Saturday, March 15, 2025

दोष व्हीआय पी सुरक्षा यंत्रणेचा: स्वर्गीय इंदिरा गांधी आणि छत्रपति संभाजी राजे

देशात छावा चित्रपट गाजला. माझ्या एका मित्राने फोन वर मला विचारले, विवेक तू तर देशातील सर्वोच्च सुरक्षा अधिकार्‍यांच्या अखत्यारीत आणि एसपीजीत काम केले आहे. या विषयावर तुझे विचार काय आहे. मराठी  इतिहासबाबत थोडे बहुत ही लिहले आणि ते जनतेला पटले नाही तर जन भावनांचा भडका उडू शकतो. बिना कुणाच्या भावना दुखविता यावर भाष्य करणे म्हणजे तारेवरची कसरत. तरी ही सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीकोणातून हा लेख लिहण्याचा प्रयत्न केला आहे. 

महाभारताच्या युद्धाच्या सुरवात होण्यापूर्वी दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देश्यून म्हणतो, पितामह भीष्मच्या नेतृत्वात आपले सैन्य अजेय आहे. सर्वांनी पितामह भीष्माची रक्षा करावी. कारण दुर्योधनाला माहीत होते, जो पर्यन्त कुरुक्षेत्रच्या युद्ध भूमीवर पितामह भीष्म आहेत, तो पर्यन्त पांडवांचा विजय होणे शक्य नाही. राजा जिवंत असेल तरच युद्ध जिंकणे किंवा शत्रूपासून राज्याची सुरक्षा करणे संभव असते.  बिना राजा राज्य सुरक्षित राहू शकत नाही. 

आज एसपीजी भारताच्या प्रधानमंत्रीची सुरक्षा करते. एसपीजीत प्रतिनियुक्ती वर सुरक्षा दलांतून अंगरक्षक भरती केले जातात. अंगरक्षक निश्चित अवधिसाठी नियुक्त केले जातात. एसपीजीचे वरिष्ठ अधिकारी प्रधानमंत्रीचे अंगरक्षकांची ड्यूटी कोण करणार हे नियमिपणे ठरवत राहतात. आज परिस्थिति पाहून एसपीजी प्रधानमंत्रीचे कार्यक्रम ही बदलू शकते. प्रधानमंत्रीला त्यांच्या सुरक्षेची चिंता करण्याची गरज नसते. ते त्यात हस्तक्षेप ही करत नाही. या शिवाय एसपीजी असो किंवा प्रधानमंत्री कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची कसून चौकशी होते. त्यांच्या परिवाराची ही चौकशी केली जाते. त्यानंतरच त्यांची नियुक्ती होते. थोडी ही शंका असेल तर त्यांची नियुक्ती केली जात नाही किंवा केली असेल तर त्यांना परत त्यांच्या मूळ विभागात पाठवून दिले जाते. 

एसपीजीच्या स्थापने पूर्वीही सुरक्षा दलांचे कर्मचारी प्रधानमंत्रीची सुरक्षा करायचे. सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी अंगरक्षकांची नियुक्ती करायचे. शंका असेल तर अंगरक्षकांना बदलण्याचा अधिकार ही त्यांना होता. पण त्याकाळी प्रधानमंत्रीच्या इच्छेनुसार अंगरक्षक कितीही वर्ष तिथे काम करू शकत होते. ही सुरक्षा यंत्रणेची सर्वात मोठी चूक होती. 

