Friday, March 13, 2026

"दोन सांड भिडले की गावभर धूळ उडते."

 


आपण
सर्वांनी कधी ना कधी रस्त्यावर दोन सांडांची झुंज पाहिलीच असेल. काही वर्षांपूर्वी मला देखील असा अनुभव आला होता. दिल्लीचा सीताराम बाजार संध्याकाळ होत होती, पण गर्दी कमी होत नव्हती. दुकानांसमोर सजलेले रंगीबेरंगी गाडे, मसाल्यांचा आणि पक्वान्नांचा मिसळलेला सुगंध, ग्राहकांच्या घासाघाशीच्या आवाजसगळे मिळून एक जिवंत दृश्य तयार करत होते.

 

पाणीपुरीवाला हाक मारत होता, “या भैया, मसालेदार पाणीपुरी!” बाजूलाच आलू टिक्कीवाल्याच्या तव्यावर तूप खणखणत होते. भाजी आणि फळांच्या गाड्यांवर घासाघाशी सुरू होती.


लोक आपापल्या कामात मग्न होते, तेवढ्यात अचानक बाजारात गोंधळ झाला. कुठूनतरी दोन विशाल सांड रस्त्याच्या मध्यभागी आले. आधी ते काही क्षण एकमेकांकडे रोखून पाहत राहिले, जणू काही मौन आव्हान देत होते. मग अचानक त्यांच्या शिंगांची टक्कर झाली. धडक इतकी जोरदार होती की आवाज संपूर्ण बाजारात घुमला.


काही क्षणांतच त्यांची झुंज उग्र झाली. दोन्ही सांड एकमेकांना ढकलत इकडे-तिकडे धावू लागले. बाजाराची अरुंद गली त्यांच्यासाठी जणू एखादे आखाडा बनली. जे काही समोर आले ते त्यांच्या धडकेत सापडले. पाणीपुरीवाल्याचा गाडा उलटला आणि मसालेदार पाणी रस्त्यावर वाहू लागले. आलू टिक्कीवाल्याचा तवा उलटला आणि गरम टिक्क्या धुळीत पडल्या. भाज्यांच्या टोपल्या दूरवर विखुरल्याटोमॅटो, वांगी, बटाटे रस्त्यावर लोळू लागले. फळवाल्याची सफरचंदे आणि केळी लोकांच्या पायाखाली चिरडली गेली.

घाबरून लोक पळू लागले. कोणी आपल्या मुलांना ओढून सुरक्षित जागी नेत होते, कोणी जवळच्या दुकानांत लपले. गोंधळात काही लोक पडले आणि जखमी झाले. सायकली आणि मोटरसायकलीही धक्क्याने पडून रस्त्यावर विखुरल्या. काही दुकानदार असहाय्यपणे आपले उजाडलेले सामान पाहत उभे राहिले.

मीही त्या वेळी बाजारात होतो. अचानक झालेल्या या गोंधळाने घाबरून मीही एका छोट्या किराणा दुकानात आसरा घेतला. दुकानात उभे राहून आम्ही बाहेरचे दृश्य पाहत होतो. बाहेर सांडांची झुंज सुरू होती. शिंगांची टक्कर, जमिनीवर पडणाऱ्या खुरांचा आवाज, आणि मध्येच लोकांच्या घाबरलेल्या हाका.

 

हा संघर्ष साधारण १५२० मिनिटे चालला असेल. शेवटी दोन्ही सांड  दमून वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. पण त्यांच्या जाण्यानंतर जे दृश्य उरले ते एखाद्या छोट्या वादळानंतरच्या विध्वंसासारखे होते. उलटलेले गाडे, विखुरलेल्या भाज्या, पडलेली भांडी, आणि घाबरलेले लोक, जे हळूहळू बाहेर येत होते.

 

आज अमेरिकाइराण युद्धाचा समाचार ऐकताना मला ते जुने दृश्य डोळ्यांसमोर आले. दोन शक्तिशालीसांडसमोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्या वाढत्या तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या लढाईत कोणताही सांड  जिंकला तरी त्याचा परिणाम जगभरातील सामान्य माणसालाच भोगावा लागेल ज्यांचा  मोठ्या देशांच्या झुंजीशी थेट संबंध नाही. अगदी तसेच जसे बाजारातील सांडांच्या  झुंजीनंतर सर्वात जास्त नुकसान पाणी-पुरीवाल्याचे, फळ-भाजीवाले आणि  दुकानदारांचे झाले. अनेक निर्दोष लोक ही जख्मी झाले.   

 

सारांश, मोठ्या शक्तींची झुंज नेहमी आखाड्यात नाही, तर जगाच्या बाजारात आणि सामान्य लोकांच्या जीवनात आपला खरा परिणाम दाखवते. महागाई आणि बेरोजगारीचा परिणाम सामान्य माणसालाच भोगावा लागतो. तेव्हा समजते की ताकदवानांच्या लढाईचा सर्वात मोठा भार नेहमी दुर्बलांनाच उचलावा लागतो.

