Thursday, August 10, 2023

वार्तालाप (२४) : दुराशेची पोथी.

मोक्षेंविण फळश्रुती.
ते दुराशेची पोथी.
ऐकतां ऐकतां पुढती.
दुराशाचि वाढे.

श्री समर्थ म्हणतात मोक्षा शिवाय इतर फळे ज्या ग्रंथाची सांगितली आहे तो ग्रंथ म्हणजे दुराशा वाढविणारी पोथी होय. असे ग्रंथ ऐकता/वाचता दुराशाच वाढत जाते. 

अनेकदा वाचली तरी समर्थांची ही ओवी मला समजली नाही. अनेक दिवस विचार केल्यावर मनात विचार आले शब्द कानावर पडणे किंवा पुस्तक वाचणे हे श्रवण नव्हे. लाखो शब्द तर दररोज फेसबूक, व्हाट्सअप, ट्यूटर, दूरदर्शन, रेडियो, वर्तमान पत्र इत्यादि माध्यमांनी कानात पडत राहतात किंवा डोळ्यांनी त्यांचे वाचन करत राहतो. पण त्यातला एक टक्का ही आपल्या लक्षात राहत नाही. शाळेत शिक्षक म्हणायचे, एका कानाने ऐकले आणि दुसर्‍याने काढून टाकले. डोक्यात काहीच गेले नाही. परीक्षेच्या एक दिवस अगोदर घोकमपट्टी कण्याचा उद्देश्य परीक्षेच्या दिवशी उत्तर लक्षात राहावे, हाच होता. कानात पडलेले शब्द आपल्या स्मृतीत जाऊन सुरक्षित होतात, त्या शब्दांना आपण विसरत नाही, बहुतेक त्यालाच समर्थांनी श्रवण म्हणले आहे. त्याच स्मृतीच्या आधारावरच आपण कृती ही करतो.

प्रापंचिक ज्ञान प्राप्तीसाठी आपण अनेक पुस्तके वाचतो किंवा श्रवण करतो. वेगवेगळ्या ग्रंथांची वेगवेगळी फळे असतात आणि त्या श्रवण केलेल्या ग्रंथांच्या आधारावर आपण नौकरी, व्यापार किंवा उद्योग करतो. पण ह्या सर्व ग्रंथांचे श्रवण आपल्याला मोह मायेच्या जाळ्यात ही अटकवितात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दुराशा वाढते. पोथी श्रवण करून तो  हृदयरोग तज्ञ झाला. अल्प काळात हजारो ऑपरेशन केले. एक दिवस हृदयघाताने त्याची मृत्यू झाली. ड्रीम इलेव्हन किंवा ऑनलाईन लॉटरी खेळून कोट्यावधीचे बक्षीस मिळते हे श्रवण करून, कोट्यावती तरुण अब्जावधी रुपयांचा जुआ खेळतात. त्यातल्या निण्यानऊ टक्क्यांचा पदरी निराशा येते. त्यांचे आयुष्य  उद्ध्वस्त होतात. उद्योग आणि धंद्यात सफल झाला तरी ते यश टिकविण्यासाठी अनेक नैतिक आणि अनैतिक कार्य करावे लागतात. मनावर सतत दडपण असते. कोणावर विश्वास नाही. माणूस एकटा पडतो आणि सदैव चिंताग्रस्त राहतो. कधी कधी निराश होऊन आत्महत्या ही करतो. तात्पर्य फक्त प्रापंचिक ग्रंथ वाचत राहू तर त्याची फळे मिळतील पण दुराशाही वाढत राहील. प्रपंचात ही सुख आणि समाधान मिळणार नाही. आजच्या काळात वाढत चाललेल्या लाईफ स्टाईल रोगांचे, डिप्रेशन, आत्महत्येची प्रवृत्ती किंवा हिंसक आचरण इत्यादींचे मुख्य कारण शारीरिक आणि मानसिक  दुराशाच आहे.

मानव जीवनाचा उद्देश उत्तम प्रपंच करून परमार्थ साध्य करणे होय. श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी हाच उपदेश श्रवण करणाऱ्यांना दिला आहे. श्रीमद् भागवत गीता आणि श्री सार्थ दासबोध वाचल्यावर आपल्याला कळते आपण फक्त निमित्त आहोत कर्ता करविता हा परमेश्वर आहे. हे ग्रंथ वाचून आपली बुद्धी स्थिर होते. आयुष्यात जय-पराजय, लाभ-हानि आणि सुख- दुःख आले तरीही चित्त कधीही ढळत नाही. राजा हरिश्चंद्राची कथा वाचून आपल्याला बिकट  परिस्थितीत ही सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. दुराशा आपल्यापासून दूर राहते. प्रपंच आणि परमार्थ साधण्यात आपण सफल होतो. समर्थांनी म्हंटलेच आहे:

मी कर्ता ऐसे म्हणसी.
तेणे तू कष्टी होसी.
राम कर्ता ऐसे म्हणविसी.
तेणे पावसी येश कीर्ती प्रताप.

श्री सार्थ दासबोध श्रवण करण्याचा एक हेतु मनातील दुराशा दूर करणे ही आहे. 

No comments:

Post a Comment