Friday, September 25, 2015

शिवस्वरूप खंडोबा - " एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"





इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l
एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुः
l

(ऋग्वेद १/१६४/४६)



[सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणी गॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि]. 



आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवनचरित्रावर मालिका सुरु आहे. मालिकेत खंडेराय हे महादेवाचे अवतार आहे, असे दाखविले जाते.  खंडेराय हे धनगर समाजातले होते. काहींच्या मते देत्यांचा राजा बळी यांनी खंडेरायांना जेजुरीचे क्षेत्रपाल नेमले होते. एक मात्र खंर, शेकडों/ हजारों वर्षांपासून लोक त्यांची पूजा करतात, त्या अर्थी त्यांनी आपल्या आयुष्यात काही भव्य-दिव्य केल असेल. आपल्या प्रजेला निश्चित सुखी ठेवले असेल. काही तथाकथित पुरोगाम्यांना वाटते, मालिकेत खंडेरायाचे चरित्र विकृत करून दाखविले जात आहे. त्यांना हे सर्व ब्राह्मणी षड्यंत्र वाटते. पण मला तर वाटते या अतिविद्वान लोकांना देशाच्या मूळ सर्वसमावेषक संस्कृती बाबत कुठलेहि ज्ञान नाही. 



आसेतु हिमालय पर्यंत पसरलेला हा विस्तृत आणि विशिष्ट भूभाग भारत भूमी म्हणून वैदिक काळापासून ओळखला जातो. प्राचीन काळापासून विभिन्न जनजाती समूह इथे एकत्र नांदत आहे. त्यांची जात-पात भाषा वेगळी तरी त्यांचे आणि भारत भूमीचे भविष्य सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे, हे प्राचीन  वैदिक ऋषींनी ओळखले होते. एकत्र राहण्यासाठी सर्वाना आपल्यात समावून घेणे गरजेचे. त्या साठी सर्व जमाती आणि जातीय समूहांच्या परंपरेचा सम्मान करणेहि गरजेचे.





ईश्वराची कल्पना सर्व जातीय समूहांनी आपापल्या परीने वेगवेगळी केली. कुणी आपल्या पूर्वजांना ईश्वर मानले, कुणी प्रकृतीला ईश्वर मानले, कुणी सर्पांची पूजा करायचे तर कुणी लिंग पूजा करायचे, तर कुणी वृक्षांना देवता मानायचे.  हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी". पण सर्वांचा उद्देश्य एकच, सत्य मार्गावर जाण्यासाठी भगवंताच्या कृपेची प्राप्ती. 



हे ओळखूनच कदाचित् उपनिषदकरांनी, ईश्वराची नवीन संकल्पना पुढे आणली.  



यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।

सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥

(ईशान उपनिषद /६)



जो सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पाहतो, तो कुणाचा हि द्वेष करीत नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा निवास आहे. तात्पर्य ईश्वराच्या प्रत्येक स्वरुपाची  पूजा उपासना करताना आपल्या इष्ट देवताची कल्पना त्या ईश्वरीय स्वरुपातहि करू शकतो.



भगवंतानी गीतेत हीच भावना रोखठोक शब्दात सांगितली ते म्हणतात, अर्जुन, मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. मीच विष्णू आहे, मीच शंकर आहे, कुबेर आहे, अग्नि आहे, मेरू पर्वत आहे, कार्तिकेय आहे, महासागर आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे, अश्वांमध्ये उचैश्रवा आहे, गजेंद्रामध्ये ऐरावत आहे आणि  सुरभी गायहि  आहे. मी सर्पांमध्ये वासुकी आहे, नागांमध्ये अनंत नाग आहे, वरुण आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, .....अर्थात त्या काळी माहित असलेल्या सर्व ईश्वरी स्वरूपांमध्ये एकच ईश्वर आहे हि भावना लोकांमध्ये रुजवली.



