Saturday, October 27, 2018

सुरक्षा विमा आहे, साहेब?


कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा  बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता. रिक्षा चालकाने लगेच उत्तर दिले, साहेब विमा घेतलेला आहे, काळजी करू नका. चालक शेजारी बसलेला माणूस उद्गरला, गाढवा विम्याचे पैशे तू मेल्यावर तुझ्या बायकोला मिळतील आणि त्या पैश्याने ती तुझ्या सारखाच एक गाढव नवरा पुन्हा विकत घेईल. एकच हशा रिक्षात पिकला.  

काही वेळ विचार करून रिक्षा चालक म्हणाला, साहेब मला दोन मुले आहेत, सरकारी शाळेत शिकतात. बायको तीन-चार घरी झाडू-पोंंछा करून चार-पाच हजार घरी आणते. मला काही झाले तर, विम्याचे पैशे पोरांच्या शिक्षणाच्या कामी येतील, असा विचार करून मी बँक खाते उघडले आणि विमा हि घेतला.  त्याच्या उत्तराने आम्ही सर्व निरुत्तर झालो. 

घरी येऊन विचार केला. बँक खाते आणि १२ रुपयात मिळणारा सुरक्षा विमा, गरीब आणि अडाणी माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत  क्रांती घडवितात आहे. तो हि आता आपल्या परिवाराचा, मुलांचा भविष्याचा सकारात्मक रूपेण विचार करू लागला आहे. 

No comments:

Post a Comment