Tuesday, August 29, 2023

वार्तालाप (२८): घांसा मागे घांस घातला, पुढें कैसें


घांसा मागे घांस घातला.
अवकाश नाही चावायला.
अवघा बोकणा भरिला. 
पुढें  कैसें. 


समर्थ म्हणतात तोंडामध्ये एका मागून एक बोकणा वाघ मागे लागल्यासारखा आपण भरत राहिलो तर आपले काय होणार. समर्थांना आरोग्य शास्त्राचे उत्तम ज्ञान होते, हे या ओवी वरून सिद्ध होते. समर्थांनी या ओवीत शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी जेवण कसे करावे हे सांगितले आहे. 

जेवणाचा मुख्य उद्देश्य शरीराला उत्तम पोषण मिळाले पाहिजे. आपले शरीर स्वस्थ्य असेल तरच आपण आपले सांसारिक आणि अध्यात्मिक उद्दिष्ट सिद्ध करू शकतो. म्हंटलेच आहे "शरीर मध्यम खलु धर्म साधनं". 

आपल्या परंपरागत वैद्यकीय शास्त्रात म्हंटले आहे, माणसाने तोंडातील अन्नाच्या घासाला किमान 32 वेळा दांतानी चर्वण केले पाहिजे. जेवढे जास्त आपण अन्नाला चावतो, अन्नाचे तेवढे लहान तुकडे होतात आणि तेवढी जास्त लार अन्नात मिसळते. पोटात अन्नाचे पचन उत्तमरीत्या होते. अन्नात असलेले सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात. याशिवाय दातांचा उत्तम व्यायाम ही होतो. दात ही मजबूत राहतात. पण आजच्या धगधगीच्या युगात अधिकांश लोक भूक शमविण्यासाठी भरभर जेवतात. अन्नाचे छोटे तुकडे होत नाही. आपल्या पचन संस्थेला हे जेवण पचविता येत नाही. बिना चावता लवकर लवकर अन्न गिळले तर पोटात अन्नाचे पचन होणार नाहीच आणि पोषक तत्व ही शरीराला मिळणार नाही. परिणाम आज देशातील अधिकांश जनता पोटाच्या विकारांनी  ग्रस्त आहे. 

आयुर्वेदाच्या मते पोट हे अधिकांश रोगांचे मूळ कारण आहे. अन्न न पचल्यामुळे पोटाची जळजळ होते, पोटात गॅस होते, पोटावर सूज येते, वजन वाढते, आंतड्यात अनेक रोग उत्पन्न होतात, नेहमी पोट दुखत राहते इत्यादी. माणूस चिडचिड  करू लागतो, कामात लक्ष लागत नाही. अधिकांश वात रोगांचा, सर्व प्रकारच्या दुखण्यांचा  पोटाशी थेट संबंध आहे. पोटाकडे सतत दुर्लक्ष केले तर  हृदयरोग, मधुमेह, केंसर इत्यादी होण्याचीही शक्यता वाढते. असो. 

ही ओवी वाचून आपण शांतपणे बसून अन्न चावून चावून जेवायला सुरुवात केली तरच ओवी वाचणे सार्थकी लागेल. असो. 




Sunday, August 27, 2023

दोन लघुकथा: चांदसा मुखडा आणि गगनचुंबी इमारत

शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.  चंद्रमाचा फोटो पाहून मुलाने कपाळावर हात मारला आणि तेंव्हापासून तो एकच गाणे  गुणगुणत राहतो. चाँद सी बायको हो मेरी ऐसा मैंने क्यों सोचा था.

आजोबांनी एका प्लॉटवर एक चंद्रमौळी झोपडी बांधली. आजोबांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर त्याच्या नातवाने तिथेच एक उंच गगनचुंबी इमारत बांधली. नातू खुश झाला. आपण ही गगनचुंबी इमारत कशी बांधली सर्वांना सांगू लागला. पण  त्या इमारतीची प्रशंसा करत नातेवाईकांनी त्याला म्हंटले या गगनचुंबी इमारतीचे श्रेय  तुला नाही फक्त तुझ्या आजोबांना आहे. 