 

Monday, March 9, 2026

छोटू : दंग्यात हरवलेलं बालपण

 

माझं वय १२-१३ वर्षांचं असावं. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पायी निघायचो. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतियाखान असा शाळेत जाण्याचा मार्ग होता. शाळेत पोहोचायला पाऊण तास लागायचा. रोज सकाळ-दुपारी जवळपास ३-३ किलोमीटर पायी चालल्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजायचेच.

मोतियाखानच्या भागात पटरीवर एक चांभार बसायचा. ५-१० पैशांत तो जोडे आणि चप्पल दुरुस्त करून द्यायचा. छोटू हे त्याच्या मुलाचं नाव. त्याचं वयही आमच्याच एवढं होतं. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी, म्हणजे ७-८ च्या दरम्यान, तो आपल्या वडिलांच्या कामात मदत करायचा. चप्पल आणि जोड्यांची छोटी-मोठी मरम्मत तोच करायचा.

त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे व्हायचेच. आमच्या दृष्टीने ‘दंगा’ म्हणजे बनियांच्या दुकानांची जाळपोळ आणि लूटमार. असाच एक दंगा सदर बाजार येथे झाला. त्या दंग्यात कपड्यांची अनेक दुकाने लुटली गेली. ‘बहती गंगेत’ अनेक गरिबांनी आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी अनेक मुले नवीन कपड्यांत दिसू लागली. त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यांत साजरी झाली. पण प्रत्येक नाण्याचे दोन पहलू असतातच.

दंग्याच्या १५-२० दिवसांनंतरची गोष्ट. शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला होता. त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला—या वेळी हा शाळा सोडून इथे का बसला आहे? कदाचित त्याच्या वडिलांची तब्येत खराब असेल. जोडा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होता. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारलं, “अब्बू की तबियत खराब है क्या?” छोटू म्हणाला, “स्कूल छोड़ दिया है। अब दुकान में ही बैठूंगा।” मी विचारलं, “का?” तो निर्विकारपणे म्हणाला, “अब्बू जेल में है।” “क्यों???”

तो म्हणाला, “उस दिन तड़के अम्मी ने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही हैं। पड़ोस का नानके दो-चार कपड़े के थान उठा के लाया है। मोहल्ले के बाकी मर्द भी वहीं गए हैं और तुम हो कि सो रहे हो।”

अब्बू उठला. मनात विचार आला—हे योग्य नाही. पण त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण मोहल्लाच—हिंदू असो वा मुसलमान—दुकाने लुटायला निघाला होता. अब्बूही त्या गर्दीचा भाग बनला. सदरमध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बूही त्या दुकानात गेला. “लालच बुरी बला होती है” ही म्हण उगाचच नाही. शरीराला पेलवत नव्हतं तरीही ३-४ कपड्यांचे थान डोक्यावर लादून अब्बू बाहेर पडला.

अचानक आवाज आला- “पुलिस! पुलिस!” अब्बू घाबरला. त्याचा तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच, पण पोलिसांनीही त्याला रंगे हाथ पकडलं.

अशा वेळी काय म्हणावं हे कळण्यासारखं वय नव्हतं, तरीही मी हिम्मत करून विचारलं, “कोई वकील किया है क्या?” “हाँ, एक वकील किया है, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत हैं। काही वर्ष तरी अब्बूला जेलमध्ये काढावी लागतीलच.”

छोटू पुढे म्हणाला, “उस दिन अब्बू से गलती हो गई। किस्मत खराब थी, और क्या।” खरंच! किस्मतची मार छोटूवर पडली होती. त्याचं शिक्षण सुटलं. लहान वयातच घराचा संपूर्ण गाडा त्याच्या खांद्यावर आला होता.

त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार घेऊन आली होती.




Thursday, March 5, 2026

"स्वयें आत्महत्या करणे, तो तमोगुण

 
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात, 

"स्वयें आत्महत्या करणे, तो तमोगुण." (२.६.१०)

तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जेव्हा जगणे असंभव वाटते, तेव्हा निराश झालेला व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडतो. भारतात दरवर्षी सुमारे पावणे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यापैकी ८० टक्के साक्षर असतात. १५ ते ४० वयोगटात सर्वाधिक आत्महत्या होतात.

