Friday, June 28, 2019

मेघ आणि यक्षप्रिया


मेघांचा गडगडाट ऐकून यक्षप्रिया इमारतीच्या गच्चीवर आली. प्रियतमाच्या संदेशाने भिजलेल्या पहिल्या पावसात ती मनसोक्त भिजली. पण हे काय अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. पहिल्या पावसाच्या तेजाबी जलधारांनी तिचा चेहरा जाळून टाकला होता. तिचे सौंदर्य नष्ट झाले होते.  

एका इमारती कडे मेघाचे लक्ष गेले, एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे कुरूप झालेला होता. लोक कुजबुज करत होते, आषाढच्या मेघ वरून सर्व काही बघत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला अतीव दुख झाले. या सर्वाला आपणच जवाबदार आहोत, असे त्याला वाटले. आता परतताना रामगिरी वर यक्षप्रियेचा संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार. काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला उदरातील पाणी घेऊन परत फिरावे व समुद्रात रिकामे करावे.  पण त्याला वरूण राजाचा आदेश आठवला. जमिनीवर काय घडत आहे, याची चिंता न करत दिलेले पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळुन पुढच्या प्रवासाला निघाला. 

Tuesday, June 25, 2019

माझे पावसाळी ज्ञान


त्याकाळी जुन्या दिल्लीत नया बाजार येथे महाराष्ट्र समाज होता. जवळपासच्या भागात तीस ते पस्तीस मराठी कुटुंबांचे वास्तव्य होते. समाजात टेबल टेनिस व कॅरम खेळायची सुविधा होती. त्यामुळे समाज हा आमच्या सारख्या मुलांचा टाईमपास अड्डा होता. रविवारी सकाळी समाजात पुस्तकालयहि उघडायचे.  कुमार मासिक ते फास्टर फेणे हे सर्व त्यावेळी तिथे वाचायला मिळायचे. मी बहुतेक सातवीत असेल. जुलै महिन्यातील दिवस, बाहेर पाऊस पडत होता. माझ्या वर्गातील शिकणारे गण्या, झंप्या आणि एक दादा (नुकतेच काठावर 11वी पास झाले होते) आम्ही कॅरम खेळत होतो. आमच्या दृष्टीने दादा हा अत्यंत ज्ञानी होता. त्यादिवशी कॅरम खेळता-खेळता मिळालेले पावसाळी ज्ञान:

मी: दादा, मृगाचा पाऊस हा काय प्रकार आहेत.

दादा (शर्टाची कालर वर करीत):  तू हरीण बघितलास, कसा दिसतो तो.

मी: दादा हरीण सोनेरी असतो व त्याच्या शरीरावर काळे ठिपकेहि असतात. 

दादा: शाब्बास, पटाईत. जेंव्हा काळे-काळे ठिपके असलेले पांढरे ढग आकाशात जमतात, अगदी हरीणासारखे, आणि टीप टीप करत हळुवार असा पाऊस पडतो. या पावसाला मृगाचा पाऊस म्हणतात. पोरींना मृगाच्या पावसात भिजायला भारी मजा येते. 

झंप्या: (पोरींची नक्कल करत) अय्या! किती छान पाऊस, काय मजा येईल भिजण्यात.

दादाने डोळे वटारून झंप्या कडे पाहिले. मलाहि त्याच्या राग आला, 

मी: दादा, हा झंप्या वर्गातहि सदानकदा मुलींकडे पाहत असतो, अभ्यासाकडे  मुळीच लक्ष देत नाही. एखाद दिवशी वर्गातील मुली  याला चांगलेच  धुवणार आणि नंतर याचा बाहि याला चाबकाने बदडेल. हा पुढच्या तिमाही परीक्षेत १०० टक्के नापास होणार, मला खात्री आहे. 

दादा: हे काय ऐकतो मी झंप्या. अरे हे वय शरीर कमवायचे. वेळ मिळाल्यास थोडा बहुत अभ्यासहि करायचा असतो. काडी पैलवानला पोरी घास टाकत नाही. मर्द मुले मृगाच्या पावसात आंघोळ करत नाहीत. समजलास.

गण्या: मग आम्ही कुठल्या पावसात भिजायचं ???

दादा: हत्तीच्या (*हस्त नक्षत्र) पावसात.  जेंव्हा आकाशात हत्ती सारखे मोठे-मोठे काळे-काळे ढग जमतात. जोराचा धाड-धाड पाऊस पडतो. अंगावर  पावसाचे जबरदस्त तडाखे बसतात. अश्या पावसात आंघोळ केल्याने शरीर मजबूत होते. आता सांगा, मर्द मुले कुठल्या पावसात आंघोळ करतात.

आम्ही जोरात ओरडलो, हत्तीच्या पावसात.

दादा:  शाब्बास, मर्दांनो. हां, एक सांगायचे राहिलेच. एक आणिक खतरनाक पाऊस असतो. 

मी: कोणता दादा?

दादा: वाघाचा पाऊस. जंगलात वाघाला सर्वच प्राणी भितात. वाघाची चाहूल लागतात सर्व प्राणी घाबरून दूर पळतात. वाघ गुपचूप शिकार जवळ येतो. मग जोरात डरकाळी फोडत...

झंप्या:आई! ग!!! 

दादा: बायला, चूप बैस. तुझा ईलाज करावा लागेल. आई! ग म्हणण्या पूर्वीच वाघाचे दात तुझ्या नरड्यातून आरपार होतील. चड्डी फक्त पिवळी होणार तुझी. (आम्ही जोरात फिदी फिदी हसलो). तर काय म्हणत होतो मी, जेंव्हा आकाशात वीजा चमकतात. वादळ जोरात गडगडाट करत असतात. अचानक, जसा वाघ शिकारवर तुटून पडतो, तसेच वीजहि जोराचा कडकडाट करत जमिनीवर पडते. ज्याच्या अंगावर वीज पडणार तो क्षणात खलास. अश्या पावसात भिजायला जायचे नसते, गुमान घरात गुपचूप बसून राहायचे असते.  

त्या दिवशी प्रथमच मला पावसाचे किती प्रकार असतात व कोणत्या पावसात आंघोळ करायची असते, हे कळले. दादा बाबत आदर आणिकच वाढला. बाकी झंप्याला एक दिवस वर्गातील मुलींनी चांगलेच धुतले व तिमाही परीक्षेत नापास झाल्यामुळे त्याच्या बापानेहि. त्यानंतर त्याने कधीच मुलींकडे ढुंकूनहि पाहिले नाही. अजूनही तो अविवाहितच आहे. 

 *हस्त म्हणजे हात हत्ती नव्हे. 

Wednesday, June 12, 2019

पाऊस: जन्माचे रहस्य


तुफान पाऊस कोसळत होता. अचानक तिचे लक्ष त्याच्याकडे गेले. काळ्या धिप्पाड पहाडासारखा तो तिचे भिजलेले आरस्पानी सौंदर्य डोळ्यांनी पीत होता. अचानक ढगातून वीज कडकली. घाबरून तिने त्याला मिठी मारली.... तिच्या कुशीत चैतन्याचे दान टाकून तो परदेसी निघून गेला...

आज पुन्हा तसाच तुफान पाऊस कोसळत होता. माय-लेकी पाऊसात भिजत होत्या. वरुणा! जाणायचे होते तुला, तुझा बा कोण?  त्या दिवशी असाच पाऊस कोसळत होता... अचानक जोराचा  कडकडात करत कुठेतरी वीज कोसळली.. आई ग! म्हणत ती आईच्या कुशीत शिरली....

आईच्या डोळ्यांतून बरसणाऱ्या अश्रूंच्या धारा पुसत ती म्हणाली, आई, जाणले मी माझ्या जन्माचे रहस्य. काळ्याकुट्ट ढगाकडे पाहत ताठ मानेने ती म्हणाली, वरुण पुत्री मी वरुणा....

Tuesday, June 4, 2019

आठवणीतून: ते सूर, ती आठवण आणि मी


क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस - सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नवे वळण देते. निराशाच्या गर्तेत बुडालेल्या मनात आशेचा संचार होतो. असाच एक अनुभव. वर्ष  २००७, मईचा महिना, काही महिन्यांपासून
पाठीचे मणके आपल्या जागेवरून हलल्यामुळे कमरेचे  दुखणे  वाढत होते. डॉक्टर कोठारीनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण आपण मराठीमाणूस. कामाप्रती अधिक निष्ठावान. मग व्हायचा तोच परिणाम झाला. त्यावेळी कार्याचा अधिकतेमुळे रोजच रात्री उशीर अर्थात घरी पोहचता-पोहचता रात्रीचे १० तरी वाजायचे.  एक दिवस रात्रीचे जेवण घेतल्यानंतर वाशबेसिन वर हात धुवत असताना पाठीत असंख्य विजा चमकतात आहे असे वाटले. डावा पाय सुन्न झाला. असंख्य वेदना कमरे व पायातून उमटल्या. डावा पाय सरळ करता येत नव्हता कसेबसे रात्र  जागून काढली. सकाळी एम्बुलेन्स बोलवली.  स्ट्रेचर  टाकून मला सफदरजंग हॉस्पिटलला नेले. पेशंट पहायचा दिवस नसतानाही  डॉक्टर कोठारी मला बघण्यासाठी हॉस्पीटला आले. डॉक्टरांचं न ऐकणार्या पेशंटच आणखीन काय होणार, आपण  पंधरा-वीस  दिवस वाट पाहू,  काही फरक पडला तर ठीक, अन्यथा ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. बिस्तरावर न हलता-डुलता पडून राहाण्याचा सख्त आदेश ही मला दिला. खंर म्हणाल तर त्या वेळी जरा ही पाय हलला तर एवढ्या वेदना होत होत्या की हालण- डुलण शक्यच नव्हत.  म्हणायला सोप आहे,  "प्रात:विधी" पासून सर्वकाही बिस्तरावर करताना, शरीरापेक्षा मनाला किती यातना होतात, हे रोगीच जाणतो.  असेच १० ते १२ दिवस  उलटले, वेदना किंचित ही कमी होत नव्हत्या. रात्री छोट्या स्टूल वर पाय ठेउन झोपण्याचा असफल प्रयत्न करायचो.  झोपेचा अभाव आणि दुखण याचा परिणाम शरीरावर व मनावर होऊ लागला होता. कदाचित आपण कधीच बिस्तरावरून उठू शकणार नाही असे वाटू लागले होते त्या मुळे मनात निराश्याची भावना दाटू लागली होती.

मग तो दिवस उगवला. रात्रीची वेळ होती, झोपण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात बायको म्हणाली,  "सा  रे ग म"  पुन्हा सुरु झाल आहे.  गाणे ऐका थोड बर वाटेल अस म्हणत तिने टीवी लावला. पण वेदने मुळे गाणे ऐकण्यात लक्ष लागेना

अचानक  "क्षण दिपती क्षण लपती,  भिजुनी उन्हें चमचमती"  हे  सूर काना वर पडले.  अचानक  पंचवीस पूर्वीची घटना डोळ्यांसमोर तरळली, पावसाळ्याचे दिवस होते. श्रावणाचा महिना असल्या मुळे ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. ऑफिस सुटल्या वर चार्टर बस साठी वाट पाहत कृषी भवनच्या बसस्टाप वर उभा होतो.  क्षणभरा करता पावसाची एक जोरात सर आली आणि चिंब भिजवून गेली. पुन्हा ऊन निघाले. अचानक डोळे प्रकाशात दिपले. वळून बघितले तिच्या सोनेरी केसात अडकलेल्या पावसाच्या थेम्बातून परावर्तीत होऊन सूर्य प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडत होता.  पांढर्या सलवार-कुर्त्यात  भिजलेली ती अतिशय मोहक दिसत होती. तिच्या वरून दृष्टी हलत  नव्हती. काही क्षणानंतर  वरती आकाशाकडे बघितल सूर्यदेव ही ढगाचा परदा सारून भिजलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते. मला हसू आले. मनातल्या मनात शीळ घालत पुटपुटलो  "सूर्यदेव तुम्हीही आमच्या सारखे, दिसली पोरगी की शीळ घातली.  तुम्हाला स्वर्गात अप्सरांची काय कमी, पृथ्वीवरच्या सौंदर्याला का म्हणून बघता.  काही आमचा विचार करा." तेवढ्यात  चार्टर बस आली. बस मधे चढलो. खिडकी जवळची सीट मिळाली. बस सुरु झाली. सहज लक्ष गेल, पश्चिम दिशेला आकाशात इंद्रधनुष्य उमटलेल दिसत होत. गाण संपता-संपता केन्हां डोळा लागला कळलंच नाही. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर जाणवलं, वेदना पुष्कळ कमी झालेल्या होत्या. पाया खालचा स्टूल दिसत नव्हता. झोपेत पाय आपोआप सरळ झाला होता. बायकोचा चेहरा ही आज उजळल्या सारखा दिसत होता. इतक्या दिवसांपासून  ती पतिव्रता ही नवर्या सोबत  रात्र जागून काढत होती. काल छान झोप लागली वाटत. तुमच्या साठी 'पॉट'  घेऊन येऊ का, तिने विचारले. मी म्हणालो, आज बिस्तरावर नाही.  मुलाच्या मदतीने toilet पर्यंत गेलो.

रात्री ऐकलेले ते सूर आठवले, ती आठवण ही डोळ्या समोर आली. खरोखरच संगीतात एवढी शक्ती असते की एका रात्रीत वेदना कमी होतात व शरीरात नवीन चैतन्य निर्माण होते. नंतर कळले ती गायिका सायली पानसे होती.  हळू हळू तब्येतीत सुधारणा होऊ लागली.  सप्टेंबर महिन्याचा अखेरीच ऑफिस जॉईन केल. अर्थातच पुढील एक-दीड  वर्ष कमरेला बेल्ट आणि काठी सोबत ठेवावी लागली. माझ्या ठीक होण्यात डॉक्टर कोठारींचा मोठा वाट होता यात शंका नाही. पण त्या दिवशी ऐकलेल्या त्या सुराचा व त्या आठवणीचा ही मोठा वाटा आहे हे ही तेवढच सत्य.