Friday, December 25, 2015

सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस



कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे  भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता.  गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला  जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी  बहुत संवेदनशील और अच्छे  इन्सान है. रेल का सफर  करने वाले आम आदमी का ख्याल रखते हैं. फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत  असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या  समस्या ते चुटकीसरशी दूर करतात.

या आधी दिल्लीत मराठी नेत्यांची प्रशंसा मी क्वचितच ऐकली असेल. काही मुंबईकर नेत्यांमुळे, मराठी माणूस म्हणजे परप्रांतीय लोकांशी द्वेष करणारा, या ना त्या कारणाने सतत राडा करणारा. अशी मराठी माणसाची प्रतिमा. पण आज प्रभु साहेबांची प्रशंसा ऐकून माझी छाती चौडी झालीच.  एकमात्र खरे, त्यांच्या चांगल्या कार्यामुळे एका अनोळखी तरुणाने,  मला बसायला जागा दिली.  मी त्याच तरुणाचे  आभार मानले. पण मला यात काहीच आश्चर्य वाटले नाही. श्री सुरेश प्रभू  प्रधानमंत्री कार्यालयात इंडियन शेरपा म्हणून कार्यरत असताना, मी त्यांच्या अखत्यारीत  पीएस म्हणून जवळपास दीड एक महिना काम केले आहे. त्याच वेळी मला त्यांच्या मानवीय भावनेने परिपूर्ण अश्या संवेदनशील मनाचा अनुभव आला होता.

जुलै, 2014 महिन्यात माझी हृदयाची बाईपास सर्जरी झाली होती. तीन महिन्याची सख्तीची रजा मिळाली. बहुधा वीस-एक सप्टेंबरची तारीख असेल, ऑफिस मधून  एका  अधिकार्याचा फोन आला. प्रथम शिष्टाचार म्हणून त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. नंतर फोन करण्याचे खरे कारण- अर्थात पटाईतजी आप कब दफ्तर जॉईन कर रहे हो. मी उत्तर दिले,  तीन महिन्याची रजा आहे, पूर्ण होताच जॉईन करेल. थोडा जल्दी जॉईन कर सकते हो क्या? मी विचारले, का?  माननीय सुरेश प्रभुजी की  जी-२० के लिए इंडियन शेरपा के पद पर नियुक्ति हुई है. वह प्रधान मंत्री कार्यालय जॉईन कर रहें हैं. (श्री सुरेश प्रभूंची इंडियन शेरपा या पदावर नियुक्ति झाली आहे, ते शीघ्र कार्यालय ज्वाइन करणार आहेत).  अधिकारी पुढे म्हणाले, ते काही रोज कार्यालयात  येणार नाही, आले तरी जास्ती वेळ बसणार ही नाहीत.  फक्त जी-२०च्या संदर्भात काही मीटिंग्स, चर्चा, मुलाकाती वैगरेह होतील. तुम्हाला सहज जमेल. दोन एक  महीने तुमचे आरामात निघून जातील. (दिल्लीच्या सरकारी भाषेत याला चारा फेंकना, असे ही म्हणतात).  प्रधानमंत्री कार्यालयात २-३ महीने आरामात निघून जातील, हे काही थोड़े-थोडके नव्हे. मासा गळाला लागला. दुसर्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. फिटनेस सर्टिफिकेट घेतले आणि कार्यालयात रुजू झालो.

प्रधानमंत्री कार्यालयाचे नाव किती ही मोठे असले तरी इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे इथे हि जागेची समस्या आहेच. दुसर्या माल्यावर कॅन्टीन आणि किचन(स्वैपाकघर) आहे. किचनच्या उजव्या बाजूचा एक मोठा रूम श्री सुरेश प्रभु  साहेबांच्या बसण्यासाठी तैयार केला. शिवाजी महाराजांचे एक मोठे तैलचित्र हि त्यांच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लावण्यात आले. त्यांना केबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला असला तरी  स्टाफमध्ये पीएस म्हणून मी आणि एक सिपाही, असे आम्ही दोघेच होतो. एकट्यानेच सर्व काम करायचे होते. तरीही त्यांच्या सोबत काम करताना मला कधीच दडपण जाणविले नाही.  इतके सहज होते ते. 

