Saturday, December 29, 2018

क्षणिका: हिवाळा : सूर्य आणि धरती


अनेक वर्षांनंतर दिल्लीत डिसेंबर महिन्यात भयंकर थंडी पडली आहे. धुक्यामुळे सूर्य दिसत नाही आणि  धरतीने हि हिरवेगार वस्त्रांच्या त्याग केला आणि दवांत न्हात आहे,  येणार्या वसंतात नटण्यासाठी. 

कुडकुडत्या थंडीत 
सूर्याला भरलं कापरंं.
दुलई ओढून धुक्याची 
दडला तो आकाशी. 

धरतीने त्यागली 
हिरवीगार चोळी. 
दवांत ती न्हाली 
अंग-अंग चोळूनी. 




Friday, December 21, 2018

ब्राह्मण, आरक्षण आणि सरकारी नौकरीची तैयारी

(हा लेख ब्राह्मण समाजाला केंद्रित करून लिहिला असेल तरी सर्व मराठी माणसांवर लागू होतो). 

बलीराम तुला कितीदा एकच गोष्ट परत-परत सांगावी लागले. एसएससीचा पेपर पास तरी कसा झाला.  तो शांतपणे म्हणाला साब, १००० घंटे पढने के बाद गधा भी एसएससी का पेपर पास कर लेगा. मै तो फिर भी इन्सान हूँँ. कहो तो ४३ का पहाडा सुना दूँँ. बलीरामने चक्क ५० पर्यंतचे पहाडे पाठ केले होते. गणिताचे शेकडो फार्मुले हि.  बलीरामाला १२वीत ५० टक्के मार्क मिळाले. याला अभ्यासात गति नाही हे ओळखून मुलाने सरकारी नौकरीची तैयारी केलेली बरी, हा विचार त्याच्या वडिलांनी केला. (११वी बोर्डात आंग्ल भाषेत काठावर व द्वितीय श्रेणीत पास झाल्यावर मी हाच विचार केला होता, आपल्याला सरकारी नौकरी शिवाय अन्यत्र कुठली  चांगली नौकरी मिळणे शक्य नाही). बिहारमधून बलीराम थेट दिल्लीत आपल्या चुलत्याकडे पोहचला. दिल्लीत आल्यावर बीए (corrs) अडमिशन घेतली व एसएसचीच्या तैयारी साठी क्लास सुरु केली. रोज एसएससीची क्लास व त्या शिवाय दोन ते तीन तास घरी अभ्यास. शनिवारी रविवारी व सुट्टीत कालेजची क्लास. या शिवाय रोज  घरच्या कामात मदत करणे आलेच. वर्षभरानंतर त्याने सरकारी पेपर हि देणे सुरु केले. अनेक सरकारी पेपर दिले. अखेर यश मिळाले बळीरामने एसएससीचा पेपर पास केला  आणि २२ व्या वर्षी सरकारी नौकरीत रुजू झाला. हजारो बिहारी आज केंद्र सरकारच्या नौकरीत आहे. सामान्य बुद्धी असली तरी नियमित मेहनत करून, आज सुरवातीचा पगारच ३५००० हजारहून अधिक घेत आहेत. पण मराठी माणूस कुठे. माझ्या csss केडर मध्ये स्टेनो ते पीएसओ ६००० पोस्ट आहेत. त्यात मराठी माणूस बोटांवर मोजण्या एवढे. ब्राह्मण तर ४ ते ५, ते हि दिल्लीकर. बहुधा ते हि पुढील काही वर्षांत निवृत्त होतील. दिल्लीकरांची पुढची पिढी सरकारी नौकरीत नाही. मराठी लोकांची जनसंख्या पाहता किमान या केडरमध्ये ५०० तरी मराठी माणूस असायला पाहिजे. हीच परिस्थिती केंद्र सरकारच्या सर्व केडर मध्ये आहे. कारण काय. 

