Tuesday, January 21, 2025

हिवाळ्यातील मौज: टोमॅटो मिक्स सूप

हिवाळ्यात गर्मागरम सूप पिण्याचा आनंद काही औरच असतो. एक तर हिवाळ्यात टोमॅटो स्वस्त असतात आणि खिश्याला परवडतात. अनेकांची तक्रार असते घरी बाजार सारखे  टोमॅटो सूप बनत नाही. सूप पातळ बनते. सूप घट्ट करण्यासाठी त्यात मैदा इत्यादि पदार्थ मिळविणे केंव्हाही उचित नाही. या शिवाय बाजारात लाल भडक टोमॅटो मिळत ही नाही. देसी टोमॅटो आंबट असतात, ते जास्त टाकले तर सूप ही आंबट बनणार. त्यात साखर घालणे ही योग्य नाही. आता एक स्वास्थ्यवर्धक स्वादिष्ट सूप बाजार सारखे घरी कसे करायचे. सौ. घरात टोमॅटो बनविते. तिने यावर सौपा उपाय शोधला. यासाठी ती टोमॅटो, गाजर आणि बिट्स रूट (हिंदीत चुकुंदर) वापरते. गाजर गोड स्वाद देते आणि बिट्स रूट लाल भडक रंग देते. दोन्ही टाकल्याने सूप किती घट्ट करायचे आपण स्वत: ठरवू शकतो. आता तर मी ही सूप बनविण्यात एक्स्पर्ट झालो आहे. चार ते सहा लोकांसाठी सूपची विधी:  पाच ते सहा सामान्य आकाराचे टोमॅटो (टोमॅटो जास्त आंबट असतील तर कमी ही चालतील), एक गाजर आणि एक लहान आकाराचे बिट्स रूट (मोठे असेल तर अर्धे). या शिवाय एक हिरवी मिरची (नाही टाकली तरी चालेल). टोमॅटो, गाजर, बिट्स रूटचे छोटे तुकडे करून आणि साबूत मिरची कुकर मध्ये टाकून थोडे पाणी घालून उकळून घ्यायचे. (कोथिंबीरीच्या काड्या ही टाकू शकतात त्या ही स्वाद वाढवितात).  गॅस वर दोन शिट्या पुरे. त्यानंतर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घ्यायचे. सूप एका भांड्यात काढून आता तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे त्यानुसार त्यात पाणी मिसळायचे. स्वादासाठी, जिरे, मिरपूड, आणि मीठ घालून चार- पाच  मिनिटे उकळून घ्यायचे. सूप बाउल किंवा कपात  सर्व करताना, एक चमचा क्रीम किंवा ताजे लोणी. ते ही घरात नसेल तर दुधावरची साय ही टाकता येते. इथे चित्रात दुधावरची साय टाकली आहे. स्वाद अप्रतिम लागतो. आवडत असेल तर कोथिंबिर ही सूप वर टाकाता येते. 


हिवाळ्यात पालकचे सूप ही छान लागते. पालक सूप बनविताना त्यात एखाद टोमॅटो  घातला की ते ही स्वादिष्ट लागते आणि लहान मुले ही  पिताना नखरे करत नाही. भाज्यांच्या मिक्स सूप मध्ये ही टोमॅटो आणि बिट्स रूट घातले की ते ही स्वादिष्ट बनते. 





Saturday, January 18, 2025

दिल्ली विधानसभा निवडणूकीची तैयारी : निष्पक्ष विश्लेषण

दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार.  दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

कांग्रेस दिल्लीत पंधरावर्ष सत्तेत होती. अल्पसंख्यक, दलित आणि पूर्वांचली  हा कांग्रेसचा वोट बँक होता. आज ही दिल्लीत 8-10 टक्के निष्ठावंत मतदाता कांग्रेसपाशी आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ही अल्पसंख्यक समुदाय  भाजपा विरोधातात असलेल्या प्रमुख पक्षाला एक गठ्ठा मतदान करतात.  अल्पसंख्यक मतदार तेलंगना प्रमाणे कांग्रेसकडे वळविण्यात कांग्रेस नेतृत्व यशस्वी झाले असते तर आप पार्टीचे अस्तित्व बर्‍यापैकी संपविण्यास कांग्रेस यशस्वी झाली असती.  पण तसा काही प्रयत्न काँग्रेसने गेल्या सहा महिन्यात केला नाही. या वेळी ही जास्तीस्जास्त 5 ते 10 जागांवर कांग्रेस लढताना दिसेल. बाकी जागांवर भाजपाची मते कापण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक यामुळेच माननीय केजरीवाल एका भाषणात म्हणाले दिल्ली निवडणूकीच्या काळात ते माननीय राहुल गांधींची निंदा करणार नाही.