एक दिवस दुपारी सव्वादोन वाजता श्री सुरेश प्रभु साहेब कार्यालयात आले. आल्यावर नेहमीप्रमाणे मी त्यांच्या कक्षात गेलो. ते म्हणाले मला भूक लागली आहे, काही  मिळेल का? मी म्हणलो  साहेब जेवणात काय मागवू. तैयार करायला जास्तीस्जास्त १०-१५ मिनिटे लागतील. साहेब म्हणाले, किचनमध्ये सध्या कुक आणि वेटर जेवतात आहेत, त्यांना त्रास देऊ नका. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच मागवा.  दुसर्या माल्यावर लिफ्टमधून बाहेर आल्यावर समोरच किचन दिसते.  रोज २ वाजता कॅन्टीन बंद होते. दोन ते अडीच या वेळात किचन आणि कॅन्टीनमध्ये काम करणारे कुक आणि वेटर इत्यादी जेवतात. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच बनविणारा कॅाउन्टर उघडा असतो. बहुधा  साहेबांनी त्यांना जेवताना बघितले असेल. आपण जर जेवणाचा ऑर्डर दिला तर तो पूर्ण करण्यासाठी त्यांना अर्धवट जेवण सोडून उठावे लागेल. साहेबांच्या संवेदनशील मनाला हे पटले नसेल. साहेबांनी केवळ ब्रेड सेंडविचवर आपली भूक भागवली.   मला नाही वाटत या आधी वेटर- कुक सारख्या लहान लोकांचा विचार कुणी मंत्री- अधिकारी यांनी केला असेल.  त्याच दिवशी त्यांच्या संवेदनशील मनाचा ओलावा मला हि जाणविला.

Sunday, December 20, 2015

मटार -कांदे परांठा



हिवाळा सुरु झाला कि मटारच (वाटाणे)ची भाजी मोठ्याप्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते.  गेल्या रविवारी भाजी  स्वस्त: मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे  निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला.   मटारच्या वरील   सर्व  भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली.  साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला.  त्याचीच कृती खाली देत आहे. 

साहित्य : निवडलेले मटार २ वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी,  बारीक चिरलेली कोथिंबीर -अर्धा वाटी, हिरवी मिरची -२-४ (इच्छेनुसार),   तिखट २-३ छोटे चमचे, जिरेपूड १ छोटा चमचा,, मिरे पूड १ छोटा चमचा, हळद १ छोटा चमचा  आणि  चाट मसाला (१ मोठा चमचा ) [चाट मसाला टाकला कि इतर मसाले टाकायची आवश्यकता नसते आणिक स्वाद हि मस्त येतो], मीठ स्वादानुसार [ चाट मसाल्यात हि मीठ असते, हे लक्षात ठेवावे].  तेल २ चमचे. 

कणिक चार वाटी  परांठ्यांसाठी आणि देसी तूप किंवा तेल परांठ्यांना लावण्यासाठी.

कृती: गॅसवर कढई ठेऊन २ चमचे तेल घालून, त्यात  मटार आणि हिरवी मिरची परतून, २ मिनिटासाठी झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्यावी.  नंतर थंड झाल्यावर मटार मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.   बारीक वाटलेल्या मटार मध्ये तिखट, जिरे, मिरे पूड, हळद  , चाट मसाला, मीठ,  बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून  परांठ्यांत भरण्यासाठी गोळे मळून घ्यावे. 

आता मळलेल्या कणकीची पारी बनवून त्यात  त्यात वरील मिश्रणाचे गोळे भरून परांठा लाटून, तव्यावर चारीबाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्यावे.

ज्याना तूप कमी खायचे असेल त्यांच्या साठी - तव्यावर पोळीसारखा परांठा भाजून नंतर गर्मागरम परांठ्यावर थोडे तूप लाऊन  गर्मागरम परांठा  वाढवा. 

टीप:तुपा एवजी तेल हि वापरू शकतात.

हा परांठा दही आणि हिरव्या चटणी सोबत मस्त लागतो.  सौ. ने दही आणि आवळ्याच्या हिरव्या चटणी सोबत परांठा वाढला. 






