Saturday, January 2, 2016

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ



काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्या साठी दोन सूत्र सांगितले-पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.

विकल्परहित संकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला  माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेल तर आपण कुठेच पोहचू शकत नाही.  डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो.  योगी बनण्यासाठी योग साधना करावी लागेल तर गाणे शिकण्यासाठी योग्य गुरूच्या मार्गदर्शनात रियाज करावा लागेल. अर्थात जीवनात लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे. पोहणे न शिकतातच नदीत उडी मारणार्यांपैकी काहीच भाग्यशाली लोक असतात जे नदीत वाहणाऱ्या ओंडक्याच्या मदतीने दुसर्या किनार्यावर पोहचतात बाकींच्या नशिबी नदीत बुडणेच.

अखंड पुरुषार्थ: एकदा लक्ष्य निश्चित केल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयास कारणे गरजेचे. एक दिवस १० तास अभ्यास करणारा  आणि ५ दिवस झोपणार्या विद्यार्थीला चांगले मार्क्स मिळणे अशक्यच. त्या पेक्षा दररोज नियमित २ तास अभ्यास करणार्याला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त. तसेच दुकानदार असो वा चाकर, दररोज नियमितपणे कार्य करणे गरजेचे असतेच. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी निरंतर कार्य करणे म्हणजेच तपस्या होय. या साठी आपल्याला ३ गोष्टींची गरज आहे - स्वस्थ शरीर, ज्ञान आणि अनासक्त कर्म.

स्वस्थ शरीर: निरंतर कर्म करण्यासाठी स्वस्थ निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर जर रोगग्रस्त किंवा दुर्बल असेल तर इच्छा असूनही आपण निरंतर कार्य करू शकत नाही. आता माझेच उदाहरण या घटकेला दिल्लीत थंडी आहे, कमरेचे जुने दुखणे पुन्हा वर आल्यामुळे इच्छा असूनही काम्पुटर वर टंकन करणे शक्य होत नव्हते. साहजिकच आहे शरीर दुर्बल आणि रोगी असेल तर आपण निरंतर कार्य करू शकणार नाही आणि आपले उद्दिष्ट हि साध्य करू शकणार नाही. मनात निराशा घर करेल. मन हि रोगी रोगी बनेल. म्हणूनच म्हंटलेले आहे.  'शरीर माध्यम धर्मं खलु साधनम'. कुठलेही कार्य, मग जप-तप, योग, अभ्यास, नौकरी-धंधा आणि शेती. शरीर निरोगी असणे गरजेचे. त्या साठी निरंतर योग आणि व्यायाम आवश्यक आहे. 

ज्ञान: लक्ष्य प्राप्ती साठी लक्ष्यावर पोहचण्यासाठी लागणारे ज्ञान हि आवश्यक असते. डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या शिवाय आपण डॉक्टर बनू शकणार नाही. तसेच एखाद्या उंच पर्वतावर चढायचे असेल तर पर्वतावर चढण्याचे प्रशिक्षण व त्या साठी लागणारे सर्व उपकरण, या सर्वांची गरज असते. त्या शिवाय आपण पर्वतावर चढू शकत नाही. व्यापार करायचा असेल तर त्या धंद्याची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे, अन्यथा व्यापारात नुकसान हे होणारच.

