माझं वय १२-१३ वर्षांचं असावं. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पायी निघायचो. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतियाखान असा शाळेत जाण्याचा मार्ग होता. शाळेत पोहोचायला पाऊण तास लागायचा. रोज सकाळ-दुपारी जवळपास ३-३ किलोमीटर पायी चालल्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजायचेच.
मोतियाखानच्या भागात पटरीवर एक चांभार बसायचा. ५-१० पैशांत तो जोडे आणि चप्पल दुरुस्त करून द्यायचा. छोटू हे त्याच्या मुलाचं नाव. त्याचं वयही आमच्याच एवढं होतं. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी, म्हणजे ७-८ च्या दरम्यान, तो आपल्या वडिलांच्या कामात मदत करायचा. चप्पल आणि जोड्यांची छोटी-मोठी मरम्मत तोच करायचा.
त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे व्हायचेच. आमच्या दृष्टीने ‘दंगा’ म्हणजे बनियांच्या दुकानांची जाळपोळ आणि लूटमार. असाच एक दंगा सदर बाजार येथे झाला. त्या दंग्यात कपड्यांची अनेक दुकाने लुटली गेली. ‘बहती गंगेत’ अनेक गरिबांनी आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी अनेक मुले नवीन कपड्यांत दिसू लागली. त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यांत साजरी झाली. पण प्रत्येक नाण्याचे दोन पहलू असतातच.
दंग्याच्या १५-२० दिवसांनंतरची गोष्ट. शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला होता. त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला—या वेळी हा शाळा सोडून इथे का बसला आहे? कदाचित त्याच्या वडिलांची तब्येत खराब असेल. जोडा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होता. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारलं, “अब्बू की तबियत खराब है क्या?” छोटू म्हणाला, “स्कूल छोड़ दिया है। अब दुकान में ही बैठूंगा।” मी विचारलं, “का?” तो निर्विकारपणे म्हणाला, “अब्बू जेल में है।” “क्यों???”
तो म्हणाला, “उस दिन तड़के अम्मी ने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही हैं। पड़ोस का नानके दो-चार कपड़े के थान उठा के लाया है। मोहल्ले के बाकी मर्द भी वहीं गए हैं और तुम हो कि सो रहे हो।”
अब्बू उठला. मनात विचार आला—हे योग्य नाही. पण त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण मोहल्लाच—हिंदू असो वा मुसलमान—दुकाने लुटायला निघाला होता. अब्बूही त्या गर्दीचा भाग बनला. सदरमध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बूही त्या दुकानात गेला. “लालच बुरी बला होती है” ही म्हण उगाचच नाही. शरीराला पेलवत नव्हतं तरीही ३-४ कपड्यांचे थान डोक्यावर लादून अब्बू बाहेर पडला.
अचानक आवाज आला- “पुलिस! पुलिस!” अब्बू घाबरला. त्याचा तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच, पण पोलिसांनीही त्याला रंगे हाथ पकडलं.
अशा वेळी काय म्हणावं हे कळण्यासारखं वय नव्हतं, तरीही मी हिम्मत करून विचारलं, “कोई वकील किया है क्या?” “हाँ, एक वकील किया है, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत हैं। काही वर्ष तरी अब्बूला जेलमध्ये काढावी लागतीलच.”
छोटू पुढे म्हणाला, “उस दिन अब्बू से गलती हो गई। किस्मत खराब थी, और क्या।” खरंच! किस्मतची मार छोटूवर पडली होती. त्याचं शिक्षण सुटलं. लहान वयातच घराचा संपूर्ण गाडा त्याच्या खांद्यावर आला होता.
त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार घेऊन आली होती.