Tuesday, September 8, 2026

दासबोध: - दशक १७, समास ६, देहात्मनिरूपण

 

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या सतराव्या दशकात "प्रकृतिपुरुष" हा विषय हाताळला आहे. जड सृष्टी म्हणजे प्रकृती आणि चैतन्य म्हणजे पुरुष अर्थात आत्मा. यांचा संबंध. समर्थ देहात्मनिरूपण समासात सांगतात की जो पर्यन्त जीवात्मा हा देहाशी जोडलेला (देहबुद्धीयुक्त) असतो, तोपर्यंत त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यू, वार्धक्य, रोग हे सर्व भोगावेच लागते. मग प्रश्न येणारच देह बंधंनातून जीवत्म्याला मुक्ति काशी मिळणार. मग आपल्या शरीरात आत्मा आपण कसा ओळखणार.
 
मुंडूक उपनिषद मध्ये ऋषि म्हणतात: द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते । ...अर्थात दोन सुंदर पक्षी नेहमी एकत्र राहणारे, परस्परांचे जिवलग मित्र (सखा) असलेले एकाच वृक्षावर बसलेले असतात. त्यांतील एक पक्षी त्या वृक्षाची गोड-कडू फळे चाखत राहतो, म्हणजे सांसारिक सुख आणि दुख भोगत राहतो; तर दुसरा पक्षी कोणतेही फळ न खाता, केवळ शांतपणे पाहत राहतो, साक्षीभावाने. हा वृक्ष म्हणजे शरीर. जो पक्षी फळे खात राहतो तो म्हणजे मनाने अर्थात देहबुद्धीने बांधलेला जीवात्मा, सुख-दुःखांचा भोक्ता, कर्मफळांत गुंतलेला "मी". जो पक्षी न खाता निव्वळ पाहत राहतो तो म्हणजे परमात्मा. कर्मबंधनातून मुक्त होऊन आपल्याला परमात्म्याशी जवळीक साधायची आहे. या समासात हाच भाव सामान्य माणसाला समजणार्‍या भाषेत समर्थांनी सांगितलं आहे.
 
या दोन पक्ष्यांचे उदाहरण आजच्या भाषेत सांगायचे झाले तर, आपण एखादा चित्रपट पाहताना ज्याप्रमाणे पडद्यावरील घटनांशी भावनिकरीत्या इतके गुंततो की स्वतःला त्या कथेचाच भाग समजू लागतो, तो झाला "फळ चाखणारा" पक्षी. पण जेव्हा चित्रपट संपतो आणि आपण थिएटरबाहेर येतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण फक्त 'प्रेक्षक' होतो, कथेतील पात्र नव्हतो. हा जो 'साक्षीभाव' आहे, तोच दुसरा पक्षी म्हणजे परमात्मा.  रोजच्या आयुष्यात राग, मत्सर, मोह यांच्या प्रसंगी आपणही अनेकदा 'पात्र' बनून जातो; पण थोडे थांबून, श्वास घेऊन 'हे माझ्या मनात घडते आहे, मी ते फक्त पाहतो आहे' असे जाणणे,  हाच साक्षीभावाचा सराव आहे.
 
"आत्मा देहाअध्यें असतो नाना सुखदुखें भोगितो
सेवटीं शरीर सांडून जातो येकायेकीं "
 
आत्मा शरीरात राहतो, त्याच्याद्वारे सुख-दुःखे भोगतो आणि शेवटी अचानक शरीर सोडून निघून जातो. देह हे तात्पुरते वास्तव्यस्थान आहे, कायमचे घर नाही. समर्थ पुढे म्हणतात,
 
"ऐसा दों दिसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म
नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतला "
 
हा दोन दिवसांचा, क्षणभंगुर भ्रम आहे, त्यालाच लोक परब्रह्म समजून बसतात आणि नाना प्रकारच्या सुख-दुःखाच्या गोंधळालाच "मी" म्हणून स्वीकारतात. हे आजच्या सोशल मीडियावरील "परफेक्ट लाईफ"सारखेच आहे. फोटो, लाईक्स, रील इत्यादि पाहून दुसर्‍यांना आपले खरे स्वरूप कळणे शक्यच नाही. आपल्यालाही वाटते तेच "आपण" आहोत. पण उद्या तब्येत बिघडली किंवा परिस्थिती पालटली, तर ती ओळखच कोसळते. आपल्या खर्‍या स्वरूपाशी आपला साक्षात्कार होतो.
 
उदाहरणार्थ, एखाद्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचे हजारो फॉलोअर्स असतात, त्याचे आयुष्य 'परफेक्ट' भासते. पण त्याच व्यक्तीला जर अचानक एखादा गंभीर अपघात झाला, किंवा नात्यात मोठा तुटवडा आला, तर तेच फॉलोअर्स, त्या लाईक्स, कोणीही प्रत्यक्ष दुःखात सोबत देऊ शकत नाहीत. ती चकचकीत प्रतिमा ही केवळ एक क्षणभंगुर मुखवटा असते; आतला खरा 'मी' त्या प्रतिमेपेक्षा वेगळाच असतो, हे तेव्हा उमगते.
 
समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात वर्णन केलेले संसारिक सुख-दुःखांचे स्वरूप मानवी देह आणि त्याच्या मर्यादांवर आधारित आहे. तरुणपणी शरीरात ताकद आणि सौंदर्य असते, तोवर माणूस नानाविध भौतिक सुखे उपभोगतो आणि स्वतःचे अस्तित्व, पद किंवा सौंदर्याच्या गर्वात वावरतो. मात्र, वृद्धापकाळात किंवा प्रतिकूल परिस्थितीत हेच शरीर अशक्त होते, अवयव साथ देईनासे होतात आणि माणूस इतरांवर अवलंबून राहतो. दैनंदिन आयुष्यातही पूर्ण सुख कधीच मिळत नाही; जुन्या काळात ढेकूण, माश्या आणि उंदरांचा त्रास जसा माणसाला छळायचा, तसाच आजच्या काळात वीज जाणे, भेसळयुक्त अन्न, कामाचा ताण, क्रेडिट कार्ड आणि किस्त देण्याची चिंता किंवा नात्यांमधील दुरावा यांसारख्या रोजच्या लहान-मोठ्या समस्या माणसाला अस्वस्थ करतात.
 
याचे आणखी एक साधे उदाहरण म्हणजे, नोकरीच्या सुरुवातीच्या काळात तरुण मंडळी नवीन पगारात मोठी स्वप्ने रंगवतात,  नवी गाडी, मोठे घर, परदेशवारी. पण काही वर्षांनी हप्ते (EMI), मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांची काळजी, आणि कामाच्या ठिकाणची स्पर्धा यांचे ओझे वाढत जाते. जे सुख कमावण्यासाठी इतकी धावपळ केली, तेच सुख हाती येईपर्यंत नवीन चिंता निर्माण होतात. हाच 'दों दिसांचा भ्रम' आहे.  सुख मिळाल्यासारखे वाटते, पण ते टिकत नाही, त्याची जागा लगेच दुसरी चिंता घेते.
 
मृत्यूसमयीचे साम्य
 
पुढे समर्थ सांगतात मृत्यूसमयीचे दैन्य व लाचारी श्रीमंत-गरीब किंवा राजा-रंक सर्वांना सारखीच असते. देहावर उभी असलेली प्रतिष्ठा, मग ती आजच्या भाषेत बँक बॅलन्स असो, सोशल मीडियावरचा स्टेटस असो, की शारीरिक सौंदर्य असो, शेवटी काहीही टिकत नाही. मृत्यूचा क्षण अत्यंत कठीण असतो; शरीरातून प्राण सहज जात नाहीत. म्हणूनच अज्ञानात न राहता, या नश्वर देहालाच सर्वस्व मानणाऱ्या 'देहबुद्धीच्या' पलीकडे जाऊन शाश्वत तत्त्वाकडे (आत्मज्ञानाकडे) लक्ष द्यावे, हाच समासाचा सार आहे.
 
तरुणपणी सुखांचा उपभोग घेत तो स्वतःची किंमत या नश्वर गोष्टींमध्येच शोधत असतो. पण वयाच्या उत्तरार्धात किंवा अचानक आलेल्या एखाद्या गंभीर आजारपणात हे चित्र पूर्णपणे बदलते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमुळे ते ग्लॅमर ओसरते, सोशल मीडियावरील फॉलोअर्स आणि डिजिटल स्टेटस त्याला आजाराच्या वेदनेतून वाचवू शकत नाहीत. अचानक कंपनीत 'ले-ऑफ' झाला किंवा नोकरी गेली, तर ती प्रतिष्ठा एका रात्रीत निघून जाते. गंभीर आजारपणात जेव्हा आयसीयूमध्ये (ICU) व्हेंटिलेटरवर पडून राहावे लागते, तेव्हा कोट्यवधींचा बँक बॅलन्स असणारा श्रीमंत असो वा सामान्य व्यक्ती, मृत्यूसमयीचे दैन्य आणि लाचारी दोघांसाठीही अगदी सारखीच असते. आयुष्यभर ज्या देहाला, सौंदर्याला आणि पदाला तो स्वतःचे अस्तित्व ('मी') समजत होता, ते किती क्षणभंगुर होते याची जाणीव त्याला शेवटी हताश झाल्यावर होते. देहावर आधारित सुख आणि अहंकार हे शेवटी असमाधान आणि दुःखातच संपतात, हेच यावरून स्पष्ट होते.
इतिहासातही याची अनेक उदाहरणे सापडतात. मोठमोठे सम्राट, ज्यांच्या एका आदेशावर लाखो लोकांचे भवितव्य ठरत असे, तेही शेवटी एका साध्या तापाने किंवा वृद्धापकाळाने खितपत पडलेले दिसतात. आजच्या काळातही, मोठमोठ्या उद्योगपतींना किंवा सेलिब्रिटींना जेव्हा गंभीर आजार होतो, तेव्हा त्यांचे पैसे उत्तम उपचार मिळवून देऊ शकतात, पण मृत्यूचा अंतिम क्षण, ती शारीरिक वेदना आणि हतबलता टाळू शकत नाहीत. यावरून हेच सिद्ध होते की देहावर आधारित कोणतीही श्रीमंती किंवा प्रतिष्ठा शेवटी तात्पुरतीच ठरते.
 