अनासक्त कर्म:  आपल्या उद्दिष्ट प्राप्ती साठी आपण अखंड पुरुषार्थ केला तरी हि कित्येकदा आपल्या हातात नसणाऱ्या घटनांमुळे कार्य सिद्ध होत नाही. आपले केलेले कर्म वाया जाते, त्यातून निराशेची भावना मनात घर करते. उदा: एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या परीक्षेसाठी उत्तम अभ्यास केला, परीक्षेत हि सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने दिली. पण कुठल्या तरी परीक्षा केंद्रात पेपर फुटला. परीक्षा रद्द झाली. कुठलीही चुकी नसतानाही त्या विद्यार्थाची मेहनत फुकट केली. प्राकृतिक प्रकोप- पूर, वादळ, भूकंप, अग्नी या शिवाय चोरी, डकैती, अस्थिर राजकीय परिस्थिती इत्यादींचा परिणाम हि आपल्या कर्मांवर होतोच. कर्मावर आसक्ती असेल तर निराशा मनात घर करणे साहजिकच. या शिवाय कधी-कधी असे हि होते, थोडीबहुत सफलता मिळताच, आपल्या कर्माचे आणि पुरुषार्थाचे फळ मिळाले, असे समजून आपण पुरुषार्थ करणे सोडून देतो. आपल्या कर्माच्या आसक्तीत गाफील राहिल्यामुळे काही काळानंतर बदलत्या परिस्थितीचा फटका त्यांना बसतो. स्वर्गीय धीरूभाई अंबानी जर एक कारखाना लाऊन चैनीत बसले असते तर आज एवढा मोठा रिलायन्स समूह दिसला नसता. बाबा रामदेव हि एक योगपीठ टाकून स्वस्थ बसले नाही. त्यांनी फूडपार्क, ग्रामोद्योग, आयुर्वेद अनुसंधान आणि प्राकृतिक शेतीच्या संवर्धनाचे कार्य हि हातात घेतले. या शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणावर आचार्यकुलम उघडण्याची हि योजना आहे. अर्थातच एक लक्ष्य पूर्ण होताच, दुसरे लक्ष्य निर्धारित करणे व त्या साठी अखंड पुरुषार्थ करणाराच आपले उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. काळ आणि परिस्थिती निरंतर बदलत असते त्यामुळे पुरुषार्थ हि निरंतर करावाच लागतो. लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता जो माणूस अखंड  पुरुषार्थ करत राहतो, तो आपल्या उद्दिष्टात निश्चित सफल होतो.  

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

Friday, December 25, 2015

सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस



कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे  भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता.  गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला  जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी  बहुत संवेदनशील और अच्छे  इन्सान है. रेल का सफर  करने वाले आम आदमी का ख्याल रखते हैं. फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत  असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या  समस्या ते चुटकीसरशी दूर करतात.

या आधी दिल्लीत मराठी नेत्यांची प्रशंसा मी क्वचितच ऐकली असेल. काही मुंबईकर नेत्यांमुळे, मराठी माणूस म्हणजे परप्रांतीय लोकांशी द्वेष करणारा, या ना त्या कारणाने सतत राडा करणारा. अशी मराठी माणसाची प्रतिमा. पण आज प्रभु साहेबांची प्रशंसा ऐकून माझी छाती चौडी झालीच.  एकमात्र खरे, त्यांच्या चांगल्या कार्यामुळे एका अनोळखी तरुणाने,  मला बसायला जागा दिली.  मी त्याच तरुणाचे  आभार मानले. पण मला यात काहीच आश्चर्य वाटले नाही. श्री सुरेश प्रभू  प्रधानमंत्री कार्यालयात इंडियन शेरपा म्हणून कार्यरत असताना, मी त्यांच्या अखत्यारीत  पीएस म्हणून जवळपास दीड एक महिना काम केले आहे. त्याच वेळी मला त्यांच्या मानवीय भावनेने परिपूर्ण अश्या संवेदनशील मनाचा अनुभव आला होता.

