Monday, May 11, 2026

झालमुरी: दोन हायकू

 प्रसाद नाही खाल्ला 
राज्य बुडाले 
अंगध्वजाचे .

झालमुरी  खाल्ली
राज्य मिळाले 
मोदींना.

Friday, May 8, 2026

ययातिच्या मनातील द्वंद: भोग की त्याग

 



(चित्र मोठे करून चित्र कथा पाहू शकतात) 

बुद्धीमान आणि सर्व प्राण्यांमध्ये शक्तीशाली ययातिला पृथिवीचे साम्राज्य प्रदान करत ऋषि त्याला उपदेश देतात पृथ्वीवरील जड चेतन सर्वांची रक्षा करणे तुझे कर्तव्य आहे. ऋषी म्हणतात की क्षमा, दया आणि सहिष्णुता ही मानवतेची खरी भूषणं आहेत. त्यागासह भोग केल्यानेच जीवनाचे सार्थक होते.  तू हा मार्ग स्वीकारला तर प्रलय पर्यन्त पृथ्वीला भोगू शकेल. 

पण ययाति आपल्या ज्ञानाच्या आणि शक्तीच्या नशेत चूर आहे. त्याला वाटते "क्षमा आणि दया" ही दुर्बलांची भाषा आहे. पृथ्वी वीरांच्या भोगण्यासाठी आहे, दुर्बलांना इथे जगण्याचा अधिकार नाही.

तो शूद्र जीवांना आपल्या पायतळी तुटवतो. जे मोठे प्राणी होते त्यांना स्वत:च्या मनोरंजनाचे साधन बनवितो. तो  चिरतरुणी वसुंधरेचं सौंदर्य मोहात पडतो. वसुंधरेचं सौंदर्य त्याच्या राक्षसी लालसेला बळी पडतं. तो  विक्षिप्त, बलात्कारी बनतो. तो वसुंधरेच्या हिरव्यागार वस्त्रांना छिन्न-भिन्न करून टाकतो. त्याच्या पाशवी क्रूरतेमुळे पृथ्वीच्या शरीरावर जागोजागी खोल जखमा होतात. त्या जखमा उपाय न केल्याने सडू लागतात. त्यातून दुर्गंध युक्त विषारी वायू निघून वातावरणात पसरू लागतो.  आता ययातिचा श्वासही कासावीस होऊ लागतो. स्वर्गीय देव ही त्याला चेतावनी देतात "तुझं जीवन धरणीशी जोडलेलं आहे. भोगाचा मार्ग सोड आणि धरणीला वाचव." अन्यथा धरती सोबत तू ही नष्ट होईल. 

ययाति देवांकडे तुच्छतेने पाहतो, तो  ज्ञानाच्या मदतीने अंतरिक्षात दुसरी पृथ्वी शोधण्याचा विचार करू लागतो. तर कधी तो शक्तीच्या जोरावर स्वर्गातिल देवांना अपदस्थ करून, स्वर्गात अप्सरांसोबत नित्य नवीन भोग अनुभवण्याचं स्वप्न पाहतो.  पण कधी-कधी त्याला वाटतं स्वर्गातील अमृत त्याची तृप्त तहान भागवू शकेल का?

काळातच दडलेलं आहे मनुष्यपुत्राचं भाग्य. ययाति नीच भोगमार्ग सोडून त्याग आणि तपस्येचा मार्ग स्वीकारेल का? की तो हरवून जाईल अंतरिक्षाच्या असीम अंधारात? सध्या तरी ययाति किंकर्तव्यविमूढ आहे .

 

Tuesday, May 5, 2026

एक फसलेली टूलकिट

 

फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्या व्यक्तीच्या प्रचारासाठी किंवा एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात
'टूलकिट'चा वापर केला जातो, हे सर्वश्रुत आहे. अनेक बनावट आयडींद्वारे त्या व्यक्तीचा प्रचार केला जातो आणि त्या पोस्ट कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. निश्चितच या पोस्ट प्रायोजित असतात, अन्यथा आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या पोस्ट आपल्या अनुयायांपर्यंतही नीट पोहोचत नाहीत, मग कोट्यवधींपर्यंत पोहोचणे तर दूरच.

