Thursday, December 22, 2016

शर्यत : ससा आणि कासव



मोगलीचे जंगल होते. एक काळाकुट्ट ससा आणि एक पांढरे शुभ्र कासव एका  रिंगणात धावत होते. शर्यत होती जंगी. अचानक शिट्टी वाजली. शर्यत संपली. ससा आणि कासव होते तिथे थांबले. गोल-गोल होते रिंगण, कोण जिंकले, कोण हरले, प्रश्न होता बिकट.  हत्ती म्हणाला ससा धावतो वेगात, तोच आहे विजेता. तवाकी म्हणाला, मला वाटते बहुतेक पांढरे कासव जिंकले असावे. निर्णयासाठी सर्वांनी, महाराज शेरखानकडे बघितले. शेरखान हि बुचकळ्यात पडला, त्याने शर्यतीची नियमावली बघितली. शेरखान म्हणाला, काळा ससा धावतो, जोरात पण कासव आणि सस्याच्या शर्यतीत नेहमीच जिंकतो कासव, असेच लिहिले आहे यात.  आजच्या शर्यतीचा विजेता आहे पांढरा कासव.

अचानक माझे स्वप्न भंगले, अर्थ काही कळेना. शेरखान म्हणतो, बहुधा तेच सत्य असावे.  आपले काय म्हणणे आहे. 

Sunday, December 18, 2016

अग्रपूजेचा मान - भाई भतीजावादाची पहिली कथा


कालचीच गोष्ट, गल्लीतली एक मुलगी घरी आली, पेढे घेऊनच. मी विचारले पढे कसले? ती म्हणाली, काका मला नौकरी लागली.  खरंच ती मुलगी अत्यंत हुशार आहे. या आधी हि तिने  दोन-तीन वेळा लिखित परीक्षा पास केली होती. पण दरवेळी साक्षात्कार मध्ये बाद झाली.  या वेळी साक्षात्कार नव्हता. (केंद्र सरकारच्या श्रेणी आणि साक्षात्कार घेणे बंद झाले आहे, नमो कृपा आणखीन काय) लिखित परीक्षा पास होताच तिला नौकरी लागली. असो. 

नौकरी मिळविण्यासाठी, त्या नौकरीसाठी अपेक्षित असलेल्या गुणांची परीक्षा हि द्यावीच लागते.  पण या शिवाय साक्षात्कार नावाचा एक प्रकार हि असतो.  परीक्षेत पहिला क्रमांक आला तरी साक्षात्कार मध्ये कमी मार्क्स देऊन परीक्षक उम्मेद्वाराला बाद करू शकतात अर्थात करतातच. मग ती नौकरी शिक्षकाची असो, पोलीस मधली भर्ती असो किंवा इस्पितळात नर्सची नौकरी. आपल्या माणसांना अर्थात भाई आणि भतीज्यांना नौकरी देण्यासाठीच बहुधा साक्षात्कार नावाचा प्रकार आपल्या देशात रूढ झाला असावा. 

रात्रीच्या वेळी पलंगावर पडल्या-पडल्या, भाई भतीजावादाची प्रथा आपल्या देशात केंव्हा सुरु झाली असेल, हा विचार करत होतो. अचानक ती पुराणकथा डोळ्यांसमोर चमकली. 

कोणत्या देवताला अग्रपूजेचा मान मिळायला पाहिजे, या साठी परीक्षा ठेवली होती. देवाधिदेव भगवान शंकर हे परीक्षक होते. जो सर्वात कमी वेळात पृथ्वी प्रदिक्षणा करेल त्या देवताला अग्रपूजेचा मान मिळणार होता. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून पृथ्वी  प्रदिक्षणेसाठी निघाले.  पण गणेश मात्र तिथेच होता. शंकराने विचारले, गणेश, सर्व निघाले तू अजून इथेच का? तुला अग्रपूजेचा मान नको का? गणेश म्हणाला, पिताश्री, उंदिरावर बसून मी गरुडावर स्वार भगवान विष्णू  यांच्याशी स्पर्धा करू शकतो का? कदापि शक्य नाही.  हि तर वाहनांची स्पर्धा आहे,  ज्याचे वाहन जोरात धावणार ती देवता जिंकेल. यात देवांची हुशारी काय? गणेशचे म्हणणे ऐकून शंकराची विकेटच उडाली. शंकर म्हणाले, च्यायला हे माझ्या ध्यानातच नाही आले. पण आता काही उपयोग नाही. त्यावर गणेश म्हणाला, बाबा तुम्ही मनात आणले तर मला अग्रपूजेचा मान सहज मिळू शकतो. मी इतरांसारखा मूर्ख नाही, हे आत्ताच सिद्ध केले आहे. मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कि नाही, या बाबत काही शंका असेल तर आईला विचारा. शंकराच्या नेमक्या त्या दुखात्या जखमेवर गणेशनी  बोट ठेवले होते.  चांगली गंगा डोक्यात बस्तान बांधून बसली होती आणि वामांगावर पार्वती देवी विराजमान. मस्त चालले होते. कसे काय पार्वतीला गंगेबाबत कळले. गणेशाची मदत घेऊन तिने, गंगेला दूर दक्षिणेत जायला बाध्य केले. खरे म्हणाल, शंकराला गणेशवर भारी राग होता, पण करणार काय, बायकोचा प्रिय पुत्र तो. त्याच्यावर राग काढणे शक्यच नव्हते. 

