Wednesday, July 15, 2026

पंचमहायज्ञ: गृहस्थाश्रमाची पाच शाश्वत कर्तव्ये



ईजे यज्ञेभिः शशमे शमीभिर्ऋधद्वारायाग्नये ददाश।

एवा चन तं यशसामजुष्टिर्नांहो मर्तं नशते न प्रदृप्तिः 
ऋग्वेद (मण्डल ६, सूक्त ३, मंत्र २)

 
अर्थ: जो मनुष्य यज्ञांद्वारे ईश्वराची (अग्नीची) उपासना करतो, आपल्या पवित्र कर्मानी (शमीभिः) शांत आणि संयमी राहतो, तो आपल्या मानवी जीवनाचा, घराचा आणि कुळाचा उत्कर्ष करतो. सूर्य ज्याप्रमाणे सर्वांना प्रकाश देतो, त्याप्रमाणे यज्ञीय भावनेने जगणारा मनुष्य सर्वांचे कल्याण करतो आणि तो अद्भुत अग्नी आपल्या बुद्धीला उन्नत करतो.
 
ऋग्वेदातील या यज्ञीय भावनेला आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनात आणण्यासाठी मनुस्मृतीमध्ये 'पंचमहायज्ञ' सांगितले आहेत.  
 
अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम्।
होमो दैवो बलिर्भौतो नृयज्ञोऽतिथिपूजनम्।।
(मनुस्मृती ३.७०):
 
अर्थ: . ब्रह्मयज्ञ म्हणजे  अध्यापन (शिकवणे आणि शिकणे) म्हणजे ब्रह्मयज्ञ होय. पितृयज्ञ: म्हणजे पूर्वजांचे तर्पण (स्मरण आणि आदर) करणे म्हणजे पितृयज्ञ होय. देवयज्ञ: म्हणजे होम-हवन (अग्नीमध्ये आहुती देणे) म्हणजे देवयज्ञ होय. भूतयज्ञ (बलिवैश्वदेव यज्ञ): म्हणजे भूतमात्रांना (प्राणी, पक्षी, निसर्ग) बली किंवा अन्न देणे म्हणजे भूतयज्ञ होय. मनुष्ययज्ञ (नृयज्ञ): अतिथींचे पूजन आणि सेवा करणे म्हणजे नृयज्ञ होय.

या शिवाय परोपकार इत्यादि  उत्तम कर्म, सत्य भाषण  ही यज्ञ आहेत.   असे शुभ कर्म केल्याने चित्त शांत होतो आणि पाप नष्ट होतात आणि ग्राहस्थ कर्म बंधनातून मुक्त होतो. 
  
या पाच ही यज्ञाचे अर्थ आणि आज हे यज्ञ कसे करायचे

ऋषीमुनींच्या मते, आपण या समाजात जगताना नकळत अनेक जीवांना इजा पोहोचवतो (जसे की पाणी भरताना, झाडू मारताना किंवा चूल पेटवताना). या दोषांचे निवारण करण्यासाठी आणि सृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पाच यज्ञ रोज करायचे असतात:

१. ब्रह्मयज्ञ (ऋषियज्ञ)

दररोज बुद्धी, ज्ञान आणि संस्कृतीचा परिचय देणाऱ्या ग्रंथांचे अध्ययन करणे आणि त्याचे ज्ञान निःस्वार्थपणे इतरांना देणे म्हणजे ब्रह्मयज्ञ; जेणेकरून सर्वांना सत्य आणि समाजाच्या कल्याणकारी मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळेल.
 
आजचे उदाहरण: आजच्या डिजिटल युगात इंटरनेटवरून किंवा पुस्तकांतून विधायक व नैतिक गोष्टी शिकणे, चांगल्या विचारांचा आणि साहित्याचा प्रसार करणे तसेच एखाद्या गरजू किंवा गरीब मुलाला मोफत शिक्षण देणे, हाच खरा ब्रह्मयज्ञ आहे.
 
 
२. पितृयज्ञ

ज्या माता-पिता आणि पूर्वजांमुळे आपल्याला हे जीवन व संस्कृती मिळाली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे पितृयज्ञ.

आजचे उदाहरण: आजच्या काळात आपल्या वृद्ध आई-वडिलांची मनापासून सेवा करणे, त्यांचा आदर राखणे आणि आपल्या दिवंगत पूर्वजांच्या स्मृत्यर्थ एखाद्या अनाथालयाला किंवा वृद्धाश्रमाला मदत करणे, हा आजचा पितृयज्ञ आहे. आज पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे साजरे केले जाणारे 'मातृदिन' आणि 'पितृदिन' हे केवळ वर्षातील दोन दिवस नसून, ही कृतज्ञतेची भावना ऋग्वेदकाळापासून 'पितृयज्ञा'च्या माध्यमातून आपल्या संस्कृतीत अखंड रुजलेली आहे. पालकांप्रती असलेल्या याच शाश्वत आदरामुळे आणि कर्तव्याच्या भावनेमुळे आजच्या आधुनिक युगातही भारतात 'संयुक्त परिवार' (एकत्र कुटुंब पद्धती) आणि कौटुंबिक मूल्यांची वीण घट्ट टिकून आहे."

३. देवयज्ञ

वैदिक काळापासून  निसर्गातील ज्या शक्तींमुळे (सूर्य, हवा, पाणी, वनस्पती) आपण जगू शकतो, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  अग्नीमध्ये आहुती देऊन हा यज्ञ केला जायचा. अग्नी, वायू, जल व माती या मूलभूत तत्त्वांद्वारे निर्माण झालेल्या वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी गायीच्या शुद्ध घी व औषधी वनस्पतींच्या आहुतीने केलेला यज्ञ हवेची शुद्धता करतो, रोगजंतू नष्ट करतो आणि सर्व प्राणिमात्रांसाठी अनुकूल पर्यावरण टिकवतो.
 