जुलै, 2014 महिन्यात माझी हृदयाची बाईपास सर्जरी झाली होती. तीन महिन्याची सख्तीची रजा मिळाली. बहुधा वीस-एक सप्टेंबरची तारीख असेल, ऑफिस मधून  एका  अधिकार्याचा फोन आला. प्रथम शिष्टाचार म्हणून त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. नंतर फोन करण्याचे खरे कारण- अर्थात पटाईतजी आप कब दफ्तर जॉईन कर रहे हो. मी उत्तर दिले,  तीन महिन्याची रजा आहे, पूर्ण होताच जॉईन करेल. थोडा जल्दी जॉईन कर सकते हो क्या? मी विचारले, का?  माननीय सुरेश प्रभुजी की  जी-२० के लिए इंडियन शेरपा के पद पर नियुक्ति हुई है. वह प्रधान मंत्री कार्यालय जॉईन कर रहें हैं. (श्री सुरेश प्रभूंची इंडियन शेरपा या पदावर नियुक्ति झाली आहे, ते शीघ्र कार्यालय ज्वाइन करणार आहेत).  अधिकारी पुढे म्हणाले, ते काही रोज कार्यालयात  येणार नाही, आले तरी जास्ती वेळ बसणार ही नाहीत.  फक्त जी-२०च्या संदर्भात काही मीटिंग्स, चर्चा, मुलाकाती वैगरेह होतील. तुम्हाला सहज जमेल. दोन एक  महीने तुमचे आरामात निघून जातील. (दिल्लीच्या सरकारी भाषेत याला चारा फेंकना, असे ही म्हणतात).  प्रधानमंत्री कार्यालयात २-३ महीने आरामात निघून जातील, हे काही थोड़े-थोडके नव्हे. मासा गळाला लागला. दुसर्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. फिटनेस सर्टिफिकेट घेतले आणि कार्यालयात रुजू झालो.

प्रधानमंत्री कार्यालयाचे नाव किती ही मोठे असले तरी इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे इथे हि जागेची समस्या आहेच. दुसर्या माल्यावर कॅन्टीन आणि किचन(स्वैपाकघर) आहे. किचनच्या उजव्या बाजूचा एक मोठा रूम श्री सुरेश प्रभु  साहेबांच्या बसण्यासाठी तैयार केला. शिवाजी महाराजांचे एक मोठे तैलचित्र हि त्यांच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लावण्यात आले. त्यांना केबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला असला तरी  स्टाफमध्ये पीएस म्हणून मी आणि एक सिपाही, असे आम्ही दोघेच होतो. एकट्यानेच सर्व काम करायचे होते. तरीही त्यांच्या सोबत काम करताना मला कधीच दडपण जाणविले नाही.  इतके सहज होते ते. 

एक दिवस दुपारी सव्वादोन वाजता श्री सुरेश प्रभु साहेब कार्यालयात आले. आल्यावर नेहमीप्रमाणे मी त्यांच्या कक्षात गेलो. ते म्हणाले मला भूक लागली आहे, काही  मिळेल का? मी म्हणलो  साहेब जेवणात काय मागवू. तैयार करायला जास्तीस्जास्त १०-१५ मिनिटे लागतील. साहेब म्हणाले, किचनमध्ये सध्या कुक आणि वेटर जेवतात आहेत, त्यांना त्रास देऊ नका. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच मागवा.  दुसर्या माल्यावर लिफ्टमधून बाहेर आल्यावर समोरच किचन दिसते.  रोज २ वाजता कॅन्टीन बंद होते. दोन ते अडीच या वेळात किचन आणि कॅन्टीनमध्ये काम करणारे कुक आणि वेटर इत्यादी जेवतात. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच बनविणारा कॅाउन्टर उघडा असतो. बहुधा  साहेबांनी त्यांना जेवताना बघितले असेल. आपण जर जेवणाचा ऑर्डर दिला तर तो पूर्ण करण्यासाठी त्यांना अर्धवट जेवण सोडून उठावे लागेल. साहेबांच्या संवेदनशील मनाला हे पटले नसेल. साहेबांनी केवळ ब्रेड सेंडविचवर आपली भूक भागवली.   मला नाही वाटत या आधी वेटर- कुक सारख्या लहान लोकांचा विचार कुणी मंत्री- अधिकारी यांनी केला असेल.  त्याच दिवशी त्यांच्या संवेदनशील मनाचा ओलावा मला हि जाणविला.