Sunday, August 20, 2023

वार्तालाप (२७): नेणतां वैरी जिंकती

नेणतां वैरी जिंकती. 
नेणतां अपाई पडती.
नेणतां संहारती घडती.
जीवनाश.

समर्थ म्हणतात नेणतेपणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो.  

या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो. 

समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे. एका राजनेत्याला प्रजा सुखी आहे की नाही, प्रजेच्या गरजा किती, सरकारी अधिकारी त्यांच्या कर्तव्यांचे पालन करत आहेत की नाही, इत्यादी जाणण्याची गरज असते. ते जाणूनच राजा प्रजेच्या हितासाठी पाऊले उचलतो. या शिवाय राजाला त्याचे आंतरिक आणि बाह्य शत्रू किती, शत्रूंची शक्ती किती, त्यांचे मनसुबे काय, त्यांच्या हालचाली काय, इत्यादींवर लक्ष ठेवावे लागते. जो राजा शत्रूचे मनसुबे जाणण्याच्या प्रयत्नात कसूर करतो त्याचा पराभव होतो. त्याची सत्ता जाते आणि कधी- कधी जीव ही जातो. हे सर्व जाणण्यासाठी राजा गुप्तचर ठेवतो. जे त्याला सर्व माहिती पुरवितात. ज्या राजा जवळ सक्षम गुप्तहेर यंत्रणा असते त्याचा पराभव होणे शक्य नाही. छत्रपति शिवाजी महाराजांपाशी सक्षम गुप्तहेर यंत्रणा होती. ती प्रत्येक मोहिमे पूर्वी शत्रूचे बल, त्याच्या हालचाली, त्याचे दुर्बळ पक्ष इत्यादींची अचूक माहिती पुरवायची. या माहिती आधारावर राजे रणनीती निर्धारित करत होतो. त्यामुळेच राजे अफझल खानाचा वध करू शकले, शाहिस्ता खानाचे बोटे कापू शकले आणि आग्र्याहून सकुशल स्वराज्यात परत येऊ शकले. 

दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी, चीन ने 1950 मध्ये तिब्बत गिळंकृत केला, तरी ही ते हिंदी चिनी भाई-भाईच्या दिवास्वप्नात मग्न राहिले. चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्नच केला नाही. परिणाम 1962 मध्ये आपला दारुण पराभव झाला. त्यांनी चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्न केला असता तर 1950 ते 1962 हा १२ वर्षांचा कालावधी चीन सोबत असलेल्या सीमेला सुरक्षित करण्यासाठी पर्यात होता. आपला पराजय झाला नसता.

राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी  नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. 
 

Tuesday, August 15, 2023

वार्तालाप (26): दुराशेच्या धार्मिक पोथी.


श्रवणी लोभ उपजेल तेथे 
विवेक केंचा असेल तेथे.
बैसली दुराशेची भुते 
तया अधोगती.

समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य  इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः.

आज समाजात प्रचलित धार्मिक कथेंचे दोन भाग असतात. एक वास्तविक कथा आणि दुसरी स्वार्थासाठी त्यात केलेली भेसळ. यासाठी कथा अधिकारी  व्यक्तीकडून श्रवण करण्याची गरज असते. नंतर कथा समजल्यावर कथेत सांगितलेल्या मार्गावर चालणे. पण हा मार्ग कठीण असतो. दुसरा सौपा मार्ग म्हणजे स्वार्थासाठी पोथीत केलेल्या भेसळ अनुसार कृती करणे अर्थात पोथीत सांगितले आहे, उपवास, दान दक्षिणा इत्यादी केल्याने सांसारिक फळे मिळतात. हा मंत्र जपा, परीक्षेत उत्तम गुण मिळतील. अभ्यास सोडून मंत्र जप केला तर परिणाम काय होईल हे सांगण्याची गरज नाही. मग आपण कथेला दोष देतो. आता साहजिक आहे, इच्छित फळे मिळाली नाही तर मनातील दुराशाही वाढणार आणि प्रपंचात असफलता ही मिळणार.

