Tuesday, September 8, 2026

दासबोध: - दशक १७, समास ६, देहात्मनिरूपण

 

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या सतराव्या दशकात "प्रकृतिपुरुष" हा विषय हाताळला आहे. जड सृष्टी म्हणजे प्रकृती आणि चैतन्य म्हणजे पुरुष अर्थात आत्मा. यांचा संबंध. समर्थ देहात्मनिरूपण समासात सांगतात की जो पर्यन्त जीवात्मा हा देहाशी जोडलेला (देहबुद्धीयुक्त) असतो, तोपर्यंत त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यू, वार्धक्य, रोग हे सर्व भोगावेच लागते. मग प्रश्न येणारच देह बंधंनातून जीवत्म्याला मुक्ति काशी मिळणार. मग आपल्या शरीरात आत्मा आपण कसा ओळखणार.
 
मुंडूक उपनिषद मध्ये ऋषि म्हणतात: द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते । ...अर्थात दोन सुंदर पक्षी नेहमी एकत्र राहणारे, परस्परांचे जिवलग मित्र (सखा) असलेले एकाच वृक्षावर बसलेले असतात. त्यांतील एक पक्षी त्या वृक्षाची गोड-कडू फळे चाखत राहतो, म्हणजे सांसारिक सुख आणि दुख भोगत राहतो; तर दुसरा पक्षी कोणतेही फळ न खाता, केवळ शांतपणे पाहत राहतो, साक्षीभावाने. हा वृक्ष म्हणजे शरीर. जो पक्षी फळे खात राहतो तो म्हणजे मनाने अर्थात देहबुद्धीने बांधलेला जीवात्मा, सुख-दुःखांचा भोक्ता, कर्मफळांत गुंतलेला "मी". जो पक्षी न खाता निव्वळ पाहत राहतो तो म्हणजे परमात्मा. कर्मबंधनातून मुक्त होऊन आपल्याला परमात्म्याशी जवळीक साधायची आहे. या समासात हाच भाव सामान्य माणसाला समजणार्‍या भाषेत समर्थांनी सांगितलं आहे.
 
या दोन पक्ष्यांचे उदाहरण आजच्या भाषेत सांगायचे झाले तर, आपण एखादा चित्रपट पाहताना ज्याप्रमाणे पडद्यावरील घटनांशी भावनिकरीत्या इतके गुंततो की स्वतःला त्या कथेचाच भाग समजू लागतो, तो झाला "फळ चाखणारा" पक्षी. पण जेव्हा चित्रपट संपतो आणि आपण थिएटरबाहेर येतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण फक्त 'प्रेक्षक' होतो, कथेतील पात्र नव्हतो. हा जो 'साक्षीभाव' आहे, तोच दुसरा पक्षी म्हणजे परमात्मा.  रोजच्या आयुष्यात राग, मत्सर, मोह यांच्या प्रसंगी आपणही अनेकदा 'पात्र' बनून जातो; पण थोडे थांबून, श्वास घेऊन 'हे माझ्या मनात घडते आहे, मी ते फक्त पाहतो आहे' असे जाणणे,  हाच साक्षीभावाचा सराव आहे.
 
"आत्मा देहाअध्यें असतो नाना सुखदुखें भोगितो
सेवटीं शरीर सांडून जातो येकायेकीं "
 
आत्मा शरीरात राहतो, त्याच्याद्वारे सुख-दुःखे भोगतो आणि शेवटी अचानक शरीर सोडून निघून जातो. देह हे तात्पुरते वास्तव्यस्थान आहे, कायमचे घर नाही. समर्थ पुढे म्हणतात,
 
"ऐसा दों दिसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म
नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतला "
 
हा दोन दिवसांचा, क्षणभंगुर भ्रम आहे, त्यालाच लोक परब्रह्म समजून बसतात आणि नाना प्रकारच्या सुख-दुःखाच्या गोंधळालाच "मी" म्हणून स्वीकारतात. हे आजच्या सोशल मीडियावरील "परफेक्ट लाईफ"सारखेच आहे. फोटो, लाईक्स, रील इत्यादि पाहून दुसर्‍यांना आपले खरे स्वरूप कळणे शक्यच नाही. आपल्यालाही वाटते तेच "आपण" आहोत. पण उद्या तब्येत बिघडली किंवा परिस्थिती पालटली, तर ती ओळखच कोसळते. आपल्या खर्‍या स्वरूपाशी आपला साक्षात्कार होतो.
 
उदाहरणार्थ, एखाद्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचे हजारो फॉलोअर्स असतात, त्याचे आयुष्य 'परफेक्ट' भासते. पण त्याच व्यक्तीला जर अचानक एखादा गंभीर अपघात झाला, किंवा नात्यात मोठा तुटवडा आला, तर तेच फॉलोअर्स, त्या लाईक्स, कोणीही प्रत्यक्ष दुःखात सोबत देऊ शकत नाहीत. ती चकचकीत प्रतिमा ही केवळ एक क्षणभंगुर मुखवटा असते; आतला खरा 'मी' त्या प्रतिमेपेक्षा वेगळाच असतो, हे तेव्हा उमगते.
 
समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात वर्णन केलेले संसारिक सुख-दुःखांचे स्वरूप मानवी देह आणि त्याच्या मर्यादांवर आधारित आहे. तरुणपणी शरीरात ताकद आणि सौंदर्य असते, तोवर माणूस नानाविध भौतिक सुखे उपभोगतो आणि स्वतःचे अस्तित्व, पद किंवा सौंदर्याच्या गर्वात वावरतो. मात्र, वृद्धापकाळात किंवा प्रतिकूल परिस्थितीत हेच शरीर अशक्त होते, अवयव साथ देईनासे होतात आणि माणूस इतरांवर अवलंबून राहतो. दैनंदिन आयुष्यातही पूर्ण सुख कधीच मिळत नाही; जुन्या काळात ढेकूण, माश्या आणि उंदरांचा त्रास जसा माणसाला छळायचा, तसाच आजच्या काळात वीज जाणे, भेसळयुक्त अन्न, कामाचा ताण, क्रेडिट कार्ड आणि किस्त देण्याची चिंता किंवा नात्यांमधील दुरावा यांसारख्या रोजच्या लहान-मोठ्या समस्या माणसाला अस्वस्थ करतात.
 
याचे आणखी एक साधे उदाहरण म्हणजे, नोकरीच्या सुरुवातीच्या काळात तरुण मंडळी नवीन पगारात मोठी स्वप्ने रंगवतात,  नवी गाडी, मोठे घर, परदेशवारी. पण काही वर्षांनी हप्ते (EMI), मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांची काळजी, आणि कामाच्या ठिकाणची स्पर्धा यांचे ओझे वाढत जाते. जे सुख कमावण्यासाठी इतकी धावपळ केली, तेच सुख हाती येईपर्यंत नवीन चिंता निर्माण होतात. हाच 'दों दिसांचा भ्रम' आहे.  सुख मिळाल्यासारखे वाटते, पण ते टिकत नाही, त्याची जागा लगेच दुसरी चिंता घेते.
 
मृत्यूसमयीचे साम्य
 
पुढे समर्थ सांगतात मृत्यूसमयीचे दैन्य व लाचारी श्रीमंत-गरीब किंवा राजा-रंक सर्वांना सारखीच असते. देहावर उभी असलेली प्रतिष्ठा, मग ती आजच्या भाषेत बँक बॅलन्स असो, सोशल मीडियावरचा स्टेटस असो, की शारीरिक सौंदर्य असो, शेवटी काहीही टिकत नाही. मृत्यूचा क्षण अत्यंत कठीण असतो; शरीरातून प्राण सहज जात नाहीत. म्हणूनच अज्ञानात न राहता, या नश्वर देहालाच सर्वस्व मानणाऱ्या 'देहबुद्धीच्या' पलीकडे जाऊन शाश्वत तत्त्वाकडे (आत्मज्ञानाकडे) लक्ष द्यावे, हाच समासाचा सार आहे.
 
