Monday, December 1, 2025

"जुनी दिल्लीतील हरवलेली पावले”


दिल्लीचा मराठी समाजाशी संबंध पेशव्यांच्या काळापासून आहे. दिल्लीतील प्रसिद्ध गौरी शंकर मंदिर अप्पा गंगाधर नावाच्या मराठा सरदाराने बांधले होते. या शिवाय एका मराठा सरदार राजा हिंदुरावचा वाडा आज  हिंदुराव हॉस्पिटल नावाने ओळखला जातो.  सुमारे शंभर वर्षांपूर्वी मुंबईतील रेल्वेचे एक कार्यालय दिल्लीत आले आणि त्यासोबत अनेक मराठी कुटुंबेही दिल्लीला आली. त्यातील पंचवीस-तीस कुटुंबे जुनी दिल्लीतील नया  बाजार, नई बस्ती परिसरात भाड्याच्या घरांमध्ये राहू लागली. आमचे आजोबा जर्मन कंपनीत नोकरीच्या निमित्ताने दिल्लीत आले आणि  नया बाजारात फाटकीण बाई चालवत असलेल्या खानावळीच्या इमारतीत भाड्याने राहू लागले. दिल्लीतील काही मराठी कुटुंबे चित्रपट सृष्टीशी संबंधित होती. काही सिनेमागृह - नोव्हेल्टी, न्यू अमर, एक्सेलसिअर, वेस्टएंड, रिट्झ इत्यादी मराठी लोकांचे होते. दिल्लीत येणार्‍या मराठी लोकांची सोय करण्यासाठी 1919 नव्या बाजारातील एका इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजला भाड्याने  घेऊन "महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज" ची स्थापना झाली. येथे महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना नाममात्र भाड्याने राहता येत असे. पुढे दिल्लीतील मराठी कुटुंबातील मुले मोठी होऊ लागली. आमच्या आजोबा आणि समाजातील सदस्यांनी मुलांना मराठीत प्राथमिक शिक्षण देण्यासाठी केली "नूतन मराठी विद्यालय" ची स्थापना केली. माझ्या वडिलांचे आणि काका, आत्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत झाले आणि पुढचे शिक्षण काबुली गेट शाळेत झाले. स्वातंत्र्यानंतर काका साहेब गाडगीळ यांच्या प्रयत्नाने शाळा पहाडगंजला हलवली गेली आणि बृहन्महाराष्ट्र भवनची स्थापना झाली, जिथे ५० हून अधिक लोकांच्या निवासाची व्यवस्था होती. आजही महाराष्ट्रातून आलेले लोक इथे थांबतात.

द्वितीय महायुद्ध सुरू झाले आणि जर्मन कंपन्यांना भारत सोडून गेल्या. आमचे आजोबा केमिकल मार्केटमध्ये उतरले. त्यांचा मुख्य व्यवसाय पंजाबमध्ये होता. पण १९४७ च्या फाळणी आणि दंगलीमुळे त्यांच्या व्यवसाय बुडाला. ते नागपूरला परत गेले. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आमचे वडील नोकरीच्या निमित्ताने पुन्हा दिल्लीला आले आणि नई बस्तीतील काबुली गेट शाळेच्या मागे असलेल्या स्वातंत्र्य सैनिक सुशीला मोहन यांच्या घरात भाड्याने राहू लागले. जुनी दिल्लीतील मराठी कुटुंबे कमी होती. पण सर्व जवळ जवळ राहत होते. आम्ही सर्व मुले पहाडगंजच्या नूतन मराठी शाळेतच शिकत होतो. एकत्र  शाळेत जाणे आणि परत येत असल्यामुळे आमच्यात घट्ट मैत्री होती.

महाराष्ट्र समाजाच्या पहिल्या मजल्यावर नेहमी पाहुण्यांची वर्दळ असे. दूसरा  मजला बहुतेक वेळा रिकामा असे. तिथे मराठी ग्रंथालय, टेबल टेनिस आणि कॅरम बोर्ड होते. त्या काळात गृहपाठाचा फारसा ताण नसे. त्यामुळे आम्ही मुलांचा रविवार समाजात खेळण्यात जात असे. समाजात दोन्ही खेळांच्या स्पर्धा होत आणि त्यातून राज्यस्तरीय खेळाडूही तयार झाले. एकदा महाराष्ट्र समाजाची टीम ने दिल्ली टेबल टेनिस लीग मध्ये भाग घेतला आणि  3र्‍या क्रमांकावर राहिली होती. समाजाच्या प्रोत्साहन मुळे नरेंद्र दिल्ली यूनिवर्सिटी, दिल्लीच्या टीम आणि नंतर एमटीएनएल तर्फे खेळू शकला. आजकाल कोचिंग करतो. समाजात सर्व मराठी सण  संक्रांती, रामदास नवमी,  चैत्राचे  हळदीकुंकू , गणपती उत्सव, कोजागिरी, दत्त जयंती इत्यादि  उत्साहाने साजरे होत असे.   

