Sunday, March 30, 2014

महाभारत कथा: युद्धाची तैयारी

  

(उपस्थित सदस्य: सम्राट दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, दु:शासन, शकुनी, कर्ण आणि सभेत कधी कधी येणारा विकर्ण या शिवाय मुख्य शस्त्राधिकारी व गुप्तचर अधिकारी )

विकर्ण: महाराज, युद्धाचा निर्णय झाला आहे, पण आपण युद्धासाठी खरोखरच तैयार आहोत का? युद्धासाठी शस्त्रास्त्रे, दिव्यास्त्रे (प्रेक्षेपास्त्र) इत्यादींचा पर्याप्त साठा आहे का?

दुर्योधन: विकर्ण, काय म्हणायचं ते स्पष्ट बोल, कोड्यात  बोलण्याची ही वेळ नाही.

विकर्ण: कर्णासारखे योद्धे असतानाही विराट युद्धात आपल्याला पळ काढावा लागला होता, त्या बाबत काय म्हणणे आहे महाराज?

दुर्योधन: विकर्ण आम्ही युद्धाला गेलो नव्हतो. विराट नरेश,  त्रिगर्तराज सुशर्मा बरोबर युद्धात गुंतला होता. या संधीचा फायदा उचलून विराटचा हजारों गायींना पळवून आणण्याच्या विचार होता.  काही निवडक सैनिकांसह लवकरात लवकर पोहोचण्या साठी जास्त शस्त्र बरोबर घेतले नव्हते, शिवाय रथांवर जास्त सैनिक आणि शस्त्र घेतले असते तर पोहचायला उशीर झाला असता आणि मग संधी निघून गेली असती.  आम्हाला विश्वास होता गायींचे रक्षक एक तर आम्हाला पाहताच पळून जातील किंवा थोडाफार प्रतिकार करतील. पण झाले भलतेच, अर्जुनाने बाणांचा वर्षावच सुरु केला. गायींसाठी प्राण धोक्यात घालणे, म्हणजे मूर्ख पणा, म्हणून मैदान सोडावे लागले.

मुख्य शस्त्राधिकारी: महाराज, मला काही बोलायचे आहे, आपल्या शस्त्रागारात धनुष्य-बाण, भाले व गदा यांची भारी करमरता आहे. गेल्या तेरा वर्षांपासून, आपण शस्त्र किंवा विकत घेतली नाही किंवा निर्माण ही केली नाही. म्हणून त्या वेळी गरजेनुसार अस्त्र-शस्त्र पुरविली होती.

दुर्योधन: आश्चर्य आहे, गेल्या तेरा वर्षांत झालेल्या कुठल्या ही बैठकीत कुणी ही मला या बाबतीत  काहीच का सांगितले नाही?

विकर्ण: कोण सांगणार? गुरुदेव द्रोण, भीष्म पितामह,  कृपाचार्य, विदुर सर्वच पांडवांचे हितचिंतक आणि महाराज, कर्ण, दु:शासन आणि शकुनी, देशोदेशीच्या राजे-महाराज्याना बोलवून पासें खेळण्यात मग्न. महाराज, आपण राज्याची दौलत स्वखुशीने दुसर्यांवर लुटवीत होता.

शकुनी: विकर्ण, याला राजनीती म्हणतात, आज अधिकांश राजे महाराजे आपल्या सोबत आहे, ११ लाख सैन्य या घटकेला आपल्या पाठीशी आहे. आपण सहज युद्धात जिंकू. अजूनही महिना-दोन महिन्यांचा अवधी आहे. लोहारांसोबत, सैनिक आणि जनतेची मदत घेतली तर लक्षाविध शस्त्र तैयार करता येतील.  आम्ही जरी द्यूत क्रीडेत मग्न होतो, आपण काय करत होता?

विकर्ण: हा! हा! हा!, शकुनी मामा, तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर,  बाण आणि भाल्यांसाठी लोखंड कुठून आणणार. महाराज जरासंधाच्या मृत्यू नंतर मगध (बिहार) नरेश सहदेवाने पांडवांची संबंध जोडले. तांब्याच्या खाणी विराट नरेशच्या राज्यात (राजस्थान) आहे, राजकन्या उत्तर हिचे लग्न अर्जुनपुत्र अभिमन्यूशी करून, त्यांनी ही पांडवांशी सोख्याचे संबंध जोडले आहे. शिवाय कामाअभावी अधिकांश लोहार कुरु राज्य सोडून केंव्हाच निघून गेले आहे. माझ्या विषयी म्हणाल तर, ज्या दिवशी भर दरबारात कुलवधू द्रोपदीचा अपमान झाला होता, त्या दिवसापासून मी राज सभेत आणि मंत्रिमंडळाचा बैठकीत येणे बंद केले होते. आज बोलविले म्हणून आलो. ती ही खरी परिस्थितीची जाणीव करून देण्या साठी.  बाकी मी कर्णासारखा, पळपुटा नाही, महाराजांना माहित असेल महारथी कर्णानी अनेक वेळा युद्धातपाठ दाखविली आहे.   

दुर्योधन: विकर्ण शांत ही आरोप- प्रत्यारोपाची वेळ नाही,   

विदुर: महाराज, मला ही काही म्हणायचे आहे, विकर्णाने भीष्म पितामह समेत, आमच्या वर लावलेला आरोप चुकीचा आहे. त्यानी माफी मागितली पाहिजे. महाराजांनी  आमच्या सारख्या म्हाताऱ्यानी दिलेले कित्येक मोलाचे सल्ले, पायदळी तुटविले आहे.  सभेत चूप बसण्याशिवाय आम्ही काय करणार. पण या विषयावर चर्चे आधी  पांडवांची तैयारी कशी आहे, हे जाणून घेतले पाहिजे. मगच या विषयावर सार्थक चर्चा करता येईल.

