Monday, April 15, 2019

कीर्तीसाठी मी मैफिलकर झालो.


स्वामी त्रिकालदर्शी ध्यानस्थ बसले होते. मी हात जोडून त्यांचे डोळे उघडण्याची वाट पाहत बसलो होतो. मनात विचारांचे काहूर उठले होते. कारण हि तसेच होते. गेल्या आठवड्याची गोष्ट. मोहल्यात  एक लग्न होते. साहजिक मीहि सौ. सोबत लग्नाला गेलो होतो. माझी ओळख करून देताना एक सद्ग्रहस्थ वदले "हे सौ. .. चे मिस्टर आहेत". तीस वर्ष या मोहल्यात वास्तव्य असूनही शेजार्यांना माझे नाव देखील ठाऊक नाही. मनाला किती वेदना झाल्या हे सांगणे कठीण. काल रात्री तर कहरच झाला. कार्यालयातून घरी परतायला उशीर झाला. मोह्ल्यातील कुत्रे एरवी येणाऱ्या-जाणार्यांवर भुंकतात पण त्यांनीहि माझी दखल घेतली नाही. कुत्र्यांच्या भुंकण्याची लायकी हि आपली नाही. जगणे व्यर्थ वाटू लागले.

समर्थ म्हणतात, "मरावे परी कीर्तिरुपी उरावे". इथे जीतेजी कुणी ओळखत नाही,  तिथे मेल्यावर कुणाला आपले स्मरण होणार.  काय करावे जेणेकरून आपले नाव काही काळ तरी लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. मन बैचैन झालेले होते. तेवढ्यात स्वामीजींनी डोळे उघडले, माझ्याकडे बघत म्हणाले, काय विवेक प्रसिद्धी ध्यास लागला आहे वाटते. 

मी म्हणालो, "स्वामीजी, आपल्यापासून काय लपले आहे,  प्रत्येकाला वाटते जगात नाव झाले पाहिजे, मला हि वाटते". 


स्वामीजी मंद हसले आणि म्हणाले, देशात निवडूणुकीचे वारे वाहत आहेत, निवडणूक लढव. 

"स्वामीजी, जिथे मोहल्यात कुणी ओळखत नाही, तिथे निवडणुकीचे तिकीट कोण देणार". 

मग असे कर, एखादी शाळा, अनाथालय किंवा धर्मशाळा बांध, जगी नाव होईल.  

"स्वामीजी, कशालाहो थट्टा करता गरीबाची. सरकार फक्त दाल-रोटी निघेल एवढाच पगार देते". 

मन्जे तुला प्रसिद्धी पाहिजे, तेही  पैका न खर्च करता?

"होय स्वामीजी, मला फक्त प्रसिद्धी पाहिजे. पैका नाही मिळाला तरी चालेल". 

मग एखादी कला अवगत आहे का? संगीत, नृत्य, चित्रकला इत्यादी...

"स्वामीजी, आता साठी जवळ आली आहे, संगीत नृत्य इत्यादी शिकण्याची वेळ निघून गेली आहे. चित्रकलेचे म्हणाल तर जास्तीसजास्त आडव्या-तिरप्या रेखा कागदावर रखडण्या व्यतिरिक्त काही अधिक येत नाही". 

स्वामीजी हसले, म्हणाले, हे हि पुरेसे आहे, आजच्या काळात कुणालाहि न कळणार्या चित्रांनांच जास्त वेल्यू आहे. फक्त त्या चित्रांना विवादास्पद नाव दे, पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतील. 

स्वामीजींचे बोलणे ऐकून खरे म्हणाल तर मला रागच आला, पण उसने अवसान आणून म्हणालो, "स्वामीजी, विवादांपासून मला दूरच ठेवा, आजकाल असहिष्णुता लई वाढली आहे. त्यात मी सिंगल हड्डी. जान जोखीम मध्ये टाकून मला प्रसिद्धी नको".

स्वामीजी जोरात हसले म्हणाले, बच्चा तुझी फिरकी घेत होतो. उगाच त्रागा करू नकोस, सौपा उपाय सांगतो, तू लेखक आणि  कवी हो, थोडेफार नाव निश्चित होईल.  

स्वामीजींना मध्येच तोडत मी म्हणालो, "स्वामीजी एक तर मला लिहिता येत नाही. दुसरे त्यातहि खिश्यातील ४० ते ५० हजार खर्च केल्यावर दोनशे तीनशे पानी पुस्तकच्या हजार एक प्रती छापल्या तरीही ती वाचणार कोण?  आजकाल पुस्तके, त्यातहि मराठी पुस्तके लोक विकत घेत नाही. मित्रांना, परिचितांना फुकट वाटली तरी ते वाचणार नाही. याची शंभर टक्के खात्री आहे. ती सरळ रद्दीत जातील".  

स्वामीजी म्हणाले, "बच्चा आधी मी काय म्हणतो तेपूर्ण ऐक. तुझ्यासाठी योग्य ठिकाण शोधले आहे. इनस्टेंट प्रसिद्धी मिळेल. गुगलवर अनेक  स्वयंसिद्ध लेखूकांनी  व्हाट्सअप ग्रुप तैयार केले आहेत. अश्याच एखाद्या  ग्रुपची सदस्यता ग्रहण कर. तिथे अनेक स्वयंसिद्ध लेखक/कवी  लेख आणि कविता टंकतात. फक्त एक गोष्ट लक्ष्यात ठेव, आवडो न आवडो, दुसर्यांचे लेख आणि कविता  लाईक कर. जेवढ्या जास्त तू दुसर्यांच्या कविता आणि लेख  लाईक करेल बदल्यात तुझ्या  निरर्थक लेखांनाहि  लाईक मिळतील.  काही काळातच,  किमान  शंभर ते  हजार लोक  तुला ओळखू लागतील. 

स्वामीजींचा आशीर्वाद घेतला. घरी आलो मोबाईलवर ग्रुप शोधू लागलो. "मैफिल ग्रुप" सापडला. लगेच सदस्यता घेतली. पाहू किती कीर्ती मिळते ते. 





1 comment:

  1. छान लिहिले आहे. आधी समाधानाचा आनंद,पाठोपाठ प्रसिद्धीचा आनंद!

    ReplyDelete