Wednesday, January 14, 2026

राजकुमारी आणि दर्पण


एक राजकुमारी होती. तिचे सौंदर्य म्हणजे तिच्या अस्तित्वाचा श्वास. तिचे दात मोती सारखे नाजुक मलिन होणारे नव्हते. तिचे दात होते हिर्‍यासारखे पांढरे शुभ्र, टणक, होते. जेंव्हा ती हसायची तेंव्हा असे वाटायचे जणू निसर्गाने पांढर्‍या शुभ्र फुलांची बरसात केली आहे.   

राजकुमारीला नटण्या-मुरडण्याची विलक्षण हौस होती. तिचा वार्डरोब म्हणजे एक जागतिक संग्रहालय होता. त्यात पॅरिसच्या रॅम्पवर चालणारे कपडे, राजस्थानच्या रंगीबेरंगी लहंग्यांपासून ते महाराष्ट्राच्या नववारी साड्यांपर्यंत विविध प्रकारचे वस्त्र होते. तिच्या प्रत्येक वस्त्रात सौंदर्याची एक नवी कथा विणलेली होती. महालात एक दर्पण होता— साधा नव्हे, बोलणारा. तो तिचा विश्वासू सखा होता. दर सकाळी ती नटून-थटून त्याच्यासमोर उभी राहायची आणि विचारायची,

“सांग दर्पणा, कशी मी दिसते?”

दर्पण उत्तर द्यायचा,

“सुंदर... सुंदर... सुंदर...”

ती हसायची, सेल्फी काढायची, आणि सोशल मीडियावर टाकायची. पण एक दिवस काहीतरी वेगळं घडलं. ती नववारी साडी नेसून दर्पणासमोर उभी राहिली. तिच्या मनात एक विचार चमकून गेला—

“आज सेल्फी दर्पणातल्या माझ्या प्रतिमेसोबत घेते.”

ती दर्पणातळ्या प्रतिमेसोबत  सेल्फी घेतते आणि विचारते,

“सांग दर्पणा, मी जास्त सुंदर दिसते की माझी प्रतिमा?”

दर्पण गोंधळला. तो राजकारणी नव्हता, जे डिप्लोमॅटिक उत्तर देतात. त्याला खरे बोलण्याची सवय होती. तो म्हणाला,

“राजकुमारी, तुझी प्रतिमा तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते.”

राजकुमारीचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला. तिच्या सौंदर्याला तिच्याच प्रतिमेने आव्हान दिले होते.  तिला ते सहन होणे शक्यच नव्हते. 

दुसऱ्या दिवशी सफाईवाल्याला कचर्‍याच्या ढिगात काही काचेचे तुकडे सापडले...

 

Saturday, January 10, 2026

विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर

बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला.
 
पाहतो कायभीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा. त्याची आज्ञा घेता भावंडांनी पाणी प्यायले असावे, म्हणून यक्षाने त्यांना दंडित केले असावे.
 
युधिष्ठिराने यक्षाला पुकारले, “हे यक्षदेव, तुम्ही दयाळू आहात. या वाळवंटात पाण्याचे संरक्षण करून प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य करत आहात. माझ्या भावंडांकडून चूक झाली, कृपया त्यांना क्षमा करा.”
 
युधिष्ठिराचा पुकारा ऐकून यक्ष प्रकट झाला. युधिष्ठिराने त्याला प्रणाम केला आणि भावंडांच्या प्राणांची भीक मागितली. यक्ष म्हणाला, “युधिष्ठिर, मी कोण क्षमा करणारा? तुझी तहानेने व्याकूळ भावंडे या सरोवरावर आली. त्यांनी पाणी पिण्याची माझी परवानगी मागितली. पण हे पाणी अत्यंत दूषित आणि विषारी आहे, म्हणून मी नकार दिला. त्यांनी माझे ऐकले नाही. पाणी प्राशन केले आणि मृत्यूमुखी पडले.”
युधिष्ठिराने पुन्हा हात जोडून विनंती केली, “हे यक्षदेव, आपण सर्वज्ञ आहात. यावर काही उपाय असेल का? पूर्वी हिमालयात संजीवनी बुटी मिळायची. तीच आणून हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. पण आज हिमालयावर एकही वृक्ष नाही. संजीवनी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.”
 
