Saturday, January 18, 2014

संक्रांति ऋतू परिवर्तन


दिनांक: १८.१.२०१४. 

संक्रांति दरवर्षी जनवरीच्या १४ किंवा १५ तारखेला येते. त्या पूर्वी दिल्लीच्या कुडकुडत्या हिवाळ्यात माणूस काय, लेखणी ही जमून जाते. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होतो. संक्रांति पासून  मोठा होणारा दिवस जाणवू लागतो. सकाळी थंड  कोरडे वारे  आणि दुपारी सूर्याच्या उन्हात थोडी उष्णता जाणवते. पर्वतांवर बर्फ वितळू लागते. उत्तरेकडून येणारे वारे सुरु होतात ते शिवरात्री पर्यंत ४० दिवस राहतात याला ‘चिल्ला जाडा’ असे म्हणतात.  धुक्याचा परदा दूर होतो. शेतांत सरसोंला(मोहरी) फुले येतात. दूरपर्यंत पिवळा गालीचा पसरलेला सहज दिसतो. जुनी पाने गळून पडतात, झाडांना नवे कोंब फुटतात जणू धरती वसंताच्या स्वागतास सज्ज होते आहे. कालपासून  ढगाळ वातावरण  असल्यामुळे बाहेर थंडी आहे, तरी ही एक उत्साह मनात निर्माण झाला. आज सकाळी लवकर अंघोळ केली आणि सकाळी मनात आलेले विचार (क्षणिका) टंकित करू लागलो.


(१)
रात्रीची विराणी
धुक्यात विरली
प्रेमाची गाणी
ओठांवर आली.

(२)
धुक्यातुनी डोकावली
गुलाबाची कळी
प्रेमाची लाली
गालावर पसरली.

 (३)
हळद  लाउनी
धरती नटली
लेक लाडकी
निघाली सासरी.

No comments:

Post a Comment