दुर्योधन: गुप्तचर प्रमुख, या बाबत आपला अहवाल सादर करावा.

गुप्तचर प्रमुख: महाराज, आपले चिरशत्रू पांचाल नरेश द्रुपद युद्धाची तैयारी गेल्या १३-१४ वर्षांपासून करीत आहे,  त्यांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्र निर्मितीचा ठेका मगध नरेशांना दिला होता. अस्त्र- शस्त्रांचा मोठा  साठा  घेऊन मगध नरेश आणि पांचाल नरेश पांडवाना येऊन मिळाले सुद्धा आहे. गेल्या वर्षांत मी कित्येक वेळा, आपले सुरक्षा मंत्री आणि सेनानी पितामह भीष्म यांना या बाबत सूचना दिली होती.

भीष्म: कुरु राज्याला कुठल्या ही शत्रू पासून धोका नव्हता आणि आज ही नाही आहे. अस्त्र-शस्त्रांवर उगाच राज्याचा खजिना खर्चिक करणे व्यर्थ, असे मी मानतो. तरी ही सुरक्षेसाठी आवश्यक अस्त्र-शस्त्र खरेदी साठी कित्येकदा अर्थमंत्री दुशासनपाशी विनंती केली होती. पण अर्थमंत्र्यांनी त्या साठी कधीच पर्याप्त धन उपलब्ध केले नाही, या वर आम्ही काय करणार. त्यांनाच जाब विचारा.

विदुर: मला ही काही म्हणायचे आहे, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी, पांडव युद्धाची तैयारी फार पूर्वी पासून केली आहे. दूरदर्शीपणा दाखवून पांडवानी युद्धात पराजित राजांशी ही सोख्याचे संबंध  जोडले आहे. आर्य, अनार्य, नाग, राक्षस कुणाला ही हीन आणि परके मानले नाही.  अर्जुनाने गंधर्व राज चित्रसेन, देवराज इंद्र आणि हिमालयात राहणाऱ्या भगवान शंकर यांना प्रसन्न करून ब्रम्हास्त्र सहित अनेक दिव्यास्त्रे (आकाशगामी) मिळविली आहे. अर्जुनाने नागराणी उलूपीशी लग्न करून पूर्व देशातील नागांशी सोख्याचे संबंध जोडले. नागांनी ही बाणाच्या पात्यांना लावण्यासाठी जहाल विष  पाठविले आहे.  शिवाय भीमसेन यांनी हिडम्बेशी लग्न करून राक्षसांची संबंध जोडले, धर्मयुद्धाचे कुठले ही नियम न मानणारे रात्री युद्ध  करणारे  हे राक्षस ही पांडवाना मिळाले आहे. महाराज आपण काय केले, कुठ्ल्याशी शक्तिशाली  देवतांना प्रसन्न करून, दिव्यास्त्रे मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त कर्णा जवळ एक दिव्यास्त्र आहे, ते ही तो अर्जुना विरुद्ध वापरेल. अश्वथाम्या जवळ एक विनाशकारी ब्रम्हास्त्र ज्याचा नियमानुसार युद्धात उपयोग करता येत नाही. .. माझे आज ही म्हणणे आहे, पांडवांशी तह करणेच सद्य परिस्थितीत योग्य.

भीष्म: दुर्योधन, या घटकेला आपल्या भंडारग्रहात केवळ अस्त्र- शास्त्रांच्या नावाने केवळ भंगार आहे, जुनी जंग लागलेली धनुष्य, बाण गदा आणि तलवारी आणि त्यांची अवस्था, गदा कुणाच्या डोक्यावर मारली तर गदाच फुटून जाईल, तलवार तुटून जाईल आणि बाण तर शत्रू पर्यंत पोहचणार ही नाही. कश्याचा जोरावर आपण युद्ध जिंकणार? पराभव निश्चित आहे.

दुर्योधन: पितामह म्हणून तुमचा आदर करतो, पुन्हा पराजयाची भाषा बोलू नका. हे युद्ध आपल्यावर लादल्या गेलं आहे, आपण कुणावर आक्रमण केलेले  नाही. शिवाय आज पाच गावे पांडवाना दिली तरी ही ते पूर्ण राज्य गिळंकृत केल्या शिवाय राहणार नाही. हस्तिनापूरच्या रक्षणासाठी युद्ध हे लढावेच  लागणार. आपल्याला लढायचे नसेल तर तसे सांगा, मी कुणा दुसऱ्याला सेनापती नियुक्त करतो.

भीष्म: दुर्योधन, हस्तिनापूरच्या सुरक्षेसाठी मी वचनबद्ध, आहे. सद्य परिस्थितीत  युद्ध जिंकायचे असेल  तर  शस्त्रांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. सर्व सेनानी आणि सैनिकांना काही सूचना पाळाव्याच लागतील. एक,  शत्रू जवळ आल्या शिवाय अस्त्र- शस्त्रांचा वापर करू नये. उदा: शत्रू टप्यात आल्या शिवाय भाले आणि बाण वापरू नये. गदा उगाच हवेत फेकू नव्हे, हा भित्रा कर्ण शत्रूला दूर ठेवण्यासाठी हवेत हजारो बाण व्यर्थ करतो, कर्णासमान योद्धे युद्धापासून दूर ठेवलेले बरे.

कर्ण: बाणाचा वर्षाव करून, शत्रूच्या मनात भीती उत्पन्न करून युद्ध जिंकता येते. व्यर्थ प्राण हानी करण्यात अर्थ नसतो. शिवाय शत्रू जवळ आल्यास, त्याचा ही नेम वर्मी लागू शकतो. आपल्या सैनिकांचे प्राण धोक्यात टाकणे ही काही युद्ध नीती नाही.

