Tuesday, March 17, 2026

उत्तम राजनेता


संत समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या ग्रंथात दशक १८ (बहुजिनसी) च्या समास मध्ये उत्तम पुरुष (सर्वोत्तम व्यक्ती) चे निरूपण केले आहे.   यात उत्तम राजनेत्याच्या  शारीरिक, मानसिक आणि राजकीय गुणांचे वर्णन आहे. समर्थ स्वामी म्हणतात की, उत्तम पुरुषाने आपले अंतर्मन विवेक, विचार आणि राजकरणाने सजवले पाहिजे. हा समास शिवाजी महाराजांच्या अफझलखान वधानंतरच्या भेटीच्या संदर्भात सांगितला गेला असावा.

नाना वस्त्रें नाना भूषणें येणें शरीर श्रृंघारणें
विवेकें विचारें राजकरणें अंतर श्रृंगारिजे
 
राजनेत्याने समयोचित, सुंदर, स्वच्छ  वस्त्र धारण केले पाहिजे.  ज्याने आंतरिक शक्ति आणि बुद्धिमत्ता प्रगट होईल. उदाहरण. आपले पंत प्रधान मोदीजी मंदिरात जाताना धार्मिक पोशाक धारण करतात, 15 ऑगस्टच्या भाषणाच्या वेळी वेगळी, विदेशात जाताना वेगळे. त्यांचे वस्त्र नेहमी स्वच्छ आणि आकर्षक असतात.
 
तर्हे सीघ्रकोपी सदा कदापि धरी मर्यादा
राजकारण संवादा मिळोंचि नेणें
 
अशा शीघ्रकोपी (घाईगडबड करणाऱ्या) व्यक्तीला मर्यादा धरता येत नाहीत. राजकारणात संवाद जोडणे (इतरांशी जुळवून घेणे) त्याला अवघड जाते. उत्तम राजनेतीत संवाद आणि सामंजस्य आवश्यक आहे.
 
समयासारिखा समयो येना नेम सहसा चलेना
नेम धरितां राजकारणा अंतर पडे
 
पत्येक प्रसंग वेगळा असतो, म्हणून एकच नियम कायम चालत नाही. राजकारणात एकाच नेमाचा (नियमाचा) हट्ट धरला, तर फूट पडते. राजनेती लवचिक आणि प्रसंगानुसार असावी.  छत्रपती शिवाजी महाराजाने शायस्ता खानच्या महालावर छापा मारून त्याच्या निमोड केला. पण राजा जयसिंह समोर प्रसंग पाहून संधि ही केली आणि 23 किल्ले ही मुगलांना दिले. त्यासाठी समर्थ म्हणतात, विवेकी राजनेता छत्रपती शिवरायांसारखा प्रसंग पाहोन चालतो.
 
न्याय नीति विवेक विचार नाना प्रसंगप्रकार
परीक्षिणें परांतर देणें ईश्वराचें
 
या ओवीत समर्थ रामदास स्वामी उत्तम पुरुषाच्या गुणांचे वर्णन करताना म्हणतात उत्तम राजनेता  न्याय, नीती, विवेक आणि विचार हे मूलभूत गुण ईश्वरी देणगी आहेतउत्तम राजनेता विविध प्रसंग हातळताना इतरांच्या मनाची (परांतर) परीक्षा घेऊन निर्णय घेतो.   हा गुणधन अभ्यासाने विकसित होतो, ज्यामुळे तो राजनेता धर्मरक्षक आणि लोकहितकारी होतो.
 
समर्थ स्वामींच्या मते ब्राह्मण म्हणजे  विवेकी, धर्मनिष्ठ आणि ज्ञानमार्गाचे मार्गदर्शक  करणारे असतात . असे ब्रम्हज्ञानी  समाजाचे आध्यात्मिक आणि बौद्धिक आधार असतात,  ज्यांची चिंता उत्तम पुरुष वाहतो. खाली प्रत्येक ओवीचा मूळ मजकूर, अर्थ आणि संदर्भ दिला आहे. राजनेत्याने विद्वानांचा नेहमीच सम्मान केला पाहिजे.
 
धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार
जाले आहेत पुढें होणार देणें ईश्वराचें ॥२०॥
 
समर्थ म्हणतात राजनेता ईश्वराच्या अवतारासारखा धर्माची स्थापना करणारा, परोपकारी आणि लोकांचे पालन करणारा असतो. राजकार्य केवळ सत्ता नसून विवेकाने सजवलेली कला आहे, जी अति, हट्ट आणि बेइमानी टाळून ईश्वरकृपेने चालवावी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे योद्धे किंवा राम-कृष्णासारखे अवतार, जे अधर्म नष्ट करून धर्माची पुनर्स्थापना करतात त्यांना ईश्वरीय अवतार म्हंटले आहेताजे उदाहरण मननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर श्री राम मंदिराची अयोध्येत 600 वर्षांनंतर  पुन:स्थापना झाली. 

Friday, March 13, 2026

"दोन सांड भिडले की गावभर धूळ उडते."

 


आपण
सर्वांनी कधी ना कधी रस्त्यावर दोन सांडांची झुंज पाहिलीच असेल. काही वर्षांपूर्वी मला देखील असा अनुभव आला होता. दिल्लीचा सीताराम बाजार संध्याकाळ होत होती, पण गर्दी कमी होत नव्हती. दुकानांसमोर सजलेले रंगीबेरंगी गाडे, मसाल्यांचा आणि पक्वान्नांचा मिसळलेला सुगंध, ग्राहकांच्या घासाघाशीच्या आवाजसगळे मिळून एक जिवंत दृश्य तयार करत होते.

 

पाणीपुरीवाला हाक मारत होता, “या भैया, मसालेदार पाणीपुरी!” बाजूलाच आलू टिक्कीवाल्याच्या तव्यावर तूप खणखणत होते. भाजी आणि फळांच्या गाड्यांवर घासाघाशी सुरू होती.


लोक आपापल्या कामात मग्न होते, तेवढ्यात अचानक बाजारात गोंधळ झाला. कुठूनतरी दोन विशाल सांड रस्त्याच्या मध्यभागी आले. आधी ते काही क्षण एकमेकांकडे रोखून पाहत राहिले, जणू काही मौन आव्हान देत होते. मग अचानक त्यांच्या शिंगांची टक्कर झाली. धडक इतकी जोरदार होती की आवाज संपूर्ण बाजारात घुमला.


काही क्षणांतच त्यांची झुंज उग्र झाली. दोन्ही सांड एकमेकांना ढकलत इकडे-तिकडे धावू लागले. बाजाराची अरुंद गली त्यांच्यासाठी जणू एखादे आखाडा बनली. जे काही समोर आले ते त्यांच्या धडकेत सापडले. पाणीपुरीवाल्याचा गाडा उलटला आणि मसालेदार पाणी रस्त्यावर वाहू लागले. आलू टिक्कीवाल्याचा तवा उलटला आणि गरम टिक्क्या धुळीत पडल्या. भाज्यांच्या टोपल्या दूरवर विखुरल्याटोमॅटो, वांगी, बटाटे रस्त्यावर लोळू लागले. फळवाल्याची सफरचंदे आणि केळी लोकांच्या पायाखाली चिरडली गेली.

घाबरून लोक पळू लागले. कोणी आपल्या मुलांना ओढून सुरक्षित जागी नेत होते, कोणी जवळच्या दुकानांत लपले. गोंधळात काही लोक पडले आणि जखमी झाले. सायकली आणि मोटरसायकलीही धक्क्याने पडून रस्त्यावर विखुरल्या. काही दुकानदार असहाय्यपणे आपले उजाडलेले सामान पाहत उभे राहिले.

मीही त्या वेळी बाजारात होतो. अचानक झालेल्या या गोंधळाने घाबरून मीही एका छोट्या किराणा दुकानात आसरा घेतला. दुकानात उभे राहून आम्ही बाहेरचे दृश्य पाहत होतो. बाहेर सांडांची झुंज सुरू होती. शिंगांची टक्कर, जमिनीवर पडणाऱ्या खुरांचा आवाज, आणि मध्येच लोकांच्या घाबरलेल्या हाका.

 

हा संघर्ष साधारण १५२० मिनिटे चालला असेल. शेवटी दोन्ही सांड  दमून वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. पण त्यांच्या जाण्यानंतर जे दृश्य उरले ते एखाद्या छोट्या वादळानंतरच्या विध्वंसासारखे होते. उलटलेले गाडे, विखुरलेल्या भाज्या, पडलेली भांडी, आणि घाबरलेले लोक, जे हळूहळू बाहेर येत होते.

