Friday, February 20, 2026

द्रोणाचार्यांची चातुरी : एकलव्याने प्रतियोगिता जिंकली

हस्तिनापूरचे गुरुकुल त्या काळातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षण संस्था होती. हे विशाल गुरुकुल फक्त देशी-विदेशी राजकुमारांसाठी राखीव होते. गुरुकुलात सकाळी भाषा, गणित, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायव्यवस्था, राजकारण इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जात असे. दुपारनंतर गुरुकुलाच्या विस्तीर्ण मैदानावर अस्त्र-शस्त्रांचे कठोर प्रशिक्षण राजकुमारांना दिले जात असे. गुरुकुलाच्या काही दूरवर धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र होते. त्या केंद्राचे प्रमुख आचार्य गुरु द्रोणाचार्य होते. हस्तिनापूर राज्याकडून त्यांना मान-सन्मानासह उत्तम वेतन मिळत होते. राजकुमारांना शिकवली जाणारी गूढ विद्या इतर कुणालाही शिकवायची नाही, ही अट होती. खासगी शिकवणी घेण्यास त्यांच्यावर बंदी होती.
 
गुरु द्रोणाचार्य अत्यंत चतुर होते. त्यांचे मेहुणे कृपाचार्य तिथे सकाळी धनुर्विद्येचे प्रशिक्षण त्यांच्या शिष्यांना द्यायचे, पण प्रत्यक्षात द्रोणाचार्य सर्वांना प्रशिक्षण देत असत. त्यासाठी महिन्याकाठी मोठी गुरुदक्षिणा त्यांना मिळत असे. निषादराज हिरण्यधनूचा पुत्र एकलव्य ही कृपाचार्यांचा शिष्य होता.
 
हस्तिनापूर राज्यात दर चार वर्षांनी युद्ध-शस्त्र कलेची प्रतियोगिता होत असे. ही प्रतियोगिता सर्वांसाठी खुली होती. प्रथम पुरस्कार लाख सुवर्णमुद्रा होता, पण उत्तम प्रदर्शन करणाऱ्यांनाही अनेक पुरस्कार मिळत असे. याशिवाय भारतखंडातील राजे-महाराजे उत्तम प्रदर्शन करणाऱ्या प्रतियोगींना त्यांच्या राज्यांत नोकरी देत असत. त्यामुळे संपूर्ण भारतखंडातून हजारो प्रतियोगी या स्पर्धेत भाग घेत असत.
 
एका दिवशी अर्जुनाला वार्ता मिळाली की गुरु द्रोणाचार्य नियमभंग करून राजकुमारांच्या व्यतिरिक्त इतरांना धनुर्विद्येचे गूढ शिकवतात. हस्तिनापूरात अफवा पसरली होती की यावर्षी होणारी धनुर्विद्येची प्रतियोगिता द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य एकलव्य जिंकणार आहे.
 
अर्जुनाने ही वार्ता युधिष्ठिराला सांगितली. युधिष्ठिराने वेळ गमावता हस्तिनापूर गुरुकुलाचे प्रमुख भीष्म पितामह यांच्याकडे गुरु द्रोणाचार्यांची तक्रार केली. पितामह भीष्मांनी द्रोणाचार्यांना जाब विचारला. द्रोणाचार्य म्हणाले, “एकलव्य हा माझा शिष्य नाही. मी पहाटे उठून धनुर्विद्येचा सराव करतो. त्यावेळी तिथे कुणीच नसते. कदाचित एकलव्य मला सराव करताना चोरून पाहत असेल.”
 
भीष्म पितामह म्हणाले, “याचा अर्थ एकलव्य चोरून विद्या ग्रहण करत होता.” विदुर म्हणाले, “पितामह, द्रव्य, वस्तू, जनावरे इत्यादी चोरीसाठी दंड देण्याची व्यवस्था आपल्या कायद्यांत आहे. पण विद्या चोरीसाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे एकलव्याला आपण दंड देऊ शकत नाही. चोरी गुरु द्रोणाचार्यांच्या विद्येची आहे. त्यांनाच शिक्षा ठरवू द्या.”
 