मराठी माणूस त्यात हि ब्राह्मण, ६० टक्केवाल्या मुलाला हि जबरदस्ती बीटेकला टाकतो. भरपूर पैसा खर्च करतो. नंतर त्याला १५ ते २० हजाराची नौकरी हि बमुश्कील लागते. शिकलेला असल्यामुळे क्लार्कचा पेपर द्यायला त्याला लाज वाटते. या सरकारी पेपर पास करण्यासाठी जी मेहनत व अभ्यास लागतो ती करण्याची तैयारी मराठी विशेषकरून ब्राह्मण मुलांची नसते. ग्रेजुएट होत पर्यंत पालक हि लक्ष देत नाही. मग नौकरीसाठी मुलांवर दबाव आणतात. मग मुले हि हि वेकेंसी निघाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात. दोन-चार महिन्याचा अभ्यास, अर्धवट तैयारी करून क्लार्कचा पेपर पास करणे शक्य नाही. मग म्हणतात, मुलाने पेपर दिला पास झाला नाही. आरक्षणावर खापर फोडतात. एकदा तर एका नातलगाने महाराष्ट्रातून फोन केला. माझ्या मुलाने स्टेनोचा लिखित पेपर पास केला आहे. दिल्लीला पाठवितो २ महिन्यात त्याला स्टेनोची तैयारी करून देईल का? मी म्हणालो स्टेनो शिकायला किमान २ वर्ष लागतात. तेही नियमित न चुकता ३६५ दिवस अभ्यास केला तर. त्या नंतर हि जो पर्यंत पेपर पास होत नाही रोज एक तास अभ्यास करावाच लागेल. अधिकांश मराठी मुले,  लिखित परीक्षा पास केल्यावर टाइपिंग शिकण्याचा विचार करतात. टाइपिंगचा हि रोज अभ्यास करावा लागतो.  दोन ते तीन महिन्यात टाइपिंग शिकणे शक्य नाही. अर्धवट तैयारी करून दिलेला पेपर कितीही सौपा असला तरी तो पास करणे कदापि शक्य नाही.  

सुरवातीला ३५००० हजाराहून जास्त पगार असलेल्या क्लार्क, डाटा एन्ट्री ओपरेटर, इत्यादीचा  पेपर पास करणे अत्यंत सौपे आहे. सामान्य  ज्ञान, गणित (१० स्तर),आंग्ल भाषा आणि तर्क शक्ती, हे विषय असतात. तुमच्या मुलाला १२वीत कमी मार्क्स आले. तर कालेज सोबत सरकारी पेपर तैयारी करण्यासाठी क्लास लावा. क्लास नसेल लावली तरी प्रतियोगिता दर्पण या मासिकाचे नियमित वाचन व त्यातले पेपर सोडविणे. नेटवर असलेले एसएससी, रेल्वे इत्यादींचे पेपर पैकी रोज एक सोडविणे. अभ्यासासाठी विकास पीडिया (http://mr.vikaspedia. in/ InDG)  हि सरकारी वेबसाईट सर्व भाषेंत उपलब्ध आहे. या साईटवर सर्व सरकारी योजना, इतिहास ते अर्थशास्त्र संपूर्ण ज्ञान उपलब्ध आहे. भारतकोश या वेबसाईटवर   (http://bharatdiscovery.org)  सामान्य ज्ञानच्या अर्थशास्त्र पासून ते नागरिक शास्त्र पर्यंत हजारो प्रश्नोत्तरी आहेत. दुसर्या शब्दांत सरकारी पेपरची तैयारी करण्यासाठी नेटवर सर्व साहित्य उपलब्ध आहे. इंटरनेट वर आज बँक, रेल्वे, कोर्ट, सरकारी कंपन्या, केंद्र सरकारचे एसएससीचे पेपर उपलब्ध आहेत. रोज एक पेपर सोडविला तरी तीन वर्षांत भरपूर तैयारी होते. एवढी तैयारी केल्यावर विश्वास वाढतो.  बीए, बीकॉमचे पेपर हि मुले चांगल्या मार्काने पास होतात. वयाच्या २५शी पर्यंत बँक रेल्वे सरकारी पदांसाठी अनेक पेपर दिल्यामुळे ज्ञान हि वाढते व सरकारी नौकरी सहज मिळते. आंग्लभाषा सहित अनेक विषयांचे ज्ञान वाढल्याने निजी क्षेत्रात हि चांगली नौकरी मिळते.  पण आपली मुलें काय करतात. फेसबुक, whatsup, रस्त्यावर पान तंबाकू खात टवाळक्या करणे, यातच वेळ घालवितात. काही टाईमपास म्हणून एमए, एमकॉम मध्ये अडमिशन घेतात. वेळ वाया घालवितात. स्वत:ला आणि घरच्यांना मूर्ख बनवितात. 