जे अधिकारी प्रधानमंत्रीच्या सुरक्षेसाठी जवाबदार असतात. त्यांच्यात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्रीच्या इच्छेच्या विरोधात जाऊन निर्णय घेण्याची क्षमता ही असली पाहिजे. मी एसपीजीत होतो तेंव्हा  प्रधानमंत्री नेहरूजींच्या बाबतीत एक गोष्ट ऐकली होती. त्यात किती सत्य होते, हे अजूनही मला माहीत नाही. एकदा भाषण संपल्यावर  जनता  त्यांच्या भोवती गोळा झाली. कुणाला त्यांचे चरण स्पर्श करायचे होते, कुणाला हात मिळवायचे होते. कुणाला त्यांच्याशी बोलायचे होते. पण असे करताना पंडितजींना लोकांचे धक्के लागत होते. त्यांच्या सुरक्षेत असलेल्या अधिकार्‍याला वाटले, लोकांचे प्रेम जरा अति होत आहे. तो पंडित नेहरू जवळ गेला. त्यांचे हात पकडून त्यांना थोड्या दूर उभ्या असलेल्या कार जवळ ओढत घेऊन जाऊ लागला. पंडित नेहरूंनी विरोध केला, पण अधिकार्‍याने त्याकडे लक्ष दिले नाही. दुसर्‍या दिवशी पंडितजींनी त्याला आपल्या कार्यालयात बोलविले. अधिकार्‍याला वाटले, आता प्रधानमंत्री त्याला फायर करतील. पण नेहरूजींनी त्याच्या कर्तव्य परायणता आणि समय सूचकतेचे कौतुक केले. मला वाटते या गोष्टीचा एकच उद्देश्य होता, राष्ट्र प्रमुखाची सुरक्षा, ही राष्ट्र प्रमुखाच्या इच्छेपेक्षा जास्त महत्वपूर्ण असते, हे राष्ट्र प्रमुखाच्या सुरक्षेत असलेल्या सर्वांनी सदैव लक्षात ठेवले पाहिजे.  

प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या अंगरक्षक दलात दोन सिख ही होते. अनेक वर्षांपासून त्यांची ड्यूटी प्रधानमंत्रीच्या निवासस्थानी होती. त्यांचे प्रधानमंत्री इंदिरा गांधी सोबत पारिवारिक स्नेह संबंध ही स्थापित झाले होते. आपरेशन ब्लू स्टार नंतर सिखांच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या होत्या.  प्रधानमंत्रीच्या सुरक्षा व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकार्‍यांना त्या दोन्ही सिख अंगरक्षकांना प्रधानमंत्रीच्या सेवेतून मुक्त केले पाहिजे असे वाटत होते. त्यांनी आपली शंका प्रधानमंत्रीला बोलावून दाखविली आणि त्यांची बदली करण्याची अनुमति मागितली. साहजिक होते, प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी ती दिली नाही. नियमांनुसार अधिकारी त्या सिख अंगरक्षकांची बदली करू शकत होते. प्रधानमंत्रीची अनुमति घेण्याची गरज नव्हती. इथे ही  स्वामीची इच्छा स्वामी निष्ठेवर भारी पडली. अधिकार्‍यानी स्वामी हिताचा निर्णय घेतला नाही.  त्यांच्या चुकीचा परिणाम प्रधानमंत्री सहित हजारो लोकांना जीव गमवावा लागला.  

छत्रपति संभाजी राजांच्या काळी राजाला अधिकान्श निर्णय स्वत: घ्यावे लागायचे. जनतेत जाऊन न्याय निवडा ही करावा लागत असे. त्यासाठी राज्यभर फिरावे लागत असे. छत्रपति संभाजी राजांना शत्रू आपल्यावर चालून येत आहे. ही माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या सोबत अंगरक्षक, मित्र आणि सरदार ही होते. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या अधिकार्यांनी  सारासार विचार केला असता  तर त्यांना समजले असते.  मुगल फौजेला राजा कुठे आहे ही माहिती मिळाली आहे. याचा अर्थ फितुरी झाली आहे.  राजा सोबत किती सैनिक आहे, हे ही मुगल फौजेला माहीत झाले असेल. मुगलांनी राजांच्या मागावर  निवडक आणि प्रशिक्षित सैन्य पाठविले असेल.  ते वेगाने इथे पोहचण्याचा प्रयत्न करतील. जे फितूर झाले आहेत, ते मुगल फौजेचा मार्गदर्शन ही करू शकतात. अश्या बिकट परिस्थितीत बिना अधिक विचार करता छत्रपति संभाजी राजांना त्वरित तेथून हलविले पाहिजे होते. पण काय झाले. राजांचे सर्व सोबती स्वामी भक्त होते, स्वामी आज्ञेचे पालन करताना मरण पत्करू शकत होते. पण ते परिस्थितीचा सारासार विचार करून स्वामींच्या  हिताचा निर्णय घेण्यास ते असमर्थ ठरले. 

