Wednesday, January 2, 2019

ईशाचे लग्न


आजच्या ब्राह्मण मुली इतर जातीत लग्न का करतात, आपल्या जातीत का योग्य मुले नाहीत का? हा प्रश्न फेसबुक वर एका ब्राह्मण ग्रुपमध्ये वारंवार वाचायला मिळाला.  काही घडलेल्या घटनांवर आधारित.

ईशा कुलकर्णी मूळ विदर्भातली. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. शाकाहारी व निर्व्यसनी. बीबीए केल्यावर पुण्यात तिला नौकरी मिळाली. नौकरी लागल्यावर लग्नाची इच्छा होणारच. साहजिक होते, पुण्यातच काम करणारा नवरा मिळावा अशी ईशाची इच्छा होती. नौकरी लागल्यानंतर काही महिन्यातच मिलिंद नावाचा मुलाशी तिचा परिचय झाला. तो हि नागपूरचा होता व ब्राह्मण हि होता. वर्षाचे ५ लाख वर्षाचे पकेज. त्याच्या वडिलांना पेन्शन होती. स्वत:चे घर हि नागपुरात होते. तिच्यासाठी नवरा म्हणून मिलिंद सामाजिक व आर्थिक दृष्ट्या परफेक्ट होता. दोघांच्या नौकरी शिवाय पुण्यासारख्या महानगरात गुजराण होणे शक्य नाही, हे हि सत्य दोघांना कळून चुकले  होते. ईशाने मिलिंदची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. पण वडिलांनी मुलाची जन्म तारीख आणि वेळ विचारली. मुलाची जन्म कुंडली बनवून मिळवून बघितली. जन्म कुंडली जुळली नाही. अर्थातच लग्नाची बोलणी पुढे होऊ शकली नाही. वर्ष दोन वर्ष असेच निघून गेले. पुण्यात काम करणाऱ्या ३-४ मुलांचे फोटो ईशाला रुचले,  पण कुठेही पत्रिका जुळली नाही. आता ईशा पंचविसीची झाली.

सृष्टीच्या नियमांना बांधले ग्रह नक्षत्र अवकाशात विचरण करतात. त्यांना पृथ्वीवरील माणसांशी काही घेणे-देणे नाही. त्यांचा काही प्रभाव मानवावर पडत असेल तर सर्वांवर एकसारखा. जेंव्हा पासून टीवी मालिकांचे प्रस्थ वाढले आहे, स्वत:ची बुद्धी गहाण ठेऊन पत्रिका इत्यादी पाहण्याचे प्रमाण हि वाढले आहे. पत्रिकेतल्या १२ खाण्याचे लग्न एका-दुसर्याशी होत नाही. जीवित स्त्री-पुरुषांचे होतात, हे साधे सत्यहि शिकलेल्या ब्राम्हण समाजाच्या लोकांना कळत नाही याचेच दु:ख होते.  

एका मुलाची पत्रिका जुळली. ईशाच्या आईने आनंदाने हि बातमी ईशाला सांगितली. आता तुम्ही दोघांनी एका दुसर्याला पसंत केले कि झाले.  ईशा त्या मुलाला भेटायला गेली. थोड्या वेळ एका-दुसर्याशी जुजबी बोलणे झाल्यावर तो मुलगा म्हणाला.  मी एकुलता एक मुलगा आहे. आईची इच्छा आहे. मुलीकडच्यांनी दोन्हीकडचा खर्च केला पाहिजे, हुंडा आणि इतके तोळे सोने हि दिले पाहिजे.  ईशाला राग आला, तिने त्याला सरळ विचारले, तुम्ही लोक भिकारी आहात का? किस्सा तिथेच समाप्त झाला. ईशाच्या आईने  ईशालाच रागावले, तुला चिडायला काय झाले होते. हुंड्याच्या गोष्टी आम्ही केल्या असत्या. अशाने तुझे लग्न कसे जमणार?

एक मुलगा तर चक्क तोंडात पान-तंबाकू तोंडात कोंबून तिला भेटला. त्याने तिला विचारले तू घेते का? लग्न झाल्यावर तिला सामिष भोजन बनवावे लागेल. तिने त्याला तिथेच नकार दिला. आता तिची आई तिच्यावर डाफरली. आजकाल सर्वच तरुण दारू पितात, सामिष भोजन करतात. लग्न करायचे असेल तर तुला बदलावे लागेल. असेच दोन-तीन वर्ष निघून गेले. ईशाने लग्नाचा विचारच सोडून दिला. 

मनोज ईशाच्या ऑफिस मध्येच काम करत होता. त्याच्या वडिलांनी राधास्वामी पंथाची दीक्षा घेतली होती. मद्य मांस मदिरा इत्यादी व्यसनांचा त्याच्या  वडिलांनी त्याग केला.  साहजिक होते, मनोजला कुठलेही व्यसन नव्हते आणि तो पूर्ण शाकाहारी होता. पुण्यात नौकरी लागल्यावर त्यालाहि कळून गेले होते महानगरात एका नौकरीत गुजराण होणे शक्य नाही. भाड्यातच अर्धा पगार निघून जात होता आणि  एका पगारात स्वत:चा फ्लॅट घेणे आयुष्यात शक्य होणार नाही. त्याच्या बिरादरीत शिकलेल्या मुली नाहीत आणि एखाद दुसरी असेली, तरी पुण्यात नौकरी करणारी नाही. तो हि तीसीचा होत आला होता. पण लग्न झाले नव्हते. त्यालाहि पुण्यात काम करणारी शिकलेली बायको पाहिजे होती. पण त्याची जात पाहून उच्चवर्णीय शिक्षित मुली लग्नासाठी होकार देतील का? हा प्रश्न नेहमीच त्याच्या डोळ्यांसमोर यायचा. ईशाचे लग्न या न त्या कारणाने जमत नाही याची कुणकुण त्यालाही लागली होती. त्याने विचार केला, ईशासारख्या  नौकरी करणार्या मुली म्हणजे सतत दूध देणार्या गायी. लोक दूध देणाऱ्या गायीला पैका मोजून विकत घेतात. मूर्ख लोक हुंडा मागतात. हिश्याची लग्न झाले तर आयुष्याचा सर्व समस्या सुटतील. दोघांच्या पगारात पुण्यात फ्लॅट हि विकत घेता येईल. आई-वडिलांना हि गावातून पुण्यात बोलविता येईल आणि होणार्या मुलांना चांगले शिक्षण हि देता येईल.  शिकलेली आई मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देईलच. 

एक दिवस हिम्मत करून त्याने ईशासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. तो म्हणाला माझी जाती सोडली तर माझ्यात तुला अपेक्षित सर्व गुण आहेत. आम्हाला दहेज नको, एका साडीत तू घरात आली तरी सर्व तुझा स्वीकार करतील. आमच्या घरी तुला मान आणि प्रतिष्ठा मिळेल.  ईशानेहि विचार केला हुंडा न मागणारा निर्व्यसनी आणि तिच्याच जेव्हढा पगार असलेल्या मुलाशी लग्न करण्यात काय गैर. शेवटी जाती माणसाने निर्मित केल्या आहेत, देवाने नव्हे. असा चांगला मुलगा मिळणे आता शक्य नाही. आता ईशाच्या आई वडिलांनी विचार केला आपली मुलगी आता ३०ची होत  आली आहे, तिला एक मुलगा आवडला आहे. एक जाती सोडली, तर सर्व चांगले गुण मनोज मध्ये आहेत. त्यांनी पत्रिका इत्यादीचा विचार त्यागून, सर्वांचा विरोध झुगारून आपल्या ऐपतीप्रमाणे ईशाचे मनोज सोबत लग्न लाऊन दिले. लग्नानंतर पहिले काम मनोजने फ्लॅट बुक करण्याचे केले. त्याचे पुण्यातले स्वप्न पूर्ण झाले होते.

मनोजच्या एका मित्राने त्याला विचारले, ब्राह्मण पोरीला तू कसे काय पटविले. तो म्हणाला, जो पर्यंत व्यसनाधीन ब्राह्मण मुले, अतिशहाणे पत्रिका पाहणारे आणि हुंडा मागणारे ब्राह्मण मायबाप आहेत, शिक्षित, संस्कारी आणि चांगल्या पगार असलेल्या ब्राह्मण मुलींना पटविणे सहज शक्य आहेत.   


3 comments: