Saturday, October 14, 2023

आमच्या छकुलीची मराठी अस्मिता उर्फ भाषाई राजनीती


आपल्याला वाटते तसे लहान पोरं ही निष्पाप असतात ही भारी गैर समजूत आहे. जन्माच्या पहिली दिवसापासून ते आपला स्वार्थ सिद्ध करण्याची राजनीती शिकू लागतात.  जशी निवडणूक जवळ येते मुंबईत अनेक नेत्यांची मराठी अस्मिता जागृत होते. तसेच आमच्या छकुलीची ही मराठी अस्मिता अचानक जागृत झाली.  असाच एक किस्सा.  

छकुलीचा लहान भाऊ तेजस ( बदलेले नाव) तिला बडी दीदी म्हणतो. त्याच्यापेक्षा सहा महिने मोठ्या चुलत बहीणीला तो छोटी दीदी म्हणतो.  तिन्ही  मुले मला आबा आणि सौ.ला आजी म्हणतात

छकुलीने कारोना काळातील दोन वर्ष अर्थात केजी आणि पहिलीचा ऑनलाईन अभ्यास  आमच्या घरी केला. दोन वर्षांत ती मराठी उत्तम बोलू लागली होती. छकुली उन्हाळ्याच्या सुट्टीत मंडी जिल्हयातील पहाडावर असलेल्या त्यांच्या गावी जाते. गावात बडी अम्मा आणि आणि चुलत आजी फक्त मंडीयाली बोलतात, त्यामुळे ती भाषा ही तिला समजते. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर तिला घरची आठवण ही येत नाही. पंधरा-सोळा खोल्यांचे भले मोठे घर, गाईचा गोठा, दोन बकऱ्या  आणि मागे एक मोठे आंगण. याशिवाय चित्र-विचित्र पक्ष्यांचा गोंगाट, दूर दिसणारी व्यास नदी, दरीतील गावांत पसरलेले धुके. घरची आठवण येणे शक्यच नाही. तेजसला मात्र उन्हाळी सुट्टीत गावी सोडत नाही. एक तर वय कमी आणि खोडकर स्वभाव  असल्यामुळे  गावी गेल्यावर त्याच्यावर सतत लक्ष ठेवावे लागते.   


वेगळा विषय. यावर्षी जलपा मातेची अवकृपा झाली. पहाडावर भयंकर पाऊस झाला. शेकडो घरे नष्ट झाली. मृत्यूचे तांडव झाले. घराचा मागचे आंगण गायीच्या गोठ्या समोरचा भाग पूर्ण कोसळला.  थोडक्यात घर बचावले. (छकुली आजीच्या कडेवर, आता हे आंगण कालातीत झाले आहे)

गेल्या वर्षी नियमित शाळा सुरू झाली. छकुली आपल्या घरी परतली. छकुली मराठी भाषा ही हळू -हळू विसरू लागली होती.  आठवड्यातून  एकदा किंवा दोनदा आमची लेक व्हिडिओ कॉल करते. तिन्ही पोरांशी बोलणे होते.  छकुलीला मराठी समजत असली तरीही ही व्हिडिओ कॉल वर ती हिंदीत बोलू लागली होती. 

आता छकुली तिसरीत आहे. छोटी दीदी आणि तेजस दोन्ही एकाच वर्गात अर्थात केजीत आहे. तिन्ही एकाच शाळेत शिकतात. सर्व छोटी मुले शाळेत खोड्या करतातच. फक्त मुलांच्या खोड्या  मुलींपेक्षा वेगळ्या असतात. सुरवातीला छोटी दीदी आपल्या भावाच्या खोड्यांची तक्रार बडी मम्माला करायची. पण दोन -तीन महिन्यात तिला वर्गात भाऊ असण्याचे फायदे कळून चुकले. दोघांची युती झाली. तिने भावाची तक्रार करणे बंद केले. आता दोघांचे सिक्रेट तिसर्याला कळने अशक्य झाले होते. 