आजचे उदाहरण: आजच्या काळात पर्यावरणाचे रक्षण करणे, झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्रदूषण न करणे आणि घरात सात्विक वातावरण ठेवणे हाच देवयज्ञ आहे.
 
४. भूतयज्ञ (बलिवैश्वदेव यज्ञ)
 
ईशान उपनिषद सांगते की, आपल्या वाट्याला आलेल्या वस्तूंचा कृतज्ञतेने उपभोग घेत, प्रत्येक जीवाला इथे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. निसर्गाचा आदर करत कर्म केल्यास शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरली तरी कर्मबंधने मानवाला बांधू शकत नाहीत. भूत यज्ञ हा या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव आहे.समर्थ रामदासस्वामी ही म्हणतात  "जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत" परोपकारी वेचि जीव । तो सत्त्वगुण जाणावा ॥ "या जगात भेटणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्रात आणि मानवात परमेश्वराचेच रूप पाहावे. सर्वांशी प्रेम, दया आणि आदराने वागणे श्रम आणि आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी खर्च करतो हीच खरी ईश्वरसेवा आहे.   
 
आजचे उदाहरण: उन्हाळ्यात गच्चीवर किंवा गॅलरीत पक्षांसाठी पाणी व दाणे ठेवणे, रस्त्यावरील मुक्या प्राण्यांन अन्न देणे आणि निसर्गातील जैवविविधतेचा आदर करणे हे आजचे भूतयज्ञ आहे.
 
५. मनुष्ययज्ञ (नृयज्ञ)

गरजू, वृद्ध, आजारी व निराधार व्यक्तींना मदतीचा हात देणे, अतिथींचा आदर करणे, भुकेल्यांना अन्नदान करणे आणि समाजोपयोगी कार्यात सहभागी होणे हा आधुनिक मनुष्ययज्ञ आहे. सर्व प्राणीमात्र आणि मानवजातीबद्दल करुणा, सेवा व कृतज्ञतेची भावना ठेवणे हेच पंचमहायज्ञांचे खरे सार आहे.

आजचे उदाहरण: घरी आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करणे, तसेच समाजातील गरीब, आजारी किंवा उपेक्षित व्यक्तीला वैद्यकीय, मानसिक किंवा आर्थिक मदत करणे हा आजचा सर्वोत्तम मनुष्ययज्ञ आहे. या पंचमहायज्ञांचे महत्त्व वेद आणि उपनिषद काळापासून चालत आले आहे, याचे पुरावे खालील ग्रंथांमध्ये मिळतात: शतपथ ब्राह्मणात या पाच यज्ञांना थेट 'महायज्ञ' अशी संज्ञा देऊन त्यांचे नित्य आचरण अनिवार्य मानले आहे:

 
पञ्चैव महायज्ञाः। तान्येव महासत्राणि-देवयज्ञः
पितृयज्ञो भूतयज्ञो मनुष्ययज्ञो ब्रह्मयज्ञ इति। 
शतपथ ब्राह्मण (शुक्ल यजुर्वेद - ११.५.६.१)
 
ऋषींनी या पाच महायज्ञांना 'महासत्र' (महान अनुष्ठान) म्हटले आहे. ते म्हणजे - देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. हे मानवाने रोज केलेच पाहिजेत. भगवान श्रीकृष्णही म्हणतात,    
 
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम।।
(भगवद्गीता ४.३१)
 
हे कुरुश्रेष्ठा (अर्जुना), यज्ञापासून उरलेले 'यज्ञशिष्ट' (यज्ञाचे अन्न किंवा फळ) जे अमृतातुल्य आहे, त्याचे सेवन करणारे श्रेष्ठ पुरुष सनातन परब्रह्माला प्राप्त होतात. परंतु, जो मनुष्य या जीवन-यज्ञाचे आचरण करत नाही (म्हणजे स्वार्थी जीवन जगतो), त्याला हा भौतिक लोक (हा संसार) देखील सुखकर ठरत नाही; मग परलोक कसा बरे मिळेल? 'यज्ञशिष्टामृतभुजो' (यज्ञाचे अन्न ग्रहण करणारे): याचा अर्थ असा की गृहस्थाने प्रथम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ याद्वारे समाज, निसर्ग आणि प्राण्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत. त्यानंतर जे उरते, ते अन्न नसून 'अमृत' आहे. २. 'नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य' (यज्ञ न करणाऱ्याला हा लोकही नाही): भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की, जो माणूस कोणताही त्याग किंवा यज्ञ न करता फक्त स्वतःपुरता विचार करतो, त्याला या समाजातही आदर किंवा सुख मिळत नाही. मानवी जीवन हे परस्परांच्या सहकार्यावर (Interdependence) टिकून आहे, हेच यातून सिद्ध होते. आज ही भारतात घरात शुभ कार्य असेल तर भंडारा इत्यादि करतात. सर्वच धार्मिक क्षेत्रांत भक्तांनी उपाशी राहू नये या  भावनेने  अन्नछत्र चालविले जातात.  
 
निष्कर्ष: ऋग्वेदातील मंत्रापासून ते भगवद्गीतेपर्यंत आपल्या सर्व ग्रंथांनी एकच संदेश दिला आहे की, मनुष्य हा एकटा जगू शकत नाही. तो समाज आणि निसर्गाचा ऋणी आहे. पंचमहायज्ञ म्हणजे कोणतीही कठीण कर्मकांडे नसून, निसर्ग, समाज, कुटुंब आणि स्वतःच्या बुद्धीप्रती 'कृतज्ञता' (Gratitude) व्यक्त करण्याची एक सुंदर व शाश्वत जीवनपद्धती आहे.
 