 

आज अमेरिकाइराण युद्धाचा समाचार ऐकताना मला ते जुने दृश्य डोळ्यांसमोर आले. दोन शक्तिशालीसांडसमोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्या वाढत्या तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या लढाईत कोणताही सांड  जिंकला तरी त्याचा परिणाम जगभरातील सामान्य माणसालाच भोगावा लागेल ज्यांचा  मोठ्या देशांच्या झुंजीशी थेट संबंध नाही. अगदी तसेच जसे बाजारातील सांडांच्या  झुंजीनंतर सर्वात जास्त नुकसान पाणी-पुरीवाल्याचे, फळ-भाजीवाले आणि  दुकानदारांचे झाले. अनेक निर्दोष लोक ही जख्मी झाले.   

 

सारांश, मोठ्या शक्तींची झुंज नेहमी आखाड्यात नाही, तर जगाच्या बाजारात आणि सामान्य लोकांच्या जीवनात आपला खरा परिणाम दाखवते. महागाई आणि बेरोजगारीचा परिणाम सामान्य माणसालाच भोगावा लागतो. तेव्हा समजते की ताकदवानांच्या लढाईचा सर्वात मोठा भार नेहमी दुर्बलांनाच उचलावा लागतो.

 

Monday, March 9, 2026

छोटू : दंग्यात हरवलेलं बालपण

 

माझं वय १२-१३ वर्षांचं असावं. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पायी निघायचो. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतियाखान असा शाळेत जाण्याचा मार्ग होता. शाळेत पोहोचायला पाऊण तास लागायचा. रोज सकाळ-दुपारी जवळपास ३-३ किलोमीटर पायी चालल्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजायचेच.

मोतियाखानच्या भागात पटरीवर एक चांभार बसायचा. ५-१० पैशांत तो जोडे आणि चप्पल दुरुस्त करून द्यायचा. छोटू हे त्याच्या मुलाचं नाव. त्याचं वयही आमच्याच एवढं होतं. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी, म्हणजे ७-८ च्या दरम्यान, तो आपल्या वडिलांच्या कामात मदत करायचा. चप्पल आणि जोड्यांची छोटी-मोठी मरम्मत तोच करायचा.

त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे व्हायचेच. आमच्या दृष्टीने ‘दंगा’ म्हणजे बनियांच्या दुकानांची जाळपोळ आणि लूटमार. असाच एक दंगा सदर बाजार येथे झाला. त्या दंग्यात कपड्यांची अनेक दुकाने लुटली गेली. ‘बहती गंगेत’ अनेक गरिबांनी आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी अनेक मुले नवीन कपड्यांत दिसू लागली. त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यांत साजरी झाली. पण प्रत्येक नाण्याचे दोन पहलू असतातच.

दंग्याच्या १५-२० दिवसांनंतरची गोष्ट. शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला होता. त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला—या वेळी हा शाळा सोडून इथे का बसला आहे? कदाचित त्याच्या वडिलांची तब्येत खराब असेल. जोडा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होता. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारलं, “अब्बू की तबियत खराब है क्या?” छोटू म्हणाला, “स्कूल छोड़ दिया है। अब दुकान में ही बैठूंगा।” मी विचारलं, “का?” तो निर्विकारपणे म्हणाला, “अब्बू जेल में है।” “क्यों???”

तो म्हणाला, “उस दिन तड़के अम्मी ने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही हैं। पड़ोस का नानके दो-चार कपड़े के थान उठा के लाया है। मोहल्ले के बाकी मर्द भी वहीं गए हैं और तुम हो कि सो रहे हो।”

अब्बू उठला. मनात विचार आला—हे योग्य नाही. पण त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण मोहल्लाच—हिंदू असो वा मुसलमान—दुकाने लुटायला निघाला होता. अब्बूही त्या गर्दीचा भाग बनला. सदरमध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बूही त्या दुकानात गेला. “लालच बुरी बला होती है” ही म्हण उगाचच नाही. शरीराला पेलवत नव्हतं तरीही ३-४ कपड्यांचे थान डोक्यावर लादून अब्बू बाहेर पडला.

अचानक आवाज आला- “पुलिस! पुलिस!” अब्बू घाबरला. त्याचा तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच, पण पोलिसांनीही त्याला रंगे हाथ पकडलं.