भीष्म: सद्य परिस्थितीत हीच  युद्ध नीती योग्य आहे, लक्षात ठेवा, हे युद्ध जिंकण्यासाठी नव्हे एका दुसऱ्याला मारण्यासाठी आहे. कुठल्याही एका पक्षाच्या सर्व योद्धांचा  प्राणांत झाल्या शिवाय हे युद्ध संपणार नाही. मी जिवंत असे पर्यंत युद्धाची हीच नीती पाळावी लागेल. दुर्योधन तुला कर्णा सारख्या सैनिकांना  युद्धापासून दूर ठेवावे लागेल.

आपला सैनिक म्हणून उल्लेख केल्याने कर्ण चिडला आणि रागाने म्हणाला,  मला ही तुमच्या नेतृत्व खाली युद्ध  लढण्याची इच्छा नाही.  आपल्या जवळ भरपूर सैन्य आहे, मरण्यासाठी. माझी ही एक सूचना आहे. एका सैनिकापाशी ढाल आणि एका पाशी तलवार असे द्यावे, दोन सैनिक एकत्र लढतील. एक ढालीने बचाव करेल आणि दुसरा तलवारीने आक्रमण. अश्यारीतीने अस्त्र-शस्त्रांचा योग्य वापर करता येईल.

दुर्योधन: कर्णा शांत हो. पितामह, मला आपल्या सर्व सूचना मान्य आहे आणि कर्णाची दिलेली सूचना ही आवडली  या शिवाय आपल्या समोर दुसरा पर्यायच नाही. पितामह, सर्व सेनानी आणि सैनिकापाशी हे निर्देश पोहचविण्याची व्यवस्था करा. गुरुदेव, शुभ मुहूर्तावर काढा, त्यानुसार कुरुक्षेत्राकडे प्रस्थान करण्याची व्यवस्था करता येईल. बैठक समाप्तीची घोषणा झाली.

(टीप: कल्पनेत झालेल्या हस्तिनापुरातल्या उत्खननात या बैठकीची ध्वनीभित स्वामी त्रिकालदर्शी यांना सापडली होती. घटनेच्या सत्यते बाबत कुणी आक्षेप घेऊ नये. या बैठीकीची तुलना  आपल्या आजच्या सैन्य तैयारी बाबत न करणे उचित

Saturday, March 29, 2014

कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची


मार्च महिना सुरु झाल्या बरोबरच  सौ.चे उपद्व्याप सुरु होतात. आलू चिप्स, बटाटे-साबूदाण्याचे पापड आणि मुगोड्या इत्यादी प्रकार करण्याची तैयारी आणि त्या साठी आमच्या सारख्या हक्काच्या गुलामांचा वापर ही होणारच. तसे म्हणाल तर  या वर्षी हिवाळा थोडा जास्त वेळ राहिला. तरी ही होळी नंतर आकाशमधून मधून  स्वच्छ राहते.  होळी नंतर ४ दिवसांची सुट्टी घेतली, थोड आराम करावा म्हणून. पण  घरी नवरा सुट्टीवर असेल तर त्याला कसे कामात गुंतवून ठेवावे जेणेकरून सुट्टी घेण्याच्या फंदात  पडणार नाही. झाले ही तसेच. या सुट्टीत सर्वात आधी केलेला पदार्थ म्हणजे मुगोड्या.  बाजारात जाऊन मुगाची डाळ विकत आणली सौ.ने निवडून भिजत घातली. सकाळी सकाळी चहा पिऊन डाळीला धुऊन साल वेगळी केली. पाणी काढून,  मिक्सर मध्ये पाण्याचा वापर न करता पिसून काढली व एका परातीत मिश्रण पसरवले.(अर्थातच हे कार्य अस्मादिकांना संपन्न करावे लागले).  शिवाय हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक बारीक  कार्य ही कार्य अस्मादिकांनी संपन्न केले. सौ. फक्त मेथी बारीक चिरली. सर्व साहित्य पिसलेल्या डाळीत मिसळले. चवी साठी जिरे-मिरी पावडर व मीठ मिसळले. वरतून आले किसून  टाकले. मिश्रण थोड गाढे असेल तर मुगोड्या टाकायला त्रास होत नाही आणि मुगोड्या वाळतात ही लवकर. आता कृती ही खाली देत आहे:

बटाटे चिप्स, साबूदाणा-बटाट्यांचे पापड इत्यादी)  विकत घेतलेले आहे.  त्या वर छोट्या आकाराच्या मुगोड्या घातल्या. (सौ. ला मदत करावीच  लागली) थोड्या वेळ उभे राहून माश्यांना दूर ठेवण्याची कामगिरी सौ. ने अस्मादिकांवर सौपवली. (मनात मनात शिव्या देत ती जवाबदारी ही पार पडली  जवळपास पाउण तासानंतर एक  मलमलची चुन्नी  त्या वर घातली आणि क्लिपा लाऊन ती उडणार नाही याची दक्षता घेतली.   कामाच्या मोबदल्यात एक कप चहा एक्स्ट्रा प्यायला मिळाला.   दिल्लीच्या उन्हात दोन दिवस वाळायला लागले. वाळल्या वर मुगोड्या अलगद निघून येतात. त्यांना एका परातीत काढून पुन्हा दोन-तीन  दिवस ऊन दाखविले.  चांगल्या वाळल्यावर एका डब्यात बंद करून ठेवता येतात.  

[साहित्य: १ किलो धुतलेली किंवा साल असलेली मुगाची डाळ, मेथी २५० ग्रम, १ जुडी कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, जीर काळी मिरी पावडर (३ चमचे) किंवा तिखट चवी पुरती मीठ व आलं.]



