Sunday, June 28, 2026

युवकांनो, आधी स्वतःला घडवा; मग लोकशाही मार्गाने राष्ट्र घडवा.


भारत हा जगातील सर्वात तरुण लोकशाही राष्ट्रांपैकी एक आहे. आपल्या देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या हातात आहे. आज सोशल मीडियाच्या युगात अनेक संघटना, नेते आणि आंदोलने युवकांना आपल्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने भावनेपेक्षा विवेक, अभ्यास आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर निर्णय घेणे आवश्यक आहे.
 
दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतरवर कोट्यवधी अनुयायायी असलेल्या कोक्रोच संघटनेचे आंदोलन झाले. भारतीय आणि जागतिक माध्यमांचे लक्ष त्या आंदोलनाकडे होते. मात्र ते आंदोलन पूर्णपणे अपयशी ठरले. युवा पिढी आंदोलनापासून दूरच राहिली. त्यामागचे कारण काय?" सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की कोणत्याही राष्ट्राची उभारणी  केवळ घोषणांनी, आंदोलनांनी किंवा सोशल मीडियावरील प्रचाराने होत नाही. राष्ट्रनिर्माणासाठी शिक्षण, चारित्र्य, कौशल्य, संघटनशक्ती आणि समाजसेवा यांची आवश्यकता असते. इतिहास साक्ष देतो की समाजात कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तींनी आणि संघटनांनी अनेक वर्षे अभ्यास, तपश्चर्या आणि जनसेवा केली होती. 
 
 
भारतीय लोकशाहीवर युवकांचा विश्वास नेहमीच दृढ राहिला आहे. याचे उदाहरण म्हणजे विविध काळात सुशिक्षित युवकांनी लोकशाही मार्गाने सत्ताबदल घडवून आणला आहे. आसाममधील विद्यार्थी चळवळीमधून नेतृत्व निर्माण झाले आणि लोकशाही प्रक्रियेतून सत्ता प्राप्त झाली. अरविंद केजरीवाल यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून लोकशाही मार्गाने सत्ता मिळवली. दक्षिण भारतात अभिनेता विजय यांनीही राजकारणात प्रवेश करून लोकशाही प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला. यावरून स्पष्ट होते की भारतातील युवक परिवर्तनासाठी मतपेटी आणि लोकशाही व्यवस्थेलाच सर्वात प्रभावी साधन मानतात.

युवकांनी हेही लक्षात घ्यावे की सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जनाधार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लाखो फॉलोअर्स असणे आणि हजारो समर्पित कार्यकर्ते असणे यात मोठा फरक आहे. एखाद्या संघटनेची खरी ताकद तिच्या सेवा कार्यात, संघटनशक्तीत आणि समाजाशी असलेल्या जिवंत नात्यात असते. जी संघटना शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, आपत्ती निवारण आणि समाजसेवा यासाठी सातत्याने कार्य करते, तिलाच टिकाऊ जनसमर्थन प्राप्त होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुयायी मिळतात, पण खरे जनसमर्थन मिळत नाही, हे आपण नुकतेच अनुभवले आहे. यामधून एक महत्त्वाचा धडा मिळतो: केवळ प्रचार पुरेसा नसतो. समाजाचा विश्वास जिंकण्यासाठी सातत्यपूर्ण सेवा, संपर्क आणि संघटन उभारणी आवश्यक असते. उदाहरणार्थ, शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक सामाजिक संघटना म्हणून जनतेत लोकप्रिय आणि प्रभावी आहे.
 
विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी  आंदोलनांमध्ये सहभागी होताना विवेकाने निर्णय घेतला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आणि कायदेशीर आंदोलन हा नागरिकांचा अधिकार आहे. परंतु कोणत्याही आंदोलनात अराजक प्रवृत्तीचे लोक घुसले आणि हिंसा किंवा तोडफोड झाली, तर त्याचे परिणाम अनेकदा निरपराध युवकांनाही भोगावे लागू शकतात. न्यायालयीन प्रक्रिया अनेक वर्षे चालू शकते. अशा वादांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, स्पर्धा परीक्षांवर आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होऊ शकतो. आजच्या स्पर्धात्मक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रत्येक कृतीचे दूरगामी परिणाम लक्षात घेतले पाहिजेत.
 
