Friday, April 22, 2016

चंदेरी: मियांजींच्या घरी जेवणाचा किस्सा.


   
गेल्या वर्षी चंदेरीला गेलो होतो. दुपारच्या वेळी किल्याच्या भिंतीवर पत्रावळ ठेऊन जेवत असताना, खाली दूरवर पसरलेल्या चंदेरी नगरावर नजर केली. दूर कुठून ढोल ताश्यांचा आवाज येत होता, कुठली तरी मिरवणूक निघत होती. आपल्या मेहुणीला विचारल्यास कळले, आज रामापीरची जयंती आहे. रामापीरची शोभायात्रा निघत असेल. हिंदू- मुसलमान दोन्ही धर्माचे लोक रामा पीरला मानतात.  हिंद-मुसलमान, सर्वजातीय लोक या शोभा यात्रेत  भाग घेतात.  चंदेरीची दुकाने हि आज बंद असतात. सकाळी जेवण बरोबर घेऊन अशोकनगरहून का निघालो होतो तहे हि कळले. 

(किल्याच्या भिंतीवरून दिसणारे चंदेरी शहर)  

जेवत असताना, वडिलांनी सांगितलेला एक जुना किस्सा आठवला. १९६०-६२च्या दरम्यानची गोष्ट. वडील मुंबईच्या एका रंगरसायन कंपनीचे विक्रय प्रतिनिधी म्हणून दिल्लीत कार्यरत होते. चंदेरीच्या साड्या प्रसिद्ध आहेतच. पण तिथे सद्या रंगण्याचे कारखाने  हि भरपूर आहेत. १९६०च्या दशकात जुने रंग सोडून नवीन रासायनिक रंगांचा वापर तेथे हि सुरु झाला होता. त्या बरोबर काही समस्या हि निर्माण झाल्या होत्या. कुठलीही नवीन तकनीक वापरताना सुरवातीला समस्या या येतातच. ऑफिसने मुंबई वरून एक तकनीकी व्यक्ती दिल्लीला पाठवला. त्याच्या सोबत वडील चंदेरीला पोहचले. तेथील डीलरच्या दुकानात तेथील  रंगारी जमले, त्यांच्या सोबत चर्चा झाली. दुसर्या दिवशी पहाटे एका बुजुर्ग मियांजींच्या कारखान्यात प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले. मियांजींच्या राहत्या घराच्या एक बाजुला त्यांच्या कपडे रंगण्याचा छोटेखानी  कारखाना होता. पाहुणे घरी आले, की त्यांचे यथोचित स्वागत झाले पाहिजे, हि भारतीय परंपरा आहेच.  मियांजी म्हणाले, कल आ ही रहे हो तो दुपहर का भोजन हमारे घर हो जाय.  वडिलांनी उत्तर दिले, काही हरकत नाही, पण जेवायला शाकाहारी पदार्थ ठेवा, कारण आम्ही शाकाहारी आहोत. मियांजी उद्गारले, काळजी करू नका, मी स्वत: जातीने लक्ष देईन. 

त्या दिवशी रात्री, मुंबईहून आलेल्या तकनीशियन ने विचारले, पटाईत साहेब  आपण जेवणाचे निमंत्रण स्वीकारले आहे, पण हे लोक तर मांस इत्यादी खाणारे. वडील म्हणाले, फिरतीवर असताना आपण ढाब्यावर जेवतो. अन्न कस आणि कश्यारीतीने बनविले आहे, आपल्याला माहित नसते. केवळ विश्वासावर आपण ढाब्यात जेवतो. इथे तर घर आहे, काळजी कशाला, भांडे चक्क धुऊन-पुसून स्वैपाक करतील हे लोक. कुठला हि अरुचीकर वास येणार नाही याची काळजी घेतील.

दुसर्या दिवशी काम संपल्यावर दुपारी एक दीड वाजता. मियांजींच्या घरी पोहचले. त्या काळच्या हिशोबाने घर कौलारू आणि मातीचे होते. स्वैपाकघरात ताटे मांडली होती. स्वैपाकघर हि व्यवस्थित शेणाने सारवलेले दिसत होते. चंदेरी, शिंद्यांच्या अधिकारात असल्यामुळे मराठी जेवण संस्कृतीचा प्रभाव या भागावर अजूनही आहे. अशोक नगरहून चंदेरी कडे जाताना सकाळच्या वेळी रस्त्यात ठेल्यांवर बटाटा पोहे विकताना दुकानदार दिसले होते.  मियांजींच्या घरी हि वडिलांना हा प्रभाव जाणविला.  वरण-भात, पापड, लोणचे, बटाट्याची सूखी भाजी आणि सेंवैया खीर हा मेनू होता.  चुल्हयावर कढई, ठेवलेली होती, गर्मागर्म पुर्या तळून म्हातारी अम्मी वाढणार होती.

ताटावर बसल्यावर वडिलांना एक जाणवले. पितळेचे ताट, वाटी, पेला, चुल्ह्यावर ठेवलेली पितळी कढई सर्व भांडे नवीन होते. वडिलांनी सहज विचारले, मियांजी, भांडे नवीन विकत घेतलली आहेत का. हां, आप लोक आने वाले थे, इसलिए  अम्मीजीने कहा, नए बर्तन ले आओ. मियांजीचे उत्तर ऐकून, वडिलांना कसे-कसे वाटले, काहीवेळ त्याना काय बोलावे काही सुचले नाही.  थोड्यावेळ विचार करून ते म्हणाले, अम्मीजी इसकी क्या जरुरत थी. म्हातारी अम्मीने लगेच उत्तर दिले, कैसे जरुरत नहीं थी. बामन आदमी को घर पर खाने को बुलाया है. बर्तन कितना भी मांजो कहीं न कहीं बास रही जाती है. ऐसे बर्तन में खाना खिलाकर आपका धर्मभ्रष्ट थोड़े ना करना है. फिर मुझे भी तो अल्लाताला को जवाब देना है.  त्या भोळ्या अशिक्षित म्हातारी अम्मीचे उत्तर ऐकून, वडिलांनी डोळ्यातून ओघळणार्या अश्रुना बामुश्कील थांबविले. दुसर्यांच्या धार्मिक विचारांबाबत किती काळजी होती तिला.  त्या दिवशीच्या जेवणाची गोडी काही औरच होती. 

२००७ मध्ये, वृद्धावस्था आणि आजारी असताना, वडिलांनी हा किस्सा सांगितला होता. जवळपास पन्नास वर्षानंतर हि त्यांच्या जिभेवर अम्मीच्या हातच्या जेवणाची चव  होती.  त्या दिवशी रात्री घरी सेंवैया खीर केली हे सांगणे नकोच.

वडील नेहमी म्हणायचे, तो काळ वेगळा होता. लोक ढोंगी नव्हते. त्या काळी लोक, अलग-अलग थाळीत जेवत होते, पिण्याचे पेले हि वेगळे होते. पण एका दुसर्याच्या प्रती प्रेम होत. दुसर्याच्या भावनांचा सम्मान कसा करायचा, हे अडाणी लोकांना हि कळायचे. सांगायचे नको, त्या नंतर २-३ वेळा  चंदेरी जाण्याचा वडिलांना योग आला. प्रत्येक वेळी अम्मीच्या हातचे जेवायला, ते हक्काने जात होते.

No comments:

Post a Comment