मुगोड्यांचा उपयोग: मुगोड्या टाकलेल्या वांग्याची भाजी भलतीच चविष्ट लागते. शिवाय बटाट्याच्या भाजीत ही मुगोड्या टाकता येतात. पण मला नुसती मुगोड्याची भाजी जास्त आवडते आणि ती ही लोखंडी कढईत (काही भाज्या लोखंडी कढईत बनविल्या तर त्यांचा स्वाद द्विगुणित होतो उदा: वांग्याची भाजी, बारीक चिरलेल्या बटाट्याची भाजी इत्यादी ).  ही भाजी सौ. जशी बनविते, कृती देत आहे.

साहित्य: एक वाटी मुगोड्या, तेल, लसूण, किसलेलं खोबर किंवा लसूण खोबरऱ्याची चटणी (लसूण आणि खोबर किसून थोड तेल घालून  सौ.  चटणी तैयार करून ठेवते) , हिरवी मिरची १-२, हिंग,मोहरी तिखट, हळद, चिंच आणि गुळ (चिंच गुळाचे कोळ  ही करून ठेवली कि फ्रीज मध्ये १०-१५ दिवस टिकते) व मीठ.

कृती. आधी मुगोड्या लाटण्याने थोड्या फोडून घ्याव्या किंवा खलबत्यात हलक्या हाताने कुटाव्या. मग लोखंडाच्या कढईत. दोन चमचे तेल घालून त्यात मुगोड्या लाल होत पर्यंत परताव्या. मुगोड्या एका ताटात काढून कढईत पुन्हा तेल टाकावे. त्यात मोहरी टाकावी, मोहरी फुटल्यावर हिंग, हिरवी मिरची घालावी नंतर लसूण आणि खोबऱ्याची चटणी (किंवा लसूण आणि खोबर घालावे), नंतर हळद आणि तिखट टाकून तीन-चार वाट्या पाणी घालावे व एक उकळी आल्यावर मुगोड्या त्यात टाकाव्या. झाकण ठेवावे. १० एक मिनिटात मुगोड्या शिजतात. त्यात मीठ चिंच गुळाचे कोळ (एक किंवा दोन चमचे (कोळ किती गाढे बनविले आहे त्यावर अवलंबून आहे)  घालावे. पुन्हा एक उकळी द्यावी. मस्त भाजी तैयार होते. 

टीप १: काही लोक फक्त थोड मीठ घालून मुगोड्या टाकतात.

टीप २: नौकरी पेशा आणि फ्लेट मध्ये राहणार्यांसाठी: घर कामासाठीच वेळ नाही, शिवाय गच्ची ही नाही. मग मुगोड्या कश्या घालाव्या. प्रश्न आहे. पण एखाद वाटी मुगाची डाळ भिजवून, एका परातीत मुगोड्या टाकून वर पातळ कापड टाकून २-३ तास ऊन येणाऱ्या बाल्कनीत वाळवतात येतात. जास्तीस जास्त ५-६ दिवस लागतील. शिवाय रात्री पंख्याखाली ही वाळविता  येतात. 

Thursday, March 20, 2014

अथ: वांगे पुराण


७-८ वर्षांपूर्वी मामे बहिणीच्या लग्नात भंडाऱ्याला गेलो होतो. सीमांतपूजेच्या दिवशी रात्री भरपूर तेल असलेलीजहाल वांग्याची भाजी ताटात होती. एवढा जबरदस्त झणका होता कि जीभे  बरोबर मेंदू ही सी सी करू लागला. नंतर कळले पाहुणे मंडळी पुणे, मुंबई, दिल्लीची असल्यामुळे तिखट थोड कमीच टाकल होत. वांग्यांना हिंदीत 'थालीचे बैंगन' ही म्हणतात वांग्याच्या भाजी शिवाय कुठलीही थाली पूर्ण होत नाही. वांगे ही एकाच भाजी आहे जिच्या डोक्यावर छत्र अर्थात मुकुट असते म्हणून वांग्यांना  वांग्यांना भाजीचा राजा ही म्हणतात.

वांगे विकत घेताना: वांगे काळसर, जांभळे, हिरवे आणि विदर्भात पांढऱ्या रंगाचे ही मिळतात. वांगे मोटे-ताजे गोल-मटोल, लहान-लहान किंवा लांब आणि पातळ स्वरूपात मिळतात. वांग्यात  बिया जास्त असेल तर वांगे स्वादिष्ट लागणार नाही. शिवाय ढाब्यात  वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच त्या मुळे मी  ढाब्यात वांग्याची भाजी खायचो टाळतोच. वांगे विकत घेणे ही एक कला असते. आमची सौ. या बाबतीत तरबेज आहे. तिने सर्वांनाच भाज्या कश्या निवडाव्या ह्याचे उत्तम प्रशिक्षण अर्थात मलाच दिले आहे.  प्रथम वांगे ताजे दिसत आहे कि नाही पाहावे. वांग्यांना चमक देण्यासाठी तेल तर नाही लावले हे ही पाहावे लागते. मग छिद्र तर नाहीना हे बघावे. जास्ती वजन म्हणजे जास्त बिया. त्या साठी दोन वांग्यांना वेगवेळ्या हातात घ्यावे. हलके वांगे निवडावे. बाजारात जर वांग्यांना  २० रु  आणि  २५ रु. भाव असेल पण एका किलोत चार एवजी सहा वांगे मिळत असेल तर २५ रु. मोजणे फायद्याचाच सौदा ठरेल. सर्व प्रकारचे वांगे याच पद्धतीने निवडावे.  तशी ही पद्धत बिया असलेल्या सर्व भाज्या  विकत घेताना सोयीची ठरते. ढोबळी मिरची तशीच महाग असते. ह्या पद्धतीने निवडल्यास जास्त मिरच्या हाती येतील. अर्थात दुकानदार तुमच्या कडे वाकड्या नजरेने पाहिल हे ठरलेलेच.

