Tuesday, June 22, 2021

विश्वामित्र आणि विषाणू

अत्यंत सुरक्षित अश्या प्रयोग शाळेत विश्वामित्र विषाणू निर्मितीचा प्रयत्न करत होता. तो अचानक ओरडला युरेका-युरेका, विषाणूला निर्मित करण्यात मी सफल झालो. नारायण- नारायण या आवाजानी त्याची तंद्रा भंग झाली.  त्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला 

 नारदा!  इथे टपकायचे कारण काय. तुला दिसत नाही मी किती व्यस्त आहे.   

अरे वा! तू मला पाहताच ओळखले, नाही तर बाकी लोकांना  मी वीणा दाखविली तरी लोकांचा विश्वास बसत नाही. चमत्कार करून दाखवावा लागतो, तेंव्हा त्यांना माझी ओळख पटते.  भारी हुशार आहे तू.  कसे ओळखले तू मला?

या गुप्त जागेची माहिती कुणालाही नाही. इथल्या कुठल्याही यंत्राने तुझ्या येण्याची नोंद केली नाही. अर्थात तू पृथ्वीचा मानव नाही,  बाकी तुझी वेशभूषा तुझा परिचय आहेच.  माझा वेळ किमती आहे, तुला जो काही संदेश द्यायचा आहे किंवा तुझे इथे येण्याचे जे काही कारण आहे, स्पष्ट आणि कमी शब्दांत बोल. 

कारण असल्याशिवाय मी कुठेच जात नाही. तू जे  काही करत आहे त्याच्या काय परिणाम होणार,याचा विचार केला आहे का? 

काय म्हणजे, मी "घातक आणि विनाशक" अश्या  विषाणूची निर्मिती केली आहे. या विषाणूच्या शक्तीने माझा देश संपूर्ण जगावर राज्य करेल. 

‘घातक आणि विनाशक’, त्या घातक सिनेमात बहुतेक अडीच किलो हात वाला हिरो होता. नाव विसरलो त्याचे.   

सनी देओल, वा! तुमच्या स्वर्गातही बॉलीवूडचे सिनेमे लागतात.  

तसे नाही रे, मी जेंव्हा मृत्युलोकात भटकायला येतो, तेंव्हा पाहतो, हॉलीवूड, बॉलीवूड,  सनी लिओनि ... 

च्यायला! बाल ब्रह्मचारी असून सनी लिओनि .... 

तसे नाही रे, मी इथे आलो कि इथेले सर्वच मला दिसते. तू जो हा विनाशक प्रयोग करत आहे त्याला थांबवण्यासाठी मी इथे आलो

हा! हा! हा!  मानव निर्मित एका छोट्या विषाणूला तुमचे देवराज इंद्र घाबरले आणि तुला पाठवविले. इथे आम्हाला हे हि माहित नाही तुमचा स्वर्ग लोक कुठे आहे ते.  

तू काहीही समज. पण एक लक्षात ठेव, निर्मितीचे कार्य  ब्रम्हदेवाचे आहे, मानवाचे नाही. या विषाणूला नष्ट कर, हेच तुझ्या आणि मानवजातीच्या  हिताचे आहे. 

व्हाट अ जोक! ब्रम्हदेवाने माणसाला बुद्धी दिली. त्या बुद्धीचा वापर करून मी विषाणू निर्मित‍ केला. अर्थात मी जे काही करत आहे,  त्यात  ब्रम्हदेवाची  इच्छा आहेच.  

कदाचित् असेलही, पण तू दुसर्‍यांना संपवण्यासाठी विषाणूची निर्मिती केली आहे, हे कितपत योग्य आहे. 

या मृत्यू लोकात आमचा बाप डार्विन म्हणतो, जो शक्तिशाली तोच  जिवंत राहणार. जे निर्बल आहे ते नष्ट होणार.  

तुला नाही वाटत, निर्बलांचे रक्षण करणे हा मानवाचा धर्म आहे. 

नारदा, तू माझे जास्त डोके पकवू नको, मी एकच धर्म मानतो, दुसर्‍यांना नष्ट करून स्वत:चे रक्षण करायचे. शिवाय मी इथे एकटाच नाही, माझ्या सारखे अनेक विश्वामित्र इथे एकापेक्षा एक घातक विषाणूच्या  निर्मितीत व्यस्त आहे. ज्या देशाजवळ जेवढे घातक विषाणू तो तेवढाच शक्तिशाली. आता कृपा करून येथून प्रस्थान करावे.

मलाहि वेळ नाही इथे जास्त वेळ थांबायला, पण एक शेवटचा प्रश्न विचारू का? हा विषाणू निसटला तर काय होईल,याचा विचार केला आहे का?

विश्वामित्र क्षणभर विचार करतो आणि उत्तर देतो, नारदा!,जास्तीसजास्त काही कोटी लोक मरतील. पृथ्वीवरचा थोडा भार कमी होईल.  बाकी विषाणूचे काय करायचे ते आम्ही बघून घेऊ म्हणत  नारदाला जाण्याचा  इशारा करतो. 

नारदाचे पृथ्वीवर येऊन अनेक विश्वामित्रांना समजविण्याचे  प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी नारद निराश होऊन स्वर्गलोकी परतले आणि थेट ब्रम्हदेवाला जाऊन भेटले. 

नारायण नारायण! 

ब्रम्हदेवाने हसत-हसत विचारले, काय समाचार आहे पृथ्वीलोकाचे. 

माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. कुणालाच भविष्याची चिंता नाही. सर्वच आगीशी खेळत आहे, म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी . 

नारदा, हे कलयुगाचे शेवटचे चरण आहे, आता  पृथ्वीवरील जीवसृष्टी क्रमश: नष्ट  होणार, हे अटळ आहे. कदाचित,  मानव आपल्या कर्माने प्रलय पूर्वीच जीवसृष्टी नष्ट करणार.  बहुतेक या महायुगाचा अंत असाच असेल. 

म्हणजे पिताजी, तुम्हालाहि माहित नाही, मानवाचे भविष्य? 

नारदा, माझे कार्य फक्त निर्मितीचे, सृष्टीचा अंत कसा होणार, याची कल्पना मलाहि नसते. 

अखेर, विषाणू विश्वामित्रच्या प्रयोगशाळेतून  निसटला. पृथ्वीवर मृत्यूचे थैमान सुरु झाले. मानव विरुद्ध विषाणू युद्ध सुरु झाले. कोट्यावधी जीव गेले. एवढे होऊनही आजचा विश्वामित्र अधिक घातक विषाणूंच्या निर्मितीत व्यस्त आहे.