Sunday, December 20, 2015

मटार -कांदे परांठा



हिवाळा सुरु झाला कि मटारच (वाटाणे)ची भाजी मोठ्याप्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते.  गेल्या रविवारी भाजी  स्वस्त: मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे  निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला.   मटारच्या वरील   सर्व  भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली.  साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला.  त्याचीच कृती खाली देत आहे. 

साहित्य : निवडलेले मटार २ वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी,  बारीक चिरलेली कोथिंबीर -अर्धा वाटी, हिरवी मिरची -२-४ (इच्छेनुसार),   तिखट २-३ छोटे चमचे, जिरेपूड १ छोटा चमचा,, मिरे पूड १ छोटा चमचा, हळद १ छोटा चमचा  आणि  चाट मसाला (१ मोठा चमचा ) [चाट मसाला टाकला कि इतर मसाले टाकायची आवश्यकता नसते आणिक स्वाद हि मस्त येतो], मीठ स्वादानुसार [ चाट मसाल्यात हि मीठ असते, हे लक्षात ठेवावे].  तेल २ चमचे. 

कणिक चार वाटी  परांठ्यांसाठी आणि देसी तूप किंवा तेल परांठ्यांना लावण्यासाठी.

कृती: गॅसवर कढई ठेऊन २ चमचे तेल घालून, त्यात  मटार आणि हिरवी मिरची परतून, २ मिनिटासाठी झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्यावी.  नंतर थंड झाल्यावर मटार मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.   बारीक वाटलेल्या मटार मध्ये तिखट, जिरे, मिरे पूड, हळद  , चाट मसाला, मीठ,  बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून  परांठ्यांत भरण्यासाठी गोळे मळून घ्यावे. 

आता मळलेल्या कणकीची पारी बनवून त्यात  त्यात वरील मिश्रणाचे गोळे भरून परांठा लाटून, तव्यावर चारीबाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्यावे.

ज्याना तूप कमी खायचे असेल त्यांच्या साठी - तव्यावर पोळीसारखा परांठा भाजून नंतर गर्मागरम परांठ्यावर थोडे तूप लाऊन  गर्मागरम परांठा  वाढवा. 

टीप:तुपा एवजी तेल हि वापरू शकतात.

हा परांठा दही आणि हिरव्या चटणी सोबत मस्त लागतो.  सौ. ने दही आणि आवळ्याच्या हिरव्या चटणी सोबत परांठा वाढला. 






Thursday, December 17, 2015

व्यथा एका कठपुतळी राजाची



कठपुतळीचा खेळ सर्वांनाच आवडतो. मलाहि आवडतो. विशेषकरून राक्षसाच्या तावडीतून सुंदर राजकुमारीची सुटका करणारा राजकुमार.  हा खेळ बघताना सर्व खरेच वाटायचे. स्वप्नात हरवून जायचो. असे वाटायचे, राजकुमारीची सुटका करण्यासाठी मीच त्या राक्षसाची युद्ध करतो आहे. पण कधी-कधी जोरात वारा आला कि परदा हवेत उडायचा आणि कठपुतली नाचविणार्याचे हात दिसायचे.  क्षणात स्वप्न भंग व्हायचे, हे काही खर नाही, याची जाणीव व्हायची. 


एकदा भरपूर जनता जमली कि कठपुतलीचा खेळ दाखविणारे सरकारी धोरणाचा हि प्रचार करायचे. कथा नेहमीचीच, राजा आपल्या प्रधानाच्या सोबत जनतेचे कष्ट दूर करण्यासाठी घोड्यावरून राज्याचा दौरा करायला निघतो. प्रजेला कष्ट देणार्यांना चोर, डाकू, तस्कर, काळाबाजार करणार्यांना धडा शिकवितो. सर्वत्र आनंदी आनंद. लोक हि टाळ्यावाजवून राजाची प्रशंसा करतात.  खेळ संपतो.


