Saturday, July 20, 2013

कविता, मीटर आणि मी


माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला, आजकाल आमी बी कविता करू लागलोआहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर? असे म्हणत ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ या धर्तीवर’ तो कवितेची चोपडी चाळू लागला. मी ही कान टवकारून, त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानी तो उद्गारला, लेका, कविता छान आहे, आवडल्या (?), पण एक ही कविता मीटरमध्ये नाही, आणि खरंच सांगतो, बिना मीटरच्या कवितेची मार्केट वेल्यू नसते, कवीला प्रतिष्ठा ही मिळत नाही आणि मोबदला ही, असे म्हणत एखाद्या खलनायका प्रमाणे माझ्या कडे पाहत, तो खदा-खदा हसू लागला. त्या वेळी त्याचा चेहरा, मला चक्क ब्रूटस सारखा वाटला, ‘ब्रुटस तुम भी’ एवढेच म्हणायचं काय ते राहिलं. पण एक खरं त्याचा घाव जिव्हारी लागला. त्या दिवसापासून एक ही कविता सुचली नाही.

कवितेच मीटर म्हणजे काय, हा एकच प्रश्न सतत डोक्यात घोळू लागला. आज सकाळी विजेचे बिल आले. आजकाल विजेचे बिल पाहून हादरा हा बसतोच. किती ही कमी वीज वापरली तरी बिल दीड-दोन हजारापेक्षा कमी येत नाही. विजेचे निजीकरण झाल्याचा परिणाम. कंपनीने जुने मीटर बदलले, नवीन डिजीटल मीटर आले, ते वेगाने पळतात. ऊर्जा मंत्रालयात काम करणाऱ्या एक सहकर्मिला, या बाबतीत विचारणा केली होती. तो म्हणाला, मीटरच्या अचूकते बाबत काही प्रतिशत (+, -) ची सूट निजी कंपन्यांना मिळाली आहे, त्याचा गैरफायदा या कंपन्या घेतात. सर्वच मीटर (+) असतात. निष्कर्ष- मीटर आहे म्हणून आपण विजेचे बिल देतो, ‘मीटर वेगाने पळतात, आणि आपल्याला वीजेसाठी जास्त पैसा मोजावा लागतो’. दिल्लीत आटो, पूर्वी कधीच मीटरने पळत नसे, आजकाल मीटरने जायला तैयार राहतात. कारण नवीन मीटर आटोपेक्षा ही जास्तवेगाने पळतात. गेल्या रविवारी कुठे बाहेर जायचे होते, गल्लीत एक आटो उभा होता, आटोवाल्याला विचारले, तो म्हणाला साहब मीटर खराब है, मीटर ठीक होने तक सवारी नाही बिठा सकता, मी- बिना मीटर के चल. तो- ‘बिना मीटर के में मुफ्त में भी किसी को नही ले जा सकता, चलान कट जायेगा’. माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली, प्रकाश पडला, एक - बिना मीटर आटो ही रस्त्यावर धावू शकत नाही, दोन- ‘मीटर असेल तरच मोबदला मिळतो’.

त्याच संध्याकाळी, एका कवी/ गीतकारची मुलाखत दूरदर्शन वर पहिली. तो म्हणत होता, त्याला संगीतकाराच्या चालीवर गाणे लिहिणे जास्त सौपे वाटते, कविता पटकन मीटरमध्ये बसविता येते. कविता आधी लिहिली असेल तर चालीनुसार मीटरमध्ये बसविणे कठीण जाते. हा त्याचा अनुभव. मीटर मध्ये बसणाऱ्या कविता लिहिणाऱ्या गीतकाराला नक्कीच भरपूर मोबदला मिळत असेल. खरंच जिथे मीटर तिथे मोबदला/ पैसा. मग विजेचे मीटर असो, आटोचे असो किंवा कवितेचे.