द्रोणाचार्य म्हणाले, “त्याने चोरून का होईना माझ्याकडून विद्या शिकली. त्यामुळे आता मी त्याचा गुरु झालो आहे. मी गुरुदक्षिणेत त्याच्या उजव्या हाताचा अंगठा त्याच्या कडून मागतो.” भीष्म पितामहांनी सहमती दिली. एकलव्याने सहर्ष आपला उजव्या हाताचा अंगठा द्रोणाचार्यांना समर्पित केला. आता द्रोणाचार्य एकलव्याला उघडपणे धनुर्विद्या शिकवू लागले.
 
काही महिन्यांनी हस्तिनापूरमध्ये धनुर्विद्येची स्पर्धा भरली. भरतखंडातील हजारो स्पर्धकांनी त्यात भाग घेतला. साहजिकच कृपाचार्यांचे शिष्यही त्यात सहभागी झाले. प्रतियोगिता सुरू झाली. कर्णाने शंभर पैकी 91 गुण मिळविले, तर अर्जुनाने 92 गुण मिळवून कर्णाला मात दिली. आपणच प्रतियोगिता जिंकू, हा विश्वास अर्जुनाला होता. पण एकलव्याने 95 गुण घेऊन अर्जुनाला ही मात दिली. सर्वांनी एकलव्याचा जयजयकार केला. अंगठा नसतानाही त्याने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले होते. एक लक्ष सुवर्णमुद्रा त्याने जिंकली. या क्षणाचा फायदा घेऊन दुर्योधनाने मिठी मारून त्याचे अभिनंदन केले.

अर्जुनाला वाटले गुरु द्रोणाचार्याने त्याला दगा दिला आहे. संध्याकाळी अर्जुनाने कृष्णाला विचारले, “अंगठा छाटल्यानंतरही हे कसे शक्य झाले?” कृष्ण म्हणाले, “मित्रा, तू बाण कसा चालवितोस?” अर्जुन म्हणाला, “मी तर्जनी आणि मधल्या बोटाने बाण पकडतो कारण ही बोटे दोरीला स्थिर पकड देतात आणि सोडताना बाणाची दिशा बिघडत नाही.” कृष्ण हसत म्हणाले, “गुरु द्रोणाचार्यांनी नियमांचे पालन करत ही भीष्म पितामह सहित सर्वांना मूर्ख बनविले. तू स्वतः डोळ्यांनी पाहिले की कृपाचार्यांचे सर्वच शिष्य उत्तम प्रदर्शन करत होते. 
 
(काल बागेत फिरताना आमच्या सोसायटीतील एका शेजाऱ्याने मला सांगितले की त्याचा मुलगा एका महागड्या शाळेत शिकतो. शाळेच्या बसेसही एसी आहेत, तरीसुद्धा त्याला कोचिंग लावावे लागले. आश्चर्य म्हणजे त्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तोच शिक्षक शिकवतो जो शाळेत शिकवतो. त्यावरून वरील कथा सुचली)

#महाभारत #द्रोणाचार्य #कृपाचार्य #एकलव्य  
#अर्जुन #युधिष्ठिर #भीष्मपितामह  
#धनुर्विद्या #गुरुदक्षिणा #स्पर्धा  
#इतिहास #पुराणकथा #भारतीयसंस्कृती  
#मराठीसाहित्य #कथा #प्रेरणा
 

Monday, February 16, 2026

पढतमूर्ख: "शब्दांचे ज्ञान, कृतीत अज्ञान"