अशा वेळी काय म्हणावं हे कळण्यासारखं वय नव्हतं, तरीही मी हिम्मत करून विचारलं, “कोई वकील किया है क्या?” “हाँ, एक वकील किया है, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत हैं। काही वर्ष तरी अब्बूला जेलमध्ये काढावी लागतीलच.”

छोटू पुढे म्हणाला, “उस दिन अब्बू से गलती हो गई। किस्मत खराब थी, और क्या।” खरंच! किस्मतची मार छोटूवर पडली होती. त्याचं शिक्षण सुटलं. लहान वयातच घराचा संपूर्ण गाडा त्याच्या खांद्यावर आला होता.

त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार घेऊन आली होती.




Thursday, March 5, 2026

"स्वयें आत्महत्या करणे, तो तमोगुण

 
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात, 

"स्वयें आत्महत्या करणे, तो तमोगुण." (२.६.१०)

तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जेव्हा जगणे असंभव वाटते, तेव्हा निराश झालेला व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडतो. भारतात दरवर्षी सुमारे पावणे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यापैकी ८० टक्के साक्षर असतात. १५ ते ४० वयोगटात सर्वाधिक आत्महत्या होतात.

आत्महत्येची प्रमुख कारणे म्हणजे प्रपंचात अयशस्वी होणे, घरातील कटकटी, शिक्षणातील अपयश, प्रेमभंग, बेरोजगारी, अहंकाराला ठेस लागणे इत्यादी. आत्महत्येला प्रवृत करणारे तमोगुण -  काम, क्रोध, निद्रा, आळस, अवास्तव अहंकार, मनात येईल तसे वागणे, "माझ्या हिशोबाने जगाने चालले पाहिजे" ही अपेक्षा, आणि दिवस-रात्र नकारात्मक विचार करत राहणे. या तमोगुणांच्या आहारी जाऊन माणूस भ्रमिष्ट होतो. आजच्या भाषेत सांगायचं तर तो डिप्रेशनमध्ये जातो आणि आत्महत्या करतो.

सोशल मीडिया आणि दृश्य माध्यमांमध्ये अपराध व आत्महत्येचे महिमामंडन किंवा त्यावर अनावश्यक चर्चा ही तरुणांच्या मनातील नकारात्मक विचारांना उत्तेजन देते. शैक्षणिक संस्थांमध्ये पसरलेली नकारात्मक विचारधारा हेही एक कारण आहे. तरुणांना वाटू लागते की आजच्या सामाजिक व्यवस्थेत त्यांच्यासारख्या तरुणांचे शोषण होत आहे. या काल्पनिक अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती त्यांच्यात नसते, म्हणून त्यांना मरण अधिक सोयीचे वाटते. अशा नकारात्मक विचारधारेच्या आहारी जाऊन रोहित वेमुला यांसारखे शिक्षित तरुणही आत्महत्या करतात. 

काही लोक दुसऱ्यांवर दोष टाकून आत्महत्या करतात. जीवंत असताना विरोधकाचे काहीही करू शकत नाहीत, पण कागदावर आत्महत्येसाठी त्याला दोष देऊन आत्महत्या करतात. “मी मरणार, पण दुसऱ्यालाही शांततेने जगू देणार नाही”- ही वृत्ती तमोगुणाचे निकृष्टतम उदाहरण आहे. आपला कायदा अशा लोकांची साथ देतो, त्यामुळे दुसऱ्यांना दोष देऊन आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. आज हजारो आत्महत्या करणारे दुसऱ्यांना दोष देऊन आत्महत्या करतात. अश्या आत्महत्या रोखण्यासाठी कायद्यात बदल करणे पण आवश्यक आहे. 

लाखो योनीतून भटकून नंतर मनुष्य जन्म मिळतो. मानव जीवनाचे सार्थक करण्याऐवजी आत्महत्या करून संपविणे निश्चितच उचित नाही. तमोगुणापासून मुक्त होण्यासाठी सात्त्विक विचारांचा अभ्यास, कर्मयोगी वृत्ती, आणि सकारात्मक संगत आवश्यक आहे. नियमित ध्यान, शारीरिक श्रम, आणि विवेकपूर्ण आचरणाने मन शुद्ध होते. त्यागसहित उपभोग आणि प्रामाणिक पुरुषार्थ यांचा अवलंब केल्यास माणूस अंधारातून प्रकाशाकडे जाऊन जीवन सार्थक करू शकतो.