याचा अर्थ असा नाही की युवकांनी समाज आणि राष्ट्राच्या प्रश्नांपासून दूर राहावे. उलट त्यांनी प्रथम स्वतःला सक्षम बनवावे. ज्ञान, कौशल्य, चारित्र्य आणि आर्थिक स्वावलंबन प्राप्त केल्यानंतर समाजासाठी केलेले कार्य अधिक प्रभावी ठरते. इतिहासातील अनेक महान नेत्यांनी प्रथम शिक्षण पूर्ण केले, स्वतःला घडवले आणि त्यानंतर समाजकार्यात प्रवेश केला.महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यांनी केवळ विरोध केला नाही, तर राष्ट्रनिर्माणाची व्यापक दृष्टीही दिली.
 
सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात स्वामी दयानंद सरस्वती यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या गुरु विरजानंद यांच्याकडून वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्रांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा भ्रमण करून समाजातील समस्या समजून घेतल्या. अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र, जादूटोणा, खर्चिक कर्मकांड आणि विविध सामाजिक कुरीतींविरुद्ध त्यांनी जागृती केली. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढे शिक्षणाच्या प्रसारासाठी डी..व्ही. संस्थांसारख्या शैक्षणिक परंपरांना प्रेरणा मिळाली. हे उदाहरण आपल्याला सांगते की चिरस्थायी सामाजिक परिवर्तनासाठी सखोल अध्ययन, चिंतन आणि संघटन उभारणी आवश्यक असते.
 
आजचा विद्यार्थी जर खरोखर समाजपरिवर्तन घडवू इच्छित असेल, तर त्याने तीन गोष्टी केल्या पाहिजेत. प्रथम- स्वतःच्या शिक्षणावर आणि कौशल्यविकासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. द्वितीय- एखाद्या प्रत्यक्ष समाजसेवा कार्याशी जोडले जावे, जसे की गरजू मुलांना शिकवणे, पर्यावरण संवर्धन, रक्तदान किंवा कौशल्य प्रशिक्षण. तृतीय- लोकशाही प्रक्रियेचे ज्ञान घेऊन सजग आणि जबाबदार नागरिक बनावे.

लोकशाहीत सरकार बदलण्याचे सर्वात प्रभावी आणि स्थायी साधन म्हणजे निवडणूक. जर एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला वाटत असेल की सरकारच्या धोरणांमध्ये त्रुटी आहेत, तर त्यांनी लोकांना आपल्या विचारांशी जोडावे, संघटना उभी करावी आणि लोकशाही मार्गाने जनसमर्थन मिळवावे. हाच मार्ग संविधानसुसंगत आहे आणि दीर्घकालीन यश मिळवून देणारा आहे.
 
शेवटी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, क्षणिक भावनेपेक्षा दीर्घकालीन निर्मिती अधिक महत्त्वाची असते. घोषणा देण्यापेक्षा ज्ञान मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा चारित्र्यनिर्मिती अधिक महत्त्वाची आहे. आणि केवळ विरोध करण्यापेक्षा समाज राष्ट्राला पुढे नेणारा सकारात्मक पर्याय उभा करणे अधिक महत्त्वाचे आहे.

 

Thursday, June 25, 2026

वेदवाणी: यशाची गुरुकिल्ली - विद्या, आरोग्य आणि पुरुषार्थ



प्राचीन काळापासून वेद हे संपूर्ण जगाला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची दिव्य प्रेरणा देत आले आहेत. केवळ आध्यात्मिक प्रगतीच नव्हे
, तर श्रेष्ठ विद्या प्राप्त करणे आणि तिचा समाजासाठी प्रचार-प्रसार करणे यावर वेदांचा मुख्य भर राहिला आहे. आळसाचा पूर्णपणे त्याग करून शरीराने निरोगी राहणे आणि अखंड पुरुषार्थ करणे, हाच मानवी जीवनाचा खरा उद्देश असल्याचे वेद आपल्याला सांगतात. यजुर्वेदातील खालील ऋचेमध्ये (मंत्रात) नेमका हाच यशस्वी जीवन जगण्याचा संदेश अत्यंत सुंदर रितीने दिला आहे."

