Monday, June 10, 2024

मतदान केंद्र व्यवस्थापन

मतदारांनी जास्त संख्येने येऊन आपल्या पक्षाला मतदान केले पाहिजे यासाठी मतदान केंद्राचे व्यवस्थापन गरजेचे असते. सौप्या भाषेत बूथ मॅनेजमेंट हा शब्द वापरला जातो. 

आपण जेंव्हा मतदान करायला जातो. केंद्राच्या बाहेर काही अंतरावर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते, आपण टेबल खुर्चीवर बसलेले पाहतो. त्यांच्यापाशी मतदारांची लिस्ट असते. ते मतदाराला मत कसे टाकायचे याचे मार्ग दर्शन करतात. बूथ वर येणाऱ्या मतदारांचा  हिशोब ठेवतात. इत्यादी. मतदान केंद्रात ही आत प्रत्येक पक्षाचे एजंट असतात. ते मतदान सुरू आणि पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात. या शिवाय बोगस मतदारांवर ही लक्ष ठेवतात.

मतदान करणे हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मग राजनीतिक पक्षांना बूथ मॅनेजमेंट करण्याची गरज काय हा प्रश्न मनात येणार.  ज्याचे मुख्य कारण मतदारांची असलेले भिन्न भिन्न प्रकार. 

कट्टर मतदाता हे आंधी,पाऊस किंवा भयंकर ऊन असो ते मतदान करणारच. अश्या मतदारांची संख्या २० ते २५ टक्के असते. दुसरा प्रकार संघटीत मतदाता. हे ही सामान्य मतदान पेक्षा जास्त मतदान नेहमीच करतात. 

बाकी उरलेल्या मतदारांनी मतदान केंद्रात घेऊन मत द्यावी यासाठी बूथ मॅनेजमेंटची गरज असते. पहिल्या प्रकारचे मतदार:  कुंपणावरचे आणि वाऱ्यावरचे मतदार. कुंपणावरचे मतदार कुंपणावर बसलेल्या पक्ष्यांसारखे असतात. ते दाना-पाण्यासाठी मतदान करतात. वाऱ्यावरच्या मतदारांच्या मनात फक्त एकच इच्छा असते त्यांनी ज्याला मत दिले आहे तो निवडून आला पाहिजे. यांचे स्वतःचे काहीही विचार नसतात. पक्षाच्या बूथवर असलेली भीड पाहून ते त्या पक्षाला मतदान करतात. या दोन्ही प्रकारातल्या मतदारांची संख्या पाच ते सात टक्के असली तरी अटीतटीच्या सामन्यात यांचे महत्त्व वाढते. उदाहरण माझ्या मतदार संघात 25 लक्ष वर मतदार आहे. कोणत्याही पक्षाला या लाख मताचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. 

आता उरले उदासीन मतदार. या मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी पक्षांना सर्वात जास्त मेहनत करावी लागते.  मतदानाच्या किमान आठवड्याभरात आधी पाच ते दहा कार्यकर्त्यांसोबत घरी-दरी जाऊन पक्षाचे प्रचार साहित्य, उमेदवाराची माहिती देऊन पक्षासाठी मत देण्याची विनंती करावी लागते. पदयात्रा, स्थानीय  नेत्यांच्या सभा इत्यादीसाठी भीड ही एकत्र करावी लागते. या शिवाय एक दिवस आधी प्रत्येकाच्या घरी जाऊन पर्ची ही द्यावी लागते. आमचे मतदान केंद्र अर्धा किमी दूर सरकारी शाळेत आहे.  मी तर प्रत्येक पक्षाच्या बूथ वर नमस्कार-चमत्कार करत मतदान करायला जातो. अनेकांशी गाठी भेटी हातात. पण आळशी मतदारांसाठी ई  रिक्षांची व्यवस्था ही करावीच लागते. मतदानाच्या दिवशी ही घरी जाऊन आठवण करून द्यावी लागते. 

आपल्याला कल्पना आलीच असेल. बूथ मॅनेजमेंट साठी प्रत्येक बूथवर  पाच ते दहा  कार्यकर्त्यांची गरज असते. आजच्या काळात कोणीही फ्री मध्ये काम करत नाही. बूथ मॅनेजमेंट म्हणजे गल्ली बोळ्यातील  स्वयंभू नेता आणि कार्यकर्त्यांसाठी  काही दिवसांचा रोजगार.  टेबल खुर्च्यांचे भाडे, स्टेशनरी खर्च. ई रिक्षाचा खर्च. याशिवाय मतदानाच्या दिवशी दोन वेळचा चहा नाश्ता, जेवण आणि रात्रीची पार्टी.  दिल्ली सारख्या शहरात एका मतदान केंद्राच्या बूथ मॅनेजमेंट खर्च २५ ते ५० हजार हा येतोच. अंदाजे खर्च पाच ते दहा कोटी प्रति लोकसभा सीट. याशिवाय कुंपणावरच्या पक्ष्यांसाठी होणारा दाणापाणीचा खर्च वेगळा.  बूथ मॅनेज करण्यासाठीं होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात कधीच येत नाही कारण निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा पर्यादा घातली आहे. विभिन्न पक्षांचे कार्यकर्ता ही स्वतःच्या खिशातून एक पै खर्च करत नाही. पक्षाची मॉनिटरिंग कमी असेल तर गल्ली बोळ्यातील हे स्वयंभू नेता अधिकांश पैसा स्वतःच्या खिशातच घालतात आणि बूथ मॅनेजमेंट वर कमी खर्च करतात.  

उत्तम बूथ मॅनेजमेंट झाले तर पक्षाच्या उमेदवाराला पाच ते दहा टक्के मते जास्त मिळतात. पक्षाचा उमेदवार जिंकण्याची आशा वाढते. निवडणूक आयोग यासाठी खर्चाची व्यवस्थेबाबत निर्णय घेत नाही तो पर्यंत पांढरा पैसा यासाठी खर्च करणे राजनीतिक पक्षांना संभव नाही. निवडणुकीच्या दिवशी राजनीतिक पक्षाच्या बूथ वर भीड पाहून निकालाची भविष्यवाणी करता येते.






Thursday, May 16, 2024

पाकिस्तानचा सम्मान करा

पाकिस्तान हा भारताचा शेजारी आहे. एका अर्थाने भारताचा लहान भाऊ. पण सध्याच्या घटकेला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिति बिकट आहे. महागाई 33  टक्क्यांनी वाढत आहे. जनता महागाई, बेरोजगारी इत्यादीने ने त्रस्त आहे. पाकिस्तानात सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. दुसरी कडे भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची झपाट्याने प्रगति होत आहे. पण आपल्या लहान भावाची मदत करणे सोडून भारत त्याच्या छताडावर बंदूक रोखून उभा आहे. पाक व्याप्त कश्मीर मध्ये अराजकता माजवत आहे. पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत आहे. अज्ञात व्यक्ति तिथल्या प्रसिद्ध शांतिपूर्ण लोकांची हत्या करत आहे. भारताचे पाकिस्तान सोबत असे वागणे निश्चितच उचित नाही. या परिस्थितीवर भारताच्या एका प्रसिद्ध अहिंसावादी नेता मनीशंकर यांनी विधान केले, हे असेच चालू राहिले तर तिथल्या पागल लोकांचे माथे भडकतील. त्यांच्या जवळ अणु बॉम्ब आहे. त्यांना तो बॉम्ब भारतावर फोडायला वेळ लागणार नाही. जर त्यांनी लाहोर मध्ये फोडला तरी अमृतसर नष्ट होणार. आपल्या देशाचे किती नुकसान होईल याची कल्पना करा.  हा विनाश थांबवायला असेल तर आपल्याला पाकिस्तानचा सम्मान केला पाहिजे. 

आता प्रश्न येतो. पाकिस्तानचा सम्मान कोणत्या रीतीने केला पाहिजे जेणे करून तो भारतावर अणु बॉम्ब टाकणार नाही. पाकिस्तानची भारताकडून काय अपेक्षा आहे यावर विचार करून काही उपाय शोधले. 