क्षणभर थांबून यक्ष म्हणाला, “जीवनाचे अंतिम सत्य काय आहे?”

युधिष्ठिर म्हणाला, “मृत्यू हेच जीवनाचे शेवटचे सत्य आहे.”

यक्ष अट्टहासाने हसत म्हणाला, “युधिष्ठिर, तुला जीवनाचे सत्य माहित आहे, हे चांगलेच. तुझे बंधू जिवंत होऊ शकत नाहीत. इथे दूर-दूर पिण्यालायक पाणीही नाही. तुझ्यासमोर दोनच मार्ग आहेतया सरोवराचे विषारी पाणी पिऊन काही क्षणांत मृत्यू स्वीकार किंवा तहानेने तडफडत मृत्यूला सामोरे जा.”
 
हे सांगून यक्ष अदृश्य झाला.
 
युधिष्ठिर काही वेळ विचारात गढून गेला. “मरण निश्चित आहे, तर भावंडांसोबत मेलेले बरे,” असा विचार करून त्याने विषारी पाणी प्राशन केले. तहान शांत झाली. काही क्षणांत तोही निष्प्राण झाला.
 
पाचही पांडव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडले होते. महाभारताचा अवेळीच अंत झाला. सत्याचा विजय नव्हताप्रदूषणाचा मानवावर विजय झाला होता
 

Tuesday, January 6, 2026

तुटे वाद संवाद तो हितकारी


समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या ग्रंथातील ओव्या क्रमांक १०६ ते ११५  मुख्यतः मनाच्या शुद्धीकरण, सज्जनसंग, विवेक, दया, भक्ती आणि विशेषतः वाद-संवादाच्या हितकारक भूमिकेवर केंद्रित आहेत. या ओव्यांमध्ये समर्थ मनाला सज्जन संगाची शिफारस करतात, व्यर्थ वाचाळपणा टाळण्यास सांगतात आणि असे वाद-संवाद उपयुक्त ठरतात जे अहंकार तोडून विवेक जागृत करतात. संसारात वैभवशाली जीवन जगायचे असेल तर लोकांना सोबत जोडावे लागते. उद्योग धंधा  असो किंवा नौकरी लोकांसोबत, कर्मचार्‍यांसोबत संवाद कसा करावा  या हेतूने  समर्थांच्या ओव्यांच्या अर्थ सांगण्याचा प्रयत्न आपल्या अल्प बुद्धीने केला आहे.

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा। विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा।

दया सर्वभूती जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥

समर्थ म्हणतात,  माणसाने रोज सकाळी उठून स्नान करून संध्यावंदन करावे. हे केल्याने शरीर शुद्ध होते आणि मनाला शिस्त लागते. प्रत्येक कार्य नियमित करण्याची सवय लागल्याने  मन स्थिर होते, चंचलपणा कमी होतो आणि एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढल्याने विवेक जागृत होतो, मनाला योग्य–अयोग्य कालू लागते. सर्व प्राण्यांप्रती दया–प्रेम वाढते आणि भक्तीचा भाव मनात स्थिर होतो.   मन शुद्ध होते.   

मना कोपआरोपणा ते नसावी। मना बुद्धि हे साधुसंगी वसावी।

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी। मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥१०७॥

समर्थ म्हणतात, काही चुकीचे घडले तरी लगेच दुसऱ्यावर दोषारोप करू नये. अशाने मन अशांत होते. विनाकारण राग धरल्याने द्वेष वाढतो, म्हणून तो टाळावा. समर्थ म्हणतात, क्रोध आवरण्याचा सोपा उपाय म्हणजे सज्जनांचा संग करणे आणि दुष्ट लोकांची संगती सोडणे. असे केल्याने मन शुद्ध राहते. राग–द्वेष नष्ट झाल्यावर मन मोक्षमार्गावर सहजपणे चालू लागते

समर्थ म्हणतात, माणसाने सदा सज्जन लोकांच्या संगतीत राहावे. सज्जनांच्या संगतीमुळे क्रिया पालटतात अर्थात आपण चुकीच्या  मार्गांपासून  दूर होतो. समस्त प्राण्यांप्रती दया भावना उत्पन्न झाल्याने आपण आपसूक भक्ति मार्गावर चालू लागतो. कर्मांशिवाय बोलणे उचित नाही. माणसाने आधी कर्म करून लोकांना दाखविले पाहिजे, मगच बोलले पाहिजे. तेंव्हाच तुमच्या बोलण्याचा दुसर्‍यांवर परिणाम होतो. वाद एवजी संवाद सुरू होतो.  समर्थ पुढे म्हणतात, खरा संवाद दुसर्‍यांचे शोक दूर करणारा आणि हीतकारी असतो.