आप पार्टीला दिल्लीत अल्पसंख्यक समुदायाचे समर्थन आहे. दुसर्‍या शब्दांत  मतदानपूर्वीच +10 मतांची लीड त्यांच्या पाशी आहे. दिल्लीत डीटीसी बसेस मध्ये महिलाना तिकीट घ्यायची गरज नाही. रोज किमान दहा ते पंधरा लाख महिला डीटीसी बसेस मधून प्रवास करतात. या शिवाय वीज, पाणी अनेक फ्री बी आहेत. एका वर एक बाटली फ्रीचा लाभ आप पक्षाला मिळणार. या शिवाय निवडणूकीची तैयारी कशी केली जाते हे आप पार्टी कडून शिकण्यासारखे आहे. विधानसभा निवडणूकीसाठी डिसेंबर महिन्यात आपने आपले उमेदवार जाहिर करून टाकले होते. पण अधिकान्श जागांवर तीन  महीने आधीच अनौपचारिक रीतीने उमेदवार निश्चित झाले होते. त्यांनी प्रचार ही सुरू केला, विशेषकरून ज्या भागांत लोकसभेत आपला कमी मते मिळाली होती. निवडणूकीच्या घोषणे पूर्वी केलेली कामे आचार संहितेत येत नाही. याचा लाभ आप पक्षाने पूर्णपणे घेतला. त्यात काहीही गैर नाही.  बाकी आमच्या उत्तम नगर भागातील निवर्तमान विधायक बल्यान पुण्यकर्म करून तिहाड तीर्थ क्षेत्री विश्राम करत असल्याने त्यांच्या श्रीमतीला तिकीट मिळाले आहे आणि तिचा प्रचार जोरदार सुरू आहे.   

भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. सध्या तरी तीच परिस्थिति दिसत आहे. लोकसभा निवडणूकी नंतर एक भाजप कार्यकर्ता मला म्हणाला होता. जर भाजपने मुख्यमंत्री चेहरा देऊन दोन महीने आधी उमेदवार घोषित केले तर भाजप विधानसभा निवडणूक जिंकू शकते. पक्षाचा उमेदवारला विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागातील प्रधानांना, छूटभैये नेत्यांना पक्षाशी पुन्हा जोडायचे असेल तर एवढा वेळ पाहिजे. पण भाजप ने मुख्यमंत्रीचा चेहरा ही दिला नाही आणि नॉमिनेशन सुरू झाले तरीही भाजपचे सर्व  उमेदवार निश्चित झाले नाही. अनेकांना वाटते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा दिल्ली जिंकण्याची नाही. बहुतेक विधानसभेत आप आणि लोकसभेत भाजपा हे समीकरण भाजप शीर्ष नेतृत्वाला जास्त योग्य वाटते. भाजप विधानसभा जिंकली तर कांग्रेस दिल्लीत पुन्हा प्रबळ होईल. लोकसभेत कांग्रेस पक्षाच्या जागा वाढू शकतात. भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल. भाजप नेतृत्वाला नाही. 

बाकी आपल्या देशात भ्रष्टाचार, विकास, शिक्षण, स्वास्थ्य, शांति व्यवस्था  इत्यादि मुद्दे कधीच निवडणूकीचे विषय रहात नाही.  माननीय गडकरींच्या शब्दांत जर जनतेने काम पाहून मत दिले असते तर त्यांना  400 जागा निश्चित मिळाल्या असत्या. 


Wednesday, January 15, 2025

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो.  लोकसभा निवडणूकीच्या वेळी  दोन्ही पक्षांचे  बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत: 

सचिन मला म्हणाला, विवेकजी, निवडणूक आयोगाने निवडणूक घोषित केली. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी बूथ प्रबंधकांची नियुक्ती करण्यासाठी दोन-तीन मीटिंग्स घेतल्या. गेल्या विधानसभा निवडणूकीत त्याच्या बूथ वर 50 टक्के पेक्षा थोडे जास्त मतदान झाले होते. यावेळी पक्षाने मला बूथ व्यवस्थापक नियुक्त केले. मी आपल्या बूथ वर 60 टक्के पेक्षा जास्त मतदान होईल याचे आश्वासन दिले आहे. सचिन या एका महिन्यात अनेक वेळा मीटिंग्ससाठी पक्ष कार्यालयात किंवा पक्ष नेत्यांचा कार्यालयात गेला. त्याचा पेट्रोलचा खर्च ही झाला असेलच. या शिवाय तिथे त्याला चहा पाणी आणि लंच/ डिनर  ही मिळाले असेलच. 

पक्षाचे अस्थायी स्थानीय कार्यालय हे बूथ व्यवस्थापनाचे पहिले पाऊल आहे. बहुतेक जवळपासच्या तीन ते चार मतदान केंद्रांची व्यवस्था पाहण्यासाठी एक अस्थायी स्थानीय कार्यालय स्थापित केले जाते. पक्ष कार्यालयात खुर्ची, टेबल, स्टेशनरी इत्यादींची व्यवस्था करावी लागते. पक्षांचे प्रचार साहित्य वाटण्यासाठी इथे ठेवावे लागते. या शिवाय एक किंवा दोन व्यक्ति पगारी कर्मचारी ही ठेवावे लागतात. कार्यालयाचे भाडे दहा ते वीस हजार, पगारचे ही 10 ते 20 हजार होतात. या शिवाय रोज 50 ते 100 कप चहा, समोसा किंवा वडा पाव  इत्यादि.  या सर्वांवर 10 ते वीस हजार खर्च होत असेल. एका मतदान केंद्रात 1000 मतदाता असतील तर प्रति मतदार 10 ते 20  रुपये पक्ष कार्यालयाचा खर्च येणार. मुंबई सारख्या शहरात याहून जास्त असू शकतो. 

मतदान यादी तपासण्यासाठी सचिन तीन दिवस त्याच्या भागात चार-पाच  कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरला. प्रत्येक घरात जाऊन यादी तपासली. 40 ते 50 बोगस नावे त्याने यादीतून रद्द करवून घेतली. दहा- बारा लोकांचे नाव यादीत टाकले. या शिवाय त्याचे दोन दिवस प्रचार साहित्य वाटण्यात गेले. अर्थात पाच कार्यकर्त्यांनी पाच दिवस काम केले. एका माणसाचे एका दिवसाचे 500 रुपये धरले तरी दहा ते 15 हजार रुपये  खर्च  झालाच असेल. अर्थात प्रति मतदार खर्च 10 ते 15 रुपये. सचिन ने घेतलेल्या मेहनती मुळे सचिनच्या मतदान केंद्रावर 65 टक्के मतदान झाले. 