या घटनांपासून एकच धडा मिळतो. शत्रूला तुमच्या राजाला नष्ट करायचे असते. त्यासाठी समोरा-समोर युद्धा एवजी तो साम, दाम, दंड, भेद हे सर्व हत्यार ही वापरू शकतो. तो फितुरांची मदत ही घेऊ शकतो. राजाच्या सुरक्षेत असलेल्या सर्व अधिकार्‍यांना, सरदारांना हे माहीत असले पाहिजे. त्यांच्यात राजाच्या सुरक्षेसाठी, राजाच्या इच्छे विरुद्ध ही जाण्याचे धाडस असले पाहिजे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी असो किंवा छत्रपति सभाजी राजे दोघांचे प्राण वाचले असते जर त्यांच्या सुरक्षेत असलेल्या जवाबदार अधिकार्यांनी स्वामीची सुरक्षा प्रथम ह्या सिद्धांतंनुसार निर्णय घेतला असता.

व्हीआयपी सुरक्षा ही सामूहिक जिम्मेवारी असल्याने कुणा एकाला दोष देण्यात अर्थ नाही. आपण फक्त इतिहासातून धडा घेऊ शकतो. प्रत्येक राजकर्त्यांने समर्थांचे बोल  "अखंड सावधान असावे... नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. 


Wednesday, March 5, 2025

राजकुमार, बुटका आणि राक्षस : युक्रेन आणि अमेरिका


एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली.  

आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.   

रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेनने रशियाची मैत्रीपूर्ण संबंध ठेवले असती तरी समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला आणि रशियाच्या मित्र देशांविरोधात अर्थात भारत विरोधी भूमिका ही घेत राहिला. युक्रेनमध्ये रशियन लोकांवर आत्याचार सुरू झाले. नंतर मीडिया आणि पैश्यांच्या मदतीने एका मूर्ख व्यक्तीला युक्रेनच्या सिंहासनावर बसविले. परिणाम रशियाला संपूर्ण रशियन भाषिक प्रदेश युक्रेनपासून तोडण्यासाठी युद्ध करण्यास भाग पाडले. अमेरिकाने 300 बिलियनहून जास्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला दिले. (अर्थात तो पैसा अमेरिकन शस्त्र उत्पादकांना मिळाला). तसेच युरोप ने ही केले. शस्त्र माफिया खुश झाला.  रशियावर अनेक प्रतिबंध लावले. तीन वर्ष झाले युद्धाचा काही परिणाम निघलेला नाही. युक्रेनचे काही लक्ष सैनिक युद्धात शहीद झाले. अमेरिकेला अपेक्षित होते तेवढे रशियाचे नुकसान झाले नाही. रशिया ही आपल्या रशियन मूळच्या जनतेला वार्‍यावर सोडून परत जाणार नाही. जो पर्यन्त आर्थिक क्षमता आहे, नुकसान सोसेल. चीनला या युद्धाचा जास्त फायदा झाला. आफ्रिका आणि दक्षिणी अमेरिकेत त्याचे आर्थिक हस्तक्षेप वाढले. युक्रेन युद्धात जास्त पैसा ओतणे हे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे नाही. हे अमेरिकेला कळून चुकले आहे. आता अमेरिकेला  युक्रेन मध्ये खर्च केलेल्या 300 बिलियन डालरच्या मोबदल्यात त्याला युक्रेनची खनिज संपत्ति पाहिजे. युरोप ही त्याच उद्देश्याने युक्रेनला शस्त्र पुरवठा करता आहे. झेलेंस्की आता युरोपला या युद्धात भाग पाडण्याचा विचार करतो आहे. युरोप प्रत्यक्ष युद्धात उतरणार नाही.  युरोप फक्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला पुरवीत राहणार. तबाही मात्र युक्रेनची होणार. 