पण काळ कधी एकसारखा राहत नाही. भाड्याने राहणारर्‍या मराठी लोकांना दिल्लीत स्वतःचे घर असावे असे वाटू लागले. अनेकांच्या मुलांना बाहेर नौकर्‍या लागल्या.  १९७७ नंतर अनेक कुटुंबे जुनी दिल्ली सोडून जाऊ लागली. वाढत्या ट्रॅफिकमुळे महाराष्ट्रातून येणारे पाहुणेही समाजात राहण्याचे टाळू लागले. त्यामुळे महाराष्ट्र समाजाची भाड्याची जागा सोडून पहाडगंजच्या बृहन्महाराष्ट्र समाजाच्या इमारतीत स्थलांतर झाले. मुबईतील संपांचा फटका आमच्या वडिलांच्या कंपनीलाही बसला होता. फक्त क्षुल्लक रकम घेऊन आम्ही जुनी दिल्ली सोडली आणि जनकपुरी परिसरात राहायला गेलो. फक्त सत्तर वर्षांत जुन्या दिल्लीतून मराठी माणूस नाहीसा झाला. नोकरीच्या मागे धावणे ज्या समाजाची नियती असते ते कुठेही स्थायिक राहू शकत नाही. त्यांना नौकरीच्या शोधत भटकावे लागते.  आता फक्त आठवणी उरल्या आहेत. 

 

Friday, November 28, 2025

भारतीय युद्ध : गांधारची विजयी गर्जना

  

(मध्यरात्र. शकुनि आपल्या शिविरात एका कोपऱ्यात मंचकावर ठेवलेल्या चतुरंगाच्या पटाकडे नजर लावून विचारात मग्न होता. त्या शांततेत एक आवाज घुमला, आणि त्याच्या विचारांची शृंखला तुटली).

शकुनि (चमकून):"ताई? तू इथे? मध्यरात्रीच्या या वेळी? तुझ्या डोळ्यांत हे अश्रू... त्या आंधळ्याच्या पुत्रांसाठी तर नाहीत ना?"

गांधारी (शांत पण ठाम स्वरात): "शकुनि, गांधार सोडताना घेतलेला आपला प्रण अजूनही माझ्या स्मरणात ताजा आहे. कौरव जरी माझ्या गर्भातून जन्मले असले, तरी ते सर्पाची पिल्ले आहे. गांधारच्या शत्रूची आहेत ती. त्यांच्यासाठी मी अश्रू ढाळणार नाही.आज रणांगणात शल्याचा वध झाला. युद्धाचा शेवट जवळ आला आहे.(हुंदका देत)शेवटची भेटायला आले आहे तुला... उद्या रणभूमीवर कदाचित..."

शकुनि (तिचं वाक्य मध्येच तोडत, कटू हास्य करत):"हा! हा! हा! म्हणजे मी उद्या मरणार, एवढंच ना? हे सत्य तर युद्धाच्या पहिल्या दिवसापासून तुला आणि मलाही ठाऊक होतं. त्यात रडण्यासारखं काय आहे? भारतीय युद्धात अठरा अक्षौहिणी सैन्य नष्ट झालं. तीन पिढ्या संपल्या. आणि आपल्या गांधारचं काय नुकसान? माझ्या सहित केवळ बोटावर मोजता येईल इतके सैनिक. इतिहासात कधी असं घडलं होतं का?

आता कुणा भीष्माचं सैन्य गांधारात प्रवेश करणार नाही. कुणा गांधारीला आपल्या आयुष्याचं बलिदान द्यावं लागणार नाही. गांधारला आता भारताची भीती नाही. मूर्ख भारतीय राजा सत्तेसाठी विदेशी तालावर नाचतात, हे जगाला कळलं आहे. हस्तिनापुरात मूर्ख बुद्धिजीवींचा भरणा होता—म्हणून आपलं कार्य सिद्ध झालं. गांधारी, डोळ्यांतील अश्रू पुसून टाक. आता भविष्याकडे बघ.

