Tuesday, February 3, 2026

शोध अंतर्मनातील प्रेमाचं

 

खरं प्रेम शोधण्यासाठी तो घराबाहेर पडला. संध्याकाळच्या कुंद प्रकाशात-पायाखाली वाळलेली पाने चुरडत, तो चालत होता. त्याला अनुभवायचा होता प्रेमाचा खरा स्पर्श- जो शब्दांपलीकडचा होता. पण प्रेमाच्या वर्तुळाचे दुसरे टोक त्याला कधीच सापडलं नाही. तो आयुष्यभर कोरडाच राहिला… आणि खरं तर, कोणालाच सापडले आहे का?

हे जग म्हणजे  मोह, माया आणि वासनांचे भोवरे. आपण या भोवर्‍यांतच  गटांगळ्या खात राहतो. प्रेमाच्या गूढ, अथांग महासागरचा स्पर्श आपल्याला होतच नाही. तो अनुभवायचा असेल तर, गरज आहे अहंकाराने बंद झालेल्या हृदयाच्या कपाटांना उघडण्याची. जेव्हा हे कपाट उघडतील, तेव्हा प्रेमाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसेल.

त्या प्रकाशात कळेल, जल, थल, नभ- संपूर्ण चराचर सृष्टीत फक्त एकच तत्त्व व्यापलेलं आहे. ते म्हणजे प्रेम.  प्रेम दृश्य ही आहे आणि अदृश्य ही आहे. ह्या प्रेमामुळे जगाचे अस्तित्व टिकून आहे.ते अनुभवायचं असेल, तर स्वतःच्या आत डोकवावं लागत, बाहेर ते कधीच मिळणार नाही. 

 

 

Friday, January 30, 2026

आंब्याच्या झाडवरचे सरडे

सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात.  (चाट जीपीटीच्या मदतीने बनविलेले चित्र)

 








सरकार
 बदलली तरी चेहरे जुनेच होते

टोपी बदलली तरी  नियत तीच होती.


रंग बदलणारे सरडेच   आंब्याच्या झाडावर होते.

जनतेच्या पैश्यांवरती त्यांचे डोळे खिळले होते.

Monday, January 26, 2026

माझी कामधेनु

लग्नकरून एक हक्काची स्त्री घरात आणली. तिच्या पुढ्यात चारा टाकला.  चार्‍याच्या बदल्यात बदल्यात तिने भरपूर दूध दिले. ती तिचे  कर्तव्य चोख बजावत होती.  त्यात कसले आले प्रेम, हा माझा शूद्र पुरुषी विचार होता. हास्पिटलच्या बेड वर मृत्यशी झुंज देत होतो. माझ्या थरथरत्या शरीराला तिने दोन्ही हातांनी पकडून बेडवर बसविले. त्यावेळी तिच्या डोळ्यांत डोकावून पहिले. तिथे होते निखळ निरागस प्रेम. मनात विचार आला, का ओळखू शकलो नाही तिचे प्रेम. मला माझीच लाज वाटू लागली. मी तिचा हात घट्ट पकडला आणि कांपर्‍या आवाजात म्हणालो, भीती वाटते मला. ती कणखर आवाजात म्हणाली, काही नाही होणार तुम्हाला. मी आहे, ना! त्या क्षणी ती मला आपल्या पतीसाठी यमराजाशी झुंज देणारी सावित्री वाटली.  प्रेमाच्या माणसांसाठी सर्वस्व अर्पण करणारी , संसारात सुखाचे रंग भरणारी, खरोखर कामधेनुच ती. 

Thursday, January 22, 2026

छोट्या कुटुंबाचे महत्त्व : दासबोधाच्या दृष्टीने

आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठीहम दो, हमारे दोयोजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते. आपल्या धर्मात पूर्वापासून पुत्रप्राप्ती ही गृहस्थाश्रमातील एक पवित्र धार्मिक उद्देश मानली जाते, जी पितृऋण चुकवण्यासाठी, कुलवृद्धीसाठी आणि वंशपरंपरेच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. चाणक्यनीतीतील एका श्लोकात म्हटले आहे:

