Monday, March 30, 2026

मोगर्‍या फुलांची वेणी (संपादित)


तब्बल ३५ वर्षांनी ते दोघं पुन्हा भेटले. केस पांढरे झाले होते, चेहऱ्यावर काळाच्या रेषा उमटल्या होत्या, पण डोळ्यांतली ओळख अजूनही ताजी होती. त्याला आठवली ती शेवटची भेट—नेहरू पार्क.  केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळलेली ती, त्याला खेटून बसलेली होती.  त्याने वेणी हुंगण्याचे नाटक करत तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं होतं. “दूर हो! काय समजलं मला? अजून लग्न नाही झालं आपलं,” ती रागावून म्हणाली. “मग केव्हा विचारणार तुझ्या वडीलांना? मला नोकरी लागून वर्ष झालंय.” “अरे, माझे बाबा एका भाड्यावर राहणार्‍या बाबूशी आपल्या लेकीचे लग्न करायला तैयार होणार नाही”. ‘मग काय आपण असेच राहायचे’? 

मी सरकारी नौकरी साठी प्रयत्न करते आहे. एकदा मला नौकरी लागली की विचारेल की बाबांना, एका स्मार्ट पण अक्कल नसलेला, कंजूष मुलाशी लग्न करायचे आहे. दोघांच्या पगारात आमचे व्यवस्थित भागेल. माझे बाबा नाही म्हणणार नाही, खात्री आहे मला”. ‘मी कंजूष?’ “मग काय, आपल्या प्रेयसीला चाणक्य सिनेमा हाल मध्ये ६५ पैश्याचे पहिल्या रोचे तिकीट घेऊन सिनेमा दाखवणार्‍याला काय म्हणायचे? एका रुप्पलीचे पॅापकॅार्न आणि एक कप कॉफी दोघांसाठी. काय मजनू आहे माझा. बाय द वे तुझ्या आई-वडीलांना विचारले का?” ‘दूध देणार्‍या गायीला, कोण नकार देणार’. तिने त्याच्या पाठीवर जोरात गुद्दा मारला. ‘आई! ग! किती जोरात मारते’. “आई! ग, नाही म्हणायचे, बायको ग, म्हणायचे”. ‘म्हणजे लग्न झाल्यावरही तू मारणार’ “हो, पण लाटण्यानी” ....

पुढे ती भेटलीच नाही. नंतर कळले मुंबईत एका सरकारी कार्यालयात तिने नौकरी जॉईन केली होती. तिचे लग्नही झाले. तो देवदास तर नक्कीच नव्हता. आईने पसंत केलेल्या मुलीशी त्याने लग्न केले.

‘कशी आहे’ ती म्हणाली, “राग तर नाही ना माझ्यावर! माझ्या वडीलांना आपले प्रकरण माहित झाले होते. मला तुझ्या पासून दूर नेण्यासाठी बाबांनी खेळी केली. आईने शपथ घातली. तूही तिथे नव्हता. नाइलाजाने वडीलांची इच्छा पूर्ण केली”.

 काय करतात तुझे मिस्टर?” “ ते हयात नाहीत. मोठ्या हुद्द्यावर होते, दारू आणि जुगाराच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते  सैतानासारखे वागायचे. काही वर्षांतच वर गेले. मुलगाही बापाच्या वळणावर गेला. दारूने त्याचे ही प्राण  घेतले. आता बहुतेक वृद्धाश्रमात जावं लागेल.  नशीब एकेकाचे. तुझे काय”.

तुझे लग्न झाले हे कळल्यावर खरं तर मला राग आला होता. पण आईने समजावले, आयुष्य हे असेच असते. आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर एकदा बायको सोबत ओडीयन मध्ये बाल्कनीचे तिकीट घेऊन सिनेमा पाहिला , “मैने प्यार किया” तो उगाच हसला. 

