Friday, August 21, 2015

विरोध शिवाजी राजांना होता, पुरंदरेना नव्हे


(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो.  हे हि लोकांना कळले पाहिजे.  म्हणून हा लेख).
 
दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून  मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून  जागा दिली.  मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता.  थोडी बहुत मराठी हि त्याला कळते. त्याने मला विचारले बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, माहित आहे का? त्या बाबत काय म्हणायचे आहे. त्याने  जाणता राजा पाहिल्याचे हि सांगितले.  मी म्हणालो, पुरंदरे यांचे शिवचरित्र फार ३०-३५ वर्षांपूर्वी वाचले होते. आता काही विशेष आठवत नाही. राजनैतिक कारणांमुळे त्यांना पुरस्कार देण्याचा विरोध होतो आहे. एवढेच टीवी पाहून कळते. 

तो खळखळून हसला. मला म्हणाला विरोध पुरंदरे यांना नाही, अपितु  हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांचे गुणगान करणाऱ्या शाहिराला देण्याचा होतो आहे.  विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही.  शिवाजी राजांचे गुणगान धर्मनिरपेक्ष लोकांना आवडत नाही.

च्यायला त्याच्या या जावई शोधामुळे माझी विकेटच उडाली. मी त्याला विचारले, या विधानाला काही पुरावा आहे का?  तो म्हणाला शाहिरांचे नाव घेतल्या बरोबर लोकांना शिवाजी राजा आठवणार, मुघलांचे अत्याचार आठवणार, अफजलखान आणि शाहिस्तेखान आठवणार. भूषण हि आठवणार, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे हि आठवणार.  औरंगजेबाचे संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न महाराष्ट्रात भंगले. हिंदवी साम्राज्याची घुड दौड उत्तरे पर्यंत पोहचली.  अहल्याबाई होळकर समेत अनेक मराठा सरदारांनी उत्तरेतल्या हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला.....इत्यादी.  एका रीतीने हिंदवी साम्राज्याचे स्वप्न साकारल्या गेले.  सारांश शिवाजी राजेंमुळे देशाचे इस्लामीकरण करण्याचे  औरंगजेबाचे स्वप्न भंग झाले. सत्य हेच आहे, आजच्या अल्पसंख्यक नेत्यांना  शिवाजी आवडत नाही.  त्यांना प्रसन्न करण्यासाठी  शाहिरांना पुरस्कार देण्याचा  विरोध करणे आवश्यक होते. 

मी त्याला विचारले विरोध करण्याने शरद पवारांना काय फायदा होणार? तो म्हणाला  कांग्रेसने ब्राह्मण+ दलित + मुस्लीम गठ्जोडची राजनीती करून देशावर शासन केले. वीपी  सिंग यांनी कांग्रेसच्या  राजनीतीला सुरंग लावला.  ओबीसी + मुस्लीम गठ्बंन पुढे आणले.  मायावतीने दलित+ मुस्लीम आणि ब्राह्मण कार्ड खेळले.  तसेच बिहार मध्ये लालूने हि मुस्लीम + यादव कार्ड खेळले.  या सर्वांना सत्ता मिळाली. दोन्ही राज्यात अल्पसंख्यक आणि दलित कॉंग्रेस पासून दूर गेले. बाकी उरलेले भाजपात गेले. दिल्लीत  ही लोकसभेच्या निवडणूकीत हिंदुवादी  भाजप जिंकली कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. केजरीवाल यांनी या मौक्याचा फायदा घेतला.  दिल्लीतलली ८०% अल्पसंख्यक मते आपकडे वळवली. भारी बहुमताने विधान सभा निवडणूक जिंकली.  मुख्यमंत्री केरीवाल यांनी नौटंकी सोडून व्यवस्थित राज्य केले तर  कॉंग्रेस दिल्लीत  हि  संपुष्टात येईल.

महाराष्ट्रात हि जर अल्पसंख्यक मते राष्ट्रवादीकडे वळली, तर शरद पवारांची बल्लेबल्ले होईल. ज्या शरद पवारांनी कित्येकदा शाहिरांचा सम्मान केला, त्यांचे अनुयायी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या  आदेशनुसार हे सर्व घडले.  बाकी कांग्रेसचे म्हणाल तर वरून काही हुकुम  आला नाही.  विरोध कि समर्थन काय करायचे त्यांना कळले नाही.  

त्याचे इतिहास ज्ञान पाहून मी विचारले आपने इतिहास पढ़ा है क्या? और एक बात क्या आप पूर्वांचली हो क्या?  किसी भी बात में राजनीती ढूंढकर उसका  गहरा विश्लेषण कोई पूर्वांचली हि  कर सकता है. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. संभाजी ब्रिगेडवाले तर शिवाजी राजेंना आपला आदर्श मानतात. त्यानी का विरोध केला. तो म्हणाला, मी पूर्वांचली आहे, मला  बीए मध्ये इतिहास हा एक विषय होता. आयुष्यात त्याचा कही उपयोग झाला नहीं हे वेगळे. बाकी संभाजी ब्रिगेडचे  म्हणाल तर,  रस्त्यावर दंगामस्ती, तोडफोड करणार्या छुटभैये नेत्यांना आपल्या राजनीतिक आकाना प्रसन्न करून  राजनीतिक जीवनाची सुरुवात करायची असते. वरिष्ठ नेता प्रसन्न झाले तर निदान 'वार्ड' ची तरी निवडणूक  लढायला मिळू शकेल, हि अपेक्षा.  बाकि इतिहास वैगरेह किंवा पुरंदरे यांच्या लेखानाबाबत त्यांच्या पैकी अधिकांश लोकांना  काही माहिती ही असेल मला नाही वाटत. असली तरी हि, राजनीतिक उद्देश्य साधण्यासाठी त्याच्या कडे दुर्लक्षच करतील.   

तेवढ्यात माझे स्टेशन आले, मी मेट्रोतून उतरलो. घरी येता येता विचार करू लागलो. त्याच्या बोलण्यात हि तथ्य होते. महाराष्ट्रात विशेषकरून मुंबईत पूर्वांचली (भैयांची) लोकांची  संख्या भरपूर आहे. ते हि निवडणूकीत मते देतात. एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे.  म्हणून हा लेख.

No comments:

Post a Comment