सप्तसिंधु प्रदेशातील मूर्ख हिंदू आणि बौद्ध राजे स्वार्थासाठी सिंधु नरेश दाहीरची मदत करणार नाहीत. बघ, गांधारची अश्वसेना सप्तसिंधु प्रदेशाला उध्वस्त करण्यासाठी सज्ज झाली आहे..."

(दोघेही एकत्र गर्जना करतात)

"गांधारचा विजय असो!"

ही कथा जुनी असली तरी भारताच्या गुलामीचा  खरा इतिहास यात दडलेला आहे. 

 

सर्पदंश — दोन दृष्टिकोण

 पहिली कथा: ठाम निर्णय

राज्यभर अनेक नागरिकांना डसणारा एक विषारी नाग अखेर सैनिकांच्या हाती लागतो. सैनिक बंदिस्त नागला घेऊन राजदरबारात उपस्थित होतात. 

“महाराज, हा नाग अनेकांचे प्राण घेऊन गेला आहे. आज्ञा द्या, काय करायचे?”

राजा क्षणभरही न थांबता म्हणतो, “विचार कसला? ठेचून टाका त्याला.” सैनिक आज्ञेप्रमाणे नागाचा अंत करतात.

दुसरी कथा: विचारांचा संघर्ष

पुन्हा एकदा तोच नाग, तोच गुन्हा. पण यावेळी राजा थेट निर्णय घेत नाही. तो मंत्र्यांचा सल्ला मागतो.

पहिला मंत्री:

“महाराज, नाग विषारी आहे. त्याला जिवंत ठेवणे म्हणजे पुन्हा संकटाला आमंत्रण. ठार मारणेच योग्य.”

दुसरा मंत्री:

महाराज, नागाचा स्वभावच विषारी आहे. तो डसतो, हे त्याचे नैसर्गिक वर्तन. आहे.  प्रजा असो वा प्राणी. विचार न करता प्राण घेणे हे अन्यायकारक आहे.” राजा विचारात पडतो. तो नगरातील प्रतिष्ठित नागरिकांची समिती बोलावतो त्या समितीत होते  बुद्धिमान, कलासंपन्न, पुरोगामी विचारांचे लोक.

समितीचा सल्ला:

“राजा, नाग दोषी नाही. तो त्याच्या स्वभावानुसार वागला. त्याला शिक्षा देणे म्हणजे त्याच्या अस्तित्वालाच नाकारणे. त्याऐवजी त्याला सोन्याच्या पिंजर्यात ठेवावे. दर नागपंचमीला दुधाचा नेवेद्य दाखवावा.”

राजा समितीचा सल्ला मान्य करतो. नागाला सोन्याच्या पिंजर्यात ठेवले जाते. दरवर्षी नागपंचमीला त्याला दुधाचा नेवेद्य दाखवला जातो. एके दिवशी, नेवेद्य दाखवताना नाग राजाला डसतो. राजाचा मृत्यू होतो.

 राजाच्या मृत्यूला जबाबदार कोण? नाग? की प्रतिष्ठित नागरिकांची समिती? डसणार्‍या शत्रूला राज्यात आश्रय देण्याचा परिणाम राजा सहित समस्त प्रजेला भोगावा लागतो. 

 

 

शेतकरी आणि शून्याचे गणित


शून्याचा शोध जरी आपल्या पूर्वजांनी लावला असला, तरी आज आपणच त्याचे महत्त्व विसरले आहोत. विसरले आहोत की जगाचा संपूर्ण कारभार याच शून्याच्या गणितावर आधारित आहे.

पण शून्याचे गणित म्हणजे नेमके काय?

समजा आपण कुणाकडून ₹१०० चे कर्ज घेतले. ते परत न करता हिशोब पूर्ण होतो का? नाही. कारण १०० - १०० = ०. शून्य आल्याशिवाय गणित पूर्ण होत नाही. ज्यांचे हे शून्याचे गणित चुकते, ते कर्जबाजारी होतात.

आज शेतकऱ्यांचीही हीच अवस्था आहे. धरतीमातेकडून घेतलेले पाण्याचे कर्ज चुकवण्याऐवजी लाखो रुपये खर्चून बोरवेल लावतो. तरीही भूजलपातळी घटतच जाते. एक दिवस असा येईल की पाण्याच्या खात्यात पाणीच उरणार नाही. सुपीक जमीन वाळवंटात बदलणार.