Tuesday, July 7, 2026

वट सावित्रीच्या पूजेमागचे वैज्ञानिक सत्य

 


भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमेचा सण आणि सावित्री-सत्यवानाची कथा ही केवळ एक काल्पनिक
'भाकड कथा' नसून, त्यामागे मानवी आरोग्याचे आणि पर्यावरण संरक्षणाचे एक प्रगल्भ 'विज्ञान' दडलेले आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये हा सण नेमका कडक उन्हाळ्याच्या शेवटी येतो, यामागे एक अत्यंत महत्त्वाचे भौगोलिक व जैविक कारण आहे.


सावित्री-सत्यवान कथेमागील विज्ञान: जेव्हा उन्हाळ्यात तापमान ४०°C ते ४५°C च्या पार जाते आणि अत्यंत उष्ण वारे (लू) वाहतात, तेव्हा वडाचे विस्तीर्ण आणि घनदाट छत (Canopy) या उष्ण लहरींना शोषून घेते. या झाडाखालील तापमान सभोवतालच्या वातावरणापेक्षा ४ ते ५ अंशांनी कमी असल्याने, ते उष्माघातापासून (Heat Stroke) मानवाचे आणि पशू-पक्ष्यांचे नैसर्गिक कवच म्हणून रक्षण करते.

कडक उन्हामुळे जेव्हा जीव कासावीस होतो, श्वसनाचा त्रास होतो किंवा हृदयगती मंदावते, अशा आणीबाणीच्या प्रसंगी वडाच्या झाडाखाली मिळणारा प्रचंड प्रमाणातील शुद्ध प्राणवायू (ऑक्सिजन) शरीराला नवजीवन देतो. हा निसर्गदत्त ऑक्सिजन जणू काही आपत्कालीन वैद्यकीय स्थितीत 'सॉर्बिट्रेट' (Sorbitrate) या गोळीसारखेच काम करतो.


पौराणिक कथेत सावित्रीने वडाच्या झाडाखालीच यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते; यामागील वैज्ञानिक सत्य हेच आहे की, उन्हाच्या तीव्रतेने मूर्च्छित झालेल्या सत्यवानाला वडाच्या शीतल छायेने आणि तिथल्या अतिशुद्ध ऑक्सिजननेच जीवदान दिले असणार.


वटवृक्षाची वैशिष्ट्ये वडाला आपल्या संस्कृतीत आणि निसर्गात 'राजनिवास' किंवा 'अक्षय वृक्ष' मानले जाते. या वृक्षाचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत:


1. दीर्घायुष्य आणि विस्तार: वडाचे झाड शेकडो वर्षे जगू शकते. त्याच्या फांद्यांमधून निघणाऱ्या पारंब्या जमिनीत रुतून नवीन खोड तयार करतात, ज्यामुळे या झाडाचा विस्तार अफाट होतो. याची मुळे दूरवर पसरलेली असतात आणि मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरवतात.

2. अखंड प्राणवायू (ऑक्सिजन): वड हा अशा मोजक्या वृक्षांपैकी एक आहे जो मोठ्या प्रमाणावर प्राणवायू उत्सर्जित करतो आणि वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतो.

3. शीतल छाया: वडाचे छत एवढे दाट असते की, कडक उन्हाळ्यातही या झाडाखाली अत्यंत थंड आणि आल्हाददायक वातावरण राहते.

4. जलसंधारण: वडाची पाळेमुळे जमिनीत खूप खोलवर पसरून पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचे कार्य करतात, ज्यामुळे भूमीचे दुष्काळापासून रक्षण होते.

 

औषधीय गुणधर्म:  आयुर्वेदात वडाच्या झाडाच्या प्रत्येक भागाला (पाने, फळे, साल, पारंब्या आणि चीक) औषधी मानले गेले आहे:

 

1. पाने आणि फळे: अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात. फळे पक्ष्यांचे मुख्य अन्न तर आहेतच, पण मानवासाठीही ती काही विशिष्ट आजारांवर चूर्ण स्वरूपात फायदेशीर ठरतात.

2. वडाचा चीक:सांधेदुखी किंवा सूज आल्यास लावल्याने आराम मिळतो; दातांच्या दुखण्यावरही गुणकारी मानला जातो.

3. पारंब्या: कोवळ्या पारंब्यांचे चूर्ण केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते; यामुळे केस मजबूत होतात.

4. साल: याचा काढा शरीरातील अंतर्गत दाह (inflammation) कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरला जातो.

 

पक्ष्यांचे आणि जीवांचे आश्रयस्थान: वडाचे झाड म्हणजे केवळ एक वनस्पती नसून ते निसर्गाचे एक मोठे हॉटेल किंवा हक्काचे घर आहे. या झाडावर मैना, पोपट, कावळे, घुबड आणि अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी राहतात. वडाची लहान-लहान लाल फळे ('टेंभा') हे पक्षी, खारी आणि माकडांचे आवडते खाद्य आहे. त्याच्या घनदाट पानांमध्ये असंख्य कीटक, मुंग्या आणि लहान जीव आश्रय घेतात. म्हणजेच, एक वडाचे झाड संपूर्ण परिसराची जैव विविधता टिकवून ठेवते.

पूजेमागचे मूळ कारण: वृक्ष संरक्षण आणि प्रकृतीचा सन्मान: आपल्या पूर्वजांनी वटपौर्णिमेच्या माध्यमातून वडाच्या पूजेची जी परंपरा सुरू केली, त्यामागे एक अत्यंत प्रगल्भ आणि वैज्ञानिक विचार होता.


१. कृतज्ञता आणि प्रकृतीचा सन्मान निसर्ग हाच आपला खरा पालनकर्ता आहे. वड आपल्याला सावली, औषध, शुद्ध हवा देतो आणि वातावरणाचा समतोल राखतो. या उपकाराची जाणीव ठेवून प्रकृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हाच पूजेचा मुख्य उद्देश आहे.