 तुटे वाद संवाद त्याते म्हणावे। विवेके अहंभाव यातें जिणावे।

अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११०॥

समर्थ म्हणतात की, सर्वांना पटेल असा सुखकारी संवाद साधण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. मी म्हणेल तीच दिशा’ हा आग्रह सोडावा लागतो. अहंकारामुळे योग्य आणि सर्वमान्य निर्णय घेता येत नाहीत, त्यामुळे विवाद वाढतो. ज्यात संपूर्ण समाजाचे हित आहे तेच सत्य मानावे. पूर्वी सरकारकडून जनतेच्या हितासाठी खर्च केलेल्या एका रुपयापैकी फक्त १५ पैसे जनतेकडे पोहोचत होते. मन की बात माध्यमातून पंतप्रधान थेट जनतेशी संवाद साधतात आणि त्यांच्या समस्या जाणून घेतात. पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री जनधन योजना राबवून जनतेची बँक खाती उघडून दिली. त्यामुळे गरीबांना विविध योजनांमधून मिळणारे १०० टक्के अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होते. हे हितकारी संवादाचे उत्तम उदाहरण आहे. समाजाच्या हितासाठी निरर्थक वाद सोडून हितकारी संवाद करणे अधिक उचित आहे

समर्थ पुढे म्हणतात, व्यर्थ वाद–विवाद मनुष्याचा जन्म वाया घालवतात आणि संशय व दंभ वाढवतात. अहंकारामुळे विद्वानांचे ही पतन होते, म्हणून मनाने अहंकाराचा त्याग करून परमेश्वरात रमावे. फुकट बोलणे आणि गर्व निरर्थक आहेत; त्याऐवजी आत्मशोध करावा. खरा संवाद तोच जो वाद तोडतो, विवेकाने अहंकार बदलतो, बोलणे आणि आचरण यांचा मेळ घालतो आणि कर्म भक्तिपंथाकडे वळवतो. अशा हितकारी संवादानेच संसारात ही माणसाला वैभव प्राप्त होते आणि मन शुद्ध होऊन मोक्षमार्ग सुलभ होतो. 

 

Friday, January 2, 2026

"विरही स्पर्श"

(काल्पनिक कथा)

त्या दिवशी शनिवार होता, कनॉट प्लेस इथल्या सरकारी कार्यालयातून  दुपारी अडीच वाजता काम पूर्ण करून बाहेर पडलो. मेट्रो स्टेशनकडे  जाताना, मला ती माझ्याच दिशेने चालत येताना दिसली. तिने ही मला पाहिले, 

"विवेक", ती धावतच माझ्या जवळ आली. जणू तिला मला मिठी मारायची होती. पण जवळ येताच ती थबकली. आज ही ती तशीच दिसत होती. सड-पातळ, पंजाबी उजळ रंग, फक्त केस थोडे पांढरे झालेले होते. तिच्या चेहर्‍यावर आनंद आणि भीतीचे मिश्र भाव  दिसत होते. 

मी "तुझ्यात काहीच बदल नाही. अगदी तशीच दिसते आहे जशी 35 वर्षांपूर्वी दिसत होती". ती हसत म्हणाली तू ही अगदी तसाच आहे, फक्त केस पांढरे झाले आहे. 

मी हसत म्हणालो "वय झाले आहे आता आपले. कॉफी हाऊस चलते का? आपल्याला गप्पा ही मारता येतील".  न कळत मी तिचा हात आपल्या हातात घेतला आणि आम्ही कॉफी हाऊसच्या दिशेने चालू लागलो. 