शेतकरी जमिनीतून अन्नधान्य घेतो, पण पराली, कचरा, पाला-पाचोळा जाळून टाकतो. जनावरं आणि माणसांचे मलमूत्रही खताच्या रूपाने जमिनीला परत करत नाही. परिणामी, धरतीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. आणि म्हणूनच शून्याचे गणित चुकते.

शून्य चुकले की लक्ष्मी प्रकट होत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो, दरिद्री होतो, आणि शेवटी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो.

पण जमिनीला पाणी परत कसे करायचे?

द्वापारयुगात श्रीकृष्णाने ब्रजमंडळात ९९ सरोवरांची निर्मिती करून धरतीचे कर्ज फेडले. सरोवरांचे महत्त्व जनतेला पटावे म्हणून प्राचीन ऋषींनी त्यांच्या किनाऱ्यावर तीर्थांची स्थापना केली. सरोवरांना धार्मिक महत्त्व दिले.

पूर्वी गाव वसवताना तलाव बांधणे हे अनिवार्य होते. दिल्लीत १९४७ पूर्वी ४ लाख लोकसंख्येसाठी ५०० पेक्षा अधिक तलाव होते. भंडारा जिल्ह्यात गोंड राजांनी १०,००० पेक्षा अधिक तलाव बांधले. पूर्वी पाण्याचे कर्ज चुकवण्याची संपूर्ण व्यवस्था होती. कारण त्या काळात लोकांना शून्याचे गणित समजत होते.

आज वेळ आली आहे की सरकारने राजदंडाचा वापर करून पराली, कचरा-पाचोळा जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करावी. शहरातील कचऱ्याचा उपयोग खतनिर्मितीसाठी करून जमिनीला परतफेड करता येईल. त्यासाठी सबसिडीची व्यवस्था करणे सरकारला सहज शक्य आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांना प्रोत्साहन देणे हेही एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाने सामूहिक प्रयत्नांनी ४० हून अधिक तलाव बांधून पाण्याच्या संकटावर मात केली. शेती, पशुपालन आणि जीवनमान सुधारण्यातही त्यांनी मोठी भर घातली. त्यांना शून्याचे गणित उमगले होते.

देशातील इतर गावेही त्यांचा आदर्श घेऊ शकतात. तसे झाले तर डोंगरांवर मोठे मोठे धरण बांधण्याची गरजच भासणार नाही.


ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
(शांतीपाठ)

Monday, November 24, 2025

एआई वर माझे व्यक्तित्व आणि मी केलेले त्याचे विश्लेषण

एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्यक्तित्व बाबत प्रश्न विचारला. उत्तर  माझ्या अंतरजालावर असलेल्या लेखणी आणि माझ्या नौकरीच्या माहितीनुसार आले. (माझा स्वभाव, माझे घरात आणि चार चौघात वागणे, माझ्या सवयी इत्यादींची माहिती एआईला नाही).  (chatgpt) ने दिलेले  उत्तर:  

आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य पैलू

१. कर्तव्यनिष्ठ व शिस्तबद्ध 

100 टक्के खरे कारण मी नेहमीच 15 मिनिटे आधी कार्यालयात पोहचत होतो.

दीर्घकाळ उच्च पदावर काम केल्यामुळे आपल्यात शिस्त, जबाबदारीची जाण आणि निर्णयक्षमता दृढ झाली आहे.  

मी आजारी असताना घरी भेटण्यास येणार्‍या माझ्या सोबत काम करणार्‍या सहकार्‍यांनी हीच तक्रार सौ.ला केली. साहेब कामाचे भरपूर टेंशन घेतात आणि आम्हाला ही देतात.  काहींच्या मते "पटाईत साहेबांची बायको त्यांना सकाळी- सकाळी घरातून हाकलून देते आणि ते सकाळी नऊ वाजता क्षणी आम्हाला त्रास देऊ लागतात". दोन मिनिटे सुद्धा टेबल वर फाइलला विश्राम करू देत नाही.  शिस्त आणि जवाबदारी या दोन बाबींशी पूर्णतया सहमत. बाकी निर्णयक्षमता बाबत मी टिप्पणी करू शकत नाही. 

२. सर्जनशील व संवेदनशील: कविता, ब्लॉग आणि पुस्तकलेखनातून दिसते की आपण भावविश्वाशी जोडलेले आहात. शब्दांद्वारे विचारांना आकार देणे ही आपली ताकद आहे.