एकदा असाच खेळ सुरु होता. पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र धारण करून, पांढर्या शुभ्र घोड्यावर स्वार इमानी राजा मंचावर अवतारला.  येताच त्याने आरोळी ठोकली, प्रधानजी कुठे आहात. अचानक, काळ्या घोड्यावर स्वार एक काळाकुट्ट माणूस मंचावर प्रगटला. राजाने विचारले, कोण रे तू, आणि एवढा काळा का.? लोक तुला पाहून घाबरतील. त्याने राजाला मुजरा करीत म्हंटले, महाराज, मी तुमचा प्रधान. पूर्वी मी असा काळा नव्हतो. काळ्याकुट्ट अमावस्याच्या रात्रीत मी काळ्या लक्ष्मीची कठोर अघोरी उपासना केली. काळ्यालक्ष्मीची कृपा मजवर झाली. त्यामुळे मी असा काळा आहे. मला आपल्यासोबत राज्याच्या दौऱ्यावर घेऊन चला, काळ्या लक्ष्मीची कृपा तुमच्यावर हि होईल. त्याचे बोलणे ऐकून, राजाची तळपायाची आग मस्तकात गेली. या दुष्ट माणसाला मंचावरून खाली फेकून द्यावे, पाहिजे, असे राजाला वाटले. पण राजाने असे काहीही केले नाही. माणसाच्या हातांच्या तालावर नाचणे, हेच त्याच्या नशीबात होते. तेवढ्यात संगीत सुरु झाले, घोड्यांच्या टापा आणि माणसाचा आवाज गुंजला, आधीच उशीर झाला आहे, चला प्रधानजी निघू या, टप टप, दुड दुड करत राजा काळ्याकुट्ट प्रधानासोबत दौर्यावर निघाला, प्रजेच्या कल्याणासाठी ????


Wednesday, November 25, 2015

सकाळचा नाश्ता : अरबी(अळू) परांठा, स्पेशल रेड सूप आणि आंवळा चटणी




काल संध्याकाळी लेक माहेरी आली.   तिचे सासरे नुकतेच हिमाचलच्या आपल्या गावातून दिल्लीला परतले होते. लेकी सोबत एक पिशवीभर अरबी आणि आले (त्यांच्या सीढ़ीदार शेतातले– शुद्ध नेसर्गिक) पाठविले होते. आज सकाळी उठल्यावर ती म्हणाली आज सकाळचा नाश्ता मी बनविणार. (लेकी माहेरी आराम करायला येतात, पण माहेरी आल्यावर काम करायचा उत्साह का संचारतो, कधीच कळत नाही) असो. पराठा, सूप आणि चटणी असे करायचे ठरले.




घरात दुधी होती, टमाटर महाग असल्यामुळे १/२ किलोच आणले होते. पण लाल सुर्ख लौह तत्वाने भरपूर बिट्स हि घरात होते. सूप म्हंटले कि लाल रंग हा पाहिजेच.  तिने सर्व वस्तू एकदम बनवायला सुरुवात केली (कसे जमते तिला, मला कधीच कळले नाही) .


आंवळा चटणी (साहित्य): साहित्य  आंवळे ५-६, कोथिंबीर, हिरवी मिरची २, आले  १/ इंच, लसूण ५-६ पाकळ्या, जिरे १/२ मोठा चमचा, १/२ काळीमिरी पूड, हिंग १/२ लहान चमचे, गुळ एक लहान तुकडा, ओले खोबरं २ चमचे आणि मीठ स्वादानुसार.


प्रथम आवळ्यांच्या बिया काढून चिरून घेतले. नंतर  खोबर, कोथिंबीर, आले, लसून, चिरे, हिंग, गुळ आणि मीठ इत्यादी सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घेतले.  आवळ्याची चटणी तैयार झाली.



स्पेशल रेड सूप (साहित्य): अर्धा किलो दुधी भोपळा, १/२ बिट्स (चुकुंदर), २ टोमाटो, २ आवळे, गाजर २ लहान. या शिवाय  आले १/२ इंच, (१/२ चमचे जिरेपूड, १/२ चमचा काळी मिरी पूड, हिंग १/२ छोटा चमचा, मीठ स्वादानुसार.