दोन दिवस आधी गंमत झाली रात्री नऊ वाजता छकुलीचा व्हिडिओ कॉल आला. छकुलीने चक्क शुद्ध मराठीत विचारले, आबा कसे आहात. तुमची तब्येत कशी आहे. पुढे ती म्हणाली, आबा मला मराठी आवडते. मी तुमच्याशी नेहमी मराठीतच बोलत जाईन. छकुलीचे उतू जाणारे मराठी प्रेम पाहून, माझ्या मनात पाल चुकचुकली. 

शेवटी आमच्या लेकीने खुलासा गेल्या. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी हॉस्पीटल  मधून घरी परतल्या-परतल्या छकुली आईला म्हणाली, मम्मा आज ना तेजस ने.....पण लगेच छकुलीचे लक्ष शेजारी उभ्या असलेल्या तेजस कडे गेले आणि तक्षणी विषय बदलत म्हणाली, आज ना हमने स्कूल में बहुत मजे किये, इत्यादी इत्यादी. मग हळूच आईच्या कानात मराठीत तेजसच्या खोडयांची तक्रार केली. साहजिकच होते, बडी  दीदी आईला काय म्हणते आहे हे तेजसला कळले नाही. पण तेजस लक्ष देऊन ऐकतो आहे, हे लक्षात आल्यावर छकुली त्याला म्हणाली, मै ना मराठी में तुम्हारी तारीफ कर रही थी की तेजस बहुत अच्छा है. बिचाऱ्या तेजस ने बडी दीदीला थॅन्क्स म्हंटले. हा प्रकार पाहून आमच्या लेकीची हसता-हसता पुरेवाट झाली. छकुलीला मराठी का आवडू लागली याचे कारण कळले. आता छकुली आई सोबत सिक्रेट गोष्टींसाठी आणि स्वतः च्याच फायद्यासाठी मराठी भाषेचा उपयोग करणार.  

शेवटी छोटे बच्चे असो की राजनेता, स्वत:चा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी भाषाई अस्मिता जागृत होते, हेच सत्य. बाकी कारण काही ही असो पुढच्या पिढीत मराठी जिवंत राहणार, याचा आनंद ही झाला.



 

Sunday, October 8, 2023

किस्सा अब की बार सौ पार.

भारताला १०७ पदक मिळाले त्यासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन. त्याच सोबत देशाच्या खेळांची नीती निर्धारित करणाऱ्यांचे ही अभिनंदन.  

बहुतेक दीड एक महिन्यापूर्वीची गोष्ट, एका जुन्या सहकारीचा फोन आला. हॅलो, देशभक्त कैसे हो( बहुतेक त्याला अंधभक्त म्हणायचे होते), मी पण काही कमी नाही लगेच त्याला उत्तर दिले, बोल रे टेबलस्पून बऱ्याच दिवसांनी तुला आठवण आली, काय म्हणायचं आहे. अरे तुझ्या फेकूने नारा दिला आहे आपकी बार सौ पार.  खूप लांबची फेकली आहे. ७० पेक्षा कमी मिळाले तर गोची होईल. विपक्ष हा मुद्दा उचलून धरणार आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. तुला ही बरणाल वापरावे लागेल. मी उतरलो, जर प्रधानमंत्री ने असे म्हटले आहे तर नक्कीच 100 पार होतील. तो जोरात हसला आणि म्हणाला,  देशभक्त जरा मागचे रेकॉर्ड तपासून बघ. पदक वाढले तरी जास्तीत जास्त दहा-पंधरा वाढतील 100 तर निश्चित होणार नाही. (आकड्यांची खेळण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची सवय), पैज लाव. मी पैज लावत नाही, हे तुला माहित आहे. पण भेटल्यावर माझ्या तर्फे चाय पकौडे किंवा तुझ्या तर्फे लंच. 

या वेळी पहिल्यांदा सोनी लिव्ह वर सर्व खेळ पहिले. दिवसभर  टीव्ही समोर बसून, चहाचे घोट घेत खेळाडूंना प्रोत्साहन देणे सुरू केले. एक दिवस सौ. ने कंटाळून आयुष्यात प्रथमच विचारले, आजकाल लिहणे सोडून दिले आहे का? मी उतरलो १०० पूर्ण होऊ दे, मग ठरवेल काय लिहायचे ते. दिवसभराच्या भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाची चीरफाड करणाऱ्या समीक्षकांना ही १०० पदक मिळतील याची खात्री नव्हती. माझे मन ही सांशक होते. पण विश्वास होता बाकी मंत्रालयाच्या टार्गेट प्रमाणे हे लक्ष्य ही निश्चित पूर्ण होईल. बाकी १०७ पदक मिळाले तरी सोनी लिव्हच्या समीक्षकांपाशी सरकारची तारीफ करण्यासाठी शब्द नव्हते. असो.