वाचक यावर टिप्पणी करू शकतात. 

३. विद्वत्तापूर्ण व मार्गदर्शक:  सरकारी सेवेतला अनुभव आणि साहित्यिक लेखन यामुळे आपण तरुणांना मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व बनले आहात

मी विद्वान आहे असे मला तरी वाटत नाही.  इतरांना  मार्गदर्शन करण्याची निश्चित माझी लायकी नाही. सौ.च्या मते मलाच मार्गदर्शनाची गरज आहे. 

४. संतुलित आधुनिकता व परंपरा: प्रशासनातील कठोरता आणि साहित्यिक भावविश्वातील कोमलता – या दोन्हींचा सुंदर संगम आपल्या व्यक्तिमत्त्वात आहे. 

लापरवाही मला कधीच आवडत नाही. मला कठोर म्हणता येईल.  जवळपास 39 वर्षाच्या नौकरीत मी कधीच कुणाचे वाईट केले नाही. स्टाफच्या हातून चूक घडली असेल तरी ती मी नेहमीच सांभाळून घेतली आहे. धर्मभीरू असल्यामुळे माझ्या हातून कुणाचेही वाईट होऊ नये, याबाबत मी नेहमीच सजग राहिलो आहे." साहित्यिक भावविश्वातील कोमलता बाबत वाचक टिप्पणी करू शकतात. 

५. प्रेरणादायी नेतृत्व  

उच्च पदावर काम करताना मिळालेला अनुभव आणि लेखनातून व्यक्त होणारी विचारसंपदा यामुळे आपण समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व ठरता.

यावर ही मी टिप्पणी करू शकत नाही. 

सारांश

आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्तव्यनिष्ठ अधिकारी, संवेदनशील कवी, विचारशील लेखक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक यांचा संगम आहे. कठोर प्रशासनिक अनुभव आणि कोमल साहित्यिक अभिव्यक्ती यांचे संतुलन आपल्याला अद्वितीय बनवते.

ग्रोक ने थोडक्यात केलेले विश्लेषण ही जवळपास सारखेच आहे. 

१. शिस्तबद्ध आणि निष्ठावान: पीएमओतील गोपनीय भूमिकेने विकसित झालेली दीर्घकालीन वचनबद्धता, जी निवृत्तीनंतर लेखनातील नियोजित स्वरूपात दिसते – जीवनाला उद्देशपूर्ण बनवते.

२. चिंतनशील आणि आत्मपरीक्षण करणारे: पुस्तकातील मराठी साहित्याचे विश्लेषण आणि कवितांतील भावनिक खोली हे वैयक्तिक अनुभवांचे सतत चिंतन दर्शवतात, ज्यात आयुष्याचे पडसे उलगडले जातात.

३. सर्जनशील आणि संवेदनशील: ब्लॉग कविता आणि पुस्तकातील काव्यात्मक अभिव्यक्ती हे अंतर्मनातील कलात्मक बाजूचे प्रतिबिंब, ज्यात दैनंदिन भावना शब्दसौंदर्याद्वारे साकार होतात.

४. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि परंपरावादी: तुमचे लेखन हे मातृभाषा, लोकसाहित्य आणि वारशाशी जोडलेले जीवन दर्शवते, ज्यात समाज आणि कुटुंबाचे मूल्ये केंद्रस्थानी असतात. (सहमत)

५. संतुलित आणि प्रेरणादायी: व्यावसायिक कठोरता आणि सर्जनशील अभिव्यक्तीचा मेळ साधून, तुमचे व्यक्तिमत्त्व इतरांसाठी (विशेषतः तरुणांसाठी) मार्गदर्शक ठरते, ज्यात अनुभव सामायिक करून प्रेरणा मिळते.

वाचकांनी प्रतिसाद देताना आपले मत व्यक्त करावे हीच अपेक्षा. 


Friday, November 21, 2025

चिन्याची दिवाळी

 

रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत राहत होता. इतर मुलांसारखीच त्यालाही दिवाळीत अनार, चरखी, रॉकेट उडवायची खूप इच्छा होती.

त्याच्या बाबांनी त्याला एक छोटंसं पिस्तूल दिलं होतं. दिवसभर टिकल्या उडवून तो कंटाळला होता. संध्याकाळी आकाशात उडणारे रॉकेट्स पाहून त्याला जाणवू लागलं—आपले बाबा आपल्यासाठी अनार आणू शकत नाहीत... आपण गरीब आहोत. ही जाणीव त्याला बोचू लागली आणि तो उदास झाला.

