Thursday, May 26, 2016

लाकूडतोड्याची लोखंडी कुल्हाडी - कथेचा सार



लाकुडतोड्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहित असेल. लाकुडतोड्याची कुल्हाडी पाण्यात पडली. लाकुडतोड्याने जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली. जलदेवता सोन्याची, चांदीची आणि लोखंडी कुल्हाडी घेऊन वर आले. लाकुडतोड्याने लोखंडी कुल्हाडी आपली म्हणून ओळखली. जल देवता प्रसन्न झाले, लोखंडी कुल्हाडी सोबत सोन्या आणि चांदीच्या कुल्हाडी हि त्याला दिल्या. 

काही दिवस आधी एका फेसबुक मित्राचा लेख वाचला होता. लेखाचा सार काहीसा असा होता- नीती कथा चतुर लोकांनी सामान्य लोकांना मूर्ख बनविण्यासाठी लिहिल्या आहे. सामान्य माणसांनी केवळ श्रम करावे आणि दाल-रोटी खाऊन गुजरा करावा. लेखकाचे म्हणणे होते, त्या लाकुडतोड्याने सोन्याची कुल्हाडी आपली म्हणून ओळखायला पाहिजे होती. कुल्हाडीतल्या सोन्याचा निवेश करून दुसर्याच्या श्रमावर लाकुडतोड्या चैन करू शकत होता.  बहुतेक नीती कथांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगळी असल्यामुळे त्यांना तसे वाटले असेल. 

लाकुडतोड्या हा सामान्य माणसाचा प्रतीक आहे. समजा त्याने सोन्याची कुल्हाडी स्वत:ची म्हणून ओळखली असती. ते सोने विकून त्याला आजच्या हिशोबाने २५-५०  लाख रुपये मिळाले असते.  आता श्रम करण्याएवजी हा पैसा त्याने निवेश करायचे ठरविले.  सरकारी योजनांमध्ये ८-9 टक्क्यापेक्षा जास्त मिळत नाही.  शिवाय वाढत्या महागाईमुळे पुढील काही वर्षांनी त्या व्याजावर चरितार्थ चालविणे त्याला शक्य होणार नाही.  दुसरा मार्ग म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक.  पण  त्या साठी हि  मानसिक श्रम हे लागतेच. कुठली कंपनी चांगली. त्या कंपनीचे भविष्य काय आहे याचे आंकडे सामान्य माणसांना हि थोडे मानसिक श्रम करून मिळविणे शक्य आहे. पण सरकारी आणि आंतरराष्ट्रीय नीती आणि नियम, त्यांच्यात होणारे बदलाव आणि आपल्या देशात तर मालकांची नियत, याचा अंदाज सामान्य माणसे सोडा, शिकलेल्यानाही करता येणे शक्य नाही. या शिवाय बाजारात प्रतिस्पर्धा हि असतेच. माझ्या  अनेक मित्रांनी, अगदी चांगल्या शिकलेल्या आणि सरकारी नौकरी करणार्यानी, बाजारात गुंतवणूक केली. एखाद-दुसरा अपवाद सोडता, सर्वांनाच नुकसान झालले पाहिले आहे.  बाबूलोक शिकलेले असले तरीही गुंतवणूक केल्याने त्यांना नुकसानच होते. लाकुडतोड्या सारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांचे काय होईल. तूर्त सामान्य माणसांसाठी शेअर बाजार नाही. तिसरा मार्ग, व्याजावर पैसा उधार देणे. पण पैसा वसूल करण्यासाठी  दबंगई लागते.  सामान्य माणूस ती कुठून आणणार. शिवाय श्रम न करणार्याला लक्ष्मीची किंमत कळणे शक्य नाही. आपल्या बाप दादांची जायदाद फुंकतानाचे अनेक उदाहरण मी स्वत: डोळ्यांनी पाहिले आहे. आपण हि पाहिले असतील. 

लाकूडतोड्या कडे स्वत:ची लोखंडी कुल्हाडी आहे. अविरत परिश्रम करण्याची त्याची मानसिक आणि शारीरिक तैयारी आहे.  वाढत्या महागाई सोबत तोडलेल्या लाकडांची किंमत हि महागाई अनुसार त्याला मिळत राहील.  नुकसान होण्याची संभावना नाही. पण लोखंडी कुल्हाडी सोबत चांदी,सोन्याची कुल्हाडी मिळविणे हि त्याला शक्य होणार नाही.   

काल रात्री सहज आस्था चेनल लावले. रामदेवबाबांचे भाषण सुरु होते. त्यात त्यांनी म्हंटले अविरत परीश्रामासोबत ज्ञान, तकनिकी आणि स्किल यांचा मिलाप केला तर परिस्थिती सहज बदलता येते.  विषय वेगळा होता तरी सर्वव्यापक सत्य त्यात दडलेले होते. 

लाकुडतोड्या ज्या गावात किंवा नगरात लाकूड विकतो. तिथल्या लोकांना लाकडाच्या कुठल्या वस्तूंची गरज आहे हि माहिती मिळविणे म्हणजे ज्ञान. त्या वस्तूंचा निर्माण सर्वश्रेष्ठ पद्धतीने कसा करायचा, त्या साठी लागणारी औजारे, निर्मितची पद्धत इत्यादी म्हणजे तकनीक आणि ती आत्मसात करणे म्हणजे स्कील.  शिवाय त्याने निर्मित केलेल्या वस्तू ग्राहकांच्या खरोखरच गरजेच्या आहे, हे त्यांच्या  डोक्यात  उतरविण्यासाठी पण ज्ञान आणि स्किल दोन्ही लागतात.  थोडे मानसिक आणि शारीरिक श्रम करून लाकूडतोड्यासारखा सामान्य माणूस हि काहीप्रमाणात ज्ञान, तकनीक आणि स्कील आत्मसात करू शकतो. 

लाकूडतोड्याने आपल्या अविरत परिश्रमाला ज्ञान, तकनिकी आणि स्कीलची जोड दिली आणि लाकडांं सोबत अन्य घरगुती किंवा शेतकऱ्याला लागणार्या वस्तूंची पण निर्मिती केली आणि ती विकली तर त्याचे उत्पन्न निश्चित वाढेल. लोखंडी कुल्हाडी सोबत चांदी आणि सोन्याच्या कुल्हाडी लाकूडतोड्याला सहज उपलब्ध  होतील.  

जलदेवताने बहुतेक हाच संदेश लाकूडतोड्याला दिला आणि त्याने तो प्रत्यक्षात उतरविला. हेच  या नीती कथेचे  सार आहे.  

No comments:

Post a Comment