Monday, September 4, 2023

वार्तालाप (२९): बिना हिशोबाचा व्यापार


लिहणें न येंता व्यापार केला. 
कांही एक दिवस चालिला.
पुसतां सुरनीस भेटला.
तेव्हां खोटे.

समर्थ रामदास म्हणतात व्यवसाय करताना त्याचा लिखित हिशोब ठेवला नाही तर व्यवसाय फक्त काही दिवस चालेल. जेंव्हा सुरनीस (हिशोब तपासनीस) हिशोब तपासायला येईल तेंव्हा व्यवसाय तोट्यात चालला आहे, हे कळेल. ही ओवी वाचल्यावर आपल्याला हेही कळते त्याकाळी ही समर्थांना व्यवसायांची आर्थिक हिशोब लिखित ठेवण्याचे महत्त्वही माहीत होते.

सरकार असो किंवा मोठे व्यवसाय हिशोब तपासणी ठेवतातच, त्या शिवाय त्यांना गत्यंतर नाही. पगारदार आणि छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना ही स्वतः हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला सर्व जमा-खर्च लक्षात राहतो या मानसिकतेतून मुक्त होणे गरजेचे आहे.  एखाद्याने गल्ली-बोळ्यात जरी दुकान उघडले तरी त्याला किमान ५० ते  १०० वस्तू  विकायला ठेवावी लागतात. जर दुकानदार प्रत्येक वस्तूचा खरीद- विक्रीचा हिशोब ठेवणार नाही तर किती माल दुकानात भरायचा आहे हे  कळणार नाही. दुकानातील कर्मचारी/ ग्राहकांनी चोरी केली तरी कळणार नाही. काही वस्तू दुकानात एकत्र होत राहतील आणि त्यांची एक्सपायरी डेट निघून जाईल. हिशोब न ठेवण्याने खर्चावर नियंत्रण राहणार नाही. व्यवसायातील नफा-तोटा करणार नाही. घर खर्चासाठी किती पैसा दुकानातून घ्यायचा हेही कळणार नाही. गल्ली-बोळ्यात नवीन उघडलेली किमान अर्धी दुकाने वर्षाच्या आत बंद होतात त्याचे मुख्य कारण लिखित हिशोब न ठेवणे आहे. 

पगारी नोकरदारालाही खर्चाचा हिशोब ठेवावा लागतो. त्यानुसार महिन्याचे बजेट बनवावे लागते. तो तसे करणार नाही तर महिना पूर्ण होण्या आधीच पगार संपून जाईल. दुकानदाराची उधारी करावी लागेल. मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागतील. मित्रांनी मना केल्यावर सावकार कडून व्याजावर पैसे उसने घ्यावे लागतील. क्रेडिट कार्डचा हिशोब चुकता करणे अशक्य होईल आणि पठाणी व्याज द्यावे लागेल. महिना दर महिना हे कर्ज वाढतच जाईल.  त्याला कर्जातून बाहेर पडणे शक्य होणार नाही आणि शेवटी त्याला घरदार ही विकावे लागेल.
 
आजच्या ऑनलाईन आणि क्रेडिट खरिदीच्या जमान्यात जमा-खर्चाचा लिखित हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण तसे नाही केले तर दोन-चार महिन्यातच तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अटकणार, हे निश्चित. असो.


Tuesday, August 29, 2023

वार्तालाप (२८): घांसा मागे घांस घातला, पुढें कैसें


घांसा मागे घांस घातला.
अवकाश नाही चावायला.
अवघा बोकणा भरिला. 
पुढें  कैसें. 


समर्थ म्हणतात तोंडामध्ये एका मागून एक बोकणा वाघ मागे लागल्यासारखा आपण भरत राहिलो तर आपले काय होणार. समर्थांना आरोग्य शास्त्राचे उत्तम ज्ञान होते, हे या ओवी वरून सिद्ध होते. समर्थांनी या ओवीत शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी जेवण कसे करावे हे सांगितले आहे. 

जेवणाचा मुख्य उद्देश्य शरीराला उत्तम पोषण मिळाले पाहिजे. आपले शरीर स्वस्थ्य असेल तरच आपण आपले सांसारिक आणि अध्यात्मिक उद्दिष्ट सिद्ध करू शकतो. म्हंटलेच आहे "शरीर मध्यम खलु धर्म साधनं". 