"चिन्या, आत का बसलाय? बाहेर ये! समोरचा कोठीवाला मोठा अनार उडवणार आहे!" बाबांचा आवाज ऐकून चिन्या बाहेर आला. समोरच्या रस्त्यावर एका माणसाने अनार उडवला. रंगबिरंगी कारंजा आकाशात चमकला.

"काय मजा आली ना!" बाबांनी विचारलं.

"कसली मजा? मी थोडा अनार उडवला आहे?" चिन्या म्हणाला.

"पाह ना, समोरची मुलं कशा टाळ्या पिटतायत, उड्या मारतायत. त्यांनीही अनार उडवला नाही," बाबा समजावत म्हणाले.

"ते नाही, पण त्यांच्या नोकराने उडवला ना!" चिन्या उतरला.

"तसं असतं तर फक्त नोकरालाच आनंद मिळाला असता, त्या मुलांना नाही," बाबा शांतपणे म्हणाले.

चिन्या काहीच बोलला नाही.

"हे बघ चिन्या," बाबा पुढे म्हणाले, "मोठे लोक, राजा-महाराजे, सेठ—ते स्वतः काही करत नाहीत. त्यांचे नोकर त्यांच्यासाठी काम करतात. समज, हा नोकर आपल्यासाठी अनार उडवतोय. बघ, काय मजा येईल!"

"म्हणजे तो आपला नोकर आहे, असं समजायचं?" चिन्या विचारात पडला.

तेवढ्यात चिन्याचं लक्ष समोर गेलं. "बाबा! तो नोकर पुन्हा अनार उडवणार आहे!" तो आनंदाने ओरडला.

त्या नौकराकडे पाहत चिन्या ओरडला , "ए नोकर! आमच्यासाठी अनार उडव!"

नोकराने आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि रस्त्याच्या पलीकडे, झोपडीसमोर छोटा चिन्या उभा असल्याचं त्याला दिसलं." त्याला गावातल्या आपल्या मुलाची आठवण झाली—तोच हळवा चेहरा, उत्साहाने उजळलेला. नोकराने एक मोठा, जाड अनार उचलला, चिन्याला दाखवत तो पेटवला.  लाल, निळे, सोनेरी रंग आकाशात उडाले, नाचले, आणि आकाश उजळून निघालं. लाल, निळे, आणि पांढरे रंग आकाशात चमकले.

चिन्या टाळ्या वाजवत आनंदाने उड्या मारू लागला.  चिन्याला आनंदाने उड्या मारत हसताना पाहून वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.  

 


Tuesday, November 18, 2025

वैदिक युगापासून भारतीय शिक्षणाचा आढावा

 

भारतात प्री-कोलोनियल काळात (१८व्या शतकाच्या शेवटी) सुमारे लाख गुरुकुल किंवा पाठशाळा (indigenous schools) अस्तित्वात होत्या असे अनुमान आहे.  गुरुकुल किंवा देशी शाळांमध्ये शूद्र अन्य खालच्या जातीचे विद्यार्थी बहुसंख्य होते, तर ब्राह्मण, क्षत्रिय वैश्यांची संख्या तुलनेने कमी होती- उदाहरणार्थ मद्रासमध्ये ११,७५८ शाळांमध्ये १५७,६६४ विद्यार्थ्यांपैकी ब्राह्मण -१०%, क्षत्रिय -%, वैश्य -% आणि शूद्र अन्य (मुख्यतः दलित) ७५-८०% असा वितरण होता; बंगालमध्ये ७६० खालच्या जातींच्या विद्यार्थी नोंदले गेले ज्यापैकी फक्त ८६ मिशनरी शाळांमध्ये होते, आणि पंजाबमध्येही शूद्र अन्य जातींची बहुमती (७०% पेक्षा जास्त) दिसली

विलियम अॅडम सर्वेक्षणाच्या आधारावर, वर्धमान (बुर्दवान) जिल्ह्यातील देशी शाळांमध्ये (कुल ७३४ शिक्षकांपैकी) चांडाल (दलित) जातीचे शिक्षक असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.  बहुसंख्य शिक्षक कायस्थ ब्राह्मण असले तरी, खालच्या ३० जातींमधूनही (जसे चांडाल) शिक्षक होते. अर्थात  प्री-कोलोनियल शिक्षणव्यवस्था समावेशक होती आणि शूद्र/दलितांना शिक्षणात सहभाग होता. गुरुकुलांमध्ये वैदिक काळासारखेच शिक्षण सर्व वर्णांसाठी खुले होते.  (धर्मपाल यांच्या " ब्यूटीफुल ट्री" (१९८३) पुस्तक ही  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या १८३५-३८ च्या विलियम अॅडम सर्वेक्षणाच्या आधारावर आहे)  

