Saturday, April 11, 2026

उद्योग–व्यवसायासाठी व्यवस्थापनाचे नैतिक मार्गदर्शन

 समर्थ रामदास स्वामींचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे १७व्या शतकातील अमूल्य साहित्य आहेत, जे केवळ आध्यात्मिक नाहीत तर जीवनव्यवहार आणि नेतृत्वाचे उत्कृष्ट सूत्र आहेत. उद्योगातील व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन या ग्रंथांत आहे. या दोन्ही ग्रंथांत समर्थांनी उद्योगात सफलतेसाठी शिस्त, प्रेरणा आणि नैतिकतेवर भर दिला आहे. त्यांनी सांगितलेले व्यवस्थापनाचे त्रिकोणप्रयत्न, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठाखालील उदाहरणांसह मी आपल्या अल्प बुद्धीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

. प्रयत्न आणि शिस्त: अपयश टाळण्याचे सूत्र

"अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना

आपला अवगुण जाणवेना काहीं केल्यां "

(दशक १२, समास , ओवी ):

अपयशाचे कारण अविवेकी प्रयत्न; स्वदोष ओळखा. 

"मना पापसंकल्प सोडूनि द्यावा

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा " मनाचे श्लोक (श्लोक ):

रामदास म्हणतात जर दुकानदार जास्त नफ्यासाठी खोटे बोलून निकृष्ट दर्जाची वस्तू महागात विकेल, तर कधी ना कधी ग्राहकाला सत्य कळेल आणि तो पुन्हा त्या दुकानात येणार नाही. कारण काठ की हांडी फक्त एकदाच चढते.  दुकानदार GST आणि इतर कर वाचवण्यासाठी खोटे बिल देत असेल तर तो  कधीतरी  कायद्याच्या चक्रात अडकेल.  मानहानी होईल आणि त्याला जेलमध्ये ही जावे लागेल. परिणाम  संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त होईल. उद्योग धंदा करायचा असेल तर तो सत्याच्या आधारावरच केला पाहिजे.

. नम्रता आणि संवाद:  मनाच्या श्लौकांत समर्थ  म्हणतात,

"मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे

मना बोलणे नीच सोशीत जावें

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे "

दुकानदार असो की उद्योगपती, कर्मचाऱ्यांच्या चुका झाल्यावर त्यांच्यावर आरडाओरडा करण्याऐवजी नम्रतेने त्या चुका कशा सुधाराव्यात यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. ज्यांनी चूक केली त्यांना तात्काळ काढून टाकण्या ऐवजी धैर्याने विचार करून त्यांचे मार्गदर्शन केले पाहिजे. नम्रतेने केलेले मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना प्रेरणा देते आणि व्यवसाय टिकवते.  उदाहरण: जर एखाद्या कर्मचाऱ्याने बिलिंगमध्ये चूक केली, तर त्याला रागावण्याऐवजी शांतपणे ती चूक दाखवून दुरुस्त करायला शिकवावे. पुढे अशा चुका टाळण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. यामुळे कर्मचारी सुधारतो आणि ग्राहकांचा विश्वासही टिकतो.

. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा: दीर्घकालीन यश

 "ज्या ज्याचा जो व्यापार तेथें असावे खबर्दार " (दासबोध दशक ११// १९):

समर्थ म्हणतात, व्यापारात नेहमी खबरदारी ठेवली पाहिजे. उदाहरण:  जर परचेस विभागातील अधिकारी लाच घेऊन उत्तम दर्जाच्या ऐवजी निकृष्ट दर्जाचे टोमॅटो आणतील, तर त्यापासून बनलेली सॉसही निकृष्ट दर्जाची बनेल. ग्राहकांना दर्जाहीन माल मिळाला तर ते तुमची सॉस विकत घेणे बंद करतील. म्हणून मालकाने डोळे उघडे ठेवून प्रत्येक कामावर लक्ष ठेवले पाहिजे. उत्पादनाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी मालकाने कारखान्यातील प्रत्येक भागावर; खरेदी, उत्पादन प्रक्रिया आणि विक्री; इत्यादींवर  बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. यासाठी त्याला स्वतःही कामात सहभागी व्हावे लागते. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात कामेविण राहू नये. मालक जर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणारा असेल तर कर्मचारीही इमानदारीने काम करतील. ग्राहकांना दर्जेदार माल मिळाला तर त्यांचा विश्वास बसतो. परिणामी कंपनीची ब्रँड व्हॅल्यू वाढते आणि व्यवसायही अधिक यशस्वी होतो

