Thursday, March 5, 2026

"स्वयें आत्महत्या करणे, तो तमोगुण

 
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात, 

"स्वयें आत्महत्या करणे, तो तमोगुण." (२.६.१०)

तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जेव्हा जगणे असंभव वाटते, तेव्हा निराश झालेला व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडतो. भारतात दरवर्षी सुमारे पावणे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यापैकी ८० टक्के साक्षर असतात. १५ ते ४० वयोगटात सर्वाधिक आत्महत्या होतात.

आत्महत्येची प्रमुख कारणे म्हणजे प्रपंचात अयशस्वी होणे, घरातील कटकटी, शिक्षणातील अपयश, प्रेमभंग, बेरोजगारी, अहंकाराला ठेस लागणे इत्यादी. आत्महत्येला प्रवृत करणारे तमोगुण -  काम, क्रोध, निद्रा, आळस, अवास्तव अहंकार, मनात येईल तसे वागणे, "माझ्या हिशोबाने जगाने चालले पाहिजे" ही अपेक्षा, आणि दिवस-रात्र नकारात्मक विचार करत राहणे. या तमोगुणांच्या आहारी जाऊन माणूस भ्रमिष्ट होतो. आजच्या भाषेत सांगायचं तर तो डिप्रेशनमध्ये जातो आणि आत्महत्या करतो.

सोशल मीडिया आणि दृश्य माध्यमांमध्ये अपराध व आत्महत्येचे महिमामंडन किंवा त्यावर अनावश्यक चर्चा ही तरुणांच्या मनातील नकारात्मक विचारांना उत्तेजन देते. शैक्षणिक संस्थांमध्ये पसरलेली नकारात्मक विचारधारा हेही एक कारण आहे. तरुणांना वाटू लागते की आजच्या सामाजिक व्यवस्थेत त्यांच्यासारख्या तरुणांचे शोषण होत आहे. या काल्पनिक अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती त्यांच्यात नसते, म्हणून त्यांना मरण अधिक सोयीचे वाटते. अशा नकारात्मक विचारधारेच्या आहारी जाऊन रोहित वेमुला यांसारखे शिक्षित तरुणही आत्महत्या करतात. 

काही लोक दुसऱ्यांवर दोष टाकून आत्महत्या करतात. जीवंत असताना विरोधकाचे काहीही करू शकत नाहीत, पण कागदावर आत्महत्येसाठी त्याला दोष देऊन आत्महत्या करतात. “मी मरणार, पण दुसऱ्यालाही शांततेने जगू देणार नाही”- ही वृत्ती तमोगुणाचे निकृष्टतम उदाहरण आहे. आपला कायदा अशा लोकांची साथ देतो, त्यामुळे दुसऱ्यांना दोष देऊन आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. आज हजारो आत्महत्या करणारे दुसऱ्यांना दोष देऊन आत्महत्या करतात. अश्या आत्महत्या रोखण्यासाठी कायद्यात बदल करणे पण आवश्यक आहे. 

लाखो योनीतून भटकून नंतर मनुष्य जन्म मिळतो. मानव जीवनाचे सार्थक करण्याऐवजी आत्महत्या करून संपविणे निश्चितच उचित नाही. तमोगुणापासून मुक्त होण्यासाठी सात्त्विक विचारांचा अभ्यास, कर्मयोगी वृत्ती, आणि सकारात्मक संगत आवश्यक आहे. नियमित ध्यान, शारीरिक श्रम, आणि विवेकपूर्ण आचरणाने मन शुद्ध होते. त्यागसहित उपभोग आणि प्रामाणिक पुरुषार्थ यांचा अवलंब केल्यास माणूस अंधारातून प्रकाशाकडे जाऊन जीवन सार्थक करू शकतो. 


Saturday, February 28, 2026

मन अधोमुख की उपराटी? सुखाचा आणि मुक्तीचा मार्ग

 
समर्थांनी वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेचे गहन अध्ययन केले होते. या सर्व प्राचीन ग्रंथांचा सार समर्थांनी मनाचे श्लोक आणि दासबोध यांच्या माध्यमातून मराठीत सोप्या भाषेत लोकांसमोर मांडला. समर्थांनी धर्म आणि सत्यमार्गावर चालून ऐश्वर्यशाली जीवन जगण्याचा तसेच आध्यात्मिक उन्नती आणि मोक्षाचा मार्ग लोकांना दाखविला.
 
