Monday, January 8, 2018

प्रदूषण: कलियुगात दुर्योधनाचा दारूण अंत



कुरुक्षेत्रच्या रणांगणातून जीव मुठीत घेऊन दुर्योधन पळत-पळत २१व्या  शतकातल्या दिल्ली नगरीत युमुनेच्या काठावर असलेल्या निगमबोध घाटाकाठी येऊन पोहचला. समोर यमुनेचे अथांग काळे जळ बघून दुर्योधनाने सुटकेचा निश्वास टाकला, बचावलो एकदाचा. आता भीम, कृष्ण आणि पांडव माझे काहीही करू शकत नाही. त्यांना यमुनेच्या जळात मला शोधणे शक्य नाही. त्याने मागे वळून पाठलाग करत येणाऱ्या पांडवांकडे बघितले. 

नदीत उडी टाकण्याच्या तैयारीत असलेल्या दुर्योधनाकडे पाहून भीम जोरात ओरडला. भ्याडा तुझ्यासाठी प्राण अर्पण करणार्या भावंडांचा विचार कर. तुझा भित्रेपणा पाहून त्यांना स्वर्गात किती दुख होईल. तुझा नामर्दीणा पाहण्यासाठी का त्यांनी प्राण गमावले?  शरमेने मान खाली होईल त्यांची . महाराज धृतराष्ट्र यांचा खरा पुत्र असेल तर समोर ये. माझ्याशी युद्ध कर. जिंकला तर तुला राज्य मिळेल आणि हरला तरी स्वर्गात जाशील. कुरुवंशाला कलंकित करू नको. पण दुर्योधना वर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शेवटी भीम रागाने म्हणाला, कदाचित तू धृतराष्ट्राचा खरा पुत्र नाही,  निश्चितच कुणा दासापासून पैदा झाला असेल.  

दुर्योधनाने तुच्छ नजरेने भीमाकडे बघितले आणि म्हणाला, मूर्खा तू किती हि टाकून बोलले तरी काही लाभ नाही.  मी यमुनेत उडी घेतो आहे, हिम्मत असेल तर तूही उडी टाक. माझा वध करण्याची प्रतीज्ञा पूर्ण कर. यमुनेच्या तळाशी आपण मल्ल युद्ध खेळू म्हणत दुर्योधनाने पाण्यात उडी घेतली. 

दुर्योधन यमुनेच्या तळाशी पोहचला. दुर्योधनापाशी पाण्यातून प्राणवायू शोषणाची सिद्धी होती. पाण्यात प्राणवायू असतो. त्या वर जलचर पाण्याच्या आत हि जिवंत राहतात. पण आजच्या २१ शतकात तर कालीयानागापेक्षा किमान १०० पट विषारी असे  रसायन व प्राणवायू रहित यमुना जळात सुश्म जलचर जीवांना हि जिवंत राहणे अशक्य तिथे मानवाची काय बिशाद.  तळाशी आल्यावर दुर्योधनाने श्वास घेण्याचा प्रयत्न केला. प्राणवायू रहित घातक विषारी पाणी नाकपुड्यांच्या वाटे त्याच्या शहरीरात शिरले.  दुर्योधनाचा पाण्यातच अंत झाला.  

यमुनेच्या काठी उभ्या भीमाला  पुढे काय करायचे सुचेनासे झाले. तेवढ्यात इतर पांडवांसोबत कृष्ण हि तिथे पोहचला. भीम कृष्णाकडे पाहत म्हणाला,त्या भ्याड्याने यमुनेत उडी टाकली. आता त्याला शोधणे अशक्यप्राय आहे. दुर्योधनाचा वध केल्याशिवाय युद्ध संपणार नाही. हे केशव आता पुढे काय करायचे तूच सांग.  कुणालाच काही करायची गरज नाही  मी काहीही हि करणार नाही, कृष्ण म्हणाला. दुर्योधनाने स्वत: मृत्यूला मिठी मारली आहे. थोड्या वेळात दुर्योधनाचे प्रेत वर येईल. सर्वांनी सांशक नजरेने कृष्णाकडे बघितले. कृष्ण म्हणाला या यमुनेच्या विषाक्त जळात कुणीही जिवंत राहू शकत नाही. पहाच थोड्या वेळात दुर्योधनाचे प्रेत वर येईल. भीम म्हणाला, माझ्या प्रतीज्ञेचे काय होईल. कृष्ण हसत म्हणाला, या कलयुगात प्रतीज्ञा किंवा आश्वासनाचे काडीचेही हि मूल्य नसते. 




1 comment:

  1. व्वा!! फार सुरेख. शेवटची तीन चार वाक्य तर मला खूप आवडली!

    ReplyDelete