“अरे वा! भाग्यशाली आहे ती, प्रेयसीसाठी ६५ पैशांचे तिकीट आणि बायकोसाठी बाल्कनी” बोलताना तिने जीभ चावली”. त्याचे लक्ष रस्त्यावर मोगऱ्या फुलांच्या वेण्या विकणार्‍या दुकानदाराकडे गेले, मनात विचार आला. तिच्या पांढर्‍या केसांवरही मोगऱ्याची वेणी शोभून दिसेल. तो थांबला, त्याने तिला विचारले ‘वेणी घ्यायची का’? “हो, घे ना! तुझ्या बायकोसाठी. मलाही आवडते, मोगऱ्याची वेणी.... त्याने दोन वेण्या घेतल्या. वेणी हातात घेत, ती म्हणाली “तुला विसरण्याचा प्रयत्न केला पण विसरू शकली नाही. हे गेल्यावर तर सारखी तुझीच आठवण यायची. कधी-कधी वाटायचे, कदाचित अजूनही तू माझी वाट पहात असेल तर कधी वाटायचे तुझाही संसार असेल. तुला विसरलेच पाहिजे. मनाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. तुझी आठवण अनावर झाली कि बाजारात जाऊन मोगऱ्या फुलांची वेणी विकत घेते, खोलीचे दार बंद करून वेणी केसांत माळून आरश्या समोर उभी राहून रडते... आजही रडणारच”. काही क्षण दोघ काहीच बोलले नाही. तेवढ्यात तिची बस आली आणि ती निघून गेली... 

काही वेळाने त्याचे लक्ष हातातल्या मोगऱ्याच्या वेणी कडे गेले. त्याने उभ्या आयुष्यात बायकोसाठी मोगऱ्या फुलांची वेणी घेतलीच नव्हती आणि आज... त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. लग्ना पूर्वी त्याच्या बायकोनेही राजा-राणीच्या सप्तरंगी संसाराचे चित्र पाहिले असेल. पण प्रत्यक्षात दिसली, नवर्‍याच्या अपुर्या पगारात घर चालवण्याची तिची धडपड. संसार फुलण्यासाठी तिने स्वत:च्या सर्व इच्छा मारून टाकल्या. कधी काहीही मागीतले नाही किंवा हट्ट केला नाही. त्याला आठवले, कित्येकदा त्याचा आणि पोरांचा डब्बा भरल्यावर भाजी शिल्लक राहायची नाही. कधी विचारले ‘अग! तुझ्यासाठी भाजी उरली नाही’. ‘मी माझे बघून घेईल’, हेच नेहमीचे उत्तर. बहुतेक लोणच्या सोबत किंवा पोळीला तेल, तिखट-मीठ लाउन भूक भागवायची. तिनेही त्याच्यावर शरीर व मनानी प्रेम केले आहे, बदल्यात त्याने काय दिले??? कधी मनाने प्रेम केलं का तिच्या वर? त्याने निश्चय केला, आता सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायला हवी. घरी गेल्यावर त्याने आपल्या हाताने बायकोच्या पांढर्‍या शुभ्र केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळली....

  

Thursday, March 26, 2026

वासंतिक प्रेम

 

 

टेसूच्या ज्वाळांनी तन उजळले,
कोकिळेच्या कुहूने मन झुलले
सखी, वसंत प्रेमाचा साज घेऊन आला.

वसंताच्या वाऱ्यात उधळले रंग,
धरणीने केला शृंगार प्रेमाचा 
माझ्या मनात अलगद  
उमलली प्रेमाची कळी.
 


Monday, March 23, 2026

आजचा युगधर्म

 
दुर्योधनाच्या भव्य सभेत
कोट्यवधींची गर्दी पाहून,

गोंधळलेला अर्जुन म्हणाला—

“योगेश्वर, आता माझा धर्म कोणता?”

कृष्णानं मर्सिडीज सुरू केली,
आणि पोहोचला दुर्योधनाच्या तंबूत.