२. धार्मिक अधिष्ठानातून 'वृक्ष संरक्षण' पूर्वीच्या काळी आजच्यासारखे कायदे नव्हते. त्यामुळे एखाद्या मौल्यवान गोष्टीचे रक्षण करायचे असेल, तर त्याला श्रद्धेची आणि देवा-धर्माची जोड दिली जायची. वडाला 'पवित्र' मानल्यामुळे लोक त्याला तोडत नाहीत, उलट त्याचे जतन करतात, ही एक प्रकारे निसर्ग संरक्षणाची पारंपरिक पद्धत  आहे. "आपण वडाची पूजा करतो, म्हणूनच आज या महाकाय वृक्षाचे रक्षण होते," हे विधान त्रिकालाबाधित सत्य आहे. आमच्या फ्लॅटच्या समोरच्या बागेत आधी वडाचे झाड नव्हते. पाच-सात वर्षांपूर्वी लोकांनी वट पूजेसाठी झाड लावले. आज 15 फूट उंच झालेले आहे. भविष्यात महाकाय वृक्ष होणार.


३. 'निसर्ग वाचेल, तरच आपण वाचू' हा संदेश आजच्या सिमेंटच्या जंगलात जर आपण झाडे वाचवली नाहीत, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. वडाची पूजा करणे म्हणजे केवळ एका झाडाची पूजा करणे नव्हे, तर 'निसर्गाचे रक्षण हीच मानवाची सुरक्षा' या वैश्विक सत्याचा अंगीकार करणे होय. आजची सावित्री जेव्हा वडाची पूजा करते, तेव्हा ती प्रत्यक्षात पर्यावरणाचे सत्य जपून मानवाच्याच प्राणांचे रक्षण करत असते.



विज्ञान-कथा: वटवृक्ष आणि सावित्री

 

सावित्रीने वाचविले सत्यवानाचे प्राण,

भाकड कथा ही नव्हे मुळी, दडले तिज विज्ञान!

वटवृक्षाच्या सावलीत मिळे जीवा संजीवनी,

निसर्गरक्षणाचेच सत्य सांगते ही कहाणी. || ||

 

दीर्घायुषी हा वटवृक्ष, अथांग त्याचा विस्तार,

पशु-पक्षी-कीटकांना देई आसरा, आधार.

शुद्ध वायूचा अखंड झरा, मानवाला दान देई,

शीतल छाया शिरी धरून, वसुंधरेची सेवा वाही. || ||

 

पारंब्यांतुनी नवे जीवन, मुळे खोल रुजती धरणी,

जल साठवूनी दुष्काळातही, तृषार्तांची तृष्णा हरती.

अशा वृक्षा पूजूनी आपण, जपतो त्याचे अस्तित्व,

निसर्ग वाचला तरच वाचेल, मानवाचे भवितव्य! || ||

Saturday, July 4, 2026

समर्थ विचार: मंदिर आणि मठांचे व्यवस्थापन

 


आपल्या सनातन धर्मात मंदिर हे केवळ देवदर्शन आणि पूजापाठापुरते मर्यादित स्थान नसून, ते संपूर्ण समाजाला एकत्र बांधणारे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गतिमान करणारे मुख्य केंद्र आहे. मंदिरात साजरे होणारे देवांचे बहुदिवसीय उत्सव, जत्रा, भागवत सप्ताह, प्रवचन आणि कीर्तने याद्वारे केवळ आध्यात्मिक प्रबोधन होत नाही, तर लोककलेचे आणि व्यापाराचे एक विराट व्यासपीठ निर्माण होते. या जत्रांमध्ये समाजातील प्रत्येक घटकाला आणि कलाकाराला हक्काचे स्थान मिळते. नट, बहुरूपी, जादूगार, दशावतारी व गोंधळी कलाकार आणि लोकनृत्य सादर करणाऱ्या नर्तकी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतात; ज्यामुळे आपल्या पारंपरिक लोककलांचे जतन होते.
 
यासोबतच, लहान मुलांची खेळणी विकणारे, सुवासिक द्रव्ये, गृहोपयोगी वस्तू आणि विविध साहित्याचे स्टॉल्स लावणारे छोटे व्यापारी, तसेच ज्ञानप्रसाराचे काम करणारे पुस्तक विक्रेते यांना या निमित्ताने मोठी बाजारपेठ मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या या जत्रांमुळे त्या भागातील शेतकरी, कुंभार, विणकर आणि हस्तकला कारागिरांच्या उत्पादनांना थेट ग्राहक मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला (Rural Economy) मोठे चलन मिळते. उत्सवकाळात दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी आयोजित करण्यात येणारी मोफत वैद्यकीय (मेडिकल) शिबिरे आणि अन्नछत्रे हे मंदिराच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचे तर, आपली मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नसून ती कला, संस्कृती, व्यापार, आरोग्य आणि समाजकल्याण यांचा मेळ घालणारी एक आदर्श, स्वयंपूर्ण व्यवस्था आहे.
 
संत समर्थ रामदास स्वामी हे केवळ पारमार्थिक संत नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसंघटक आणि कुशल व्यवस्थापक होते. त्यांनी शिवकाळात महाराष्ट्रात उभारलेली मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नव्हती, तर ती संकटकाळात समाजाला धान्य, आश्रय आणि बळ देणारी प्रमुख केंद्रे होती. समर्थांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ११०० पेक्षा जास्त मठांची आणि मारुती मंदिरांची स्थापना केली. एका मध्यवर्ती केंद्रातून (चाफळ) या सर्व मठांचे जाळे आणि तिथे काम करणारे शेकडो तरुण 'रामदासी' कार्यकर्ते सांभाळणे, हे उत्कृष्ट नेटवर्क मॅनेजमेंट (Network Management) आणि नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे. असे करताना मठ आणि मंदिर कसे बांधले पाहिजे, तिथली व्यवस्था कशी असायला पाहिजे, याचे विस्तृत वर्णन श्री सार्थ दासबोधातील 'अर्चन भक्ती' आणि इतर समासांमध्ये केले आहे.
 