काल मित्राला फोन करून त्याला विचारले, कुठे सुजले असेल तर बरनाल  घेऊन येऊ का? दोन चार शिव्या देत तो म्हणाला, मला माहित आहे, दिवसभर टीव्ही समोर बसून तू काळी जादू करत असणार, त्या शिवाय हे शक्य नाही. मी उतरलो, तुला माहित होते, तर पैज का लावली. मी लवकरच भेटायला येणार आहे लंच  तैयार ठेव.

चला शंभरी पार झाली. आता १५० करायचे असेल तर तैराकी, जिमनॅस्टिक आणि इतर खेळांवर वर ही काम करण्याची गरज आहे.  निवडणुकीत विपरीत घडले नाही तर २०३० पर्यंत हे लक्ष्य निश्चित पूर्ण होऊ शकते. 

शेवटी, मी ऑलम्पिक चॅम्पियन आहे.  मला ट्रायल देण्याची गरज नाही. मी सरकारला ब्लॅकमेल केले. एशियन गेम्सचे तिकीट पटकावले. पण गर्वाचे घर नेहमीच खाली होते.  हे मात्र त्याला कळले नाही.


Monday, October 2, 2023

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

 (काल्पनिक कथा)

वंचित समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सरकारी नौकरीत आरक्षण दिले गेले. आरक्षित वर्गाला पात्रता मार्क्स कमी असेल तरी सरकारी नौकरी मिळू शकते. वय मर्यादा ही वाढवून दिली आहे. पण या विशेष सुविधांचा विपरीत परिणाम ही होतो. अशाच एका तरुणाची कथा...

आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी  कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो. काही म्हंटले की अंगावर येतो. मी कारण विचारले.  त्याने पूर्ण कथा सांगितली

सुनीलचे वडील सरकारी नौकरीत होते. साहजिकच होते मुलांना सरकारी नौकरी मिळावी अशी त्यांची ईच्छा होती. सुनील कसा बसा बीए पास झाला. त्याने स्टनोग्राफी शिकली. त्याला सरकारी नौकरी मिळाली. त्याचा लहान भाऊ हुशार होता, तो प्रथम श्रेणीत तो एम.ए. झाला. त्याच वेळी त्याचे वडील ही हार्ट अटॅक ने गेले. आईला सरकारी पेन्शन मिळू लागली. त्याने ही सुनील सारखे सरकारी नौकरीसाठी परीक्षा देणे सुरू केले. आता सरकारी परीक्षा कोणत्याही पदासाठी असली प्राथमिक परीक्षेत अंग्रेजी सोबत गणित, सामान्य ज्ञान आणि रिजनींगचे पेपरस् असतात. अर्ध्या तासात ५० प्रश्न सोडविणे आर्ट्सचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी जरा जडच. या शिवाय आरक्षण असेल तरी एका पोस्ट साठी 25 ते 100 तरुण परीक्षा देणारे असतात. असेच चार पाच वर्ष निघून गेले घरात खटके उडू लागले. तुझे वय वाढत चालले आहे, आधी नौकरी शोध आणि नौकरी करता करता परीक्षा दे. जास्त वय झाल्यावर नौकरी मिळणे कठीण होईल. अनेकांना वयाच्या तिशी पर्यंत सरकारी नौकरी मिळाल्याची अनेक उदाहरणे त्याच्या बिरादरीत होती. शिवाय आईची शह ही त्याला होती. खरे म्हणाल तर एक दोन परीक्षा दिल्यानंतर आपली पात्रता आपल्याला कळून चुकते.  तरीही फक्त आशेच्या जोरावर तरुण मुले परीक्षा देत राहतात. किंवा घरच्यांना मूर्ख बनवित राहतात (हे सर्वांनाच लागू). पण सतत अपशायामुळे मानसिक तणाव वाढू लागतो. अखेर एकदाची त्याची तिशी ही उलटली. आता सरकारी नौकरीचा मार्ग खुंटला. 