Wednesday, February 26, 2025

घरच्या देव्हार्‍यातील देव आणि भगवान बुद्धाची शिकवण.

 
सनातन धर्मात घरात ही देवांची पूजा करण्याची परंपरा आहे. घरच्या देव्हार्‍यात पाच देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही संख्या  व्यक्तीच्या श्रद्धेनुसार कमी जास्त राहू शकते. (काही लोक फक्त एकाच देवाची पूजा करतात). हे पाच देव आहेत गणपती, शंकर, सूर्य, देवी आणि विष्णू. आज अधिकान्श घरातील देव्हार्‍यात सूर्य देवाला स्थान नसते. त्या एवजी भगवान दत्तात्रयाची मूर्ती किंवा कुळ देवता/कुळ देवीच्या मूर्ती असते.  भगवान विष्णु एवजी बाळकृष्ण असतो. भगवान शंकरच्या मूर्ती एवजी चांदीची छोटी पिंडी असते. घरातील पूजा आपण अर्ध्या तासाच्या आत करतो त्यामुळे सर्व देवतांना घरच्या देव्हार्‍यात स्थान देणे कठीणच आहे. बाकी देवतांच्या दर्शनाला आपण मंदिरात जातो, देव दर्शनासाठी यात्रा करतो, वारीत जातो. भगवान बुद्ध ही विष्णूचे अवतार असल्याने घरच्या देव्हार्‍यात त्यांना अप्रत्यक्ष स्थान मिळाले आहे. सर्वच मंदिरांत दशावतारात भगवान बुद्धाला स्थान आहे. उदा. महाराष्ट्रातील कोपेश्वरचे (शंकराचे) यादव काळातील मंदिरांत खांबांवर विष्णूचे दशावतार चित्रित आहे. त्यात भगवान बुद्ध ही आहेत. अयोध्येच्या राम मूर्तीत ही भगवान बुद्ध आहेत. 

भगवान बुद्धांचा जन्म शाक्य कुळात झाला. सूर्य वंशातील  राजा शाक्य पासून शाक्य कुळ सुरू झाले. बौद्ध ग्रंथ दशरथ जातक अनुसार भगवान बुद्ध हे पूर्व जन्मी श्रीराम होते. त्याकाळी सनातन धर्मात आलेले  दोष दूर करण्यासाठी भगवान बुद्धाने सम्यक ज्ञानाची अवधारणा आपल्याला दिली. 

भगवान बुद्धाची सम्यक ज्ञानाची शिकवण सनातन धर्मात सांगितलेल्या धर्माच्या दश लक्षणांसाखीच आहे. धर्माचे दहा लक्षण- धैर्य, क्षमा, संयम, चोरी न करणे, स्वच्छता पाळणे, इंद्रियांना वश मध्ये ठेवणे, बुद्धि, विद्या, सत्य आचरण आणि क्रोध न करणे आहेत. श्रीमद भगवद्गीतेतील धर्म मार्गावर चालणार्‍या स्थितप्रज्ञ (सम्यक) व्यक्तीचे जे लक्षणं आहेत त्याच अनुसार भगवान बुद्धाने धर्माची हीच लक्षणे सम्यक् दृष्टि,सम्यक् संकल्प, सम्यक् वाक् सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीव-सम्यक् व्यायामसम्यक् स्मृति सम्यक् समाधिच्या माध्यमाने सांगितली आहे.  

बाकी भगवान बुद्धाच्या शिकविणेचे पालन सनातन धर्मीय करतात. समाजात तेढ निर्माण करण्याची घातक वृती पासून दूर राहावे हीच अपेक्षा. 