एकोऽपि गुणवान् पुत्रो निर्गुणेन शतेन किम्।
एकश्चन्द्रस् तमो हन्ति ताराः सहस्रशः॥

याचा अर्थ असा की एकच गुणवान पुत्र शंभर निःगुण पुत्रांपेक्षा श्रेष्ठ असतो; जसा एकच चंद्र अंधकार दूर करतो, तसे हजारो तारे करू शकत नाहीत. या श्लोकातून संतानोत्पत्तीचा उद्देश वासना किंवा संख्या वाढवणे नसून, सद्गुणी पुत्राला जन्म देणे आहे, जो ज्ञान, धर्म आणि सामर्थ्याने युक्त राहून कुटुंबाची उन्नती करेल, पितरांचे तृप्त करेल आणि जीवनाला सार्थकता देईल. धर्माची शिकवण अशी की पुत्र हे ओझे नसून गुणवान वारसा आहे, ज्यामुळे कुलाची ज्योती कायम राहते.

समर्थ रामदास स्वामींनी देशांटण करताना जास्त संतान असलेल्या कुटुंबांची दारुण दशा पाहिली असेल. श्रीमत् दासबोधातील दशक तिसरा आणि समास चौथा यात त्यांनी मोठ्या कुटुंबामुळे (उदंड अपत्यांमुळे) निर्माण होणारे दारिद्र्य, चिंता, उद्वेग आणि कष्टांचे मार्मिक वर्णन केले आहे. एका श्रीमंत व्यक्तीच्या कथेद्वारे त्यांनी दाखवले की अनेक मुलांना जन्म दिल्यामुळे संपत्तीचा नाश झाला, कुटुंब भिकारट झाले आणि जीवन दुःखमय झाले. या कथेतून समर्थ अप्रत्यक्षपणे छोट्या कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करतात. जास्त मुले म्हणजे जास्त जबाबदारी; त्यामुळे धन-वैभवाची रक्षा होत नाही, वैयक्तिक सामर्थ्य विखुरते आणि ईश्वरभक्ती विसरते.

समर्थ म्हणतात:

लेंकुरें उदंड जालीं। तों ते लक्ष्मी निघोन गेली।
बापडीं भिकेसी लागलीं। कांहीं खाया मिळेना॥

जास्त मुले झाल्याने कुटुंबाचा खर्च वाढतो, पगार अपुरा पडतो, संपत्ती नष्ट होते आणि पोटभर अन्नही मिळत नाही. मोठ्या परिवाराचे पोट भरण्यासाठी खर्च वाढत जातो पण उत्पन्न वाढत नाही. मुलींच्या लग्नासाठी पैशाची कमतरता भासते, त्यामुळे घरातील मूल्यवान वस्तू सावकाराकडे गहाण ठेवाव्या लागतात. कर्जाचे ओझे वाढते आणि भिक्षा मागण्याची वेळ येते. कर्त्या पुरुषाला घरदार सोडून परदेशात नीच नोकऱ्या कराव्या लागतात. अतोनात मेहनतीमुळे मानसिक ताण वाढतो आणि शरीराला रोगराई लागते.
या कथेचा सारांश असा की मोठ्या कुटुंबात जीवन सुखाऐवजी दुःखाचे केंद्र बनते; माणूस ईश्वरस्मरण विसरून प्रपंचाच्या ओझ्यात बुडतो. कुटुंबाचे पालन करता करता त्याची शक्ती संपते आणि शेवटी कोणीही त्याच्या उपयोगाला येत नाही. म्हणूनच समर्थांनी म्हटले आहे:

कुटुंबकाबाडीं कानकोंडा। जाला ईश्वरीं।
प्रपंच ओझे वाढले सुख नाहीं॥

मोठ्या कुटुंबात सततच्या भांडणांमुळे आणि गोंधळामुळे जीवनात शांतता राहत नाही. प्रपंचाचे ओझे वाढते, पण त्यातून खरे सुख मिळत नाही.

समर्थांनी त्या काळातच परिवार नियोजनाचे महत्त्व ओळखले होते. त्यांच्या दृष्टिकोनातून छोटे कुटुंब असल्यास आर्थिक स्थैर्य टिकते, खर्च नियंत्रित राहतो आणि संसाधनांचा योग्य वापर होतो. मानसिक शांती वाढते आणि परस्परांतील प्रेम दृढ होते. घरातील प्रमुखाला छोटे कुटुंब असल्यामुळे आई-वडील, पत्नी आणि एक-दोन मुलांकडे पुरेसा वेळ, योग्य लक्ष आणि स्नेह देता येतो. त्यांच्या आरोग्याकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येते आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करता येतात. यामुळे परिवारीक जीवन सुखी, सामर्थ्यपूर्ण आणि भक्तिमय होते. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, छोटे कुटुंब हे केवळ सामाजिक गरज नसून अध्यात्मिक प्रगतीसाठीही आधारभूत पाया आहे.
 