डोक्यात गोंधळ माजला, अनेक प्रश्न उभे राहिले, विवेक पटाईत तुम्ही मीटर मध्ये कविता लिहू शकतात का? हृदयातून उत्तर आले - शक्यच  नाही. बिना मीटरच्या कवितेला बाजारात किंमत नाही, मग तुम्हाला आयुष्यात कधी प्रतिष्ठा आणि नाव मिळेल का? प्रतिष्ठा व नाव नसलेल्यांना कविसंमेलनात कुणी बोलवतो का? कुणी कविता छापतो का? माझ्या एका दिल्लीकर कवी मित्राने स्वत:च्या खर्चाने नागपूर हून आपले दोन-तीन कविता संग्रह प्रकाशित केले आहे (५००च्या आवृतीचे, १५ ते वीस हजार खर्च येतो असे तो म्हणाला होता). पुस्तके किती विकल्या गेली त्यास माहीत नाही. कारण रॉयल्टी त्याला कधीच मिळाली नाही.

आपण काय विचार करतो आहे, या विचाराने मला माझेच हसू आले. तुलसीदासाला कुठल्या ही राजाच्या दरबारी ‘राजकवीचे’ पद सहज मिळाले असते. पण तुलसीदासाने काशीच्या घाटावर, स्वांत सुखाय ‘रामचरितमानस रचले’ होते, कुठल्या ही मोबदल्याचा विचार न करता. त्या वेळी आत्मशून्य झालेल्या लोकांना राक्षसी शक्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणे हाच रामचरितमानस रचण्याचा त्यांचा कदाचित उद्देश्य असेल. शेवटी स्वत:लाच म्हणालो, विवेक पटाईत, आजचे प्रश्न कवितेच्या माध्यमातून उभे करू थोडे ही यश मिळाले, तर काही मिळविण्याचे समाधान नक्कीच मिळेल. मग कविता मीटर मध्ये असो किंवा नसो.

Sunday, June 30, 2013

वृक्षांचे देवत्व


मुले ब्रह्मा त्वचा विष्णू शाखायाम तु शंकर:
पत्रे-पत्रे तु देवानाम् वृक्ष राज नमोस्तुते.

वृक्षांच्या मुळांमध्ये साक्षात ब्रह्मदेव निवास करतात. वृक्षांची त्वचेत भगवान विष्णु, फांद्यांमध्ये भगवान शंकर निवास करतात. पाना-पानात देवतांचा निवास असणार्‍या वृक्षराजाला मी नमस्कार करतो.

वृक्षांच्या विना मानव जातीच्या अस्तित्वाची कल्पना ही अशक्य आहे, आपल्या प्राचीन ऋषींना हे माहीत होते. वृक्ष पर्यावरणला शुद्ध करतात, घर आणि यज्ञा साठी लाकूड प्रदान करतात, क्षुधा शांत करतात आणि रोगांपासून आपल्याला मुक्त करतात (अशी आख्यायिका आहे - आयुष्यभर अध्ययन करून ही ‘चरकला’ एक ही वनस्पती किंवा वृक्ष सापडला नाही की ज्यात औषधीय गुण नाहीत).

पुराणात वृक्षांचे महत्व सांगताना महर्षि व्यास म्हणतात जो मनुष्य पिंपळ,
चिंचेचे, वट आणि कडू लिंबाचे एक-एक झाड, बिल्व आणि आवळ्याचे तीन-तीन आणि आंब्याचे पाच झाडे लावेल तो कधीही नरकात जाणार नाही. गीतेत ही भगवंताने ‘अश्वत्थ सर्व वृक्षाणाम’ वृक्षांमध्ये मी अश्वत्थ (पिंपळ) हा वृक्ष आहे असे म्हटले आहे. वृक्षांची महिमा सांगताना ऋषि म्हणतात एक वृक्ष दहा पुत्रांच्या बरोबर आहे. [(विष्णु धर्मसूत्र (१९/४)].

वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर यांचे निवास तुळशी वर लक्ष्मी आणि विष्णु, सोमलता-चंद्रमा, बिल्व –शंकर, अशोक-इंद्र, आंबा –लक्ष्मी , कदंब- कृष्ण, पलाश-ब्रह्मा आणि गंधर्व, पिंपळ – विष्णु, औदुंबर – रुद्र आणि विष्णु, महुआ –अचल सौभाग्याचे आशीर्वाद देणारा वृक्ष (बंगालच्या अकाल च्या वेळी ज्या गावांत महुआची झाडे होती, तेथील गावकर्यांनी या झाडाच्या वाळलेल्या फुलांपासून बनलेल्या पोळ्या खाऊन आपले रक्षण केले, असे एका लेखात वाचले होते).