आत्महत्येची प्रमुख कारणे म्हणजे प्रपंचात अयशस्वी होणे, घरातील कटकटी, शिक्षणातील अपयश, प्रेमभंग, बेरोजगारी, अहंकाराला ठेस लागणे इत्यादी. आत्महत्येला प्रवृत करणारे तमोगुण -  काम, क्रोध, निद्रा, आळस, अवास्तव अहंकार, मनात येईल तसे वागणे, "माझ्या हिशोबाने जगाने चालले पाहिजे" ही अपेक्षा, आणि दिवस-रात्र नकारात्मक विचार करत राहणे. या तमोगुणांच्या आहारी जाऊन माणूस भ्रमिष्ट होतो. आजच्या भाषेत सांगायचं तर तो डिप्रेशनमध्ये जातो आणि आत्महत्या करतो.

सोशल मीडिया आणि दृश्य माध्यमांमध्ये अपराध व आत्महत्येचे महिमामंडन किंवा त्यावर अनावश्यक चर्चा ही तरुणांच्या मनातील नकारात्मक विचारांना उत्तेजन देते. शैक्षणिक संस्थांमध्ये पसरलेली नकारात्मक विचारधारा हेही एक कारण आहे. तरुणांना वाटू लागते की आजच्या सामाजिक व्यवस्थेत त्यांच्यासारख्या तरुणांचे शोषण होत आहे. या काल्पनिक अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती त्यांच्यात नसते, म्हणून त्यांना मरण अधिक सोयीचे वाटते. अशा नकारात्मक विचारधारेच्या आहारी जाऊन रोहित वेमुला यांसारखे शिक्षित तरुणही आत्महत्या करतात. 

काही लोक दुसऱ्यांवर दोष टाकून आत्महत्या करतात. जीवंत असताना विरोधकाचे काहीही करू शकत नाहीत, पण कागदावर आत्महत्येसाठी त्याला दोष देऊन आत्महत्या करतात. “मी मरणार, पण दुसऱ्यालाही शांततेने जगू देणार नाही”- ही वृत्ती तमोगुणाचे निकृष्टतम उदाहरण आहे. आपला कायदा अशा लोकांची साथ देतो, त्यामुळे दुसऱ्यांना दोष देऊन आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. आज हजारो आत्महत्या करणारे दुसऱ्यांना दोष देऊन आत्महत्या करतात. अश्या आत्महत्या रोखण्यासाठी कायद्यात बदल करणे पण आवश्यक आहे. 

लाखो योनीतून भटकून नंतर मनुष्य जन्म मिळतो. मानव जीवनाचे सार्थक करण्याऐवजी आत्महत्या करून संपविणे निश्चितच उचित नाही. तमोगुणापासून मुक्त होण्यासाठी सात्त्विक विचारांचा अभ्यास, कर्मयोगी वृत्ती, आणि सकारात्मक संगत आवश्यक आहे. नियमित ध्यान, शारीरिक श्रम, आणि विवेकपूर्ण आचरणाने मन शुद्ध होते. त्यागसहित उपभोग आणि प्रामाणिक पुरुषार्थ यांचा अवलंब केल्यास माणूस अंधारातून प्रकाशाकडे जाऊन जीवन सार्थक करू शकतो. 


Saturday, February 28, 2026

मन अधोमुख की उपराटी? सुखाचा आणि मुक्तीचा मार्ग

 
समर्थांनी वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेचे गहन अध्ययन केले होते. या सर्व प्राचीन ग्रंथांचा सार समर्थांनी मनाचे श्लोक आणि दासबोध यांच्या माध्यमातून मराठीत सोप्या भाषेत लोकांसमोर मांडला. समर्थांनी धर्म आणि सत्यमार्गावर चालून ऐश्वर्यशाली जीवन जगण्याचा तसेच आध्यात्मिक उन्नती आणि मोक्षाचा मार्ग लोकांना दाखविला.
 
कबीरदास म्हणतात,मन तो रे उड़त पंछी जितना, उड़ि उड़ि जावै आकाश।मन हे उडणाऱ्या पक्ष्यासारखे आहे. जसे पक्षी आकाशात उंच उडत राहतो, तसे मनही सतत इकडून तिकडे भटकत राहते. ते कधी भूतकाळात जाते, कधी भविष्याची चिंता करते, तर कधी विषयसुखांच्या मागे धावते. या भटकणाऱ्या मनाला आवरणे अत्यंत आवश्यक आहे.
 