तरुणपणी सुखांचा उपभोग घेत तो स्वतःची किंमत या नश्वर गोष्टींमध्येच शोधत असतो. पण वयाच्या उत्तरार्धात किंवा अचानक आलेल्या एखाद्या गंभीर आजारपणात हे चित्र पूर्णपणे बदलते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमुळे ते ग्लॅमर ओसरते, सोशल मीडियावरील फॉलोअर्स आणि डिजिटल स्टेटस त्याला आजाराच्या वेदनेतून वाचवू शकत नाहीत. अचानक कंपनीत 'ले-ऑफ' झाला किंवा नोकरी गेली, तर ती प्रतिष्ठा एका रात्रीत निघून जाते. गंभीर आजारपणात जेव्हा आयसीयूमध्ये (ICU) व्हेंटिलेटरवर पडून राहावे लागते, तेव्हा कोट्यवधींचा बँक बॅलन्स असणारा श्रीमंत असो वा सामान्य व्यक्ती, मृत्यूसमयीचे दैन्य आणि लाचारी दोघांसाठीही अगदी सारखीच असते. आयुष्यभर ज्या देहाला, सौंदर्याला आणि पदाला तो स्वतःचे अस्तित्व ('मी') समजत होता, ते किती क्षणभंगुर होते याची जाणीव त्याला शेवटी हताश झाल्यावर होते. देहावर आधारित सुख आणि अहंकार हे शेवटी असमाधान आणि दुःखातच संपतात, हेच यावरून स्पष्ट होते.
इतिहासातही याची अनेक उदाहरणे सापडतात. मोठमोठे सम्राट, ज्यांच्या एका आदेशावर लाखो लोकांचे भवितव्य ठरत असे, तेही शेवटी एका साध्या तापाने किंवा वृद्धापकाळाने खितपत पडलेले दिसतात. आजच्या काळातही, मोठमोठ्या उद्योगपतींना किंवा सेलिब्रिटींना जेव्हा गंभीर आजार होतो, तेव्हा त्यांचे पैसे उत्तम उपचार मिळवून देऊ शकतात, पण मृत्यूचा अंतिम क्षण, ती शारीरिक वेदना आणि हतबलता टाळू शकत नाहीत. यावरून हेच सिद्ध होते की देहावर आधारित कोणतीही श्रीमंती किंवा प्रतिष्ठा शेवटी तात्पुरतीच ठरते.
 
कर्मयोगाचा मार्ग
 
जर देवाने आपल्याला देह दिला आहे तर सुख आणि दुख येणारच मग माणसाने या जगात जगावे कसे भगवद्गीतेत भगवंत म्हणतात:
 
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि
 
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कर्तव्यकर्म करताना त्याच्या फळाची (सुख मिळेल की दुःख, जिंकू की हरू) चिंता न करता, समबुद्धीने कर्म करावे. हीच स्थितप्रज्ञतेची सुरुवात आहे. मन सुख-दुःखाच्या हेलकाव्यांपासून अलिप्त राहिले, तरच खरी शांती आणि कर्मयोग साधतो. आपल्या आत्म्याशी आपली ओळख होते.
 
याचे एक व्यावहारिक उदाहरण म्हणजे एखादा खेळाडू. सामना जिंकणे किंवा हरणे हे त्याच्या हातात पूर्णपणे नसते.  प्रतिस्पर्धीचा खेळ, नशीब, पंचांचे निर्णय असे अनेक घटक कारणीभूत असतात. पण जो खेळाडू केवळ स्वतःच्या सरावावर, तंत्रावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो, आणि निकालाची फारशी चिंता न करता खेळत राहतो, तोच दीर्घकाळ स्थिर राहतो आणि खरा आनंद घेतो. हरल्यावर कोसळत नाही आणि जिंकल्यावर हुरळून जात नाही. हीच वृत्ती स्थितप्रज्ञतेच्या जवळ जाणारी आहे.  फळाची आसक्ती सोडून कर्तव्य चोख करणे.
 
देहात्मनिरूपण समासात समर्थांनी एकच मूलभूत सत्य वेगवेगळ्या उदाहरणांतून संगितले आहे. देह हा नाशवंत, बदलणारा आणि सुख-दुःखाने भरलेला आहे, आणि याच देहाशी बांधलेल्या, सतत सुख-दुःखात हेलपाटणाऱ्या जीवभावालाच अज्ञानी लोक चुकून "परब्रह्म" किंवा आपली खरी, कायमची ओळख समजून बसतात. परब्रह्म म्हणजे आपले खरे, शाश्वत स्वरूप. कधीही नाश न पावणारे, दुःखरहित आणि स्तुती-निंदेच्या पलीकडचे आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, आपण देह, त्याची सुख-दुःखे आणि त्यावर आधारित तात्पुरत्या ओळखी यांना अवाजवी महत्त्व न देता, त्यांच्या पलीकडे असलेल्या स्थिर आत्मतत्त्वाकडे विवेकाने लक्ष द्यावे. साधकाला जर जन्म मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त व्हायचे असेल तर, मृत्यू येण्यापूर्वी आपले मन देहातून काढून घ्यावे आणि मुक्त व्हावे. हाच खरा आत्म साक्षात्काराचा मार्ग आहे. समर्थांच्या शब्दांत:
 
ऎसें जयास ज्ञान जालें तयाचें बंधन तुटलें
येरां नसोनीच जडलें सदृढ अविवेकें ॥१४॥(आत्माराम)
 
असा ज्याला स्वरूपसाक्षात्कार झाला त्याचे सर्व बंधन तुटलें, तो मुक्त झाला. हे बंधन वास्तविक नसून केवळ काल्पनिकच असल्याने, खरे पाहता कोणालाच ते नाही. परंतु अज्ञानाने 'मी जीव मज बंधन' या अविवेकाच्या भ्रांतीने, या जीवांनी आपल्याला संसारात दृढ बांधून घेतले आहे.
 
याचे एक सोपे उदाहरण म्हणजे स्वप्नात एखाद्याला वाघाने पकडले आणि तो घाबरून ओरडतो, घाम फुटतो.  पण जागा झाल्यावर त्याला कळते की तो वाघ, ती भीती, सगळे स्वप्नातलेच होते, प्रत्यक्षात काहीच घडले नव्हते. त्याचप्रमाणे देहबुद्धीचे बंधन हे एक प्रकारचे 'जागृत स्वप्न' आहे. ज्याला आत्मज्ञान होते, तो या स्वप्नातून जागा होतो आणि त्याला कळते की बंधन कधी खरे नव्हतेच,  ते फक्त अज्ञानामुळे खरे भासत होते. हीच समर्थांची शिकवण आजच्या काळातही तितकीच लागू पडते: बाह्य गोष्टींच्या मागे धावताना, आपल्या आतल्या शाश्वत, अविनाशी स्वरूपाचा विसर पडू देऊ नये.

Saturday, September 5, 2026

मी लेक आहे मुद्गलानीची





"उत् स्म वातो वहति वासो अस्या अधिरथं यदजयत् सहस्रम्
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ..."


रणांगणी ती प्रथम उतरली, बैल जुव्याला बांधला खंबीर,
गर्जून उठला वृषभ पराक्रमी, दुमदुमले रणांगण गंभीर।
लगाम हाती, रथ चौफेर उधळला, शत्रूचा थरकाप उडाला,
मी लेक आहे मुद्गलानीची, जिच्यामुळे विजय उजाडला॥

वारा उधळीत होता पदर, तरी वस्त्रांकडे नसे तिचे भान,
डोळ्यांसमोर एकच ध्येय, गोधनरक्षा, धर्माचा मान।
बैलाच्या गर्जेने सैन्य चेतले, शौर्याचा जळला अग्निकुंड,
मी लेक आहे मुद्गलानीची, जिने जिंकले रण अखंड॥

गोधन पुन्हा स्वधर्मी आले, दस्यूंचा झाला पूर्ण पराभव।
ऋषींनी ऋचांत अमर केली, मुद्गलानीच्या शौर्‍याची गाथा॰  
स्वाभिमानी तेजस्वी मी देश धर्म सत्यासाठी आज ही भिडते।
मी लेक आहे मुद्गलानीची, रणरागिणी त्या मातृशक्तीची.  
 

Wednesday, September 2, 2026

धनाचा खरा उपयोग : धर्म, रक्षण आणि कल्याण”

 
 ऐन्द्रं सानसिं रयिं सजित्वानं सदासहम्। वर्षिष्ठमूतये भर॥

(ऋषी: मधुच्छंदा वैश्वामित्र, देवता: इंद्र, ऋग्वेद १.५.३)
 
हे इंद्रा, हे बलशाली परमेश्वरा! आम्हांला असे धन प्रदान कर, जे केवळ संग्रहासाठी नसून आमच्या रक्षणासाठी, पुष्टीसाठी, नित्य उपयोगासाठी आणि उत्कर्षासाठी कारणीभूत ठरेल. ते धन शत्रूंचे आघात परतवणारे, प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून देणारे आणि जीवनाला वैभवाकडे नेणारे असावे, अशी हृदयस्पर्शी प्रार्थना ऋषी मधुच्छंदा या ऋचेतून करतो.
 