तो अर्जुनाला म्हणाला—

लोकशाहीच्या या युगात
ना सत्य, ना तप, ना त्याग
संख्या आहे विजयाची साक्ष ,
बहुमत म्हणजे धर्म 
बहुमत म्हणजे न्याय 
  
दुर्योधनाशी सौख्य 
हाच आहे आजचा युगधर्म
 


 


 

  


 

Friday, March 20, 2026

स्वप्नील शब्दांची सोनेरी वही


आयुष्याच्या सायंकाळी मला माझ्या आईची आठवण आली. आठवला गावातील जुना वाडा, आठवले पहाटे-पहाटे गुलाब फुलांवर पडणारे मोती सारखे दव बिन्दु. प्राजक्त फुलांचा सडा. मंदिराचा घंटा नाद. खळखळ वाहणारी नदी, गुरांच्या मागे धावणे, अस्ताचलच्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन कुरणे. त्याच स्वप्नील काळात शब्दांना पंख फुटले होते. स्वप्नील शब्दांना रेखाटण्यासाठी आईने आणून दिली होती सोनेरी वही. सारे-सारे आठवले. 

आयुष्यभर मायेच्या मोहात अडकून, पोटासाठी मी निरर्थक धावपळ करत राहिलो. दररोज मी कागदांवर शब्दांचा खोटा हिशोब लिहीत होतो. माझी सृजनशीलता आभासी होती. कवी सम्मेलनांमध्ये निरर्थक शब्दांचा खेळ मांडून भरपूर मानधन घेत होतो. मी स्वतःला ब्रह्मा समजू लागलो होतो. पांडित्याच्या आव आणून दुसर्यांना हीन लेखत होतो. पण फक्त मलाच माहीत होते,  माझे शब्द अर्थहीन, गंध हीन आणि भावना हीन आहेत.  माझी सोनेरी शब्दांची वही  हरवली होती. माझं अस्तित्व, हरवलेले स्वप्न होते. 

पुन्हा ऐकू येईल का मला आईची मधुर अंगाई?  तिच्या कुशीत मी पुन्हा शिरू शकेन का? माझी सोनेरी स्वप्नांची हरवलेली वही ती पुन्हा शोधून देईल का? अनेक प्रश्नांचा गुंता मला चैन पडू देत नव्हता. मी आईचा पुकारा गेला.  तेवढ्यात आईचा स्वर्गीय आवाज कानात गुंजला "बाळ, तुझ्या हृदयाच्या कपाटातच बंद आहे ती सोनेरी वही. फक्त मायेची धूळ त्यावर जमलेली आहे". 

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. "कविवर्य येत्या रविवारी हास्य कवि सम्मेलन ठेवले आहे, आपल्यासाठी मोठे मानधन ही निश्चित केले आहे. मन दोलायमान झाले. अखेर मला उत्तर सापडले. "मी येणार नाही, म्हणतात मोबाइल बंद केला". मला माझी सोनेरी वही सापडली होती. 


Tuesday, March 17, 2026

उत्तम राजनेता


संत समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या ग्रंथात दशक १८ (बहुजिनसी) च्या समास मध्ये उत्तम पुरुष (सर्वोत्तम व्यक्ती) चे निरूपण केले आहे.   यात उत्तम राजनेत्याच्या  शारीरिक, मानसिक आणि राजकीय गुणांचे वर्णन आहे. समर्थ स्वामी म्हणतात की, उत्तम पुरुषाने आपले अंतर्मन विवेक, विचार आणि राजकरणाने सजवले पाहिजे. हा समास शिवाजी महाराजांच्या अफझलखान वधानंतरच्या भेटीच्या संदर्भात सांगितला गेला असावा.

नाना वस्त्रें नाना भूषणें येणें शरीर श्रृंघारणें
विवेकें विचारें राजकरणें अंतर श्रृंगारिजे
 
राजनेत्याने समयोचित, सुंदर, स्वच्छ  वस्त्र धारण केले पाहिजे.  ज्याने आंतरिक शक्ति आणि बुद्धिमत्ता प्रगट होईल. उदाहरण. आपले पंत प्रधान मोदीजी मंदिरात जाताना धार्मिक पोशाक धारण करतात, 15 ऑगस्टच्या भाषणाच्या वेळी वेगळी, विदेशात जाताना वेगळे. त्यांचे वस्त्र नेहमी स्वच्छ आणि आकर्षक असतात.
 