Sunday, February 23, 2025

शिक्षण आणि विटाळ पाळणे


 "शिक्षण  प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात. असे अर्ध-शिक्षित लोक त्यांच्या कृतीने ते अशिक्षित आहेत हे दाखविण्याचा कोणताही मौका सोडत नाही. 

आता दूसरा प्रश्न विटाळ म्हणजे काय? स्त्रीच्या शरीरातून  महिन्यातून  काही दिवस अनुपयोगी आणि अपायकारक  स्त्राव  बाहेर पडतात. या दिवसांना, स्त्रीची मासिक पाळी किंवा स्त्री विटाळशिण झाली, असे शब्द भाषेत आहे. अश्या अनुपयोगी, अपायकरक स्त्रावतून कुणाचाही जन्म होत नाही. अजून तरी जेंव्हा स्त्री आणि पुरूषांचे बीज एकाकार होतात आणि त्यांचे पोषण स्त्रीच्या गर्भात होते, तेंव्हाच नवे बाळ जन्माला येते. विटाळातून कुणाचाच जन्म होत नाही.असो. स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्राव जमिनीवर पडू नये, त्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून आजच्या आधुनिक स्त्रीया पैड इत्यादि वापरतात. पण शंभर वर्षांपूर्वी आपल्या देशात अधिकान्श स्त्री आणि पुरुष अंतर्वस्त्र वापरत नव्हते. मी स्वत: सहावीत गेल्या पहिल्यांदा अंडर वेयर घातली होती. ही 1980 पूर्वी महानगरातील परिस्थिति होती. बहुतेक ब्रा-पेंटी इत्यादिंचा वापर महानगरात 100 वर्षांपूर्वी सुरू असेल. अजूनही 100 टक्के ग्रामीण भागात या अंतर्वस्त्रांचा प्रसार झाला नसेल.  पूर्वीच्या  काळात  स्त्रीच्या शरीरातील बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्रावाने घरातील आणि बाहेरचे  वातावरण प्रदूषित होऊ नये यासाठी उपाय शोधणे गरजेचे होते. या शिवाय मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव होण्याने स्त्रीला शारीरिक विश्रांतीची ही गरज असायची. त्या काळच्या  शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली. स्त्री विटाळशिण झाली की तिला विश्रांति मिळावी या हेतूने विटाळशिण स्त्रीला वेगळे ठेवण्याची परंपरा समाजात रूढ झाली. त्याकाळच्या सामाजिक स्वास्थ्य दृष्टीने ती व्यवस्था सर्वोत्तम होती.  आजच्या काळात अधिकान्श कामांसाठी आधुनिक उपकरण उपलब्ध असतात तरी ही शिक्षित डॉक्टर स्त्रीला मासिक पाळीच्या काळात जास्त शारीरिक श्रमांचे काम न करण्याचा सल्ला देतात. 

काळानुसार समाज आणि परिस्थिति बदलत रहाते. कोणतेही विधान करण्यापूर्वी त्याकाळच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितींचा विचार करणे ही गरजेचे असते. मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने  सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.  पण चिंतन आणि मनन करण्याची क्षमता नसलेले अर्ध-शिक्षित  सर्व जुन्या सामाजिक परंपरांबाबत निरर्थक विधान करतात त्यासाठी हा लेख. 



Monday, February 10, 2025

दिल्ली मराठी साहित्य सम्मेलन : दिल्ली कर मराठी कवींच्या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.




दिल्लीत मराठी साहित्य सम्मेलांनाच्या निमित्ताने दिल्लीकर मराठी कवींच्या कवितांचे संग्रहाचे प्रकाशन झाले. त्यात माझ्या ही दोन कविता होत्या. 

बजेट आले आणि लग्न तुटले.


ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले.  ग्राऊंड फ्लोर वर  एक मोठा हॉल, दोन बेड रूम,  मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम  आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर  पाहुण्यासाठी एक रूम ही.  घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती. जाई जुई, मोगरा, गुलाब, सदाफुली  इत्यादि फुलांच्या झाडे आणि वेली ही होत्या. मुंबई पुण्याच्या भाषेत एक बंगलो त्यांनी बांधला होता.