केवळ तीन ओळींच्या या ऋचेत ऋषींनी धनाचे तत्त्वज्ञान अत्यंत मार्मिकपणे मांडले आहे. धन म्हणजे नुसता आकडा नव्हे; ते रक्षण (सुरक्षा), पुष्टी (आरोग्य), स्थैर्य (सातत्यपूर्ण उपयोगिता) आणि समृद्धी (उत्कर्ष),  या चार स्तंभांवर उभे असले तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. हजारो वर्षांपूर्वीची ही दृष्टी आजही तितकीच प्रस्तुत आहे, किंबहुना आजच्या स्पर्धात्मक जगात अधिकच निर्णायक ठरते.
 
जगात धनवानालाच लोक कुलीन, विद्वान आणि गुणवान समजतात. पण शास्त्र याहून खोल सत्य सांगते,  "धर्मस्य मूलम् अर्थः, सुखस्य मूलं धर्मः।" अर्थ हा धर्माचा पाया आहे आणि धर्म हा सुखाचा आधार. महाभारतातील विदुरनीतीही हेच अधोरेखित करते- निरुपयोगी धन हे भाराप्रमाणे आहे; ते सत्कारणी लागले तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच धनाचा तिरस्कार करणे जितके अज्ञानाचे लक्षण आहे, तितकेच त्याचा अंदाधुंद संचय करणेही अधर्माचे लक्षण आहे. खरी शहाणपणाची कसोटी आहे — धन कशासाठी आणि कसे वापरले जाते, हेच या ऋचेतून ऋषींनी स्पष्ट केले आहे.
 
१. रक्षणासाठी धन- सुरक्षा हाच पहिला स्वधर्म: आचार्य चाणक्यांनी अर्थशास्त्रात स्पष्टच म्हटले आहे, "कोशमूलो दण्डः", म्हणजे सामर्थ्यशाली सैन्य आणि दंडनीतीचे मूळ कोशातच (राजकोषातच) असते. ज्या राष्ट्राकडे संपत्ती आहे पण संरक्षणसिद्धता नाही, ते राष्ट्र वैभवशाली दिसले तरी असुरक्षित असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या तिजोरीतील मोठा वाटा जलदुर्ग, आरमार आणि गडकोटांच्या उभारणीत गुंतवला.  तीच दूरदृष्टी आज 'सुरक्षा प्रथम' या धोरणाचा पाया ठरते.
 
आधुनिक उदाहरण याहून बोलके आहे. आखाती अरब देशांनी तेलसंपत्तीतून अफाट वैभव मिळवले, पण संरक्षण-सिद्धता व स्वदेशी तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केल्याने इराणसारख्या शेजाऱ्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपुढे त्यांना हतबल व्हावे लागले.  रोज हजारो कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे. उलट, इस्रायलने अल्प भूभाग व मर्यादित साधनसंपत्ती असूनही आपले धन संशोधन, तंत्रज्ञान आणि संरक्षणात गुंतवले आणि 'आयर्न डोम'सारख्या प्रणालींद्वारे अस्तित्व टिकवले.
 
भारतानेही हाच धडा आत्मसात केला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 'आत्मनिर्भर भार' आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत स्वदेशी तेजस लढाऊ विमाने, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, आकाश प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक झाली. याचे मूर्त फळ म्हणजे २०२५ मधील ऑपरेशन सिंदूरपहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेली निर्णायक कारवाई. यात नौदल, थलसेना आणि वायुसेना यांचा समन्वय, स्वदेशी शस्त्रसज्जता आणि राजकीय इच्छाशक्ती स्पष्ट दिसली, आणि भारताने अणुधमकीलाही बळी न पडता दहशतवादाविरोधात 'न्यू नॉर्मल' धोरण जगासमोर मांडले.
 
२. पुष्टीसाठी धन- आरोग्य हीच खरी संपत्ती: संस्कृत सुभाषित म्हणते, "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्", शरीर हेच सर्व साधनांचे मूळ साधन आहे. निरोगी प्रजा हीच राष्ट्राची खरी संपत्ति आहे. कौटिल्याने अर्थशास्त्रात राजाचे प्रथम कर्तव्य 'योगक्षेम' (प्रजेचे कल्याण) सांगितले आहे.  "प्रजासुखे सुखं राज्ञः, प्रजानां च हिते हितम्",  प्रजेच्या सुखातच राजाचे सुख सामावलेले आहे. सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखांतून मनुष्य आणि पशूंसाठीही औषधालये, विहिरी व रस्ते उभारल्याचा उल्लेख आढळतो. हे प्राचीन भारतातील 'पुष्टी'च्या तत्त्वज्ञानाचे मूर्त रूप होते.
 
आधुनिक भारतात याच परंपरेचा विस्तार दिसतो. आयुष्मान भारत योजनेद्वारे कोट्यवधी गरीब कुटुंबांना मोफत आरोग्यसेवेची हमी मिळाली, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्ससारख्या संस्था उभ्या राहिल्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट झाली आणि डिजिटल हेल्थ मिशनने आरोग्यसेवा तळागाळापर्यंत पोहोचवली. कोविड काळात भारताने स्वतःच्या नागरिकांना लसीकरण देतानाच जगातील १०० हून अधिक देशांना 'वॅक्सिन मैत्री' अंतर्गत मदत केली.  हे दाखवते की योग्य दिशेने वापरलेले धन केवळ स्वतःची नव्हे, तर संपूर्ण मानवतेची पुष्टी करते.
 
३. सातत्याने उपयुक्त ठरणारे धन- ज्ञान व तंत्रज्ञानातील गुंतवणूक: तक्षशिला आणि नालंदा या प्राचीन विद्यापीठांत राजाश्रयाने उभारलेले ज्ञानभांडार शतकानुशतके जगाला मार्गदर्शन करत राहिले. हे सिद्ध करते की ज्ञानात गुंतवलेले धन कधीही क्षीण होत नाही, उलट पिढ्यानपिढ्या फळ देत राहते. आधुनिक जगात जपानचे उदाहरण याहून समर्पक आहे. दुसऱ्या महायुद्धातील उद्ध्वस्ततेनंतरही जपानने आपले उरलेसुरले धन उद्योग, संशोधन व शिक्षणात ओतले आणि काही दशकांतच जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून उभे राहिले.
 
भारतानेही डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP २०२०) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर मिशन, अंतराळ तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत मोठी गुंतवणूक केली आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी चंद्र-दक्षिण ध्रुव लँडिंगने हे सिद्ध केले की मर्यादित खर्चातही योग्य नियोजनाने जागतिक स्तरावरचे तांत्रिक यश मिळवता येते. यामुळेच भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आणि वेगाने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था बनला आहे। हे धन खऱ्या अर्थाने 'सदासहम्' म्हणजे सदैव उपयोगी ठरणारे आहे.
 
४. वाढ आणि समृद्धी आणणारे धन:  चाणक्यांनी अर्थशास्त्रात राजाला विद्या (शिक्षण), योगक्षेम (कल्याण) आणि दंड (सुरक्षा) या तीन आघाड्यांवर धन खर्च करण्याचा उपदेश दिला कारण यातूनच राष्ट्राची खरी वाढ साधली जाते. गुरुकुल पद्धती, आयुर्वेद आणि राज्यसंरक्षण यांत गुंतवलेले धन हेच प्राचीन भारताच्या समृद्धीचे रहस्य होते.
 
आजच्या भारताने या प्राचीन नीतीला आधुनिक चौकट दिली आहे.  शिक्षणात NEP २०२०, आरोग्यात आयुष्मान भारत, संरक्षणात आत्मनिर्भर भारत आणि तंत्रज्ञानात डिजिटल इंडिया व AI मिशन. या चतुःसूत्रीतून लाखो युवकांना रोजगार, कोट्यवधी नागरिकांना आरोग्यसेवा आणि राष्ट्राला आर्थिक व सामरिक बळ मिळाले आहे. मधुच्छंदा ऋषींनी जे धन "वर्षिष्ठम्" (अत्युत्तम) आणि उत्कर्षाला नेणारे मागितले, त्याचेच प्रत्यंतर आजच्या भारताच्या वाटचालीत दिसते.
 