धार्मिक कथा आपल्याला काय सांगत आहे हेच कळत नाही आणि त्यामुळे चुकीचा अर्थ लावून आपण फक्त विधी विधानात रमून जातो आणि इच्छित फळे नाही मिळाली तर मनात नैराश्य येते. आपण पोथीला दोष देतो. सत्यनारायणाच्या कथें पैकी एका कथेचे उदाहरण.  साधूवाणी हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे.  हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. त्याला कैद हि भोगावी लागली आणि व्यापारात मोठे नुकसान झाले. आजकाल ही अनैतिक रीतीने धन अर्जित करणाऱ्यांचे लाखो कोटी सरकारने जब्त करते. काहींना कारावास ही भोगावा लागतो. कथेच्या अखेर साधुवाणीला सत्य धर्माच्या मार्गावर चालून व्यापार करण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो. सत्यनारायण कथा श्रवण करून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून सांसारिक कर्तव्य पूर्ण केले तर घरात सुख-समृद्धी आपसूक येते आणि आध्यात्माच्या मार्गावर वाटचाल ही सहज सुरू होते. यासाठीच नवीन संसार सुरू करताना सत्यनारायण कथा श्रवण करण्याची प्रथा आपल्या समाजात आहे.

शेवटी ज्या पोथ्या फक्त देवी चमत्काराने भरलेल्या आहेत,  श्रवण करणाऱ्याला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देत नाही. त्या श्रवण करणे आणि त्यानुसार वागल्याने फक्त दुराशाच नशिबी येणार.

Thursday, August 10, 2023

वार्तालाप (२४) : दुराशेची पोथी.

मोक्षेंविण फळश्रुती.
ते दुराशेची पोथी.
ऐकतां ऐकतां पुढती.
दुराशाचि वाढे.

श्री समर्थ म्हणतात मोक्षा शिवाय इतर फळे ज्या ग्रंथाची सांगितली आहे तो ग्रंथ म्हणजे दुराशा वाढविणारी पोथी होय. असे ग्रंथ ऐकता/वाचता दुराशाच वाढत जाते. 

अनेकदा वाचली तरी समर्थांची ही ओवी मला समजली नाही. अनेक दिवस विचार केल्यावर मनात विचार आले शब्द कानावर पडणे किंवा पुस्तक वाचणे हे श्रवण नव्हे. लाखो शब्द तर दररोज फेसबूक, व्हाट्सअप, ट्यूटर, दूरदर्शन, रेडियो, वर्तमान पत्र इत्यादि माध्यमांनी कानात पडत राहतात किंवा डोळ्यांनी त्यांचे वाचन करत राहतो. पण त्यातला एक टक्का ही आपल्या लक्षात राहत नाही. शाळेत शिक्षक म्हणायचे, एका कानाने ऐकले आणि दुसर्‍याने काढून टाकले. डोक्यात काहीच गेले नाही. परीक्षेच्या एक दिवस अगोदर घोकमपट्टी कण्याचा उद्देश्य परीक्षेच्या दिवशी उत्तर लक्षात राहावे, हाच होता. कानात पडलेले शब्द आपल्या स्मृतीत जाऊन सुरक्षित होतात, त्या शब्दांना आपण विसरत नाही, बहुतेक त्यालाच समर्थांनी श्रवण म्हणले आहे. त्याच स्मृतीच्या आधारावरच आपण कृती ही करतो.