कर्मयोगाचा मार्ग
 
जर देवाने आपल्याला देह दिला आहे तर सुख आणि दुख येणारच मग माणसाने या जगात जगावे कसे भगवद्गीतेत भगवंत म्हणतात:
 
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि
 
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कर्तव्यकर्म करताना त्याच्या फळाची (सुख मिळेल की दुःख, जिंकू की हरू) चिंता न करता, समबुद्धीने कर्म करावे. हीच स्थितप्रज्ञतेची सुरुवात आहे. मन सुख-दुःखाच्या हेलकाव्यांपासून अलिप्त राहिले, तरच खरी शांती आणि कर्मयोग साधतो. आपल्या आत्म्याशी आपली ओळख होते.
 
याचे एक व्यावहारिक उदाहरण म्हणजे एखादा खेळाडू. सामना जिंकणे किंवा हरणे हे त्याच्या हातात पूर्णपणे नसते.  प्रतिस्पर्धीचा खेळ, नशीब, पंचांचे निर्णय असे अनेक घटक कारणीभूत असतात. पण जो खेळाडू केवळ स्वतःच्या सरावावर, तंत्रावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो, आणि निकालाची फारशी चिंता न करता खेळत राहतो, तोच दीर्घकाळ स्थिर राहतो आणि खरा आनंद घेतो. हरल्यावर कोसळत नाही आणि जिंकल्यावर हुरळून जात नाही. हीच वृत्ती स्थितप्रज्ञतेच्या जवळ जाणारी आहे.  फळाची आसक्ती सोडून कर्तव्य चोख करणे.
 
देहात्मनिरूपण समासात समर्थांनी एकच मूलभूत सत्य वेगवेगळ्या उदाहरणांतून संगितले आहे. देह हा नाशवंत, बदलणारा आणि सुख-दुःखाने भरलेला आहे, आणि याच देहाशी बांधलेल्या, सतत सुख-दुःखात हेलपाटणाऱ्या जीवभावालाच अज्ञानी लोक चुकून "परब्रह्म" किंवा आपली खरी, कायमची ओळख समजून बसतात. परब्रह्म म्हणजे आपले खरे, शाश्वत स्वरूप. कधीही नाश न पावणारे, दुःखरहित आणि स्तुती-निंदेच्या पलीकडचे आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, आपण देह, त्याची सुख-दुःखे आणि त्यावर आधारित तात्पुरत्या ओळखी यांना अवाजवी महत्त्व न देता, त्यांच्या पलीकडे असलेल्या स्थिर आत्मतत्त्वाकडे विवेकाने लक्ष द्यावे. साधकाला जर जन्म मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त व्हायचे असेल तर, मृत्यू येण्यापूर्वी आपले मन देहातून काढून घ्यावे आणि मुक्त व्हावे. हाच खरा आत्म साक्षात्काराचा मार्ग आहे. समर्थांच्या शब्दांत:
 
ऎसें जयास ज्ञान जालें तयाचें बंधन तुटलें
येरां नसोनीच जडलें सदृढ अविवेकें ॥१४॥(आत्माराम)
 
असा ज्याला स्वरूपसाक्षात्कार झाला त्याचे सर्व बंधन तुटलें, तो मुक्त झाला. हे बंधन वास्तविक नसून केवळ काल्पनिकच असल्याने, खरे पाहता कोणालाच ते नाही. परंतु अज्ञानाने 'मी जीव मज बंधन' या अविवेकाच्या भ्रांतीने, या जीवांनी आपल्याला संसारात दृढ बांधून घेतले आहे.
 
याचे एक सोपे उदाहरण म्हणजे स्वप्नात एखाद्याला वाघाने पकडले आणि तो घाबरून ओरडतो, घाम फुटतो.  पण जागा झाल्यावर त्याला कळते की तो वाघ, ती भीती, सगळे स्वप्नातलेच होते, प्रत्यक्षात काहीच घडले नव्हते. त्याचप्रमाणे देहबुद्धीचे बंधन हे एक प्रकारचे 'जागृत स्वप्न' आहे. ज्याला आत्मज्ञान होते, तो या स्वप्नातून जागा होतो आणि त्याला कळते की बंधन कधी खरे नव्हतेच,  ते फक्त अज्ञानामुळे खरे भासत होते. हीच समर्थांची शिकवण आजच्या काळातही तितकीच लागू पडते: बाह्य गोष्टींच्या मागे धावताना, आपल्या आतल्या शाश्वत, अविनाशी स्वरूपाचा विसर पडू देऊ नये.

No comments:

Post a Comment