कस्त्वा युनक्ति स त्वा युनक्ति कस्मै त्वा युनक्ति तस्मै त्वा युनक्ति। कर्मणे वाँवेषाय वाम् ॥यजु.१.६॥

वेद मंत्राचा अर्थ आणि उपदेश: या मंत्रात प्रश्नोत्तराच्या रूपाने परमेश्वराने जीवांना उपदेश केला आहे.

प्रश्न:कोण मला सत्कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो?’

उत्तर: तो प्रजापती म्हणजेच परमेश्वरच तुम्हांला वेदाच्या उपदेशाच्या माध्यमातून पुरुषार्थ करण्याची आणि उत्तम, चांगले कर्म करण्याची प्रेरणा देतो.

विद्यार्थ्याचा विद्वानास प्रश्न:कोण आहे जो अंतर्यामीरूपाने माझ्या आत्म्यामध्ये सत्याचा प्रकाश करतो?’

विद्वानाचे उत्तर:सर्वव्यापक जगदीश्वर सत्याचा प्रकाश देतो.’

प्रश्न: 'तो परमेश्वर आम्हांला कोण-कोणत्या प्रयोजनासाठी उपदेश करतो आणि आज्ञा देतो?’

उत्तर:सुखाच्या प्राप्तीकरिता, सुखस्वरूप परमेश्वराच्या प्राप्तीकरिता आणि सत्य-विद्या व सत्य-धर्माच्या प्रसाराकरिता.’

प्रश्न:तो ईश्वर मला आणि तुम्हांला कोणते कर्म करण्यासाठी उपदेश देतो?’

उत्तर:यज्ञ करण्यासाठी.’

प्रश्न:तो कोण-कोणत्या पदार्थांच्या प्राप्तीसाठी आज्ञा करतो?’

उत्तर:सर्व विद्यांच्या प्राप्तीसाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी.’
 
या ऋचेत ऋषि म्हणतात,  माणसाने प्रामुख्याने दोन उद्दिष्टांसाठी प्रवृत्त व्हावे-
पहिले म्हणजे पुरुषार्थ करणे व शरीर निरोगी ठेवून चक्रवर्ती राज्यपदाची प्राप्ती करणे; आणि दुसरे उद्दिष्ट म्हणजे सर्व विद्या चांगल्या प्रकारे अवगत करून त्यांचा प्रचार-प्रसार करणे. कोणत्याही माणसाने पुरुषार्थाचा त्याग करून आळसाचा आश्रय कदापि करू नये. (संदर्भ: यजुर्वेद भाष्य - पंडित वेदकुमार वेदालंकार)
 
आधुनिक युगाच्या संदर्भात वरील ऋचेचे विश्लेषण:

आजच्या आधुनिक युगात, एक विद्यार्थी म्हणून विद्या प्राप्त करण्याचा उद्देश काय असावा आणि तो कसा पूर्ण करावा, याचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे:
 
१. विद्या प्राप्तीचा उद्देश (Objective)
 
यजुर्वेदाच्या भाष्यात सांगितलेले दोन मुख्य उद्देश आजच्या आधुनिक भाषेत खालीलप्रमाणे लागू होतात:

चक्रवर्ती राज्यपदाची प्राप्ती (Leadership & Financial Independence): आजच्या काळात 'चक्रवर्ती राज्य' म्हणजे कोणावर जुलूम करणे नव्हे, तर आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान (Excellence) गाठणे. विद्यार्थ्याचा उद्देश केवळ एक नोकरी मिळवणे हा नसून, आपल्या ज्ञानातून उद्योग, तंत्रज्ञान, कला किंवा प्रशासनात नेतृत्व (Leadership) निर्माण करणे हा असला पाहिजे.