 . शिकण्याची वृत्ती: मूर्खपणा दूर करणे

 "ऐसीं हें मूर्खलक्षणें श्रवणें चातुर्य बाणे

चित्त देउनियां शहाणे ऐकती सदा " (दशक / / ७२):

समर्थ म्हणतात, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पूर्वी त्या क्षेत्रात लोकांनी केलेल्या चुका नीट समजून घेतल्या पाहिजेत. त्या चुका पुन्हा करू नयेत, कारणदुसऱ्यांना काय समजते, मीच शहाणाहे मूर्खपणाचे लक्षण आहे. शहाणपण म्हणजे इतरांच्या अनुभवातून शिकणे, उत्तम सल्लागारांचे विचार ऐकणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे. त्यानंतर चातुर्याने ते मार्गदर्शन आपल्या उद्योगात लागू करणे आणि व्यवस्थित पद्धतीने राबवणे. यामुळे चुका टळतात, वेळ वाचतो आणि व्यवसाय अधिक मजबूत होतो. उदाहरण: एका नवीन स्टार्टअपने सुरुवातीच्या काळात गुणवत्ता नियंत्रण प्रणाली बसवली नव्हती. त्यामुळे ग्राहकांना एकसारख्या दर्जाचे उत्पादन देऊ शकले नाही. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि व्यवसायावर परिणाम झाला. मग तज्ञांचे ऐकून त्यांनी गुणवत्ता नियंत्रणावर लक्ष दिले. परिणामी त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला आणि ब्रँडवर विश्वास बसला.

समर्थ रामदासांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे व्यवस्थापनासाठी नैतिक मार्गदर्शन देणारे ग्रंथ आहेत. यात प्रयत्न आणि शिस्त यावर भर देऊन सत्याच्या आधारावर व्यवसाय करावा, अन्यथा अपयश निश्चित ठरते असे सांगितले आहे. नम्रता आणि संवादाने कर्मचाऱ्यांच्या चुका सुधाराव्यात, प्रशिक्षण मार्गदर्शनाने संघटना मजबूत होते. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो, ब्रँड टिकतो आणि व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी राहतो. तसेच इतरांच्या चुका ऐकून शहाणे होणे हेच खरे चातुर्य आहे; शिकण्याची वृत्ती व्यवसायाला दीर्घकालीन यश देते. अशा रीतीने हे ग्रंथ आधुनिक व्यवस्थापनात प्रयत्न, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठा या त्रिकोणातून यशस्वी आणि नैतिक नेतृत्वाचे सूत्र देतात।

 

Tuesday, April 7, 2026

धुरंधर सिनेमा: गुप्तचर कारवाईचा गौरव की सनातनी अजेंडा?

 
(मी स्वतः पंतप्रधान कार्यालयात असताना, सर्वश्री ए. एस. दुलत आणि एम. के. नारायण साहेबांचा पी.ए. राहिलो असल्याने, गुप्तचर कारवाई म्हणजे काय आणि त्या कशा कार्य करतात याची थोडी कल्पना होती. शत्रू देशांत राहून आलेल्या काहींनी त्यांचे किस्सेही सांगितले होते. अर्थात, त्यावर मी कधीही लेख लिहिणार नाही. हा लेख लिहिताना संदर्भासाठी आणि भाषा शुद्धीसाठी एआयचा वापर केला आहे.)