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या दशक दुसऱ्यातील समास दहाव्यात पढतमूर्खाची (शिकलेल्या मूर्खाची) लक्षणे आणि दोष अतिशय स्पष्टपणे सांगितले आहेत. हे दोष बाह्य विद्वत्ता असूनही अंतरी विवेक आणि सदाचार नसल्यामुळे उद्भवतात. अशा मूर्ख व्यक्तीला अभिमान वाढवतो; तो स्वतःची स्तुती करतो, इतरांचे दोष शोधतो, क्रोधाने कठोर बोलतो, परंतु स्वतःचे अवगुण त्याला दिसत नाहीत. अशा पढतमूर्खांसाठी समर्थ म्हणतात:
 
बहुश्रुत व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा अभिमान धरी ॥३॥
 
समर्थ रामदास सांगतात की काही पुस्तके पाठ करून शिक्षण घेतलेले तथाकथित उच्च शिक्षित लोक स्वतःला विद्वान समजू लागतात. परंतु ग्रंथातील सत्य आणि विवेक त्यांना कळलेले नसते. अशा पढतमूर्खांचे वर्णन करताना समर्थ म्हणतात:
 
समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण
गुण सांगतां पाहे अवगुण तो एक पढतमूर्ख ॥२६॥
 
समर्थ म्हणतात, कोणत्याही ग्रंथाची समीक्षा करण्यापूर्वी तो ग्रंथ वाचला पाहिजे. उत्तम गुरूकडून त्या ग्रंथातील शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतरच त्या ग्रंथाची समीक्षा करावी. ग्रंथातील गुण-दोष यांचे चिंतन करून सार ग्रहण करावे. गुण स्वीकारावेत आणि दोष टाकून द्यावेत. पण पढतमूर्ख ग्रंथ पूर्ण वाचता किंवा अर्धवट वाचून, एखाद्या श्लोकावरून संपूर्ण ग्रंथाचा विरोध करतो. उदाहरणार्थ, मनुस्मृती जाळणाऱ्यांपैकी बहुतेकांनी तो ग्रंथ वाचलेलाच नसतो.
 
वर्तल्याविण शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी
पराधीन गोसावी तो एक पढतमूर्ख ॥३८॥

एखादा माणूस शास्त्र वाचतो, मोठमोठ्या सभा घेऊन ब्रह्म ज्ञानावर भाषण करतो, पण स्वतःच्या वर्तनात लोभ-क्रोध सोडत नाही . दुसरा एखादा साधू लोकांवर अवलंबून राहतो, प्रपंच हातातून निसटलेला असतो, पण परमार्थाचा साधा अंशही नसतो. \ तिसरा एखादा विद्वान देव- ब्राह्मणांचा द्वेष करतो, फक्त बोलण्यात ज्ञान दाखवतो, पण कृतीत नाही. अश्या सर्वांना समर्थांनी पढतमूर्ख म्हंटले आहे.
 
सारांश: पढतमूर्ख प्रपंचात बुडालेला असतो, स्त्री-कामवासनेला अधीन राहतो, देव-धर्माची निंदा करतो, ब्रह्मज्ञान फक्त तोंडाने सांगतो पण कृतीत आणत नाही, परकीय संगत करतो, व्यसन आणि आळसात रमतो, अतिथी-शरणागतांना त्रास देतो, मत्सर आणि द्वेष धरतो, अनीतीने पैसा कमावतो, भक्तीमार्ग सोडून स्वार्थासाठी ज्ञान वापरतो. परिणामी प्रपंच हातातून निसटतो आणि परमार्थ मिळत नाही.
 
समर्थ म्हणतात विवेक जागृत करून वर्तन सुधारले तरच ज्ञानाचा उपयोग होतो. विवेकाने वागणारा मनुष्य प्रपंचात अडकत नाही, तर परमार्थाकडे वाटचाल करतो. सद्गुण स्वीकारल्याने जीवन सुखी, शांत आणि अर्थपूर्ण होते. लोभ, क्रोध, द्वेष यांचा त्याग करून सत्य, करुणा, संयम यांचा स्वीकार केला तर जीवनाला दिशा मिळते. हेच सद्गुण मनुष्याला शहाणपणाकडे नेतात. अंतरी विवेक, साधना आणि सद्गुण असले तरच जीवन खरेच सुखी आणि अर्थसंगत होते.
 