1981 बहुतेक ऑगस्ट महिना असेल. मला राजेंद्र प्लेस इथल्या एका व्यापारीक संघटनेत तात्पुरती नौकरी मिळाली होती. तीही याच परिसरात एका दुसर्‍या कंपनीत काम करत होती. माझ्याच वयाची होती. तिळक नगर येथे राहत होती. चार्टर बस मध्ये तिची ओळख झाली. ती बी.कॉमच्या  फायनल मध्ये होती. तिला अकाऊंट मध्ये समस्या होती. माझे अकाऊंट उत्तम होते. रविवारी आणि वेळ मिळाल्यास अकाऊंटच्या अभ्यासासाठी आमच्या घरी येऊ लागली. असेच एक दिवस अभ्यास झाल्यावर, मी तिला सोडायला जेल रोड जात असताना, आमच्या भागातील काही टवाळखोर मुले माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत गेले. मला चुकचुकल्या सारखे वाटले. मला जाणवले, माझ्या हात तिच्या खांद्यावर ठेवलेला आहे. मी हळूच हात हटविला आणि तिला म्हणालो, "चुकून हात खांद्यावर ठेवला, सॉरी". तिने माझा हात पुन्हा तिच्या खांद्यावर ठेवला आणि माझ्याकडे पहात हसत म्हणाली, मूर्ख आहे तू, तुला काहीच कळत नाही. ती माझ्या प्रेमात पडली होती. त्याकाळी शनिवारी आफिसांमध्ये दुपारी एक वाजता सुट्टी होत होती. सुट्टी झाल्यावर तिच्या सोबत राजेंद्र प्लेसच्या रचना सिनेमा हॉल मध्ये दोन-तीन सिनेमे बघितले असतील. बॉलीवूड हीरो-हिरोईन आम्ही  सारखे बुद्ध गार्डन मध्ये ही फिरलो. 

पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. काही दिवसांपासून ती भेटली नव्हती. एक दिवस तिची ऑफिस मधली मैत्रीण लंच टाइमला तिचा निरोप घेऊन आली. ती म्हणाली, विवेक तिला भेटण्याचा प्रयत्न करू नको, आमच्या ऑफिस मध्ये ही येऊ नको. मी विचारले, काय झाले. ती म्हणाली, काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी, तिच्या मोठ्या भावाच्या मित्रासोबत तिला लग्ना बाबत विचारले. तिने नकार देत म्हंटले, त्याच्या दारुड्या मित्राशी मी लग्न करेल असा विचार तुमच्या मनात आला तरी कसा. तिचा भाऊ भडकला, वडिलांना म्हणाला, "मी म्हणत होतो तिला नौकरी करू देऊ नका. बाहेर  "नैनमटका" करत असेल". भावाचे म्हणणे ऐकून, तिला ही राग आला, हो करते, काय करणार तू. तो तुझ्या सारखा दारुडा नाही. निर्व्यसनी आहे आणि चांगल्या ब्राह्मण परिवाराचा आहे. त्या काळात दिल्लीत खालिस्तानी वारे वाहत होते. तिच्या बापाचा पारा चढला. कमरेवरचा बेल्ट काढून तिला मारणे सुरू केले. तिच्या बापाला तिच्या कडून तुझे नाव वदवून घ्यायचे होते. पण ती मार खात राहिली पण तिने तोंडातून तुझे नाव घेतले नाही. शेवटी तिच्या आईने कसे-बसे तिला वाचविले. तिच्या भावाने तर तुला मारण्याचा प्रण केला आहे. मी विचारले, तुला हे सर्व कुणी संगितले. त्या दुर्दैवी घटनेच्या दोन किंवा तीन दिवसांनी तिचा भाऊ ऑफिसला आला आणि म्हणाला तिचा अपघात झाला आहे. तिला भरपूर मार लागला आहे. बहुतेक ती आता ऑफिसला येऊ शकणार नाही. नंतर माझ्या जवळ येऊन म्हणाला, "तिचा एक बॉयफ्रेंड आहे, तिला त्याला भेटायचे आहे. मला तिचा निरोप त्याला द्यायचा आहे". त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून माझी सहावी इंद्रिय जागी झाली. मी त्याला म्हणाले, माझी तिची मैत्री फक्त ऑफिसची आहे. बाहेर ती काय करते मला माहीत नाही. तो पुटपुटला, नका सांगू कुठे जाईल तो. आमच्या मॅनेजरला ही तिच्या सोबत काही वाईट घडले आहे, याची शंका आली. दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळी मॅनेजरसोबत मी तिच्या घरी गेले. घरी फक्त तिची आई होती. तिची आई आमच्यासाठी चहा ठेवला स्वैपाक घरात गेली. तेंव्हा ती हळूच मला म्हणाली, "विवेकला सांग सध्या काही महीने मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. माझा भाऊ कॅनडा जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तो गेला की मी  स्वत:हून विवेकला  भेटेल". 