काळ पुढे गेला, भरतखंडात  जनसंख्या वाढली, नवे नवे विचार जन्मले आणि त्या सोबत देवतांची संख्याहि वाढत केली. प्रत्येकाला आपला देव हा श्रेष्ठ वाटणारच.  जिथे श्रेष्ठत्व तिथे भांडणेहि होणारच. आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश.  इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एकसुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषी मुनी आणि पुराणकारांनी केले.  सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला.  नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली.



पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात.   प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. अश्या अतिविद्वान लोकांना ‘खंडेराय’ मालिकेतहि षड्यंत्र दिसेल. पण ईश्वराला मानणारे आणि श्रद्धावंत लोक ‘खंडोबा’च्या स्वरुपात महादेवाचे दर्शन करतात आणि महादेवात खंडेरायांचे

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।




Wednesday, September 23, 2015

नेता


बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

त्याच्या 
एका हातात खंजीर आहे 
दुसर्या हातात 
नागाचा विषारी दंश आहे 



एका क्षणी  शिव्या देतो
दुसर्या क्षणी मधाळ बोलतो.
धृतराष्ट्री पुतळा तो
नेहमीच समोर ठेवतो. 

तो मित्र आहे कि शत्रू 
काहीच कळत नाही.
एक मात्र खरं
तो सीजर नक्कीच  नाही 
ब्रुटस असू शकतो  कदाचित्
किंवा 
  नेताहि असू शकतो.


Tuesday, September 15, 2015

पाऊस - वेगवेगळे रंग



संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलो. राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागलो.  भुरका-भुरका पाऊस पडत होता.   भुरक्या  पाऊसाचे एक चांगले आहे, आपल्याला पाऊसात भिजण्याचा आनंद हि मिळतो आणि आपण जास्त ओले चिंब हि होत नाही. नजरे समोर एक अंधुक आकृती दिसू लागली.  असेच एकदा तिच्या सोबत एका संध्याकाळी भुरका-भुरका  पाऊसाचा आनंद घेत नेहरू पार्कच्या हिरवळीवर फिरत होतो.... पण तो  पाऊस.... केंव्हाच हवेत विरून गेला..  किर्रर्र बाईक थांबण्याचा आवाज, मी हादरलोच.. अंकलजी कहाँ खोये हो, कम से कम रास्ता तो देख कर पार किया करो. सॉरी, मी पुटपुटलो.  हायसं वाटल.  पांढऱ्या डोक्यावरून हात फिरविला, एवढ्या वर्षानंतर हि तो ओलावा अजून हि जाणवत होता


मेट्रोत भीड होती. उभा राहून खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहत होतो. मेट्रोच्या वाढत्या वेगाप्रमाणे, पाऊसाचा जोर हि वाढला होता.  एका गच्चीवर  काही उघडबंब लहान मुले पाऊसात खिदळत होती. एकमेकांवर पाणी उडवीत होती.  अचानक  लहानपण आठवले. जुन्या दिल्लीच्या ज्या वाड्यात  आम्ही भाड्यानी राहत होतो, त्या वाड्याच्या मध्यभागी मोठे आंगण होते. फरशी ही सिमेंटची होती. पाऊसात आम्ही लहान मूले असेच खेळायचो.  भिजण्याचा आनंद घ्यायचो. चिंब भिजून घरी आल्यावर,   आईच्या हातचा गरमागरम आले टाकून केलेला कडक चहा प्यायला मिळायचा. कधी कधी चहा सोबत कांद्याची  भजी हि.  अग, आले टाकून कडक चहा करते का? सोबत कांद्याची भजी हि, बोलता बोलता...मी जीभ चावली.  काही नजऱ्या वळल्या , काहींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.  काही  कटाक्ष - ऐसी बरसात में कड़क चाय और कांद्याची भजी खाने दिल तो करेगा ही.  उम्र पचपन कि दिल बचपन का.   काही हि म्हणा बॉलीवूड मुळे मराठी भाषेतले अनेक शब्द सर्वश्रुत झालेले आहेत. 

