Tuesday, May 3, 2016

कोवळ्या मुलांची प्रेम कथा उर्फ पैश्यांचा वर्षाव



शास्त्रात म्हंटले आहे, वयाच्या पंचविशी पर्यंत ब्रम्हचारी राहून शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण पूर्ण झाल्यावरच संसारात पडले पाहिजे. बाबा साहेब अम्बेडकर ते प. नेहरू सर्वांनी आधी आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर राजनीती केली. एकाने संविधान घडविले आणि दुसर्याने राज्याचा कार्यभार सांभाळला. शिक्षण सोडून ते प्रेमात पडले असते आणि घरातून पळाले असते तर  बाबा साहेबानी संविधान लिहिले असते का? सध्याचेच एक ताजे उदाहरण, एका विद्यार्थीने शिक्षण घेता-घेता राजनीती सुरु केली. राजनीती करण्याचे साईड इफेक्ट त्याच्या समोर आले. तो त्यांच्या सामना करण्यास असमर्थ ठरला कारण त्याच्या पंखात तेवढी शक्ती नव्हती.  निराश होऊन त्याने आत्महत्या केली. जर त्याने शिक्षण पूर्ण केले असते आणि नंतर राजनीतीत आला असता तर त्याचा असा दारूण अंत नसता झाला. असो. 

दोन-तीन वर्षांपूर्वी बालक पालक हा सिनेमा आला होता. टीवी वर बघितला होता. त्यात शाळेकारी मुलांच्या लेन्गिक विषयावरील समस्या दाखविल्या होत्या. तो सिनेमा अफाट चालला.  शाळेत शिकणारे  विद्यार्थी हि एक मोठा बाजार आहे, हे चाणाक्ष मराठी निर्मात्यांनी ओळखले. आता शाळेत शिकणार्या कोवळ्या मुलांना प्रेम कशाशी खातात कळण्याची अक्कल असते का याचा विचार हि त्यांनी केला नाही. डोळ्यांसमोर फक्त पैश्यांचा वर्षाव दिसत होता. 

टाईमपास नावाचा सिनेमा आला. सिनेमा बनविण्याचा फार्मुला नेहमीचाच. पूर्वीच्या काळी नायक एक मिल मध्ये काम करणारा मजदूर असायचा आणि हिरोईन मालकाची मुलगी. त्यांची   प्रेम कथा आणि संघर्ष पडद्या वर रंगविल्या जायची.  त्याच धर्तीवर शाळेत शिकणारी शिक्षित कुटुंबातली विद्यार्थिनी म्हणजे नायिका आणि झुग्गीत राहणारा शिक्षणा पासून वंचित मुलगा म्हणजे नायक. सिनेमात दोघांचे प्रेम प्रकरण दाखविले. सिनेमा सुपर डुपर हिट झाला. अधिकांश शाळेकारी मुलांनी चोरून का असेना हा सिनेमा बघितला असेलच. सिनेमा पासून प्रेरणा घेऊन शाळेत शिकणारे विद्यार्थी अभ्यास सोडून टाईमपास  करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या मुलांचे भविष्य काय, हे सांगायची गरज नाही. 

टाईमपासची सफलता पाहून निर्मात्यांनी आणखीन पुढे एक पाऊल टाकले. हीच कहाणी शहरातून गावात आणली.  मराठी वाहिनींवर सैराट सिनेमाचे ट्रेलर  बघितले. गावच्या पाटील म्हणजे खलनायक हि मराठी सिनेमांची परंपराच. साधा-भोळा गरिब परिवारातील सच्चा इन्सान म्हणजे नायक. फरक एवढाच पूर्वी त्याची जात कुठली बहुतेक हे कळायचे नाही. सैराट सिनेमात शहरात झोपडीत राहणारा नायक गावात खालच्या जातीचा मुलगा झाला.  मुलगी पाटलाची कन्या झाली (नायिका नववीत शिकणारी मुलगी आहे). दोघेही अभ्यास सोडून प्रेमाची गाणी गुणगुणू लागले अर्थात झिंगत नाचू लागले. बाकी प्रेमात अडथळे आणणारे नेहमीचेच खलनायक. एक बदल आणखीन केला शिकणार्या विद्यार्थीनीच्या हातात पिस्तुल हि दाखविले आहे. प्रेमाच्या आड येणार्यांना पिस्तुलच्या गोळीने ठोका. 

उद्या जर शाळेत विद्यार्थी पिस्तुल  घेऊन येऊ लागली. आपले प्रेम प्रकरण निकालात लावण्यासाठी पिस्तुलीचा वापर करू लागले तर काय होईल, कल्पनाच करवत नाही. या वरून आठवले गेल्या वर्षी एका शाळेच्या शिक्षकाने एक किस्सा सांगितला होता.  एका मुलाला त्याच्या वर्गातली एक मुलगी आवडायची, त्याचाच वर्गातला एक दुसरा मुलगा सुद्धा त्या पोरीवर लाईन मारायचा.  पहिला मुलगा वडिलांची पिस्तुल घेऊन शाळेत आला. त्याने आपल्या एका मित्राला सांगितले कि तो आज आपल्या रस्त्यातला रोडा दूर करणार आहे आणि पिस्तुलहि दाखविले. त्याच्या मित्र घाबरला. मित्राने लगेच प्रिन्सिपलला या बाबत कळविले. तत्काळ त्याच्या दफ्तरातून पिस्तुल बरामद केले. त्याच्या वडिलांना सूचना दिली. अनुचित प्रकार न झाल्यामुळे दोन्ही मुलांचे भविष्य वाचले. 

कोवळ्या मुलांवर सिनेमाचा प्रभाव पडतोच. शिक्षण घेता-घेता प्रेम करणे काही गुन्हा नाही, किंबहुना अभ्यास सोडून प्रेम करणे जास्त चांगले. घरातून पळून जाण्यात हि काही दोष नाही. परंतु घराची सुरक्षा सोडून पाळणाऱ्यांचे काय हाल होतात याची त्यांना कल्पना नसते. प्रेमात आड येणार्यांवर पिस्तुलची गोळी चालविणे हि गुन्हा नाही इत्यादी इत्यादी. पण या गोष्टींचा काय परिणाम काय होणार हे समजण्याची क्षमता कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन शाळेकारी/ कालेजच्या मुलां/मुलींमध्ये असते का? अल्प वयीन मुलीला पळविण्याचा परिणाम काय, माहित असते का? शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्यावर, त्यांचे भविष्य हि अंधकारमय होणार हे माहित असते का?  

सैराट सिनेमात जर नायक आणि नायिका मोठ्या वयाचे, स्वत:च्या पायावर उभा असलेला, पळून जाण्या एवजी गावात राहून संघर्ष करणारा परशा दाखविला असता तर चालले नसते का? पण मग पैश्यांचा वर्षाव कसा झाला असता???

No comments:

Post a Comment