Wednesday, June 29, 2011

समर्थ विचार/ (१) (नेतृत्व गुण)/ पराजयाची कारणे


अखंड सावधान असावे I दुश्चित कदापि नसावे Iत्याचा त्याचा जो व्यापार I तेथे असावे खबरदार I 

हिंदीत एक म्हण आहे "सावधानी हटी और दुर्घटना घटी". प्रत्येकाला सावध व खबरदार रहावेच  लागते मग  नौकरी असो वा धंधा.  राजकारणी  लोकांना तर जास्त सावध राहावे लागते. त्यांच्या थोड्याश्या असावधानिमुळे  देशाचा इतिहास बदलून जातो. बिजापुरचा  सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला. शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी  सोने-चांदी, हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले. अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो शिवाजीस भेटण्यास प्रतापगड्याच्या पायथ्याशी येऊन पोहचला. पुढे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. असाच काहीसा प्रकार त्या योगीपुरुषा बरोबर दिल्लीत घडला.   आधी आदर-सत्कार नंतर ...

त्या योगी पुरुषाला देशात पसरलेल्या भ्रष्टाचाराचा नायनाट करायचा होता. त्या साठी त्याने जीवाचे रान केले. संपूर्ण देश आपल्या पायदळी तुटविला.  जनते समोर आपले विचार मांडले.  भ्रष्टाचार विरुद्ध जनतेत काही अंश का होईना,   जागृती ही  निर्माण केली. त्याला वाटले करोडो लोग आपल्या मागे आहेत. सरकार आपल्या मागण्या पूर्ण करेल,  काळ्याधना विरुद्ध आपली मोहीम अवश्य यशस्वी होईल.  ह्या इराद्याने त्याने दिल्लीत तळ ठोकला. सरळ सत्तेला आव्हान दिले. मुरब्बी राजनेत्यांनी  त्याला हातोहात मूर्ख बनविले. भ्रष्टाचारा विरूद्धचे हे आंदोलन, एका रात्रीतच पार पडले. जनतेचे समर्थन असतानाही आंदोलन असफल झाले, याचे कारण शोधताना समर्थांचे विचार आठवले:- 
जनांचा प्रवाह चालला I 
म्हणजे कार्यभाग आटोपला I  
जन ठायी ठायी तुंबला I
 म्हणजे खोटे I  
जनतेला आपले विचार कळले आहे व आपल्या विचारांशी सहमत ही आहे. याचा अर्थ आपले कार्य सिद्ध झाले असे वाटणे म्हणजे खोटे. इतिहासात अशीच एक घटना: पन्नास हजारांपेक्षा जास्त फौजेनिशी हेमू अकबरचा पाठलाग करीत होता. शेवटी पानिपतच्या मैदानात हेमूने अकबरास गाठले. नाईलाजाने बैरम खानच्या नेतृतवाधीन असलेल्या तीन हजाराज्या तटपुंज्या फौजेनिशी अकबर ने झुंज दिली. पण युद्धात काय झाले. एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला. तो हत्ती वरून खाली पडला. हत्तीवर राजा नाही हे कळताच त्या विशाल सेनेने पलायन केले. देशाचा इतिहास बदलला. अकबर युद्ध जिंकला. दिल्लीचा बादशाह झाला. मोगलांचे  राज्य देशभर पसरले.  हेमू जवळ पन्नास हजारांच  सैन्य होते. सैनिकांना  बाण, तलवार, भाले इत्यादी अस्त्र-शस्त्र ही चालविता येत होते. त्यांना युद्ध सहज जिंकायला पाहिजे होते, तरीही ते हरले कारण? सेनेच नेतृत्व करणारा अन्य कोणीही नव्हता. 
अचूक यत्न करवेना I 
म्हणून केलेले सजेना I 
आपला अवगुण जाणवेना I 
काही केल्या II (१२-२-६) 
आपला उद्येश्य कितीही पवित्र असला तरीही, अचूक प्रयत्न व नियोजनाचा अभावी कार्य सिद्ध होत नाही. आपल्या दोषांमुळे आपण अयशस्वी होतो. आपल्यातल्या दोषांना दूर करून, योग्य मार्गाचा अवलंबन केल्यानेच कार्य सिद्ध होते. दुसर्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.  इतिहासातले असेच एक उदाहरण.  शाईस्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. या मुरलेल्या  सरदार सोबत लाखांच्यावर सैन्य होत. तरीही शिवाजीने त्याचा पराभव केला. शिवाजीने जाणले, सरळ युद्धात शाईस्ताखाणास पराजित करणे शक्य नाही. शिवाजी ने दुसरा मार्ग निवडला. रात्रीच्या वेळी छापा मारला व युद्ध जिंकले.  त्यांनी अचूक मार्ग निवडला होता व कार्य सिद्ध करण्यासाठी योग्य नियोजन ही केले होते. आपल्या हातून काय चुका झाल्या हे आपल्याला कळल तर आपण त्या चुका दुरुस्त करू शकतो.  समर्थांनी म्हटले आहे:  
मूर्खपणा सांडीत जाते I 
शहाणपण शिकता येते I 
कारभार करिता उमजते I 
 सकळ काही (१४-६-६ )

No comments:

Post a Comment