मतदांनाच्या दिवशीचा खर्च फार मोठा असतो. मतदान केंद्राच्या 100 मीटर दूर गल्लीत पक्षाच्या बूथसाठी दोन टेबल आणि चार खुर्च्या भाड्यांनी आणल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभरात चार ते पाच थंड पाण्याचे मयूर जग लागले. मतदार केंद्रात एक अजेंट आणि बाहेर पक्षाच्या बूथवर सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजे पर्यन्त किमान आठ ते दहा लोकांची गरज असते. पक्षाच्या बूथ पाशी तीन-चार कार्यकर्ता पूर्ण दिवस असले पाहिजे. दोन ते तीन टक्के मतदाता पक्षाच्या बूथवर वर्दळ पाहून मतदान करतात. या शिवाय सकाळी चहा. सकाळी 9 वाजता किमान दहा ते बारा कार्यकर्त्यांना नाश्ता ही द्यावा लागतो. दिल्लीचे म्हणाल तर, ब्रेड-पकोडे, कचोरी आणि बटाट्याची भाजी, छोले भटुरे इत्यादि आणि चहा. कार्यकर्त्यांसाठी दुपारच्या जेवणासाठी व्यवस्था ही करावी लागते. संध्याकाळी पुन्हा चहा-समोसा इत्यादि. मतदान उकरल्यावर पाच किंवा सहा लोकांचे डिनर ही. ईव्हीएम जमा करण्यासाठी जाण्याचा आणि मतमोजणीच्या दिवसाचा खर्च वेगळा. या शिवाय पान-तंबाकू इत्यादीचा खर्च ही. थोडक्यात एका मतदान केंद्राचा खर्च 15 ते 20 हजारांचा घरात जातो. प्रति मतदार हा खर्च 15 ते 20 रु

किती खर्च झाला हा प्रश्न  विचारल्यावर  सचिन ने प्रश्नाचे उत्तर दिले नाही. खर्च कुणी उचलला हे ही सांगितले नाही. तरीही अंदाजे वरील सर्व खर्च मोजला तर पक्षाला एक मतदार 30 ते 50 रूपयांचा पडतो.  

अफवांवर विश्वास ठेवला तर निवडनूकीच्या दिवशी दारू आणि पैसा ही वाटला जातो. या शिवाय पक्ष नेत्यांच्या रोड शो, रॅलीचा खर्च, नेत्यांचा प्रवासाचा खर्च ही मोठा असतो. या सर्वांवर मोठ्या पक्षांचे काही अब्ज नक्कीच खर्च होत असतील. दिल्लीत एक कोटी 55 लक्ष मतदार आहेत. याचा अर्थ फक्त मतदान केंद्र व्यवस्थापनेचा खर्च मोठ्या पक्षांना 100 कोटीच्या जवळपास पडेल. ज्या पक्षाजवळ बिना मजुरी घेता कार्य करणारे कार्यकर्ता असतील त्याला खर्च कमी येऊ शकतो. विधानसभा निवडणूकीच्या वेळी लोकसभा निवडणूकी पेक्षा जास्त खर्च येतो. कारण उमेदवारांना त्या भागातील विभिन्न समुदाय प्रमुख, कालोनी प्रधान आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना ही प्रसन्न करावे लागते. 

आपल्या देशात लोकसभा, विधानसभा, स्थानीय निकाय इत्यादींची  निवडणूक वेगळी घेतली जाते.  प्रत्येक वेळी पक्षांना अब्जावधी रुपये खर्च करावा लागतो. कुणीतरी हा खर्च उचलणार आणि जो खर्च उचलेल निवडणूक जिंकल्यावर त्याचे भले राजनीतिक पक्षांना करणे भागच असते. किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी झाली तर कितीतरी अब्जावधीचा खर्च पक्षांचा वाचेल. पक्षांचा निवडणूक लढविण्याचा खर्च ही अर्धा होईल.



Monday, December 16, 2024

दुर्योधन: बेलेट पेपर वर निवडणूक झालीच पाहिजे.

शकुनी मामा (दुर्योधनाचा रडका चेहरा पाहून): दुर्योधन, पुन्हा पडला का निवडणूकीत. 