Thursday, December 17, 2015

व्यथा एका कठपुतळी राजाची



कठपुतळीचा खेळ सर्वांनाच आवडतो. मलाहि आवडतो. विशेषकरून राक्षसाच्या तावडीतून सुंदर राजकुमारीची सुटका करणारा राजकुमार.  हा खेळ बघताना सर्व खरेच वाटायचे. स्वप्नात हरवून जायचो. असे वाटायचे, राजकुमारीची सुटका करण्यासाठी मीच त्या राक्षसाची युद्ध करतो आहे. पण कधी-कधी जोरात वारा आला कि परदा हवेत उडायचा आणि कठपुतली नाचविणार्याचे हात दिसायचे.  क्षणात स्वप्न भंग व्हायचे, हे काही खर नाही, याची जाणीव व्हायची. 


एकदा भरपूर जनता जमली कि कठपुतलीचा खेळ दाखविणारे सरकारी धोरणाचा हि प्रचार करायचे. कथा नेहमीचीच, राजा आपल्या प्रधानाच्या सोबत जनतेचे कष्ट दूर करण्यासाठी घोड्यावरून राज्याचा दौरा करायला निघतो. प्रजेला कष्ट देणार्यांना चोर, डाकू, तस्कर, काळाबाजार करणार्यांना धडा शिकवितो. सर्वत्र आनंदी आनंद. लोक हि टाळ्यावाजवून राजाची प्रशंसा करतात.  खेळ संपतो.


एकदा असाच खेळ सुरु होता. पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र धारण करून, पांढर्या शुभ्र घोड्यावर स्वार इमानी राजा मंचावर अवतारला.  येताच त्याने आरोळी ठोकली, प्रधानजी कुठे आहात. अचानक, काळ्या घोड्यावर स्वार एक काळाकुट्ट माणूस मंचावर प्रगटला. राजाने विचारले, कोण रे तू, आणि एवढा काळा का.? लोक तुला पाहून घाबरतील. त्याने राजाला मुजरा करीत म्हंटले, महाराज, मी तुमचा प्रधान. पूर्वी मी असा काळा नव्हतो. काळ्याकुट्ट अमावस्याच्या रात्रीत मी काळ्या लक्ष्मीची कठोर अघोरी उपासना केली. काळ्यालक्ष्मीची कृपा मजवर झाली. त्यामुळे मी असा काळा आहे. मला आपल्यासोबत राज्याच्या दौऱ्यावर घेऊन चला, काळ्या लक्ष्मीची कृपा तुमच्यावर हि होईल. त्याचे बोलणे ऐकून, राजाची तळपायाची आग मस्तकात गेली. या दुष्ट माणसाला मंचावरून खाली फेकून द्यावे, पाहिजे, असे राजाला वाटले. पण राजाने असे काहीही केले नाही. माणसाच्या हातांच्या तालावर नाचणे, हेच त्याच्या नशीबात होते. तेवढ्यात संगीत सुरु झाले, घोड्यांच्या टापा आणि माणसाचा आवाज गुंजला, आधीच उशीर झाला आहे, चला प्रधानजी निघू या, टप टप, दुड दुड करत राजा काळ्याकुट्ट प्रधानासोबत दौर्यावर निघाला, प्रजेच्या कल्याणासाठी ????


Wednesday, November 25, 2015

सकाळचा नाश्ता : अरबी(अळू) परांठा, स्पेशल रेड सूप आणि आंवळा चटणी




काल संध्याकाळी लेक माहेरी आली.   तिचे सासरे नुकतेच हिमाचलच्या आपल्या गावातून दिल्लीला परतले होते. लेकी सोबत एक पिशवीभर अरबी आणि आले (त्यांच्या सीढ़ीदार शेतातले– शुद्ध नेसर्गिक) पाठविले होते. आज सकाळी उठल्यावर ती म्हणाली आज सकाळचा नाश्ता मी बनविणार. (लेकी माहेरी आराम करायला येतात, पण माहेरी आल्यावर काम करायचा उत्साह का संचारतो, कधीच कळत नाही) असो. पराठा, सूप आणि चटणी असे करायचे ठरले.