1. भारताने पाकिस्तान सोबत वार्ता पुन्हा सुरू करावी. 
2.  पाकिस्तानची सीमा पुन्हा खुली करून व्यापार सुरू करावा. 
3. ज्या प्रमाणे भारत आपल्या 80 कोटी लोकांना राशन फ्री देतो तसेच पाकिस्तानच्या जनतेला ही देण्यासाठी काही कोटी टन गहू, तांदूळ आणि  साखर उपहार स्वरूप पाकिस्तानला द्यावे. 
4. भारताने पाकिस्तान मध्ये शांतिपूर्ण लोकांची हत्या करणे त्वरित बंद करावे. 
5. भारतातील जेलांमध्ये बंद पाकिस्तानच्या शांतिपूर्ण नागरिकांची सुटका करून त्यांना पाकिस्तान मध्ये परत पाठविले पाहिजे. 
6.  पाकिस्तान मधून शांततेचा संदेश घेऊन भारतात येण्याचा प्रयत्न करणार्‍या शांतिपूर्ण पाकी नागरिकांची हत्या करणार्‍या सुरक्षा दलांच्या जवानांवर हत्येचे  केसेस दाखल करून त्यांना दंड दिला पाहिजे. बहुतेक पूर्वी असे होत होते. त्या वेळी कश्मीर घाटीतील भारतीय सुरक्षा दलांत एक म्हण प्रचलित झाली होती. "मर गये तो पेन्शन, बच गये तो टेंशन". 
6. नद्यांवर बांधलेले बंधारे तोडून सर्व पाची नद्यांचे संपूर्ण पाणी पाकिस्तानला दिले पाहिजे. जेणे करून तिथल्या शेतकर्‍यांना भरपूर पानी मिळेल. अन्न उत्पादन वाढल्याने तिथली महागाई दूर होईल. तिथल्या जनतेला स्वस्त अन्न धान्य मिळेल. 
7. सर्वात शेवटी कश्मीरचा भाग अत्यंत आनंदाने पाकिस्तानला सौपविला पाहिजे. असे केले की पाकिस्तान अत्यंत प्रसन्न होईल आणि भारतावर अणु बॉम्ब फोडणार नाही. 

जो पर्यन्त तानाशाह मोदीजींची सत्ता भारतात आहे. पाकिस्तानचा सम्मान होणे शक्य नाही. कारण आजच्या अशिक्षित सत्ताधीशांना विदेश नीतीचे ज्ञानच नाही. आपल्या शेजार्‍याला कसे प्रसन्न ठेवावे हेच कळत नाही. येत्या जून 4 नंतर मोदीजी पुन्हा सत्तेत आले तर पाकिस्तान मध्ये अराजकता माजवून पीओके घेण्याचा प्रयत्न भारत करू शकतो. अश्या परिस्थितित निराश होऊन पाकिस्तानी सैन्य भारतावर अणु बॉम्ब फोडू शकतो. येत्या निवडणूकीत पाकिस्तानचा सम्मान करणार्‍याच्या इरादा ठेवणार्‍यांना मत दिले तर भारतावर अणु बॉम्ब पडणार नाही. पाकिस्तानचा सम्मान करण्याचे आणिक काही उत्तम उपाय असतील तर ते प्रतिसादात सांगावे ही अपेक्षा. असो. 






Thursday, May 2, 2024

मध्यम वर्ग: मतदानासाठी कमालीची अनास्था

गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा.  मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स.  हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार  मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान  केंद्र स्थापित केले गेले होते.

सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत  मतदरांमुळे  शक्य झाले. असे म्हणता येईल.

देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहेत? खरे तर सर्वात  जास्त मतदान शिक्षित  मध्यम वर्गाने  केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. 

पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो.  मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. 

जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.



Thursday, April 18, 2024

किस्सा झीरो ऑईल मूगाच्या डाळीच्या गोळ्यांची कढ़ी

 दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. सवयी  प्रमाणे माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. चिरंजीवांना माझ्या खाद्य प्रयोगांची भीती वाटते. तो सदैव सौ.ची अर्थात  आईंची घेतो. पण आज सोन्याचा दिवस उगवला वरक् फ्रॉम होम असले तरी चिरंजीव आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला जातात. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 असते. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनकपुरी- विकासपुरी भागातील सांस्कृतिक चळवळींचे आदान-प्रदान करून, पोटातला भार हलका करून तीन एक वाजेपर्यंत सर्व  प्रसन्न मनाने घरी परततात.