दुर्योधन: होय मामा, यंदा ही जनतेने मला मत दिले नाही. या वेळी तर भीमाने तब्बल 50 हजार मतांनी पराजित केले. त्या हलकट अर्जुनाने तर तब्बल लाख मतांनी कर्णा वर विजय मिळविला. धर्मराज पुन्हा राजा झाला आहे. मामा, एक ही निवडणूक मी जिंकू शकलो नाही. पण  मामा, मला एक कळत नाही, तुम्ही दहा वेळा निवडणूका कश्या काय जिंकल्या. तुमच्या सारख्या नीss.. म्हणता-म्हणता दुर्योधन मध्येच थांबला. शकुनी म्हणाला, दुर्योधना, तुला काय म्हणायचे आहे, मला कळले आहे. फक्त तूच माझे खरे स्वरूप ओळखतो याचा मला आनंदच आहे. म्हणूनच मी तुला वारसा हक्क दिला आहे. जनता मला मत देत होती, हा तुझा भ्रम आहे. भांजे, मी साम दाम दंड भेद वापरुन निवडणूका जिंकल्या आहेत. म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते. मी जनतेची कधीच पर्वा केली नाही. मी फक्त जनतेला मूर्ख बनविले आहे. पन्नास वर्षांपूर्वी पहिली निवडणूक तुझा मामाने गुंडांच्या मदतीने बूथ लुटून जिंकली होती. पण काळ एक सारखा रहात नाही. जेंव्हा बूथ लुटणे अशक्य झाले तर मामा नकली बेलेट पेपर छापून निवडणूक जिंकायचा. अश्या रीतीने वेगवेगळे मार्ग वापरुन तुझ्या मामाने दहा निवडणूका जिंकल्या आहेत आणि अब्जावधी संपत्तिचे मोठे साम्राज्य स्थापित केले आहे.  

दुर्योधन: मामा तो काळ गेला, आता ईव्हीएम आली आहे. त्या बदलणे शक्य नाही. त्यात हेराफेरी ही करता येत नाही. तसे असते तर तुमच्या या भाच्याने कधीच हेराफेरी करून निवडणूक जिंकली असती. आता तर मला वाटते, माझ्या भाग्यात फक्त वनवास आहे. 

शकुनी: एवढ्यात निराश होऊ नको, तुझा मामा जिवंत आहे. आपल्या जवळ भरपूर पैसा आहे. आपण मीडिया विकत घेऊ, एनजीओ  विकत घेऊ, सामाजिक संस्थांना विकत घेऊ. ईव्हीएम विरुद्ध जोमाने प्रचार करू. जनतेच्या मनात ईव्हीएम बाबत शंका उत्पन्न करु. मग जनताच म्हणेल बेलेट पेपर वर मतदान घ्या. एकदा की बेलेट पेपर वर मतदान घेतले की तुझा विजय निश्चित समज.

दुर्योधन: मामा,  खरोखर असे होईल? तो मायावी कृष्ण असे होऊ देईल का. 

शकुनी मामा: का नाही होणार. आपण प्रचार करू मायावी कृष्ण ईव्हीएम हेक करतो आणि पांडव निवडणूक जिंकतात. मायावी कृष्ण संविधान विरोधी आहे, प्रजातंत्र विरोधी आहे, तांनाशाह आहे. हस्तिनापूरची संपत्ति लुटून तो द्वारकेत नेतो आहे. जो पर्यन्त शकुनी जीवंत आहे, कृष्णाला असे करू देणार नाही. .. दुर्योधना कसे वाटले माझे उद्याचे भाषण?

दुर्योधन: मामा. आता माझ्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली आहे. तुम्ही आदेश द्या, मी ईव्हीएम विरोधात उद्या पासूनच देशभराचा दौरा सुरू करतो. 

असे म्हणत दुर्योधनाने जोरात घोषणा केली, ईव्हीएम मुर्दाबाद, बेलेट पेपर झिंदाबाद. पुढची निवडणूक, बेलेट पेपर वर. त्याच बरोबर कावळ्यांनी ही कांव-कांव करत प्रतिसाद दिला. 


Friday, December 13, 2024

शिक्षित मध्यमवर्ग मोक्षाच्या वाटेवर

दोन महीने पूर्वीची गोष्ट राजीव चौक जवळ असलेल्या हनुमान मंदिरात मारूतीचे  दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो, अचानक पटाईssत, अशी जोराची हाक ऐकू आली. मागे वळून बघितले, एक सत्तरीचा वयस्कर माणूस माझ्याच कडे येत होता. तो जवळ आला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला तो प्रदीप* (टोपण नाव)  होता. मला पाहताच तो म्हणाला, पटाईत, तुझ्या चेहर्‍यात काहीच बदल झालेला नाही. अजूनही तसाच दिसतो. तुला पाहताच ओळखले. प्रदीपची माझी पहिली ओळख कृषि भवन मध्ये कार्यरत असताना झाली होती. 1995 मध्ये त्याची बदली झाली. त्यानंतर काही आमची भेट झाली नाही. तब्बल 29 वर्षांनंतर आज आम्ही भेटलो होतो. त्याला जवळच्या कॉफी हाऊस मध्ये घेऊन गेलो. आम्ही कॉफी हाऊस मध्ये दोन तास बसून एका दुसर्‍याच्या राम कहाण्या ऐकल्या.    