तात्पर्य एवढेच केंद्र सरकार, रेल्वे, बँक व राज्य सरकारच्या खुल्या प्रवर्गात हजारो पदे दरवर्षी निघतात. पण त्या नौकरींसाठी किती ब्राह्मण तरुण तैयारी करतात. नुकतेच या वर्षी रेल्वेत लाखाच्या वर पदांसाठी परीक्षा झाली. अर्धी पदे खुल्या प्रवर्गासाठी होती. किती ब्राह्मण तरुणांनी पेपर दिले. एका ब्राह्मण फेसबुक ग्रुप वर हे विचारले. कुणीही सार्थक उत्तर दिले नाही. बहुतेक कुणाचाही मुलगा सरकारी नौकरीच्या प्रयत्नात नाही. फक्त आरक्षण-आरक्षण हि ओरड करण्यात वेळ व्यर्थ घालवीत आहेत. समजा ब्राह्मणांना महाराष्ट्रात ३ टक्के आरक्षण मिळाले तरी उत्तर  प्रदेश आणि बिहारी मुले मराठी भाषा शिकून त्या जागांवर आपले नाव लिहतील. मग त्यांच्या नावाने बोंब ठोका.  

सरकारी नौकरीच्या माहिती साठी. 
 http://www.sarkarinaukridaily.in/employment-news-paper/



Saturday, December 15, 2018

छत्रपती आणि ब्राह्मण: श्री. सुनील चिंचोळकर यांचा लेख

(आज समाजात जातीभेद पसरविण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. तो दूर रकरण्यासाठी या लेखाचा प्रसार करणे मला आवश्यक वाटले.)

छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’,

 हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत.

१. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच !

अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्तकंठाने गायन करणारे पहिले कवी समर्थ रामदासस्वामी हे ब्राह्मण होते. त्यांनी त्या वेळी केलेले हे वर्णन पहा –

‘यशवंत, कीर्तीवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥
आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळाठायी ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हाकारणे ॥

भारतभर भ्रमण करणार्‍या समर्थ रामदासस्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा थोर माणूस भेटला नाही, ही नोंद महत्त्वाची आहे. छत्रपतींच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना पत्र लिहितांना समर्थांनी ‘शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप’, हाच उपदेश केला.

आ. छत्रपतींच्या हयातीत त्यांच्या गुणांचे वर्णन करणारे कवी भूषण हे ब्राह्मण होते.

इ. छत्रपतींच्या सांगण्यावरून संस्कृत भाषेत ‘शिवभारत’ नावाचे शिवचरित्र लिहिणारे कवी परमानंद नेवासकर, हे ब्राह्मण होते.

याचा अर्थ महाराजांच्या हयातीत त्यांचे चरित्र लिहिणारे अन् थोरवी गाणारे महत्त्वाचे तीनही कवी ब्राह्मण होते.

१ अ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जाज्वल्य एकनिष्ठा असलेले ब्राह्मण !

१. छत्रपती शिवाजी महाराज आगर्‍याहून सुटल्यावर डबीर आणि कोरडे या महाराजांच्या दोन निष्ठावान सेवकांना औरंगजेबाच्या सैनिकांनी अटक केली. वस्तूतः या दोघांनीच संभाजी महाराजांना मथुरेस लपकवून ठेवले होते; पण त्यांनी ही गोष्ट शेवटपर्यंत औरंगजेबाला सांगितली नाही. उलट सुमारे दोन मास औरंगजेबाच्या कारागृहात ते रोज चाबकांचे फटके सहन करत राहिले.

२. ब्राह्मण माणसे विश्वासू आणि एकनिष्ठ असू शकतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांना चांगले ठाऊक होते. सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले जानंभट अभ्यंकर आणि दादंभट अभ्यंकर यांनी मरेपर्यंत सिंधुदुर्ग किल्ला सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने सिंधुदुर्ग किल्ला जिंकून घेतला, त्या वेळी हे दोघे भाऊ किल्ल्यात मारले गेले. ‘आम्ही सिंधुदुर्ग सोडून कुठेही जाणार नाही’, हा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला.