सकाळी  लवकर उठून स्वैपाक केला कारण चिरंजीव आठ वाजता निघणार होते. चिरंजीव गेल्यावर सौ.अंघोळीला गेली. हा मौका साधून तृतीयांश वाटी मूग डाळ एका वाटीत गरम पाण्यात भिजवली. वाटी बैठीकीच्या खोलीत माझ्या पुस्तकांची रेक आहे. त्यात ठेऊन दिली. माझ्या बाबतीत सौ.चे नाक कान आणि डोळे अत्यंत  तीष्ण तरी तिला वास लागला नाही. अकरा वाजता सौ. बीसीला गेली आता तीन वाजेपर्यंत काळजी नव्हती. वाटी आणून स्वैपाक घरात ठेवली. 

दुपारी बारा वाजता गच्चीवर जाऊन कढीपत्ता तोडून आणला. डाळ धुवून पाणी निथळायला चहाच्या गाळणीत ठेवून दिली.  दोन चमचे  दही आणि त्यात एक चमचा बेसन घालून मिक्सीत फेटाळून घेतले आणि ४०० ml दहा रू वाली छाज मध्ये मिसळून कढईत टाकले. त्यात अंदाजे हळद, मीठ, चिमूट भर हिंग, एक चहाचा चमचा जिरे आणि सौंप, दोन लाल मिर्च्या, कढी  पत्ता आणि आले किसून टाकले. गॅस लावला. आता मिक्सर मध्ये चार लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि चार पाच काळी मिरी टाकून  भिजलेली डाळ पिसून घेतली. मिश्रण एका भांड्यात काढून त्यात हळद, गरम मसाला, मीठ आणि एक मोठा चमचा बेसन मिश्रण एक जीव आणि घट्ट केले. कढईत टाकलेली कढी उकळू लागल्यावर त्यात  मिश्रणाचे दहा एक छोटे-छोटे गोळे टाकले. तीन एक मिनिटात गोळे वर दिसू लागले. आता मिश्रणाच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी टाकून उरलेले मिश्रण ही कढीत टाकले. दोन एक मिनिटात  कढ़ीचा रंग बदलून पिवळा झाला. आता एक गोळा काढून तपासला. थोडा कच्चा वाटला. थोडे पाणी आणि चिमूटभर मीठ स्वाद ठीक करण्यासाठी टाकले. दोन एक मिनिटांनी एक चहाचा चमचा काश्मिरी लाल मिरची टाकली. कढ़ी  थोडावेळ उकळू दिली. गॅस बंद केला. मोबाईल वर कढईतल्या कढ़ीचा फोटो घेतला. समाधान झाले नाही. पुन्हा नेहमीसारखा फोटू घेतला. 

कढ़ी खरोखर मस्त झाली होती. अर्धी सौ. आणि चिरंजीवासाठी ठेवली.  दोघांना आवडली. 