कृती: दुधी भोपळा, गाजर, बिट्स, आवळा, टमाटरचे तुकडे करून १ गिलास पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घेतले. कुकरचे झाकण उघडून त्यात १ गिलास थंड पाणी टाकले. घरी हाताचे मिक्सर असल्यामुळे कुकरमध्येच फिरवून घेतले.  सूप जास्त पातळ करायची गरज नाही किंवा गाळून घेण्याची हि नाही. नंतर त्यात आले किसून जिरे, काळी मिरी आणि हिंगाची पूड हि टाकून कुकर गॅस वर ठेऊन एक उकळी काढून घेतली.   

अरबी परांठा (साहित्य): अर्धा किलो अरबी, १/२ बिट्स (चुकुंदर),२ कांदे, ५-६ लसणाच्या पाकळ्या, ३-४ हिरव्या  लसणाच्या दांड्या, कोथिंबीर  १/२ जुडी, ३-४ हिरव्या मिरच्या  (मोठा चमचा: १/२ चमचे जिरे, १ ओवा, १०-१५ काळीमिरी दाणे यांची पूड करून घेतली), १ चमचा धने पूड, १ चमचा अमचूर, २ चमचे चाट मसाला, १/२ चमचे हळद, १/२ चमचे तिखट  आणि मीठ स्वादानुसार.

शिवाय तीन वाटी कणिक. पराठ्यांसाठी.          

कृती: (पराठ्याचे सारण): प्रथम गॅस वर अरबी उकळून घेतली. थंड झाल्यावर अरबीचे साल काढून, अरबी किसून घेतली. बिट्स हि किसून घेतले. कांदा, कोथिंबीर, हिरवे लसूण, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. सर्व मिश्रण एकत्र करून त्यात धने, अमचूर, चाट मसाला, जिरे-ओवा-काळीमिरीची पूड आणि  हळद टाकून मिश्रण एकजीव केले.  (तिखट खाणारे  जास्त तिखट हि टाकू शकतात).  हे झाले पराठ्याचे सारण.



आता जसे बटाट्याचे पराठे करतो त्याच प्रमाणे कणकीच्या गोळ्यात भरपूर सारण भरून, पोळी लाटून तव्यावर तेल/ तूप सोडून खरपूस परांठे भाजून घ्या. 



Saturday, November 21, 2015

वंदन भक्ती आणि पुणेरी षड्यंत्र

समर्थ रामदास म्हणतात 

करावें देवासी नमन I  संत साधू आणि सज्जन I नमस्कारीत जावे I
नमस्कारें सख्य घडे I नमस्कारें मोडली जडती I समाधानें I

समर्थ म्हणतात वंदन भक्ती सर्वात सौपी आणि सरळ आहे. वंदन करण्यासाठी  एक दमडी सुधा  लागत नाही.   काही साधन सामग्री ही लागत नाही.  कुणालाहि हात  जोडून आदराने नमस्कार केल्याने  आपण त्याला प्रिय होतो. बिघडलेले कार्यहि मार्गी लागते. 

आपण रोज पाहतोच, आपण जेंव्हा कुणाला नमस्कार करतो, त्याचा चेहरा आनंदाने उजळतो. प्रतिउत्तर म्हणून तोहि आपल्याला नमस्कार करतो. दोघेही प्रसन्न होतात.   आपण कुणाला नमस्कार केला आणि त्याने प्रतिउत्तर दिले नाही  तर  पुढच्या वेळी आपण त्याला नमस्कार करणार नाही. किंबहुना तो व्यक्ती जर समोरून येत असेल तर आपण त्याची नजर चुकवून पुढे निघून जाऊ. सरकारी कार्यालयात असे दृश्य नेहमीच दिसते. कर्मचार्यांच्या नमस्काराला उत्तर न देणाऱ्या अधिकार्याला  समोरून येताना पाहून कर्मचारी मार्ग बदलतात किंवा त्याची नजर चुकविण्याचा प्रयत्न करतात.   कर्मचार्यांचे सख्य किंवा निष्ठा या अधिकारीला प्राप्त होत नाही. तसेंच जो कर्मचारी कुणालाहि नमस्कार करीत नाही किंवा नमस्काराला प्रतिउत्तर देत नाही, त्याच्या बरोबर अन्य कर्मचारी बोलणे सोडून देतात. काही काळाने अशी परिस्थिती येते कि हा कर्मचारी आपल्या विभागात कार्यरत आहे, अधिकांश सहकर्मीनां माहितच नसते. 