१ आ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील संवेदनशील आणि अतीमहत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार ब्राह्मणच !

१. छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडाणा किल्ला घेऊन देणारे बापूजी देशपांडे ब्राह्मण होते.
२. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना फत्तेखानाबरोबर लढतांना सर्वांत महत्त्वाचे साहाय्य करणारे किल्लेदार नीळकंठ सरनाईक हे ब्राह्मण होते.
३. महाराजांच्या हेरखात्याचे पहिले हेरप्रमुख नानाजी देशपांडे ब्राह्मण होते. पुढे ही जागा बहिर्जी नाईक यांनी घेतली.
४. त्र्यंबकेश्वराचे वेदमूर्ती ढेरगेशास्त्री महाराजांच्या कल्याणासाठी भगवान शंकराजवळ अनुष्ठान करीत असत.
५. लालमहालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याप्रसंगी जी साहसी मोहीम आखली होती, त्याचे प्रमुख चिमाजी देशपांडे ब्राह्मण होते.
६. चिमाजीचे वडील लाल महालात जिजाऊबाईंकडे अनेक वर्षे चाकरीला होते; त्यामुळे त्यांना लाल महालाचे बारीकसारीक ज्ञान होते; म्हणून या मोहिमेची सूत्रे त्यांच्या हाती होती.
७. अफझलखानाला भेटण्यासाठी जातांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गाईची आणि ब्राह्मणाची पूजा केल्याची ऐतिहासिक नोंद आहे. ही पूजा सांगणारे प्रभाकर भट्ट हे महाराजांचे राजोपाध्ये होते.’

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राह्मणांविषयीचा नितांत आदरभाव आणि स्पष्टवक्तेपणा !

१. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदींना अग्रहार (इनाम) दिल्याची ४-५ पत्रे उपलब्ध आहेत. केवळ या पत्रांच्या आधारावर महाराजांना सर्वधर्मसमभावी ठरवण्याची घाई केली जाते; मग ब्राह्मणांना अग्रहार दिल्याविषयीची ८२ पत्रे उपलब्ध आहेत, त्या आधारे अशाच प्रकारचा निष्कर्ष का काढू नये ?

२. ८.९.१६७१ या दिवशी तुकाराम सुभेदार यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘बापूजी नलवडा याणे कल्हावतीकरून तरवारेचा हात टाकीला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिल्हा. हे वर्तमान होऊन गेले. मर्हाटा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली. याचा नतीजा तो पावला.’ या पत्रात छत्रपतींचा ब्राह्मणांविषयीचा आदर तर दिसतोच, पण त्याचबरोबर महाराजांच्या सरदारांना महाराजांचा हा स्वभाव माहीत असल्यामुळे कसा धाक होता, हे नलवडे प्रकरणावरून कळते. प्रभावळीतील बापूजी नलवडे नामक मराठा सरदाराने एका ब्राह्मणावर तलवारीने वार केला, पण नंतर त्याला ही भीती वाटली की, ‘महाराजांना ही गोष्ट कळल्यावर महाराज आपल्यास कठोर शिक्षा करतील.’ या भीतीने त्याने स्वतःच्या पोटात सुरी खूपसून आत्महत्या केली. राज्यकर्त्यांचा असा धाक प्रजाजनांवर असला पाहिजे.

३. सुमारे ८-१० पत्रांमध्ये, ‘एखादा विशिष्ट नियम पाळावा’, म्हणून महाराजांनी गाईची आणि ब्राह्मणांची शपथ घ्यायला लावल्याचा उल्लेख आहे.

४. अनेक पत्रांमध्ये ब्राह्मण-भोजनाचे प्रावधान (तरतूद) असून ‘हा सर्व पैसा धार्मिक खात्याकर व्यय (खर्ची) करावा आणि याविषयी कुठलीही काटकसर करू नये’, अशी कडक सूचना महाराज देतात (सन १६४८). यावरून त्यांची ब्राह्मणांसंबंधांची भूमिका स्पष्ट होते.