घरात दुधी होती, टमाटर महाग असल्यामुळे १/२ किलोच आणले होते. पण लाल सुर्ख लौह तत्वाने भरपूर बिट्स हि घरात होते. सूप म्हंटले कि लाल रंग हा पाहिजेच.  तिने सर्व वस्तू एकदम बनवायला सुरुवात केली (कसे जमते तिला, मला कधीच कळले नाही) .


आंवळा चटणी (साहित्य): साहित्य  आंवळे ५-६, कोथिंबीर, हिरवी मिरची २, आले  १/ इंच, लसूण ५-६ पाकळ्या, जिरे १/२ मोठा चमचा, १/२ काळीमिरी पूड, हिंग १/२ लहान चमचे, गुळ एक लहान तुकडा, ओले खोबरं २ चमचे आणि मीठ स्वादानुसार.


प्रथम आवळ्यांच्या बिया काढून चिरून घेतले. नंतर  खोबर, कोथिंबीर, आले, लसून, चिरे, हिंग, गुळ आणि मीठ इत्यादी सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घेतले.  आवळ्याची चटणी तैयार झाली.



स्पेशल रेड सूप (साहित्य): अर्धा किलो दुधी भोपळा, १/२ बिट्स (चुकुंदर), २ टोमाटो, २ आवळे, गाजर २ लहान. या शिवाय  आले १/२ इंच, (१/२ चमचे जिरेपूड, १/२ चमचा काळी मिरी पूड, हिंग १/२ छोटा चमचा, मीठ स्वादानुसार.


कृती: दुधी भोपळा, गाजर, बिट्स, आवळा, टमाटरचे तुकडे करून १ गिलास पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घेतले. कुकरचे झाकण उघडून त्यात १ गिलास थंड पाणी टाकले. घरी हाताचे मिक्सर असल्यामुळे कुकरमध्येच फिरवून घेतले.  सूप जास्त पातळ करायची गरज नाही किंवा गाळून घेण्याची हि नाही. नंतर त्यात आले किसून जिरे, काळी मिरी आणि हिंगाची पूड हि टाकून कुकर गॅस वर ठेऊन एक उकळी काढून घेतली.   

अरबी परांठा (साहित्य): अर्धा किलो अरबी, १/२ बिट्स (चुकुंदर),२ कांदे, ५-६ लसणाच्या पाकळ्या, ३-४ हिरव्या  लसणाच्या दांड्या, कोथिंबीर  १/२ जुडी, ३-४ हिरव्या मिरच्या  (मोठा चमचा: १/२ चमचे जिरे, १ ओवा, १०-१५ काळीमिरी दाणे यांची पूड करून घेतली), १ चमचा धने पूड, १ चमचा अमचूर, २ चमचे चाट मसाला, १/२ चमचे हळद, १/२ चमचे तिखट  आणि मीठ स्वादानुसार.

शिवाय तीन वाटी कणिक. पराठ्यांसाठी.          

कृती: (पराठ्याचे सारण): प्रथम गॅस वर अरबी उकळून घेतली. थंड झाल्यावर अरबीचे साल काढून, अरबी किसून घेतली. बिट्स हि किसून घेतले. कांदा, कोथिंबीर, हिरवे लसूण, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. सर्व मिश्रण एकत्र करून त्यात धने, अमचूर, चाट मसाला, जिरे-ओवा-काळीमिरीची पूड आणि  हळद टाकून मिश्रण एकजीव केले.  (तिखट खाणारे  जास्त तिखट हि टाकू शकतात).  हे झाले पराठ्याचे सारण.



आता जसे बटाट्याचे पराठे करतो त्याच प्रमाणे कणकीच्या गोळ्यात भरपूर सारण भरून, पोळी लाटून तव्यावर तेल/ तूप सोडून खरपूस परांठे भाजून घ्या. 



Saturday, November 21, 2015

वंदन भक्ती आणि पुणेरी षड्यंत्र

समर्थ रामदास म्हणतात 

करावें देवासी नमन I  संत साधू आणि सज्जन I नमस्कारीत जावे I
नमस्कारें सख्य घडे I नमस्कारें मोडली जडती I समाधानें I

समर्थ म्हणतात वंदन भक्ती सर्वात सौपी आणि सरळ आहे. वंदन करण्यासाठी  एक दमडी सुधा  लागत नाही.   काही साधन सामग्री ही लागत नाही.  कुणालाहि हात  जोडून आदराने नमस्कार केल्याने  आपण त्याला प्रिय होतो. बिघडलेले कार्यहि मार्गी लागते. 