ऋग्वेदातील  ही ऋचा एक राष्ट्रनीतीच आहे. रक्षण, पुष्टी, सातत्य आणि समृद्धी- या चार आधारस्तंभांवर उभे असलेले धनच खऱ्या अर्थाने "इंद्रदत्त" ठरते. इतिहास साक्षी आहे, ज्या राष्ट्रांनी संपत्तीला केवळ उपभोगाचे साधन मानले, ती कालौघात लयाला गेली; आणि ज्यांनी तिला रक्षण, आरोग्य, ज्ञान व समृद्धीचे माध्यम बनवले, ती चिरकाल तेजाने तळपत राहिली. आजचा भारत त्याच सनातन दृष्टिकोनाला आधुनिक तंत्रज्ञान व धोरणांची जोड देत, मधुच्छंदा ऋषींच्या त्या पुरातन प्रार्थनेला नवा अर्थ देत आहे.
 

Friday, August 28, 2026

विश्वरूप दर्शन: सर्वांमध्ये एकच परमात्मा



महाभारताच्या कुरुक्षेत्रात जेव्हा अर्जुन आपल्याच स्वजनांविरुद्ध युद्ध करण्यापासून विमुख झाला
, तेव्हा त्याचा हा द्वंद्व केवळ कौटुंबिक मोहाचा नव्हता, तर तो त्या खोल मानवी प्रश्नाचा होता- सत्य आणि धर्म काय आहे. भगवान श्रीकृष्णांनी हीच द्विधा मनःस्थिती शांत करण्यासाठी आपले विराट स्वरूप दाखवले. गीतेच्या अकराव्या अध्यायात वर्णिलेले हे विश्वरूप दर्शन काही साधे चमत्कार नव्हते, तर संपूर्ण सृष्टी, सर्व जीव, सर्व लोक एकाच परमात्म्यामध्ये सामावलेले आहेत हे दाखवण्याचे माध्यम होते. याच अध्यायात कृष्ण सांगतात की जे योद्धे रणभूमीवर उभे आहेत, ते सर्व आधीच त्या विराट रूपात विद्यमान आहेत- निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नव्हता, तर संपूर्ण मानवतेसाठी होता। प्रत्येक प्राणी, प्रत्येक रूप त्याच एका अविनाशी सत्तेची अभिव्यक्ती आहे.
 
प्राचीन संस्कृतींमध्ये हाच भाव वेगवेगळ्या रूपांत प्रकट होत राहिला आहे. वैदिक काळात सूर्य, अग्नी, वरुण, इंद्र, पृथ्वी आणि नद्यांना देवत्व मानले गेले. वृक्ष, नाग, गाय, पर्वत  सर्वांमध्ये दिव्यता पाहिली गेली. हा काही अंधश्रद्धेचा भाग नव्हता, तर हा भाव होता की निसर्गाचा प्रत्येक अंश त्याच परम चैतन्याचा विस्तार आहे. भारताबाहेरही इतर प्राचीन संस्कृतींमध्ये हीच प्रवृत्ती दिसून येते. प्राचीन इजिप्त संस्कृतीत सूर्यदेवता रा, सृष्टी आणि पुनर्जन्माचे देवता ओसायरिस, मातृत्व आणि जादूची देवी आयसिस, तसेच आकाशदेवता होरस अशा अनेक देवी-देवतांची पूजा होत असे, आणि तिथेही प्राण्यांना, जसे मांजर, बैल आणि श्येन पक्षी,पवित्र मानले जाई. मध्य अमेरिकेतील माया संस्कृतीत पावसाचा देव चाक, सृष्टिकर्ता कुकुल्कान (पंख असलेला सर्प), तसेच मक्याच्या देवतेची उपासना प्रचलित होती, जी शेती आणि निसर्गचक्राशी जोडलेली होती. दक्षिण अमेरिकेतील इंका संस्कृतीत सूर्यदेवता इंती हे सर्वोच्च देवता मानले जात, त्याचबरोबर गर्जनेचा देव इल्यापा आणि पृथ्वीमाता पचामामा यांचीही पूजा होत असे. या सर्व संस्कृतींमध्ये एक समान भाव दिसून येतो, निसर्गाच्या शक्तींमध्ये आणि जीवनदायी घटकांमध्ये परमात्म्याला पाहण्याची प्रवृत्ती, मग तो भारत असो, इजिप्त असो किंवा अमेरिका खंड असो. ऋग्वेदातील हे वचन याच भावनेचे सार आहे- एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति, म्हणजेच सत्य एकच आहे, विद्वान त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. ईशावास्य उपनिषदही सांगते की, ईशावास्यमिदं सर्वम्, या जगाचा कणकण ईश्वराने व्यापलेला आहे. हाच विचार पुढे गीतेत अधिक स्पष्टपणे प्रकट झाला.

भगवान कृष्णांच्या काळातही भारतात विविध जनपदांमध्ये वेगवेगळ्या देवी-देवतांची उपासना प्रचलित होती. स्वाभाविक आहे की जेव्हा माणूस आपल्याच श्रद्धेला सर्वश्रेष्ठ मानू लागतो, तेव्हा तिथूनच संघर्षाची सुरुवात होते. आपल्याच उपासना पद्धतीला श्रेष्ठ मानून ती इतरांवर लादण्याची प्रवृत्ती नेहमीच वाद, वैमनस्य आणि अखेरीस युद्धाला जन्म देत आली आहे. इतिहास साक्षी आहे की याच प्रवृत्तीमुळे भूतकाळात लाखो निरपराध लोक मारले गेले, कधी धर्मयुद्धांच्या (क्रुसेड्स) नावाखाली, कधी धार्मिक मोहिमा आणि साम्राज्यवादी विस्ताराच्या नावाखाली, तर कधी आपला मतच एकमेव सत्य मानून इतरांची श्रद्धा नष्ट करण्याच्या प्रयत्नात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान यहुद्यांचा नरसंहार (होलोकॉस्ट) हे याचे अत्यंत वेदनादायी उदाहरण आहे, जिथे वांशिक आणि वैचारिक श्रेष्ठत्वाच्या दुराग्रहाने लाखो निरपराध लोकांचे जीवन संपवले. यावरून हे स्पष्ट होते की जेव्हा एखादा समुदाय आपली ओळख, श्रद्धा किंवा विचारधारा इतरांपेक्षा श्रेष्ठ मानून ती बळजबरीने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचा परिणाम विध्वंस आणि नरसंहाराशिवाय दुसरे काही नसतो. अर्जुनाचा द्वंद्व खरे तर याच मानवी प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो, जो आपली श्रद्धा आणि कर्तव्य यांच्यात अडकलेला असतो. याच संदर्भात गीतेतील हा श्लोक अत्यंत हृदयस्पर्शी आहे, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मनुष्य ज्या कोणत्याही रूपात माझी उपासना करतो, मी त्याच रूपात त्याचा स्वीकार करतो, कारण सर्व मार्ग शेवटी माझ्यापर्यंतच पोहोचतात. यापेक्षाही सोपा संदेश गीतेच्या नवव्या अध्यायात मिळतो- पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. भगवंताला भव्य कर्मकांडाची गरज नाही, तर निष्कपट भावाने अर्पण केलेले एक पान, एक फूलही स्वीकार्य आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की बाह्य आडंबर आवश्यक नाही, अंतःकरणातील भाव आणि सदाचरण हीच खरी पूजा आहे. सनातन परंपरेत वर्णिलेला धर्माचा अर्थ सत्य, अहिंसा, करुणा, कर्तव्यपालन करणेच पुरेसे आहे, मग उपासना पद्धती कोणतीही असो.
 