५. अनेक ब्राह्मणांना भूमी अग्रहार देतांना महाराजांनी त्यांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे, उदा. ३ ऑगस्ट १६७४ला मुरारी त्रिमल विभूते यांना छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘स्वामी सिव्हासनी बैसता समयी तुम्ही स्वामीसनीध बहुत खस्त मेहनत केली. थोर पराक्रम करून स्वामीचे नवाजीस उतरला. तुमचे स्वामीकार्य जाणून तुम्हावर मेहेरबान होऊन सर्फराजीविषयी हे इनाम.’

६. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्यात यश यावे’, म्हणून जिजाऊबाई अनेक ब्राह्मणांकडून अनुष्ठान करून घेत, असा स्पष्ट उल्लेख १८ फेब्रुवारी १६५३ ला वेदमूर्ती गोपाळ भट यांना लिहिलेल्या पत्रात आहे. महाराज लिहितात, ‘वेदमूर्ती प्रभाकर भट यांच्या विद्यमाने स्वामी पासून मंत्र उपदेश संपादिला. स्वामीस आपण आपले आभ्योदयार्थ सूर्यप्रित्यर्थ अनुष्ठान सांगितले.’

२. छत्रपती ब्राह्मणांच्या आहारी गेले नव्हते !

ब्राह्मण कारभार्‍याच्या हातून चूक झाली त्याविषयी १९ जानेकारी १६७५ ला लिहिलेल्या पत्रात महाराजांनी ब्राह्मण कारभार्‍याची हजेरीदेखील घेतली आहे. महाराज लिहितात, ‘ऐशा चाकरास ठिकेठीक केले पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ? याउपरी बोभाटा आलीया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही.’ याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मण जातीविषयी आदर असला, तरी ते ब्राह्मणांच्या आहारी गेले नव्हते; पण त्याचसमवेत अशा १-२ पत्रांचे भांडवल करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लपून ब्राह्मणद्वेष वाढवण्याचीही आकश्यकता नाही. ‘ब्राह्मणांना नष्ट करणे, हे ज्यांचे जीवनव्रत आहे’, त्यांनी अवश्य ब्राह्मणद्वेष करावा; मात्र असे करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून त्या थोर महात्म्यास कलंकित करू नये.

३. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रितपालक’ म्हणवून घेताना संकोच वाटत नाही, तिथे त्यांच्या अनुयायांनी ‘गोब्राह्मण’ शब्दावरून कांगावा का करावा ?

छत्रपतींची सुमारे २०० पत्रे उपलब्ध आहेत. २०० पैकी सुमारे १०० पत्रे त्यांनी वेगवेगळ्या ब्राह्मणांना काहीतरी दान केल्याविषयी किंवा अग्रहार दिल्याविषयी आहेत. माणसाचे अंतःकरण जाणून घेण्यासाठी पत्र हे अतिशय मौलिक साधन आहे. ऐतिहासिक घटनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना जवळ केले. त्यांचा हा कल आपल्याला त्यांच्या पत्रां मध्ये देखील पहायला मिळतो. महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हटले की, काही लोकांचे डोके फिरते. परंतु इ.स. १६४७ या वर्षी मोरेश्वर गोसावी यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘ब्राह्मण अतिथ अभ्यागतास पावते. महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती. गाईचा प्रतिपाल केलीया बहुत पुण्य आहे.’ जिथे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घेताना संकोच वाटत नाही, तिथे त्यांच्या अनुयायांनी गोब्राह्मण शब्दावरून कांगावा का करावा, ते कळत नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘‘महाराजांचा उल्लेख कोणी कोणी ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणून करतात. मला या उपाधीचे आकर्षण वाटते. भूमीला समृद्धीचा कर देणारे गोधन, तसेच आपल्या तपोबलाने आणि अध्ययनाने समाजाची उंची वाढवणारा ब्रह्मवेत्ता महाराजांना रक्षणीय वाटला, यात काहीच अप्रस्तूत नाही; पण शब्दांची ओढाताण केली जाते. अर्थाचा विपर्यास केला जातो. आजकाल मान्यता पावलेली ‘दुधाचा महापूर’ ही कल्पना आणि अवघडात अवघड परीक्षा घेऊन केली जाणारी अधिकार्‍यांची निवड, या प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात गोब्राह्मणप्रतिपालनाचे स्मरण घडवणार्‍याच नाहीत का ? एकविसाव्या शतकात ब्राह्मण हा शब्द विद्वत्ता, बुद्धीमत्ता, विज्ञाननिष्ठा आणि स्वतंत्रप्रज्ञा यांचा वाचक ठरला, तर किती बरे होईल !’’