नोव्हेंबर महिन्यात मला सरकारी नौकरी लागली. घरची आर्थिक परिस्थिति थोडी बदलली. जानेवरी 83 मध्ये आम्ही हरिनगर येथील एलआयजी फ्लॅट मध्ये शिफ्ट झालो. एक दिवस मी तिच्या ऑफिस मध्ये गेलो. तिची मैत्रीण म्हणाली "ती काही पुन्हा ऑफिसला आली नाही. काही दिवसांपूर्वी मी, तिच्या घरी गेली होती. तिचे घर बंद होते. मला एवढेच कळले तिच्या वडिलांनी मुलाला कॅनडा पाठविण्यासाठी घर विकले आणि उरलेल्या पैश्यांनी एक फ्लॅट विकत घेतला आहे". 

मी निस्तब्ध झालो. एवढ्या मोठ्या दिल्लीत मी  तिला शोधणार कुठे? माझी प्रेमाची कथा इथेच अर्धवट संपली होती. 

कॉफी पिताना तिने मला विचारले, विवेक तुझा संसार कसा काय सुरू आहे. मी म्हणालो, तुझा काही पत्ताच लागला नाही. पंचविसी उलटताच आईने पसंद केलेल्या मुलीशी लग्न केले. दोन अपत्य आहे.  तुझे काय. ती म्हणाली. सहा महिन्यांनी भाऊ कॅनडाला गेला. त्याच आठवड्यात आई-बाबांचा अपघात झाला. त्यांच्या स्कूटरला एका ट्रक ने धडक दिली होती. वडील नहमीसाठी अंथरूण पकडून बसले. आई ही वर्षभर अंथरुणावर होती. माझा पूर्ण दिवस त्यांच्या सेवेत निघून जायचा. स्वत:चा विचार करण्याचा वेळ ही नव्हता. वडिलांची दुकान विकली. लाख रुपये फिक्स मध्ये टाकले. त्या व्याजवर आणि भाऊ पैसे पाठवायचा त्यातच कसाबसा गुजारा होऊ लागला. वर्षभरानंतर आई वाकरच्या मदतीने चालू लागली होती. एक दिवस वेळ काढून तुझ्या घरी गेली. पण तुम्ही तिथून शिफ्ट झाला होता. माझी ऑफिसची मैत्रीण ही नौकरी सोडून गेली होती. तुझा पत्ता कुणापाशी नव्हता. तू कुठे आहे, कळण्याचा मार्ग नव्हता. भावाने कॅनडात लग्न केले आणि पैसे पाठविणे बंद केले. आई-वडिलांच्या उपचारात  बॅंकेतली  जमा बचत ही कमी होऊ लागली होती. मी घरी ट्यूशन घेणे सुरू केले आणि सरकारी नौकरीसाठी जोमाने तैयारी सुरू केली. 1986 अखेर मला सरकारी नौकरी मिळाली. पुन्हा तुझी आठवण आली. एक दिवस तुझी माहिती मिळाली. तुझे लग्न झाले आहे, कळले. मी हताश आणि निराश झाली. बहुतेक माझ्या भाग्यात आई वडिलांची सेवा होती, म्हणून नियतीने आपल्या दोघांना दूर केले असावे. "आता कसे आहेत दोघे", मी विचारले. ती म्हणाली, वडील पुढे चार-पाच वर्षानी गेले. माझे आजोबा पाकिस्तानातून एकटेच जीवंत आले होते. बाबा ही एकुलते एक होते. एक भाऊ होता, तो ही अंतिम संस्कारासाठी आला नाही. मीच वडिलांचा अंतिम संस्कार केला. आई ने मला अनेकदा लग्नाबाबत विचारले. पण अपंग आईला सोडून मी कुठे जाणार. अखेर गेल्या वर्षी ती ही वर गेली.   