कबीरदास म्हणतात,मन तो रे उड़त पंछी जितना, उड़ि उड़ि जावै आकाश।मन हे उडणाऱ्या पक्ष्यासारखे आहे. जसे पक्षी आकाशात उंच उडत राहतो, तसे मनही सतत इकडून तिकडे भटकत राहते. ते कधी भूतकाळात जाते, कधी भविष्याची चिंता करते, तर कधी विषयसुखांच्या मागे धावते. या भटकणाऱ्या मनाला आवरणे अत्यंत आवश्यक आहे.
 
कठोपनिषदात सांगितले आहे की आत्मा हा रथाचा मालक आहे आणि शरीर हा रथ आहे. बुद्धी सारथी आहे, मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत. ज्याने हे सर्व नीट सांभाळले, तोच जीवनाचा खरा आनंद घेणारा आहे. आपण असे म्हणू शकतो की जसे एखादा रथ चालवण्यासाठी सारथी, लगाम आणि घोडे यांचे योग्य नियंत्रण आवश्यक असते, तसेच जीवनात आत्मा, बुद्धी, मन आणि इंद्रिये यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे. ज्याने हे संतुलन साधले, तोच खऱ्या अर्थाने सुखी आणि यशस्वी ठरतो.
भगवद्गीतेत भगवान अर्जुनाला संबोधित करताना म्हणतात,
 
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण गृह्यते (अध्याय , श्लोक ३५)
 
हे महाबाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, हे खरे आहे; पण अभ्यास आणि वैराग्य यांच्या साहाय्याने ते नियंत्रित करता येते. इथे अभ्यास म्हणजे निरंतर नियमित प्रयत्न आणि विषयांपासून अंतर ठेवण्याची वृत्ती म्हणजे वैराग्य. ज्या व्यक्तीला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या, त्याला मनावर नियंत्रण मिळवता येते. संसारात आणि आध्यात्मिक क्षेत्रांत सफल होण्यासाठी मनावर नियंत्रण करणे आवश्यक आहे.
मनावर नियंत्रण कसे करावे हे सांगण्यासाठीच समर्थांनी मनाचे श्लोक रचले. समर्थ म्हणतात:
 
मन अधोमुख उपराटी केले पाहिजे। तरीच समाधान पाविजे।
नाही तरी मनाची गती। कधी रिघे हाती
(दासबोधदशक २०, समास , ओवी १९)
 
मन स्वभावतः अधोमुख असते, म्हणजेच मन विषय, वासना, लोभ, अहंकार आणि इंद्रियसुखांच्या शोधात भटकत राहते. अशा मनाला योग्य मार्गावर आणायचे असेल तर त्याची उपराटी करणे अत्यावश्यक आहे. उपराटी म्हणजे मनाच्या अधःप्रवृत्तीला थांबवून तिला विवेक, वैराग्य आणि आत्मचिंतनाकडे वळवले पाहिजे. समर्थ स्पष्ट करतात की मनाला मोकळे सोडले तर ते आपल्या हाती राहत नाही; ते सतत नवीन-नवीन इच्छांकडे धाव घेत राहते. अशा व्यक्तीला भौतिक सुख आणि संपत्ती मिळत नाही आणि आध्यात्मिक क्षेत्रांत सफल होण्याचा प्रश्नच येत नाही. असा माणूस फक्त अस्वस्थ, असंतुष्ट आणि दुःखी होतो. म्हणूनच समाधान हवे असेल तर मनावर नियंत्रण आवश्यक आहे. हे नियंत्रण दडपशाहीने नव्हे, तर आत्मजाणीव आणि विवेकाने करावे लागते.  मनाची दिशा बदलणे, हाच  उपराटीचे खरा अर्थ आहे.
 