 

गेल्या रविवारी मुलाने विचारले
, “बाबा, धुरंधर सिनेमा पाहणार का?” माझ्या डोक्यात प्रकाश पडला. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही नवरा-बायको दोघांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नव्हता. तसेही मला सिनेमा वगैरे पाहण्याचा शौक नाही, आणि घरात मोठा टीव्ही असल्याने थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याची जिद्द सौ. ने कधी केलीच नव्हती. असो. २०२६ च्या आधुनिक सुविधांनी युक्त, थंडगार ए.सी. थिएटरमध्ये २५० रुपयांचे पॉपकॉर्न आणि पेप्सी (सिटच्या एका बाजूला पेप्सी ठेवण्याची जागा असते) घेऊन आम्ही चार तासांचा धुरंधर २ सिनेमा पाहिला. त्याच्या आधी टीव्हीवर पहिला भागही पाहिला. धुरंधर हा सिनेमा सर्वांनी पाहिलाच असेल, तरी त्याची कथा थोडक्यात:
 
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर (२०२५) आणि त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला दुसरा भाग धुरंधर: द रिव्हेंज (२०२६) हे हिंदी चित्रपट खऱ्या जागतिक घडामोडी आणि गुप्तचर मोहिमांवर आधारित हाय-व्होल्टेज ‘स्पाय थ्रिलर’ आहेत. या सिनेमात जसकीरत सिंग रंगी नावाच्या भारतीय गुप्तहेराची कथा आहे, जो हम्झा अली मजारी या बनावट ओळखीने पाकिस्तानमधील कराचीच्या ल्यारी भागात अंडरकव्हर एजंट बनून जातो. भारतावर होणारे दहशतवादी हल्ले रोखणे, विशेषतः २६/११ सारख्या कटांमागील गुन्हेगारी सिंडिकेट आणि आयएसआयचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे, हे त्याचे मुख्य ध्येय असते.
 
या सिनेमात आर. माधवन (अजित डोवाल सारखा) संजय दत्त, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.  या शिवाय शत्रूच्या गोटात अनेक वर्षे राहणाऱ्या एका एजंटचा भावनिक सांसारिक प्रवास ही धुरंधरमध्ये मांडला आहे.
 
मोदीजी सत्तेत आल्यानंतर गुप्तचर धोरणात मोठा बदल झाला. पूर्वी केवळ निरीक्षण व माहिती संकलनावर भर होता, परंतु आता “डॉक्ट्रिन” बदलून प्रत्यक्ष कारवाईवर भर देण्यात आला आहे. सिनेमाच्या सुरुवातीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर झालेल्या कारवायांचा उल्लेख येतो. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सुलेमान शाह, एकेकाळचा पाकिस्तानी सैनिक, भारतीय दलांच्या ऑपरेशनमध्ये ठार झाला. त्याच्यासह आणखी दोन दहशतवादी मारले गेले.
 
गेल्या काही वर्षांत, विशेषतः २०२२ आणि २०२३ पासून, भारतात विविध दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असलेल्या आणि पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या सुमारे २० ते २५ हून अधिक हाय-प्रोफाइल दहशतवाद्यांचा ‘अज्ञात हल्लेखोरांनी’ खात्मा केला आहे. यामध्ये पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ, लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर अदनान अहमद (उर्फ अबू हन्झला), खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजित सिंग पंजवार, जैश-ए-मोहम्मदचा मौलाना रहीम उल्लाह तारिक, २६/११ हल्ल्याशी संबंधित साजिद मीर (काही दाव्यांनुसार), आयसी-८१४ हायजॅकर झहूर मिस्त्री (उर्फ झाहीद अखून), लष्करचा अक्रम गाझी, हिजबुल मुजाहिद्दीनचा बशीर अहमद पीर, आणि भारतीय नागरिक सरबजीत सिंग यांची हत्या करणारा आमिर सरफराज उर्फ तांबा यांचा समावेश आहे.
 
या गूढ हत्यांमुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये मोठी घबराट पसरली असून, हे अज्ञात हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
 
धुरंधर सारख्या चित्रपटांतून आजच्या ‘नव्या भारताचे’ कणखर धोरण स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. भारत आता केवळ स्वतःच्या सीमांचे रक्षण करण्यापुरता मर्यादित राहिला नसून, राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शत्रूला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात शोधून संपवण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती बाळगतो.
 