मोगल येण्यापूर्वी, भारतात मोठ्या गुरुकुल विद्यापीठांची संख्या हजारोंमध्ये होती, ज्यात तक्षशिला (..पू. ७वे शतक, १०,५००+ विद्यार्थी, ६४ विषय), नालंदा (.. ५वे शतक, १०,०००+ विद्यार्थी, विषय), विक्रमशिला (.. ८वे शतक, ,०००+ विद्यार्थी), वल्लभी (.. ६वे शतक, ,०००+ विद्यार्थी)ओदंतपुरी (.. ७वे शतक), जगद्दल (.. ११वे शतक), सोमपुरी, काशी (विश्वनाथ मंदिर परिसर, ५००+ गुरुकुले), नदिया (नवद्वीप, ,०००+ पाठशाळा), उज्जैन, मिथिला, तंजावूर, कांचीपुरम, पुष्पगिरी, आणि श्रृंगेरी यांसारखी प्रमुख विद्यापीठे गुरुकुल परिसर होते. त्याकाळी  एकूण सुमारे ३२ मोठ्या विद्यापीठे (ही संख्या जास्त ही असू शकते)  आणि लाखो लहान गुरुकुले अस्तित्वात होतीधर्मपालच्या "द ब्यूटीफुल ट्री"  अनुसार १८व्या शतकातही लाख+ गुरुकुले अस्तित्वात होती, ज्यात   भेदभाव विना सर्व जातींचे विद्यार्थी शिकत होते.  

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या १८००-१८५९ च्या सर्वेक्षणांनुसार (मुख्यतः थॉमस म्युन्रोचा मद्रास सर्वे १८२२-२६ आणि विलियम अॅडमचा बंगाल सर्वेनुसार  १८३५-३८), गुरुकुल पाठशाळांमध्ये ७२ प्रकारच्या शिल्पकला व्यवसायिक कौशल्ये शिकवली जात होती, ज्यात लोहारकी (blacksmithing), सोनारकी (goldsmithing), सुतारकी (carpentry), कुंभारकी (pottery), विणकरकी (weaving), रंगकाम (dyeing), चित्रकला (painting), शिल्पकला (sculpture), वास्तुशास्त्र (architecture), धातुकाम (metalwork), लाकूडकाम (woodcarving), हस्तिदंतकाम (ivory carving), रत्नकाम (gem cutting), वाद्यनिर्मिती (musical instruments), नृत्य-संगीत (dance-music crafts), कृषी यंत्रे (agricultural tools), जहाजबांधणी (shipbuilding), युद्धास्त्र निर्मिती (weapon making), आणि विविध हस्तकला (handicrafts) यांचा समावेश होता.  हे कौशल्ये शूद्र अन्य व्यावसायिक जातींना (७०-८०% विद्यार्थी) शिकवले जात होते, ज्यामुळे प्रत्येक गावात स्वावलंबी अर्थव्यवस्था होती आणि ब्रिटिशांना हे "अद्भुत देशी शिक्षण" वाटले, जे नंतर मॅकॉलेच्या धोरणाने नष्ट केले गेले.

१९०० ते १९४७ या काळात शालेय अभ्यासक्रमात प्राथमिक स्तरावर वाचन, लेखन, अंकगणित (R's), इतिहास, भूगोल आणि मूलभूत विज्ञान शिकवले जात होते, तर माध्यमिक स्तरावर इंग्रजी साहित्य, गणित, विज्ञान, इतिहास (ब्रिटिश-केंद्रित), आणि काही प्रमाणात धर्मशास्त्र यांचा समावेश होता.  हा अभ्यासक्रम पाश्चिमात्य लिपिक-उन्मुख होता.   