आजचे उदाहरण घेऊन पाहूया: एखादा विद्यार्थी सतत मोबाईल, सोशल मीडिया किंवा क्षणिक करमणुकीत वेळ घालवत असेल तर समजावे की त्याचे मन अधोमुख झालेले आहे. तो एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यास असमर्थ ठरतो आणि परीक्षेत नापास होतो. पण एकदा त्याला आपले मन भटकले आहे, ही जाणीव झाली की तो मोबाईल इत्यादींचा नाद सोडून नियमित आणि निरंतर अभ्यास करण्याचा प्रयत्न करू लागतो. काही दिवसांत त्याला ध्यान-वाचनाची सवय सहज लागते आणि परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करू लागतो. शेवटी तो उत्तम गुण मिळवून परीक्षेत पास होतो. परीक्षा पास होण्याचे ध्येय पूर्ण झाल्यावर त्याला मानसिक शांती आणि समाधान निश्चित मिळते.
  
उपराटी केल्याशिवाय समाधान मिळत नाही.  उदाहरणार्थ, एखादा माणूस फक्त पैसा, प्रतिष्ठा किंवा भोग यांच्या मागे धावत राहिला, तर कितीही मिळाले तरी त्याचे मन तृप्त होत नाही. पण तोच माणूस विवेकाने गरज आणि लोभ यातील फरक ओळखून मनावर संयम ठेवत असेल, तर अल्पातही समाधान अनुभवतो.
 
सारांश: मन अधोमुख उपराटी केले पाहिजेही ओवी आत्मसंयम, मनोनिग्रह आणि अंतःशांतीचा मूलमंत्र सांगते. जर मन अधोमुख ठेवले, म्हणजे विषयसुख, लोभ आणि वासनांच्या मागे धावू दिले, तर माणूस दुःखी, असंतुष्ट आणि जीवनात असफल ठरतो. पण मनाची उपराटी केली, म्हणजे त्याला विवेक, वैराग्य आणि आत्मचिंतनाकडे वळवले, तर तो सुखी आणि समाधानी होतो. अशा व्यक्तीला संसारातील भौतिक सुखही मिळते आणि मुक्तीच्या मार्गावर चालण्यातही यश मिळते. हा समर्थांचा गूढ पण अत्यंत व्यावहारिक उपदेश आहे.

Tuesday, February 24, 2026

"सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ"

 

नवरा
: तुमच्या रोजच्या कटकटींमुळे मी त्रासून गेलो आहे. आत्महत्येचा विचार मनात येतो आहे. 

बायको: "खुशाल कर, कुणी रोखले आहे तुला? पण लक्षात ठेव, लग्नात मला जन्म भर पोसण्याचे वचन दिले होते तुझी दोन लेकरं आहेत. त्यांचा उद्धारही तुलाच करायचा आहे. 

नवरा: माझा कोट्यवधीचा विमा आहे, काही कमी पडणार नाही तुला. 

बायको: तेवढ्या पैश्यांनी काही ही होणार नाही. ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केली आहे, तिला लग्नाच्या बाजारात खपविण्यासाठी भरपूर हुंडा द्यावा लागेल.  मुलीचे लग्न करून ही जवाबदारी संपता नाही. त्यासाठी आठ-दहा कोटी लागतील. 
 
बायको: तुझ्या मुलालाही पुढचे शिक्षण अमेरिकेत घ्यायचे आहे. त्यासाठीही आठ-दहा कोटी लागतील.  माझी ही नुकतीच पन्नाशी उलटली आहे. अजून तीस-चाळीस वर्षे मी जिवंत राहणार.  माझ्या रोजच्या खर्चाची व्यवस्था तुला करावी लागेल. मी एक पतिव्रता स्त्री आहे. बाहेर ख्याली नाही. माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा लग्न करावे लागेल. एका विधवेला पुन्हा विवाह करण्यासाठी भरपूर हुंडा मोजावा लागतो.  माझ्यासाठीही वीस-पंचवीस कोटींची व्यवस्था करावी लागेल. एवढे जमले तर खुशाल कर..  आत्महत्या... माझी ना नाही.   
पोरांनीही आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला. 
 
