(हा माझा अंतर्जालावरचा पहिला लेख मराठीसृष्टी वर 13.७.2010ला प्रकाशित केला होता. अनेकांनी हा लेख चोरला होता म्हणून तारीख देत आहे).
खुसरो म्हणतो,
रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को, दोउ भए इक रंग.
लैला-मजनूच्या प्रेमकथा ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणाऱ्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने वेगळे असले तरी त्यांचे हृदय एक होते. लैला-मजनूचं प्रेम हे खरं प्रेम होतं.
आजच्या तरुण पिढीच्या प्रेमाच्या कल्पना काय आहेत? तो स्मार्ट, ती सुंदर. त्याला ती आवडली, तिलाही तो आवडला. त्यांनी एकत्र सिनेमा पाहिला, एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरले, बहरलेल्या यौवनाचा आनंद घेतला. त्यांना वाटलं ते प्रेमात पडले. त्यांनी प्रेमविवाह केला. एकत्र एकाच घरात राहायला सुरुवात झाली. एकमेकांच्या आवडीनिवडी वादाचे विषय होऊ लागले. शुल्लक गोष्टींवरून भांडणं सुरू झाली. दोघांचाही अहंकार मोठा होता. परिणाम:
"देहाच्या आकर्षणाने दोघे जवळ आले,
प्रेमाअभावी ते शीघ्र 'डायव्होर्सी' झाले."
'ती' म्हणते, "मी प्रेमात आंधळी झाले होते."
'तो' म्हणतो, "मी मूर्ख होतो, म्हणून हिच्या प्रेमात पडलो."
पडणारच! कारण त्यांना प्रेमाचा अर्थ कळलेला नव्हता.
काहींचं प्रेम विवाहापर्यंत पोहोचतच नाही. कारण देहाचं आकर्षण क्षणभंगुर असतं. ते संपलं की प्रेमही संपतं. तो किंवा ती, कोणी तरी एक प्रेमभंगाला कारणीभूत ठरतो. आपण वर्तमानपत्रांत रोज वाचतो प्रेमभंगामुळे कोणी आत्महत्या करतो, तर कोणी खूनही. कारण त्यांनाही प्रेमाचा अर्थ कळलेला नसतो.
काही जण आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रेमाचा देखावा करतात. "मी डॉक्टर, तीही डॉक्टर. आपण एकत्र आलो तर चैनित आयुष्य जाईल." किंवा दोघंही नोकरी करणारे स्वार्थ मनात ठेवून प्रेम करतात. याला काय म्हणायचं?
"प्रेमाचा देखावा आज फायद्याचा सौदा आहे,
विवाहसुद्धा आज देहभोगाचा करार आहे."
स्वार्थापोटी केलेलं प्रेम भंग पावणारच. मग घटस्फोट होणारच, यात आश्चर्य नाही. कारण त्यांनाही प्रेमाचा अर्थ कळलेला नाही.
मग प्रेम म्हणजे काय?
आपल्या सौंदर्याचा अभिमान बाळगून पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती, कामदेवाच्या मदतीने शंकराचं प्रेम जिंकायला निघाली. परिणाम काय झाला? शंकराने आपलं तिसरं नेत्र उघडलं आणि कामदेव भस्म झाला. पार्वतीला आपली चूक कळली. तिने तपस्येचा मार्ग धरला. आपला अहंकार, अभिमान इत्यादी तपस्येच्या अग्नीत भस्म केले. अखेर शंकर प्रसन्न झाले. पार्वतीलाही प्रेमाचा अर्थ कळला.
आपण पाहतोच—वसंतात बहरलेल्या कच्च्या कैरीला ग्रीष्माच्या उन्हात तपावं लागतं, तेव्हाच रसाळ, मधुर आंबा मिळतो. आपल्या मनातील विकारांना अग्नीत भस्म केल्याशिवाय प्रेमाचा अर्थ कळणं अशक्य. म्हणूनच एका उर्दू शायरने प्रेमाबद्दल म्हटलं आहे:
"इक आग का दरिया है, तैर के जाना है."
आगीचा दरिया पार करण्यासाठी डोळे उघडे असायला हवेत. आंधळ्या माणसाचं हे काम नव्हे. एकदा शेजारच्या आजीला विचारलं, "तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? प्रेमाचा अर्थ काय?"
आजीनं उत्तर दिलं "प्रेमाचं तर सोडा, त्या काळी लग्नाआधी मुलाला मुलगी दाखवण्याची पद्धतच नव्हती. बायको म्हणजे आईच्या मदतीला घरकामासाठी आणलेली हक्काची बाई. ती आपल्याला देहसुखही देते आणि घराला वारसही. त्या काळी बायकांना कष्ट करावेच लागायचे. कधी-कधी मारही खावा लागायचा. आपलं माहेर विसरून नवऱ्यासाठीच आयुष्य आहे, हे मनात ठरवून सासरी संसार सुरू केला.
काही वर्षांत चित्र बदललं. एका दुसऱ्याची सवय लागली. त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. माझ्यासाठी त्यांनी आपला स्वभावही बदलला. माझ्या आवडीनिवडींकडे ते जातीने लक्ष देऊ लागले. मला काय हवंय, हे न सांगताच समजू लागले. आज एका दुसऱ्याच्या मनात काय आहे, हे न बोलताच आम्ही समजू शकतो. आता त्यांच्या मनात काय विचार चालला आहे, हे मी सांगू शकते.
त्यागाशिवाय प्रेम संपादन करता येत नाही, हेच खरं. संसाराचे चटके बसल्याशिवाय प्रेमाचा अर्थ कळणं अशक्यच." आजीचं बोलणं मला पटलं. आजीनं खरोखरच तपस्या केली होती, म्हणून तिला प्रेमाचा अर्थ कळला होता. असं प्रेम पाहूनच अमीर खुसरो म्हणतो,
"रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को, दोउ भए इक रंग."
शरीराने वेगळे असले तरी प्रेमाच्या रंगात भिजून दोघांचं हृदय एक झालं होतं. कारण प्रेमात द्वैत नाही. सूफी संतांच्या मते लौकिक प्रेम ही अलौकिक प्रेमाची पायरी आहे. ज्याच्या हृदयात प्रेम आहे, तोच ईश्वराला प्राप्त करू शकतो.
याचा अर्थ लग्नाआधी प्रेम करू नये, असा नाही. प्रेम अवश्य करा. पण आपण प्रेमात पडलो आहोत असं वाटत असेल, तर डोळे उघडा. स्वतःलाच प्रश्न विचारा, हे देहाचं आकर्षण तर नाही ना? यात आपला स्वार्थ तर नाही ना? कुठल्याही परिस्थितीत आपण त्याचा/तिचा साथ देऊ शकतो का? त्याच्या/तिच्यासाठी आपण आपल्या सर्वस्वाचाअर्थात अहंकार, अभिमान इत्यादींचा, त्याग करू शकतो का?
याचं उत्तर "हो" असेल, तरच पुढे पाऊल उचला. अन्यथा प्रेमात पडणारच. खऱ्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी तपस्या करावीच लागते. दोघांना शरीराने आणि मनाने एक व्हावं लागतं. तेव्हाच प्रेमाची प्राप्ती होते. म्हणूनच कबीरदास म्हणतात,
"जब मैं था तब हरि नाही, जब हरि है मैं नाही,
प्रेम गली अति सांकरी, जामे दो न समाई."