Saturday, December 27, 2014

बंदुकीची गोळी आणि ती


(काल्पनिक कथा)

तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक  जागा मिळाली.  समोरच्या सीट वर  एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थातच केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल  प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती. कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे. तुम्ही ही बर्याच  नक्सलवाद्याना  कंठस्नान घातले असतील. त्यावर मेथ्यु  म्हणाला,  कुणाचे ही प्राण घेण्यात बहादुरी नाही, लोकांचे प्राण घेऊन आनंद ही मिळत नाही. मग तो शत्रू का असेना.  'बंदुकीची गोळी फक्त प्राण घेते आणि लोकांचे आयुष्य उध्वस्त करते'. बंदुकीची गोळी कुठल्या ही समस्येचे समाधान नाही. एका अर्धसैनिक दलाच्या अधिकारीच्या तोंडून हे ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.  माझा मनात चाललेला गोंधळ मेथ्युचा ध्यानी आला. तो म्हणाला साहेब, तीन एक वर्षांपूर्वीची घटना आहे.  १५  शिपायांची  तुकडी घेऊन गस्त घालायला निघालो. जंगलातून  पायवाटेवर चालताना बलवान सिंग आणि मोहन हे दोघे सिपाही पुढे होते. मी, होशियार सिंग थोड्या अंतरावर त्यांच्या मागे. एका वळणावर  बंदुका घेतलेले सैनिकी वेशात तीन लोक बलवान सिंहला दिसले. तो थोडा गोंधळला, ते तिघे नक्षली होते. आपल्या समोर अर्धसैनिक दलाची तुकडी आहे, त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांना एक धक्का देऊन इथून पलायन करणे उचित, त्यांच्या म्होरक्याने निमिषातच निर्णय घेतला. त्यांनी समोर दिसणाऱ्या दोन्ही शिपायांवर आपल्या एके ४७ ने ब्लास्ट (सर्व गोळ्या एकाच वेळी) केला. काही समजण्या आधीच बलवान आणि मोहन जमिनीवर पडले. मी लगेच एका झाडाची आड घेतली आणि आम्ही नक्षलींच्या दिशेने गोळीबार सुरु केला. होशियार सिंगने याने  थोड रांगत पुढे जाऊन एक हेंड ग्रेनेड त्यांच्या दिशेने फेकला. तो ग्रेनेड बरोबर त्यांच्या मध्ये जाऊन पडला. काही क्षणांकर्ता नक्षली गोंधळले. त्यांनी आपली पोजिशन सोडली आणि त्याच क्षणी ग्रेनेडचा ही ब्लास्ट झाला. सर्वकाही शांत झालं.  माझे  दोन शिपाई  शहीद झाले  होते. बाकी इतर कुणाला ही कुठलीच इजा झाली नव्हती. शिपायांना नक्षली जिवंत आहे कि मेलेले याची खात्री करायला सांगितले. होशियार सिंहाने परत येऊन सांगितले,  साहिब एक जिंदा है, क्या करें उसका. मी जवळ गेलो, बघितले  जेमतेम  १७-१८ मुलगी असेल.  दोन्ही पाय ब्लास्ट मुळे जखमी झाले होते. पाठीला गोळी ही  लागलेली होती. शरीरातून रक्त वाहत होते. एक  शिपाई  म्हणाला, साहब इसे तो उठाकर ले जाना पड़ेगा. मी विचार केला. जंगल नक्सलीनी भरलेले आहे. कदाचित या चकमकी बाबत त्यांना कळले ही असेल. आधीच दोन शहीद  शिपाई, त्यांची आणि नक्षली त्यांचे शस्त्र. ६-७ शिपाई तर या साठीच लागतील. उरलेल्या ५-६ शिपायांवर  सर्वांच्या संरक्षणाची जवाबदारी. निर्णय घेतला. आपल्या जवळ लोक नाही. सध्यातरी हिला इथेच सोडावे लागेल, नंतर येऊन बघू, काय करायचे ते. साहेब अश्यानी ही काही वेळातच इथेच तडफडून मरेल, एक शिपाई म्हणाला.  मी म्हणालो, ठीक आहे, मी तिला मुक्त करतो. मी तिच्या जवळ गेलो.एक पाय तिच्या छातीवर ठेवला आणि  तिच्या कपाळावर नेम धरला. त्या वेळी तिच्या चेहर्याकडे लक्ष गेल. मोठ्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत काहीतरी बोलण्याच्या प्रयत्न करत होती. मन घट्ट करून मी गोळी झाडली. त्या क्षणी माझ्या कानात आवाज घुमला  'साहेब मला का मारले, मला जगायंच होत.' 

मेथ्यु काही क्षणासाठी थांबला. तो पुढे म्हणाला, बलवान सिंहच्या बायकोचे वय फक्त तीस वर्ष होते त्यात तीन मुली. तिला पुढील सर्व आयुष्य तीन मुलींना वाढवत वैधव्यात काढावे लागणार. मोहन तर फक्त २२ वर्षांचा होता. आपल्या आई-बापांचा एकुलता एक. ती मुलगी, दोन वर्षांपूर्वी तिने दहावीचा पेपर दिला होता. तिला डॉक्टर बनायचे होते.  तिचा मोठा भाऊ कालेजात शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत  घरी आला होता. त्याच वेळी जवळच्या गावात पोलीस पोस्टवर नक्षली हमला झाला. जवळपासच्या गावातल्या तरुणांना पोलिसांनी उचलले. त्यात तिचा भाऊ ही होता. असे गावकर्यांचे  म्हणणे. नंतर कळले पोलीस एन्काऊंटर मध्ये काही नक्षली मारल्या गेले त्यात तिचा भाऊ होता. भावाचा बदला घेण्यासाठी तिने जंगलाचा रस्ता धरला आणि चकमकीत मी तिला मारले. तिच्या वडिलांनाही या घटने नंतर पोलीस उचलून घेऊन गेले. कदाचित अद्यापही ते जेल मध्ये असतील. काही क्षणांच्या चकमकीत अनेकांचे  स्वप्न भंगले, काही परिवार उध्वस्त झाले. 

बाकी माझे म्हणाल, तर मी झोपेच्या गोळ्या घेतो  तरी ही मला झोप  लागत  नाही. जरा डोळे मिटले कि  तिचा चेहरा समोर येतो, एकच  आवाज कानात घुमत राहतो. 'साहेब मला का मारले, मला जगायचं होत.'  काय उत्तर देणार मी तिला. मला नेहमीच  वाटते, ती सतत माझ्या अवती-भोवती असते, कदाचित या क्षणी ही इथेच  असेल. जो  पर्यंत तिला  तिच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही ती जाणार नाही. जन्म भर ती मला अशीच छळत राहणार. मेथ्युची कथा ऐकून मी सुन्न झालो. काहीच बोलू शकलो नाही. 

No comments:

Post a Comment