एक प्रश्न आपल्या डोक्यात आला असेलच, वंदन भक्तीचा पुणेरी षड्यंत्रशी काय संबंध? 

 माझा एक पुणेरी मित्र दिल्लीत काही कामासाठी आला होता, हक्काने घरी उतरलादिनांक  १.११.२०१५ वेळ संध्याकाळची, सात वाजून काही मिनिटे. संध्याकाळी चहा पिता- पिता  घरगुती  गप्पा गोष्टी सुरु झाल्या.  काळ, वेळ न बघता, मला काय वाटेल याचा विचार न करता,  माझ्या मराठीतील चुका दाखविण्याचे कार्य माझा हा मित्र नेहमीच  न चुकता करतो.  पण त्या दिवशी सहज बोलता-बोलता म्हणाला विवेक तुझ्या मराठीत बरीच सुधारणा झाली आहे.   कुणी आपली प्रशंसा केली तर आपण प्रसन्न होतोच आणि त्यातूनहि कुणी पुणेकराने प्रशंसा केली तर काय म्हणावे, हवेवर तरंगूच लागलो. नसलेली  छाती ५६ इंच फुलवत तरichआजकाल आमी नुसतेच बोलत नाहीत, मराठीत लिवू बी लागलो आहे. तो लगेच सावध झाला आणि म्हणाला लिहिणे वाचणे हे रिकामटेकडे लोकांचे काम, आमच्या सारख्यांजवळ टाईम कुठे, मराठी लिहिण्या वाचण्यासाठी.  मी लगेच उतरलो, अब नमक खा ही रहे हो, तो अपुन का ब्लॉग भी देखना पड़ेगा.  कम्प्युटर उघडून आपला ब्लॉग आणि मिसळपाव दाखविले. सहज  त्याचे लक्ष्य 'तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?' या लेखावर गेले.  च्यायला अंतर्जालावर लोक डुप्लिकेट नावांनी लिहितात, प्रतिसाद हि  डुप्लिकेट नावांनी देतात. मी म्हणालो असे नव्हे, लोक खर्या नावांनी हि लिहितात.  काही लोक खर्या आणि डुप्लिकेट दोन्ही आयडीने लिहितात. शिवाय आपले विचार निर्भिकपणे मांडण्यासाठी हि काही लोक डुआयडी घेतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो विचित्र हसत म्हणाला 'तुझ्याहि दोन-चार डुआयडी असतीलच'.  त्यांच्या वापर कर.  तुला आवडणाऱ्या  १५-२० आयडी टंकून टाक, त्यात तुझे नाव पण टाक. कुणी न कुणी परतफेड  म्हणून  तुझे नाव हि त्याच्या आवडत्या आयडीत टंकेल. मी शांतपणे म्हणालो, मला दुहरेपणाने जगता येते नाही. माझी कुठलीही डुआयडी नाही. मग  ३०-४० आयडी आवडल्या म्हणून टंकून टाक, दोन-चार लोक तरी तुला लाईक करतील', नाहीतर  तुझ्या सारख्या बकवास लेखकाला कोण लाईक करेल.  मी रागानेच म्हणालो तू कधी माझा कुठला लेख किंवा गोष्ट वाचली आहे का? 'नाही  म्हणूनच तर म्हणतो, कशाला नाराज होतो, साधा व्यवहार आहे, अहो रूपं अहो गान गाढवाने केली कावळ्याची प्रशंसा. कशी वाटली तुकबंदी. 'अंतर्जालावर तुम्ही एका दुसर्याची पाठ थोबडून घेणार'.  (सौ. नेहमीच म्हणते, तुझे  सगळे मित्र एकापेक्षा एक दिव्य आत्मा आहेत, कुठे भेटतात तुला असली भुते, काय म्हणणार, एकेकाचे नशीब).   त्याला अक्षरश: हात जोडत म्हणालो, बाबारे मी कुठल्याहि आयडीला लाईक करणार नाही. तो म्हणाला, मग तुला हि कुणी लाईक करणार नाही. हा मानवीय स्वभाव आहे.   या वर हि कुणी तुला लाईक केले तर म्हणता येईल. तुझ्या लेखनात काही दम आहे. हं! आणखीन एक,  पुढच्या १०-१२ दिवस मिसळपाववर फिरकू पण नको.  नाही तर दोन-चार न कळणाऱ्या कविता टंकशील, वाचून कुणीतरी तुला लाईक करेल.   मी उतरलो, उद्या पासून घरात डागडुजी, रंग-रोगन, सफेदीचे काम सुरु करणार आहे. नंतर दिवाळी. मिसळपाव तर सोडा, पुढे १०-१५ दिवस अंतर्जालावर हि फिरकायला वेळ मिळणार नाही. नरक चतुर्थी पर्यंत घरात काम सुरु होते.  तरीही मित्राला दिलेला शब्द पाळला अंतर्जालावर फिरकलो हि नाही.   दिवाळी नंतर  हळूच मिपावर डोकावून आयडीवाला लेख बघितला.मित्राचे म्हणणे खरेच होते. 