सौ. वांग्याची भाजी चिरत असतात, आमची स्वारी जर घरी असेल अर्थात या ना त्या (?) कारणाने स्वैपाकघरात डोकवणारच. एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून त्यात चाट-मसाला नाजूक हाताने भरविल्यास  हा! हा! हा! काय स्वादिष्ट लागतात, सांगणे न वेगळे.  

आमची आई ही वांग्याच्या रायता मस्त बनवायची. शेगडीवर वांग्याला तेल लाऊन मस्त भाजायची. गोड दही (दिल्लीत दही गोडच मिळते) किंवा  गोड न मिळाल्यास थोडी साखर टाकून, फेटून घायचे. मग आई भाजलेले वांगे सोलून चार भाग करायची. मध्ये असलेल्या बिया मोठ्या सफाईने चमच्याने अलगद काढायची. असे बिया नसलेले वांग कुस्करून आधीच फेटून ठेवलेल्या दह्यात घालायची. त्यात कांदे- टामोटो बारीक चिरून भरपूर कोथिंबीर सहित टाकायची. मग मोहरी, हिंग व हिर्व्यामिर्चीची फोडणी त्यात घालायची. मस्त आणि स्वादिष्ट असा रायता आम्ही मिटक्या मारून खायचो.

वांग्या वरून आठवले, लहान असतात आम्ही सुट्टीत नागपूरला जात असो, तेंव्हा आजी एक गोष्ट नेहमीच सांगायची, आता पूर्ण आठवत नाही तरीही एका राजाला चार बोबड्या राजकन्या होत्या. एकदा त्याने प्रधानाला घरी जेवायला बोलविले.राजकन्यांना सक्त ताकीद दिली. कुणीही तोंड उघडायचे नाही. जेवताना प्रधानाच्या लक्षात आले, सगळ्या  राजकन्या चिडीचूप आहे. त्याला वाटले या मागे  काहीतरी काळबेर नक्की असावं. बायकांना त्यांची स्तुती आवडते. प्रधानाने वांग्याच्या भाजीची स्तुती करत म्हंटले आमच्या हिला तर वांग्याची भाजी करताच येत नाही  अहाहा एवढी स्वादिष्ट भाजी कशी केली. एका राजकन्येला राहवले नाही तिने म्हंटले ‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’  राजकन्यांचे  बिंग फुटले.  (पूर्ण गोष्ट लक्षात नाही आहे. कुणाला माहित असेल तर पूर्ण गोष्ट पुन्हा वाचायला मजाच येईल. [कदाचित! ही लोककथा विदर्भातील असावी]). पण एक मात्र खरं, वांग्याच्या भाजीला काही ही लागत नाही. भरपूर तेल, हिंग, गुळ, हिरवी मिरची आणि गोडामसाला किंवा गरम मसाला टाकले तरी स्वादिष्ट भाजी तैयार होते.  बाकी भरलेले वांगे बहुतेक सर्वांनाच आवडतात.

कुठल्या ही पदार्थाची शोभा वांग्या मुळे वाढतेच. तसं सर्वांनाच अनुभव असेल नेहमी बनविताना वांग्याच्या भाजीत बटाटे बायका टाकतातच. अर्थात बटाटे पोर खातात आणि वांगे मोठ्यांच्या नशिबी येतात. विदर्भात वांगे भात हा प्रकार ही प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसात,संभार मध्ये केवळ वान्गेच आढळण्याची शक्यता जास्त. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच.

काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. यात जास्त करून मुंबई- पुण्यातले नखरेल पोर असतात. अशीच एक मुंबईकर चिमुकली उन्हाळ्यात घरी आली होती.  वांगे पाहतात म्हणाली, मावशी मला वांगे आवडत नाही. आमची सौ. काही कमी नाही. सकाळी पाहटे नाश्त्यात वांग्याचे धिरडे बनविले. वांग्याचे साल काढून वांग किसून बेसन व कणकीच्या पिठात (२:१) मिसळले त्यात बारीक कापलेले, - कांदे- टामाटो, हिरवी मिरची व नेहमी प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकली. पतंजलीच्या टमाटो सॅास बरोबर तिने मिटक्या मारत धिरडे खाल्ले. (वांग्याला भाजून ही धीरड्याच्या  पिठात मिसळता येत) अर्थातच पुढे वांग्याची भाजी खायला ही ती शिकली.

शेवटी आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच.  ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात. 

Monday, March 17, 2014

ओळखा पाहू - होळीमय चारोळ्या




 (१)
गुरूलाच दाखविला
धोबीपछाड तयाने
घालूनी टोपी गुरुची
युद्धात उतरला सत्यवीर(?)

(२)
जनसमुद्र दिसत होता
डोळ्यांसमोर तयाचा
की नजर अधू जाहली
की कबूतरे उडुनी गेली?

(३)
भीष्मासम वृद्ध
हा सेनानी महान
एक पदाती सम आज
का उतरला रणांगणात?

 (४)
आधी लगीन गादीशी
मग राजकन्येशी
विच्छा त्याची आज
पूर्ण होणार का?

(५)
द्वारकेचा राजा
होणार का दिल्लीश्वर.
कि कुणा अर्जुनाचा
सारथीच ठरणार?
शेवटी द्वारकेचा राजा दिल्लीश्वर झाला.

Sunday, March 16, 2014

दिल्लीची होळी -सल्तनत काळची- अमीर खुसरोच्या लेखणीतून


मुद्राराक्षस या नाटकात मदनोत्सव उल्लेख आहे.  वसंत ऋतूत सुंदर स्त्रिया [सर्व स्त्रिया स्वत:ला सुंदरच समजतात] आपल्या प्रेमी वर आम्रमंजरी फेकायच्या). कादंबरी या उपन्यास मध्ये कामदेवाच्या मंदिराचा उल्लेख आहे आणि पूजा करण्याचे वर्णन ही आहे.