काही क्षण थांबून मी तिला विचारले, तुझा पत्ता आणि फोन नंबर देते का? काही गरज पडली तर... 

तिने माझा उजवा हात तिच्या हातात घेतला. तिच्या स्पर्शातील दाहकता मला जाणवली. ती म्हणाली, विवेक, मी आयुष्यात एकाच पुरुषाला स्पर्श केला आहे. त्याला मिठी मारली आहे. जेंव्हा रात्री मी बैचेन होते, जीव कासावीस होतो, तुझा स्पर्श आठवून मनाला सात्वना देते. मला जगण्यासाठी तो प्रेमाचा एक स्पर्श पुरेसा आहे. माझा पत्ता मी देणार नाही. फोन नंबर ही मागू नको. मी दिसली तर दुसर्‍या वाटेने निघून जा. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या भावनांचा बंध फुटला तर त्या ज्वालेत आपण दोघे भस्म होऊन जाऊ. माझ्या सोबत तुझा संसार ही उध्वस्त होईल. बोलताना तिचा वाढता श्वासोश्वास आणि आवाजातील कंप मला जाणवत होता. बोलता-बोलता ती उठली, तिने पर्स हातात घेतली आणि झपाझप पाऊले टाकत विरुद्ध दिशेने बाहेर निघून गेली. एकदाही तिने मागे वळून पहिले नाही. मी अवाक होऊन तिला जाताना पहात राहिलो. स्तब्ध आणि जडवत. माझ्या डोळ्यात अश्रु उभे राहिले. तिच्या स्पर्शचा दाह अजूनही जाणवत होता.  ती आतल्या आत जळत होती. तरीही तिने स्वतला सावरले आणि माझा स्पर्श घेऊन पुन्हा माझ्या आयुष्यातून निघून गेली. त्यानंतर मला कित्येक रात्र झोप आली नाही. मनात अनेक प्रश्न उठत होते. मी तिला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? लग्न करायची घाई का केली? तिच्या शब्दांवर विश्वास ठेऊन तिची वाट पाहू शकत नव्हतो का? पण गेलेल्या काळातील प्रश्नांचे उत्तरे कधीच मिळत नाही. शेवटी आपण नियतीचे गुलामच. 

तिला माझी माहिती मिळाली होती तरी एवढे वर्ष तिने माझ्याशी बोलण्याचा किंवा मला भेटण्याचा विचार ही केला नाही. तिला माझ्या सुखी संसाराला तिची नजर लागू द्यायची नव्हती. ती ही गॅजेटड ऑफिसर झालेली होती. तिचा पत्ता आणि फोन नंबर मिळविणे काही कठीण नव्हते. पण तिच्या शब्दांच्या बाहेर जाण्याचा विचार मी केला नाही. आता माझा स्पर्श हृदयात जपून ती उरलेले आयुष्य जगणार होती. तिने माझ्यावर खरे प्रेम केले होते. पण मी.... या प्रश्नाचे उत्तर अनेकदा शोधून ही मला मिळाले नाही



Sunday, December 28, 2025

आषाढचा मेघ: यक्षप्रियेचा दारुण अंत

अलकानगरी—कुबेराची वैभवशाली राजधानी. सुवर्णमय रस्ते, रत्नजडित इमारती आणि यक्ष-किन्नरांच्या गगनचुंबी महालांनी नटलेली नगरी. इथे सौंदर्य हेच मूल्य आणि वैभव हेच धर्म. पण या झगमगाटाच्या आड एक गूढ, विषारी सत्य लपलेलं होतं.

आषाढाचा मेघ—वरुणराजाच्या आज्ञेने—अलकानगरीकडे निघाला होता. त्याच्या उदरात अमृतासारखं पाणी होतं, पण वातावरणात मिसळलेल्या धुरामुळे ते आता विषासमान झालं होतं. यक्षप्रिया, अलकानगरीतील एका महालात राहात होती, आपल्या प्रियकराच्या संदेशासाठी गच्चीवर आली. तिच्या मनात आशा होती की मेघ तिच्यासाठीच विजा चमकवत आहे.