तर्हे सीघ्रकोपी सदा कदापि धरी मर्यादा
राजकारण संवादा मिळोंचि नेणें
 
अशा शीघ्रकोपी (घाईगडबड करणाऱ्या) व्यक्तीला मर्यादा धरता येत नाहीत. राजकारणात संवाद जोडणे (इतरांशी जुळवून घेणे) त्याला अवघड जाते. उत्तम राजनेतीत संवाद आणि सामंजस्य आवश्यक आहे.
 
समयासारिखा समयो येना नेम सहसा चलेना
नेम धरितां राजकारणा अंतर पडे
 
पत्येक प्रसंग वेगळा असतो, म्हणून एकच नियम कायम चालत नाही. राजकारणात एकाच नेमाचा (नियमाचा) हट्ट धरला, तर फूट पडते. राजनेती लवचिक आणि प्रसंगानुसार असावी.  छत्रपती शिवाजी महाराजाने शायस्ता खानच्या महालावर छापा मारून त्याच्या निमोड केला. पण राजा जयसिंह समोर प्रसंग पाहून संधि ही केली आणि 23 किल्ले ही मुगलांना दिले. त्यासाठी समर्थ म्हणतात, विवेकी राजनेता छत्रपती शिवरायांसारखा प्रसंग पाहोन चालतो.
 
न्याय नीति विवेक विचार नाना प्रसंगप्रकार
परीक्षिणें परांतर देणें ईश्वराचें
 
या ओवीत समर्थ रामदास स्वामी उत्तम पुरुषाच्या गुणांचे वर्णन करताना म्हणतात उत्तम राजनेता  न्याय, नीती, विवेक आणि विचार हे मूलभूत गुण ईश्वरी देणगी आहेतउत्तम राजनेता विविध प्रसंग हातळताना इतरांच्या मनाची (परांतर) परीक्षा घेऊन निर्णय घेतो.   हा गुणधन अभ्यासाने विकसित होतो, ज्यामुळे तो राजनेता धर्मरक्षक आणि लोकहितकारी होतो.
 
समर्थ स्वामींच्या मते ब्राह्मण म्हणजे  विवेकी, धर्मनिष्ठ आणि ज्ञानमार्गाचे मार्गदर्शक  करणारे असतात . असे ब्रम्हज्ञानी  समाजाचे आध्यात्मिक आणि बौद्धिक आधार असतात,  ज्यांची चिंता उत्तम पुरुष वाहतो. खाली प्रत्येक ओवीचा मूळ मजकूर, अर्थ आणि संदर्भ दिला आहे. राजनेत्याने विद्वानांचा नेहमीच सम्मान केला पाहिजे.
 
धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार
जाले आहेत पुढें होणार देणें ईश्वराचें ॥२०॥
 
समर्थ म्हणतात राजनेता ईश्वराच्या अवतारासारखा धर्माची स्थापना करणारा, परोपकारी आणि लोकांचे पालन करणारा असतो. राजकार्य केवळ सत्ता नसून विवेकाने सजवलेली कला आहे, जी अति, हट्ट आणि बेइमानी टाळून ईश्वरकृपेने चालवावी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे योद्धे किंवा राम-कृष्णासारखे अवतार, जे अधर्म नष्ट करून धर्माची पुनर्स्थापना करतात त्यांना ईश्वरीय अवतार म्हंटले आहेताजे उदाहरण मननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर श्री राम मंदिराची अयोध्येत 600 वर्षांनंतर  पुन:स्थापना झाली. 

Friday, March 13, 2026

"दोन सांड भिडले की गावभर धूळ उडते."

 


आपण
सर्वांनी कधी ना कधी रस्त्यावर दोन सांडांची झुंज पाहिलीच असेल. काही वर्षांपूर्वी मला देखील असा अनुभव आला होता. दिल्लीचा सीताराम बाजार संध्याकाळ होत होती, पण गर्दी कमी होत नव्हती. दुकानांसमोर सजलेले रंगीबेरंगी गाडे, मसाल्यांचा आणि पक्वान्नांचा मिसळलेला सुगंध, ग्राहकांच्या घासाघाशीच्या आवाजसगळे मिळून एक जिवंत दृश्य तयार करत होते.

 

पाणीपुरीवाला हाक मारत होता, “या भैया, मसालेदार पाणीपुरी!” बाजूलाच आलू टिक्कीवाल्याच्या तव्यावर तूप खणखणत होते. भाजी आणि फळांच्या गाड्यांवर घासाघाशी सुरू होती.