आपण रोज पाहतोच, आपण जेंव्हा कुणाला नमस्कार करतो, त्याचा चेहरा आनंदाने उजळतो. प्रतिउत्तर म्हणून तोहि आपल्याला नमस्कार करतो. दोघेही प्रसन्न होतात.   आपण कुणाला नमस्कार केला आणि त्याने प्रतिउत्तर दिले नाही  तर  पुढच्या वेळी आपण त्याला नमस्कार करणार नाही. किंबहुना तो व्यक्ती जर समोरून येत असेल तर आपण त्याची नजर चुकवून पुढे निघून जाऊ. सरकारी कार्यालयात असे दृश्य नेहमीच दिसते. कर्मचार्यांच्या नमस्काराला उत्तर न देणाऱ्या अधिकार्याला  समोरून येताना पाहून कर्मचारी मार्ग बदलतात किंवा त्याची नजर चुकविण्याचा प्रयत्न करतात.   कर्मचार्यांचे सख्य किंवा निष्ठा या अधिकारीला प्राप्त होत नाही. तसेंच जो कर्मचारी कुणालाहि नमस्कार करीत नाही किंवा नमस्काराला प्रतिउत्तर देत नाही, त्याच्या बरोबर अन्य कर्मचारी बोलणे सोडून देतात. काही काळाने अशी परिस्थिती येते कि हा कर्मचारी आपल्या विभागात कार्यरत आहे, अधिकांश सहकर्मीनां माहितच नसते. 

एक प्रश्न आपल्या डोक्यात आला असेलच, वंदन भक्तीचा पुणेरी षड्यंत्रशी काय संबंध? 