नवरा: म्हणजे, मी आत्महत्या करणार, याचे  तुम्हाला काहीच वाटत नाही. आता मी आत्महत्या करणार म्हणजे करणार. मरण्यापूर्वी तुमची चोख व्यवस्था करून जाईल.  चिंता करू नका. 
 
काहीदिवसांनी आकाशात एक विमान कोसळले. त्यात विमान चालकासहित अनेक मृत्युमुखी पडले. काही महिन्यांनी एकाच मांडवात दोन लग्न झाली. दोघींचे नवरे विमान चालक  होते.

लग्नपत्रिका सुपारीच्या आकाराची होती. सुपारी लग्न पत्रिकेचे गूढमला अजूनही उलगडले नाही.


Friday, February 20, 2026

द्रोणाचार्यांची चातुरी : एकलव्याने प्रतियोगिता जिंकली

हस्तिनापूरचे गुरुकुल त्या काळातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षण संस्था होती. हे विशाल गुरुकुल फक्त देशी-विदेशी राजकुमारांसाठी राखीव होते. गुरुकुलात सकाळी भाषा, गणित, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायव्यवस्था, राजकारण इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जात असे. दुपारनंतर गुरुकुलाच्या विस्तीर्ण मैदानावर अस्त्र-शस्त्रांचे कठोर प्रशिक्षण राजकुमारांना दिले जात असे. गुरुकुलाच्या काही दूरवर धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र होते. त्या केंद्राचे प्रमुख आचार्य गुरु द्रोणाचार्य होते. हस्तिनापूर राज्याकडून त्यांना मान-सन्मानासह उत्तम वेतन मिळत होते. राजकुमारांना शिकवली जाणारी गूढ विद्या इतर कुणालाही शिकवायची नाही, ही अट होती. खासगी शिकवणी घेण्यास त्यांच्यावर बंदी होती.
 
गुरु द्रोणाचार्य अत्यंत चतुर होते. त्यांचे मेहुणे कृपाचार्य तिथे सकाळी धनुर्विद्येचे प्रशिक्षण त्यांच्या शिष्यांना द्यायचे, पण प्रत्यक्षात द्रोणाचार्य सर्वांना प्रशिक्षण देत असत. त्यासाठी महिन्याकाठी मोठी गुरुदक्षिणा त्यांना मिळत असे. निषादराज हिरण्यधनूचा पुत्र एकलव्य ही कृपाचार्यांचा शिष्य होता.
 
हस्तिनापूर राज्यात दर चार वर्षांनी युद्ध-शस्त्र कलेची प्रतियोगिता होत असे. ही प्रतियोगिता सर्वांसाठी खुली होती. प्रथम पुरस्कार लाख सुवर्णमुद्रा होता, पण उत्तम प्रदर्शन करणाऱ्यांनाही अनेक पुरस्कार मिळत असे. याशिवाय भारतखंडातील राजे-महाराजे उत्तम प्रदर्शन करणाऱ्या प्रतियोगींना त्यांच्या राज्यांत नोकरी देत असत. त्यामुळे संपूर्ण भारतखंडातून हजारो प्रतियोगी या स्पर्धेत भाग घेत असत.
 
एका दिवशी अर्जुनाला वार्ता मिळाली की गुरु द्रोणाचार्य नियमभंग करून राजकुमारांच्या व्यतिरिक्त इतरांना धनुर्विद्येचे गूढ शिकवतात. हस्तिनापूरात अफवा पसरली होती की यावर्षी होणारी धनुर्विद्येची प्रतियोगिता द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य एकलव्य जिंकणार आहे.
 
अर्जुनाने ही वार्ता युधिष्ठिराला सांगितली. युधिष्ठिराने वेळ गमावता हस्तिनापूर गुरुकुलाचे प्रमुख भीष्म पितामह यांच्याकडे गुरु द्रोणाचार्यांची तक्रार केली. पितामह भीष्मांनी द्रोणाचार्यांना जाब विचारला. द्रोणाचार्य म्हणाले, “एकलव्य हा माझा शिष्य नाही. मी पहाटे उठून धनुर्विद्येचा सराव करतो. त्यावेळी तिथे कुणीच नसते. कदाचित एकलव्य मला सराव करताना चोरून पाहत असेल.”
 