त्याच्या मुलाने आयटीतील डिग्री घेतली आणि त्याला पुण्यात नौकरी लागली. प्रदीप ने ही निवृत झाल्यानंतर पुण्यात घर विकत घेतले. त्याच वर्षी मुलाचे लग्न ही केले. त्यानंतर मुलाने नौकरी बदलली आणि तो अमेरिकेत गेला. मुलाने अमेरिकेत घर विकत घेतले होते. त्याचा भारतात परतण्याचा विचार नाही. प्रदीप ने विचारले, पटाईत, तुझ्या मुलाचे लग्न झाले का? मी उत्तर दिले, गेल्या वर्षी झाले. तो म्हणाला तीसी उलटल्यावर झाले असेल. मी म्हणालो, काय करणार, मुली होकार देत नव्हत्या.  विषय बदलण्यासाठी  मी त्याला गमतीने विचारले, तू दोन-चार नातवांचा आजा झाला असेल? त्याच्या चेहरा गंभीर झाला, तो म्हणाला नाही रे.  मी विचारले "मुलाने लग्न केले नाही का"? तो म्हणाला, केले आहे. गेल्या दहावर्षांपासून अमेरिकेत आहे. पण त्या दोघांची मूल पैदा करण्याची इच्छा नाही. आता तर त्याची चाळीसी ही उलटली आहे. बहुतेक माझा वंश इथेच संपणार.  याचा दोष आपलाच.  आपल्या पिढीतील अधिकांश नौकरीपेशा  मध्यमवर्गीय लोकांनी एकच मूल पैदा केले.  त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. त्याने त्याचाच नातेवाईकांचे अनेक उदाहरणे दिली. नव्या पिढीतील अधिकान्श मुलांचे लग्न 30- 35 उलटल्यावर होत आहे. एकाच्या वर अपत्य नाही. काहींना मूल पैदा करण्याची इच्छा ही नाही. तो पुढे म्हणाला असेच सुरू राहिले तर आपल्या पैकी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांचे  वंश पुढील 100 वर्षांत संपुष्टात येतील. मी वातावरण हलके करण्यासाठी म्हणालो, याला  मोक्ष  म्हणतात.  प्रदीप ने पुण्यात एक वृद्धाश्रम पाहून ठेवले होते. त्याच संदर्भात तो म्हणाला, आमचे दुर्दैव, आमचा शेवट वृद्धाश्रमात होणार. बहुतेक अग्नि देण्यासाठी कुणी नातेवाईक ही जवळ नसणार. जाता-जाता प्रदीप मला  म्हणाला, तुझ्या मुलाला म्हणा, दोन किंवा तीन पोर पैदा कर.  मी ही हसत- हसत उत्तर दिले ते माझ्या हातात नाही.  आमची कितीही इच्छा असली तरी ही मुलगा आणि सून दोन्ही नौकरी करणारे असल्याने, पुढची पिढीत एकच्या वर वृद्धी होण्याची संभावना कमीच.  


त्याची कहाणी ऐकून मला रात्रभर झोप आली नाही. पण त्याचे म्हणणे खरेच होते. माझ्या आजोबांच्या वंशात आम्हा दोन तृतीयांश भाऊ आणि बहीणींचे एकच अपत्य आहे. दोनच्या वर कुणाचेही नाही. पुढची पिढी म्हणाल, तर एकच्या वर कुणाचे ही नाही. हीच परिस्थिति अधिकान्श मध्यमवर्गीय नातेवाईकांच्या घरची आहे.  पुढच्या पिढीचा जन्मदर पाहता,  पुढील 100 वर्षानी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांच्या वंशजांना मोक्षाची प्राप्ती झालेली असेल.