Sunday, July 28, 2013

प्रेम आणि गालावरचे खड्डे



मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या बातम्या दूरदर्शन वर येत होत्या, माझ्या एका मित्राने या बाबत मला काही प्रश्न विचारले. त्याच्या मनातले बहुतेक प्रश्न आपण सर्वांच्याच मनात डोकावत असेल. म्हणून विचारलेल्या प्रश्नांचे समाधान कारक उत्तर देण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे.

पहिला पाऊस पडल्याबरोबरच मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. हिरव्यागार वस्त्रांनी नटलेली धरती, हिरव्या शालू नेसलेली भारतीय परंपरेत वाढलेल्या नववधू सारखी दिसते. पतिदेवांच्या  पहिला-पहिला स्पर्श होताच, आपली भारतीय नववधू लज्जेने चूर-चूर होते. तेंव्हा तिच्या गालावर सुंदर-सुंदर खड्डे पडतात. खड्डे पडलेल्या सुंदर, मोहक आणि मादक पत्नीस पाहून, पतीदेव तिच्या वर प्रेमाचा वर्षाव करणारच.  त्याच बरोबर गालावर लज्जेचे खड्डे ही अधिक पडणारच. 


आपले रस्ते ही आपल्या भारतीय परंपरेला जपणारे आहेत. कितीही डाबर किंवा सिमेंट कांक्रीटनी बनलेले असो, पाऊसाचा प्रथम प्रेमळ स्पर्श झाल्या बरोबरच, नववधू सारखे रस्ते लज्जेने चूर-चूर होतात आणि त्यांचा गालावर खड्डे पडतात. रस्त्याचं हे सुंदर मोहक रूप पाहून, प्रेमाचा पूर हा रस्त्यावर वाहणारच आणि मोठ्या संख्येने रत्यावर खड्डे ही पडणारच. त्यात नवल काय?  पुन्हा प्रश्न उभा राहतो, आपल्याच देशात रस्त्यांवर खड्डे का पडतात? पाश्च्यात देशांत का नाही? उत्तर सोपे आहे, पाश्चात्य देशांत, जिथे लोकांना सार्वजनिक प्रेम प्रदर्शन करण्याची मुभा आहे. तिथली नववधू पहिल्या रात्रीत लाजत नाही आणि तिच्या गालावर खड्डे ही पडत नाही. मग प्रेम वर्षावाचा प्रश्नच येत नाही. प्रेमाच्या अभावी त्यांचा संसार ही फार काळ टिकत नाही.(हा वेगळा भाग आहे). मुद्दा हा, तिथले रस्ते ही तिथल्या स्त्रीयांसारखे लज्जेहीन असतात,  मग त्यांच्या गालांवर खड्डे पडणार तरी कसे?

माझ्या मित्राने पुहा प्रश्न विचारला, पाऊसाचे आणि रस्त्यांचे प्रेम -बीम हे सर्व ठीक आहे. पण त्यांच्या प्रेमाचे परिणाम आपल्याला का भोगावे लागतात? दरवर्षी कित्येक वाहने खड्यात पडतात, कित्येक लोक जखमी होतात, कित्येकांची तर थेट  रवानगी देवाघरी होते. शिवाय दररोज होणारऱ्या ट्राफिक जाम मुळे कार्यालयात पोहचायला उशीर होतो व घरी यायला ही.


मी उतरलो, दोन जीव प्रेमात मग्न असताना, त्यांना त्रास देणे योग्य नाही. अशा वेळी रस्त्यांवर जाणे म्हणजे त्यांचा प्रेमात बाधा उत्पन्न करणे होय. प्रेमी जीवांना त्रास देणाऱ्यांना देव क्षमा करत नाही. अश्या लोकांना परिणाम भोगावेच लागतात. त्यात रस्त्यांचा काय दोष. पाऊस सुरु असताना चक्क दांडी मारून घरी बसावे हेच योग्य. म्युनिसिपाल्टी ने किती ही खड्डे बुजविले तरी ही प्रत्येक पाऊसात रस्त्यांच्या गालावर खड्डे हे पडणारच कारण पाश्चात्य स्त्रियांप्रमाणे आपल्या रस्त्यांनी लज्जा सोडलेली नाही. पाऊस आल्यावर त्यांचा गालावर खड्डे हे पडणारच उगाच म्युनिसिपाल्टी किंवा रस्त्याला शिव्या देण्यात अर्थ नाही. प्रारब्धाचा स्वीकार करावा हेच योग्य. असो

1 comment:

  1. Very well said. Given pathetic state of our roads, we do need some sense of humor to live with it :)

    ReplyDelete