१. मंदिराचा परिसर वैभवपूर्ण असावा
 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, जुनी झालेली देवळे व मंदिरे यांचा जीर्णोद्धार करावा आणि त्यासाठीचे आवश्यक ते काम तत्परतेने पूर्ण करावे. हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, चौरंग, पालख्या, सुखावह वाहने, मंचक, डोलारे, विमाने इत्यादी सर्व साधने नूतनीकरण करून सज्ज ठेवावीत. मेघडंबरी, छत्रे, चामरे, अब्दागिऱ्या, निशाणे या वस्तू काळजीपूर्वक सांभाळाव्यात. देवाची नाना प्रकारची वाहने, बसण्यासाठी उत्तम ठिकाणे आणि विविध प्रकारची सुवर्णासने वगैरे प्रयत्नपूर्वक जपून ठेवावीत. भुवने, कोठड्या, पेट्या, पेटारे, रांजण, हौद, घागरी अशा मौल्यवान व उपयुक्त वस्तू अतिप्रयत्नाने जमा कराव्यात.
 
संकटप्रसंगी उपयोगी पडणारी अनेक भुयारे, तळघरे आणि त्यांना जोडणारे गुप्त बोगदे, विविध स्थळांना जोडणारी गुप्त द्वारे आणि अत्यंत मूल्यवान वस्तूंची भांडारे (खजिना) प्रयत्नपूर्वक निर्माण करून त्यांचे जतन करावे. उत्तम जागा निवडून भव्य मंदिराची निर्मिती करावी. तिथे अनेक देवकुळे, शिखरे, मोठी पटांगणे, मंडप, धर्मशाळा, विहिरी, सरोवरे, मठ इत्यादींचे बांधकाम करावे. मंदिराच्या परिसरात सुंदर वन-उपवने आणि सुगंधी फुलांच्या बागा (पुष्पवाटिका) असाव्यात; जिथे ऋषी-मुनी आणि तपस्वी शांत वातावरणात तपश्चर्या करू शकतील. शुक (पोपट), सारिका (मैना), मोर (मयूर) व कोकिळा यांसारखे पक्षी आपल्या मधुर आवाजाने तो परिसर जिवंत ठेवतील. या निसर्गरम्य आणि पवित्र परिसरात देवाच्या सेवेसाठी व वैभवासाठी गाई, म्हशी, घोडे, हत्ती, तसेच तलावात विहार करणारी बदके यांसारखे पशू-पक्षी मंदिराला अर्पण करावेत.
 
२. भक्तांची व्यवस्था
 
तडाग कूप आणि सरोवर। निर्मळोदके भरले दिसावे।
धर्मशाळा आणि अन्नछत्र। जेथे विसावे साधूपात्र॥
 
मंदिरात होणाऱ्या उत्सवांमध्ये भाग घेण्यासाठी आणि जत्रेसाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांची तसेच साधू-संतांची सोय करणे हे मंदिराचे प्रमुख कर्तव्य आहे. त्या काळात लोक पायी चालत देवदर्शनासाठी येत असत. अनेकदा त्यांच्याजवळ पुरेसा पैसा किंवा खाण्या-पिण्याचे साहित्य नसायचे. समर्थांनी यासाठी मंदिर उभारताना मंदिराच्या परिसरात स्वच्छ पाण्याची, निवासाची आणि भोजनाची चोख व्यवस्था असावी, असे निर्देश दिले आहेत. भक्तांना स्नानासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मंदिराच्या आवारात तलाव (तडाग), विहीर (कूप) किंवा सरोवर असावे, जे नेहमी निर्मळ पाण्याने भरलेले असेल. तसेच प्रवाशांच्या हक्काच्या निवासासाठी 'धर्मशाळा' आणि भुकेलेल्यांसाठी अखंड 'अन्नछत्र' चालवले जावे, जेणेकरून तिथे येणाऱ्या साधू-संतांना व गरिबांना हक्काचा आश्रय मिळेल.
 
३. अन्नभंडार (धान्यकोठी) आणि सामग्री व्यवस्था
 
मंदिराच्या कोठारांमध्ये नेहमी मुबलक धान्य भरून ठेवलेले असावे आणि सर्व प्रकारची सामग्री आधीच तयार करून ठेवावी. गरजेच्या वेळी, उत्सवाप्रसंगी किंवा दुष्काळासारख्या आपत्कालीन परिस्थितीत ती सामग्री अत्यंत आदराने, नियोजित पद्धतीने आणि चातुर्याने लोकांच्या सेवेसाठी वापरावी.

४. संकटकालीन व्यवस्थापन (Crisis Management) व सुरक्षा
 
शिवकाळात परकीय आक्रमणे आणि दुष्काळ या दोन्ही संकटांचा सातत्याने सामना करावा लागत होता. अशा वेळी मंदिरांमध्ये तळघरे आणि धान्य कोठारे सज्ज ठेवण्याचा समर्थांचा विचार म्हणजेच आजच्या काळातील 'Risk & Crisis Management' होय.

भुयेरीं तळघरें आणी विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें ।
अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । येत्नें करीत जावीं ॥  
 
समर्थ म्हणतात की, मंदिरात गुप्त भुयारे, तळघरे, विवरे अशी अनेक गुप्त स्थळे आणि त्यांना जोडणाऱ्या गुप्त वाटा तयार कराव्यात. तसेच अमूल्य वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी गुप्त भांडारे प्रयत्नपूर्वक बनवावीत. भारताच्या इतिहासात मंदिरांवर वारंवार परकीय आक्रमणे झाली. लुटारू राज्यकर्त्यांनी मंदिरांतील सोने, मूर्ती व मौल्यवान संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केला. अशा संकटकाळात गुप्त भुयारे व तळघरांमुळे देवाची मूर्ती तसेच खजिना शत्रूच्या नजरेपासून सुरक्षित राहत असे. गुप्त द्वारांमुळे पुजारी व भाविक संकटसमयी सुखरूप बाहेर पडू शकत असत. भांडारांमध्ये साठवलेले धन पुढे मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी, धर्मकार्यासाठी व गरजू भक्तांच्या मदतीसाठी उपयोगी पडत असे. थोडक्यात, संकटकाळात मंदिराचे अस्तित्व, देवतेची प्रतिष्ठा आणि शतकानुशतके जमवलेली संपत्ती या सर्वांचे रक्षण या गुप्त व्यवस्थेमुळे शक्य होत असे. समर्थांनी हे केवळ आध्यात्मिक नव्हे, तर अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगितले आहे.
 