 

Friday, February 13, 2026

गोटू : क्रिकेटच चेंडू आणि बालपण

 

तेंव्हा माझं वय सुमारे १२ वर्षांचं असेल. अर्थात, थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो होतो. जुन्या दिल्लीत आमचं खेळायचं ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुनेपर्यंत पसरलेले विस्तीर्ण बाग.

मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठं मैदान होतं. मैदानाचा एक भाग स्टीफन कॉलेजचा होता, म्हणून त्या मैदानाला लोक ‘स्टीफन ग्राउंड’ म्हणायचे. सुट्टीच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम्स तिथे खेळत असत. एवढ्या गर्दीत कोणत्या क्षणी डोक्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पनाही करता येत नसे.

आम्ही ५-६ मराठी मुले, काही मोहल्ल्यातली आणि दोन-चार मुस्लिम मुले, अशी आमची टीम असायची. सर्वच गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय असल्यामुळे प्रत्येकी १०-२० पैसे गोळा करून २-३ रुपये जमवून कॉर्कचा चेंडू विकत घ्यायचो. त्या वेळी क्रिकेटचा चेंडू १०-१४ रुपयांना मिळत असे.

श्रीमंत मुलं पांढऱ्या शुभ्र कपड्यांत, चांगल्या दर्जाच्या बॅट्ससह आणि खरी क्रिकेट बॉल घेऊन खेळायची. त्यांना पाहून आम्हाला इर्षा वाटणं साहजिकच होतं. क्रिकेटच्या चेंडूने खेळण्याची आपली इच्छा कधी पूर्ण होईल, असं वाटत नव्हतं.

एक दिवस मैदानात गोटू भेटला. माझ्याच वयाचा असेल. त्याच्याकडे २-३ क्रिकेटचे चेंडू होते. त्याच्या जवळ असलेल्या क्रिकेट बॉल्सची  क्वालिटी पाहून आम्हाला राहवलं नाही. सहज विचारलं, “कितीला देतो?”

तो म्हणाला, “१ रुपयापासून ५ रुपयांपर्यंतच्या बॉल्स आहेत. घ्यायच्या  असतील तर सांग.” माझ्या मित्राला शंका आली. त्याने विचारलं, “इतक्या स्वस्त बॉल्स कुठून आणतोस?”

गोटू ऐटीत म्हणाला, “DDCAमध्ये ओळख आहे. मॅच संपल्यावर जुने बॉल्स ओळखीच्या लोकांना स्वस्तात मिळतात. काही तर एक-दोन ओव्हरच वापरलेले असतात.” तो डझनच्या भावाने बॉल्स घेतो आणि मग ३-४ रुपयांना विकतो. थोडे जुने असतील तर १-२ रुपयांना. आम्हीही कधी १ रुपया, कधी दीड, तर कधी अगदी नवा कोरा बॉल ३ रुपयांना त्याच्याकडून विकत घेऊ लागलो.

गोटू क्रिकेटही चांगला खेळायचा. कधी-कधी सकाळी आमच्यासोबत खेळत असे. २-३ दिवसांनी कळलं की ‘गोटू’ हे त्याचं टोपण नाव आहे. खरं नाव असलम. तो बल्लीमारान भागात राहायचा.

हिवाळी सुट्टी लागली. गोटूने वादा करूनही बॉल आणून दिला नाही. नंतर कळलं की आमच्यासाठी ठेवलेला बॉल त्याने दुसऱ्या टीमला २ रुपयांना विकला होता. माझ्या मित्राने त्याला झापलं. अखेर त्याने सांगितलं की तो सकाळी ११ वाजता फिरोजशाह कोटला येथे जाणार आहे. बॉल मिळाले तर उद्या आणून देईल.