Monday, April 15, 2024

बद्ध लक्षण समासाचे निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ


आज श्रीमद् दासबोधातील बद्ध निरूपण समासाचे निरूपण करण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्पबुध्दीने करत आहे. समर्थ म्हणतात सृष्टीत अनंत जीव आहेत तथापि त्यांचे चारच वर्ग आहेत.  बद्ध,  मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. पहिला प्रश्न मनात घेणार बद्ध म्हणजे काय? बद्ध म्हणजे बांधलेला जीव. याचे एक छोटेसे उदाहरण, एक माणूस कुत्र्याला साखळीने बांधून सकाळी फिरायला जातो. साखळीने बांधलेला कुत्रा प्रशिक्षित असेल तर तो मालकाच्या मागे निपुटपणे चालतो. पण प्रत्यक्षात आपण काय पाहतो. कुत्रा पुढे-पुढे पळत आहे आणि मालक त्याच्यामागे कसे तरी धडपडत साखळी पकडून कुत्र्याच्या मागे चालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कधी- कधी कुत्रा साखळी तोडून पळू लागतो. कुणालातरी चावतो. मग वादावादी, हाणामारी, ज्याला चावला त्याचा उपचाराचा खर्च, कधी-कधी कोर्ट केसेस इत्यादी ही मालकाच्या नशिबी येतात. कुत्रा पाळण्याचे सुख त्याला मिळत नाही. पण मनस्ताप मात्र नशिबी येतो. दुसऱ्या शब्दांत इथे कुत्र्याच्या मोहात पडून कुत्र्या ऐवजी मालकच साखळीने बद्ध झालेला आहे. आपल्यापाशी  नाक, कान, डोळे, स्वाद, स्पर्श, हात, पाय इत्यादी इंद्रिय रुपी कुत्रे आहेत. आपण जर या इंद्रिय रूपी कुत्र्यांच्या मोहात बद्ध झालो तर हे कुत्रे स्वैराचार करू लागतील. आपली दशा कुत्र्याच्या मालका सारखी होईल.


चौऱ्यांशी लक्ष योंनीत भटकल्या नंतर आपल्याला मानव जन्म मिळतो. मानवाला देवाने बुद्धी दिलेली आहे. आपण या बुध्दीचा उपयोग जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी परमार्थ साधण्यात करणे अपेक्षित. समर्थांनी, आपल्याला परमार्थ साधण्याचा सोपा मार्ग कळला पाहिजे आणि आपल्या इंद्रिय रुपी कुत्र्यांना  मोह- माया पासून दूर ठेवण्यासाठी या समासात बद्ध लक्षणांचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात:


आता बद्ध तो जाणिजे ऐसा 

अंधारींचा अंध जैसा. 

चक्षुविण दाही दिशा.

शून्याकार.


ज्याच्या डोळ्यांसमोर सर्वत्र अंधकार आहे त्याला:


न कळे सारासार विचार.

न कळे स्वधर्म आचार.

न कळे कैसा परोपकार.

दानपुण्य.


न कळे भक्ती न कळे ज्ञान.

न कळे वैराग्य न कळे ध्यान.

न कळे मोक्ष न कळे साधन.

या नाव बद्ध.


डोळे नसलेल्या माणसाला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याच प्रमाणे बद्ध माणूस अंधारातच चाचपडत असतो. त्याला धर्माचा मार्ग माहीत नसतो. त्याला कर्माचा मार्ग माहीत नसतो. स्वधर्म, आचार, विचार माहीत नसतो. तीर्थ, व्रत, दान, पुण्य,ज्ञान, वैराग्य  तो जाणत नाही. दया, करुणा,  मैत्री, शांती, क्षमा त्याला माहित नसते. तो सदैव इंद्रिय जनित स्वार्थ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. तो सदा सर्वकाळ काम, क्रोध, गर्व, मद, मत्सर आणि असूयात बुडालेला असतो.  अश्या बद्ध व्यक्तीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात:

नैंत्री द्रव्यधारा पाहावी. 

श्रवणी द्रव्यदारा ऐकावी. 

चिंतनी द्रव्यदारा चिंतावी

 या नाव बद्ध.


समर्थ म्हणतात, असा व्यक्ती काया, वाचा, मनसा द्रव्य दारेच्या भजनात व्यस्त असतो. स्वार्थापोटी सदैव अविचार त्याच्या मनात येत राहतात. तो कपट- कारस्थान रचतो, भ्रष्टाचार करतो, निष्ठुर  होऊन दुसऱ्यांचा जीव ही घेतो. सर्व प्रकारचे पातक तो करतो. शेवटी कोर्ट, कचेरी जेल यात्रा त्याच्या नशिबी येते.  


इंद्रिय सुखांचा बहु आनंद घेतल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी माणूस ग्रस्त होतो.  सांसारिक भोगांचा आनंद ही त्याला घेता येत नाही. अश्या बद्ध जीवाला परमार्थ साध्य होण्याच प्रश्नच येत नाही. त्याची स्थिती कुत्र्याच्या मालका सारखी होते त्याला मालक आपण आहोत की कुत्रा हेच कळत नाही. अश्या व्यक्तींसाठी समर्थ म्हणतात:


न कळे परमार्थाची खूण.