शेवटी कवी नीरजची कवितेतील एक अंश -

खेत जले, खलिहान जले,
सब पेड जले, सब पात जले.
मेरे गांव में रात न जाने कैसा पानी बरसता था.

हा अनुभव आपण आत्ताच घेतला आहे.

Tuesday, June 25, 2013

गूढ कथा: वृत्रासुर आणि पर्वतांत कैद नद्या


वेदांमध्ये कथा आहे. वृत्रासुराने नद्यांना पर्वतांत बंदिस्त केले होते. इंद्राने वज्राच्या प्रहाराने पर्वतांचे हृद्य फोडले आणि नद्यांना मुक्त केले. आज आपण वृत्रासुर प्रमाणेच पुन्हा नद्यांना पर्वतात बंदिस्त करतो आहे. याचा परिणाम आपल्याला भोगावेच लागेल. (इंद्र: अग्नी, वायू आणि जल या तिन्ही प्राकृतिक शक्तींचा स्वामी आहे. प्रकृतीच्या या शक्तीं बरोबर सहयोग करण्यात शहाणपणा असतो. या शक्तींवर विजय मिळविण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशाचा मार्गावर चालणे.)

इंद्राच्या वज्राने, 
हृद्य फोडले पर्वतांचे.
बंदिस्त नद्या मुक्त केल्या
सकळ प्राणी सुखिया झाला.
 
पर्वतांत कैद केल्या नद्या,
बांधुनी धरणे
‘इंद्राचा’ क्रोध अनावर झाला
सकळ प्राणी दुखिया झाला.

नद्यांना आपल्या स्वार्थासाठी पर्वतांत कैद करण्याचा परिणाम ही आपल्याला भोगावे लागेल. 

 




Sunday, June 16, 2013

पुन: एकलव्य : नियतीचा खेळ


एकलव्य चित्रगुप्त समोर उभा होता पण त्याचे मन अशांत होते. चित्रगुप्तने आपला निर्णय ऐकविण्याआधी, आपल्याला एकदा तरी बोलायची संधी द्यावी असे त्याला वाटत होते. तेवढ्यात चित्रागृप्ताने निर्णय दिला, एकलव्य तुझ्या हातून पापकर्मे घडली नाही आहेत, त्या मुळे तुला नरकात पाठविता येणार नाही. पण तुझ्या मनात काही अतृप्त इच्छा शेष आहेत, म्हणून तुला स्वर्गातही धाडता येणार नाही. तुला पृथ्वीवर परत पाठवावे लागेल, तुझ्या मनात काय आहे?

एकलव्य म्हणाला - हे देव, माझ्यावर अन्याय झालेला आहे, आपण जाणत असालच. मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालो असतो पण द्रोणाचार्यांनी राजपुत्र अर्जुनासाठी माझा अंगठा दक्षिणा म्हणून मागून घेतला. माझी इच्छा अपुरी राहिली. हे देव, माझे एकच मागणे आहे पृथ्वीवर उच्च कुळात माझा जन्म व्हावा आणि अर्जुनाचा एका वनवासीच्या घरी जन्म व्हावा, माझ्यावर झालेला  अन्याय अर्जुनाला हि कळला पाहिजे.  हीच माझी इच्छा आहे.

चित्रगुप्त म्हणाले, एकलव्या तू प्रतिशोधाच्या अग्नीत जळत आहे, पुन्हा एकदा विचार कर.

एकलव्य रागात म्हणाला, विचार म्हणजे काय? साक्षात धर्माच्या दरबारात ही मजवर अन्याय होणार का?  चित्रगुप्त म्हणाले, जसी तुझी इच्छा, तू पृथ्वीवर उच्च कुळात जन्म घेशील आणि अर्जुन वनवासी कुळात घेईल. तथास्तु.

कलयुगात पुण्यनगरी येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मणाच्या घरात एकलव्याचा जन्म झाला. वडील सरकारी नौकरीत होते. घरची परिस्थिती बर्यापैकी होती. एका पुब्लिक शाळेत एकलव्य शिक्षण घेऊ लागता. एकलव्याचे एकच ध्येय होते, काहीही करून बारावीत चांगले मार्क्स आणायचे त्यासाठी त्याने शाळे व्यतिरिक्त अनेक क्लास ही जॉईन केले होते. अपेक्षे प्रमाणे त्याला बारावीत ९५% टक्के मार्क्स मिळाले.

आपले ध्येय साधण्यासाठी देशातील प्रमुख शिक्षण संस्थान इंद्रप्रस्थ व्यवस्थापन महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तो इंद्रप्रस्थ नगरील पोहचला. कोट-पैंट आणि टाई घातलेला हा एकलव्य महाविद्यालयाच्या दरवाज्यावर पोहचला. तिथे त्याला पायात तुटलेली चप्पल व मळके कपडे घातलेला एक मुलगा दिसला, त्याला पाहताच एकलव्यला गतजन्म आठवला, तू अर्जुन का? निश्चित तू वनवासी कुळात जन्मला असेल, म्हणत एकलव्य मोठ्याने हसला.

अर्जुनाची ही गतजन्माची स्मृती जागृत झाली, तो म्हणाला एकलव्य, खरं आहे, मी वनवासी कुळातच जन्म घेतलेला आहे, आज सकाळीच छत्तीसगड वरून इथे आलो आहे. घरापासून १०-१२ की.मी. दूर असलेल्या सरकारी शाळेत माझे शिक्षण झाले आहे मला बारावीत ६०% मार्क्स मिळाले आहे. गुरुजी म्हणाले तुला इंद्रप्रस्थ येथील महाविद्यालयात अवश्य प्रवेश मिळेल म्हणून मी इथे आलो आहे.

एकलव्य मोठ्याने हसला, अर्जुन मला ९५% टक्के  मार्क्स मिळाले आहे, ९०% टक्क्याहून कमी  मार्क्सवाल्यांनी इथे फिरकलेही नाही पाहिजे. एवढे कमी मार्क्स येऊन ही तू येथे आला आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटते. अर्जुन यावर काहीच बोलला नाही. प्रवेश फार्म जमा करून, एकलव्य आपल्या हॉटेल वर परत आला. उद्या निकाल जाहीर होणार, अर्जुनाची निराशा होईल, ह्या विचाराने त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तो शांत झोपी गेला.

दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजता, एकलव्य महाविद्यालयात पोहचला. निकाल लागला होता. यादीत एकलव्याचे नाव नव्हते. त्याच्या पेक्षा कितीतरी कमी मार्क्सवाल्यांना प्रवेश मिळालेला होता. अर्जुनाचे ही नाव त्यात होते. त्यामुळे एकलव्याच्या अंगाची लाही-लाही झाली. काही तरी गलफत जाहली असेल. जाब विचारयला पाहिजे, तो तणतणत, प्राचार्यांचा कार्यालय जवळ पोहचला.

दरवाज्यावर पाटी होती त्यावर लिहिले होते प्राचार्य श्रीयुत द्रोणाचार्य. असं होय, मनात पुटपुटत, एकलव्य सरळ आत शिरला आणि द्रोणाचार्यांवर ओरडलाच, प्रत्येक जन्मात माझ्यावर अन्याय करताना तुम्हाला लाज का वाटत नाही? त्या अर्जुना जवळ अस काय आहे, प्रत्येक वेळी तुम्ही त्याची बाजू राखतात.

द्रोणाचार्यांनी ही एकलव्याला ओळखले  शांत पणे म्हणाले, एकलव्या, तुझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मी कारणीभूत नाही, व्यवस्था कारणी भूत आहे.

ते कसें, मला मूर्ख बनवू नका. एकलव्य मी सगळ समजावून सांगतो, असे म्हणत द्रोणाचार्यांनी एकलव्यला समोर कुर्सी वर बसविले आणि म्हणाले एकलव्या या महाविद्यालयात व्यवस्थापन विषयाच्या ५० जागा उपलब्ध आहे. त्यात ७०% स्थानीय विद्यार्थांसाठी राखीव आहे. गेल्या युगांमध्ये दलित, वनवासी आणि मागासवर्गीय लोकांवर झालेल्या अन्यायाचे परिताप करण्यासाठी, कलयुगात आपल्या लोकशाही सरकारने त्यांना आरक्षण दिलेले आहे. शिवाय काही जागा मुलींसाठी, विकलांग मुलांसाठी, स्वतंत्रता सेनानीच्या मुलांसाठी आणि काही अल्पसंख्यकांसाठी आरक्षित आहे. तुझ्यापेक्षा कमी मार्क्स असून ही वनवासी कोट्यात अर्जुनाचे सर्वात जास्ती मार्क्स आहे. सामान्य श्रेणीत केवळ १ मार्क्स कमी पडल्यामुळे तुला प्रवेश मिळाला नाही.

एकलव्यला आता काहीच सुचत नव्हते, पुन्हा अर्जुनाच्या हातून त्याचा पराभव झाला होता. त्याला वाटले पुन्हा एकदा त्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी हिसकावला होता. त्याची दशा बघून द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्या, तुझी इच्छा होती, अर्जुनाने वनवासी व्हावे, ती पूर्ण झाली. पण बदला घेण्याच्या विचाराने जळत असलेला तू विसरून गेला, काळाचे चक्र सदैव फिरत राहते, ते कधीच अन्याय करत नाही.. एकलव्य चुपचाप उठला आणि परत फिरला.
 
 

Sunday, June 9, 2013

फिक्सिंग आणि मोका -दोन कविता


 (१)
बिना कुणाला फिक्स केल्या आपल्या देशात कुठलेही काम होत नाही....
 

सगळ कसं छान आहे
सगळ कसं फिक्स आहे.
फिक्सिंगच्या चौकटीत इथे
बंदिस्त सर्वांचे आयुष्य आहे. 

म्हणतो दास विवेक कसा
फिक्स करा व फिक्स व्हा
आयुष्याचा आनंद लुटा.


(2)


जाळ्यात लहान मासोळ्याच येतात, मोठ्या मगरींच्या नादी कुणीच लागत नाही....
लहान लहान मासोळ्यां वर
मोका मोका मोका.
मोठ्या मोठ्या मगरीं पासून
तौबा तौबा तौबा. 

Saturday, May 11, 2013

दोन नव्या म्हणी



धन, धान्य, संपन्नता देवाच्या कृपेने मिळते, देवाला प्रसन्न करण्यासाठी ‘नवैद्य’ दाखवावाच लागतो. देवाला नवैद्य दाखविण्याच्या आधी प्रसाद भक्षण केल्याचे परिणाम वाईट होतात, देवता कुपित होते.

(१)         

आधी  नवैद्य दाखवावा
मग प्रसाद भक्षण करावा
राहे देवाची कृपा सदा.

(२)         

बेडूकांच्या भांडणात
सर्पाची मौज.  

(बेडूक कोण हे सुज्ञ वाचक ओळखतीलच) 

Saturday, May 4, 2013

क्षणिका - संस्कृति रक्षक, पेंट जीनची व कटू सत्य

]
जगात प्राणी विवस्त्रावस्थेतच येतात. मनुष्यप्राण्या खेरीज कोणी ही वस्त्र परिधान करीत नाही, तरी ही तथाकथित संस्कृति रक्षक वस्त्रात अश्लीलता शोधतात

डोक्यातली विकृती
कपड्यात शोधात
स्वत:ला म्हणवितात
संस्कृति रक्षक
मेट्रो आणि बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन, मुलींच्या पृष्ठ भागावर हात लावणे, चीकोटी घेणे, इत्यादी प्रकार घडतात, अशा वेळी जाड कपड्यांची जीनची पेंट मुलीना हिडीस स्पर्शापासुनी वाचविते.

हिडीस स्पर्शापासुनी
सदैव वाचविणारी 
रक्षक मुलींची
पेंट जीनची


ज्या समाजात स्त्रीला संपती समजून तिला परद्याआड लपविल्या जाते, तिथेस्त्री केवळ भोग वस्तू असतें, हेच कटू सत्य

तिजोरीतील लक्ष्मी
परद्यातील स्त्री
केवळ असते
भोग वस्तु.



Friday, April 19, 2013

डीओ आणि सदूची प्रेमकहाणी


विज्ञापनातल्या हिरो ने डीओ लावला
सुंदर पोरी त्याला, येउनी बिलगल्या.
सदू ने ही डीओ लावला
तिला पटवायला, चौपाटीवर आला.
डीओचा सुगंध दरवळीत, तिच्या जवळ पोहचला.
तिला होतील एलर्जी, ती पटापटा शिंकली
बहाणा करून ती, दूर निघोनी गेली.
सदूची प्रेमकहाणी, सुरु होताच  संपली.
असे कसे घडले, सदूला नाही कळले.
विवेक म्हणे सदू बाबा
भ्रमित विज्ञापने पाहुनी, 
असेच लोक बुडती.

Saturday, April 6, 2013

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका



नेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबईअनधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी  इत्यादी अश्रु  ढाळतात- त्यांना पाहून मला काय वाटते

मगर

प्रेतांच्या ढिगार्यावर
तो नोटा मोजत होता.
कधी-कधी मगर हा
अश्रु ही ढाळीत होता.


मुंबईचे मृगजळ

मुंबईच्या मृगजळात त्याला
स्वप्नांची जागा भेटली.
त्यास का माहिती
ती त्याची कब्र होती.

Sunday, March 31, 2013

कोरडाच राहलो सदा.



पुनवेच्या चांदण्यात
भिजलो नाही कधी
अवसेच्या अंधाराला
कवटाळले सदा.

डोळ्यातलं तिचे प्रेम
दिसलं नाही कधी.
भोवर्‍यातच वासनेच्या
भटकत राहलो सदा.

प्रेमाचा अर्थ मला
कळला नाही कधी.
समुद्रात प्रेमाच्या
कोरडाच राहलो सदा. 

Monday, March 18, 2013

होळीचे वास्तव / काही विचारिका

काही वर्षांपूर्वी , ऑफिसातून परतताना , बस वर एक गुब्बार लागला, काच फुटली आणि, काचेचा एक तुकडा खिडकी जवळ बसलेल्या प्रवासाच्या कपाळावर लागला. रक्त वाहू लागले. आजकालच्या होळीचे वास्तव दाखविणाऱ्या काही क्षणिका:

(१)


मिसाईल गुब्बाऱ्याची
खिडकीवर आदळली.

सडे लाल रक्ताचे
जमिनीवर सांडले.

(२)

पूतना मावशी
होळीत जळाली.

(कुणास ठाऊक )

निर्दोष झाडांची
कत्तल मात्र झाली.


(३)

नशेत भांगेच्या
तो गटरात पडला.
संगे डुक्कारांच्या
तो होळी खेळला.


(४)

उधळले आकाशी
गुलाल सतरंगी.


रासायनिक एलर्जी
सर्वत्र पसरली.

Sunday, March 17, 2013

बटाटा चिप्स

मार्च महिन्यात आमची गृहलक्ष्मी ५-७ किलोचे बटाटा चिप्स करतेच. हे चिप्स बहुतेक वर्षभर पुरतात. ( अधिकांश चिप्स उपासाच्या दिवशी पोटात जातात). दिल्ली मुंबईत फ्लेट राहण्याऱ्या लोकांजवळ चिप्स वाळत टाकण्या साठी गच्ची नसते व मोठे भांडे हि नसतात. पण बाल्कनीत किलो -अर्धा किलो बटाट्याचे चिप्स ते टाकू शकतात.

बटाटा चिप्स करताना येणाऱ्या काही समस्या, एक- पुष्कळदा बटाटा चिप्स हे काळे पडतात. बटाटा चिप्स ज्या कपड्यावर किंवा प्लास्टिक शीट वाळत टाकल्या जातात,त्या वर ते चिपकतात व काढतात तुटतात या वर आमच्या गृहलक्ष्मी जी युक्ती वापरते ती रेसिपी सहित खाली देतो आहे:

सामग्री- बटाटे एक किलो, मीठ १/२ चमचे, फिटकरी लहान तुकडा (फिटकरी टाकल्याने बटाटे काळे नाही पडत), दोन २ किलो चे भांडे व बटाटे वाळत घालण्या साठी मुलायम कापड किंवा साडी व एक चाळणी.

कृती: बटाटे सोलून आवडी प्रमाणे चिप्स कापून पाणी असलेल्या भांड्यात टाका ( बटाट्यांना जंग लागणार नाही).

एका भांड्यात दीड एक लीटर गॅसवर तापायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात फिटकरी आणि १/२ चमचे मीठ घाला, नंतर त्यात बटाटे चिप्स टाका. तीन-चार मिनिटांत चिप्स उकळतात.

दुसर्या भांड्यात आता २ लीटर थंड पाणी तैयार ठेवा.

चाळणीच्या सहाय्याने उकळलेले चिप्स भांड्यातून काढून थंड पाण्यात घाला. (थंड झालेले चिप्स, कपड्यांवर किंवा प्लास्टिक शीटवर चिपकण्याची शक्यता कमी होते).


Friday, February 15, 2013

पैज – प्रेम दिन स्पेशल

आज १४ फेब्रुवारी- प्रेम दिवस- कॉलेजातील पोरांचा एक घोळका आशाळभूत नजरेने येणाऱ्या पोरीं कडे पाहत होता. पण कुठलीही पोरगी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. तेवढ्यात ती कॉलेज सुंदरी त्यांना दिसली. तिला पाहून त्यांचे चेहरे उजळले. त्यातला एक म्हणाला म्हणाला आपण सर्व तिच्या  वर  फिदा आहोतआज प्रेम दिवस आहे. हिम्मत असेल तर आपल्या पैकी कुणी  तिला I love you म्हणून दाखवावे. त्या मुलीने त्याला आपल्या हातानी नुसता स्पर्श ही केला तर  १००० रुपयांची पैज तो जिंकेल. काही वेळ शांतता राहिली. सहजा-सहजी बळीचा बकरा कोण बनणारस्वत:ची शोभा कोण करायला तैयार होणार? काही विचार करून त्याने पैज स्वीकारली.एक गुलाब घेऊन तो तिच्या समोर आलातिला काही कळण्या आधीच तिच्या हातात गुलाब देत जोरात I love you असे म्हणले. ती क्षणभर गोंधळलीमग एक जोरदार त्याच्या मुस्कटात हाणली. सर्व पोरं त्याचाकडे बघून फिदीफिदी हसू लागली. खाली मान घालून तो त्यांच्या जवळ आला. त्यांना हसताना बघून तो ही जोरात हसू लागला म्हणाला  मित्रानो- मुस्कटात का होईना तिच्या मखमली हातांचा स्पर्श मला गालावर अद्याप ही जाणवतो आहे. मी पैज जिंकली आहे.

(काही वर्ष आधी माझ्या एका फेकू मित्राने त्याच्या बरोबर घडलेली हि घटना सांगितली होती). 

Tuesday, December 11, 2012

दोन क्षणिका - श्रोता आणि कवी, चोर आणि कवी


 श्रोता आणि कवी

त्याने माझ्या कविता आनंदाने ऐकली
वेळोवेळी दाद दिली अगदी मनाजोगती.
मला वाटले आहे तो ‘रसिक’ मोठा
नंतर कळले, तो होता ठार ‘बहिरा’.

खरं कळल्या वर, कवीचे काय झाले असेल.

चोर आणि कवी

मागे होता पोलीस
पुढे होता कवी.
चोराने स्वीकारली
आनंदाने कोठडी.

काय करणार बेचारा, कविता ऐकण्या पेक्षा जेल केंव्हाही बरी.

Thursday, November 22, 2012

रावण


काल संध्याकाळी जनकपुरीतल्या रामलीलेत ‘रावण दहनाची’ लीला बघितली. दर दसऱ्याला रावण वध होतो, पुतळे फुंकले जातात, तरीही रावण आज ही जिवंत आहे, का? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधत घरी परतलो.

दरवर्षी होतो रावण वध

तरीही रावण मरत नाही.
रावण अजर आहे
रावण अमर आहे.

रावण वसतो, आपल्याच हृदयात
काम-क्रोध मोह-माया, मद-मत्सर
इत्यादी आयुधांनी सज्ज रावण,
सदैव जागवतो असतो मनात,
दडलेल्या सुप्त राक्षसी महत्वाकांक्षा.

कोण लढणार, कसे लढणार
मनात दडलेल्या रावणाशी.
युद्धापूर्वीच जिंकतो रावण
ठरलेला असतो
रामाच्या नशीबी वनवास.

रावण अजर आहे
रावण अमर आहे.

Sunday, November 11, 2012

अवसेची रात्र आणि एक पणती


सर्वत्र पसरलेला गर्द काळोख, भूक, आत्महत्या, भ्रष्टाचार , महंगाई , इत्यादी आसुरी शक्ती प्रबळ झालेल्या आहे, तरी ही एक पणती.

अवसेच्या राती
निराश मनी
पेटविते ठिणगी आशेची
एक पणती

अवसेच्या राती
पांढर्या बुरख्या खाली
लपलेले काळे चेहरे
दाखविते जनतेला.
एक पणती.
अवसेच्या राती
सत्य आणि न्यायाची
प्रेमाची आणि सोख्याची
पेटवू आपल्या हृदयी
एक पणती.

Saturday, November 10, 2012

न्याय देवता


न्यायाच्या आशेने लोक कोर्टात जातात, सामान्य माणसांना बहुधा तिथे न्याय मिळत नाही कारण न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. न्याय होणार तरी कसा, सत्य दिसणार तरी कसे ???


*अस्मत द्रोपदीची
लुटल्या गेली दरबारी
तरी तिला दिसले नाही
तिच्या डोळयांवर  होती पट्टी
गांधारी सारखी.

*अब्रू

म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. एकदा कोर्टाच्या पायरी वर पाय ठेवला कि ... त्या केंव्हा संपतील कुणीच सांगू शकत नाही. 



 तो कोर्टाची पायरी चढला 
आणि चढतच गेला, 
चढतच गेला ....
अखेर!
दरबारी चित्रगुप्ताच्या 
त्याचा निकाल लागला 

Friday, October 19, 2012

गीत मिलनाचे , धरती समुद्राचे



ग्रीष्माच्या उन्हात,
धरती होरपळी.
विरहाच्या अग्नीत
समुद्र पेटला.

विरही उसांसे,
आकाशी भिडलें.
एकत्र होऊनी,
मेघरूप झाले.

श्रावणी धारांत,
धरती भिजली.
प्रणय गीत ते,
नभी गुंजले.

हिरव्या शालूत,
धरती लाजली.
कुणास पाहून ती
गालात हसली.

गुपित गोड त्यांचे,
कुणा ना कळले.
कवी मनाने,
हृदयी जाणले. 


Tuesday, October 9, 2012

कोळसा


(१)

गरीबांचे घर

पेटवितो कोळसा.

दलालांचे घर
'उजळीतो' कोळसा.

(२)

कोळसा काळा

लक्ष्मी काळी.

अवसेच्या राती
दिवाळी दिवाळी.

Thursday, October 4, 2012

लेखणी


लेखणी हातात  घेण सोप आहे, पण कुठल्या मार्गाचा अवलंबन करायचे हा मोठा प्रश्न आहे. कुठल्या रस्त्यावर जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
   
(१) 

सत्याच्या आगीत, होरपळली लेखणी.
आली नशीबी, वणवण हरिश्चंद्राची.

(२) 

अंधाऱ्या राती, गायली लेखणी
सोन्याच्या दारी, नाचली लेखणी.
  
(३)

कान केले बंद, झाकले डोळे हातानी.  

तोंडाला कुलूप लाऊनि, झाली मुकी लेखणी.