१३व्या शतकातल्या होळीचे  [दिल्ली सल्तनत] अमीर खुसरोने सुन्दर वर्णन केले आहे.

आज रंग है
ऐ माँ रंग है,
मोरे महबूब के घर रंग है।
 
दैया री मोहे भिजोया री
शाह  निजाम के रंग में
कपडे रंगने से कुछ ना होत है
या रंग में मने तन को डुबाया री
दैया री मोहे भिजोया री
शाह निजाम के रंग में।
...

‘कपड्यांवर रंग टाकल्या ने काही होत नाही. मी तर शाह निजामच्या प्रेमाच्या रंगात भिजलेलो आहे.’

हिंदू असो व मुसलमान तुर्क असो वा अरब इथे सर्व वसंत ऋतूत होळीच्या मस्तीत गुलाल उधळत आहे:

हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल,
बाइस ख्वाजा मिल बन बन आयो
तामें हजरत रसूल साहब जमाल।
हजरत...

अरब यार तेरो बसंत मनायो,
सदा रखिए लाल गुलाल।
हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल।

होळी सर्व भेदभाव विसरून आनंदाने रंग उधळण्याचा पर्व आहे. त्या काळात हिंदू- मुस्लीम भेदभाव विसरून लोक होळी खेळत होते. या सणाला धर्माचे बंधन नव्हते. आज ही आपण सर्वप्रकारचे भेद विसरून प्रेमाने व आनंदाने रंग उधळीत होळी खेळू.

सर्वाना होळीच्या शुभेच्छा.

Sunday, March 9, 2014

भगवद्गीता: मुख्य देवतेला कसे ओळखावे




येsप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:I
तेsपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् I
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च l
न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते l
(भगवद्गीता  ६.२३ व २४)

अर्थ:  भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन  करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते. खरं, म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत: जाणत नाही त्यांचे पतन होते.

स्वामी त्रिकालदर्शी म्हणाले, अर्थात कुठल्या ही देवतेची पूजा करा,  ती पूजा मुख्य देवतेपाशी पोहचते आणि त्यानुसार भक्ताला त्याचे फळ ही प्राप्त होते.

भक्ताने विचारले स्वामीजी, हे कसें शक्य आहे?

स्वामी त्रिकालदर्शी: इतर देवतांची पूजा करणारे लोक जड बुद्धीचे अर्थात बुद्धिहीन असतात, त्यांचे अध्यात्मिक पातळी कमी असते आणि मुख्य देवतेला ओळखणे त्यांना शक्य नसते.

भक्त: स्वामीजी, मुख्य देवतेला कसे ओळखावे?

स्वामी त्रिकालदर्शी: ज्या देवतेच्या समोर अन्य देवता हात जोडून उभ्या असतील. तीच मुख्य देवता. जसे श्रीरामा समोर हनुमंत हात जोडून उभे असतात. श्री राम मुख्य देवता आणि हनुमंत कनिष्ठ देवता. कनिष्ठ भक्त हनुमंताची भक्ती करतात आणि त्याला नवैद्य दाखवितात. श्री रामाच्या कृपेचा प्रसाद त्यांना ही मिळतो. हे असेच आहे, जसे संकटात अडकलेला माणूस सरकारी कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्याला नेवैद्य अर्पित करतो आणि वरिष्ठांची कृपा त्यावर होते.  आपल्याला देशात हनुमंताचे मंदिरे अधिक दिसतात कारण सामान्य माणूस अर्थात कनिष्ठ भक्त मुख्य देवता ओळखण्यास समर्थ नसतो.  हरकत नाही.  मुख्य देवतेच्या सेवकावर सुद्धा वक्र दृष्टीने पाहणे कुणाला ही शक्य नसते म्हणूनच समर्थांनी म्हंटले आहे, ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे’.  

उच्च आध्यात्मिक पातळी असलेले भक्त, मुख्य देवतेला ओळखतात. विभीषण आणि सुग्रीवाने श्री रामाची भक्ती केली, दोघांना श्री रामच्या कृपेने राज्यपद लाभले. मोठे फळ मुख्य देवतेच्याच कृपेने प्राप्त होते. अर्थात कनिष्ठ देवतेची भक्ती केल्यास लहान-सहन कामे पूर्ण होतात.  मुख्य देवताच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे, त्याचाच कृपेने देशाचा कारभार चालतो. मुख्य देवतेला न ओळखणारे चुकीच्या देवतेची भक्ती भक्ती करतात आणि संकटात पडतात. अश्या मूढ भक्तांचा सर्वनाश अटळ असतो.  

भक्त: स्वामीजी, आपल्या देशात अनेक देवता आहेत. त्या आपसांत भांडतात ही. अश्या परिस्थितीत मुख्य देवता कशी ओळखायची? कुठल्या देवतेला मतरुपी नेवैद्य अर्पित करावा.