आपल्या परंपरागत वैद्यकीय शास्त्रात म्हंटले आहे, माणसाने तोंडातील अन्नाच्या घासाला किमान 32 वेळा दांतानी चर्वण केले पाहिजे. जेवढे जास्त आपण अन्नाला चावतो, अन्नाचे तेवढे लहान तुकडे होतात आणि तेवढी जास्त लार अन्नात मिसळते. पोटात अन्नाचे पचन उत्तमरीत्या होते. अन्नात असलेले सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात. याशिवाय दातांचा उत्तम व्यायाम ही होतो. दात ही मजबूत राहतात. पण आजच्या धगधगीच्या युगात अधिकांश लोक भूक शमविण्यासाठी भरभर जेवतात. अन्नाचे छोटे तुकडे होत नाही. आपल्या पचन संस्थेला हे जेवण पचविता येत नाही. बिना चावता लवकर लवकर अन्न गिळले तर पोटात अन्नाचे पचन होणार नाहीच आणि पोषक तत्व ही शरीराला मिळणार नाही. परिणाम आज देशातील अधिकांश जनता पोटाच्या विकारांनी  ग्रस्त आहे. 

आयुर्वेदाच्या मते पोट हे अधिकांश रोगांचे मूळ कारण आहे. अन्न न पचल्यामुळे पोटाची जळजळ होते, पोटात गॅस होते, पोटावर सूज येते, वजन वाढते, आंतड्यात अनेक रोग उत्पन्न होतात, नेहमी पोट दुखत राहते इत्यादी. माणूस चिडचिड  करू लागतो, कामात लक्ष लागत नाही. अधिकांश वात रोगांचा, सर्व प्रकारच्या दुखण्यांचा  पोटाशी थेट संबंध आहे. पोटाकडे सतत दुर्लक्ष केले तर  हृदयरोग, मधुमेह, केंसर इत्यादी होण्याचीही शक्यता वाढते. असो. 

ही ओवी वाचून आपण शांतपणे बसून अन्न चावून चावून जेवायला सुरुवात केली तरच ओवी वाचणे सार्थकी लागेल. असो. 




Sunday, August 27, 2023

दोन लघुकथा: चांदसा मुखडा आणि गगनचुंबी इमारत

शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.  चंद्रमाचा फोटो पाहून मुलाने कपाळावर हात मारला आणि तेंव्हापासून तो एकच गाणे  गुणगुणत राहतो. चाँद सी बायको हो मेरी ऐसा मैंने क्यों सोचा था.

आजोबांनी एका प्लॉटवर एक चंद्रमौळी झोपडी बांधली. आजोबांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर त्याच्या नातवाने तिथेच एक उंच गगनचुंबी इमारत बांधली. नातू खुश झाला. आपण ही गगनचुंबी इमारत कशी बांधली सर्वांना सांगू लागला. पण  त्या इमारतीची प्रशंसा करत नातेवाईकांनी त्याला म्हंटले या गगनचुंबी इमारतीचे श्रेय  तुला नाही फक्त तुझ्या आजोबांना आहे. 

Sunday, August 20, 2023

वार्तालाप (२७): नेणतां वैरी जिंकती

नेणतां वैरी जिंकती. 
नेणतां अपाई पडती.
नेणतां संहारती घडती.
जीवनाश.

समर्थ म्हणतात नेणतेपणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो.  

या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो. 

समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे. एका राजनेत्याला प्रजा सुखी आहे की नाही, प्रजेच्या गरजा किती, सरकारी अधिकारी त्यांच्या कर्तव्यांचे पालन करत आहेत की नाही, इत्यादी जाणण्याची गरज असते. ते जाणूनच राजा प्रजेच्या हितासाठी पाऊले उचलतो. या शिवाय राजाला त्याचे आंतरिक आणि बाह्य शत्रू किती, शत्रूंची शक्ती किती, त्यांचे मनसुबे काय, त्यांच्या हालचाली काय, इत्यादींवर लक्ष ठेवावे लागते. जो राजा शत्रूचे मनसुबे जाणण्याच्या प्रयत्नात कसूर करतो त्याचा पराभव होतो. त्याची सत्ता जाते आणि कधी- कधी जीव ही जातो. हे सर्व जाणण्यासाठी राजा गुप्तचर ठेवतो. जे त्याला सर्व माहिती पुरवितात. ज्या राजा जवळ सक्षम गुप्तहेर यंत्रणा असते त्याचा पराभव होणे शक्य नाही. छत्रपति शिवाजी महाराजांपाशी सक्षम गुप्तहेर यंत्रणा होती. ती प्रत्येक मोहिमे पूर्वी शत्रूचे बल, त्याच्या हालचाली, त्याचे दुर्बळ पक्ष इत्यादींची अचूक माहिती पुरवायची. या माहिती आधारावर राजे रणनीती निर्धारित करत होतो. त्यामुळेच राजे अफझल खानाचा वध करू शकले, शाहिस्ता खानाचे बोटे कापू शकले आणि आग्र्याहून सकुशल स्वराज्यात परत येऊ शकले. 

दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी, चीन ने 1950 मध्ये तिब्बत गिळंकृत केला, तरी ही ते हिंदी चिनी भाई-भाईच्या दिवास्वप्नात मग्न राहिले. चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्नच केला नाही. परिणाम 1962 मध्ये आपला दारुण पराभव झाला. त्यांनी चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्न केला असता तर 1950 ते 1962 हा १२ वर्षांचा कालावधी चीन सोबत असलेल्या सीमेला सुरक्षित करण्यासाठी पर्यात होता. आपला पराजय झाला नसता.

राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी  नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. 
 

Tuesday, August 15, 2023

वार्तालाप (26): दुराशेच्या धार्मिक पोथी.


श्रवणी लोभ उपजेल तेथे 
विवेक केंचा असेल तेथे.
बैसली दुराशेची भुते 
तया अधोगती.

समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य  इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः.

आज समाजात प्रचलित धार्मिक कथेंचे दोन भाग असतात. एक वास्तविक कथा आणि दुसरी स्वार्थासाठी त्यात केलेली भेसळ. यासाठी कथा अधिकारी  व्यक्तीकडून श्रवण करण्याची गरज असते. नंतर कथा समजल्यावर कथेत सांगितलेल्या मार्गावर चालणे. पण हा मार्ग कठीण असतो. दुसरा सौपा मार्ग म्हणजे स्वार्थासाठी पोथीत केलेल्या भेसळ अनुसार कृती करणे अर्थात पोथीत सांगितले आहे, उपवास, दान दक्षिणा इत्यादी केल्याने सांसारिक फळे मिळतात. हा मंत्र जपा, परीक्षेत उत्तम गुण मिळतील. अभ्यास सोडून मंत्र जप केला तर परिणाम काय होईल हे सांगण्याची गरज नाही. मग आपण कथेला दोष देतो. आता साहजिक आहे, इच्छित फळे मिळाली नाही तर मनातील दुराशाही वाढणार आणि प्रपंचात असफलता ही मिळणार.

धार्मिक कथा आपल्याला काय सांगत आहे हेच कळत नाही आणि त्यामुळे चुकीचा अर्थ लावून आपण फक्त विधी विधानात रमून जातो आणि इच्छित फळे नाही मिळाली तर मनात नैराश्य येते. आपण पोथीला दोष देतो. सत्यनारायणाच्या कथें पैकी एका कथेचे उदाहरण.  साधूवाणी हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे.  हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. त्याला कैद हि भोगावी लागली आणि व्यापारात मोठे नुकसान झाले. आजकाल ही अनैतिक रीतीने धन अर्जित करणाऱ्यांचे लाखो कोटी सरकारने जब्त करते. काहींना कारावास ही भोगावा लागतो. कथेच्या अखेर साधुवाणीला सत्य धर्माच्या मार्गावर चालून व्यापार करण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो. सत्यनारायण कथा श्रवण करून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून सांसारिक कर्तव्य पूर्ण केले तर घरात सुख-समृद्धी आपसूक येते आणि आध्यात्माच्या मार्गावर वाटचाल ही सहज सुरू होते. यासाठीच नवीन संसार सुरू करताना सत्यनारायण कथा श्रवण करण्याची प्रथा आपल्या समाजात आहे.

शेवटी ज्या पोथ्या फक्त देवी चमत्काराने भरलेल्या आहेत,  श्रवण करणाऱ्याला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देत नाही. त्या श्रवण करणे आणि त्यानुसार वागल्याने फक्त दुराशाच नशिबी येणार.