आज जेव्हा धर्माच्या नावाखाली जगाच्या अनेक भागांत वैमनस्य, हिंसा आणि जिहादसारख्या प्रवृत्ती दिसून येत आहेत, तेव्हा गीतेचा हा उपदेश अधिकच प्रासंगिक ठरतो. माणूस आजही त्याच द्विधा मनःस्थितीत आहे ज्यात अर्जुन होता॰ आपली श्रद्धा श्रेष्ठ आणि इतरांची श्रद्धा कनिष्ठ मानण्याची प्रवृत्ती आजही संघर्षाचे मूळ कारण बनलेली आहे. गीता आपल्याला शिकवते की प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक उपासना पद्धतीच्या मुळाशी तोच एक परमात्मा विराजमान आहे, हे जर मान्य केले, तर मतभेद आणि द्वेषाचे कोणतेही औचित्य उरत नाही. हे तत्त्वज्ञान धर्मांमधील सहअस्तित्व, सहिष्णुता आणि परस्पर सन्मानाचा पाया रचते. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ही भावना जर आजच्या माणसाने आत्मसात केली, तर धार्मिक कट्टरता आणि हिंसेचा मोठा भाग आपोआप संपुष्टात येऊ शकतो. गीतेचे विश्वरूप दर्शन म्हणूनच केवळ एक पौराणिक प्रसंग नाही, तर आजच्या विभाजित आणि अशांत जगासाठी एक जिवंत मार्गदर्शक तत्त्व आहे.
 

Wednesday, August 26, 2026

राष्ट्रवैभवाचे द्विसूत्र : शस्त्र आणि शास्त्र

 

 
शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिन्ता प्रवर्तते।
राष्ट्रे शास्त्रविहीने तु शस्त्रं नश्यति न संशयः॥ (महाभारत)
 
महाभारताच्या या श्लोकात 'शस्त्र' (संरक्षण, सैन्य, सामर्थ्य) आणि 'शास्त्र' (ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, विवेक) यांचे महत्त्व आणि त्यांचा परस्परावलंबी संबंध अत्यंत नेमकेपणाने सांगितला आहे. जेव्हा एखादे राष्ट्र शस्त्राच्या बळावर म्हणजेच सक्षम लष्करी शक्ती, अंतर्गत सुव्यवस्था आणि बाह्य सुरक्षेमुळे सुरक्षित असते, तेव्हाच तेथे ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य आणि विचार यांचा विकास होऊ शकतो. राष्ट्र सुरक्षित नसेल, तर लोकांचे संपूर्ण लक्ष केवळ अस्तित्व टिकविण्याकडे राहते आणि ज्ञान-विज्ञानाची प्रगती खुंटते.
 
परंतु दुसरीकडे, ज्या राष्ट्रात केवळ शस्त्रांचे सामर्थ्य असते आणि 'शास्त्र' म्हणजेच विवेक, नैतिकता, ज्ञान व नियम यांचा अभाव असतो, तेथे तीच शक्ती अखेरीस स्वतःच्याच विनाशाचे कारण बनते. म्हणूनच "शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिन्ता प्रवर्तते" हा श्लोक राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्राच्या अस्तित्वाचा मूलभूत सिद्धांत मांडतो. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी सुरक्षा (शस्त्र) आणि विवेकपूर्ण ज्ञान (शास्त्र) या दोन्हींचा समतोल तितकाच आवश्यक असतो.

वैदिक व उपनिषदिक दृष्टिकोन

भारतीय संस्कृतीने अनादी काळापासूनच 'शास्त्र' आणि 'शस्त्र' यांच्यातील समतोलाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ऋग्वेदात बलाचा गौरव करताना त्याला नेहमी धर्माच्या अधीन ठेवले गेले आहे.  बल हे रक्षणासाठी असावे, विनाशासाठी नव्हे, असा संदेश वेदांमध्ये वारंवार येतो. कठोपनिषदात श्रेय आणि प्रेय यांच्यातील भेद स्पष्ट करताना सांगितले आहे की, क्षणिक मोह किंवा सत्तालालसेपोटी (प्रेय) घेतलेला मार्ग अखेर विनाशाकडे नेतो, तर विवेकाने (श्रेय) घेतलेला मार्गच कल्याणकारी ठरतो.  
 
इतिहासातील सुवर्णकाळ: शस्त्र आणि शास्त्र यांचा समन्वय
 
इतिहास साक्ष देतो की, जेव्हा जेव्हा एखादे राष्ट्र सामर्थ्यवान झाले, तेव्हाच तेथे ज्ञान आणि विज्ञानाची भरभराट झाली. भारताचा गुप्तकाल हा याचाच सुवर्णकाळ मानला जातो. सम्राट चंद्रगुप्त आणि समुद्रगुप्त यांनी प्रथम शस्त्राच्या बळावर विशाल, सुरक्षित आणि स्थिर साम्राज्य उभे केले. त्या सुरक्षित वातावरणातच आर्यभट्ट, वराहमिहिर, कालिदास यांसारख्या महान विभूतींना ज्ञान-विज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा अभूतपूर्व विकास घडवून आणता आला.
 
आजची अमेरिका आणि चीन यांनीही हाच मार्ग स्वीकारला. प्रथम त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी सामर्थ्य मजबूत केले आणि त्यानंतर आर्थिक, तांत्रिक व वैज्ञानिक महासत्ता म्हणून जगात स्थान निर्माण केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतही याच दिशेने वाटचाल करत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या वाढत्या सामरिक क्षमतेची प्रचिती जगाला अधिक ठळकपणे आली. गेल्या १२ वर्षांत भारताने आर्थिक स्थैर्य आणि सर्वसमावेशक विकासाची उल्लेखनीय वाटचाल केली. सुमारे २५ कोटी नागरिक गरिबी रेषेबाहेर आले, ५५ कोटींहून अधिक जनधन खाती, ५० कोटींपेक्षा अधिक मुद्रा कर्जे आणि जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारी यूपीआय प्रणाली यांमुळे आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली. वीज, रेल्वे, महामार्ग आणि डिजिटल पायाभूत सुविधांतील अभूतपूर्व गुंतवणुकीमुळे उद्योग-व्यवसायांना गती मिळाली. याच कालावधीत भारताचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न सुमारे ८६ हजारांवरून २.१ लाखांहून अधिक झाले, ज्यातून देशाच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याची आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानातील सुधारणेची स्पष्ट साक्ष मिळते.

शास्त्राच्या रक्षणासाठी शस्त्राची आवश्यकता

नालंदासारखे जगप्रसिद्ध विद्यापीठ हे शास्त्रज्ञानाचे अर्थात ज्ञान-विज्ञानाचे प्रतीक होते.  तेथे हजारो विद्वान, भिक्षू आणि ज्ञान विज्ञानाचे लाखो ग्रंथ होते. परंतु त्या ज्ञान भांडाराचे रक्षण करण्याइतके शस्त्रबळ नसल्याने बख्तियार खिलजीच्या आक्रमणात हे संपूर्ण ज्ञानकेंद्र भस्मसात झाले. मध्य अमेरिकेतील माया संस्कृतीनेही खगोलशास्त्र, गणित आणि स्थापत्यकलेत विलक्षण प्रगती साधली होती, पण  सामरिक सामर्थ्याअभावी ती सभ्यता परकीय आक्रमणे आणि अंतर्गत संघर्षांपुढे टिकू शकली नाही. यावरून स्पष्ट होते की, केवळ शास्त्र असून उपयोग नाही. त्याच्या रक्षणासाठी शस्त्रही तितकेच आवश्यक असते.

 
विवेकहीन शस्त्र प्रयोगाचे परिणाम
 
परंतु इतिहास हेही शिकवतो की, विवेकाशिवाय वापरलेले शस्त्र अखेरीस विनाशालाच आमंत्रण देते. आर्थिक आणि सामरिक शक्तीने प्रबळ झालेल्या जर्मनीने विवेक गमावून अहंकाराच्या भरात संपूर्ण जग जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यातून दुसरे महायुद्ध घडले, लाखो निरपराध लोकांचे प्राण गेले आणि जर्मनी स्वतःही उद्ध्वस्त झाला. नेपोलियनचा पराभवही त्याच्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेचा आणि अविवेकी शस्त्रप्रयोगाचाच परिणाम होता.
 
प्राचीन भारतीय इतिहासातही याची उदाहरणे आढळतात. रामायणातील रावण हा अमाप शक्ती, ज्ञान आणि वैभव यांचा स्वामी होता, परंतु अहंकार आणि अविवेकामुळे त्याने आपल्या शस्त्रबळाचा गैरवापर केला आणि अंततः संपूर्ण लंका तसेच स्वतःच्या कुळाचा नाश ओढवून घेतला. महाभारतातील दुर्योधनही याच मार्गाचे उदाहरण आहे. अपार सैन्यबळ आणि साधनसंपत्ती असूनही नीती व विवेकाचा त्याग केल्यामुळे कौरव कुळाचा समूळ विनाश झाला.
 