 माझा एक पुणेरी मित्र दिल्लीत काही कामासाठी आला होता, हक्काने घरी उतरलादिनांक  १.११.२०१५ वेळ संध्याकाळची, सात वाजून काही मिनिटे. संध्याकाळी चहा पिता- पिता  घरगुती  गप्पा गोष्टी सुरु झाल्या.  काळ, वेळ न बघता, मला काय वाटेल याचा विचार न करता,  माझ्या मराठीतील चुका दाखविण्याचे कार्य माझा हा मित्र नेहमीच  न चुकता करतो.  पण त्या दिवशी सहज बोलता-बोलता म्हणाला विवेक तुझ्या मराठीत बरीच सुधारणा झाली आहे.   कुणी आपली प्रशंसा केली तर आपण प्रसन्न होतोच आणि त्यातूनहि कुणी पुणेकराने प्रशंसा केली तर काय म्हणावे, हवेवर तरंगूच लागलो. नसलेली  छाती ५६ इंच फुलवत तरichआजकाल आमी नुसतेच बोलत नाहीत, मराठीत लिवू बी लागलो आहे. तो लगेच सावध झाला आणि म्हणाला लिहिणे वाचणे हे रिकामटेकडे लोकांचे काम, आमच्या सारख्यांजवळ टाईम कुठे, मराठी लिहिण्या वाचण्यासाठी.  मी लगेच उतरलो, अब नमक खा ही रहे हो, तो अपुन का ब्लॉग भी देखना पड़ेगा.  कम्प्युटर उघडून आपला ब्लॉग आणि मिसळपाव दाखविले. सहज  त्याचे लक्ष्य 'तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?' या लेखावर गेले.  च्यायला अंतर्जालावर लोक डुप्लिकेट नावांनी लिहितात, प्रतिसाद हि  डुप्लिकेट नावांनी देतात. मी म्हणालो असे नव्हे, लोक खर्या नावांनी हि लिहितात.  काही लोक खर्या आणि डुप्लिकेट दोन्ही आयडीने लिहितात. शिवाय आपले विचार निर्भिकपणे मांडण्यासाठी हि काही लोक डुआयडी घेतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो विचित्र हसत म्हणाला 'तुझ्याहि दोन-चार डुआयडी असतीलच'.  त्यांच्या वापर कर.  तुला आवडणाऱ्या  १५-२० आयडी टंकून टाक, त्यात तुझे नाव पण टाक. कुणी न कुणी परतफेड  म्हणून  तुझे नाव हि त्याच्या आवडत्या आयडीत टंकेल. मी शांतपणे म्हणालो, मला दुहरेपणाने जगता येते नाही. माझी कुठलीही डुआयडी नाही. मग  ३०-४० आयडी आवडल्या म्हणून टंकून टाक, दोन-चार लोक तरी तुला लाईक करतील', नाहीतर  तुझ्या सारख्या बकवास लेखकाला कोण लाईक करेल.  मी रागानेच म्हणालो तू कधी माझा कुठला लेख किंवा गोष्ट वाचली आहे का? 'नाही  म्हणूनच तर म्हणतो, कशाला नाराज होतो, साधा व्यवहार आहे, अहो रूपं अहो गान गाढवाने केली कावळ्याची प्रशंसा. कशी वाटली तुकबंदी. 'अंतर्जालावर तुम्ही एका दुसर्याची पाठ थोबडून घेणार'.  (सौ. नेहमीच म्हणते, तुझे  सगळे मित्र एकापेक्षा एक दिव्य आत्मा आहेत, कुठे भेटतात तुला असली भुते, काय म्हणणार, एकेकाचे नशीब).   त्याला अक्षरश: हात जोडत म्हणालो, बाबारे मी कुठल्याहि आयडीला लाईक करणार नाही. तो म्हणाला, मग तुला हि कुणी लाईक करणार नाही. हा मानवीय स्वभाव आहे.   या वर हि कुणी तुला लाईक केले तर म्हणता येईल. तुझ्या लेखनात काही दम आहे. हं! आणखीन एक,  पुढच्या १०-१२ दिवस मिसळपाववर फिरकू पण नको.  नाही तर दोन-चार न कळणाऱ्या कविता टंकशील, वाचून कुणीतरी तुला लाईक करेल.   मी उतरलो, उद्या पासून घरात डागडुजी, रंग-रोगन, सफेदीचे काम सुरु करणार आहे. नंतर दिवाळी. मिसळपाव तर सोडा, पुढे १०-१५ दिवस अंतर्जालावर हि फिरकायला वेळ मिळणार नाही. नरक चतुर्थी पर्यंत घरात काम सुरु होते.  तरीही मित्राला दिलेला शब्द पाळला अंतर्जालावर फिरकलो हि नाही.   दिवाळी नंतर  हळूच मिपावर डोकावून आयडीवाला लेख बघितला.मित्राचे म्हणणे खरेच होते. 

आज दिनांक २१.११.२०१५,  त्याचा फोन आला, विवेक हा! हा! हा! हा!  गाढवा सारखा  'हसतोस कशाला'. अरे आज मिसळपाव उघडून आयडी वाला लेख वाचला, हा!हा! हा!  कुणाला हि तुझी आयडी आवडलेली नाही. मूर्ख लेकाचा, स्वत:चे नाक कापून घेतले. हा! हा! हा! अरे आम्ही पुणेकर म्हणजे काय चीज आहे, माहित नाही का तुला? एक नंबरी चिक्कू, कुणी दहा वेळा आमची प्रशंसा केली तर आम्ही एकदा करू. उगाच माझे ऐकले. वाईट वाटते रे, तुझ्या सारख्या महान, विद्वाआआन, लेखकूला कुणीच ओळखत नाही रे.  मरगळलेल्या आवाजात त्याला म्हणालो,   मीहि कुणाला लाईक केले नाही म्हणून दुसर्यांनी हि माझे नाव घेतले नाही. त्यात एवढे वाईट वाटण्यासारखे काय. 'कुठेतरी जळण्याचा वास येतो आहे', म्हणत त्याने फोन ठेवला. मनातल्या मनात त्याला शिव्या देत कम्प्युटर उघडला. मिपावर आयडीवाला लेख वाचला, पण कुणीही चुकून सुद्धा आपले नाव घेतलेले नाही, हे लक्ष्यात आले. रेकवर ठेवलेल्या दासबोधाच्या पुस्तकाकडे लक्ष गेले. माझ्या प्रिय (?) मित्राने मला हातोहात बनविले होते. आता तिखट मीठ लाऊन हि कथा आणखीन दहा मित्रांना सांगणार. माझा सनकी स्वभाव मला भोवला आणि त्याच्या जाळ्यात सहज अडकलो. पण 'अब पछताए हॉट क्या जब चिड़िया चुग गई खेत'.
   