आकाशात विजेचा कडकडाट ऐकून यक्षप्रियेचा आनंद गगनात मावेना. ती धावतपळत इमारतीच्या गच्चीवर पोहोचली. तिला आकाशात भला मोठा काळाकुट्ट मेघ दिसला. आकाशात चमकणाऱ्या विजेला पाहून तिला वाटलं, बहुतेक मला शोधण्यासाठीच या विजा चमकत आहेत. तिला प्रियकराचे बोलणे आठवले—"प्रिये, तू अंधारातही विद्युतलतेसारखी सुंदर दिसतेस. साक्षात रंभाच जणू. दिव्याची काय गरज?" प्रियकराची आठवण येताच स्त्रीसुलभ लज्जा तिच्या गालावर पसरली. ती अधिकच सुंदर दिसू लागली. काही क्षणात जोरात पाऊस सुरू झाला. ती आज पहिल्यांदाच आषाढच्या पावसात मनसोक्त भिजली. पण हे काय! अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. आपला चेहरा जळतो आहे, असं तिला वाटलं. ती कसेबसे आपल्या कक्षात आली. दर्पणात बघितलं. तेजाबी पाण्याने तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जागोजागी घाव झाले होते. दर्पणात स्वतःचा चेहरा पाहून ती किंचाळली. अनेक चित्रविचित्र विचारांचे वादळ तिच्या मनात उठले. आपला कुरूप चेहरा पाहून प्रियकर पूर्ववत प्रेम करेल का? त्याने तिचा त्याग केला तर? यक्षांच्या राज्यात सुंदर शरीरच स्त्रीचं आभूषण होतं. अखेर तिने कठोर निर्णय घेतला.

पाऊस थांबला. वातावरण स्वच्छ झालं. पण खालील जमिनीवरचं दृश्य पाहून आषाढच्या मेघाने धसकाच घेतला. वृक्ष-लता तेजाबी पाण्याने जळून काळ्या पडलेल्या होत्या. अनेक पक्षी मृत झालेले दिसले. "अरेSरे! माझ्या उदरातलं अमृतसमान पाणी वातावरणात पसरलेल्या तेजाबी हवेत मिसळून विषासमान झालं!" अचानक त्याला यक्षप्रियेची आठवण आली—तीही प्रियकराच्या संदेशासाठी गच्चीवर आली असेल. मेघाने खाली चहूकडे पाहिलं. एका इमारतीकडे मेघाचं लक्ष गेलं—बहुतेक यक्षाने वर्णन केलेली हीच ती इमारत. पण इमारतीखाली एवढी भीड का? एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे विद्रूप झालेला होता. लोक कुजबुज करत होते—"हिचा नवरा परदेशी गेलेला आणि हिला पावसात भिजायला हौस. माहित नव्हतं का हिला, राज्याच्या अधिकाऱ्यांनी आधीच पावसापासून सावधान राहण्याचा अलर्ट दिला होता. एवढ्या टीव्ही, रेडिओवर घोषणा होतात. ऐकल्या नव्हत्या का हिने?" एक म्हणाला, "सौंदर्य नष्ट झाल्यावर जगणार तरी कशी?" दुसरा म्हणाला, "आपण सर्वच या विषारी वातावरणात हळूहळू रोज मरतो आहोत. कुणालाच चिंता नाही. राजाच जबाबदार आहे हिच्या मृत्यूला." जमलेले लोक सरकारविरोधात घोषणा देऊ लागले.

आषाढचा मेघ वरून सर्व काही पाहत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला दुःख झालं. "या सर्वाला आपणच जबाबदार आहोत," असं त्याला वाटलं. आता परतताना रामगिरीवर यक्षप्रियेच्या संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार? काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला—उदरातील पाणी घेऊन परत फिरावं आणि समुद्रात रिकामं करावं. पण त्याला वरुणराजाचा आदेश आठवला—जमिनीवर काय घडत आहे याची चिंता न करता दिलेलं पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळून पुढच्या प्रवासाला निघाला.

 

Thursday, December 25, 2025

काय चुकलं?