आज दिनांक २१.११.२०१५,  त्याचा फोन आला, विवेक हा! हा! हा! हा!  गाढवा सारखा  'हसतोस कशाला'. अरे आज मिसळपाव उघडून आयडी वाला लेख वाचला, हा!हा! हा!  कुणाला हि तुझी आयडी आवडलेली नाही. मूर्ख लेकाचा, स्वत:चे नाक कापून घेतले. हा! हा! हा! अरे आम्ही पुणेकर म्हणजे काय चीज आहे, माहित नाही का तुला? एक नंबरी चिक्कू, कुणी दहा वेळा आमची प्रशंसा केली तर आम्ही एकदा करू. उगाच माझे ऐकले. वाईट वाटते रे, तुझ्या सारख्या महान, विद्वाआआन, लेखकूला कुणीच ओळखत नाही रे.  मरगळलेल्या आवाजात त्याला म्हणालो,   मीहि कुणाला लाईक केले नाही म्हणून दुसर्यांनी हि माझे नाव घेतले नाही. त्यात एवढे वाईट वाटण्यासारखे काय. 'कुठेतरी जळण्याचा वास येतो आहे', म्हणत त्याने फोन ठेवला. मनातल्या मनात त्याला शिव्या देत कम्प्युटर उघडला. मिपावर आयडीवाला लेख वाचला, पण कुणीही चुकून सुद्धा आपले नाव घेतलेले नाही, हे लक्ष्यात आले. रेकवर ठेवलेल्या दासबोधाच्या पुस्तकाकडे लक्ष गेले. माझ्या प्रिय (?) मित्राने मला हातोहात बनविले होते. आता तिखट मीठ लाऊन हि कथा आणखीन दहा मित्रांना सांगणार. माझा सनकी स्वभाव मला भोवला आणि त्याच्या जाळ्यात सहज अडकलो. पण 'अब पछताए हॉट क्या जब चिड़िया चुग गई खेत'.
   
समर्थ म्हणतात नमस्कारें सख्य घडे I नमस्कारें मोडली जडती I समाधानें I  जो नमस्कार करणार नाही त्याला कुणी विचारणार नाही.   हेच खरे.