तरीही अनेक पुरोगामी लोकांचे म्हणणे आहे की धुरंधर सिनेमा हा सरकारी प्रचार आहे—२०१४ पूर्वीच्या सरकारला बदनाम करणे हा हेतू आहे. सनातनी मतदारसंघ मजबूत करण्यासाठी देशात संप्रदायिकता वाढविणे हा छुपा हेतू आहे. तथापि, दुसरीकडे काहींचे म्हणणे असे आहे की आपल्या देशातील गद्दारांची पोल या सिनेमाने जगासमोर आणली आहे. आपले  मत काय आहे?
 

Friday, April 3, 2026

ओला आणि गोळा

 




बायको रागाने म्हणाली,

"आज मी माहेरी जाणार!"

मी आनंदाने उत्तरलो,

"ओला बुक करून देतो, प्रिये,"




क्षणात तिच्या अंगात 

रणचंडी संचारली,

नेम तिचा अचूक होता  

डोक्यावर  मोठे 

टेंगुळ उमटले.

 

अंगात माझ्या कापरे भरले,

तिच्या चरणावर नाक मी घासले,

माफी मागितली, हात जोडले  

खिशाला मात्र मोठे भोक पडले!


 

Monday, March 30, 2026

मोगर्‍या फुलांची वेणी (संपादित)


तब्बल ३५ वर्षांनी ते दोघं पुन्हा भेटले. केस पांढरे झाले होते, चेहऱ्यावर काळाच्या रेषा उमटल्या होत्या, पण डोळ्यांतली ओळख अजूनही ताजी होती. त्याला आठवली ती शेवटची भेट—नेहरू पार्क.  केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळलेली ती, त्याला खेटून बसलेली होती.  त्याने वेणी हुंगण्याचे नाटक करत तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं होतं. “दूर हो! काय समजलं मला? अजून लग्न नाही झालं आपलं,” ती रागावून म्हणाली. “मग केव्हा विचारणार तुझ्या वडीलांना? मला नोकरी लागून वर्ष झालंय.” “अरे, माझे बाबा एका भाड्यावर राहणार्‍या बाबूशी आपल्या लेकीचे लग्न करायला तैयार होणार नाही”. ‘मग काय आपण असेच राहायचे’? 

मी सरकारी नौकरी साठी प्रयत्न करते आहे. एकदा मला नौकरी लागली की विचारेल की बाबांना, एका स्मार्ट पण अक्कल नसलेला, कंजूष मुलाशी लग्न करायचे आहे. दोघांच्या पगारात आमचे व्यवस्थित भागेल. माझे बाबा नाही म्हणणार नाही, खात्री आहे मला”. ‘मी कंजूष?’ “मग काय, आपल्या प्रेयसीला चाणक्य सिनेमा हाल मध्ये ६५ पैश्याचे पहिल्या रोचे तिकीट घेऊन सिनेमा दाखवणार्‍याला काय म्हणायचे? एका रुप्पलीचे पॅापकॅार्न आणि एक कप कॉफी दोघांसाठी. काय मजनू आहे माझा. बाय द वे तुझ्या आई-वडीलांना विचारले का?” ‘दूध देणार्‍या गायीला, कोण नकार देणार’. तिने त्याच्या पाठीवर जोरात गुद्दा मारला. ‘आई! ग! किती जोरात मारते’. “आई! ग, नाही म्हणायचे, बायको ग, म्हणायचे”. ‘म्हणजे लग्न झाल्यावरही तू मारणार’ “हो, पण लाटण्यानी” ....

पुढे ती भेटलीच नाही. नंतर कळले मुंबईत एका सरकारी कार्यालयात तिने नौकरी जॉईन केली होती. तिचे लग्नही झाले. तो देवदास तर नक्कीच नव्हता. आईने पसंत केलेल्या मुलीशी त्याने लग्न केले.

