Tuesday, June 5, 2018

उन्हाळा-रस्त्याच्या बाजूला ठेवलेले पाण्याचे माठ व चिवताई


तीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट. दुपारची वेळ होती, एका मित्रासोबत दक्षिण दिल्लीच्या एका वसाहत नसलेल्या सुनसान रस्त्यावर स्कूटरवर बसून जात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे होती. ऐन उन्हाळ्यात हि दुरून येणारा कोकिळेचा मंजुळ आवाज व चिमण्यांची चिवचिव सूर्याचे ताप सहन करण्यास मदत करीत होती. अचानक स्कूटर घरघर करत थांबली.  ठीक करायला पंधरा एक मिनिटे लागली असतील. घामाने शरीर चिंब झाले होते आणि तहान हि लागली होती. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला  एका जागी रेतीत गाडून ठेवलेले ५-६ पाण्याचे माठ दिसले. दिल्लीत त्याकाळी सुनसान रस्त्यांवरहि कोस-दोन कोस अंतरावर  परोपकारी लोक  पाण्याने भरलेले माठ रेतीत गाडून ठेवायचे. एक तर त्यामुळे माठातले पाणी थंड राहायचे, माठ तुटण्याची भीती नाही आणि चोराला हि सहजपणे माठ चोरणे शक्य नव्हते. एक अलुमिनियमचा जग हि ठेवलेला होता. स्कूटर थांबवून अलुमिनियमच्या जगाने एका माठातले पाणी काढले आणि थोडे दूर उभे राहून ओंजळीने पाणी पिऊन तहान भागवली. थोडे पाण्याचे शिंतोडे तोंडावर हि मारले. ओंजळीने पाणी पिताना काही पाणी जमिनीवर सांडलेच. येणाऱ्या-जाणार्यांच्या पाणी पिण्याने त्या ठिकाणी एक छोटासा गड्डा झालेला होता. आम्ही तिथून थोडे दूर होताच. दहा-बारा चिवताई, काही साळुंक्या आणि एक खारूताई आपल्या पिल्ला सोबत तिथे पोहचली. स्कूटर जवळ उभा राहून मी हे दृश्य पाहत होतो. एक तर इवलासा गड्डा व थोडेसे  पाणी. त्या पाण्याने खरोखरच त्यांनीच तहान भागली का? हा प्रश्न मनात आला. मित्राने स्कूटर स्टार्ट केली. मी त्याला म्हंटले, दोन मिनिटे थांबतो का? मी त्या गड्ड्या जवळ गेलो. आपल्या हाताने तो थोडा मोठा केला.  माठातले एक जग पाणी त्या गड्ड्यात टाकले. पुन्हा स्कूटर जवळ पोहचलो. या वेळी खारूताई पुन्हा आपल्या पिल्लासोबत तिथे आली आणि पाणी पिऊ लागली. काही चिमण्याही तिथे पोहचल्या. स्कूटर स्टार्ट करत मित्र म्हणाला, विवेक इथे दर काही मिनिटांनी कुणी न कुणी पाणी पिणारच. पक्ष्यांनाही पाणी मिळेल. उगाच हात खराब केले. मी फक्त हसलो.  

गेल्या रविवारी पुन्हा त्याच रस्त्यावरून पुन्हा जाण्याचा योग आला. रस्त्यावर भरपूर गाड्या धावत होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तशीच पूर्वी सारखी झाडे होती. कारच्या खिडकीतून बाहेर बघत होतो. कित्येक कोस  निघून गेले, पण या वेळी रस्त्याच्या काठावर  कुठेच पिण्याच्या पाण्याचे माठ भरून ठेवलेले दिसले नाही. 

माणसाने उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी बोतलबंद पाण्याची सोय केली आहे. पायी चालणारा हि पाणी सोबत घेऊन घरून निघतो. आता कुणीही  स्कूटर व कार थांबवून माठातले पाणी पिणार नाही. माणसाला आता माठांची गरज नाही म्हणून माठ ठेवणे हि बंद झाले. माणसांची सोय झाली. पण चिवताई, खारूताईचे काय होणार. न जाणे काय वाटले, ड्राईवरला गाडी थांबविण्याचा इशारा केला. गाडीतून बाहेर आलो. कोकिळेचा मंजूळ आवाज आणि चिमण्याची चिव-चिव ऐकण्यासाठी कान टवकारले. पण ऐकू येत होता फक्त  रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांचा आवाज.....

1 comment:

  1. खरंच माणूस स्वत:ची सोय करतो पण त्या निष्पाप पशू पक्ष्यांना विसरून जातो..

    ReplyDelete