आजच्या जागतिक परिस्थितीत गाझा पट्टीतील संघर्ष हे याचे जिवंत उदाहरण आहे. अतिरेकी विचारसरणीने परिणामांचा कोणताही विवेक न ठेवता स्वतःपेक्षा अनेक पटींनी शक्तिशाली राष्ट्रावर आत्मघातकी हल्ला केला. योग्य शिक्षण, नैतिकता आणि दूरदृष्टी असती, तर असा निर्णय घेतला गेला नसता. या अविवेकी शस्त्रप्रयोगाचा परिणाम म्हणून आज गाझा मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाला असून हजारो निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. हे सर्व प्रसंग स्पष्टपणे सिद्ध करतात की, 'शास्त्राच्या' (विवेकाच्या) मार्गदर्शनाशिवाय 'शस्त्राच्या' बळावर उभी राहिलेली शक्ती शेवटी स्वतःचाच विनाश करते.
 
 
याच तत्त्वाचा पुनरुच्चार श्रीमद्भगवद्गीतेच्या अखेरच्या श्लोकातही आढळतो:
 
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥
 
येथे श्रीकृष्ण हे ज्ञान, नीती, विवेक आणि शास्त्र यांचे प्रतीक आहेत; तर धनुर्धारी अर्जुन हा शौर्य, सामर्थ्य आणि शस्त्राचे प्रतीक आहे. जिथे या दोघांचा समन्वय असतो, तिथेच विजय, समृद्धी, सुशासन आणि शाश्वत विकास नांदतो.
 
निष्कर्ष

महाभारतापासून गीतेपर्यंत आणि गुप्तकालापासून आजच्या अमेरिका, चीन व भारतापर्यंत, इतिहास एकाच सत्याचा पुनरुच्चार करत आला आहे.  केवळ शस्त्र किंवा केवळ शास्त्र पुरेसे नाही. राष्ट्राच्या शाश्वत वैभवासाठी सामर्थ्य आणि विवेक यांचा समन्वयच आवश्यक आहे. जिथे शस्त्र शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली चालते, तिथेच खरी सुरक्षा, प्रगती आणि चिरस्थायी विजय शक्य होतो; आणि जिथे शस्त्र विवेकाच्या नियंत्रणाबाहेर जाते, तिथे तेच सामर्थ्य स्वतःच्याच विनाशाचे कारण ठरते.
 

Saturday, August 22, 2026

विक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी: सत्तेसाठी आत्मा गिरवी




विक्रमादित्याला  सत्तेचा उपयोग करून प्रजेचे दुःख, दारिद्र्य आणि अन्याय दूर करायचा होता. त्याला वाटत होते शासन हे जनतेसाठी असावं,  त्याने विचार केला राज्यलक्ष्मीची आराधना करून, तिला प्रसन्न करून, प्राप्त सत्तेचा उपयोग तो प्रजेच्या भल्यासाठी करणार होता. प्रजा  क्षणासाठी गरुडासारखी तीव्र नजर ठेवून प्रेजेला त्रास देणार्‍या भ्रष्ट मंत्री आणि i अधिकार्‍यांना दंडित करून तो गरिबांच्या आणि शेतकर्‍यांच्या हितांची रक्षा करणार होता. त्याने राज्यलक्ष्मीची आराधना केली. अखेर राज्यलक्ष्मी प्रसन्न झाली. 

एका शुभ मूहर्तावर विक्रमादित्य सिंहासनावर विराजमान होण्यासाठी  सिंहासनाच्या पायर्‍या चढू लागला. पहिल्या पायरी वर डोळ्यांवर पट्टी बांधलेली पुतळी होती, ती राजाला म्हणते , “राजाने वाईट पाहू नये.” सर्वत्र भ्रष्टाचार, अन्याय, शोषण करणारे अधिकारी आणि मंत्री दिसत असेल तरी  दुर्लक्षित करावे. त्याशिवाय तुला पुढची पायरी चढता येणार नाही. राजा ही अट मान्य करतो. 

दुसर्‍या पायरी वर कान झाकलेली पुतळी राजाला म्हणते, राजाने वाईट ऐकू नये, जनतेच्या वेदना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबीचे आक्रोशच्या कथा ऐकू नये. विक्रम कान झाकतो. राजा ही अट ही मान्य करतो. 

तिसर्‍या पायरीवर ओठांवर बोट ठेवलेली पुतळी म्हणते, “राजाने वाईट बोलू नये.” मंत्री, अधिकारी कितीही भ्रष्ट असले तरी त्यांच्यावर टीका न करता मौन राखावे. विक्रम मौन ही स्वीकारतो.  

शेवटी चौथी पुतळी प्रकट होते. ती म्हणते, “हे सर्व झाकले तरी आत्मा अस्वस्थ होतो. आत्मा अस्वस्थ झाली की  राजा सत्ता गमावतो. तुझी आत्मा मला अर्पण कर.” विक्रम पुतळीला आत्मा अर्पण करतो आणि सिंहासनावर बसतो.

सिंहासनावर बसताच विक्रमादित्याच्या मनःचक्षूंसमोर एक दिव्य दृश्य उभं राहतं, संपन्न हिरवळीत न्हालेली शेती, कष्टकरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाची झळाळी, रस्त्यांवर खेळणारी आनंदी मुले, बाजारात उत्साहाने खरेदी करणारी प्रजा, आणि सर्वत्र एक शांत, समृद्ध, आणि सुसंस्कृत समाज. राज्यात कुठेही दुःख, दारिद्र्य, किंवा अन्यायाचा लवलेशही नाही. प्रत्येक घरात हास्य, प्रत्येक मनात आशा, आणि प्रत्येक पावलात आनंद भरलेला आहे. विक्रमादित्याला वाटते, हीच ती राज्यलक्ष्मीची कृपा, जिच्या आशीर्वादाने त्याचं राज्य स्वर्गासमान झालं आहे.

आज ही जनतेचे दुख दूर करणारे आणि इमानदारीच्या बाता करणारे सत्ता मिळताच बदलून जातात. सत्ता मिळताच त्यांना जनतेचे दुख दिसत नाही. त्यावरून सुचलेली ही कथा. 

Tuesday, August 18, 2026

ईशोपनिषद आणि पर्यावरण: शाश्वत जगण्याचा वैदिक मार्ग

 
 

 
आजचे २१ वे शतक हे तंत्रज्ञान आणि भौतिक प्रगतीचे शतक मानले जाते. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर विज्ञानाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत. परंतु, या तथाकथित प्रगतीच्या अंधाधुंद धावण्यात आपण ज्या निसर्गाच्या कुशीत जन्मलो, त्यालाच ओरबाडत चाललो आहोत. हवामान बदल, जलसंकट आणि वाढते प्रदूषण यांमुळे आज मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्वच धोक्यात आले आहे. या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्याचा आणि प्रगतीसोबतच निसर्गाचे रक्षण करण्याचा जादुई मंत्र हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी उपनिषदांच्या माध्यमातून देऊन ठेवला आहे. 'ईशावास्य उपनिषद' (ईशोपनिषद) आपल्याला केवळ अध्यात्म शिकवत नाही, तर निसर्गाचा आदर करून जगण्याचा खरा 'शाश्वत मार्ग' (Sustainable Way of Life) दाखवते.
 
वैदिक विचार आणि शांतीपाठ
 
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ 
(शांतीपाठ)

ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्॥१॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे॥२॥
[ईशोपनिषद (मंत्र १ व २)]
 
'ईशोपनिषद' हे शांतीपाठाने सुरू होते. ऋषी म्हणतात की, त्या ईश्वरीय पूर्णातून हे जगद्रूपी पूर्ण निर्माण झाले तरी ते पूर्णच शेष राहिले. उपनिषदाच्या पहिल्या मंत्रात ऋषी अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात-त्यागपूर्वक उपभोग घ्या’. दुसऱ्याच्या वाट्यावर किंवा हक्कावर गदा आणू नका. परमेश्वराने प्रत्येक जीवासाठी या सृष्टीत एक वेगळा आणि निश्चित वाटा ठेवला आहे; आपल्या वाट्याला आलेल्या घटकांचा कृतज्ञतेने उपभोग घेत प्रत्येक जीवाला इथे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसऱ्या मंत्रात ऋषी पुढे म्हणतात की, अशा रीतीने निसर्गाचा आदर करत जर तुम्ही कर्म केले, तर शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरली तरीही कर्मबंधने मानवाला बांधू शकत नाहीत.
 