४. छत्रपती शिवाजी महाराजांना साहाय्य करणारे ब्राह्मण आणि विरोधक असलेले मराठे !

अ. शिवचरित्रात शिवछत्रपतींच्या भोवताली जी महत्त्वाची प्रभावळ आहे, त्यात कितीतरी मंडळी ब्राह्मण होती.
आ. बंगळुरूहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहाय्यासाठी शहाजी महाराजांनी पाठवलेले दादोजी कोंडदेव हे अत्यंत विश्वासू कारभारी ब्राह्मण होते.
इ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्री मंडळातील आठपैकी सात मंत्री ब्राह्मण होते.
ई. डबीर, कोरडे, अत्रे आणि बोकीलकाका हे महाराजांचे सगळे वकील ब्राह्मण होते.
उ. अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण होता, म्हणून आरडाओरड केली जाते; परंतु अफझलखानाचा वकील ब्राह्मण होता, तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील गोपीनाथपंत बोकील हा सुद्धा ब्राह्मण होता.
ऊ. औरंगजेबाच्या छावणीत सहस्रो मराठे सरदार होते’, याविषयी मौन पाळले जाते.
ए. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे अडतीस नातेवाईक अफझलखानाच्या छावणीत खानाला साहाय्य करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला अफझलखान आला, त्या वेळी त्याच्या निवडक दहा देहरक्षकांमध्ये मंबाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काका, तर पिलाजी मोहिते आणि शंकरजी मोहिते हे महाराजांचे दोन चुलत सासरे होते.’

– श्री. सुनील चिंचोळकर
(संदर्भ : अखिल भारतीय मराठा विकास परिषदेने प्रकाशित केलेली, ‘समाज जागृती पुस्तिका’)

Tuesday, December 11, 2018

काही क्षणिका: हिवाळा



सावरुनी पदर धुक्याचा 
लाजली सोनेरी उषा.

सूर्य मध्यानींचा
आज थंड झाला 
अंत एका पर्वाचा.

गोठलेल्या राती 
कुंद झाले मन 
विरहणीचे. 





Friday, December 7, 2018

मोगऱ्या फुलांची वेणी

( हि कथा मैफिल दिवाळी अंकासाठी लिहली होती, तिथे प्रसिद्ध झाल्यानंतर आता ब्लॉग वर)

तब्बल ३५ वर्षांनी दोघ भेटले. केस पांढरे झाले असले तरीही दोघांनी एका दुसर्‍याला ओळखले. त्याला तिच्या सोबतची शेवटची भेट आठवली. हो, नेहरू पार्कच. केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळलेली ती, त्याला खेटून बसलेली होती. मोगऱ्याच्या वेणीला हुंगण्याचे नाटक करत त्याने पटकन तिच्या गालाचे चुंबन घेतले.

“दूर हो, मला काय समजले आहे, तुझी हक्काची बायको? अजून लग्न नाही झाले आपले”.

‘मग केंव्हा विचारणार तुझ्या वडीलांना, आता तर  वर्ष झाले मला नोकरी लागून’.

“अरे, माझे बाबा एका भाड्यावर राहणार्‍या बाबूशी आपल्या लेकीचे लग्न करायला तैयार होणार नाही”. 

‘मग काय आपण असेच राहायचे’?

