भल्या पहाटे
उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला कि मन कसं प्रसन्न होत. सकाळचे
सोनेरी कोवळे ऊन हवे-हवे से वाटते. तसेंच सोनेरी रंगाचे सुवर्ण ही माणसाला प्रिय
आहे. सुवर्णाच्या कृपेने माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. कपडे-लत्ते, टीवी, गाडी, बंगला आणि जास्त सुवर्ण
असेल तर बंगल्यात राहायला पत्नी रुपात जागतिक सुंदरी ही मिळू शकते.
फार पूर्वीची गोष्ट आहे, एक अडाणी व अज्ञानी
माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले. काही विचार न करता त्याने ते
नाणे उचलले आणि आपल्या खिश्यात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसाला ही रस्त्यात
सोन्याचे नाणे दिसले. त्याने आजू-बाजूला बघितले. जवळपास कोणी माणूस दिसत नाही याची
खात्री केली आणि नाणे उचलून स्वत:च्या खिश्यात टाकले. आणखीन काही वेळ
गेला, एक शिक्षित आणि विचारवंत माणूस तिथे आला, त्याला ही सोन्याचे नाणे
दिसले. नाणे दिसतात, त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु झाले, कुणाच्या खिश्यातून हे सोन्याचे
नाणे पडले असावे? त्याने चौफेर नजर टाकली, कुणीच दिसत नाही. आतां काय
करावे, नाणे उचलून खिश्यात टाकावे का? लगेच मनात दुसरा विचार
आला, हे करणे बरोबर नाही, दुसऱ्याची वस्तू उचलणे म्हणजे
चोरी. छे-छे दुसर्यांच्या वस्तूंकडे ढुंकून ही बघितले नाही पाहिजे. पुन्हा विचार
आला, आलेल्या लक्ष्मीचा तिरस्कार करणे योग्य नाही. अश्याने
लक्ष्मीचा अनादर होतो. लक्ष्मी कुपीत झाली तर दारिद्र्यात खितपत पडावे लागेल.
त्याला पूर्वी ऐकलेली कथा आठवली. “एकदा शंकर- पार्वती विमानातून जात असताना, शंकराने पार्वतीस
म्हंटले, तो पहा खाली पृथ्वीवर जो माणूस दिसतो आहे, तो माझा प्रिय भक्त आहे.
वादळ असो वा पाऊस, थंडी असो व शरीरला भाजणार भयंकर उन्हाळा, हा न चुकता रोज सकाळी
गावाच्या मंदिरात माझी पूजा अर्चना करतो आणि मंदिराच्या शंभर प्रदिक्षणा ही घालतो.
याने आज पर्यंत मजपाशी स्वत: साठी काहीही मागितले नाही, म्हणूनच मला हा प्रिय
आहे. पार्वतीने खाली बघितले, फाटके कपडे घातलेल्या त्या
दरिद्री माणसाला पाहून पार्वती म्हणाली, देवाधिदेव, त्याने आपणास काहीच
मागितले नाही, हे खरे असले तरी भक्ताची काळजी घेणे आपले कर्तव्य
नाही का? विष्णू भगवान तर सतत आपल्या भक्तांचे कल्याण करण्यात मग्न
राहतात. त्या वर शंकर म्हणाले, हा भाग दुष्काळी आहे, इथे सर्वच लोक दरिद्री
आहे. आपले दारिद्र्य दूर करण्यासाठी हा मला सोडून परदेसी जाणार नाही आणि जो पर्यंत
हा या गावात राहील ह्याचे दारिद्र्य दूर होऊ शकत नाही. तरी ही तुझ्या आग्रहास्त मी
प्रयत्न करतो. भगवान शंकरांनी प्रदिक्षणेच्या मार्गात काही सोन्याचे नाणे ठेवले, दरिद्री असून ही त्या ब्राह्मणाला
सोन्याच्या नाण्यांना उचलण्याचा मोह झाला नाही. असो, शंकर भगवान त्याचे दारिद्र्य
दूर करू शकले नाही.” विचारवंत माणसाने निर्णय घेतला. देवाने आपल्या वर कृपा केली
आहे, भगवंताचा कृपा प्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण करायला
काहीच हरकत नाही. असा विचार करून त्याने सोन्याचे नाणे उचलून खिश्यात टाकले.
योगायोगाने तिन्ही माणसे
एकाच दिवशी मरण पावली. यमदूतांनी त्यांना न्याय निवाड्यासाठी धर्मराजा समोर
उभे केले. धर्मराजाने पहिल्या माणसाच्या पाप-पुण्याचा हिशोब केला आणि त्यास
म्हंटले, तू एकदा सोन्याचे नाणे चोरले होते, तुला १ वर्ष नरकवासाची
शिक्षा. तो म्हणाला, मी नाणे चोरले नव्हते, रस्त्यावर सापडले होते, मी ते उचलले आणि नाणे
विकून काही दिवस मौज केली. त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते.
तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.
यमदूतांनी दुसऱ्या
माणसाला, धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराज म्हणाले, तुला ५ वर्षाचा नरकवासाची
शिक्षा. दुसरा माणूस म्हणाला, पहिल्या माणसा सारखे मी ही नाणे
उचलले होते, दोघांना सारखी शिक्षा मिळाली पाहिजे. त्याला १ वर्ष
आणि मला ५ वर्ष हा तर अन्याय आहे. धर्मराज हसत म्हणाले, मूर्खा, त्याने नाणे उचलले होते
आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी
आपल्याला पहात तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले
तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.
यमदूतांनी आता विचारवंत
माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने
त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि
त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी
केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी
निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी
माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत
आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर
बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे
कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे. इथे कुणावर ही अन्याय होत
नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे
नक्कीच समजत असणार,. तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे
त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला
क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष
नरकवासाची शिक्षा.
अश्यारीतीने धर्मराजाने
तिघांचाही न्याय-निवडा केला. तुम्हाला धर्मराजाने दिलेला न्याय पटतो आहे का?
No comments:
Post a Comment