लोक आपापल्या कामात मग्न होते, तेवढ्यात अचानक बाजारात गोंधळ झाला. कुठूनतरी दोन विशाल सांड रस्त्याच्या मध्यभागी आले. आधी ते काही क्षण एकमेकांकडे रोखून पाहत राहिले, जणू काही मौन आव्हान देत होते. मग अचानक त्यांच्या शिंगांची टक्कर झाली. धडक इतकी जोरदार होती की आवाज संपूर्ण बाजारात घुमला.


काही क्षणांतच त्यांची झुंज उग्र झाली. दोन्ही सांड एकमेकांना ढकलत इकडे-तिकडे धावू लागले. बाजाराची अरुंद गली त्यांच्यासाठी जणू एखादे आखाडा बनली. जे काही समोर आले ते त्यांच्या धडकेत सापडले. पाणीपुरीवाल्याचा गाडा उलटला आणि मसालेदार पाणी रस्त्यावर वाहू लागले. आलू टिक्कीवाल्याचा तवा उलटला आणि गरम टिक्क्या धुळीत पडल्या. भाज्यांच्या टोपल्या दूरवर विखुरल्याटोमॅटो, वांगी, बटाटे रस्त्यावर लोळू लागले. फळवाल्याची सफरचंदे आणि केळी लोकांच्या पायाखाली चिरडली गेली.

घाबरून लोक पळू लागले. कोणी आपल्या मुलांना ओढून सुरक्षित जागी नेत होते, कोणी जवळच्या दुकानांत लपले. गोंधळात काही लोक पडले आणि जखमी झाले. सायकली आणि मोटरसायकलीही धक्क्याने पडून रस्त्यावर विखुरल्या. काही दुकानदार असहाय्यपणे आपले उजाडलेले सामान पाहत उभे राहिले.

मीही त्या वेळी बाजारात होतो. अचानक झालेल्या या गोंधळाने घाबरून मीही एका छोट्या किराणा दुकानात आसरा घेतला. दुकानात उभे राहून आम्ही बाहेरचे दृश्य पाहत होतो. बाहेर सांडांची झुंज सुरू होती. शिंगांची टक्कर, जमिनीवर पडणाऱ्या खुरांचा आवाज, आणि मध्येच लोकांच्या घाबरलेल्या हाका.

 

हा संघर्ष साधारण १५२० मिनिटे चालला असेल. शेवटी दोन्ही सांड  दमून वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. पण त्यांच्या जाण्यानंतर जे दृश्य उरले ते एखाद्या छोट्या वादळानंतरच्या विध्वंसासारखे होते. उलटलेले गाडे, विखुरलेल्या भाज्या, पडलेली भांडी, आणि घाबरलेले लोक, जे हळूहळू बाहेर येत होते.

 

आज अमेरिकाइराण युद्धाचा समाचार ऐकताना मला ते जुने दृश्य डोळ्यांसमोर आले. दोन शक्तिशालीसांडसमोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्या वाढत्या तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या लढाईत कोणताही सांड  जिंकला तरी त्याचा परिणाम जगभरातील सामान्य माणसालाच भोगावा लागेल ज्यांचा  मोठ्या देशांच्या झुंजीशी थेट संबंध नाही. अगदी तसेच जसे बाजारातील सांडांच्या  झुंजीनंतर सर्वात जास्त नुकसान पाणी-पुरीवाल्याचे, फळ-भाजीवाले आणि  दुकानदारांचे झाले. अनेक निर्दोष लोक ही जख्मी झाले.   

 

सारांश, मोठ्या शक्तींची झुंज नेहमी आखाड्यात नाही, तर जगाच्या बाजारात आणि सामान्य लोकांच्या जीवनात आपला खरा परिणाम दाखवते. महागाई आणि बेरोजगारीचा परिणाम सामान्य माणसालाच भोगावा लागतो. तेव्हा समजते की ताकदवानांच्या लढाईचा सर्वात मोठा भार नेहमी दुर्बलांनाच उचलावा लागतो.