अशाच एका टूलकिटद्वारे राघव चड्ढाचा प्रचार जोरात सुरू होता. मी राघवला फॉलो करत नाही, त्याच्या एकाही पोस्टला लाइक केलेले नाही, तरीही गेल्या काही महिन्यांपासून दररोज फेसबूकवर राघवची स्तुती करणाऱ्या किमान सहा-सात वेगवेगळ्या आयडींच्या पोस्ट दिसत होत्या. दोन महिन्यांत असे किमान पन्नास-साठ वेगळे आयडी मी पाहिले असतील. सर्व पोस्टचा एकच सूर होता, राघव संसदेत जनतेचे प्रश्न मांडतो आहे; राघवमुळेच विमानतळांवर चहा-समोसे स्वस्त झाले, कर कमी झाले, मोबाइल लूट थांबली, वगैरे वगैरे.

आणि मग एक दिवस अचानक सगळे थांबले. जणू "अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले!” पोस्ट येणे एकदम बंद झाले. राघवचे फॉलोअर्स वीस लाखांनी कमी झाले. नक्की काय घडले होते?

माझ्या अंदाजाप्रमाणे अश्याच एका  टूलकिटने केजरीवालांना एक लोकप्रिय नेता म्हणून उभे केले होते, तश्याच प्रकारच्या  टूलकिटने राघवचाही प्रचार हाती घेतला असावा. परंतु केजरीवाल हे राजकारणात मुरलेले आहेत. आपल्या विरोधात शिजत असलेले कारस्थान त्यांनी वेळीच ओळखले आणि राघवचे पंख तातडीने कापले. राज्यसभेच्या उपनेतापदावरून त्याची हकालपट्टी केली.

दुसरीकडे, आपमधील बंडखोर खासदारांचा कार्यकाळ २०२८मध्ये संपणार आहे. त्यांना हे उमगले की यापुढे आपकडून तिकीट मिळणे कठीण आहे. मग पुढे राजकीय कारकीर्द कशी सावरायची, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. राघवने भाजपविरोधात खूप आक्रमक भाषणे केली होती, हे खरे; परंतु एकदा पराभवाची चाहूल लागली की टूलकिटही पाठ फिरवते, हे राघवला कळून चुकले असावे.

आपली राजकीय कारकीर्द वाचवायची असेल, तर राघवपाशी एकच पर्याय उरला होता तो म्हणजेभाजप-  म्हणजे निरमापेक्षा जास्त सफेदी देणारी वॉशिंग मशीन, ज्यात गेले की सगळेच चमकदार, उजळ, आणि एकसारखे दिसू लागतात. भाजप मध्ये जाण्याचे अनेक फायदे राघवला दिसले. भाजपमध्ये गेल्यावर पुन्हा राज्यसभेचे तिकीट मिळू शकते; पंजाबात भाजपच्या जागा वाढल्या तर मंत्रिपदही दृष्टिपथात येऊ शकते. आपले राजनीतिक अस्तित्व वाचविण्यासाठी राघव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपलाही पंजाबात एक चेहरा हवाच होता. त्यांनी लगेच सर्वांना पक्षप्रवेश देऊन राज्यसभेतील आपली संख्या बळकट करून घेतली. येत्या निवडणुकीत भाजपला फायदा झाला तर उत्तमच; नाही झाला तरी काही फरक नाही. कारण जे आले आहेत त्यांचे राजकीय अस्तित्व तर आधीच वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यासारखे नाहीसे होईल.
 
राघवने पक्ष बदलला आणि टूलकिटला मोठा धक्का बसला. त्यांनी राघवसाठी केलेली सारी गुंतवणूक एका झटक्यात वाया गेली. गेल्या एका आठवड्यात राघवची स्तुती करणारी एकही पोस्ट माझ्या फेसबूकवर दिसली नाही. उलट, त्याच्या विरोधातील काही पोस्ट मात्र दिसल्या.
 
या टूलकिटचे मालक नक्की कोण असतील? स्वत: राघव की आणिक कोणी ... या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मला सापडलेले नाही.

Saturday, May 2, 2026

मनाचे श्लोक: भक्ति पंथ म्हणजे निंद्याचा त्याग आणि वंद्याचा स्वीकार

 
 
 
"मना सज्जना भक्ती पंथेस जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे"
जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे.
 
समर्थ म्हणतात, माणसाने सज्जन मनाने भक्तीचा मार्ग धरला तर श्रीहरी सहज प्राप्त होतो. म्हणजे सज्जनता ही भक्तीची पूर्व अट आहे. सज्जन व्यक्ति बनण्यासाठी निंदनीय कार्य सोडून दिले पाहिजे आणि वंद्य म्हणजे उत्तम कार्य केले पाहिजे.
 