‘कशी आहे’ ती म्हणाली, “राग तर नाही ना माझ्यावर! माझ्या वडीलांना आपले प्रकरण माहित झाले होते. मला तुझ्या पासून दूर नेण्यासाठी बाबांनी खेळी केली. आईने शपथ घातली. तूही तिथे नव्हता. नाइलाजाने वडीलांची इच्छा पूर्ण केली”.

 काय करतात तुझे मिस्टर?” “ ते हयात नाहीत. मोठ्या हुद्द्यावर होते, दारू आणि जुगाराच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते  सैतानासारखे वागायचे. काही वर्षांतच वर गेले. मुलगाही बापाच्या वळणावर गेला. दारूने त्याचे ही प्राण  घेतले. आता बहुतेक वृद्धाश्रमात जावं लागेल.  नशीब एकेकाचे. तुझे काय”.

तुझे लग्न झाले हे कळल्यावर खरं तर मला राग आला होता. पण आईने समजावले, आयुष्य हे असेच असते. आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर एकदा बायको सोबत ओडीयन मध्ये बाल्कनीचे तिकीट घेऊन सिनेमा पाहिला , “मैने प्यार किया” तो उगाच हसला. 

“अरे वा! भाग्यशाली आहे ती, प्रेयसीसाठी ६५ पैशांचे तिकीट आणि बायकोसाठी बाल्कनी” बोलताना तिने जीभ चावली”. त्याचे लक्ष रस्त्यावर मोगऱ्या फुलांच्या वेण्या विकणार्‍या दुकानदाराकडे गेले, मनात विचार आला. तिच्या पांढर्‍या केसांवरही मोगऱ्याची वेणी शोभून दिसेल. तो थांबला, त्याने तिला विचारले ‘वेणी घ्यायची का’? “हो, घे ना! तुझ्या बायकोसाठी. मलाही आवडते, मोगऱ्याची वेणी.... त्याने दोन वेण्या घेतल्या. वेणी हातात घेत, ती म्हणाली “तुला विसरण्याचा प्रयत्न केला पण विसरू शकली नाही. हे गेल्यावर तर सारखी तुझीच आठवण यायची. कधी-कधी वाटायचे, कदाचित अजूनही तू माझी वाट पहात असेल तर कधी वाटायचे तुझाही संसार असेल. तुला विसरलेच पाहिजे. मनाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. तुझी आठवण अनावर झाली कि बाजारात जाऊन मोगऱ्या फुलांची वेणी विकत घेते, खोलीचे दार बंद करून वेणी केसांत माळून आरश्या समोर उभी राहून रडते... आजही रडणारच”. काही क्षण दोघ काहीच बोलले नाही. तेवढ्यात तिची बस आली आणि ती निघून गेली... 

काही वेळाने त्याचे लक्ष हातातल्या मोगऱ्याच्या वेणी कडे गेले. त्याने उभ्या आयुष्यात बायकोसाठी मोगऱ्या फुलांची वेणी घेतलीच नव्हती आणि आज... त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. लग्ना पूर्वी त्याच्या बायकोनेही राजा-राणीच्या सप्तरंगी संसाराचे चित्र पाहिले असेल. पण प्रत्यक्षात दिसली, नवर्‍याच्या अपुर्या पगारात घर चालवण्याची तिची धडपड. संसार फुलण्यासाठी तिने स्वत:च्या सर्व इच्छा मारून टाकल्या. कधी काहीही मागीतले नाही किंवा हट्ट केला नाही. त्याला आठवले, कित्येकदा त्याचा आणि पोरांचा डब्बा भरल्यावर भाजी शिल्लक राहायची नाही. कधी विचारले ‘अग! तुझ्यासाठी भाजी उरली नाही’. ‘मी माझे बघून घेईल’, हेच नेहमीचे उत्तर. बहुतेक लोणच्या सोबत किंवा पोळीला तेल, तिखट-मीठ लाउन भूक भागवायची. तिनेही त्याच्यावर शरीर व मनानी प्रेम केले आहे, बदल्यात त्याने काय दिले??? कधी मनाने प्रेम केलं का तिच्या वर? त्याने निश्चय केला, आता सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायला हवी. घरी गेल्यावर त्याने आपल्या हाताने बायकोच्या पांढर्‍या शुभ्र केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळली....