सदाने नागपूरच्या एका महाविद्यालतून आयटी शिक्षण घेतले. एमबीए ही केले. पण  भरपूर प्रयत्न करून ही त्याला नागपुरात नौकरी मिळाली नाही.  अखेर त्याने पुण्याची वाट धरली. त्याला पुण्यात एका आयटी कंपनीत 25 हजार पगारावर नौकरी मिळाली. एका बंगल्यात राहणारा सदा पुण्यात दोन-चार तरुणांसोबत एका फ्लॅट मध्ये राहू लागला. पुण्यात पंचवीस हजारात  एका व्यक्तीचे  जीवन निर्वाह होणे कठीण, संसार थाटणे शक्यच नाही. सदाचा पगार कमी असल्याने पुण्याच्या नौकरी करणार्‍या मुलींनी त्याला भाव देणे शक्यच नव्हते. तसे ही पुण्याच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात. त्यामुळे सदाने लग्नाचा विचार सोडून दिला. त्यात करोंना आला, कंपनी ने दोन वर्ष पगार वाढ रोखून ठेवली. पण अखेर सदाचे नशीब बदलले. 

नागपुरात ही आयटी कंपन्या येऊ लागल्या होत्या. सदाला गेल्यावर्षी एका कंपनीत 50 हजारची नौकरी मिळाली. त्यात नौकरी ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यन्तची. सदा तर भलताच खुश झाला. नुकतीच त्याची 30 उलटली होती. त्याला लग्नाची घाई झाली होती. नौकरी करणारी मुलगी भेटली नाही तरी वडिलांची पेन्शन आणि त्याच्या पगारात उत्तम रीतीने जगता येणे शक्य होते. त्याच्या वडीलांनी वधू संशोधांनाची मोहीम हाती घेतली.  पण इथेही लोचा झाला. जिथे पुण्या-मुंबईच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात, तिथे नागपुरकर मुलींना पुण्या-मुंबईचे डोहाळे लागलेले असतात. अखेर गेल्या महिन्यात एका मुलीने होकार दिला. 

एक तारखेला निर्मला ताईंनी बेजेट पेश केले. इन्कम टॅक्स लिमिट 12 लाखांपर्यंत वाढविली. पाच फेब्रुवारीच्या माघाष्टमीच्या शुभ दिवशी  सदाचे वडील पुढील बोलणीसाठी मुलीवाल्यांकडे केले. सदा ऑफिसात गेला. संध्याकाळी सदा घरी पोहचला. वडील बैठकीत बसलेले दिसले नाही. त्याने आईला विचारले बाबा कुठे, त्याची आई म्हणाली बाबा वरती गच्चीवर गमल्यातील फुलांच्या झाडांना पाणी देत आहे. तू हात पाय धूऊन कपडे बदलून ये, मी चहा ठेवते. सदा हात पाय धूऊन कपडे बदलून बैठकीत आला. त्याची आई चहा घेऊन आली. वडील ही चहासाठी खाली आले. सदाने वडिलांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले. त्याचे वडील म्हणाले सदा, मुलीवाल्यांनी नकार दिला. सदाने त्याचे कारण विचारले. त्याचे वडील म्हणाले मुलीवाले म्हणतात मुलगा किमान इन्कम टॅक्स भरणारा असावा. .....

होणारा जावई इंकम टॅक्स भरत नाही. ही तर आम्हासाठी लजास्पद बाब आहे. अश्या घरी मुलगी देणे शक्य नाही. सदा आपल्या पे स्लिपला पाहत विचार करू लागला पगार पन्नास हजार ते लाख रुपये पोहचायला किमान पाच वर्ष तरी लागतील. पाच वर्षांनी पुन्हा इन्कम टॅक्स लिमिट वाढली तर आपले कधीच लग्न होणार नाही.