आपल्या पुत्राचे ते उपकार विसरणे पार्वतीला कदापि शक्य नव्हते. तिला राहवले नाही.  पार्वती शंकराला म्हणाली, एवढे म्हणतो आहे, तर गणेशला द्या अग्रपूजेचा मान. तुम्ही दिलेला निर्णय अमान्य करण्याची हिम्मत त्रिलोकात कुणाला हि नाही.  भगवान शंकर म्हणाले, पार्वती तुला कळत का नाही, इच्छा असूनही हि परीक्षा मी रद्द करू शकत नाही. तसे केले तर माझ्यावर भाई-भतीजावादचा आरोप लागेल. माझी इज्जत धुळीत मिळेल. 

गणेश म्हणाला, बाबा परीक्षा रद्द करायची गरज नाही.  हे बघा तुम्ही कुठे उभे आहात, पृथ्वीवरच ना.  भगवान शंकर म्हणाले, होय. मग मी तुमची प्रदिक्षणा केली म्हणजे, पृथ्वी प्रदिक्षणा हि झालीच समजा. पार्वती मैया लगेच म्हणाली, बघा  किती हुशार आहे, माझा गणेश.  आता तरी झाले ना तुमचे समाधान. गणेश, यांचा विचार बदलण्याआधी पटकन प्रदिक्षणा करून टाक.  गणेशने तत्काळ आपल्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार केला आणि उंदिरावर बसून  त्यांच्या  भोवती एक चक्कर मारला आणि हात जोडून म्हणाला.  हे भगवान शंकर, मी सर्वात आधी पृथ्वी प्रदिक्षणा पूर्ण केली, मला अग्रपूजेचा मान मिळालाच पाहिजे.  बेचारे शंकर भगवान, काय करणार त्यांनी गणपतीला अग्रपूजेचा मान दिला.  सर्व देवता पृथ्वी प्रदिक्षणाकरून दमून भागून  परत आले. त्यांना कळले, भगवान शंकरांनी त्यांच्या पुत्राला अर्थात गणेशला सर्वप्रथम पृथ्वी परिक्रमा केली म्हणोन अग्रपूजेचा मान देऊन टाकला आहे. ज्या प्रमाणे विरोधीपक्ष संसदेत गोंधळ घालतात, तसेच देवतांनी हि या विरुद्ध भारी हल्लागुल्ला केला. पण त्याच्या काही उपयोग झाला नाही. त्या दिवसापासून  भारतात भाई- भतीजावादाची सुरुवात झाली.   

Wednesday, December 14, 2016

अमिट लक्ष्मणरेखा




वासनामयी डोळ्यांनी 
पाहिले तिच्याकडे मी. 
नवयौवना कोमलांगी 
मीलनोत्सुक रमणी  
नोट नवी कोरी ती
दोन हजाराची.


विरहात जळूनी
कासावीस झाले प्राण 
तरीही 
विवश होतो मी 
अलंघनीय होती 
सुट्ट्या पैश्यांची ती 
अमिट  लक्ष्मणरेखा.  




Tuesday, December 13, 2016

क्षणिका : ओढ वसंताची



गोठल्या श्वासांना
गळत्या पानांना 
ओढ वसंताची 



स्वप्न रात्रीचे 
क्षणात विरले. 
प्रवास पुढचा 
वाटसरूचा. 









Friday, December 9, 2016

स्वार्थाच्या बाजारी मैत्री अशी रंगली



सावळ्याच्या प्रेमात 
 पडली  राधा  बावरी 
काळ्या रंगात रंगुनी 
यमुनाही झाली काळी.

द्वारकेचा राजा आला 
सुदामच्या द्वारी 
काळी लक्ष्मी झाली 
जनखात्यात पांढरी.


यमुनेच्या काठी 
अवसेच्या  राती 
स्वार्थाच्या बाजारी 
मैत्री अशी रंगली. 