उपनिषदकार ऋषींना मंत्रदृष्टा का म्हणतात, हे ईशोपनिषद वाचल्यावर सहज समजते. त्यांच्यात भूत, वर्तमान आणि भविष्य पाहण्याची अलौकिक क्षमता होती. निसर्गाच्या नियमानुसार विधात्याने निर्माण केलेली ही पृथ्वी आणि त्यावरील समस्त जीवसृष्टी कधी ना कधी नष्ट होणार, हे जरी अंतिम सत्य असले, तरी भगवंताने मानवाला दिलेले आयुष्य त्याने पूर्ण आनंदाने व समाधानाने जगले पाहिजे. त्यासाठीच या मंत्रदृष्ट्या ऋषींनी या मंत्रांद्वारे आपल्याला जगण्याचा आदर्श मार्ग दाखवला आहे.
 
निसर्गाचे अनुकूल संतुलन आणि मानवी स्वार्थ
 
अग्नी, वायू, जल आणि माती या तत्त्वांपासून पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती झाली. पृथ्वीवरील आजचे वातावरण, हवा, पाणी, ऊर्जा आणि माती यांचे संतुलन मानव आणि सध्या अस्तित्वात असलेल्या समस्त प्राणीमात्रांसाठी अत्यंत अनुकूल आहे. जोपर्यंत हे वातावरण अनुकूल राहील, तोपर्यंतच मानवाचे अस्तित्व या पृथ्वीवर टिकून राहील.
 
परंतु, आजचा माणूस स्वतःला बुद्धिमान आणि काही वेळा निसर्गापेक्षाही श्रेष्ठ समजू लागला आहे. आपल्या अवाजवी स्वार्थासाठी वातावरणात अनैसर्गिक बदल करण्याची घातक क्षमता मानवाने आज मिळवली आहे. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या सुखासाठी इतर मूक प्राण्यांना नामशेष करण्याचा हट्टच जणू माणसाने धरला आहे. स्वार्थापायी आंधळ्या झालेल्या मानवाला हे समजत नाहीये की, जर पृथ्वीवरील इतर जीवन नष्ट झाले, तर मानवजातही टिकणार नाही. निसर्गाचा हा समतोल बिघडल्यास आपल्याच कर्माचे भयानक परिणाम मानवाला भोगावे लागतील. मग या जगात माणसाने आपले आयुष्य कसे जगावे, जेणेकरून मानवजात आपले अस्तित्व टिकवून आपली शंभर वर्षे जगण्याची इच्छा पूर्ण करू शकेल? याचे अप्रतिम मार्गदर्शन ऋषींनी केले आहे.
 
निर्मिती’ विरुद्ध ‘उत्पादन’ आणि त्यागाचा सिद्धांत
 
अन्न, वस्त्र आणि निवारा’ (रोटी, कपडा और मकान) या आपल्या तीन मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वस्तूंची ‘निर्मिती’ करतो आणि त्यांचा ‘उपभोग’ घेतो. आज आपण निसर्गाचा कोणताही विचार न करता, केवळ मानवी फायद्यासाठी कच्च्या मालापासून नवीन वस्तू बनवतो (उदा. प्लास्टिक, रासायनिक पदार्थ). आपण यालाच निर्मिती किंवा उत्पादन समजतो. परंतु, ऋषी खऱ्या उत्पादनाचा” (True Production) अर्थ सांगताना म्हणतात, खरे उत्पादन तेच आहे जे ‘शाश्वत’ (Sustainable) असते, ज्याच्यामुळे निसर्गाचे चक्र तुटत नाही आणि पर्यावरणाची झालेली हानी भरून काढली जाते; अर्थात ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत नाही.
 
आता मनात प्रश्न निर्माण होणारच की, निसर्गाचे संतुलन न बिघडवता कोणत्याही वस्तूची निर्मिती करणे माणसाला कसे शक्य आहे? कारण मानवी निर्मितीमुळे वातावरणात काही ना काही बदल हा होतोच. ऋषी याच प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात, आपण जे काही उपभोगतो, “त्याचा त्याग करा.” याचा अर्थ असा की, आपण निसर्गाकडून जे काही घेतो, त्याचा योग्य प्रमाणात त्याग करणे गरजेचे आहे. म्हणजेच, निसर्गाकडून जे घेतले, ते दुसऱ्या स्वरूपात निसर्गाला परत दिले पाहिजे.  हे कसे शक्य आहे, हे समजून घेण्यासाठी आपण निसर्गातीलच काही उदाहरणे पाहूया:

  • झाडे आणि वनस्पती: जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात, परंतु बदल्यात आपली पिकलेली पाने जमिनीवर गाळून मातीला पुन्हा सुपीक (खत) करतात. तसेच ती वातावरणाला प्राणवायू (ऑक्सिजन) देतात आणि पावसाचे पाणी जमिनीत साठवण्यास मदत करतात.
  • प्राणी: जनावरे निसर्गातील चारा खातात आणि विष्ठेच्या (शेणाच्या) स्वरूपात उत्कृष्ट सेंद्रिय खत जमिनीला पुन्हा परत करतात. यामुळे निसर्गाचे चक्र आणि संतुलन अविरत कायम राहते.
 
मानवाचे निसर्गविरोधी वर्तन आणि त्याचे दुष्परिणाम
 
याउलट आपण काय करतो? आपण जेवढी प्रगती करत आहोत, तेवढे निसर्गचक्र अधिक असंतुलित करत आहोत आणि त्याचे गंभीर परिणामही भोगत आहोत. हे चक्र जर असेच सुरू राहिले, तर पृथ्वीवरील मानवजात एक दिवस नष्ट होईल आणि विधात्याने दिलेले १०० वर्षांचे आयुष्य आपण जगू शकणार नाही. आपल्या वाढत्या गरजांमुळे आपण खालील प्रमुख घटकांमध्ये असंतुलन निर्माण केले आहे:

१. लाकडाचा अनिर्बंध वापर आणि जंगलतोड: झाडे वातावरणातील दूषित वायू शोषून घेऊन हवा शुद्ध करतात आणि हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढवतात. मानव आपल्या वाढत्या गरजांसाठी (जळण, फर्निचर, इमारती) मोठ्या प्रमाणावर लाकूड वापरतो. याशिवाय, देशाच्या विकासासाठी रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि विविध पायाभूत उद्योग उभे करताना मोठ्या प्रमाणावर जुनी व घटstandard झाडे कापली जात आहेत.

शासनाचे प्रयत्न (One for Ten Tree Plantation): विकासाच्या या प्रक्रियेत पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी सरकारने एका झाडाऐवजी दहा झाडे लावणे’ ही महत्त्वपूर्ण आणि बंधनकारक योजना सुरू केली आहे. यामुळे तोडलेल्या झाडांची नुकसानभरपाई तर होत आहेच, शिवाय लोकांमध्येही वृक्षारोपणाची जाणीव वाढली आहे.

सामाजिक पुढाकार: उदाहरणार्थ, आचार्य बाळकृष्ण आपला वाढदिवस 'जडी-बुटी दिवस' म्हणून साजरा करतात आणि त्यांचे अनुयायी त्या आठवड्यात लाखो औषधी वृक्ष आणि वनस्पतींची लागवड करतात. अश्याच सामान्य लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारताचे हरित क्षेत्र (Green Cover) १८ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा एक आदर्श मेळ देशात साधला जात आहे.
 
२. वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील संकट: पृथ्वीच्या पोटातून कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ काढून मानव वातावरणात विषारी वायू उधळत आहे. या दूषित वायूचे परिणाम आज आपण आजारांच्या रूपाने भोगत आहोत. वायू प्रदूषण ही आजच्या काळातील एक अत्यंत गंभीर समस्या बनली असून, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या आजारांमुळे (जसे की श्वसनसंस्थेचे रोग, हृदयरोग, निमोनिया आणि फुफ्फुसांचे आजार) भारतात दरवर्षी किमान १८ लाख लोकांचा मृत्यू होतो; आणि दुर्दैवाने ही संख्या दरवर्षी वाढतच जाणार आहे. झाडे काही प्रमाणात हवेचे प्रदूषण दूर करू शकतात, पण जर आपल्याला निसर्गाची ही हानी पूर्णपणे भरून काढणे शक्य नसेल, तर या विनाशकारी जीवाश्म इंधनांचा (Fossil Fuels) वापर आपण कमी केला पाहिजे.  यासाठी भारत सरकारने उचललेली पाऊले:
 
अपारंपरिक ऊर्जेची क्रांती: भारत सरकार या बाबतीत सकारात्मक पावले टाकत आहे. गेल्या १० वर्षांत भारताने सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून, ऋषींनी सांगितलेल्या 'निसर्गाला धक्का न लावता केलेल्या आदर्श उत्पादनाचे' हे उत्तम उदाहरण आहे. या काळात देशातील सौर ऊर्जेचे उत्पादन तब्बल १५ पटीने वाढून १०० गिगावॉट (GW) पर्यंत पोहोचले आहे, तर पवन ऊर्जाही २६ गिगावॉटवरून ४६ गिगावॉट झाली आहे. शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आता गावागावांमध्ये हर घर सौर घर’ योजना प्रभावीपणे राबवली जात आहे, ज्यामुळे ग्रामीण भाग ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे.

