जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तूंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचित केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ (मनाचे श्लोक ११)
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे मना, जगात कोण असा आहे जो नेहमी सर्व प्रकारचे सुख भोगत आहे? (कोणीच नाही!) तू स्वतःच विचार कर आणि शोधून पाहा. हे मना, तूच पूर्वजन्मींच्या कर्मांचा संचय (पूर्वसंचित) केला आहेस. त्याचप्रमाणे (कर्मानुसार) जे भोग (सुख-दुःख) प्राप्त झाले आहेत, ते तुला भोगावेच लागणार आहेत. आता मनात प्रश्न येणार पूर्वसंचित कर्म कसे बदलावे. समर्थ म्हणतात:-
“समर्थ रामदास स्वामी मनाला समजावत आहेत की, जगात कोणीही “सर्वसुखी” नाही. सुखी-दुःखी होणे हे काळाचे चक्र आहे, जे सदैव चालत राहते. जे काही घडते, ते पूर्वकर्मांचे फळ आहे असे समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे. मनाने व्यर्थ रडणे किंवा “माझ्याच बाबतीत असे का?” असे निरर्थक प्रश्न विचारणे सोडून द्यावे. प्रारब्ध कर्माचा स्वीकार केल्याने मन शांत होते आणि आत्मचिंतन सुरू होते. हा श्लोक कर्मयोग आणि समभाव शिकवतो. दुःख आले तरी मनाला त्यात बुडवून न जाता, धीराने सामोरे जावे.
येथे मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की,
पूर्वसंचित कर्म म्हणजे नेमके काय? गतजन्माचे कर्म की या जन्माचे? आपण गतजन्म पाहिलेला नाही आणि तो आपल्याला आठवतही नाही. परंतु, या जन्मातील आपली कर्मे आपल्याला चांगलीच ठाऊक असतात. "पूर्वसंचित कर्म" म्हणजेच "पूर्वी केलेले कर्म" असा अर्थ येथे आपण घेऊ शकतो. आपल्या पूर्वीच्या कृतींचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो.
महाभारतातील द्यूतसभेत द्रौपदीने स्वतःचा अपमान रोखण्यासाठी भीष्म पितामह, द्रोणाचार्य, विदुर आणि कृपाचार्य यांच्याकडे न्याय मागितला. परंतु त्या वेळी ते सर्वजण मौन राहिले. धर्मराज युधिष्ठिराने द्यूत खेळण्याचे निंदनीय कर्म केले होते, म्हणून तोही शांत राहिला. भीमाने गदा उचलली नाही आणि अर्जुनाने गांडीवही सरसावले नाही. प्रजेनेही या अन्यायाविरुद्ध बंड केले नाही. परिणामी, याचा फटका सर्वांनाच बसला. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर संपूर्ण कुरुवंशाचा विनाश झाला आणि १८ अक्षौहिणी सैन्य नाहक मारले गेले. हा प्रसंग आपल्याला दाखवतो की, अन्यायाच्या वेळी मौन बाळगणे हे देखील एक पापकर्मच आहे आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. जर प्रजा अन्यायी राजाला सहन करत असेल, तर त्याच्या दुष्कृत्यांचा परिणाम प्रजेलाही भोगावा लागतो.
आजच्या काळातही "पूर्वसंचित कर्म" या संकल्पनेचे परिणाम दिसून येतात. गाझातील काही लोकांनी दहशतवादी संघटना हमासला समर्थन दिले. हमासचा उद्देश विशिष्ट समाजाचा विनाश करणे हा होता, जे एक प्रकारे अधर्मकर्मच ठरते. जेव्हा त्यांच्याकडून निरपराध लोकांची हत्या केली गेली, तेव्हा त्या कृतीचा परिणाम भयंकर झाला. संपूर्ण गाझा उद्ध्वस्त झाला, हजारो लोक मारले गेले आणि लाखो विस्थापित झाले. त्यांच्या जीवनात दुःख, दारिद्र्य आणि असुरक्षितता आली. यावरून हेच स्पष्ट होते की, धर्माच्या मार्गावर राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि वर्तमानात योग्य कर्म करणे हेच जीवनाचे खरे तत्त्व आहे.