Sunday, January 18, 2026

हडताल आणि विश्वासघात

शर्माजी गेली वीस वर्षं एका औद्योगिक नगरीतील एका फॅक्टरीत सुपरवायझर म्हणून काम करत होते. ते साधे-भोळे, प्रामाणिकपणे काम करणारे होते. त्यांच्या मुलाने नुकतीच इंजिनिअरिंगची परीक्षा पास केली होती आणि तो नोकरीच्या शोधात होता.

एक दिवस स्थानिक कामगार संघटनेचे प्रभावी नेताजी फॅक्टरीत आले. त्यांनी शर्माजींना सांगितलं, “शर्माजी, उद्या हडताल आहे. तुम्ही आमच्या सोबत उभे राहा. मी तुमच्या मुलाला याच फॅक्टरीत नोकरी मिळवून देतो.” शर्माजींना मनात शंका होती, पण मुलाच्या भवितव्यासाठी त्यांनी साथ दिली.

दुसऱ्या दिवशी फॅक्टरीच्या गेटवर घोषणाबाजी सुरू झाली—“नेताजी जिंदाबाद! मालक मुर्दाबाद!” पोलिसांनी गर्दीवर धाव घेतली. शर्माजींसह अनेक कामगारांना बसमध्ये कोंबून दूर नेलं. काही तासांनी सर्वांना सोडून दिलं.

पण सकाळी फॅक्टरीच्या गेटवर गार्डने एक लिफाफा शर्माजींच्या हातात दिला. त्यात लिहिलं होतं:


“शर्माजी, तुम्हाला फॅक्टरीत तोडफोड व दंगा करण्याच्या आरोपाखाली नोकरीतून बरखास्त करण्यात येत आहे.”

शर्माजी हादरले. ते नेताजींना भेटायला गेले, पण नेताजी भेटले नाहीत. उलट नेताजींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की तोडफोड करणारे त्यांच्या युनियनचे नव्हते. शर्माजींच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. आता पगार नाही, पेन्शन नाही. कोर्ट-कचेरी, पोलिस स्टेशन, वकिलांचे खर्च. मुलाची नोकरी तर दूरच, आता घर चालवणंही कठीण झालं. दुसरीकडे नोकरी मिळवणंही अवघड झालं होतं.

काही आठवड्यांत फॅक्टरीत ४० नवीन कंत्राटी कामगार कमी पगारावर रुजू झाले. नेताजींनी नवीन मर्सिडीज विकत घेतली. पण शर्माजींचं आयुष्य उध्वस्त झालं.

ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही. एकट्या मुंबईतच श्रमिक नेत्यांच्या नादी लागून हजारो शर्माजी बेरोजगार झाले होते.


Wednesday, January 14, 2026

राजकुमारी आणि दर्पण


एक राजकुमारी होती. तिचे सौंदर्य म्हणजे तिच्या अस्तित्वाचा श्वास. तिचे दात मोती सारखे नाजुक मलिन होणारे नव्हते. तिचे दात होते हिर्‍यासारखे पांढरे शुभ्र, टणक, होते. जेंव्हा ती हसायची तेंव्हा असे वाटायचे जणू निसर्गाने पांढर्‍या शुभ्र फुलांची बरसात केली आहे.   

राजकुमारीला नटण्या-मुरडण्याची विलक्षण हौस होती. तिचा वार्डरोब म्हणजे एक जागतिक संग्रहालय होता. त्यात पॅरिसच्या रॅम्पवर चालणारे कपडे, राजस्थानच्या रंगीबेरंगी लहंग्यांपासून ते महाराष्ट्राच्या नववारी साड्यांपर्यंत विविध प्रकारचे वस्त्र होते. तिच्या प्रत्येक वस्त्रात सौंदर्याची एक नवी कथा विणलेली होती. महालात एक दर्पण होता— साधा नव्हे, बोलणारा. तो तिचा विश्वासू सखा होता. दर सकाळी ती नटून-थटून त्याच्यासमोर उभी राहायची आणि विचारायची,

“सांग दर्पणा, कशी मी दिसते?”

दर्पण उत्तर द्यायचा,

“सुंदर... सुंदर... सुंदर...”

ती हसायची, सेल्फी काढायची, आणि सोशल मीडियावर टाकायची. पण एक दिवस काहीतरी वेगळं घडलं. ती नववारी साडी नेसून दर्पणासमोर उभी राहिली. तिच्या मनात एक विचार चमकून गेला—

“आज सेल्फी दर्पणातल्या माझ्या प्रतिमेसोबत घेते.”

ती दर्पणातळ्या प्रतिमेसोबत  सेल्फी घेतते आणि विचारते,

“सांग दर्पणा, मी जास्त सुंदर दिसते की माझी प्रतिमा?”

दर्पण गोंधळला. तो राजकारणी नव्हता, जे डिप्लोमॅटिक उत्तर देतात. त्याला खरे बोलण्याची सवय होती. तो म्हणाला,

“राजकुमारी, तुझी प्रतिमा तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते.”

राजकुमारीचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला. तिच्या सौंदर्याला तिच्याच प्रतिमेने आव्हान दिले होते.  तिला ते सहन होणे शक्यच नव्हते. 

दुसऱ्या दिवशी सफाईवाल्याला कचर्‍याच्या ढिगात काही काचेचे तुकडे सापडले...

 

Saturday, January 10, 2026

विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर

बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला.
 
पाहतो कायभीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा. त्याची आज्ञा घेता भावंडांनी पाणी प्यायले असावे, म्हणून यक्षाने त्यांना दंडित केले असावे.
 
युधिष्ठिराने यक्षाला पुकारले, “हे यक्षदेव, तुम्ही दयाळू आहात. या वाळवंटात पाण्याचे संरक्षण करून प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य करत आहात. माझ्या भावंडांकडून चूक झाली, कृपया त्यांना क्षमा करा.”
 
युधिष्ठिराचा पुकारा ऐकून यक्ष प्रकट झाला. युधिष्ठिराने त्याला प्रणाम केला आणि भावंडांच्या प्राणांची भीक मागितली. यक्ष म्हणाला, “युधिष्ठिर, मी कोण क्षमा करणारा? तुझी तहानेने व्याकूळ भावंडे या सरोवरावर आली. त्यांनी पाणी पिण्याची माझी परवानगी मागितली. पण हे पाणी अत्यंत दूषित आणि विषारी आहे, म्हणून मी नकार दिला. त्यांनी माझे ऐकले नाही. पाणी प्राशन केले आणि मृत्यूमुखी पडले.”

युधिष्ठिराने पुन्हा हात जोडून विनंती केली, “हे यक्षदेव, आपण सर्वज्ञ आहात. यावर काही उपाय असेल का

यक्ष म्हणाला, पूर्वी हिमालयात संजीवनी बुटी मिळायची. तीच आणून हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. पण आज हिमालयावर एकही वृक्ष नाही. संजीवनी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.” क्षणभर थांबून यक्षाने युधिष्ठिराला विचारले, “जीवनाचे अंतिम सत्य काय आहे?”

युधिष्ठिर म्हणाला, “मृत्यू हेच जीवनाचे शेवटचे सत्य आहे.”

यक्ष अट्टहासाने हसत म्हणाला, “युधिष्ठिर, तुला जीवनाचे सत्य माहित आहे, हे चांगलेच. तुझे बंधू जिवंत होऊ शकत नाहीत. इथे दूर-दूर पिण्यालायक पाणीही नाही. तुझ्यासमोर दोनच मार्ग आहेतया सरोवराचे विषारी पाणी पिऊन काही क्षणांत मृत्यू स्वीकार किंवा तहानेने तडफडत मृत्यूला सामोरे जा.”
 
हे सांगून यक्ष अदृश्य झाला.
 
युधिष्ठिर काही वेळ विचारात गढून गेला. “मरण निश्चित आहे, तर भावंडांसोबत मेलेले बरे,” असा विचार करून त्याने विषारी पाणी प्राशन केले. तहान शांत झाली. काही क्षणांत तोही निष्प्राण झाला.
 
पाचही पांडव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडले होते. महाभारताचा अवेळीच अंत झाला. सत्याचा विजय नव्हता, हा प्रदूषणाचा मानवावर विजय झाला होता.