निरोगी शरीर आणि पुरुषार्थ: तंत्रज्ञानाच्या युगात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे हा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून आपण आपल्या कौशल्याचा पूर्ण वापर करू शकू.

विद्येचा प्रचार-प्रसार (Social Responsibility): स्वतः शिकून मोठे होणे हा अर्धवट उद्देश झाला. खऱ्या विद्येचा उद्देश 'सामुदायिक विकास' हा आहे. आपण जे शिकलो, त्यातून समाजातील इतरांचे जीवन कसे सुकर करता येईल (उदा. नवीन शोध लावणे, गरजूंना शिकवणे, योग्य मार्गदर्शन करणे) हा व्यापक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे.
 
२. हा उद्देश कसा पूर्ण करावा? (Implementation with Modern Examples)
 
आळसाचा त्याग आणि सातत्य (Overcoming Procrastination): भाष्यात स्पष्ट म्हटले आहे की, "माणसाने पुरुषार्थाचा त्याग करून आलस्याचे ग्रहण कदापी करू नये." आजच्या काळात सोशल मीडियाचे व्यसन आणि रिल्स पाहण्यात वेळ घालवणे हा आधुनिक आळस आहे. यावर मात करून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

कौशल्याधारित शिक्षण (Skill-based Learning): केवळ पदवी (Degree) मिळवणे म्हणजे विद्या नव्हे. आजच्या उदाहरणाने सांगायचे तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा सायन्स, कोडिंग, किंवा कोणतीही व्यावसायिक कला आत्मसात करून त्यात 'उत्कृष्टता' मिळवणे म्हणजे खरा पुरुषार्थ होय.

ज्ञानाचा समाजासाठी उपयोग (Knowledge Sharing): आजचे तरुण ओपन सोर्स सॉफ्टवेअर बनवतात, डिजिटल माध्यमांतून मोफत शिक्षण देतात किंवा स्टार्टअप्स सुरू करून नवीन रोजगार निर्माण करतात. हे यजुर्वेदातील 'विद्येच्या प्रचाराचे' उत्तम आधुनिक उदाहरण आहे.
 
अखंड पुरुषार्थाची आधुनिक प्रेरणादायी उदाहरणे
 
यजुर्वेदाने सांगितलेला हा अखंड पुरुषार्थ आणि विद्येचा प्रसार आजच्या काळात खालील महान व्यक्तींच्या उदाहरणांतून स्पष्टपणे दिसून येतो:
 
१. योग आणि शिक्षण क्षेत्र (बाबा रामदेव): योगऋषी बाबा रामदेव हे अखंड पुरुषार्थाचे उत्तम उदाहरण आहेत. ते दररोज पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत अविरत कष्ट करतात. निरोगी शरीर आणि योगाच्या बळावर त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात 'स्वदेशी' आणि आरोग्याचा प्रचार केला. आज 'भारतीय शिक्षण बोर्डा'च्या माध्यमातून ते भारतीय संस्कृती आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसार संपूर्ण देशात करत असून यजुर्वेदाचा आदर्श जिवंत करत आहेत.

२. राजकीय आणि राष्ट्रसेवा क्षेत्र (पंतप्रधान नरेंद्र मोदी): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयाच्या ७५ व्या वर्षीही अत्यंत निरोगी राहून दिवसातील १६-१८ तास काम करतात, जो एक प्रचंड पुरुषार्थ आहे. त्यांनी योग, शिस्तबद्ध जीवनशैली आणि कठोर कष्टांच्या जोरावर भारताला जागतिक पातळीवर एक 'चक्रवर्ती' म्हणजेच अग्रगण्य राष्ट्र बनवण्याचा ध्यास घेतला आहे. 'नवे शैक्षणिक धोरण' (NEP) आणून त्यांनी देशातील तरुणांना कौशल्याधारित आणि सत्य विद्या देण्याचा मोठा मार्ग मोकळा केला आहे.

३. माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्र (एन. आर. नारायण मूर्ती): इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्या तंत्रज्ञानाच्या 'विद्येचा' आणि बुद्धीचा वापर करून भारतात आयटी (IT) क्रांती घडवून आणली. अत्यंत साधी जीवनशैली आणि शिस्तीच्या बळावर त्यांनी शून्यातून प्रचंड पुरुषार्थ केला आणि भारतीय आयटी क्षेत्राला जागतिक पातळीवर सर्वोच्च (चक्रवर्ती) स्थान मिळवून दिले. त्यांनी केवळ स्वतःच संपत्ती कमावली नाही, तर लाखो तरुणांना रोजगार देऊन आणि ज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण देशासमोर ठेवले.
 

 

प्रेम म्हणजे देह, मन आणि द्वैताचा अंत

(हा माझा अंतर्जालावरचा पहिला लेख मराठीसृष्टी वर 13.७.2010ला प्रकाशित केला होता. अनेकांनी हा लेख चोरला होता म्हणून तारीख देत आहे).   

खुसरो म्हणतो,

रैन सुहाग की जागी पी के संग,

तन मेरो मन पिऊ को, दोउ भए इक रंग.

लैला-मजनूच्या प्रेमकथा ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणाऱ्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने वेगळे असले तरी त्यांचे हृदय एक होते. लैला-मजनूचं प्रेम हे खरं प्रेम होतं.

आजच्या तरुण पिढीच्या प्रेमाच्या कल्पना काय आहेत? तो स्मार्ट, ती सुंदर. त्याला ती आवडली, तिलाही तो आवडला. त्यांनी एकत्र सिनेमा पाहिला, एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरले, बहरलेल्या यौवनाचा आनंद घेतला. त्यांना वाटलं ते प्रेमात पडले. त्यांनी प्रेमविवाह केला. एकत्र एकाच घरात राहायला सुरुवात झाली. एकमेकांच्या आवडीनिवडी वादाचे विषय होऊ लागले. शुल्लक गोष्टींवरून भांडणं सुरू झाली. दोघांचाही अहंकार मोठा होता. परिणाम:

"देहाच्या आकर्षणाने दोघे जवळ आले,
प्रेमाअभावी ते शीघ्र 'डायव्होर्सी' झाले."

'ती' म्हणते, "मी प्रेमात आंधळी झाले होते."
'तो' म्हणतो, "मी मूर्ख होतो, म्हणून हिच्या प्रेमात पडलो."
पडणारच! कारण त्यांना प्रेमाचा अर्थ कळलेला नव्हता.

काहींचं प्रेम विवाहापर्यंत पोहोचतच नाही. कारण देहाचं आकर्षण क्षणभंगुर असतं. ते संपलं की प्रेमही संपतं. तो किंवा ती, कोणी तरी एक प्रेमभंगाला कारणीभूत ठरतो. आपण वर्तमानपत्रांत रोज वाचतो प्रेमभंगामुळे कोणी आत्महत्या करतो, तर कोणी खूनही. कारण त्यांनाही प्रेमाचा अर्थ कळलेला नसतो.

काही जण आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रेमाचा देखावा करतात. "मी डॉक्टर, तीही डॉक्टर. आपण एकत्र आलो तर चैनित आयुष्य जाईल." किंवा दोघंही नोकरी करणारे स्वार्थ मनात ठेवून प्रेम करतात. याला काय म्हणायचं?

"प्रेमाचा देखावा आज फायद्याचा सौदा आहे,
विवाहसुद्धा आज देहभोगाचा करार आहे."

स्वार्थापोटी केलेलं प्रेम भंग पावणारच. मग घटस्फोट होणारच, यात आश्चर्य नाही. कारण त्यांनाही प्रेमाचा अर्थ कळलेला नाही.

मग प्रेम म्हणजे काय?

आपल्या सौंदर्याचा अभिमान बाळगून पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती, कामदेवाच्या मदतीने शंकराचं प्रेम जिंकायला निघाली. परिणाम काय झाला? शंकराने आपलं तिसरं नेत्र उघडलं आणि कामदेव भस्म झाला. पार्वतीला आपली चूक कळली. तिने तपस्येचा मार्ग धरला. आपला अहंकार, अभिमान इत्यादी तपस्येच्या अग्नीत भस्म केले. अखेर शंकर प्रसन्न झाले. पार्वतीलाही प्रेमाचा अर्थ कळला.

