Thursday, September 28, 2023

पीए नामा: किस्सा ए साक्षर अशिक्षिताचा

 (काल्पनिक किस्सा)

हा दहा बारा वर्षांपूर्वीचा किस्सा. आपल्या देशात  बी.टेक + एमबीए  केल्यावर ही जर केम्पस  सिलेक्शन झाले नाही, तर उत्तम पगाराची नौकरी मिळणे अवघड.  याशिवाय सप्लाय ही डिमांड पेक्षा भरपूर जास्त आहे. अधिकांश तरुणांना कमी पगारावर नौकरी करावी लागते. त्याने कमी पगाराची नौकरी करण्यापेक्षा जास्त पगाराच्या सरकारी नौकरीसाठी तैयारी सुरू केली आणि त्याला सरकारी नोकरी लागली. त्याच्या सेक्शन मध्ये साहजिकच तो सर्वात जास्त साक्षर होता. सेक्शन ऑफिसर ही त्याच्या पेक्षा कमी साक्षर होता. सेक्शन मधल्या समस्यांचे समाधान करत कार्य करणे/कर्मचाऱ्यांकडून करवून हे सेक्शन ऑफिसरचे दायित्व असते. पण आपले नंबर वाढविण्यासाठी अनेक कर्मचारी सरकारी  सरळ मोठ्या साहेबांकडे धाव घेतात. त्याने ही हेच केले, परिणाम? 

मी त्यावेळी एका आयएएस अधिकाराचा पीएस होतो. हा अधिकारी थोडा सनकी होता. प्रत्येक काम नियमानुसार करणारा. सकाळचे नऊ म्हणजे काम सुरू करण्याची वेळ. रोजचे काम रोज पूर्ण करा आणि घरी जा. सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे करणे, गप्पा मारणे इत्यादी त्याला चालत नव्हते. तीन वर्षांत त्याने एकदाही त्याचे व्यक्तिगत काम स्टाफला सांगितले नाही. वरून हरियाणवी असल्यामुळे, कुणाला काय बोलेल त्याचा नेम नाही.  फक्त एक जमेची बाजू होती कागदावर कुणाचाही रेकॉर्ड खराब केला नाही. साहेबांचा कार्याचा ल्लेख एका प्रसिद्ध मालिकेत ही झाला होता. 

त्या दिवशी सकाळी नऊ वाजता, साहेब दिवसभराच्या कामांचा आढावा घेत मला त्याबाबत निर्देश देत होते. त्याच वेळी हा चेंबर मध्ये आला आणि साहेबांना म्हणाला, सर आपल्या एडमिन मध्ये  एक एमटीएस (शिपाई) रिकामा आहे, त्याला अंग्रेजी लिहता- वाचता येते आणि टायपिंग ही येते. त्याची पोस्टिंग जर आमच्या सेक्शन मध्ये झाली तर  इतर कामांत त्याची मदत होईल. सध्या जो  शिपाई आहे, तो फक्त आठवी पास आहे. साहेबांनी मला विचारले, "पीएस साहेब, जरा सांगा सध्याचा  शिपाई जेंव्हा नोकरीला लागला, तेंव्हा शिपाईच्या नियुक्तीची पात्रता काय होती. मी म्हणालो, तेंव्हा रोजगार कार्यालयातून सरळ भर्ती होत होती. पात्रता आठवी पास होती. साहेबांनी विचारले, "शिपाईला अंग्रेजी किंवा हिंदी विषय शिकण्याची बाध्यता होती का"? मी म्हणालो नाही, त्याने मराठीत माध्यमातून आठवी पास केली असती, तरी तो शिपाई पदावर नियुक्तीसाठी पात्र होता. साहेबांनी त्याच्या कडे पाहिले, पण त्याला साहेबांचा इशारा त्याला कळला नाही. आपल्याच नादात तो पुढे म्हणाला, सर, एक अडाणी आणि गंवार शिपाई ज्याला अंग्रेजी येत नाही, पेक्षा एक ग्रेजुएट शिक्षित शिपाई निश्चित उत्तम काम करेल. सरकारी नौकरीत जुम्मा- जुम्मा वर्ष झालेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडून जुन्या अनुभवी शिपाईचा 'गंवार'  शब्दाने उल्लेख करणे साहेबांना आवडले नाही, ते रागातच त्याला म्हणाले, "अच्छा तुम्ही स्वतःला शिक्षित समजतात. किती शिकले आहात"? सर, मी बी.टेक एमबीए केले आहे. साहेबांनी गुगली फेकली, "म्हणजे, तुम्ही चार-पाचशे पुस्तके वाचून पाठ केली, परीक्षा दिली आणि युनिव्हर्सिटी ने तुमच्या डिग्रीवर शिक्का मारला". नाही सर, विषय समजावा लागतो त्या शिवाय परीक्षा पास करणे शक्य नाही. साहेब म्हणाले, अच्छा, त्या आठवी पास शिपाई ने अंग्रेजी शिकली नाही म्हणून त्याला ती भाषा येत नाही. तुम्हाला तुमच्या विषयांचे ज्ञान असते तर तुम्ही आज पुणे- बंगलौर मध्ये चांगल्या पगाराची नौकरी करत असता किंवा युएस मध्ये डॉलर छापत असता".  तुम्ही तर त्या शिपाई पेक्षा जास्त अडाणी आहात. आता इथून जा. वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून काम शिका. दुसऱ्यांची चुगली करणे सोडा. जास्ती त्रास होत असेल तर नौकरी सोडून जा. हां, मी बोलविल्या शिवाय इथे येऊ नका". तो गेल्यावर साहेब मला म्हणाले दोन शब्द वाचून लोक स्वत:ला शिक्षित समजतात आणि अहंकारी होतात. दुसऱ्यांना तुच्छ लेखतात. खरे अशिक्षित असेच लोक असतात. आमचा साक्षर अशिक्षित सेक्शन मध्ये गेला आणि रडू लागला. तावातावाने त्याने त्यागपत्र टंकले. सेक्शन ऑफिसरने त्या त्यागपत्राचे तुकडे करून केराच्या टोपलीत टाकले आणि त्याला चांगला समज  दिला. असो.