स्वामी त्रिकालदर्शी:  मुख्य देवता स्वर्गात सिंहासनारूढ असते, अन्य कनिष्ठ देवता किती ही आपसांत भांडत असल्या तरी मुख्यदेवतेचे सिंहासन आपल्या पूर्ण ताकदीने उचलून धरतात. काही देवता हात जोडून समोर उभी राहतात.  पूर्वी महाभारताच्या काळी, इंद्राने कर्णाची कवच-कुंडले मागून, त्याला शक्तीहीन केले होते. त्याच प्रमाणे मुख्य देवते जवळ ब्रम्हास्त्रापेक्षा ही घातक असे  ‘शुकास्त्र’ असते. मुख्य देवता बनण्यासाठी शुकास्त्र हे साधावेच लागते. शुकास्त्राच्या पाशात अडकून, कनिष्ठ देवता मुख्य देवते समोर हात जोडून उभ्या राहतात आणि तिचे सिंहासन उचलून धरतात.  अश्यारितीने मुख्य देवता कनिष्ठ देवतांना अर्पित केलेला नैवेद्य (मत) हरण करते. भक्त गोंधळात पडतो.  वत्सा तुला माहितच आहे रामायणात बाली ज्याच्या बरोबर युद्ध करीत असे, त्या योद्ध्याचे अर्धे बळ बालीला मिळत असे. त्यामुळे त्याला पराजित करणे कोणत्याही योद्ध्याला शक्य नव्हते. स्वयं श्री रामाला बालीवधासाठी क्षत्रियांना न शोभणारा मार्ग वापरावा लागला. असो.  मुख्य देवता ही प्रसन्न होऊन, कनिष्ठ देवतांना ‘सुवर्णास्त्र’ प्रदान करते. सुवर्णास्त्राच्या कृपेने कनिष्ठ देवता स्वर्गसुखाचा उपभोग घेतात. कनिष्ठ देवतांची भक्तांवर कृपा करण्याची क्षमता ही कमी असते,  त्यांच्या भक्तांच्या पदरी निराशाच पडते.  दुसरीकडे पराजित देवतांना स्वर्गातून हाकलून दिल्या जाते अश्या देवतांची भक्ती करणार्याचा विनाश निश्चित असतो.

स्वामी त्रिकालदर्शी म्हणतात, अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिताअन्य देवतांची उपासना करतात आणि त्यांचे पतन होते. अध्यात्मिक दृष्टीने उन्नत लोक मुख्य देवतेला ओळखतात आणि तिची पूजा करतात आणि आपल्या सर्व भौतिक कामना पूर्ण करतात. वत्सा, आध्यात्मिक पातळीच्या उच्च स्तरावर पोहचल्यावर तू हीमुख्य देवतेला ओळखण्यास समर्थ होईल.  तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. 

Sunday, March 2, 2014

वासंतिक कविता / एक गुलाबी कळी



रोज दुपारी जेवण झाल्यावर  एक चक्कर विजय चौक पर्यंत मारून येतो. आजकाळ  रस्त्याच्या काठावर भरपूर फूले लागलेली आहे. एक भुंगा एका कळी  भोवती  फिरत होता. जवळच एक कळी कोमजलेली दिसत होती. काय बरे झाले असेल, मनात विचार आला. भुंगा तर आवाराच असतो फुलां-फुलां वर फिरणारा   

(१)  
एक गुलाबी कळी  
गालात लाजली
भुंग्याच्या प्रेमात 
जाउनी ती पडली
गत वर्षीची चूक 
पुन्हा तिने केली
विरहाच्या अग्नीत 
बेचारी कोमेजली.

(२)

वासंतिक प्रेमाला
ग्रीष्माची वेदना
विरही अश्रुना
श्रावणी आसरा.


Saturday, March 1, 2014

अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा


उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील  टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल  सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार?  काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.

खरं म्हणाल तर शेरखान जंगलाचा राजा होता. त्याच्या डरकाळीने  जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप व्हायचा. भले मोठे रेडे ही त्याला घाबरायचे.  शेरखान जंगलाच्या मध्यभागी असलेल्या तलावाजवळ दबा धरून बसायचा, संध्याकाळी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या हरीण, डुक्कर आणि कधी कधी तर एखाद्या रेड्याचा ही शिकार करायचा. असं सुख-समाधानाने आयुष्य जगत होता. अचानक त्याचा सुखाला ग्रहण लागले.  महाबली नावाचा एक रेडा जंगलात आला. आधी रेड्यांच्या कळपावर त्याने कब्जा केला नंतर त्याने स्वत:ला जंगलाचा राजा घोषित केले. सर्व शाकाहारी रेड्यांना तो म्हणाला आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे. शेरखान पासून मी सर्वांचे रक्षण करेल. कुणावर शेरखान ने हल्ला केला तर मला आवाज द्या, मी  धावत मदतीला येईल. फक्त शेरखान वर लक्ष ठेवा. मी त्याला  जंगलातून हाकलून लावेल किंवा आपल्या शिंगांच्या प्रहाराने त्याला यमसदनी पाठवेल. महाबलीने रेड्यांसह जंगलातल्या मध्यवर्ती तलावावर आपला कब्जा केला. शेरखान ने पळून, टेकडी खालच्या गुहेत शरण घेतली. महाबली रेड्याने कित्येकदा रेड्यांसोबत त्याच्या वर हमला केला, नेहमीच टेकडीवर चढून शेरखान आपले प्राण वाचवत असे. तसं म्हणाल तर अधिकांश जंगलावर महाबली रेड्याचा कब्जा झालेला होता. आता शेरखान नुसता नावाचा राजा होता.

एक दिवस सकाळी, तवाकी नावाचा तरस आपल्या बायको व पोरांसह जंगलात आला. एका रेड्याने त्याला बघितले. तो तवाकीला म्हणाला, तरसा या जंगलाचा राजा महाबली रेडा आहे, त्याने तुला बघितले तर तुझे काही खरं नाही. शेरखान सुद्धा त्याला भिउन लपून बसला आहे. मांसाहारी जनावरांना या जंगलात येण्याची सख्त मनाई आहे.  त्याचे बोलणे ऐकून तवाकी जोर-जोरात हसूं लागला. तुमच्या सारखे आम रेड्यांना दोघांनी ही मूर्ख बनविले आहे. रेडा म्हणाला: कसं,   तवाकी: मूर्ख रेड्या,   महाबली कधीच शेरखानला मारणार नाही आणि शेरखान ही हरीण आणि ससे खाऊन आपला मस्त राहील. तवाकी पुढे म्हणाला आम्ही तरस रेड्याना खात नाही, माझ्या परिवार पासून रेड्यांना काहीच भीती नाही. छोटे हरीण,ससे  ही गवत खातात, त्यांना मारून आम्ही आपली गुजराण करतो, त्यात तुम्हा रेड्यांचे ही भलंच आहे तुम्हाला जास्त गावात खायला मिळेल. शिवाय तू इथे पहारा देतो आहे आणि महाबली माद्यांबरोबर मजा मारतो आहे. तवाकीचा बाण वर्मी लागला. रेडा म्हणाला खरं, महाबली आल्या पासून मादींकडे ढुंकून ही पाहणे अशक्य. तवाकी म्हणाला मित्र चिंता नको करू, मी राजा झाल्यावर सर्व रेड्यांना, मादीचे सुख मिळेल.  उद्या मी दोघांचा वध करून राजा बनणार आहे. फक्त तुम्ही तमाशा पाहत राहा, मधे पडू नका. ही आनंदाची बातमी सर्व रेड्यांना जाऊन सांग.
 
