Wednesday, December 27, 2023

इच्छापूर्ती

स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, ईच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू  समयी  त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही. स्वामीजी धर्मदेव कडे पहात  हसत-हसत म्हणाले, त्यांच्या सर्व इच्छा तू सहज पूर्ण करू शकतो. स्वामीजींनी धर्मदेवला एक कान मंत्र दिला.

पुढील २० वर्षांत धर्मदेव यांनी वडिलांच्या स्मृतीत अनेक शाळा, कॉलेजेस अनाथाश्रम, वृध्दाश्रम बांधले. एक मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल ही बांधले. कोट्यवधी  रुपये दरवर्षी ते यासाठी खर्च करतात. एकदा एका पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला, तुम्ही कोणताही व्यापार, धंधा,  उद्योग करत नाही, मग हे सर्व तुम्हाला कसे काय जमते. धर्मदेव म्हणाले ही सर्व भगवंताची कृपा आहे. स्वामी महाराजांनी मला कान मंत्र दिला आणि हे सर्व साध्य झाले. पत्रकाराने विचारले स्वामीजींनी तुम्हाला कोणता कानमंत्र दिला होता. "स्वामीजींनी मला भगवंताचे भव्य मंदिर उभारण्याचा आदेश दिला आणि म्हणाले भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील". आपली सर्व जमापूंजी आणि व्यापार विकून मी इच्छापूर्ती करणाऱ्या भगवंताचे भव्य मंदिर बांधले. मी भगवंताची सेवा करतो आणि भगवंताने माझ्या स्वर्गीय वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या.  




Monday, December 4, 2023

वार्तालाप: कर्माची फळे का मिळत नाही


श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला  प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही  कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म  केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर  बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी  असतात.

एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.  शेताची उत्तम निगा राखतो. उत्तम पीक ही येते.  पण  पीक कापणीच्या पूर्वी  अचानक वादळ वारे, येतात गारपीट होते आणि सर्व पीक हातातून जाते. कधी पेरणी नंतर पाऊस दगा देतो. शेतकऱ्याला दैवी आपदांमुळे कर्माचे फळ मिळत नाही. वादळ वारे भूकंप सारख्या दैवी आपदा आपल्या कर्मावर पाणी फिरवितात. नुकतेच हिमाचल राज्यात हजारो घरे, हॉटेल्स, शेती पर्वत ढासळत्या मुळे नष्ट झाली. इजराईल आणि गाझा मध्ये ही आतंकवाद्यांची संबंध नसलेल्या हजारो लोकांना त्यांच्या आसुरी कृत्यांची फळे भोगावी लागली.  हजारो मृत्युमुखी पडले, हजारो लोकांचे उद्योग धन्दे बुडाले, घरे नष्ट झाली.  अचानक लागलेल्या किंवा कुणी लावलेल्या आगी दर वर्षी हजारो घर दुकान फेक्ट्री नष्ट करतात. असे शेकडो उदाहरणे आपल्याला नेहमीच दिसतात. तात्पर्य  उत्तम कर्म केले तरी त्या कर्माची अनुरूप फळे अनेकदा मिळत नाही. 

श्रीमद्भगवत गीतेत बहुतेक आधिभौतिक तापांचा प्रभावामुळे कर्म फळांवर  आपला अधिकार नसतो, हे समजविण्यासाठी  भगवंतांनी अर्जुनाला या श्लोकाचा  उपदेश दिला. तू क्षत्रिय आहे, युद्धातून पलायन करण्याचा विचार करू नको. परिणाम काय होईल याचाही विचार करू नको. फक्त तू आपले कर्तव्य कर. क्षत्रिय  धर्माचे  पालन कर. धर्म रक्षणासाठी युद्ध कर.

शेती असो, उद्योग धंधा असो, व्यापार असो किंवा नौकरी, नेहमीच कर्माच्या अनुरूप फळे मिळणे शक्य नाही. तरीही शेतकरी हजारो वर्षांपासून सतत शेती करतो. उद्योजक आणि व्यापारी आपापले धंदे करत राहतात. चाकरी करणारा चाकरी करत राहतो. असो.