कठोपनिषदात सांगितले आहे की आत्मा हा रथाचा मालक आहे आणि शरीर हा रथ आहे. बुद्धी सारथी आहे, मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत. ज्याने हे सर्व नीट सांभाळले, तोच जीवनाचा खरा आनंद घेणारा आहे. आपण असे म्हणू शकतो की जसे एखादा रथ चालवण्यासाठी सारथी, लगाम आणि घोडे यांचे योग्य नियंत्रण आवश्यक असते, तसेच जीवनात आत्मा, बुद्धी, मन आणि इंद्रिये यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे. ज्याने हे संतुलन साधले, तोच खऱ्या अर्थाने सुखी आणि यशस्वी ठरतो.
भगवद्गीतेत भगवान अर्जुनाला संबोधित करताना म्हणतात,
 
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण गृह्यते (अध्याय , श्लोक ३५)
 
हे महाबाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, हे खरे आहे; पण अभ्यास आणि वैराग्य यांच्या साहाय्याने ते नियंत्रित करता येते. इथे अभ्यास म्हणजे निरंतर नियमित प्रयत्न आणि विषयांपासून अंतर ठेवण्याची वृत्ती म्हणजे वैराग्य. ज्या व्यक्तीला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या, त्याला मनावर नियंत्रण मिळवता येते. संसारात आणि आध्यात्मिक क्षेत्रांत सफल होण्यासाठी मनावर नियंत्रण करणे आवश्यक आहे.
मनावर नियंत्रण कसे करावे हे सांगण्यासाठीच समर्थांनी मनाचे श्लोक रचले. समर्थ म्हणतात:
 
मन अधोमुख उपराटी केले पाहिजे। तरीच समाधान पाविजे।
नाही तरी मनाची गती। कधी रिघे हाती
(दासबोधदशक २०, समास , ओवी १९)
 
मन स्वभावतः अधोमुख असते, म्हणजेच मन विषय, वासना, लोभ, अहंकार आणि इंद्रियसुखांच्या शोधात भटकत राहते. अशा मनाला योग्य मार्गावर आणायचे असेल तर त्याची उपराटी करणे अत्यावश्यक आहे. उपराटी म्हणजे मनाच्या अधःप्रवृत्तीला थांबवून तिला विवेक, वैराग्य आणि आत्मचिंतनाकडे वळवले पाहिजे. समर्थ स्पष्ट करतात की मनाला मोकळे सोडले तर ते आपल्या हाती राहत नाही; ते सतत नवीन-नवीन इच्छांकडे धाव घेत राहते. अशा व्यक्तीला भौतिक सुख आणि संपत्ती मिळत नाही आणि आध्यात्मिक क्षेत्रांत सफल होण्याचा प्रश्नच येत नाही. असा माणूस फक्त अस्वस्थ, असंतुष्ट आणि दुःखी होतो. म्हणूनच समाधान हवे असेल तर मनावर नियंत्रण आवश्यक आहे. हे नियंत्रण दडपशाहीने नव्हे, तर आत्मजाणीव आणि विवेकाने करावे लागते.  मनाची दिशा बदलणे, हाच  उपराटीचे खरा अर्थ आहे.
 
आजचे उदाहरण घेऊन पाहूया: एखादा विद्यार्थी सतत मोबाईल, सोशल मीडिया किंवा क्षणिक करमणुकीत वेळ घालवत असेल तर समजावे की त्याचे मन अधोमुख झालेले आहे. तो एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यास असमर्थ ठरतो आणि परीक्षेत नापास होतो. पण एकदा त्याला आपले मन भटकले आहे, ही जाणीव झाली की तो मोबाईल इत्यादींचा नाद सोडून नियमित आणि निरंतर अभ्यास करण्याचा प्रयत्न करू लागतो. काही दिवसांत त्याला ध्यान-वाचनाची सवय सहज लागते आणि परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करू लागतो. शेवटी तो उत्तम गुण मिळवून परीक्षेत पास होतो. परीक्षा पास होण्याचे ध्येय पूर्ण झाल्यावर त्याला मानसिक शांती आणि समाधान निश्चित मिळते.
  
उपराटी केल्याशिवाय समाधान मिळत नाही.  उदाहरणार्थ, एखादा माणूस फक्त पैसा, प्रतिष्ठा किंवा भोग यांच्या मागे धावत राहिला, तर कितीही मिळाले तरी त्याचे मन तृप्त होत नाही. पण तोच माणूस विवेकाने गरज आणि लोभ यातील फरक ओळखून मनावर संयम ठेवत असेल, तर अल्पातही समाधान अनुभवतो.
 
सारांश: मन अधोमुख उपराटी केले पाहिजेही ओवी आत्मसंयम, मनोनिग्रह आणि अंतःशांतीचा मूलमंत्र सांगते. जर मन अधोमुख ठेवले, म्हणजे विषयसुख, लोभ आणि वासनांच्या मागे धावू दिले, तर माणूस दुःखी, असंतुष्ट आणि जीवनात असफल ठरतो. पण मनाची उपराटी केली, म्हणजे त्याला विवेक, वैराग्य आणि आत्मचिंतनाकडे वळवले, तर तो सुखी आणि समाधानी होतो. अशा व्यक्तीला संसारातील भौतिक सुखही मिळते आणि मुक्तीच्या मार्गावर चालण्यातही यश मिळते. हा समर्थांचा गूढ पण अत्यंत व्यावहारिक उपदेश आहे.