इतर गैर-पारंपरिक स्रोत: सौर आणि पवन ऊर्जेव्यतिरिक्त जलविद्युत ऊर्जा, जैवभार ऊर्जा (Biomass), बायोगॅस, भू-औष्णिक ऊर्जा (Geothermal), सागरी लाटांची ऊर्जा (Tidal) आणि 'ग्रीन हायड्रोजन' यांसारख्या प्रदूषणमुक्त मार्गांचा वापर वाढवला जात आहे. यामुळे निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता ऊर्जा मिळवणे शक्य होत आहे, परंतु ही फक्त सुरुवात असून अजून मोठा टप्पा गाठायचा आहे.
 
३. पाण्याचे प्रदूषण आणि जलसंकट: विहिरी किंवा बोअरवेलद्वारे जमिनीखालचे पाणी उपसणे म्हणजे 'उपभोग' आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरवून ते पुन्हा पृथ्वीला देणे म्हणजे 'त्याग'. पाण्याच्या शाश्वत उपयोगासाठी हे संतुलन साध्य करणे गरजेचे होते, पण ते बिघडल्यामुळे आज मोठे जलसंकट उभे राहिले आहे.

शेतीमधील अति-वापर: शेतीमध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी आपण गहू, तांदूळ आणि ऊस यांसारखी नगदी पिके (Cash Crops) घेण्यावर भर देत आहोत, ज्यांना अफाट पाणी लागते. रासायनिक खते, कीटकनाशके आणि जिवाणूनाशके यांच्या अतिवापरामुळे जमिनीखालील पाणी आणि नद्यांचे स्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. नद्यांचे पाणी पिण्यालायक सोडा, आता अंघोळीसाठीही योग्य राहिलेले नाही.

शहरी जीवनशैलीतील अपव्यय: शहरांमधील आधुनिक घरांमध्ये पाण्याचा अपव्यय कमालीचा वाढला आहे. बाथटब, कुलर, पाश्चात्य पद्धतीची स्वच्छतागृहे आणि रोज तीन-तीन वेळा कपडे धुण्याची सवय यांमुळे पाण्याचा वापर प्रमाणाबाहेर वाढला आहे. रासायनिक साबण आणि कारखान्यांतून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे जलवाहिन्या मृत होत आहेत.

परिणाम: या दुहेरी मार्यामुळे भूजल पातळी (Groundwater Level) प्रचंड खाली गेली असून, अनेक ठिकाणी ३०० फुटांपेक्षाही जास्त खोल बोअरवेल खणाव्या लागत आहेत. या अति-उपशामुळे शेतजमिनीचा पोतही बिघडत चालला आहे. जर हीच परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर पंजाबसारखी देशातील अत्यंत सुपीक जमीनही येत्या काही वर्षांत वाळवंट बनण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल.

जलसंकटावर आवश्यक उपाययोजना
 
ऋषींच्या "निसर्गाकडून जे घेतले, ते परत दिले पाहिजे" या नियमानुसार, खालील उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे:

1.  शेती क्षेत्रातील सुधारणा (Agricultural Reforms): ऊस आणि गव्हासारख्या पिकांना मोकळे पाणी देण्याऐवजी ठिबक आणि तुषार सिंचन वापरणे बंधनकारक केले पाहिजे, ज्यामुळे ५०% पाण्याची बचत होते. तसेच, टंचाईच्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्ये, तेलबिया किंवा भरडधान्ये (ज्वारी, बाजरी) घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.

2.  सेंद्रिय शेतीला प्राधान्य: रासायनिक खतांना पर्याय म्हणून शेतीत शेणखत, कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय (ऑर्गेनिक) खतांचा व जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता टिकून राहते.

3.  पाण्याचे ऑडिट आणि जलसंधारण: प्रत्येक गावात 'Water Audit' करून पिके ठरवली पाहिजेत. तसेच पावसाचे पाणी अडवण्यासाठी 'जलयुक्त शिवार' सारख्या योजना आणि ग्रामीण भागात सांडपाण्यासाठी 'शोष खड्डे' (Soak Pits) मोठ्या प्रमाणावर तयार केले पाहिजेत.

4.  शहरी भागातील कायदेशीर उपाय: शहरांमधील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेसाठी (Housing Society) सांडपाण्याचा पुनर्वापर (Mandatory Water Recycling) आणि इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे (Rainwater Harvesting) कायद्याने सक्तीचे केले पाहिजे. उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचा पुनर्वापर (त्याग) केला नाही, तर येणारी पिढी पाण्यासाठी तडपडेल.
 
वन्यजीव संवर्धन आणि मानवी सहअस्तित्व: 

ऋषी म्हणतात की, या सृष्टीतील प्रत्येक जीवाला जगण्याचा समान अधिकार आहे, कारण पृथ्वीवरील सर्वच जीव अन्नसाखळीसाठी आणि अस्तित्वासाठी एकमेकांवर निर्भर आहेत. ही साखळी तुटली तर माणूसही शंभर वर्षे जिवंत राहू शकणार नाही.
 
वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिकीकरणामुळे जंगले नष्ट झाल्याने वन्यजीव धोक्यात आले आहेत. यावर उपाय म्हणून भारताने वन्यजीव संवर्धनासाठी मोठे प्रयत्न केले आहेत, ज्याच्या परिणामी आज देशातील अभयारण्यांची संख्या ५६० च्या पार गेली आहे. ‘प्रकल्प वाघ’ (Project Tiger) आणि ‘प्रकल्प हत्ती’ यांसारख्या मोहिमांसोबतच, मानवी वस्ती आणि जंगलांमधील संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर विशेष इको-ब्रिज’ (Eco-Bridges) आणि प्राण्यांसाठी भुयारी मार्ग (Underpasses) तयार केले आहेत; ज्यामुळे वन्यजीव कोणत्याही अपघाताशिवाय जंगलात सुरक्षितपणे वावरू शकत आहेत. याशिवाय, वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना सरकारतर्फे तातडीने मोठी आर्थिक मदत (नुकसानभरपाई) दिली जाते. तसेच, वन्यप्राण्यांमुळे शेतातील पिकांचे किंवा पाळीव जनावरांचे नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून मानवी व वन्यजीव सहअस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
'ईशावास्य उपनिषद' आणि निसर्गाचा नियम आपल्याला एकाच सूत्रात बांधतो—"जे काही आपण पर्यावरणातून घेतो, ते आपल्याला त्याच किंवा अधिक चांगल्या स्वरूपात निसर्गाला परत करता आले पाहिजे." निसर्गाची झालेली हानी भरून काढणे (त्याग करणे) जर आपल्याला शक्य नसेल, तर निसर्गाच्या संसाधनांचा अनिर्बंध उपभोग घेण्याचा मोह आपण तातडीने टाळला पाहिजे. ज्या घटकांची भरपाई मानवाला करणे शक्य आहे, त्यांचाच उपभोग घ्यावा. ऋषींनी सांगितलेला त्यागसहित भोग’ हाच खऱ्या अर्थाने सृष्टीचा “सर्वोत्तम उपभोग” आहे. निसर्गाकडून घेतलेले कर्ज जेव्हा आपण वृक्षारोपण, जलपुनर्भरण आणि प्रदूषणमुक्तीच्या माध्यमातून परत करू, तेव्हाच सृष्टीचे संतुलन कायम राहील. अशा प्रकारे निसर्गाशी ताळमेळ ठेवून जगल्यास, आपण आणि आपली येणारी पिढी निश्चितपणे समृद्ध आयुष्य जगून विधात्याने दिलेली ‘शंभरी’ गाठू शकेल.