Wednesday, August 17, 2016

सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी


(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. )


संत कबीर दास यांनी म्हंटले आहे 'माया महा ठगनी हम जानी'. माया निरनिराळे मोहंक रूप घेऊन लोकांना ठगत राहते.  सुवर्ण तर मायाचे सर्वात मोहक आणि भयंकर रूप.  आपली सीता मैया बेचारी सुवर्ण मृगाच्या मोहात अटकली. बेचार्या रामाने कितीही समजावले तरी तिने ऐकले नाही (बायका कधी नवर्याचे ऐकतात का?).  लंकेचा राजा रावण हि सोन्यासारखी सुंदर स्त्री अर्थात सीता मैयाला पाहून मोहित झाला. परिणाम सुवर्ण लंका जाळून खाक झाली. हजारोंच्या संख्येत राक्षस, वानर मारल्या गेले. रामाने हि राक्षसांच्या संहार करून परत मिळविलेल्या सीतेला वनात सोडून दिले. कुणाच्याच हाती काही लागले नाही.  झाला फक्त विनाश. 

अर्जुन रथारूढ होईन कुरुक्षेत्रच्या मैदानात उतरला. दूरवर पसरलेले शत्रू सैन्य दिसत होते. या सैन्याचा संहार करून अर्जुनाला सुवर्णजडित सिंहासनावर बसायला मिळणार होते. अर्जुनाने बाण धनुष्यावर चढविला, अचानक त्याच्या मनात विचार आला, खरंच सुवर्ण सिंहासन एवढे महत्वपूर्ण आहे कि ज्यासाठी आपल्याला बंधू-बांधव सहित अक्षोहणी सैन्याचा संहार केला पाहिजे.  अर्जुनाची सद्विवेक बुद्धी जागृत झाली, तो मोहापासून दूर झाला. त्याने धनुष्य जमिनीवर ठेवले.  द्वारकेचा राजा कपटी कृष्ण हा अर्जुनाचा सल्लागार होता. त्याने अर्जुनाला म्हंटले, राज्य मिळाले तर शरीरावर सुवर्ण हि धारण करायला मिळेल. सुवर्णासाठी आप्त असो वा बंधू त्यांना मारण्यात काहीच गैर नाही.  भौतिक जगात सुवर्णच हे सत्य आहे.  तू याच  सुवर्ण धर्माचे पालन कर आणि पृथ्वीवर राजसी सुख भोग. अर्जुन पुन्हा सुवर्णाच्या मोहात अटकला. आपल्या तीक्ष्ण बाणांनी लक्षावधी शत्रू सैन्याला यमसदनी पाठविले.  म्हणतात १८ अक्षोहिणी सैन्य युद्धात मारल्या गेल. शेवटी पांडव सुवर्ण परिधान धारण करून सुवर्णजडित सिंहासनावर आरूढ झाले. सुवर्णाच्या मोहापायी १८ अक्षोहिणी सैन्याचे रक्त पृथ्वीवर सांडले. लाखों स्त्रिया विधवा झाला. एका संपूर्ण पिढीचा विनाश झाला. भारतातील इतिहासातला महाभयंकर विनाश. 

रामायण आणि महाभारत काळापासून हजारों वर्ष लोटली, तरीही आपण भारतीय अजूनही सुवर्णाच्या मोहातच अटकलेले आहोत. जगातील सर्वात जास्त सुवर्ण भारतातच आहे. या साचलेल्या सुवर्णापायीच विदेशी लुटेरे भारतात आले. अमानुष अत्याचार येथील जनतेवर केला. जर सुवर्ण नसते, तर लुटेरे इथे कशाला आले असते. एवढे असूनही आपला सुवर्ण मोह काही कमी होत नाही. प्रधान मंत्री म्हणतात, सुवर्ण बँकेत ठेवा, बँक व्याज हि देईल. तरी हि कुणी सुवर्ण बँकेत ठेवायला तैयार नाही. प्रत्येकांनी सुवर्ण आपल्या छातीशी कवटाळून धरले आहे. घरात चिल्ला-पिल्ल्याना प्यायला दूध नसेल, पण शरीरावर सुवर्ण पाहिजे.   

रियो ऑलम्पिक मध्ये आपली नेमबाज कुमारी धनुष्यावर बाण चढवून सज्ज होती. नेम भेदला कि सुवर्ण मिळणार. अचानक अर्जुनाप्रमाणे तिची सद्विवेक बुद्धी जागृत झाली. तिच्या मनात प्रश्न आला, खरंच सुवर्ण जिंकणे महत्वपूर्ण आहे का? काय मिळणार हे सुवर्ण पदक जिंकून. आधीच भारतभूमीवर भरपूर सुवर्ण आहे. आणखीन जिंकून काय करायचे. सुवर्णापायीच युद्ध होतात. विनाश होतो. सुवर्ण पदकाच्या मोहात पडले नाही पाहिजे. या कलयुगात तिला पुन्हा सुवर्णाच्या मोहात पाडू शकेल, असा गीतोपदेश देणारा कृष्ण हि  नव्हता. सामाजिक न्यायावर विश्वास करणाऱ्या भरतखंडात तिचे लालन पालन झाले होते. तिने विचार केला, या छोट्याश्या सुवर्ण पदकाची आपल्यापेक्षा इतर देशांना जास्त गरज  आहे. तिने सुवर्णाचा मोह टाळला. एका स्थितिप्रज्ञ प्रमाणे जय-पराजया पासून ती विरक्त झाली. लोक म्हणतात तिचा नेम चुकला, तिला सुवर्ण पदक मिळाले नाही. तरीही आपली नेमबाज आनंदी होती. अर्जुनाप्रमाणे ती मोहात अटकली नाही. तिचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन, आपल्या स्थितिप्रज्ञ खेळाडूंनी सुवर्ण पदकांचा मोह टाळला. मोह आणि प्रसिद्धीच्या मायावी जाळ्यात ते अटकले नाही. असो. 


माया महा ठगनी हम जानी
तिरगुन फांस लिए कर डोले 
बोले मधुर बानी.

2 comments:

  1. फारच सुंदर लहिले आहे , तुम्हाला येत्या दिवाळी अंकासाठी लेख पाठविण्याचे आमंत्रण !
    मला ह्या इमेल वर उत्तर लिहा मग सविस्तार माहिती पाठविते .
    kokatayash@gmail.com

    Aishwarya kokatay

    ReplyDelete
  2. फारच सुंदर लहिले आहे , तुम्हाला येत्या दिवाळी अंकासाठी लेख पाठविण्याचे आमंत्रण !
    मला ह्या इमेल वर उत्तर लिहा मग सविस्तार माहिती पाठविते .
    kokatayash@gmail.com

    Aishwarya kokatay

    ReplyDelete