घरी पोहचल्या वर, चहा पिता पिता मला टीवी बघायची सवय आहे.  आज पाऊसामुळे डिश टीवीचे सिग्नल येत नव्हते. टॅब उघडला,  व्हाट्स अॅप  जावई बापूनी काही फोटो पाठविले होते. हिमाचल येथील त्यांच्या गावाजवळ वादळ फाटले होते. अनेक लोक मृत्युमुखी पडले. घरदार नष्ट झाले, शेंकडो जनावरे पाण्यात वाहून गेली. विदारक दृश्य  होते ते.  धरणी मातेचे  लचके तोडणारा... नराधम...पाऊस.  कधी कधी  रौद्र रूप घेऊन प्रलयंकारी तांडव नृत्य हि करतो हा पाऊस. 


अखेर डिश टीवीवर सिग्नल यायला सुरु झाले. मराठी बातम्या पाहू लागलो.  भयंकर दुष्काळ, आत्महत्या आणि खिरापत हि......वरुणराजाची महाराष्ट्रावरच अवकृपा  का?   पण वरुणराजा तरी काय करणार  तो तर  देवराज इंद्राच्या हुकुमाचा ताबेदार. या इंद्राला  धडा शिकविला  पाहिजे.  वृन्दावनातल्या माखन चोराची आठवण आली.  इन्द्राएवजी त्याने गोवर्धनची पूजा मांडली. ब्रजमंडळात  ९९  तीर्थांची (सरोवरांची)  स्थापना केली.  इंद्राचा पराभव झाला. लहरी वरुणराजा हि सुतासारखा सरळ झाला.  मनात विचार आला, महाराष्ट्रातले कलयुगी कृष्ण काय करतात आहेत.  त्यांनी तर तीर्थांसाठी  ठेवलेला पैका, इंद्र दरबारात, सोमरस पीत अप्सरांवरच  लुटविला...... वरुणराजाला दोष देण्यात काय अर्थ आहे.  

विचार करता करता केंव्हा डोळा लागला कळलेच नाही,  बाहेर मात्र   पाऊसाची संतत धार  सुरूच होती, एक माणूस काय विचार करतो आहे, हे त्याला तरी कुठे कळणार होते.

दिल्लीचा पावसाळा



 

Sunday, September 13, 2015

चाय पे चर्चा- आवळ्याचे तेल (देशी / विदेशी)


ऐन जवानीच्या दिवसांत  'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण  अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या  हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.

चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच.  चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ  उघडे करतोच. चहा पिता पिता  पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो.  पंतप्रधान मोदी साहेबांनी तर  चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.

नुकताच  अशोक नगर, मध्यप्रदेशला, एक नातलगाला भेटायला गेलो होतो.  एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली.  आपको कोई  एतराज ना हो तो  "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे  निमंत्रण दिले.  आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.

दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर  समोर भिंती वर लक्ष गेल.  भारत मातेचे मोठे चित्र आणि  चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे.  मै भी बचपन में जाता था. 

थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम  घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली  अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादीगप्पांसोबत  पोहे आणि शिरा पोटात  रिचविला, नंतर  गरमागरम आले कडक चहा  आला.  आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली. 

अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५८ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हयाकडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो.  त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप  कौनसा तेल लगाते होआता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारलेआवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत.  शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतातत्याचे बोलणे  ऐकून मी अक्षरश: हादरलोच.  पुन्हा समोर भिंती वर  भारतमातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....

आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे  कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली.  एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचेवनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात.  कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते.(त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे)  एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात).  लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.

थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेहे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के).  १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.    

हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पूशेविंग क्रीम, साबण  इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात.  एमवे आंवला  तेलाची  बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल.  याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये.   मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल  ऑइल ( तीळ, खोबर्याचे, ओलिव  ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता  थबकलात्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि  परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर  त्याचे मानसिक समाधान झाले असते.  दुकानात येऊन त्याने आंवला  ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते).  निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता.  मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला  चर्चेचा योग्य परिणाम  साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.   

मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात  सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू   विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य  मानू लागले आहे.  दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो.