Monday, April 21, 2025

समर्थ विचार: ग्रंथ वाचल्या शिवाय नाव ठेवणारा मूर्ख असतो

समूळ ग्रंथ पाहिल्याविण. 
उगाच ठेवी जो दूषण. 
गुण सांगतां पाहे अवगुण. 
तो एक पढत मूर्ख. 
(दासबोध: 2.10.26)

समर्थ म्हणतात कोणत्याही ग्रंथाची समीक्षा करण्यापूर्वी तो ग्रंथ वाचला पाहिजे. उत्तम गुरूंकडून त्या ग्रंथातील शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतर त्या ग्रंथाची समीक्षा केली पाहिजे. ग्रंथातील गुण आणि दोष इत्यादीचे चिंतन आणि मनन करून, त्या ग्रंथाचा सार ग्रहण केला पाहिजे. त्या ग्रंथातील गुण आपल्याला घ्यायचे आहे आणि दोष टाकून द्यायचे आहे. 

कबीर दास ही म्हणतात:  

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय.
सार -सार को गहि थोथा देई उड़ाय.

ज्या प्रमाणे धान्यातील भूसा, कचरा, खड़े इत्यादि धान्यातून वेगळे करण्यासाठी सूपाला हाताने जोरात फटकारावे लागते. हाताने सूप फटकारताना  डोक्याचा आणि डोळ्यांचा वापर ही करावा लागतो. तसे नाही केले तर कचर्‍या सोबत धान्य सूप फटकारताना उडून जाईल.  

आपले अधिकान्श ग्रंथ अत्यंत प्राचीन असल्याने आणि त्या वेळी प्रिंटिंग प्रेसचे अस्तित्व नसल्याने, अनेक सुलेखकांनी त्यात भेसळ केली आहे. ती चांगली आणि वाईट दोन्ही आहे. त्यामुळे प्राचीन ग्रंथ वाचताना, कबीरदासचा हा दोहा नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे. माझा एक दलित कबीरपंथी सहकारी होता. मनुस्मृती बहुतेक ब्राह्मणांनी दलितांना गुलाम बनविण्यासाठी लिहली असावी असे त्याचे मत होते. पण त्याला वाचण्याची आवड होती. एक दिवस लाईब्रेरीतून मनुस्मृती आणून त्याला वाचायला दिली आणि म्हंटले,  कबीरदासच्या नजरेतून या पुस्तकातील गुण दोष वेगळे करून तुझे मत मला सांग.  काही दिवसांनी त्याने पुस्तक परत केले आणि म्हणाला बहुतेक धर्म आणि दलित विरोधी नेताच मनुस्मृतीचा विरोध करतात. त्याच्या विचारात झालेल्या बदलाने मी ही आश्चर्यचकीत झालो.

आपल्या देशात बिना वाचता ज्या ग्रंथला जाळल्या जाते तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती, स्त्री, पुरुष, ब्राह्मण, शूद्र सर्वांना शिक्षणाचा अधिकार देते. गुरुकुलांत शिक्षण प्रारंभ करताना ब्रम्हचारी आणि ब्रम्हचारिणी सर्वांचा यज्ञोपवीत होत असे. सर्वांना स्नान संध्याचा अधिकार होता.  आज ही माझ्या माहीत प्रमाणे आर्यसमाज गुरुकुलांत आणि बाबा रामदेवच्या शाळांत सर्वांचा यज्ञोपवीत होतो. यू ट्यूब वर व्हिडिओ दिसतील. शिक्षणानंतर योग्यते अनुसार वर्ण ठरत असे. त्याकाळी ब्राम्हण कुळात जन्मलेला विद्यार्थी ही शूद्र होत असे आणि शूद्र ही ब्राम्हण होत होता. उदा. रत्नाकर ते वाल्मिकी, वैश्या पुत्र सत्यकाम जाबाली आणि महामुनी व्यास तर धीवर कन्येपासून विवाह बाहय संबंधातून उत्पन्न झाले होते. आपल्या संविधानात जाती जन्मानुसार आहे. आज शूद्र  ब्राम्हण बनू शकत नाही. मनुस्मृती शिक्षणात भेदभाव करत नाही. वयाच्या आठ वर्षांनंतर सर्व मुलांनी गुरुकुलात राहावे असा निर्देश मनुस्मृतीत आहे. बाल विवाहाचा ही निषेध मनुस्मृतीत आहे. रजस्वला झाल्यानंतर 36 महिन्यांनंतर अर्थात वयाच्या 16 वर्षांनंतरच  स्त्रीचा  विवाह झाला पाहिजे अशी व्यवस्था मनुने दिली आहे. विवाह पूर्वी स्त्रीचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे होते. मनुने विधवेला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार दिला आहे. पुत्र प्राप्त करण्याचा अधिकार ही दिला आहे. महाभारतात तो कुंतीने वापरला ही आहे. मनुस्मृती तर एकाच अपराधासाठी शुद्राला सर्वात कमी दंड  (कारण तो बुद्धीने न्यून आहे), त्याच्या आठ पट जास्त वैश्याला, 32 पट जास्त क्षत्रियाला आणि 64 पट ब्राह्मणाला. राजाला तर सहस्त्र पट जास्त. इत्यादि इत्यादि. तो जिज्ञासु असल्याने मनुस्मृती वाचून त्याचा दृष्टीकोण बदलला. त्याचे विचार बदलले. 

बाकी मूर्ख माणसांना धान्यात असलेले तांदूळ, गहू दिसणार नाही. त्यांना फक्त कचरा, खडे, दगड इत्यादि दिसतात आणि ते सर्व धान्य उडवून लावतात. तसेच ग्रंथांना नावे ठेवणारे आणि ग्रंथांना जाळणारे असतात. बाकी दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी म्हंटले आहे, ज्याचा मनात जैसा भाव,  तसेच फळ ग्रंथ वाचून मिळते.


No comments:

Post a Comment