आमचा विश्वास बसला नाही. मी आणि माझ्या मित्राने ठरवलं की आपणही तिथे जाऊन पाहू, कुणाकडून तो बॉल घेतो. एकदा कळलं की आपणही थेट थोकात बॉल विकत घेऊ शकतो. आणि विकून पैसे कमवू शकतो.

सकाळी ११च्या सुमारास आम्ही पायी दिल्लीगेटवर पोहोचलो. त्या काळात फिरोजशाह कोटला स्टेडियम आजसारखं मोठं नव्हतं. एक रस्ता दिल्लीगेटहून राजघाटकडे जातो. एका बाजूला जुन्या दिल्लीची भिंत, मागे दरियागंज, समोर बाग. दुसऱ्या बाजूला फुटबॉल स्टेडियम, बस स्थानक आणि एक गल्ली सरळ स्टेडियमकडे जाते.

गोटू त्या गल्लीच्या टोकावर बसलेला होता. मैदानात मॅच सुरू होती. आम्हाला पाहताच तो म्हणाला, “धंद्याचा राज  जाणायला आला  का? विश्वास नाही माझ्यावर?”

मी म्हणालो, “विश्वास असता तर इथे आलो नसतो. आम्हाला फक्त बॉल पाहिजे.” तो म्हणाला, “सध्या मॅच सुरू आहे. थोडा वेळ इथे उन्हात बसावं लागेल.”

मी म्हणालो, “इतक्या दूरून मॅच पाहण्यापेक्षा झाडाखाली हिरवळीवर बसू.”तो हसला आणि म्हणाला, “अब आ ही गये हो, तो चुपचाप यहाँ बैठो और तमाशा देखो.”

थोड्याच वेळात फलंदाजाने एक जोरदार फटका मारला. चेंडू आमच्या दिशेने उसळत रस्त्यावर आला. गोटू जणू याच क्षणाची वाट पाहत होता. तो धावत गेला, बॉल उचलला आणि ओरडला, “भागो, भागो!”

आम्ही काही समजण्याच्या आत तो रस्ता पार करून पळत होता. आम्हीही त्याच्या मागोमाग धूम ठोकली. भिंतीसमोरच्या बागेत बरीच मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांची पर्वा न करता आम्ही भिंतीतल्या एका भेगेतून आत शिरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला.

गोटू हसत म्हणाला, “क्यों, मजा आया ना? अबे बेवकूफों की तरह बैठे क्यों रहे. थोडी अजूनच वेळ झाली असती तर पकडले गेलो असतो. खूप मार पडतो. कधी-कधी पोलिसांकडेही सोपवतात.”

मी विचारलं, “इतका धोका पत्करून तू बॉल चोरून विकतोस. मिळालेल्या पैशाचं काय करतोस?” काही क्षण तो माझ्याकडे पाहत राहिला. डोळे पाणावले. म्हणाला, “घरात माझ्यापेक्षा लहान दोन भाऊ आणि एक बहिण आहे. दोन वर्षांपूर्वी आई गेली. वडिलांनी दुसरी लग्न केले. संध्याकाळी वडील भाजीची रेडी लावतात. मी त्यांना मदत करतो. पण ते एक छदामही देत नाहीत. सावत्र आई भावंडांना नीट खायला देत नाही. वडिलांना काही सांगितलं तर ओरडतात, कधी हात उगारतात.”

“या जान-जोखिममध्ये टाकून मिळवलेल्या पैशांनी मी भावंडांना खायला आणतो. आईला न कळता.” पुढे काय बोलावं, हे त्या वयात मला कळलं नाही. मुकाट्याने घरी निघालो. जाताना त्याला वचन दिलं की आजची घटना कुणालाही सांगणार नाही. त्या हिवाळी सुट्टीत आम्ही वचन पाळलं. पुढच्या उन्हाळी सुट्टीत मात्र तो मोरीगेटच्या मैदानात दिसला नाही.

या वर्षी आयपीएलचा सामना पाहताना, कुणास ठाऊक, तब्बल ४२ वर्षांनंतर त्याची आठवण आली. काय करत असेल तो?