समर्थ म्हणतात नमस्कारें सख्य घडे I नमस्कारें मोडली जडती I समाधानें I  जो नमस्कार करणार नाही त्याला कुणी विचारणार नाही.   हेच खरे.
 

Sunday, October 25, 2015

नागाला दुध पाजण्याची, आहे आपली रिती




शत्रूच्या गोळ्यांनी
शहीद  सैनिक किती.

ओघळणाऱ्या रक्ताची 
किंमत शाई पेक्षा कमी.

कसुरी नागाने 
विष ओकले  किती.
दही -दुधाच्या नवैद्य
आनंदी दाखविला जी. 

शिवबाची लेकुरो हो
कशाला करता राडा 
गुलाम संगीत ऐकुनी 
ताल धरा हो त्यावरी.

एका गालावर चापटी 
दुसरा गाल पुढती 
नागाला दुध पाजण्याची 
आहे आपली  रिती.


Monday, October 19, 2015

श्रीरामाचा मित्र - भद्र - रामायणातले एक महत्वपूर्ण पात्र




वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांड मधील ४३व्या सर्गात श्रीरामांची त्यांच्या मित्रांसोबत होणार्या चर्चेचे वर्णन आहे. त्यात श्रीरामांचा मित्र भद्र सीता विषयी प्रजेचे मत बेधडकपणे श्रीरामांसमोर मांडतो. आपल्या मित्राचे बोलणे ऐकून श्रीरामाला आपल्या प्रिय पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. रामकथेला कलाटणी देण्यात भद्राचे महत्वपूर्ण स्थान असूनही, अधिकांश लोकांना  भद्राचे नाव माहित नाही. 

म्हणतात न, राजाला मित्र नसतात. राजा अवतीभोवती वावरतात फक्त, चाटुकार, चारण, भाट आणि विदूषक. राजावर स्तुतिसुमने उधळून, निरनिराळ्या क्लुप्त्या करून राजाला प्रसन्न करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट. राजा प्रसन्न झाला तर त्यांना त्यांचे हित साध्य करता येते.  नेहमी राजाला रुचेल असेच त्यांचे वागणे असते.

श्रीरामाचीहि मित्रमंडळी होती. दिवसभराच्या राजकाजातून दमल्यावर श्रीरामहि आपल्या मित्रांसोबत हास्य, विनोद, परिहास करत काही काळ घालवीत होते.  विजय, मधुमत्त, काश्यप, मंगल, कुल, सुराजि, कालिय, सुमागध, दंतवक्त्र आणि  भद्र हि श्रीरामांच्या मित्रांची नावे. असेच एके दिवशी श्रीरामाने आपल्या मित्रांना विचारले, प्रजाजनांचे राजपरीवारा बाबत काय मत आहे?  त्यावर श्रीरामांचा मित्र भद्र म्हणाला, रावणावर आपण जो विजय मिळविला आहे, त्या बाबत बर्याच गोष्टींची चर्चा प्रजाजन करतात.

भद्राचे म्हणणे ऐकून श्रीराम म्हणाले, भद्र, न कचरता सांग, प्रजाजन माझ्या विषयी कोणकोणत्या गोष्टी शुभ बोलतात आणि कोणत्या गोष्टी अशुभ बोलतात. शुभ गोष्टींचे मी आचरण करीन आणि अशुभ गोष्टींच्या त्याग करीन.