द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम =  गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या  काठावर आहे.



Tuesday, December 6, 2016

दिल्ली कथा : अल्पावधीचा कुटीर उद्योग


(लोकांच्या अनुभवावर)

दहा नोव्हेंबरची गोष्ट कार्यालयात आपल्या रूम मध्ये बसलो होतो अचानक सुब्बु रूम मध्ये शिरला, जवळपास ओरडतच म्हणाला, पटाईतजी क्या आपको मालूम है,  RBI के सामने तो कुटीर उद्योग शुरू हो गया है, कुटीर उद्योग???. प्रथम सुब्बुला काय म्हणायचे आहे मला काहीच उमजले नाही. हा कुटीर उद्योग आहे तरी काय पाहण्यासाठी मी स्वत: लंच मध्ये कार्यालयातून बाहेर पडलो. आरबीआयच्या समोर भली मोठी रांग पैसे बदलण्यासाठी लागलेली होती. तीच परिस्थिती जनपथ वर असलेल्या सर्व बँकांची होती. पण एक जाणवले, लाईनीत लागणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक या पूर्वी कधीच  बँकांच्या लाईनीत लागले नसतील. घूँघट काढलेल्या बाया (बहुतेक राजस्थानी), पर्दानशीं स्त्रिया, आपल्या सोबत चिल्ल्या-पिल्ल्याना घेऊन लाईनीत उभ्या होत्या. बहुतेक लोक जुन्या दिल्लीतले दिसत होते.  सुब्बुच्या म्हणण्याप्रमाणे ह्या लोकांनी कुटीर उद्योग सुरु केला आहे.  स्वत:च्या आधारकार्डच्या उपयोग करून लोकांचे ४००० रुपये बदलून काही दिहाडी कमविण्यासाठी हे गरीब लोक बँकांच्या लाईनीत उभे होते.  एका  मोटारबाईक जवळ दोन चार लोकांचा घोळका दिसला. बहुतेक लाईनीत लागलेल्या स्त्रियांसोबत ते आले असावे. हिम्मत करून मी विचारले "क्या रेट चाल रिया है, मियां." त्याने लगेच उत्तर दिले, ५०० रुपैया, चाहे हजार बदलो चाहे ४००० हजार.  "रेट कुछ जियादा लग रिया है". तो: एक माणसाची पूर्ण दिवसाची दिहाड़ी, शिवाय चाय-पानी आणि जास्त वेळ लागल्यास नाश्ता हि द्यावा लागणार. त्या हिशोबाने काही जास्त घेत नाही आहे, सर्वत्र हाच रेट आहे.  "पैसा बदलून मिळेल याचा काय भरोसा?" तो: माझा मोबाईल न. आणि आधार कार्डची फोटो कापी मी तुम्हाला देणार, आता तर झाले. ऐसे कामों में भरोसा करना हि पड़ता है. "किती बदलून देऊ शकता?"  तो: पाच दहा लाख, त्याहून जास्ती काम आपल्या बसचे नाही. असो. असाच प्रकार दिल्लीत अधिकांश ठिकाणी दिसला.  

रेडक्रॉसच्या इमारती  समोर एक वयस्कर अपंग भिकारी बसलेला दिसतो.  घरी जाताना बहुतेक त्याच्या हातावर एक दोन रुपयांचे नाणे मी ठेवतो. तेवढेच पुण्य. पण आज काही तो दिसला नाही. बहुतेक तो हि या कुटीर उद्योगात उतरला असावा.  १७ तारखेला तो भिकारी पुन्हा रेडक्रासच्या इमारती समोर बसलेला दिसला. बहुतेक १६ तारखेला बोटांना स्याही लावल्यामुळे आता त्याला नोट बदलणे  शक्य नव्हते. मी सहज त्याला विचारले, "कुठे होता एवढे दिवस." तो म्हणाला साब, लाईनीत लागलो होतो.  "कितने नोट छापे." दात दाखवत तो म्हणाला, सब मोदीजी कृपा है. नेहमीप्रमाणे त्याच्या हातावर २ रुपयांचे नाणे ठेवत मी पुढे निघालो. (खरे म्हणाल तर देण्याची इच्छा नव्हती. पण विचार केला हा कुटीर उद्योग अल्पकालीन आहे, ह्याचा मूळ धंधा तर भिक मागण्याचाच). ७-८ दिवसात लाईनीत उभे राहून गरिबांनी श्रीमंतांचे तीस एक हजार कोटी नक्कीच बदलून दिले असतील आणि सहा-सात हजार कोटी कमविले हि असतील. काही विरोधीपक्ष नेता लोक RBI समोर धरना द्यायला आले होते. लोकांनी त्यांना पळवून लावले, कारण त्यांच्या येण्यामुळे लाईन तुटली. गरिबांची दिहाडी मारल्या गेली. त्यांना राग येणार साहजिकच होत. पुढे नेत्यांनी लाईनीत लागलेल्यांना भडकवायचे सोडून दिले. 