सज्जन मन म्हणजे शुद्ध, निर्मळ, दयाळू, अहंकाररहित मनभक्ती पंथेस जावे म्हणजे अशा सज्जन मनाने भक्तीचा मार्ग धरावा.  
 
समर्थ म्हणतात निंद्य म्हणजे जे वाईट आहे, दोषपूर्ण आहे, ज्यामुळे स्वतःला आणि समाजाला हानी होते, ते सोडून द्यावे. उदाहरणार्थ: खोटे बोलणे, लोभ, द्वेष, परनिंदा, अपमान, भ्रष्टाचार.


वंद्य
म्हणजे जे पूजनीय आहे, आदरणीय आहे, व्यक्तीला आणि समाजाला हितकारक आहे, ते भावपूर्वक स्वीकारावे. उदाहरणार्थ: सत्य, दया, परोपकार, ज्ञान, भक्ती, सेवा इत्यादि. सज्जन व्यक्ती निंद्य गोष्टींचा त्याग करते आणि वंद्य गोष्टींना भावपूर्वक स्वीकारते.

राजकारणी निवडणुकीत जनतेला मोठमोठी आश्वासने देतात, पण सत्तेत आल्यानंतर ती पूर्ण करत नाहीत. ते पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. जनतेच्या समस्या गांभीर्याने घेता त्यांची थट्टा करणे किंवा चुकीची माहिती देणे हेही निंद्य आचरण ठरते.
 
राजकारण्यांचे वंद्य आचरण म्हणजे निस्वार्थ भावनेने देशाच्या विकासासाठी कार्य करणे. समाजहितासाठी सतत प्रयत्न करणे, शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा; वीज, पाणी, रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक यांचा विस्तार करणे  इत्यादि. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कार्य निस्वार्थ भावनेने केले आहे. गेल्या अकरा वर्षांत त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही आणि आपल्या नातेवाईकांना कधीच सत्तेच्या जवळ येऊ दिले नाही. त्यांच्या भ्रष्टाचारमुक्त शासनामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळे त्यांचे आचरण खरोखरच वंद्य ठरते.
 
समर्थ म्हणतात सज्जनता आणि भक्ती हे एकमेकांशी जोडलेले आहेत. सज्जन मनाने भक्तीचा मार्ग धरला तर श्रीहरी सहज प्राप्त होतो. समर्थांच्या मते सज्जनता ही भक्तीची पूर्व अट आहे.  "भक्ती पंथ" म्हणजे ईश्वराशी प्रेमाने जोडलेला मार्ग.  सज्जन व्यक्ती तीच, जी सत्यप्रिय, दयाळू, परोपकारी आणि धर्मशील असते; जी इतरांचा अपमान करत नाही, परनिंदा टाळते आणि समाजहितासाठी कार्य करते. अशा सज्जनतेने युक्त मन भक्तीचा मार्ग धरते तेव्हा ईश्वरप्राप्ती सहज होते, कारण भगवंताला कठीण साधना नव्हे तर निर्मळ मन आणि भक्ती हवी असते.
 

Wednesday, April 29, 2026

आठवणीतून: अतिवृष्टीचे खरे कारण

 
"यावर्षी महाराष्ट्रात भीषण अतिवृष्टी झाली. आपण नेहमीप्रमाणे हवामान बदलालाच दोष दिला. पण एके दिवशी स्वप्नात नारद मुनी भेटले आणि त्यांनी या अतिवृष्टीमागचं खरं कारण सांगितलं.  जे पृथ्वीवर कुणालाही माहीत नव्हतं!"  काय घडले ते जाणण्यासाठी थेट इंद्रच्या दरबारात जाऊ या: 
 
इंद्रदेव(दाढी वाढलेल्या नारदांकडे पाहत): काय बातम्या आहेत जंबुद्वीपाच्या?  ही दाढी अशी का वाढवलीस नारदा? त्या दाढीवाल्यांसारखी दाढी वाढवून तुला काही जंबुद्वीपाचं राज्य मिळणार नाही!
 
नारद (हसत): देवराज, थट्टा करू नका. आषाढ गेला, अर्धा श्रावणही संपत आला, पण भरतभूमीवर पावसाचा थेंबही नाही पडला. नद्या कोरड्या पडल्या आहेत, विहिरी आटल्या आहेत. पावसा अभावी पीक जळून खाक झालंय. अजून उशीर झाला, तर कोट्यवधी पशुपक्षी आणि माणसं तहानेने व्याकूळ होऊन मरतील. आता सांगा, जिथे प्यायला पाणी नाही, तिथे दाढी करायला कुठून मिळणार? अनेक दिवस झाले, आंघोळही केलेली नाही. अंगाला वास येऊ नये म्हणून फक्त फॉग मारून दरबारात आलोय. वरुणदेवांचे वादळचालक नेहमीप्रमाणे कामात दिरंगाई करत आहेत. एकदाच कठोर कारवाई करा त्यांच्यावरनरकात धाडा त्यांना!