५. आदर्श मंदिर प्रबंधक: समर्थांच्या 'महंत लक्षणां'तील व्यवस्थापकीय दृष्टी
 
समर्थ रामदास स्वामींच्या मते, मंदिराची भव्य व्यवस्था सांभाळणारा 'महंत' किंवा प्रबंधक (Manager) हा अत्यंत कार्यक्षम, चतुर आणि उत्तम जनसंपर्क असणारा असावा. समर्थांनी 'महंत लक्षणे' सांगताना स्पष्ट केले आहे की, प्रबंधकाने केवळ एकांतात न बसता 'जनांत मिसळावे' (लोकसंग्रह करावा), पण आपले अंतःकरण ईश्वराशी जोडून ठेवावे.
 
एका आदर्श प्रबंधकाकडे प्रचंड सोशीकपणा आणि 'सावधपण' असावे, जेणेकरून मंदिराच्या कोठारातील धान्य, हिशोब आणि सुरक्षितता यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे महंताने स्वतः कष्ट करून इतरांसमोर आदर्श ठेवावा. त्याने कोणाचेही मन न दुखवता, सर्वांना सोबत घेऊन मंदिराचे उत्सव, अन्नछत्रे आणि सामाजिक कार्ये तडीस न्यावीत. प्रबंधकाकडे 'राजकारण' (म्हणजेच व्यवहारातील चातुर्य व मुत्सद्दीपणा) असावे, जेणेकरून तो बाह्य संकटांपासून मंदिराचे रक्षण करू शकेल आणि अंतर्गत व्यवस्था शिस्तीत राखेल. थोडक्यात, समर्थांचा महंत हा आजच्या काळातील एका सक्षम 'CEO' सारखा आहे, ज्याच्याकडे आध्यात्मिक नैतिकतेचे अधिष्ठान आणि व्यावहारिक प्रशासनाचे (Administration) अजोड कौशल्य आहे. समर्थ म्हणतात:
 
महंतें महंत करावें। युक्तीबुद्धीनें भरावें।
कळावंत करूनि सोडावें। बहुतां जनां॥  
 
महंताने केवळ स्वतःच काम करू नये, तर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आपल्यासारखेच कार्यक्षम आणि कलावंत (कुशल) बनवावे, जेणेकरून मंदिराची व्यवस्था अविरत आणि सक्षमपणे चालू राहील. यालाच आजच्या कॉर्पोरेट भाषेत 'Succession Planning' (उत्तराधिकारी नियोजन) किंवा 'Team Empowerment' (संघ सक्षमीकरण) म्हणतात.
 
६. भगवंताची पूजा-अर्चा
 
पंचामृतें गंधाक्षतें | पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें |
धूपदीप असंख्यातें | नीरांजनें कर्पुराचीं ||

समर्थ म्हणतात की, अनेक प्रकारच्या उत्तम सामग्रीने परमेश्वराची पूजा करावी. पंचामृत, गंध-अक्षता, फुले, पुष्कळ परिमळद्रव्ये, धूप-दीप, अनेक प्रकारच्या आरत्या व कापूर नीरांजने; तसेच सुग्रास नैवेद्य, विविध प्रकारची फळे, तांबूल, दक्षिणा, नाना अलंकार, उत्तम वस्त्रे, वनमाळा, पालख्या, छत्रे, आरामदायक सुखासने, मेघडंबरी, अब्दागिऱ्या, दिंड्या, पताका, निशाणे, आणि टाळ-मृदंगाच्या गजर करून देवाचे वैभव वाढवावे.

परंतु, जर प्रतिकूल परिस्थिती असेल आणि बाह्य साधनांची कमतरता असेल, तर समर्थांनी यावरही मार्ग सुचवला आहे. अनुकूल परिस्थिती नसताना आपल्या अंतर्यामी, मनाने षोडशोपचारे भगवंताची पूजा करावी. अशा प्रकारे केलेल्या पूजेला 'मानसपूजा' असे म्हणतात. जे जे भव्य-दिव्य अलंकार आणि वैभव आपल्याला प्रत्यक्ष अर्पण करता येत नाही, ते कल्पनेने निर्माण करून मनातील परमात्म्याला अत्यंत मनोभावे अर्पण करावे.
 
ऐसी पूजा न घडे बरवी | तरी मानसपूजा करावी |
जें जे आपणांस पाहिजे | तें तें कल्पून वाहिजे |
येणें प्रकारें कीजे | मानसपूजा ||
 
सारांश: समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या माध्यमातून मांडलेली मंदिर व मठ व्यवस्था ही केवळ धार्मिक कर्मकांडांपुरती मर्यादित नसून, ते एक अत्यंत प्रगत, व्यवहार्य आणि आदर्श सामाजिक-प्रशासकीय मॉडेल (Administrative Model) आहे. समर्थांच्या काळात मंदिरांना केवळ भक्तीचे केंद्र न ठेवता, समाजप्रबोधन, आपत्कालीन साहाय्य आणि लोककल्याणाचे मुख्य व्यासपीठ बनवले गेले.