दुसरा कुटीर उद्योग म्हणजे जनधन योजनेचा दुरुपयोग. अंदाजे किमान ४० ते ५० लक्ष लोकांनी श्रीमंतांचे काळे धन स्वत:च्या खात्यात टाकून उजळ केले असावे. कारण या अवधीत पंचवीस हजार कोटींच्या अधिक रक्कम या खात्यांत जमा झाली. २० ते २५ टक्के कमिशन  या कुटीर उद्योगात हि गरिबांना मिळाले असेल. असो.  दोन एक दिवसांपूर्वी पंतप्रधान म्हणले गरिबांनी हा पैसा परत करायची गरज नाही. त्यांनी हा पैसा स्वत: जवळच ठेवला पाहिजे आणि काळा पैश्येवाल्यांना अद्दल घडवली पाहिजे.  

काहीही म्हणा, काही दिवस तरी, गरीब लोकांना एक नवीन कुटीर उद्योग मिळाला.  मोठ्या प्रमाणात लोकांनी या बहती गंगेत हात धुऊन घेतले.  

Sunday, December 4, 2016

लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी


सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ  आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या काळी वडिलांचा पगार बहुतेक २०० रुपयांचा जवळपास होता.  दुकानात राशन नसले तरी राशन येण्याची वाट पाहत दोन-दोन, तीन-तीन दिवस लाईनीत आपली जागा रोखून उभे राहावे लागायचे. अर्थातच आम्ही सर्व भावंडे  आळीपाळीने लाईनीत उभे रहायचो. राशन आल्यावर नेहमीच भांडणे इत्यादी व्हायचची.  शेवटी महाभारताचे युद्ध जिंकून निकृष्ट दर्जेचा भरपूर कचरा असलेला गहू किंवा मिलो मिळायचा.  पण काहीही म्हणा पोटाची खळगी मात्र भरायची. हे वेगळे नवी पिढीच्या लोकांना हे किस्से कपोल कल्पना वाटत असतील. तरीही त्यांचे भरपूर मनोरंजन तर झालेच असेल आणि लाईनीत उभे राहण्याचा काही तणाव  काही अंशी कमी झाला असेल. 

अखेर काही तासांनी २००० रुपयांची नवी कोरी नोट घेऊन गल्लीतल्या वाण्याच्या दुकानात गेलो. तिथे चक्की फ्रेश आटा होता, मिलचा आटा होता, विदेशी आटा होता, पांढरा शुभ्र आटा होता, भुरे रंग का  स्वदेशी आटा होता, विटामिन वाला आटा होता, नौ अनाज वाला बाबाजींचा पोष्टिक आटा हि होता.  नव्हते  फक्त सुट्टे.  अखेर आटा न घेता रिकाम्या हाताने घरी परतलो.

घरी येऊन कधी नव्या कोर्या २००० हजारच्या नोट कडे बघितल तर कधी बँकेच्या पासबुक कडे.  कधी नव्हे ते, महिन्या अखेर खात्यात भरपूर रक्कम दिसत होती.  श्रीमंत होण्याची जाणीव झाली.  आजीने सांगितलेली एक कहाणी  आठवली. एकदा एका दरिद्री माणसाने नदी काठावर लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरु केली.  अखेर लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती सोन्याची होईल, असा वर त्याला दिला.  त्या माणसाने डोळे उघडून एका दगडाला स्पर्श केला. तो दगड तत्क्षणी सोन्याचा झाला. युरेका युरेका म्हणत तो आनंदाने उड्या मारत घरी पोहचला आणि बायकोला समोर पाहताच जवळ जवळ ओरडलाच  अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण  श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे. वेड्या सारखा तो सर्वत्र हात लावत सुटला. त्याचे जग सोन्याचे झाले होते. एक भयाण सत्य समोर आले. अन्न पाण्याविना तो तडफडत मरणार होता. असो. 

रात्री फ्रीज उघडून थंडगार पाणी प्यालो. बेडरूम मध्ये जाऊन AC सुरु केला. मखमली बिछान्यावर झोपण्याचा प्रयत्न करत गुणगुणू लागलो: 

स्वामी तिन्ही जगाचा 
आट्या बिना उपाशी.