ज्ञानार्जन करून आपण साक्षर होऊ शकतो. अर्थशास्त्रात एमए पीएचडी करून आपण साक्षर अर्थशास्त्री होऊ शकतो. उत्तम  प्रबंध लिहून नोबेल पुरस्कार ही मिळवू शकतो.  पण शिक्षित अर्थशास्त्री नाही होऊ शकत.  ज्या व्यक्तीला अर्जित ज्ञानाचा उपयोग करता येतो, तोच शिक्षित. बाकी सर्व साक्षर अशिक्षित, हेच बहुधा साहेबांना म्हणायचे होते.





Monday, September 4, 2023

वार्तालाप (२९): बिना हिशोबाचा व्यापार


लिहणें न येंता व्यापार केला. 
कांही एक दिवस चालिला.
पुसतां सुरनीस भेटला.
तेव्हां खोटे.

समर्थ रामदास म्हणतात व्यवसाय करताना त्याचा लिखित हिशोब ठेवला नाही तर व्यवसाय फक्त काही दिवस चालेल. जेंव्हा सुरनीस (हिशोब तपासनीस) हिशोब तपासायला येईल तेंव्हा व्यवसाय तोट्यात चालला आहे, हे कळेल. ही ओवी वाचल्यावर आपल्याला हेही कळते त्याकाळी ही समर्थांना व्यवसायांची आर्थिक हिशोब लिखित ठेवण्याचे महत्त्वही माहीत होते.

सरकार असो किंवा मोठे व्यवसाय हिशोब तपासणी ठेवतातच, त्या शिवाय त्यांना गत्यंतर नाही. पगारदार आणि छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना ही स्वतः हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला सर्व जमा-खर्च लक्षात राहतो या मानसिकतेतून मुक्त होणे गरजेचे आहे.  एखाद्याने गल्ली-बोळ्यात जरी दुकान उघडले तरी त्याला किमान ५० ते  १०० वस्तू  विकायला ठेवावी लागतात. जर दुकानदार प्रत्येक वस्तूचा खरीद- विक्रीचा हिशोब ठेवणार नाही तर किती माल दुकानात भरायचा आहे हे  कळणार नाही. दुकानातील कर्मचारी/ ग्राहकांनी चोरी केली तरी कळणार नाही. काही वस्तू दुकानात एकत्र होत राहतील आणि त्यांची एक्सपायरी डेट निघून जाईल. हिशोब न ठेवण्याने खर्चावर नियंत्रण राहणार नाही. व्यवसायातील नफा-तोटा करणार नाही. घर खर्चासाठी किती पैसा दुकानातून घ्यायचा हेही कळणार नाही. गल्ली-बोळ्यात नवीन उघडलेली किमान अर्धी दुकाने वर्षाच्या आत बंद होतात त्याचे मुख्य कारण लिखित हिशोब न ठेवणे आहे. 

पगारी नोकरदारालाही खर्चाचा हिशोब ठेवावा लागतो. त्यानुसार महिन्याचे बजेट बनवावे लागते. तो तसे करणार नाही तर महिना पूर्ण होण्या आधीच पगार संपून जाईल. दुकानदाराची उधारी करावी लागेल. मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागतील. मित्रांनी मना केल्यावर सावकार कडून व्याजावर पैसे उसने घ्यावे लागतील. क्रेडिट कार्डचा हिशोब चुकता करणे अशक्य होईल आणि पठाणी व्याज द्यावे लागेल. महिना दर महिना हे कर्ज वाढतच जाईल.  त्याला कर्जातून बाहेर पडणे शक्य होणार नाही आणि शेवटी त्याला घरदार ही विकावे लागेल.
 
आजच्या ऑनलाईन आणि क्रेडिट खरिदीच्या जमान्यात जमा-खर्चाचा लिखित हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण तसे नाही केले तर दोन-चार महिन्यातच तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अटकणार, हे निश्चित. असो.