दुसऱ्या दिवशी  भल्या पाहटे, तवाकी आपल्या परिवार सह  महाबली समोर उभा ठाकला व त्याला म्हणाला, महाबली आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे, तू जंगल सोडून पळून जा अन्यथा मला तुझा वध करावा लागेल. महाबली, हसून म्हणाला, मूर्ख एका पायेच्या लाथेने तुला तुडवेल,  ‘जान प्यारी असेल’,  तर आला तिथे परत जा. तवाकी: तुझे दिवस भरले, हिम्मत असेल तर लढ. महाबली म्हणाला: रेड्यांनो, याला हाकलून लावा. पण सर्व रेडे शांत उभे राहिले, कुणीच प्रतिसाद दिला नाही. महाबली म्हणाला तुम्ही शांत का? पळवून लावा त्याला. त्या वर एक रेडा म्हणाला: महाबली, तवाकी पासून आम्हाला काहीच भीती नाही, उलट तो राजा झाला तर आमच भलंच होईल. तुझ्या जाचा पासून तरी मुक्ती मिळेल. महाबली उतरला: असं होय. आधी याला संपवतो, नंतर तुम्हाला बघतो.

उंदीर-मांजराचा खेळ सुरु झाला. महाबली तवाकी वर हल्ला करायचा, तर त्याचे पोरं मागून हल्ला करायचे. दिवसभर त्यांच्या मागे पळत-पळत महाबली दमून गेला.  उगाचच याचा नादी लागलो, असे त्याला वाटू लागले. एकट्याने तवाकीच्या परिवाराशी निपटणे शक्य नाही. बाकी रेड्यांची मदत नक्कीच लागेल. नकळत महाबली टेकडी जवळ पोहचला होता. इथे जवळच शेरखान असायला पाहिजे. संध्याकाळ ही होत आली आहे. समोर पाण्यचे डबके दिसले.  महाबलीला तहान ही लागली होती, पाणी पिऊन आपण परत फिरले पाहिजे. तवाकीचे काय करायचे, उद्या बघू. महाबलीला तहान लागली आहे, तवाकीने ओळखले उडी मारून तो  सरळ महाबली समोर येऊन उभा राहिला व म्हणाला, महाबली कालच शेरखानला मारून मी त्याच्या गुहे वर व या तलावावर अधिकार केला आहे. पाणी पिण्या आधी, माझ्याशी युद्ध करावे लागेल. आता मात्र महाबली भयंकर वैतागला म्हणाला  सकाळ पासून ऐकतो आहे, युद्ध कर युद्ध कर, पळपुटा लेकाचा.  हिम्मत असेल तर तसाच समोर उभा राहा. या वर तवाकी उतरला, काल शेरखान ही असेच म्हणत होता, शेवट काय झाले, जगातून गेला बिचारा . आज तुझी पाळी आहे, तुझे मरण मला समोर दिसत आहे, ये हल्ला कर आपल्या तीष्ण नखांनी तुला फाडले नाही तर माझे नाव तवाकी नाही. याहून अधिक ऐकणे महाबलीला शक्य नव्हते, आपली खुर आणि शिंग आपटत, तो तवाकी वर चालून गेला. तवाकी आपल्या जागेवरून तिळमात्र ही हलला नाही.  महाबली आपल्या शिंगात उचलून तवाकीला फेकणारच, पण आपल्या पाठीवर कुणीतरी झेप घेतली आहे, असे त्याला वाटले, पण क्षणातच त्याची मान शेरखानच्या जबड्यात होती. तवाकी बरोबर वादावादी होत असताना शेरखान हळू हळू सरकत महाबलीच्या मागे पोचला होता आणि त्याने महाब्लीच्या  मानेवर सटीक हमला केला. त्याच क्षणी तवाकीने ही आपल्या परिवारासह महाबली वर हल्ला चढविला. त्याचा बायको ने महाबलीची शेपटी पकडली, पोरांनी त्याचे पाय पकडले. तवाकीने दोन्ही पंज्यानी त्याचे शिंग पकडले.  बेचारा महाबली काहीही करू शकला नाही.

कित्येक महिन्यानंतर, शेरखान ने रेड्यावर यथेच्छ ताव मारला. तवाकीच्या परिवाराला ही त्यात हिस्सा मिळाला. आनंदाने तवाकीने ही शेरखान महाराजांचा विजय असो अशी घोषणा दिली.  शेरखान ने पूर्वी प्रमाणेच डरकाळी फोडली. जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप झाला. रेड्यांना आपण मूर्ख बनलो हे जाणविले. पण आता काही उपयोग नव्हता. शेरखानने आपल्या बुद्धीने हे युद्ध जिंकले होते.

सूतजी म्हणाले हे राजन, कलयुगात जो कुणी या कथेचे मनपूर्वक श्रवण करेल, विपरीत परिस्थितीत ही शेरखानप्रमाणे आपल्या गादीचे रक्षण करण्यास समर्थ ठरेल.