 

रात्री पोलिसांनी तिथे छापा मारला. प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या, उच्चशिक्षित कुटुंबातील १५-१८ वयोगटातील मुलांना नशेच्या अवस्थेत पकडलं. दम देऊन सोडलं. त्यात सोनलही होती.

आईचा आवाज घरभर घुमला,

"अशीच वागत राहिलीस, तर समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही!"

सोनल फणकारली,

"बSSस! तुझे प्रवचन ऐकून कान पिकले माझे! काय केलं मी? थोडी विस्की घेतली, मित्रांबरोबर मजा केली, एवढंच ना!

घरात कॉकटेल पार्टी असते, आणि तुझे डान्स मॅनर्स? त्या दिवशी उघड्या पाठीचं स्लिव्हलेस घालून, बासच्या गळ्यात-गळे घालून नाचत होतीस... आणि त्याचा हात—"

खटाक! सोनल किंचाळली.

वडील, मतिभ्रष्टासारखे, माय-लेकींच्या ओक्साबोक्सी रडण्याकडे पाहत, मनात विचार करत होते—

"आपलं काय चुकलं?"

सोनलच्या आईवडिलांनी जे आदर्श शिकवले, ते स्वतःच्या वागणुकीत जगू शकले नाहीत. त्यांच्या वैयक्तिक वर्तनात आणि सामाजिक नैतिकतेत विसंगती होती, ज्यामुळे मुलगी गोंधळली. जेव्हा आदर्श फक्त शब्दांत राहतात, तेव्हा त्यांचं मार्गदर्शन संपतं.

Monday, December 22, 2025

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका  प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर  चित्रगुप्त विराजमान होते . ते  धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. 

चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?”

तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.”

चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला. त्याच्या पानांवर त्या आत्म्याचे संपूर्ण जीवन, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार नोंदलेले होते. तो ग्रंथ पहात चित्रगुप्त म्हणले “पण माझ्या रेकॉर्डमध्ये तुझ्या क्षमायाचनेचा उल्लेख नाही.” 

तो आत्मा चकित झाला. “असं कसं होईल? मी मंदिरात गेलो होतो. फोटो घेतले, सेल्फी काढले, रिल बनवली. साक्ष आहे!”

चित्रगुप्त थोडं हसले. “हो, साक्ष आहे. मंदिराच्या सिंहद्वारासमोर तू सेल्फी घेतलीस. परिसरातील मूर्तींसोबत  घेतलेले फोटो आहेत. धार्मिक विधींचे व्हिडिओ ही आहेत. देवतेच्या दर्शन घेताना  क्षमा मागण्याची  रिलही आहे. पण...”

चित्रगुप्त थोडं थांबले. “तुझं लक्ष फक्त कॅमेऱ्यात होतं. क्षमा मागताना  तुझ्या डोळ्यांत भक्ती नव्हती, फक्त फ्रेम होती. तुझ्या मनात पश्चात्ताप नव्हता, फक्त पोस्ट टाकण्याची  घाई होती. त्यामुळे तुझं पाप नष्ट झालं नाही.”

तो आत्मा गप्प झाला.  

चित्रगुप्त म्हणाले, “मी तुला नरकात पाठवणार नाही.  तुला पृथ्वीवर परत पाठवतो, दिल्लीच्या चिडियाघरात, माकड रूपात.”

“माकड?” तो आत्मा चकित झाला.

“हो. तिथे तू माकड चेष्टा करशील. लोक तुझ्या सोबत  सेल्फी घेतील, फोटो काढतील, रिल बनवतील. जसं तू देवतेसमोर केलं होतंस. पण आता तू त्यांच्या फ्रेममध्ये असशील. लोक तुझ्या रूपात हास्य, करुणा आणि विसंगती पाहतील. तुला तुझा पूर्वीचा जन्म आठवेल ‘आपणही कधी असं केलं होतं आणि त्याच्या परिणाम भोगतो आहे. तेंव्हा तू खर्‍या अंतकरणाने केलेल्या पापांची क्षमा मागितली तर पुढच्या जन्मी तुला स्वर्ग मिळेल.   

तो आत्मा आता शांत होता. त्याला समजलं होतं, फोटो पुरावा नाही,  भगवंताच्या चरणी सच्या मनाने केलेली प्रार्थनाच चित्रगुप्ताच्या दरबारात पुरावा असते.