मानवी मनाच्या दुर्गुणांमध्ये
‘मत्सर’ (ईर्ष्या किंवा जळफळाट) हा सर्वात घातक विषारी विकार आहे. अथर्ववेदातील हा
सूक्त मानवाला आत्मपरीक्षण करण्याचा आणि मत्सररूपी विकाराला मनात उमलताच मुळासकट
उपटून नष्ट करण्याचा सखोल आध्यात्मिक व मानसिक संदेश देतो. वेद आपल्याला सावध
करतात की, मत्सर इतरांचे वाईट करण्यापूर्वी स्वतः आपलीच आंतरिक शांती
आणि सारासार विवेक भस्म करून टाकतो. अथर्ववेदात ऋषि म्हणतात,
ईर्ष्याया ध्राजिं प्रथमां
प्रथमस्या उतापराम्।
अग्निं हृदय्यं शोकं तं ते
निर्वापयामसि॥ (अथर्ववेद ६/१८/१)
दुसऱ्याची प्रगती, यश किंवा आनंद पाहून आपल्या मनात जी मत्सराची ठिणगी पडते, तिच्या पहिल्या तीव्र वेगाला आपण लगेच शांत केले पाहिजे. जर
काही कारणास्तव तो पहिला आवेग थांबला नाही, तर त्यानंतर निर्माण होणाऱ्या
दुसऱ्या आवेगाला तरी निश्चितच शांत केले पाहिजे. हे माणसा! तुझ्या अंतःकरणात
धगधगणारी ही मत्सराची आग आणि त्यातून उत्पन्न होणारा शोक-संताप आम्ही पूर्णपणे
विझवून शांत करतो.
पहिल्या
ओळीत ऋषि म्हणतात, ‘ईर्ष्याया ध्राजिं प्रथमां
प्रथमस्या उतापराम्’ मत्सर एका प्रचंड झंझावाताप्रमाणे
मनात प्रवेश करतो. जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा सहकाऱ्याला पुढे
जाताना पाहतो, तेव्हा मनात पहिला विचार सहजपणे
मत्सराचा किंवा तुलनेचा येऊ शकतो. मंत्र सांगतो की, त्या
पहिल्या आवेगाला (झटक्याला) तिथेच रोखा. जर तो विचार अनावधानाने मनात रुजलाच, तर त्यातून निर्माण होणारी दुसरी मंद किंवा कायमस्वरूपी
भावना (द्वेष, षड्यंत्र) तरी कोणत्याही
परिस्थितीत विझवून टाकली पाहिजे.
कार्यालयात (Office) जेव्हा तुमच्या सहकाऱ्याला बढती मिळते, तेव्हा "ही मला का नाही मिळाली?" असा पहिला विचार मनात डोकावू शकतो.
हा पहिला आवेग आहे. समजूतदार व्यक्ती लगेच
स्वतःला समजावते की, "त्याने मेहनत केली, त्याला फळ मिळाले; मीही अधिक प्रयत्न करेन." अशा प्रकारे तो पहिला आवेग शांत होतो. मात्र जो
स्वतःवर ताबा ठेवत नाही, तो मनातल्या मनात जळफळत राहतो आणि
हळूहळू त्या सहकाऱ्याविरुद्ध कटकारस्थाने रचू लागतो.
ऋषि पुढे म्हणतात, ‘अग्निं हृदय्यं शोकं तं ते निर्वापयामसि’ मत्सर ही बाहेर नसून हृदयाच्या आत धगधगणारी आग आहे. ही आग
केवळ समोरच्या व्यक्तीलाच नाही, तर सर्वात आधी त्या मत्सरी
माणसालाच मानसिक संताप, तणाव आणि दुःखात लोटून देते. वेद
सांगतात की, ही अंतर्गत आग तातडीने विझवणे हेच
कल्याणकारी आहे.
मत्सराने ग्रासलेल्या माणसाचे
खाणेपिणे आणि झोप उडते. दुसऱ्याची प्रगती पाहून तो दिवस-रात्र स्वतःच दुःखी राहतो.
हळूहळू त्याचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडू लागते, रक्तदाब, नैराश्य, निद्रानाश इत्यादि व्याधींनी तो ग्रस्त होतो. मत्सराच्या आगीत तो स्वत:च विनाश ओढवून घेतो. वआपल्या
आप्तेष्टांची, मित्रांची किंवा सहकाऱ्यांची
प्रगती पाहून आनंद वाटणे हे निरोगी मानसिकतेचे लक्षण आहे. परंतु जेव्हा माणूस
मत्सराने पछाडला जातो, तेव्हा त्याचा विवेक नष्ट होतो:
समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या
कर्तृत्वाने किंवा कष्टाने यश मिळवले आहे, हे तो मान्यच करू शकत नाही.
"त्याने नक्कीच काहीतरी गैरमार्ग अवलंबून प्रगती केली असणार," असे तो गृहीत धरतो. तो नकारात्मक विचाराने ग्रस्त होऊन अकार्यक्षम
बनतो. नौकरी धंद्यात अपेशी ठरतो.
मत्सराचे रूपांतर हळूहळू द्वेषात
आणि नंतर सूडबुद्धीत होते. समोरच्या व्यक्तीची प्रतिमा डागाळण्यासाठी तो खोटा
प्रचार करू लागतो, त्याच्या मार्गात अडथळे निर्माण
करतो आणि शेवटी त्याचे वैभव नष्ट व्हावे अशी इच्छा बाळगू लागतो. ही अवस्था माणसाला
नैतिकदृष्ट्या पूर्णपणे अधःपतित करते. आजकाल तर सोशल मीडियावर अश्या खोट्या बातम्यांचा
पूर आलेला आहे.
कधी कधी
मत्सर केवळ व्यक्तीपुरता मर्यादित
नसतो; तो सामूहिक आणि बौद्धिक पातळीवर देशविरोधी रूपही धारण करतो.
जेव्हा एखादा देश स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी होऊ लागतो, तेव्हा काही संकुचित प्रवृत्ती आणि विरोधी शक्तींना ती
प्रगती पचनी पडत नाही.
भारताच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा
स्वावलंबन आणि ऐक्याची चर्चा झाली, तेव्हा अंतर्गत मत्सर आणि संकुचित
विचारांनी देशाचे मोठे नुकसान केले. जयचंदसारखी ऐतिहासिक मानसिकता याच गोष्टीचा
पुरावा आहे, जिथे स्वतःच्याच शेजारील राज्याची
प्रतिष्ठा सहन न झाल्यामुळे परकीय आक्रमकांना आमंत्रण दिले गेले.
#अथर्ववेद #वैदिकदर्शन #मानवमनोविज्ञान #ईर्ष्या #आत्मनिर्भरभारत #राष्ट्रनिर्माण #विचार
प्रतिकृया अवश्य द्या।
No comments:
Post a Comment