एवमुक्तस्तु भद्रेण राघवो वाक्यमब्रवीत्
कथयस्व यथातत्त्वं सर्वं निरवशेषतः ll९ll

शुभाशुभानि वाक्यानि कान्याहुः पुरवासिनः 
श्रुत्वेदानीं शुभं कुर्यां न कुर्यामशुभानि च ll१०ll

भद्र म्हणाला राम, प्रजाजन म्हणतात, युद्धात रावणाला मारून श्रीराम  सीतेला आपल्या घरी घेऊन आले. प्रजेच्या मनात सीतेच्या चारित्रा विषयी  शंका आहे.  रावणाने बलपूर्वक सीतेचे हरण केले, तिला घेऊन लंकेत आला. अंत:पुरातील रम्य अश्या अशोक वनात तिला ठेवले. ती रावणाच्या अधीन राहिली. एवढे असूनही श्रीरामाने तिचा स्वीकार कसा काय केला? लोक प्रश्न विचारतात, आता आम्हालाही स्त्रियांचे असे वागणे स्वीकार करावे लागेल कारण प्रजा राजाचे अनुसरण करते.  भद्राचा म्हणण्याचा आशय स्पष्ट होता, विवाह नंतर ही स्त्रियांनी पर-पुरुषांशी संबंध ठेवले, तरी तिचा त्याग करता येणार नाही. ती श्रीरामांचे उदाहरण देईल. परिणाम समाजात व्यभिचार माजेल. विवाह संस्थेला अर्थच उरणार नाही.

भद्राचे मत ऐकताच श्रीरामांना धक्काच बसला. अत्यंत दुखी होऊन श्रीरामांनी आपल्या अन्य मित्रांना त्यांचे मत विचारले. आजचा काळ असता तर सर्वांनी एकजुटीने भद्राच्या म्हणण्याचा निषेध केला असता. पण ते श्रीरामांचे सच्चे मित्र होते, त्यांनी अत्यंत दीनवाणीमध्ये म्हंटले, भद्राचे कथन सत्य आहे. जड अंत:करणाने श्रीरामांनी आपल्या मित्रांना निरोप दिला. संपूर्णपणे विचारकरून श्रीरामांनी आपले कठोर कर्तव्य निश्चित केले. प्रजेच्या मनातल्या शंका दूर करण्याकरिता आपल्या प्रिय पत्नी सीतेचा त्याग केला.

जर त्या दिवशी, भद्राने प्रजेमध्ये सीतेविषयी चाललेल्या प्रवादांबाबत, चिक्कार शब्द ही उच्चारला नसता, तर श्रीरामांनी सीतेचा त्याग केला नसता. पण या साठी भद्राला खोटे बोलावे लागले असते. भद्र श्रीरामांचा खरा मित्र होता, खोटे बोलणे त्याला शक्य नव्हते.  आपल्या हृदयावर दगड ठेऊन भद्राने श्रीरामांना कटू सत्य सांगितले. रामकथेला एक वेगळे वळण लागले. 

Tuesday, October 13, 2015

वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य



[रामसेतु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी  वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन].

वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.

आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही.  रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते  धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका)  यांच्या मध्ये असणार १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भोगोलिक संरचना आहे. या संरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठला हि पूल समुद्रावर बांधला नव्हता.  दुसरी कडे धुर सनातनी लोक म्हणतात. हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.

(रामसेततुचे चित्र)




दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्ट हि केले नसावे.  रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसाला हि सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजहि समुद्र पातळीच्या वर आहे५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती, त्यावेळी  हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेहि  भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील.   काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आज पेक्षा निदान २० फूट आणिक खाली असेल.   त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.    

आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल.  एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून  पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry)  रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.





आपल्या देशात आज हि दुर्गम भागातले ग्रामीण, पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास,  नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ  पूल तैयार  करतात.  त्याच प्रकारे श्रीरामांनीहि जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल.  अश्या प्रकारचे  पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.


वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३  या वीस श्लोकांत  समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले.  अर्जुन, बेल, अशोक,  साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून   समुद्र किनार्यावर  घेऊन आले.  या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा.  बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर  घेऊन आले.  किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर  माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता.   गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला.  श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.

वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल.  आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता.  कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग  रंगविले.  


टीप:  वाल्मिकी रामायणातील  सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न  झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:

ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥

ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥

बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥

हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥


संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ  इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले.  हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.

समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥

दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥

मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥

संक्षिप्त अर्थ:कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते.  इति