न कळे अध्यात्म निरूपण.

न कळे आपणास आपण. 

न कळे तत्वतः केवळ.

या नावबद्ध


साडे तीनशे वर्ष आधी समर्थांनी ज्या बद्ध लक्षणांची वर्णने केली आहे ती आज ही आपण सर्वत्र पाहतो. आज आपण घर राहण्यासाठी नाही तर इंद्रियांना सुख देणाऱ्या एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादींनी सजविण्यासाठी घेतो. डोळ्यांना घर सुंदर दिसावे म्हणून भिंतींवर रासायनिक पेंट लावतो. अंघोळ शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही, तर शरीर सुंदर दिसण्यासाठी करतो. त्यासाठी रासायनिक साबण, शेंपू, क्रीम वापरतो. केसांना कलर करतो. जेवण शरीराच्या पोषणासाठी ऋतु अनुसार नव्हे, तर जिभेच्या स्वादासाठी करतो. पित्झा, बर्गर, चॉकलेट, केक, मैग्गी, इत्यादी खातो. स्टेटससाठी एसी कार वापरतो. स्वतःच्या अपरमित अनंत ईच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात नवरा बायको दोन्ही जीवापाड मेहनत करतात. क्षण भराचा अवकाश ही त्यांना मिळत नाही.


 इंद्रिय भोगात आत्मकेंद्रित झाल्याने ते अति व्यवहारी बनतात.  त्यांना आई वडील ही इंद्रिय सुखाच्या मार्गात बाधा वाटतात. काहींना तर मुल-बाळ ही नकोसे वाटतात. कुत्रा पाळून हौस भागवतात. आजच्या या अश्या पिढीसाठीच बहुतेक समर्थांनी साडे तीनशे वर्षापूर्वी म्हंटले आहे:


जागृति स्वप्न रात्रि दिवस

ऐसा लागला विषय ध्यास.

नाही क्षणाचा अवकाश.

या नाव बद्ध.


अश्या परिस्थितीत परमार्थ  देव धर्माचा विचार ही त्यांच्या मनात येणे  शक्य नाही.


पण शेवटी परिणाम काय.  त्वचेचे आजार,  वायू प्रदूषणामुळे होणारे अस्थमा  इत्यादी श्वसनाचे आजार. प्रदूषित पाणी आणि जेवणामुळे मधुमेह, हृदय रोग, कॅन्सर, इत्यादी आजार. लिव्हर किडनी खराब होतात. शरीराचे अवयव दुर्बल होतात. डोळे तर जवळपास सर्वांचे खराब होतात. जीवापाड मेहनत करून कमविलेला पैसा आजारात खर्च होतो. परिस्थीती अशी आहे जवळ पैसा असला तरी ५० टक्केहून जास्त वरिष्ठ नागरिक भविष्यात वृद्धाश्रमात दिसतील. आज जवळपास संपूर्ण समाज इंद्रिय सुखानसाठी बद्ध झाला आहे. माणसाच्या अति उपभोगामुळे पृथ्वीचे पर्यावरण बिघडले आहे. त्याचे वाईट परिणाम ही आपण भोगतो आहे. शेवटी बद्ध व्यक्ती संसारात तर अपेशी राहतोच, पण त्याला परमार्थ ही साध्य होत नाही.त्याची स्थिती ‘धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का’ सारखी होते.


समर्थांनी आजच्या पिढीला सावध करण्यासाठी आणि आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय रुपी कुत्र्यांना परमार्थाच्या मार्गावर चालण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी, पहिली पायरी म्हणून या समासात जवळपास  १०० बद्ध लक्षणांचे विस्तृत वर्णन केले आहे. एकदा आपल्याला आपले इंद्रिय जनीत दोष कळले की आपण त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करूच. हे दोष कसे दूर करायचे याचे वर्णन समर्थांनी पुढील मुमुक्षु लक्षण या समासात केले आहेत.


जय जय रघुवीर समर्थ