भीष्म पितामह म्हणाले, “याचा अर्थ एकलव्य चोरून विद्या ग्रहण करत होता.” विदुर म्हणाले, “पितामह, द्रव्य, वस्तू, जनावरे इत्यादी चोरीसाठी दंड देण्याची व्यवस्था आपल्या कायद्यांत आहे. पण विद्या चोरीसाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे एकलव्याला आपण दंड देऊ शकत नाही. चोरी गुरु द्रोणाचार्यांच्या विद्येची आहे. त्यांनाच शिक्षा ठरवू द्या.”
 
द्रोणाचार्य म्हणाले, “त्याने चोरून का होईना माझ्याकडून विद्या शिकली. त्यामुळे आता मी त्याचा गुरु झालो आहे. मी गुरुदक्षिणेत त्याच्या उजव्या हाताचा अंगठा त्याच्या कडून मागतो.” भीष्म पितामहांनी सहमती दिली. एकलव्याने सहर्ष आपला उजव्या हाताचा अंगठा द्रोणाचार्यांना समर्पित केला. आता द्रोणाचार्य एकलव्याला उघडपणे धनुर्विद्या शिकवू लागले.
 
काही महिन्यांनी हस्तिनापूरमध्ये धनुर्विद्येची स्पर्धा भरली. भरतखंडातील हजारो स्पर्धकांनी त्यात भाग घेतला. साहजिकच कृपाचार्यांचे शिष्यही त्यात सहभागी झाले. प्रतियोगिता सुरू झाली. कर्णाने शंभर पैकी 91 गुण मिळविले, तर अर्जुनाने 92 गुण मिळवून कर्णाला मात दिली. आपणच प्रतियोगिता जिंकू, हा विश्वास अर्जुनाला होता. पण एकलव्याने 95 गुण घेऊन अर्जुनाला ही मात दिली. सर्वांनी एकलव्याचा जयजयकार केला. अंगठा नसतानाही त्याने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले होते. एक लक्ष सुवर्णमुद्रा त्याने जिंकली. या क्षणाचा फायदा घेऊन दुर्योधनाने मिठी मारून त्याचे अभिनंदन केले.

अर्जुनाला वाटले गुरु द्रोणाचार्याने त्याला दगा दिला आहे. संध्याकाळी अर्जुनाने कृष्णाला विचारले, “अंगठा छाटल्यानंतरही हे कसे शक्य झाले?” कृष्ण म्हणाले, “मित्रा, तू बाण कसा चालवितोस?” अर्जुन म्हणाला, “मी तर्जनी आणि मधल्या बोटाने बाण पकडतो कारण ही बोटे दोरीला स्थिर पकड देतात आणि सोडताना बाणाची दिशा बिघडत नाही.” कृष्ण हसत म्हणाले, “गुरु द्रोणाचार्यांनी नियमांचे पालन करत ही भीष्म पितामह सहित सर्वांना मूर्ख बनविले. तू स्वतः डोळ्यांनी पाहिले की कृपाचार्यांचे सर्वच शिष्य उत्तम प्रदर्शन करत होते. 
 
(काल बागेत फिरताना आमच्या सोसायटीतील एका शेजाऱ्याने मला सांगितले की त्याचा मुलगा एका महागड्या शाळेत शिकतो. शाळेच्या बसेसही एसी आहेत, तरीसुद्धा त्याला कोचिंग लावावे लागले. आश्चर्य म्हणजे त्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तोच शिक्षक शिकवतो जो शाळेत शिकवतो. त्यावरून वरील कथा सुचली)

#महाभारत #द्रोणाचार्य #कृपाचार्य #एकलव्य  
#अर्जुन #युधिष्ठिर #भीष्मपितामह  
#धनुर्विद्या #गुरुदक्षिणा #स्पर्धा  
#इतिहास #पुराणकथा #भारतीयसंस्कृती  
#मराठीसाहित्य #कथा #प्रेरणा