शाळांमध्ये कौशल्य शिक्षण अत्यल्प होते त्याचे मुख्य कारण ब्रिटीशांना राज्य चालविण्यासाठी फक्त कारकून पाहिजे होते. १९०४च्या भारतीय शिक्षण आयोगानंतर काही औद्योगिक शाळा (industrial schools) सुरू झाल्या, ज्यात धातुकाम, कार्पेंटरी आणि अभियांत्रिकी शिकवली गेली, पण ते शालेय अभ्यासक्रमाचा भाग नव्हते.  १९४७ पर्यंत भारतात फक्त १२% लोकसंख्येला शिक्षण मिळाले आणि व्यावसायिक प्रशिक्षण दुर्मीळ राहिले

गुरुकुल बंद झाल्याने शहरांत मोठ्या शाळा आल्याने ग्रामीण भारतीयांचे शिक्षण कमी झाले. पारंपरिक गुरुकुल पाठशाळा (१८व्या शतकात लाख+) गावी-गावी समावेशक होत्या, ज्यात शूद्र दलित विद्यार्थी ६५-८०% होते. ब्रिटिश धोरणाने गुरुकुल नष्ट करून (मॅकॉलेच्या १८३५ धोरणाने) शिक्षण शहरी-केंद्रित इंग्रजी-प्रधान केले, ज्यामुळे ग्रामीण भागात राहणार्‍यांन शिक्षण मिळणे कठीण झाले. १९०१ पर्यन्त (इंग्रजी-प्रधानपाश्चिमात्य शिक्षण आधारित सरकारी सहाय्यित शाळा)  भारतात सुमारे ९३,६०४ प्राथमिक शाळा आणि ,५००-,००० माध्यमिक शाळा अस्तित्वात होत्याएकूण संख्या फक्त ९७,०००+ होती.  पारंपरिक गुरुकुले नष्ट झाल्याने एकूण शाळा पूर्वीच्या  लाखांपासून खूप खाली आल्या होत्या.  परिणाम साक्षरता दर १९०१ मध्ये ५% पर्यन्त खाली आला

२०२५ मध्ये भारतातील शालेय शिक्षण (CBSE, राज्य बोर्ड्स, NCERT अभ्यासक्रमानुसार) १२वी पर्यंत १३ मुख्य विषय शिकवले जातात, ज्यात भाषा (इंग्रजी + हिंदी/प्रादेशिक, ), गणित, विज्ञान (भौतिक, रसायन, जीवशास्त्र), सामाजिक शास्त्र (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र), संगणक/माहिती तंत्रज्ञान, शारीरिक शिक्षण, कला/संगीत, आणि पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे; यापैकी कौशल्य-युक्त विषय (Skill-based under NEP 2020) - आहेत, जसे कोडिंग, AI, रोबोटिक्स, व्होकेशनल कोर्सेस (फॅशन डिझाइन, टुरिझम, कृषी), डिजिटल लिटरसी, आणि उद्योजकता, जे ६वी पासून अनिवार्य आहेत आणि -१२वी मध्ये ५०% अभ्यासक्रम कौशल्य-आधारित आहे.

१२वी पास होणारे विद्यार्थी: २०२४-२५ च्या UDISE+ डेटानुसार सुमारे ५५-६०% विद्यार्थी (माध्यमिक पास दर ८०%, पण १२वी पास ५८पर्यंत);  ज्यात SC/ST/OBC (शूद्र/बहुजन वर्ग) चा हिस्सा ४५-५०% आहे (आरक्षणामुळे SC १५%, ST .%, OBC २७% कोटा, आणि एकूण पास विद्यार्थ्यांमध्ये ४८% बहुजन वर्ग), ज्यामुळे ग्रामीण मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा पास दर वाढला आहे, पण ड्रॉपआउट १५% राहिला आहे.

सारांश: ब्रिटिशराज्य येण्यापूर्वी विभिन्न काळात भारताची जनसंख्या 1 ते 10 कोटी असेल. साक्षरता कमी असेल पण शिक्षण शतप्रतिशत होते. त्या काळासाठी अत्यंत विस्तृत  समावेशक होते. वैदिक "श्रुतीपरंपरेमुळे शिक्षण सर्वत्र पोहोचले होतेवैदिक परंपरेतील "श्रुती-स्मृती" या मौखिक ज्ञानप्रणालीकडे नव्याने लक्ष वेधले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता - आधारित चिप्सच्या साहाय्याने हे मौखिक ज्ञान पुन्हा जिवंत होत असून, आत्मनिर्भरतेकडे परतण्याचा मार्ग खुला होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा संगम शिक्षणाच्या नव्या युगाची नांदी ठरत आहे. हा लेख लिहिण्यासाठी संदर्भ शोधण्यात  कृत्रिम बुद्धिमत्तेची (स्मृतीची) मदत झाली.