“माझा एसएससीचा पेपर क्लिअर झाला आहे ना. महिन्याच्या आत अॅपाइंटमेंट लेटर येईलच. मग विचारेल बाबांना, एका स्मार्ट पण अक्कल नसलेला, निर्व्यसनी, कंजूष मुलाशी लग्न करायचे आहे. दोघांच्या पगारात आमचे व्यवस्थित भागेल. माझे बाबा नाही म्हणणार नाही, खात्री आहे मला”.
‘मी कंजूष?
“मग काय, आपल्या प्रेयसीला चाणक्य सिनेमा हाल मध्ये ६५ पैश्याचे पहिल्या रोचे  तिकीट घेऊन सिनेमा दाखवणार्‍याला काय म्हणायचे? एका रुप्पलीचे पॅापकॅार्न आणि एक कप कॉफी दोघांसाठी. काय मजनू आहे माझा. बाय द वे तुझ्या आई-वडीलांना विचारले का?” 
‘दूध देणार्‍या गायीला, कोण नकार देणार’.

तिने त्याच्या पाठीवर जोरात गुद्दा मारला.

‘आई! ग! किती जोरात मारते’.

“आई! ग, नाही म्हणायचे, बायको ग, म्हणायचे”.

‘म्हणजे लग्न झाल्यावरही तू मारणार’

“हो, पण लाटण्यानी”  ....
पुढे ती भेटलीच नाही. नंतर कळले मुंबईत एका सरकारी कार्यालयात तिने नौकरी जॉईन केली होती. तिचे लग्नही झाले. तो देवदास तर नक्कीच नव्हता. आईने पसंत केलेल्या मुलीशी त्याने लग्न केले.
---
‘कशी आहे’ 
“राग तर नाही ना माझ्यावर! माझ्या वडीलांना आपले प्रकरण माहित झाले होते. मला तुझ्या पासून दूर नेण्यासाठी बाबांनी खेळी केली. आईने शपथ घातली. तूही तिथे नव्हता. नाइलाजाने वडीलांची इच्छा पूर्ण केली”.

‘काय करतात तुझे मिष्टर’.

“ते हयात नाही. एका प्राईवेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. चांगला पगार होता पण त्याच सोबत दारू व जुगाराचे व्यसनही होते. नशेत सैतान संचारायचा त्यांच्या अंगात. सर्व राग माझ्यावर काढायचे. व्यसनांमुळे लग्नाच्या काही वर्षांतच ते वर गेले. मा‍झ्याच पगारावर कसेबसे घर चालविले. मुलगा इन्जीनियर झाला. तोही बापाच्या वळणावर गेला. त्यालाही दारूचे व्यसन आहे. त्याने प्रेम विवाह केला, सूनही पिणारी. वेगळे राहतात दोघ. व्यवस्थित चाललेय आहे, त्यांचे....  बहुतेक निवृत्तिनंतर मला वृद्धाश्रम शोधावे लागणार. नशीब एकेकाचे. तुझे काय”.

तुझे लग्न झाले हे कळल्यावर खरं तर मला राग आला होता. पण आईने समजावले, आयुष्य हे असेच असते. आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. अचानक त्याला काही आठवले, हं, लग्ना आधी एकदा भेटलो होतो आम्ही, सीपी मध्ये. ओडीयन मध्ये  बाल्कनीचे तिकीट घेऊन सिनेमा पाहिला ,मैने प्यार किया” तो उगाच हसला. 

“अरे वा! भाग्यशाली आहे ती, प्रेयसीसाठी ६५ पैशांचे तिकीट आणि बायकोसाठी बाल्कनी” बोलताना तिने जीभ चावली”.

‘हो! पण त्या नंतर गेल्या ३५ वर्षांत आम्ही सिनेमा पाहिला नाही कि कधी हॉटेलिंग केल नाही’. एकाच्या पगारात दिल्ली सारख्या शहरात गुजराण करणे मुश्कीलच. शिवाय पोरांचा शिक्षणाचा खर्चही भरपूर. आता सर्व ठीक आहे. घरही आहे स्वत:चे. लेकीचे, लग्न झाले आहे, जावयाला कसलंही व्यसन नाही. आजच्या काळात हीच जमेची बाजू म्हणावी लागेल. मुलाचे शिक्षणही पूर्ण झाले आहे. त्यालाही नौकरी लागली आहे. अजून तरी कुठल्याही पोरीने त्याला घास टाकलेली नाही. बघू काही काळ. मग आई आहेच सून शोधण्यासाठी.....काही क्षण शांतता. ‘तुझा मोबाईल नंबर देते का?