आपण पाहतोच—वसंतात बहरलेल्या कच्च्या कैरीला ग्रीष्माच्या उन्हात तपावं लागतं, तेव्हाच रसाळ, मधुर आंबा मिळतो. आपल्या मनातील विकारांना अग्नीत भस्म केल्याशिवाय प्रेमाचा अर्थ कळणं अशक्य. म्हणूनच एका उर्दू शायरने प्रेमाबद्दल म्हटलं आहे:

"इक आग का दरिया है, तैर के जाना है."

आगीचा दरिया पार करण्यासाठी डोळे उघडे असायला हवेत. आंधळ्या माणसाचं हे काम नव्हे. एकदा शेजारच्या आजीला विचारलं, "तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? प्रेमाचा अर्थ काय?"

आजीनं उत्तर दिलं "प्रेमाचं तर सोडा, त्या काळी लग्नाआधी मुलाला मुलगी दाखवण्याची पद्धतच नव्हती. बायको म्हणजे आईच्या मदतीला घरकामासाठी आणलेली हक्काची बाई. ती आपल्याला देहसुखही देते आणि घराला वारसही. त्या काळी बायकांना कष्ट करावेच लागायचे. कधी-कधी मारही खावा लागायचा. आपलं माहेर विसरून नवऱ्यासाठीच आयुष्य आहे, हे मनात ठरवून सासरी संसार सुरू केला.

काही वर्षांत चित्र बदललं. एका दुसऱ्याची सवय लागली. त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. माझ्यासाठी त्यांनी आपला स्वभावही बदलला. माझ्या आवडीनिवडींकडे ते जातीने लक्ष देऊ लागले. मला काय हवंय, हे न सांगताच समजू लागले. आज एका दुसऱ्याच्या मनात काय आहे, हे न बोलताच आम्ही समजू शकतो. आता त्यांच्या मनात काय विचार चालला आहे, हे मी सांगू शकते.

त्यागाशिवाय प्रेम संपादन करता येत नाही, हेच खरं. संसाराचे चटके बसल्याशिवाय प्रेमाचा अर्थ कळणं अशक्यच." आजीचं बोलणं मला पटलं. आजीनं खरोखरच तपस्या केली होती, म्हणून तिला प्रेमाचा अर्थ कळला होता. असं प्रेम पाहूनच अमीर खुसरो म्हणतो,

"रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को, दोउ भए इक रंग."

शरीराने वेगळे असले तरी प्रेमाच्या रंगात भिजून दोघांचं हृदय एक झालं होतं. कारण प्रेमात द्वैत नाही. सूफी संतांच्या मते लौकिक प्रेम ही अलौकिक प्रेमाची पायरी आहे. ज्याच्या हृदयात प्रेम आहे, तोच ईश्वराला प्राप्त करू शकतो.

याचा अर्थ लग्नाआधी प्रेम करू नये, असा नाही. प्रेम अवश्य करा. पण आपण प्रेमात पडलो आहोत असं वाटत असेल, तर डोळे उघडा. स्वतःलाच प्रश्न विचारा, हे देहाचं आकर्षण तर नाही ना? यात आपला स्वार्थ तर नाही ना? कुठल्याही परिस्थितीत आपण त्याचा/तिचा साथ देऊ शकतो का? त्याच्या/तिच्यासाठी आपण आपल्या सर्वस्वाचाअर्थात अहंकार, अभिमान इत्यादींचा, त्याग करू शकतो का?

याचं उत्तर "हो" असेल, तरच पुढे पाऊल उचला. अन्यथा प्रेमात पडणारच. खऱ्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी तपस्या करावीच लागते. दोघांना शरीराने आणि मनाने एक व्हावं लागतं. तेव्हाच प्रेमाची प्राप्ती होते. म्हणूनच कबीरदास म्हणतात,

"जब मैं था तब हरि नाही, जब हरि है मैं नाही,
प्रेम गली अति सांकरी, जामे दो न समाई."