आर्ट्स विषय घेऊन एम.ए. करणाऱ्याला चांगल्या पगाराची निजी क्षेत्रात नौकरी मिळणे कठीण आणि त्यातच तिशी उलटलेल्या माणसाला कोण नौकरी देणार. नौकरीच्या शोधात एक वर्ष निघून गेले. आता आईही टोमणे मारू लागली. एक दिवस त्याने त्याच्या घरा जवळच जनकपुरीत नवीन उघडलेल्या शोरूमच्या बाहेर  सेल्समनच्या नौकरीचे विज्ञापन बघितले. त्या दिवशी इंटरव्यू साठी दोनच उमेदवार आले होते. त्यातला एक बारावी पास 20 वर्षाचा तरुण मुलगा होता. मालकाने दोघांचा एकत्रच इंटरव्ह्यू घेतला. त्या मुलाला साधी अंग्रेजी ही येत नव्हती. सुनीलच्या भावाला वाटले किमान इथे तरी त्याला नौकरी मिळेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी शोरुम मध्ये गेला तर पाहतो काय तिथे तो 20 वर्षाचा तरुण काम करत होता. त्याला राग आला, त्याने मालकाला जाब विचारला.  मालकाने त्याला उत्तर दिले, या मुलाला आम्ही सर्व कामे सांगू शकतो. पण तू जास्त शिक्षित असल्यामुळे तुला सांगता येणार नाही. बाकी अंग्रेजी भाषेचे विशेष काय, कामचलाऊ अंग्रेजी तो काही दिवसांत शिकून जाईल. सुनीलच्या भावाला वाटले असावे बहुतेक त्याला कधीच नौकरी मिळणार नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याच दिवसापासून त्याने बोलणे सोडले. घरात शून्यात पहात बसून राहू लागला. 

ग्रुप सी आणि डी सरकारी नौकरीसाठी जिथे जास्तीसजास्त शैक्षणिक पात्रता स्नातक असते. तिथे वय मर्यादा २५-२६ पेक्षा जास्त नसली पाहिजे. कारण निजी क्षेत्रात अश्या पदांसाठी मोठ्या वयाच्या तरुणांना नौकरी मिळण्याची संभावना फारच कमी असते. परिणामाचा विचार न करता व्होट बँक राजनीती साठी सरकार नौकरीची वय मर्यादा सतत वाढवत जात आहे. परीक्षा देणाऱ्यांपैकी  फक्त एक -दोन टक्यांना सरकारी नौकरी मिळणार आणि बाकीचे वय परिक्षा देण्यातच निघून जाणार. त्यांचे काय होणार हा विचार कुणीच करत नाही. वय जास्ती झाल्याने शारीरिक त्यांच्यात मेहनतीचं काम करून धनार्जन करण्याची क्षमता ही राहत नाही. इतर कौशल्य  शिकणे ही तिशी नंतर अवघड जाते.

सुनीलचा भाऊ मानसिक उपचारानंतर ठीक झाला. मोठ्या भावाच्या प्रयत्नाने त्याला नौकरी ही मिळाली आणि नौकरी करणारी छोकरी ही. आज त्या दोघांना मिळून ३०-३५ हजार मिळतात. पाठीमागे खंबीर मोठा भाऊ असल्यामुळे साठा उत्तराची कहाणी सफल झाली. पण सर्वांचे असे नशीब नसते. अधिकांश तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. 

या विषयावर सहकर्मीं सोबत अनेकदा चर्चा केली असेल. सरकारी नोकरीत बिगर तकनीकी ग्रुप डी, सी आणि बी पदांसाठी वय मर्यादा २५ च्या वर नको या बाबतीत सर्वच एकमत होते. आयएएस, राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी ही, तकनीकी पद, सोडून वय मर्यादा ३० पेक्षा कमी पाहिजे. याशिवाय २५ नंतर पार्ट टाईम का असेना, रोजगार सुरू केला पाहिजे.