  

Thursday, March 26, 2026

वासंतिक प्रेम

 

 

टेसूच्या ज्वाळांनी तन उजळले,
कोकिळेच्या कुहूने मन झुलले
सखी, वसंत प्रेमाचा साज घेऊन आला.

वसंताच्या वाऱ्यात उधळले रंग,
धरणीने केला शृंगार प्रेमाचा 
माझ्या मनात अलगद  
उमलली प्रेमाची कळी.
 


Monday, March 23, 2026

आजचा युगधर्म

 
दुर्योधनाच्या भव्य सभेत
कोट्यवधींची गर्दी पाहून,

गोंधळलेला अर्जुन म्हणाला—

“योगेश्वर, आता माझा धर्म कोणता?”

कृष्णानं मर्सिडीज सुरू केली,
आणि पोहोचला दुर्योधनाच्या तंबूत.

तो अर्जुनाला म्हणाला—

लोकशाहीच्या या युगात
ना सत्य, ना तप, ना त्याग
संख्या आहे विजयाची साक्ष ,
बहुमत म्हणजे धर्म 
बहुमत म्हणजे न्याय 
  
दुर्योधनाशी सौख्य 
हाच आहे आजचा युगधर्म
 


 


 

  


 

Friday, March 20, 2026

स्वप्नील शब्दांची सोनेरी वही


आयुष्याच्या सायंकाळी मला माझ्या आईची आठवण आली. आठवला गावातील जुना वाडा, आठवले पहाटे-पहाटे गुलाब फुलांवर पडणारे मोती सारखे दव बिन्दु. प्राजक्त फुलांचा सडा. मंदिराचा घंटा नाद. खळखळ वाहणारी नदी, गुरांच्या मागे धावणे, अस्ताचलच्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन कुरणे. त्याच स्वप्नील काळात शब्दांना पंख फुटले होते. स्वप्नील शब्दांना रेखाटण्यासाठी आईने आणून दिली होती सोनेरी वही. सारे-सारे आठवले. 

आयुष्यभर मायेच्या मोहात अडकून, पोटासाठी मी निरर्थक धावपळ करत राहिलो. दररोज मी कागदांवर शब्दांचा खोटा हिशोब लिहीत होतो. माझी सृजनशीलता आभासी होती. कवी सम्मेलनांमध्ये निरर्थक शब्दांचा खेळ मांडून भरपूर मानधन घेत होतो. मी स्वतःला ब्रह्मा समजू लागलो होतो. पांडित्याच्या आव आणून दुसर्यांना हीन लेखत होतो. पण फक्त मलाच माहीत होते,  माझे शब्द अर्थहीन, गंध हीन आणि भावना हीन आहेत.  माझी सोनेरी शब्दांची वही  हरवली होती. माझं अस्तित्व, हरवलेले स्वप्न होते. 

पुन्हा ऐकू येईल का मला आईची मधुर अंगाई?  तिच्या कुशीत मी पुन्हा शिरू शकेन का? माझी सोनेरी स्वप्नांची हरवलेली वही ती पुन्हा शोधून देईल का? अनेक प्रश्नांचा गुंता मला चैन पडू देत नव्हता. मी आईचा पुकारा गेला.  तेवढ्यात आईचा स्वर्गीय आवाज कानात गुंजला "बाळ, तुझ्या हृदयाच्या कपाटातच बंद आहे ती सोनेरी वही. फक्त मायेची धूळ त्यावर जमलेली आहे". 

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. "कविवर्य येत्या रविवारी हास्य कवि सम्मेलन ठेवले आहे, आपल्यासाठी मोठे मानधन ही निश्चित केले आहे. मन दोलायमान झाले. अखेर मला उत्तर सापडले. "मी येणार नाही, म्हणतात मोबाइल बंद केला". मला माझी सोनेरी वही सापडली होती.