प्रापंचिक ज्ञान प्राप्तीसाठी आपण अनेक पुस्तके वाचतो किंवा श्रवण करतो. वेगवेगळ्या ग्रंथांची वेगवेगळी फळे असतात आणि त्या श्रवण केलेल्या ग्रंथांच्या आधारावर आपण नौकरी, व्यापार किंवा उद्योग करतो. पण ह्या सर्व ग्रंथांचे श्रवण आपल्याला मोह मायेच्या जाळ्यात ही अटकवितात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दुराशा वाढते. पोथी श्रवण करून तो  हृदयरोग तज्ञ झाला. अल्प काळात हजारो ऑपरेशन केले. एक दिवस हृदयघाताने त्याची मृत्यू झाली. ड्रीम इलेव्हन किंवा ऑनलाईन लॉटरी खेळून कोट्यावधीचे बक्षीस मिळते हे श्रवण करून, कोट्यावती तरुण अब्जावधी रुपयांचा जुआ खेळतात. त्यातल्या निण्यानऊ टक्क्यांचा पदरी निराशा येते. त्यांचे आयुष्य  उद्ध्वस्त होतात. उद्योग आणि धंद्यात सफल झाला तरी ते यश टिकविण्यासाठी अनेक नैतिक आणि अनैतिक कार्य करावे लागतात. मनावर सतत दडपण असते. कोणावर विश्वास नाही. माणूस एकटा पडतो आणि सदैव चिंताग्रस्त राहतो. कधी कधी निराश होऊन आत्महत्या ही करतो. तात्पर्य फक्त प्रापंचिक ग्रंथ वाचत राहू तर त्याची फळे मिळतील पण दुराशाही वाढत राहील. प्रपंचात ही सुख आणि समाधान मिळणार नाही. आजच्या काळात वाढत चाललेल्या लाईफ स्टाईल रोगांचे, डिप्रेशन, आत्महत्येची प्रवृत्ती किंवा हिंसक आचरण इत्यादींचे मुख्य कारण शारीरिक आणि मानसिक  दुराशाच आहे.

मानव जीवनाचा उद्देश उत्तम प्रपंच करून परमार्थ साध्य करणे होय. श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी हाच उपदेश श्रवण करणाऱ्यांना दिला आहे. श्रीमद् भागवत गीता आणि श्री सार्थ दासबोध वाचल्यावर आपल्याला कळते आपण फक्त निमित्त आहोत कर्ता करविता हा परमेश्वर आहे. हे ग्रंथ वाचून आपली बुद्धी स्थिर होते. आयुष्यात जय-पराजय, लाभ-हानि आणि सुख- दुःख आले तरीही चित्त कधीही ढळत नाही. राजा हरिश्चंद्राची कथा वाचून आपल्याला बिकट  परिस्थितीत ही सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. दुराशा आपल्यापासून दूर राहते. प्रपंच आणि परमार्थ साधण्यात आपण सफल होतो. समर्थांनी म्हंटलेच आहे:

मी कर्ता ऐसे म्हणसी.
तेणे तू कष्टी होसी.
राम कर्ता ऐसे म्हणविसी.
तेणे पावसी येश कीर्ती प्रताप.

श्री सार्थ दासबोध श्रवण करण्याचा एक हेतु मनातील दुराशा दूर करणे ही आहे. 

Sunday, August 6, 2023

वार्तालाप (१९): दुर्जनांचा ही सन्मान करा.


दुर्जन प्राणी समजावे.
परी ते प्रगट न करावे. 
सज्जना परीस आळवावे.  
महत्त्व देऊनी.

समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे. नीती कथाही म्हणतात दुर्जन आणि नीच शत्रूला थोडे बहुत देऊन संतुष्ट केले पाहिजे आणि तुल्यबळ शत्रूशी युद्ध केले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न  करत होते तर दुसरीकडे विजापूर आणि आदिलशाही स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. अश्या बिकट परिस्थितीत दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंहला स्वराज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत पाठविले. मिर्झा राजा जयसिंग मोठी फौज घेऊन दक्षिणेत आले. एवढ्या विशाल फौजेशी युद्ध करणे म्हणजे स्वराज्याचा विनाश. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांनी दासबोधात सांगितलेला मार्ग निवडलामहाराजांनी स्वराज्याचा हितासाठी दुर्जन मुघलांशी तह केला आणि स्वराज्याचे 23 किल्ले मुघलांच्या हवाली केले. एका दुर्जन शत्रूला प्रसन्न केले आणि त्याच्या वापर दुसऱ्या शत्रू विरुद्ध केला. मुगल फौजा विजापूर विरुद्ध युद्ध करण्यात गुंतल्या. स्वराज्याचे दोन्ही विरोधी दुर्बळ झाले. त्याचा फायदा स्वराज्याला झाला. अखेर मराठी साम्राज्य अटक ते कटक पर्यंत पसरले.

वर्तमान काळात ही भाजपने मेहबूबा मुफ्ती सोबत सत्ता स्थापन केली. हजारो काश्मिरी हिंदूंना काश्मीर मधून पलायन करावे लागले होते, त्यात तिच्या पक्षाचा ही हात होता, असे अधिकांश भारतीयांना वाटत होते. तरीही भाजप ने तिच्या सारख्या दुर्जन शत्रूला मुख्यमंत्री पद दिले. भाजपचे हे कृत्य अधिकांश भारतीयांना पटले नाही. पण भाजपने त्याच सत्तेचा फायदा घेऊन काश्मीर मधून धारा 370 हटवली. आपले उद्दिष्ट साध्य केले. 

राजकारणात दुर्जन शत्रूचा उपयोग ही जे स्वतःच्या हितासाठी करू शकतात त्यांनाच खरे राजकारण कळले असते.


Friday, August 4, 2023

स्मशानातील लग्नाची पूर्ण कथा

तो जहाल नास्तिक होता चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता. अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा. देवी देवतांची आणि संत महात्म्याची निंदा केल्यामुळे त्याला कधी-कधी मारही खावा लागायचा. पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते. त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले. परिणाम वयाची पस्तीशी उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही. शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी, त्याच्या अटींवर लग्न करायला तयार झाली. पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख दहा लाख द्यावे लागले. 

त्याने लग्नाची जय्यत तयारी सुरू केली. समाजात लग्न संबंधी पसरलेल्या परंपरेंना तडा देण्यासाठी त्याने गुरुजी ऐवजी एका अघोरीला लग्न लावून देण्याचे कार्य सोपविले. अघोरीने त्याचा लग्नाचा मुहूर्त रात्री दोन वाजताचा ठरविला. आघोरीच्या मते त्यावेळी स्मशानातील सर्व भूत-प्रेत जागृत होऊन या लग्नात उपस्थित राहतील. ब्रेकिंग न्यूज देणारे मराठी पत्रकार ही तिथे पोहचले. आघोर लक्षण  मुहूर्तावर लग्न पार पडले. लग्नात अग्नी ऐवजी जळत्या चितेच्या भोवती सात प्रदक्षिणा घातल्या गेल्या. लग्नात उपस्थित सर्व अंधश्रद्धा विरोधकांनी चितेवर भाजलेल्या चिकन आणि मटनच्या सोबत देशी दारूवर ताव मारला.  त्यांच्या लग्नाची बातमी मिडियात प्रसिद्ध झाली. काही ब्रेकिंग पत्रकारांचे म्हणणे होते त्या लग्नात हडळीनीं हडळाष्टक म्हंटले होते. काहींच्या दावा होता, कवट्या वेताळ आणि तात्त्या विंचू ने प्रत्यक्ष येऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद ही दिला होता. असो.

लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला कळले त्याची बायको त्याच्यापेक्षा ही एक पाऊल पुढे होती. ती त्याला म्हणाली दिवसा जागणे आणि रात्री झोपणे ही पण एक अंधश्रद्धा आहे. मी रात्री जागणार आणि दिवसा झोपणार आहे. त्याला वाटले, आपण हा विचार आधी का नाही केला. अंधश्रद्धेच्या पुढच्या मीटिंगमध्ये हा विषय सर्वांसमोर मांडला पाहिजे. दिवसा जागे राहाण्याच्या अंधश्रद्धेचा विरोध हा केलाच पाहिजे.  पण बायकोची दुसरी अट त्याला खटकली. बायको म्हणाली आपण हनिमून गोवा ऐवजी स्मशानात साजरा करू. लोक हनिमून रात्री साजरा करतात. आपण शहरातील प्रसिद्ध मोक्षधाम स्मशानात दिवसाच्या वेळी हनिमून साजरा करू. तो तिला म्हणाला मला तुझे विचार पटतात. पण दिवसाच्या वेळी स्मशानात हनिमून साजरा करणे शक्य नाही. एक तर तिथे लोकांची वर्दळ असते आणि समजा एकांत मिळाला तरी तिथले कर्मचारी तिथे असे काही करू देणार नाही. पकडून पोलिसात देतील. त्यावर ती म्हणाली, तुम्ही जर खरे अंधश्रद्धा विरोधक असाल तर तुम्हाला माझी ही अट मान्य करावीच लागेल त्याशिवाय मी तुम्हाला माझ्या अंगाला हातही लावून देणार नाही. आता मात्र त्याची पंचाईत झाली. काय करावे त्याला सुचेनासे झाले. आधीच पस्तीशी उलटून गेलेली होती.  तब्बल दहा लाख रुपये तिच्या बापाला दिल्यानंतर ती लग्नाला राजी झाली होती. लग्नाचा सर्व खर्चही त्यानेच उचलला होता. सर्व जमापूंजी त्यात खर्च झाली होती. 

आता तुमच्या मनात प्रश्न येईल पुढे काय झाले असेल.  अखेर दोन चार दिवस विचार करून त्याने हात जोडून तिला विनंती केली, काही दुसरा उपाय आहे का. ती म्हणाली हो आहे. तुला इतरांसारखे अंधश्रद्ध बनावे लागेल. आपण पुन्हा देव ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करू. खर्चाची चिंता करू नको. तू आधीच दहा लाख माझ्या बापाला दिले आहेत. त्यातच सर्व होईल. लग्नानंतर आपण आधी घराण्याच्या कुलदेवीचे दर्शन घेऊ आणि मग हनिमूनला गोव्याला जाऊ. काम वासना ही निसर्गाने माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे. हक्काची बायको मिळाल्यानंतर स्वाभाविकच होते त्याची कामवासना ही भयंकर भडकलेली होती. बायकोची अट मान्य करण्याशिवाय त्याच्यापाशी दुसरा मार्ग नव्हता. मोठ्या प्रयत्नांनी आणि दहा लाख हुंडा देऊन मिळालेली बायको गमावणे तेही फक्त एका विचारधारेसाठी, कदापि उचित नाही, एवढे कळण्या लायक बुध्दी ही त्याच्यापाशी होती. बायकोच्या इच्छेला मान देत त्याने देव ब्राह्मणांच्या साक्षीने पुन्हा लग्न केले. अंधश्रद्धा विरोधकांनी त्याच्या कृत्याची निंदा केली आणि त्याला संस्थेतून बाहेर काढले. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. बायकोला खुश ठेवण्यासाठी तो रोज सकाळी उठून स्नान संध्या आणि देवाची पूजा करतो. अभक्ष्य खाणे आणि पिणे त्याने सोडून दिले आहे. एक मात्र खरं, रात्री बायकोच्या हाताने केशर मिश्रित सुगंधीत दूध प्राशन करण्याचा आनंद तो घेतो. .....