भेटलीच नाही. नंतर कळले मुंबईत एका सरकारी कार्यालयात तिने नौकरी जॉईन केली होती. तिचे लग्नही झाले. तो देवदास तर नक्कीच नव्हता. आईने पसंत केलेल्या मुलीशी त्याने लग्न केले.
‘कशी आहे’ ती म्हणाली, “राग तर नाही ना माझ्यावर! माझ्या वडीलांना आपले प्रकरण माहित झाले होते. मला तुझ्या पासून दूर नेण्यासाठी बाबांनी खेळी केली. आईने शपथ घातली. तूही तिथे नव्हता. नाइलाजाने वडीलांची इच्छा पूर्ण केली”.
काय करतात तुझे मिस्टर?” “ ते हयात नाहीत. मोठ्या हुद्द्यावर होते, दारू आणि जुगाराच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते सैतानासारखे वागायचे. काही वर्षांतच वर गेले. मुलगाही बापाच्या वळणावर गेला. दारूने त्याचे ही प्राण घेतले. आता बहुतेक वृद्धाश्रमात जावं लागेल. नशीब एकेकाचे. तुझे काय”.
तुझे लग्न झाले हे कळल्यावर खरं तर मला राग आला होता. पण आईने समजावले, आयुष्य हे असेच असते. आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर एकदा बायको सोबत ओडीयन मध्ये बाल्कनीचे तिकीट घेऊन सिनेमा पाहिला , “मैने प्यार किया” तो उगाच हसला.
“अरे वा! भाग्यशाली आहे ती, प्रेयसीसाठी ६५ पैशांचे तिकीट आणि बायकोसाठी बाल्कनी” बोलताना तिने जीभ चावली”. त्याचे लक्ष रस्त्यावर मोगऱ्या फुलांच्या वेण्या विकणार्या दुकानदाराकडे गेले, मनात विचार आला. तिच्या पांढर्या केसांवरही मोगऱ्याची वेणी शोभून दिसेल. तो थांबला, त्याने तिला विचारले ‘वेणी घ्यायची का’? “हो, घे ना! तुझ्या बायकोसाठी. मलाही आवडते, मोगऱ्याची वेणी.... त्याने दोन वेण्या घेतल्या. वेणी हातात घेत, ती म्हणाली “तुला विसरण्याचा प्रयत्न केला पण विसरू शकली नाही. हे गेल्यावर तर सारखी तुझीच आठवण यायची. कधी-कधी वाटायचे, कदाचित अजूनही तू माझी वाट पहात असेल तर कधी वाटायचे तुझाही संसार असेल. तुला विसरलेच पाहिजे. मनाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. तुझी आठवण अनावर झाली कि बाजारात जाऊन मोगऱ्या फुलांची वेणी विकत घेते, खोलीचे दार बंद करून वेणी केसांत माळून आरश्या समोर उभी राहून रडते... आजही रडणारच”. काही क्षण दोघ काहीच बोलले नाही. तेवढ्यात तिची बस आली आणि ती निघून गेली...
काही वेळाने त्याचे लक्ष हातातल्या मोगऱ्याच्या वेणी कडे गेले. त्याने उभ्या आयुष्यात बायकोसाठी मोगऱ्या फुलांची वेणी घेतलीच नव्हती आणि आज... त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. लग्ना पूर्वी त्याच्या बायकोनेही राजा-राणीच्या सप्तरंगी संसाराचे चित्र पाहिले असेल. पण प्रत्यक्षात दिसली, नवर्याच्या अपुर्या पगारात घर चालवण्याची तिची धडपड. संसार फुलण्यासाठी तिने स्वत:च्या सर्व इच्छा मारून टाकल्या. कधी काहीही मागीतले नाही किंवा हट्ट केला नाही. त्याला आठवले, कित्येकदा त्याचा आणि पोरांचा डब्बा भरल्यावर भाजी शिल्लक राहायची नाही. कधी विचारले ‘अग! तुझ्यासाठी भाजी उरली नाही’. ‘मी माझे बघून घेईल’, हेच नेहमीचे उत्तर. बहुतेक लोणच्या सोबत किंवा पोळीला तेल, तिखट-मीठ लाउन भूक भागवायची. तिनेही त्याच्यावर शरीर व मनानी प्रेम केले आहे, बदल्यात त्याने काय दिले??? कधी मनाने प्रेम केलं का तिच्या वर? त्याने निश्चय केला, आता सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायला हवी. घरी गेल्यावर त्याने आपल्या हाताने बायकोच्या पांढर्या शुभ्र केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळली....