आता मनात प्रश्न येणार पूर्वसंचित कर्म कसे बदलावे. समर्थ म्हणतात:-
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ (मनाचे श्लोक ५)
मनुष्याच्या सर्व कृती मनातील संकल्पातूनच जन्म घेतात. जर मन पापाचे विचार करत असेल,
तर त्यातून वाईट कर्मे होतात आणि त्याचे फळ दुःखरूप मिळते. म्हणून समर्थ रामदास सांगतात की मनाने पापविचारांचा त्याग करून त्यांना मनात स्थान देऊ नये. त्याऐवजी सत्याचा, सत्कर्माचा संकल्प मनात दृढपणे धरावा. सत्यसंकल्प म्हणजे सत्य बोलणे, सत्य आचरण करणे, दया, सेवा, दान, नामस्मरण यांचा ध्यास घेणे. जेव्हा मन सतत सत्यसंकल्पात रमते तेव्हा मन शुद्ध होते आणि पूर्वसंचित कर्म शिथिल होतात.
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात:-
“उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥” (अध्याय ६, श्लोक ५)
मन हेच आपले सर्वात मोठे मित्र किंवा सर्वात मोठे शत्रू असते. जर आपण मनावर नियंत्रण ठेवले, त्याला सकारात्मक विचार, शिस्त, सद्गुण आणि आत्म-उन्नतीकडे वळवले तर ते मन आपले विश्वासू मित्र बनते. हे मन आपल्याला प्रेरणा देते, धैर्य देते, अडचणींमध्ये स्थिर ठेवते आणि यशाच्या मार्गावर नेते. दुसरीकडे, जर मनाला आवर न घातला, त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, आळस, नकारात्मक विचार किंवा व्यसनांमध्ये बुडू दिले तर ते स्वतःचेच शत्रू बनते. हे मनच आपल्याला कमकुवत करते, आत्मविश्वास कमी करते, अपयशाकडे नेते आणि शेवटी अधोगतीकडे घेऊन जाते.
पापसंकल्पाचा त्याग करून सत्यसंकल्प स्वीकारल्याने मन शुद्ध होते. शुद्ध मन सत्कर्माकडे वळते आणि पूर्वसंचित कर्म शिथिल होतात. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांचे भोगही बदलतात. याची अनेक ठोस उदाहरणे आपल्याला ग्रंथांत आणि इतिहासात दिसतात.
वाल्या कोळी हा क्रूरकर्मा होता;
वाटसरूंना मारून व लुटून तो आपला उदरनिर्वाह करत असे. परंतु, महर्षी नारदांचा उपदेश त्याला लाभला. त्याने चुकीचा मार्ग सोडून भक्तिमार्गाचा स्वीकार केला आणि तो पुढे 'वाल्मीकी ऋषी' झाला. साधना आणि भक्तीने त्याने आपले जीवन पूर्णपणे बदलले.
अंगुलीमाल हादेखील एक भयंकर डाकू होता. त्याने शेकडो लोकांची हत्या करून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात घातली होती. परंतु, जेव्हा गौतम बुद्ध त्याला भेटले, तेव्हा त्यांच्या शांत आणि करुणेने भरलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे अंगुलीमालाचे हृदयपरिवर्तन झाले. बुद्धांच्या मार्गदर्शनाने त्याने हिंसा सोडून धर्ममार्ग स्वीकारला आणि पुढे तो भिक्षू होऊन त्याला बुद्धत्वाची प्राप्ती झाली. हे उदाहरण दाखवते की, योग्य मार्गदर्शनाने आणि आत्मपरिवर्तनाने अगदी भयंकर अधर्म करणारा मनुष्यही बदलू शकतो.
इतिहासात सम्राट अशोकाचे उदाहरणही तितकेच महत्त्वाचे आहे. सत्तेसाठी त्याने आपल्या भावांची हत्या केली आणि कलिंग युद्धात अतोनात रक्तपात केला. परंतु, त्या युद्धानंतर त्याला तीव्र पश्चात्ताप झाला आणि त्याने शांती, अहिंसा व धम्माचा मार्ग स्वीकारला. इतिहासात तो "देवनांप्रिय" म्हणून ओळखला गेला.
सारांश
पापसंकल्पाचा त्याग करून सत्यसंकल्प स्वीकारल्याने मन शुद्ध होते.
शुद्ध मन सत्कर्माकडे वळते आणि पूर्वसंचित कर्म शिथिल होतात.
योग्य मार्गदर्शन आणि आत्मजागृतीने वाल्मीकी, अंगुलीमाल आणि अशोक यांसारख्या व्यक्तींनी जीवन परिवर्तन केले.
पूर्वसंचित कर्मफळे, जीव भोगी नित्यकाळा।
महाभारतातील उदाहरणे दिसती सर्व जगाला॥
नारदगुरु भेटला, वाल्या भक्ति मार्गी चालला।
वाल्मिकी ऋषी बनून तो कर्मबंधनातून मुक्त झाला॥