Sunday, May 11, 2014

एका पुतळ्याची व्यथा कथा


एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकता-ऐकता मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, उद्घाटनाच्या, दुसऱ्याच दिवसांपासून, पुतळ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. कुणीही साफ-सफाई, स्वछता करायला फिरकत नव्हते. त्याचा अंगावर धूळ-माती घाण जमा होऊ लागली.  कर्कश ओरडणाऱ्या कावळ्यांनी  प्रात:विधी साठी उपयुक्त जागा म्हणून पुतळ्याचा वापर सुरु केला.  भटक्या कुत्र्यांना, त्या सोयी साठी उपयुक्त खांब वाटला. स्वत:ला शहाणे मानणारे लोक ही कचरा फेकण्याची सोयीस्कर जागा  समजून, घरातल्या कचरा तिथे फेकत होते.  शेवटी घाणीला  कंटाळून पुतळ्यानी डोळे बंद केले आणि तो समाधी अवस्थेत केला. काही वर्षांनी पुतळ्याला चांगल्या रीतीने कळले, वर्षाकाठी एक दिवस साफ-सफाई होणार, हार-तुरे घालण्यात येईल, भाषणे होईल आणि पुन्हा हरिदासाची गाडी मूळ पदावर येणार. तरी ही त्याने विचार केला वर्षाकाठी एक दिवस का होईना, डोळे उघडून जगाला बघता येईल म्हणतात ना, एक दिवस पुरे प्रेमाचा.

पण काही दिवसांपूर्वी, अचानक पुतळा खडबडून जागा झाला. अजून वर्ष पूर्ण झालं नाही कुणी झोप मोड केली बरें, पुतळ्याने डोळे उघडले, त्याची साफ-सफाई सुरु होती. नवीन रंग-रोगन त्याच्या संपूर्ण शरीरावर होत होता. आजू-बाजूचा परिसर ही चकाचक चमकविण्याचे काम सुरु होते. त्याचे संपूर्ण शरीर सजविले जात होते. पुतळ्याने विचार केला, काय बरे झाले असावे, कदाचित निवडणूक आली असेल त्याचा अंदाज खरा ठरला. एका दाढीवाल्या माणसाने त्याला एक मोठा हार घातला.  आणि विकास विकास' असे ओरडत एक जोरदार भाषण दिले आणि जमलेल्या जनतेपाशी मते मागितली. पुतळ्याने मनात म्हंटले,  खरंच, या माणसाने अल्पावधीत स्वत:चा  भरपूर विकास केला आहे,

दाढीवाला गेला, थोड्याच वेळानी पुतळ्याने बघितले, काही लोक मोठ्या-मोठ्या हंड्यांमध्ये गंगाजल आणि दूध घेऊन येत आहेत. जवळ येताच, त्राहीमाम, त्राहीमाम, शांतम पापं, शांतम पापं च्या घोषणा देत, त्यांचा नेता म्हणाला, हे पुतळे देवा आम्हाला क्षमा करा, त्या नीच माणसाच्या जाणून बुजून  स्पर्श करून आणि तुम्हाला अपवित्र केले आहे.  पण चिंता करायची गरज नाही, गौ-ब्राह्मणांच्या साक्षीने गंगाजल आणि दुग्ध अभिषेक करून, तुम्हाला पुन्हा पवित्र करू.  पुतळ्याने मनात म्हंटले, च्यायला, देश स्वतंत्र होऊन कित्येक दशक झाले, तरी अस्पृश्यता ही आहेच. आपल्याला काय करायंच दुग्ध आणि गंगा स्नानाचा आनंद घेऊ, पुन्हा असा मौका कधी मिळेल काही सांगता येणार नाही.

दररोज न चुकता परिसराची आणि पुतळ्याची स्वच्छता होत होती. पुतळ्यापाशी ही जागा कडे बघायला भरपूर वेळ होता. पुतळा असला म्हणून काय झाले त्याला ही  भावना या होत्याच, सुंदर, अल्पवस्त्र धारी कुंतले सारख्या आधुनिक सुंदर ललनांना बघून त्याचे डोळे ही तृप्ती मिळत होती.  दुसऱ्या दिवशी एक बहनजी आली, तिने ही पुतळ्याला हार घातला. ती जोर जोरात म्हणत होती, त्या शुद्धीकरण वाल्यांचे आणि नीच माणसाची आपसांत मिली भगतआहे. त्यांचा बहिष्कार करा.  वोट मलाच द्या, पण असे भाषण देत असताना तिच्या पायाखालची जमीन का खिसकतेआहे हे पुतळ्याला कळले नाही.

पुन्हा एक-दोन दिवसांनी, एका बाबा समान वाटणाऱ्या माणसाने पुतळ्यावर हार घातला, तो जोर जोरात म्हणत होता, गेल्या ६० वर्षांपासून आंम्ही गरीबी दूर करीत आहोत. गरीबी दूर करण्यासाठी आमच्या कडे पुष्कळ योजना आहेत. आम्हालाच मते द्या, आम्ही गरिबी दूर करण्याचा सतत प्रयत्न करत राहू. लोक हो, गरिबी दूर करण्यासाठी, गरीब हे हवेच. तुम्हीच सांगा गरिबांचे अस्तित्व संपले तर आम्ही कुणाची गरिबी दूर करणार.

पुन्हा एक-दोन दिवसांनी, एक छोट्या कद-काठीचा, टोपीवाल्या माणसाने, पुतळ्याला हार घातला. तो म्हणाला, सर्व चोर आहे, मीच एक इमानदार आहे.  माझ्यापाशी  इमानदारीचे सर्टिफिकेट वाटण्याचा ठेका आहे.  जोर-जोरात अम्बानी अडाणी म्हणत असताना त्याला जोरदार खोकला आला. खंक खंक करत तो थांबला.  इमानदार माणूस भाषण देऊन निघून गेला. तेवढ्यात गर्दीतून    सीआईए, फोर्ड फोन्डेषण, असे काही शब्द पुतळ्याला ऐकू आले.

पुतळ्याने विचार केला ज्या प्रमाणे पूर्वी टाटा, बिरला,बजाज असायचे, त्याच प्रमाणे आज अंबानी-अडाणी असतील. सीआईए, फोर्ड फोन्डेषण म्हणजे काय पूर्वी जसे नाजी पक्ष आणि जर्मनी होती तसें तर नाही ना. पुतळ्याला त्या कालच्या माताहारीची पण आठवण  आली.

एकदाचा निवडणुकीचा प्रचार थांबला. पुन्हा पूर्वीची परिस्थिती निर्माण झाली, तोच कचरा, तेच कावळे आणि कुत्रे. पुन्हा घाण असह्य झाली. पुतळ्याने पुन्हा डोळे मिटले आणि तो समाधी अवस्थेत गेला.   

No comments:

Post a Comment