आजच्या २१ व्या शतकातील आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा (Modern Management) विचार केला तर, समर्थांचे हे विचार थक्क करणारे आहेत. त्यांनी 'अर्चन भक्ती'च्या बहाण्याने दिलेले धडे प्रत्यक्षात Infrastructure Management (मंदिराचा परिसर व वास्तू विकास), Hospitality & Supply Chain (भक्तांची सोय, धर्मशाळा आणि अन्नछत्रांचे नियोजन), Crisis Management (संकटसमयी भुयारे व खजिन्याचे रक्षण), आणि Human Resource & Leadership Development (महंत लक्षणे आणि कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण) यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन करतात.
 
थोडक्यात सांगायचे तर, आजच्या काळातील कोणत्याही मोठ्या संस्थेला, कॉर्पोरेट कंपनीला किंवा सार्वजनिक व्यवस्थेला यशस्वीपणे चालवण्यासाठी ज्या नेतृत्वाची, दूरदृष्टीची आणि शिस्तीची गरज असते, ती सर्व मूल्ये समर्थांनी शतकांपूर्वीच आपल्या मंदिर व्यवस्थापनात गुंफली होती. आध्यात्मिक अधिष्ठानाला जेव्हा चतुर व्यवहाराची आणि सामाजिक बांधिलकीची जोड मिळते, तेव्हाच एक स्वयंपूर्ण आणि आदर्श समाज निर्माण होऊ शकतो, हाच समर्थांच्या या मंदिर व्यवस्थापनाचा मुख्य गाभा आहे. त्यांचे हे विचार आजच्या आधुनिक व्यवस्थापकांसाठी आणि मंदिर प्रशासकांसाठी मार्गदर्शक दिवा ठरतात.
 

Wednesday, July 1, 2026

वडाचे झाड आणि चिमणा



आयुष्यभर
वडाच्या झाडाने हजारो पक्ष्यांना आसरा दिला होता. त्याच्या फांद्यांवर कितीतरी पिढ्यांनी घरटी बांधली, प्रेम फुलवलं, पिल्लांना उडायला शिकवलं. प्रत्येक चिवचिवाटात झाडाचं हृदय धडधडत होतं.

पण आता वड थकला होता. त्याचा बुंधा वाळवींनी पोखरला होता. पाने गळून पडली होती. उरल्या होत्या फक्त कोरड्या, थकलेल्या फांद्याजणू आठवणींचे अवशेष.

सर्व पक्षी एकेक करून निघून गेले. आकाशात नव्या आश्रयाच्या शोधात. पण एक चिमणा मात्र अजूनही वडाच्या कोटरात रहात होता. एकटा, पण आठवणींनी भरलेला.
 
एक संथ संध्याकाळी वडाने थरथरत्या स्वरात चिमण्याला सांगितले,

"चिमणा भाऊ, तूही निघून जा. माझा आता काही भरवसा नाही. पावसाळा जवळ आलाय. आभाळात विजा चमकत आहेत. मला वाटत नाही की येणाऱ्या वादळासमोर मी तग धरू शकेन."

चिमणा थोडा वेळ गप्प राहिला. मग हळुवारपणे म्हणाला,

"दादा, याच झाडावर मला माझी चिवताई भेटली होतीतिच्या नजरेतून प्रेमाचा स्पर्श मला जाणवला. आम्ही दोघांनी इथेच घरटे बांधलं. तूच आम्हाला दाणा-पाणी आणि आसरा दिला. आमची पिल्लं तुझ्याच फांद्यांवर खेळत मोठी झाली. आणि एक दिवस... माझी चिवताई याच घरट्यात प्राण सोडून गेलीतिच्या आठवणी इथेच दडल्या आहेत. कसा सोडून जाऊ मी तुला?"

त्या रात्री आकाश फाटलं. वादळ कोसळलं. विजांचा कडकडाट, मूसळधार पाऊस. वडाचं झाड उन्मळून पडलं. त्याच क्षणी चिमणाही खाली पडला.

पण दूर, आकाशाच्या एका शांत कोपऱ्यात, चिवताई त्याची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यांत पुन्हा एकदा प्रेमाची ओल होती. ती म्हणाली,

"किती वाट पाहिली तुझी..."

चिमणा हसला, डोळे मिटले. आणि काही क्षणात दोघं पुन्हा एकत्र आकाशात विहार करू लागलेकधीच विलग होण्यासाठी.

 
 

Sunday, June 28, 2026

युवकांनो, आधी स्वतःला घडवा; मग लोकशाही मार्गाने राष्ट्र घडवा.


भारत हा जगातील सर्वात तरुण लोकशाही राष्ट्रांपैकी एक आहे. आपल्या देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या हातात आहे. आज सोशल मीडियाच्या युगात अनेक संघटना, नेते आणि आंदोलने युवकांना आपल्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने भावनेपेक्षा विवेक, अभ्यास आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर निर्णय घेणे आवश्यक आहे.
 
दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतरवर कोट्यवधी अनुयायायी असलेल्या कोक्रोच संघटनेचे आंदोलन झाले. भारतीय आणि जागतिक माध्यमांचे लक्ष त्या आंदोलनाकडे होते. मात्र ते आंदोलन पूर्णपणे अपयशी ठरले. युवा पिढी आंदोलनापासून दूरच राहिली. त्यामागचे कारण काय?" सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की कोणत्याही राष्ट्राची उभारणी  केवळ घोषणांनी, आंदोलनांनी किंवा सोशल मीडियावरील प्रचाराने होत नाही. राष्ट्रनिर्माणासाठी शिक्षण, चारित्र्य, कौशल्य, संघटनशक्ती आणि समाजसेवा यांची आवश्यकता असते. इतिहास साक्ष देतो की समाजात कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तींनी आणि संघटनांनी अनेक वर्षे अभ्यास, तपश्चर्या आणि जनसेवा केली होती. 
 
भारतीय लोकशाहीवर युवकांचा विश्वास नेहमीच दृढ राहिला आहे. याचे उदाहरण म्हणजे विविध काळात सुशिक्षित युवकांनी लोकशाही मार्गाने सत्ताबदल घडवून आणला आहे. आसाममधील विद्यार्थी चळवळीमधून नेतृत्व निर्माण झाले आणि लोकशाही प्रक्रियेतून सत्ता प्राप्त झाली. अरविंद केजरीवाल यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून लोकशाही मार्गाने सत्ता मिळवली. दक्षिण भारतात अभिनेता विजय यांनीही राजकारणात प्रवेश करून लोकशाही प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला. यावरून स्पष्ट होते की भारतातील युवक परिवर्तनासाठी मतपेटी आणि लोकशाही व्यवस्थेलाच सर्वात प्रभावी साधन मानतात.

युवकांनी हेही लक्षात घ्यावे की सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जनाधार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लाखो फॉलोअर्स असणे आणि हजारो समर्पित कार्यकर्ते असणे यात मोठा फरक आहे. एखाद्या संघटनेची खरी ताकद तिच्या सेवा कार्यात, संघटनशक्तीत आणि समाजाशी असलेल्या जिवंत नात्यात असते. जी संघटना शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, आपत्ती निवारण आणि समाजसेवा यासाठी सातत्याने कार्य करते, तिलाच टिकाऊ जनसमर्थन प्राप्त होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुयायी मिळतात, पण खरे जनसमर्थन मिळत नाही, हे आपण नुकतेच अनुभवले आहे. यामधून एक महत्त्वाचा धडा मिळतो: केवळ प्रचार पुरेसा नसतो. समाजाचा विश्वास जिंकण्यासाठी सातत्यपूर्ण सेवा, संपर्क आणि संघटन उभारणी आवश्यक असते. उदाहरणार्थ, शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक सामाजिक संघटना म्हणून जनतेत लोकप्रिय आणि प्रभावी आहे.
 
विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी  आंदोलनांमध्ये सहभागी होताना विवेकाने निर्णय घेतला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आणि कायदेशीर आंदोलन हा नागरिकांचा अधिकार आहे. परंतु कोणत्याही आंदोलनात अराजक प्रवृत्तीचे लोक घुसले आणि हिंसा किंवा तोडफोड झाली, तर त्याचे परिणाम अनेकदा निरपराध युवकांनाही भोगावे लागू शकतात. न्यायालयीन प्रक्रिया अनेक वर्षे चालू शकते. अशा वादांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, स्पर्धा परीक्षांवर आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होऊ शकतो. आजच्या स्पर्धात्मक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रत्येक कृतीचे दूरगामी परिणाम लक्षात घेतले पाहिजेत.
 
याचा अर्थ असा नाही की युवकांनी समाज आणि राष्ट्राच्या प्रश्नांपासून दूर राहावे. उलट त्यांनी प्रथम स्वतःला सक्षम बनवावे. ज्ञान, कौशल्य, चारित्र्य आणि आर्थिक स्वावलंबन प्राप्त केल्यानंतर समाजासाठी केलेले कार्य अधिक प्रभावी ठरते. इतिहासातील अनेक महान नेत्यांनी प्रथम शिक्षण पूर्ण केले, स्वतःला घडवले आणि त्यानंतर समाजकार्यात प्रवेश केलामहात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यांनी केवळ विरोध केला नाही, तर राष्ट्रनिर्माणाची व्यापक दृष्टीही दिली.
 
सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात स्वामी दयानंद सरस्वती यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या गुरु विरजानंद यांच्याकडून वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्रांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा भ्रमण करून समाजातील समस्या समजून घेतल्या. अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र, जादूटोणा, खर्चिक कर्मकांड आणि विविध सामाजिक कुरीतींविरुद्ध त्यांनी जागृती केली. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढे शिक्षणाच्या प्रसारासाठी डी..व्ही. संस्थांसारख्या शैक्षणिक परंपरांना प्रेरणा मिळाली. हे उदाहरण आपल्याला सांगते की चिरस्थायी सामाजिक परिवर्तनासाठी सखोल अध्ययन, चिंतन आणि संघटन उभारणी आवश्यक असते.
 
आजचा विद्यार्थी जर खरोखर समाजपरिवर्तन घडवू इच्छित असेल, तर त्याने तीन गोष्टी केल्या पाहिजेत. प्रथम- स्वतःच्या शिक्षणावर आणि कौशल्य विकासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. द्वितीय- एखाद्या प्रत्यक्ष समाजसेवा कार्याशी जोडले जावे, जसे की गरजू मुलांना शिकवणे, पर्यावरण संवर्धन, रक्तदान किंवा कौशल्य प्रशिक्षण इत्यादि. तृतीय- लोकशाही प्रक्रियेचे ज्ञान घेऊन सजग आणि जबाबदार नागरिक बनावे.

लोकशाहीत सरकार बदलण्याचे सर्वात प्रभावी आणि स्थायी साधन म्हणजे निवडणूक. जर एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला वाटत असेल की सरकारच्या धोरणांमध्ये त्रुटी आहेत, तर त्यांनी लोकांना आपल्या विचारांशी जोडावे, संघटना उभी करावी आणि लोकशाही मार्गाने जनसमर्थन मिळवावे. हाच मार्ग संविधान सुसंगत आहे आणि दीर्घकालीन यश मिळवून देणारा आहे.
 
शेवटी तरुणांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, क्षणिक भावनेपेक्षा दीर्घकालीन निर्मिती अधिक महत्त्वाची असते. घोषणा देण्यापेक्षा ज्ञान मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा चारित्र्यनिर्मिती अधिक महत्त्वाची आहे. आणि केवळ विरोध करण्यापेक्षा समाज राष्ट्राला पुढे नेणारा सकारात्मक पर्याय उभा करणे अधिक महत्त्वाचे आहे.