इंद्रदेव (चकीत होऊन): हे काय ऐकतोय मी, नारदा! यावेळी तर तुमच्या सल्ल्यानुसारच वरुणदेवांना मी आदेश दिला होता, सर्व वादळचालकांनी उन्हाळ्यातच भारतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी तरीही एवढी दिरंगाई? बोलवा रे, वरुणदेवांना!

(वरुणदेव दरबारात प्रवेश करतात)

इंद्रदेव (कडक आवाजात): वरुणदेवा, पावसाळा अर्धा संपला तरी तुम्ही भरतभूमीवर वादळांचे टँकर पाठवले नाहीत. काय प्रकार आहे हा?

वरुणदेव (नम्रपणे): महाराज, क्षमा असावी. अजून वादळी टँकर भारतात पाठवू शकलो नाही.

इंद्रदेव: पण का?

वरुणदेव: त्याला जबाबदार आहेत, नारद ऋषीच. मी नको म्हणत असतानाही त्यांच्या सल्ल्यानुसार वादळचालकांना भारतात पाठवलं. ते थेट इंद्रप्रस्थ नगरीतील एका भव्य, हिरव्या रम्य परिसरात वसलेल्या विद्यापीठात उतरले. तिथे त्यांची भेट झाली "आझादी गँग"शी. तिथे कट कारस्थान शिजले.  मग काय स्वर्गात परत आल्यावर  "हमें चाहिए काम से आज़ादी", "हमारा शोषण बंद करो", "नियम से काम करेंगे, ओवर टाईम नहीं करेंगे", "जितना काम, उतना दाम" अशा घोषणा देत, लाल झेंडे घेऊन माझ्या महालाबाहेर ठिय्या दिला त्यांनी!  मी कितीही समजावलं की स्वर्गात प्रत्येकाने आपलं कार्य लोक कल्याणासाठी करावं, पण कुणी ऐकायलाच तयार नाही.

इंद्रदेव (थोडा वैतागून): मग मागण्या तरी काय आहेत त्यांच्या?

वरुणदेव: महाराज, ते म्हणतात, सोमरसाचा कोटा वाढवा. तो मिळाल्याशिवाय ते काम सुरू करणार नाहीतशिवाय, अजून एक मागणी आहे...

इंद्रदेव: थांबा वरुणदेवा, एकदाच सगळं सांगा, आणखी काय हवंय त्यांना?

वरुणदेव: ते म्हणतात, वादळवाडीत भारतातून आलेल्या बी-ग्रेड अप्सरांचं नृत्य होतं. त्यांच्या वाडीतही महिन्यातून एकदा तरी रंभा, उर्वशी यांचं खास नृत्य व्हावं, अशी मागणी आहे.

इंद्रदेव(काही क्षण विचार करून, कपाळावर हात मारत): कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मी त्यांच्या मागण्या मान्य करतो. सोमरसाचा  कोटा वाढवून तात्काळ वितरित करा आणि वादळचालकांना भरतभूमीवर पावसाचा बॅकलॉग पूर्ण करायचे आदेश द्या. मग रंभा-उर्वशीचं नृत्य ठेवू वादळवाडीत ठेऊ!

वादळचालकांच्या मागण्या पूर्ण होताच, त्यांनी सोमरसाच्या बाटल्या गटागट रिकाम्या केल्या आणि पावसाचा कोटा पूर्ण करण्यासाठी भरतभूमीवर पावसाचा मारा सुरू केला. नशेत झिंगलेल्या अवस्थेत कुठे किती पाऊस टाकतोय याचं भान त्यांना उरले नाही. त्यांना डोळ्यांसमोर  दिसत होती फक्त नृत्य करणार्‍या रंभा आणि उर्वशी.  

वादळचालकांच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्रात एकच हाहाकार माजला. मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या नगरी पाण्यात बुडाल्या. शेती उध्वस्त झाली, गुरं-ढोर वाहून गेली. शेकडो लोक थेट स्वर्गात पोहोचले. पण वादळचालकांनी दोन महिन्यांचा बॅकलॉग आठवड्यातच पूर्ण केला आणि आता गेल्या वर्षाचा बॅकलॉगही पूर्ण करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत.....