“नको रे, उगाच त्रास होईल, तुला”.

तो काही बोलला नाही, त्याचे लक्ष रस्त्यावर मोगऱ्या फुलांच्या वेण्या विकणार्‍या दुकानदाराकडे गेले, मनात विचार आला. तिच्या पांढर्‍या केसांवरही मोगऱ्याची वेणी शोभून दिसेल. तो थांबला, त्याने तिला विचारले 
 ‘वेणी घ्यायची का’? 

“हो, घे ना! तुझ्या बायकोसाठी. मलाही आवडते, मोगऱ्याची वेणी....

त्याने दोन वेण्या घेतल्या. एक तिच्या हातात देत विचारले, ‘एकदा बघायचे आहे, वेणी केसांत माळलेली तू, कशी दिसते’.
वेणी हातात घेत, ती म्हणाली “तुला विसरण्याचा प्रयत्न केला पण विसरू शकली नाही. हे गेल्यावर तर सारखी तुझीच आठवण यायची. कधी-कधी वाटायचे, कदाचित अजूनही तू माझी वाट पहात असेल तर कधी वाटायचे तुझाही संसार असेल. तुला विसरलेच पाहिजे. मनाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. तुझी आठवण अनावर झाली कि बाजारात जाऊन मोगऱ्या फुलांची वेणी विकत घेते, खोलीचे दार बंद करून वेणी केसांत माळून आरश्या समोर उभी राहून रडते... आजही रडणारच”. काही क्षण दोघ काहीच बोलले नाही. थोड्या वेळाने ती म्हणाली, “प्लीज, मला भेटण्याचा पुन्हा प्रयत्न करू नको, वादळ उठेल, भावनांचा बंध फुटेल... तुझा संसार उध्वस्त होईल”. बोलता-बोलता ती विरुद्ध दिशेला वळली आणि झप-झप पाउले टाकत चालू लागली. एका क्षणासाठीही तिने मागे वळून पाहिले नाही. काही क्षण तो स्तब्ध.. जडवत तिथेच उभा राहला. तिला हाक मारायची तीव्र इच्छा झाली पण...

काही वेळाने त्याचे लक्ष हातातल्या मोगऱ्याच्या वेणी कडे गेले. त्याने उभ्या आयुष्यात बायकोसाठी मोगऱ्या फुलांची वेणी घेतलीच नव्हती आणि आज...  त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. लग्ना पूर्वी त्याच्या बायकोनेही राजा-राणीच्या सप्त रंगी संसाराचे चित्र पाहिले असेल. पण प्रत्यक्षात दिसली, नवर्‍याच्या अपुर्या पगारात घर चालवण्याची तिची धडपड. संसार फुलण्यासाठी तिने स्वत:च्या सर्व इच्छा मारून टाकल्या. कधी काहीही मागीतले नाही किंवा हट्ट केला नाही. त्याला आठवले, कित्येकदा त्याचा आणि पोरांचा डब्बा भरल्यावर भाजी शिल्लक राहायची नाही. कधी विचारले ‘अग! तुझ्यासाठी भाजी उरली नाही’. ‘मी माझे बघून घेईल’, हेच नेहमीचे उत्तर. बहुतेक लोणच्या सोबत किंवा पोळीला तेल तिखट मीठ लाउन भूक भागवायची. तिनेही त्याच्यावर शरीर व मनानी प्रेम केले आहे, बदल्यात त्याने काय दिले??? कधी मनाने प्रेम केलं का तिच्या वर?  त्याने निश्चय केला, आता सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायला हवी. घरी गेल्यावर त्याने आपल्या हाताने बायकोच्या पांढर्‍या शुभ्र केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळली.... 

Thursday, December 6, 2018

काही क्षणिका : सत्य



सत्य मध्यानी सूर्यासारखे प्रखर असते, एखादा हरिश्चंद्र सत्य नग्न डोळ्यांनी पाहू शकतो. बाकी सत्य न पाहण्याचे अनेक कारणे: 

शोधले सत्य 
अवसेच्या राती 
सापडले नाही. 

उषा सोनेरी
भावली मनी 
मोह सुखाचा.


काळ्या चष्म्यानी
सत्य मध्यांनी 
धूसर दिसले.